Skip to main content

नवोदित कवींना आवाहन

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 05/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी- कै. सौ. प्रभावती केसकर यांच्या जन्मशताब्दीची या २५ ऑक्टोबर ला पूर्तता होत आहे. या जुन्या काळातल्या लेखिका-कवयित्री. त्यांनी आपल्या काव्यगायनाने अनेक समारंभ व कवीसंमेलानातून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कविता आशयपूर्ण तर होत्याच, शिवाय गेयही होत्या. त्यांनी केलेल्या मुक्तछंदात्मक कवितांमधून ही एक लय, नाद जाणवत राहते. त्यांच्या काव्यसंग्राहासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत शिरीष पै म्हणतात, …… त्यांची कविता वाचत असताना मला असे नाही वाटले कि काहीतरी कालबाह्य, जुने, असे काही वाचत आहोत, उलट आजच्या बर्याचश्या कवितेतला तोचतोचपणा पाहून कंटाळलेल्या मनाला प्रभावती केसकरांच्या काव्यातील वेगळेपणा टवटवीत, ताजा आणि प्रसन्न करणारा वाटला. त्यांच्या कवितेतून घरावर, पतीवर, मुलाबाळांवर प्रेम करणारी वत्सल माता कित्येकवेळा वाचकांच्या भेटीला येते, कधी देशावर प्रेम करणारी वीरललना तर कधी परमात्म्याची आळवणी करणारी, भक्तिरसाच्या अविष्कारात रमलेली ईश्वराची निस्सीम सेविकाही इथे भेटते. या विविध रूपातून जाणवतो तो कवयित्रीमधला ध्येयवादीपणा, तत्वनिष्ठा, उदात्ततेची उपासना. आजच्या नव्या मराठी कवितेत बर्‍याचदा जाणवणारी विफलता, कटुता किंवा विकृती इथे बिलकुल सापदत नाही. प्रतिमांच्या अतिरेकी वापरामुळे गुदमरलेल्या आजच्या कवितांशी तुलना करता प्रभावती केसकरांची गोड, प्रासादिक, चटकन मनाला भिडणारी कविता मनाला खूप शांती आणि मधुरतेची अनुभूती देऊन जाते....... त्या काळात प्रसाद, सह्याद्री अश्या मासिकांमधून त्यांनी विपुल कथालेखन ही केले आहे. सोलापूर येथील दीर्घ वास्तव्यात त्या तेथील साहित्य परिषदेच्या पदाधिकारी होत्या. सोलापूर येथील पहिले साहित्य संमेलन(~१९५६ मध्ये) साजरे होण्यात त्यांचा पुढाकार होता. पुढे पनवेललादेखील साहित्य परिषदेची शाखा स्थापन करून पहिले कुलाबा जिल्हा साहित्य संमेलन त्यांच्या पुढाकारातून साकार झाले. इतरही अनेक ठिकाणी कवीमंडळ स्थापन करून नवोदित कवींना त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. श्री. द्वा. वा. केळकर यांनी सुरु केलेल्या दासबोध अभ्यासक्रमासाठी अनेक ठिकाणी दासबोध अभ्यास मंडळे सुरु केली व स्वत: अनेक वर्षे त्यातील अभ्यासार्थीना मार्गदर्शन दिले. कायम संसाराचा भार सांभाळत एकीकडे त्यांनी त्यांची काव्यप्रतिभा जागी ठेवली व स्वत:च्या व इतरांच्याही कवितेचा आनंद त्या देत घेत रहिल्या. या वर्षी जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे मंगलस्मरण करताना आम्ही सर्व कुटुंबीयांनी एक छोटासा काव्यवाचनाचा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. त्यात कै. प्रभावती केसकरांच्या काही व इतर निमंत्रितांच्या काही कविता वाचल्या जातील. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ खाली दिली आहेच. कविता वाचनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी सर्वांना खुला आहे. त्यानिमित्त मी इथल्या, आन्तरजालावरच्या व इतरही नवोदित कवींना आवाहन करू इच्छिते की त्यांनी देखील आपल्या स्वतःच्या निवडक कविता या कार्यक्रमात सादर कराव्यात व कार्यक्रमाचा आनंद वाढवावा. इथे वयाची अट नाही. कविता करणार्‍या लहान मुलांना तर आग्रहाचे बोलावणे आहे असे समजावे. स्थळ: कॉन्फरन्स हॉल, न्यू बॉम्बे स्पोर्ट्स क्लब, सेक्टर ४, वाशी. वेळ : संध्याकाळी ६ ते ९. दिनांक: ५ ऑक्टोबर २०१३ कृपया कवितावाचनाची इच्छा असणार्‍या कवींनी आधी खालील पत्त्यावर संपर्क करून आपल्या निवडक कविता पाठवाव्यात. इमेल: dr.meerakeskar@gmail.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3726
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

मी नवोदित असल्याने नक्की येतोय.

शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे

कार्यक्रमास शुभेच्छा! ! आणि नवोदित कवींना विनंती ! त्यांनी श्रोत्यांच्या सहानुभूतीचा अंत बघणार्‍या कविता सादर करु नयेत यासाठी. ------------------------------------------------------------------------------------------- कोणे एकेकाळी अशाप्रकारचा उपक्रम राबवून सहनशीलतेचा अंत झालेला ..... धर्मराज मुटके

कार्यक्रमाला येण्यासाठी मुंबई, ठाण्यातल्या मिपाकरांना आमंत्रण आहे. तुमच्या ओळखीच्या अजून कुणाला आवड असेल तर नक्की कळवा.

या निमित्ताने माझा परममित्र (फोटू दिसत नाही फेम) गणेशा याचे काव्यवाचन झाल्यास त्याची खबरबात अनायासे कळेल.

खूप खूप शुभेच्छा! स्वाती

शुभेच्छा! वृत्तांत कवितांसहीत (वाचकांना काही थोडं का होईना समजणं अपेक्षित- कोण रे तो 'अक्कल वाढवा' म्हणतोय? ;) ) यावा ही नम्र विनंती.

कार्यक्रमाला शुभेच्छा.

कार्यक्रमाला शुभेच्छा! विडंबनकारांनी जरूर हजेरी लावा आणि मन लावून ऐका!

कार्यक्रमास शुभेच्छा आहेतच. कार्यक्रमाचा वृत्तांत्त आणि छायाचित्रे मिपावर टाकून आम्हा दूरदेशियांना उपकृत करावे ही विनंती.