✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लोकमान्य टिळक आणि दासबोध

द
दासबोध.कॊम यांनी
गुरुवार, 07/18/2013 - 17:32  ·  लेख
लेख
लोकमान्यांचे नाम आणि काम माहिती नाही असा मनुष्य भारतात तरी सापडणार नाही. लोकमान्यांनी आपल्या असामान्य बुद्धीमत्तेच्या जोरावर अफ़गाणिस्तान ते ब्रह्मदेश असा विस्तारलेला उभा भारतवर्ष नुसता ढवळून काढला होता! “स्वराज्य” मिळविण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या थोबाडावरच फ़ोडलेली घनगंभीर डरकाळी तर समस्त साम्राज्यवाद्यांचा थरकाप उडविणारी ठरली! अशा या लोकमान्यांच्या अंतरंगात डोकावून पाहता आले तर काय भाग्य ठरेल ते! ज्या लोकमान्यांचा मेंदु मरणोत्तर आम्हाला अभ्यासार्थ द्या असे इंग्रज त्यांच्या कुटुंबियांच्या मागे लागले होते, त्या लोकमान्यांच्या मेंदुची जडणघडण खरोखरीच कशी बरे झाली असेल? सुदैवाने याचे उत्तर शोधता येईल इतके लिखाण त्यांनी अपल्या परमव्यस्त राजकीय व सामाजिक आयुष्यातूनही वेळ काढून करून ठेवलेले आहे, हे आपले भाग्यच होय! Arctic Home in the Vedas अथवा आर्यांचे मूळ वसतीस्थान, The Orion अथवा वेदकालनिर्णय,Vedic Chronology & Vedanga Jyotish अथवा वैदिक कालनिर्णय व वेदांग ज्योतीष यांसारखे विद्वज्जड इंग्रजी ग्रंथ तर त्यांनी लिहिलेच परंतु आपल्या परमप्रीय अशा संस्कृतीचा परमोच्च बिंदु ठरणारी जी भगवद्गीता तिच्यावर मार्मिक, समयोचित व अतीशय सखोल भाष्य करणारा गीतारहस्यासारखा पारमार्थिक ग्रंथही त्यांनी लिहिला तोही अतीशय ओघवत्या अशा मराठी भाषेत! त्यांच्या या ग्रंथाबद्दल महात्मा गांधी कानपूर अधिवेशनात म्हणाले होते की गीतेवर इतक्या अधिकाराने भाष्य करणारा दुसरा ग्रंथ कधी झाला नाही व लवकर होण्याचा संभवही नाही! अरविंदबाबू घोष या ग्रंथाबाबत म्हणतात,”मराठीतील पहिल्या प्रतीचा हा पहिला प्रचंड गद्यग्रंथ आपल्या सूक्ष्म व व्यापक विचारप्रणालीने व सफ़ाईदार प्रभावी लेखनशैलीमुळे अभिजात वाङमयात समाविष्ट होतो.मराठी साहित्याच्या आणि नीतीशास्त्राच्या इतिहासांत टिळक मनात आणते तर त्यांस अद्वितीय स्थान मिळाले असते, असें या एकाच ग्रंथाने सिद्ध केलें आहे. त्यांची कीर्ती अजरामर करणारे त्यांचे संशोधनग्रंथ जीवितकार्यात घ्याव्या लागलेल्या सक्तीच्या विश्रांतीच्या काळात (तुरुंगवासात) निर्माण झाले ही घटना अत्यंत अर्थपूर्ण आहे...” अशा या महान ग्रंथाबाबत स्वत: लोकमान्यांचे विचार काय आहेत? आपल्या प्रस्तावनेची सुरुवातच ते “संतांची उच्छिष्टें बोलतों उत्तरे । काय म्या पामरें जाणावे हे ॥” या तुकोबारायांच्या अभंगाने करतात! अर्थात त्यांना हे स्पष्टपणे अधोरेखित करावयाचे आहे की या ग्रंथात माझे कर्तृत्व फ़रसे नसून सर्व संतांच्या ज्या ज्या ओळी मी आजवर वाचल्या आहेत, अनुभवल्या आहेत त्यावरील माझे चिंतनच मी मांडतो आहे. मोठी माणसे मोठी का असतात याचे उत्तर त्यांच्या या खरोखरीच स्वत:कडे छोटेपणा घेण्याच्या सवयीत दडलेले असते! उभा दासबोध कथन करून होताच समर्थ म्हणतात, “सकळ करणे जगदीशाचे। आणि कवित्वची काय मानुषाचे। ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे।“ लोकमान्यांच्या या प्रस्तावनेत मोरोपंताची आलेली एक आर्या तर तिला फ़ार कारुण्यप्रदता प्रदान करून जाते. लोकमान्य म्हणतात, मोरोपंतांच्या खालील आर्येप्रमाणे आमची अवस्था झालेली असल्याने हा लेखन प्रपंच करितो आहे. आर्या: कृतांतकटकाsमळध्वजजरा दिसो लागली। पुर:सर गदांसवे झगडीता तनू भागली॥ या आर्येचा थोडक्यात अर्थ असा की माझा सर्व इंद्रीयजन्य गर्व व अहंकार यांचा परिहार करणारे हे भयप्रद वार्धक्य आता मला जवळच दिसू लागले आहे आणि आता ते मला गिळंकृत करणार यात शंका नाही! थोडक्यात आता आपले उतारवय देखील संपत आल्याचे लोकमान्यांना लक्षात आल्याने त्यांनी विनाविलंब हा ग्रंथ सिद्ध करून पुढील अनेक पिढ्यांवर आजन्म उपकार करून ठेवलेले आहेत! आज ब्रह्मदेशात असलेल्या मंडालेच्या कारागृहात सिद्ध झालेला हा ग्रंथ लिहिण्यासाठी टिळकांना त्या काळी कलकत्त्याच्या गवर्नर साहेबाची लेखी परवानगी मागावी लागली होती! व ती दिल्याचा व लेखणासाठी लागणारे संदर्भग्रंथ पुण्याहून मंडालेला नेऊ दिल्याचा उल्लेखही लोकमान्य प्रस्तावनेत करतात! या सर्व संदर्भग्रंथांची यादीही टिळकांनी ग्रंथारंभीच दिलेली आहे, आणि इथेच आपल्या विषयाला सुरुवात होते! कारण या यादीत समर्थ रामदास कथित दासबोध या ग्रंथराजाचा देखील समावेश आहे! पुढे ग्रंथात अनेक ठिकाणी ते समर्थांची विविध वचने उधृत करतात. त्या वचनांचा नेमकेपणा व चपखलपणा व दासबोधाचा एकंदरीतच असलेला अवाढव्य विस्तार पाहाता, टिळकांवर समर्थ विचारांचा किती जबरदस्त पगडा होता तसेच त्यांचा दासबोधाचा किती सखोल अभ्यास होता हेच लक्षात येते. सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे॥असे निक्षून संगणा-या समर्थांच्या आज्ञेचे, ’गणेशोत्सव’ व ’शिवजयंती’ यांचा आरंभ करून, तितकेच तंतोतंत पालन करणारे लोकमान्य टिळक, हे म्हणुनच इतिहासातील पहिले अनुयायी ठरतात! टिळक जर हे उत्सव सुरु करून तत्कालीन हिंदु समाजास एकत्र न करते तर कदाचित आज आपल्याला हे स्वातंत्र्यदेखील न लाभते. ग्रंथाच्या अगदी आरंभीच टिळक बाराव्या दशकात आलेल्या उत्तमपुरुषलक्षणांचा आणि एकोणिसाव्या दशकात राजकारणनिरूपणा नंतरच सांगितलेल्या विवेकलक्षण निरूपणाचे दाखले देतात! भांबावलेल्या अर्जुनाला कृष्णाने केलेला उपदेश सांगण्याच्या निमित्ताने लोकमान्य तत्कालीन भारतीय समाजालाच जणु समर्थांनी केलेल्या लोकजागरणाचे स्मरण पुन:श्च करून देतात! कीर्ति पाहतां सुख नाहीं | सुख पाहातां कीर्ति नाहीं | केल्याविण कांहींच नाहीं | कोठें तरी || या मूळ दासबोधातील ओळी उधृत करतानाच टिळक आणखी एक गौप्यस्फ़ोट न कळत करून जातात! आणि तो म्हणजे त्यांना दासबोधातील अनेक वचने मुखोद्गत असल्याचा! कसे ते पाहुयात! वरील वचन हे dasbodh.com वरील समर्थवाग्देवता मंदीर प्रकाशित कल्याणस्वामींच्या मूळ दासबोध प्रतीतून घेतलेले आहे. टिळकांनीही त्यांचे पुस्तकासाठी हीच प्रत संदर्भ म्हणून वापरल्याचे ग्रंथातच नोंदवून ठेवलेले आहे. परंतु तरीही वरील ओवी देताना त्यांनी किंचित वेगळी म्हणजे खालीलप्रमाणे दिलेली आहे. कीर्ति पाहों जातां सुख नाहीं । सुख पाहतां कीर्ति नाहीं॥ लोकमान्यांसारख्या कट्टर गणीतीने व हाडाच्या शिक्षकाने जर पुस्तकात पाहून ही ओळ उतरवली असती तर ती नक्कीच जशीच्या तशीच उतरवली असती. परंतु त्यात वर निर्दिष्ट केलेले पाठभेद आढळतात, याचाच अर्थ ही ओवी त्यांना तोंडपाठ असणार व ती त्यांनी जशीच्या तशी लागलीच उतरवलीही असणार! पाठ करताना अर्थातच काही शब्द आपण चुकून बदलूनच लक्षात ठेवतो, त्यातलाच हा प्रकार आहे. कारण टिळकांच्या या लिखाणाचे प्रूफ़ रीडींग चे किचकट काम रा.द. पराडकर, रा.स.पिंपुटकर व ह.र.भागवत यांनी अतीशय नेटकेपणाने केल्याचा उल्लेख स्वत: टिळकांनीच करून ठेवलेला आहे. त्यातून अशी ओवी न सुटती! लोकमान्य टिळकही दासबोध नित्य वाचत व त्यांना तो मुखोद्गतही होता, या विचारांनीच अंगावर एक सुखद शहारा येतो! यातले सूख समर्थभक्तच जाणोत! याच पृष्ठावर टिळक एक मनाच श्लोकही असाच पाठभेदासह उधृत करतात! ते म्हणतात देह त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रिया करावी ॥ या पाठभेदांवरून टिळक मनाचे श्लोकही तोंडपाठ म्हणत असतील हे स्पष्ट होते.असो, यात मुद्दा पाठांतराचा नसून थोरामोठ्यांनाही आपल्या जडणघडणीत समर्थ विचारांचा कसा लाभ झाला हे प्रतिपादित करण्याचा आहे. दु:खी झालेल्या अर्जुनाला आणि पर्यायाने भारतीय जनतेला उपदेश करताना लोकमान्यांना समर्थांचा जगीं सर्व सूखी असा कोण आहे । विचारी मना तूंचि शोधून पाहे॥ हा मनाचा श्लोक जवळचा व परिणामकारक वाटतो. त्यामुळे तोही गीतारहस्यात येऊन जातो. मी कोण आहे याचे विवेचन करताना लोकमान्य दासबोधातील अनुमाननिर्शन या समासातील खालील ओवी देतात. प्रचितीवीण जें बोलणें | तें अवघेंचि कंटाळवाणें |तोंड पसरून जैसें सुणें | रडोन गेलें || ९.५.१५ हे ठासून सांगणा-या लोकमान्यांना दासबोधातील वचनांची प्रचिती अपल्या व्यस्त व भव्य आयुष्यात अनुभवताना किती धन्यता वाटली असेल! परब्रह्माचे विस्तृत विवेचन करताना लोकमान्य दासबोधातल्या सृष्टीत्रिविधलक्षण समासात आलेल्या खालील ओळींचा दाखला देत माया-ब्रह्म संकल्पना स्पष्ट करतात. जिकडे पाहावें तिकडे अपार | कोणेकडे नाहीं पार | येकजिनसी स्वतंत्र | दुसरें नाहीं ||२०.२.३॥ विश्वाची उभारणी व संहारणी समजाविताना लोकमान्यांना पदोपदी समर्थांचे स्मरण झाले असणार! उभ्या दासबोधात हा विषय समर्थही अतीशय सखोलपणे व व्यापकपणे समजावून सांगतात. काळें पांढरें मेळवितां | पारवें होतें तत्वतां | काळें पिवळें मेळवितां | हिरवें होये ||९.६.४०|| या गुणरूपनिरुपणातील ओवीचा संदर्भ देत लोकमान्य दृष्य कसे विविध तत्त्वांच्या आभासी मिश्रणातून बनलेले आहे हे सांगतात व लगेचच तेराव्या दशकात आलेल्या उभारणी निरूपण समासाला हात घालतात! गीतारहस्यातील हे लिखाण वाचताना पदोपदी त्यावरील समर्थ कथित संकल्पनांचा प्रभाव जाणवत रहातो. लोकमान्य इथे दासबोधातील खालील ओव्या वाचावयास सांगतात. त्या भूगोळाचे पोटीं | अनंत बीजांचिया कोटी | पृथ्वी पाण्या होता भेटी | अंकुर निघती ||१०|| पृथ्वी वल्ली नाना रंग | पत्रें पुष्पांचे तरंग | नाना स्वाद ते मग | फळें जाली ||११|| पत्रें पुष्पें फळें मुळें | नाना वर्ण नाना रसाळें | नाना धान्यें अन्नें केवळें | तेथून जालीं ||१२|| अन्नापासून जालें रेत | रेतापासून प्राणी निपजत | ऐसी हे रोकडी प्रचित | उत्पत्तीची ||१३|| अंडज जारज श्वेतज उद्बीज | पृथ्वी पाणि सकळांचे बीज | ऐसें हें नवल चोज | सृष्टिरचनेचें ||१४|| च्यारि खाणी च्यारि वाणी | चौऱ्यासि लक्ष जीवयोनी | निर्माण जाले लोक तिनी | पिंडब्रह्मांड ||१३.३.१५|| उद्धरेदात्मनाssत्मानं या प्रसिद्ध गीतावचनावर भाष्य करताना लोकमान्य दासबोधातील खालील ओळी पहा असा स्पष्ट आदेश मुमुक्षूंना देतात. ज्यास स्वहितचि करणें | त्यास किती म्हणौन सांगणें | हें ज्याचें त्यानें समजणें | सकळ कांहीं ||७|| आपला आपण करी कुडावा | तो आपला मित्र जाणावा | आपला नाश करी तो समजावा | वैरी ऐसा ||८|| आपले आपण अन्हित करावें | त्यास अडवें कोणें निघावें | येकांती जाऊन जीवें | मारी आपणासी ||९|| जो आपला आपण घातकी | तो आत्महत्यारा पातकी | याकारणें विवेकी | धन्य साधु ||१७.७.१०|| संन्यास आणि कर्मयोगावर टिळकांनी केलेले भाष्य मुळापासून वाचण्यासारखे आहे. या लिखाणातच त्यांचे समर्थांबद्दलचे मत काय होते हेही आपल्याला वाचायला मिळते. ते त्यांच्याच शब्दात आहे तसे पहाणे इष्ट ठरेल. गीतारहस्यात लोकमान्य म्हणतात, “ ’संन्यास’ या शब्दाने ’लग्न न करणे’ किंवा केले असल्यास ’बायकामुले सोडून भगवी वस्त्रे घेणे’ अथवा ’नुसता चतुर्थश्रम घेणे’ एवढाच अर्थ या ठिकाणी विवक्षित नाही.कारण लग्न न करता भीष्म आमरणान्त राज्याच्या उलाढाली करीत होते,व ब्रह्मचर्यापासून एकदम चतुर्थाश्रम घेऊन श्रीमद्शंकराचार्यांनी, किंवा आमचे महाराष्ट्रदेशांत आमरणान्त ब्रह्मचारी गोसावी राहून श्रीसमर्थ रामदास यांनी, ज्ञानप्रसाराने जगाच्या उद्धाराची कर्में केलेली आहेत.ज्ञानोत्तर जगातील व्यवहार केवळ कर्तव्य म्हणून लोककल्याणार्थ करावे की ते मिथ्या म्हणून अजिबात सोडून द्यावे, हा प्रकृतस्थली मुख्य मुद्दा आहे. हे व्यवहार जो करितो तो कर्मयोगी होय.मग तो लग्न करो वा न करो, अथवा भगवी वस्त्रे नेसो वा पांढरी नेसो. किंबहुना अशी कर्मे करण्यास, विवाह न करणे, भगवी वस्त्रे घेणे, किंवा शहराबाहेर विरक्त होऊन रहाणेच कित्येकदा सोयीचे असते.कारण मग कुटुंबभरणाची उपाधी मागे नसल्यामुळे आपला सर्व वेळ व परिश्रम लोककार्यार्थ खर्ची घालण्यास काहीच अडचण रहात नाही.असे पुरुष वेषाने सन्यासी असले तरी तत्त्वत: ते कर्मयोगीच होत.” स्वत: आमरण समर्थ विदित कर्मयोग आचरणा-या लोकमान्यांचा समर्थांप्रती असलेला भावच येथे व्यक्त झालेला दिसतो! भगवद्गीते सारख्या ज्ञानग्रंथाला देखील नाव देताना लोकमान्य “श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र” असे देतात यावरूनच त्यांची कर्मयोगावरील निष्ठा सिद्ध होते! अशा कर्मयोग्यानेच खरा कर्मयोगी ओळखावा! याबाबत समर्थांनीच दासबोधात म्हणून ठेवले आहे. योगी वोळखावा योगेश्वरें | ज्ञानी वोळखावा ज्ञानेश्वरें | माहाचतुर तो चतुरें | वोळखावा || याच प्रकरणात पुढे लोकमान्य समर्थांनी पोटतिडकीने सर्वसामान्य जीवांना केलेला उपदेश उधृत करतात, प्रपंच सांडून परमार्थ केला | तरी अन्न मिळेना खायाला | मग तया करंट्याला | परमार्थ कैंचा ||१२.१.३|| यावरून टिळकांनी समर्थांचे सर्व विषयांवरील चौफ़ेर विचार किती खोलात जाऊन अभ्यासले असतील याचा अंदाज येतो! टिळक महान होते असे आज सर्वजण म्हणतात व पुढेही म्हणत रहातील, परंतु ते तसे का होते याचे संशोधन अत्ता आपण करितो आहोत! व पुढच्या पिढीलाही आपण हा कानमंत्र मग सहजतेने देऊ शकू! अन्यथा आमच्या पूर्वजांनी आम्हाला बरबाद केलेला देश व बुडविलेली संस्कृती दिली असे कुणी वंशज दु:खावेगाने म्हणाला तर खाली मान घालण्याची नामुष्की पदरी पडायची...असो. सिद्धाचे वर्तन कसे असावे हे सांगताना टिळकांचे समर्थप्रेम पुन:श्च उफ़ाळून आलेले दिसते! समर्थांच्या दासबोधाचा त्यांचा किती गाढा अभ्यास होता हे जाणून घ्यावयाचे असेल तर त्यांचे विचार अगदी त्यांच्याच शब्दात पहाणेच इष्ट ठरेल. लोकमान्य टिळक निस्पृहाचा व्याप समजाविताना आपल्याला दासबोध समोर घेऊन बसण्याचाच आदेश जणु देतात आणि म्हणतात, “स्वार्थपरायण लोकांवर न रागावता किंवा त्यांची लोभबुद्धी पाहून आपल्या मनाची समता न ढळू देता, उलट अशा लोकांच्या कल्याणार्थ साधूपुरुष आपले उद्योग केवळ कर्तव्य म्हणून वैराग्याने सुरु ठेवीत असतात.हेच तत्त्व मनात ठेवून श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधाच्या पूर्वार्धात प्रथम ब्रह्मज्ञान सांगितल्यावर ,स्थितप्रज्ञ किंवा उत्तम पुरुष लोकांना शहाणे करून सोडण्यास वैराग्याने म्हणजे निस्पृहपणाने लोकसंग्रहार्थ जो व्याप अगर उद्योग करीत असतात, त्याचे वर्णन करण्यास अकराव्या दशकात (दासबोध ११.१० निस्पृहवर्तणुकनिरुपण ;१२.८ काळरूपनिरूपण* ;१२.९ येत्नसिकवण ;१२.१० उत्तमपुरुषनिरुपण-१ ;१५.२ निस्पृहव्यापलक्षण ) सुरुवात केली आहे, आणि पुढे अठराव्या दशकात ज्ञानी पुरुषाच्या म्हणजे जाणत्याच्या कथा,गोष्टी,युक्ति,पेंच,प्रसंग,साक्षेप,तर्क,धूर्तपणा,राजकारण,सहिष्णुता,तीक्ष्णता,औदार्य,अध्यात्मज्ञान,भक्ती,अलिप्तपण,वैराग्य आणि धारिष्ट,हव्यास,करारीपणा,निग्रह,समता,विवेक इत्यादी अनेक गुण सर्वांनी शिकावे असे म्हटले आहे (दासबोध १८.२ सर्वज्ञसंगनिरूपण). परंतु या निस्पृहास लोभी मनुष्यांतच वागावयाचे असल्यामुळे – धटासी आणावा धट । उद्धटासी पाहिजे उद्धट। खटनटासी खटनट । अगत्य करी ॥ असा अखेरीस समर्थांचा उपदेश आहे.(दासबोध १९.९.३० राजकारणनिरुपण-२)” लाख मोलाच्या अशा या ओळी आहेत! पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा! यातून सूज्ञाला अनेक अर्थ उमगतील पहा! एकतर टिळक अख्खा दासबोध कसा कोळून पिलेले होते हे कळेल! दुसरे म्हणजे त्यांचे समर्थांबद्दलचे मत, किंवा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन काय होता हे कळेल. वर लोकमान्यांनी दिलेली यादी नीट पहा, यातील अक्षरश: एक अन् एक विषेशण हे निस्पृहाला, अर्थातच समर्थांना आणि मुख्य म्हणजे दस्तुरखुद्द टिळकांनाही जसेच्या तसे लागू होते! म्हणतात ना, समानशीले व्यसनेषु सख्यम् ! या लिखाणातील समासांचे क्रमांकही टिळकांनी स्वत: गीतारहस्यात जसेच्या तसे दिलेले आहेत, यावरून त्यांची वाचकांप्रती असलेली तळमळ दिसते, की अरे तुला जेंव्हा केंव्हा वेळ होईल ना तेंव्हा दासबोधातले हे हे समास जरूर वाच! समासांच्या केवळ नावांवरूनच कुणालाही कळेल की समर्थांची management वगैरे म्हणतात ते सर्व ज्ञान म्हणजे हेच सर्व समास होय! मुख्य म्हणजे अतीशय ज्ञानी असूनही अतीशय गर्वाने टिळकांनी केलेल्या “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच!” किंवा “ज्युरींचा निर्णय विरुध्द असला तरी मी निरपराध असल्याबद्दल माझे मत कायम आहे. वस्तुमात्राच्या भवितव्याचे नियंत्रण करणारी (याहून निराळी) उच्च सामर्थ्ये आहेत. मी मोकळा राहाण्यापेक्षा माझ्या कार्याचा उत्कर्ष माझ्या क्लेशांनी व्हावा, अशीच कदाचित ईश्वराची इच्छा असावी.” यांसारख्या विधानांवरून उद्धटासी पाहिजे उद्धट या समर्थोक्तीचा भावार्थ लोकमान्यांच्या रक्तात कसा भिनला होत हेच लक्षात येते, कारण पुढेही काही ठिकाणी लोकमान्य याच ओळीचा दाखला देतात! असो, या परिच्छेदावरून होणारे सर्वात महत्त्वाचे ज्ञान म्हणजे टिळक हे भारतातील सार्वकालिक सर्वोत्तम राजकारणी, आपल्या राजकारणासाठी समर्थ लिखित राजकारणनिरूपणाचा नित्य अभ्यास करीत होते हे सप्रमाण सिद्ध होते! त्यामुळेच ते आपल्यालाही, तुम्ही हा समास वाचाच असा आग्रह धरीत आहेत! याच निरुपणात पुढे ते सदेवलक्षण समासाचाही उल्लेख करतात, वत्यातील खालील ओवी चिंतनार्थ पुढे ठेवतात, तो परोपकार करितचि गेला | पाहिजे तो ज्याला त्याला | मग काय उणें तयाला | भूमंडळीं ||१९.४.१०|| व समर्थांचे हे वर्णन यथार्थ आहे असा स्वानुभवजन्य शेराही त्यावर मारतात. टिळकांना अभिप्रेत असलेला राजकारणी हा सिद्ध असावा असे त्यांच्या लिखाणावरून प्रतीत होते! कारण ’सिद्धावस्था व व्यवहार’ या प्रकरणाचे निरूपण करताना ते जवळ जवळ अख्खा राजकारणनिरूपण समासच सांगून मोकळे होतात! गीतारहस्यात खालील ओव्या नीट अभ्यासा असे टिळक याच प्रसंगी सांगतात. कांटीनें कांटी झाडावी | झाडावी परी ते कळों नेदावी | कळकटेपणाची पदवी | असों द्यावी ||१२|| न कळतां करी कार्य जें तें | तें काम तत्काळचि होतें | गचगचेंत पडतां तें | चमत्कारें नव्हे ||१३|| ऐकोनी आवडी लागावी | देखोन बळकटचि व्हावी | सलगीनें आपली पदवी | सेवकामधें ||१४|| कोणी येक काम करितां होतें | न करितां तें मागें पडतें | या कारणें ढिलेपण तें | असोंचि नये ||१५|| जो दुसऱ्यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला | तोचि भला ||१६|| अवघ्यांस अवघें कळलें | तेव्हां तें रितें पडिलें | याकारणें ऐसें घडलें | न पाहिजे कीं ||१७|| मुख्य सूत्र हातीं घ्यावें | करणें तें लोकांकरवीं करवावें | कित्तेक खलक उगवावे |*राजकारणामधें ||१८|| बोलके पहिलवान कळकटे | तयासीच घ्यावे झटे | दुर्जनें राजकारण दाटे | ऐसें न करावें ||१९|| ग्रामण्य वर्मीं सांपडावें | रगडून पीठचि करावें | करूनि मागुती सांवरावें | बुडऊं नये ||२०|| खळदुर्जनासी भ्यालें | राजकारण नाहीं*राखिलें | तेणें अवघें प्रगट जालें | बरें वाईट ||२१|| समुदाव पाहिजे मोठा | तरी तनावा*असाव्या बळकटा | मठ करुन ताठा | धरूं नये ||२२|| दुर्जन प्राणी समजावे | परी ते प्रगट न करावे | सज्जनापरीस आळवावे | महत्व देउनी ||२३|| जनामधें दुर्जन प्रगट | तरी मग अखंड खटखट | याकारणें ते वाट | बुझून टाकावी ||२४|| गनीमाच्या देखतां फौजा | रणशूरांच्या फुर्फुरिती भुजा | ऐसा पाहिजे किं राजा | कैपक्षी परमार्थी ||२५|| तयास देखतां दुर्जन धाके | बैसवी प्रचीतीचे तडाखे | बंड पाषांडाचे वाखे | सहजचि होती ||२६|| हे धूर्तपणाचीं कामें | राजकारण करावें नेमें | ढिलेपणाच्या संभ्रमें | जाऊं नये ||२७|| कोठेंच पडेना दृष्टीं | ठाईं ठाईं त्याच्या गोष्टी | वाग्विळासें सकळ सृष्टी | वेधिली तेणें ||२८|| हुंब्यास हुंबा लाऊन द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा | लौंदास पुढें उभा करावा | दुसरा लौंद ||२९|| धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी ||३०|| जैशास तैसा जेव्हां भेटे | तेव्हां मज्यालसी थाटे | इतुकें होतें परी धनी कोठें | दृष्टीस न पडे ||१२.९.३१|| लोकमान्यांचा व्यासंग इतका गाढा होता की त्यांनी सर्वच देशी, परदेशी तत्त्वचिंतकांच्या तत्त्वज्ञानांचा चिकित्सक व तौलनिक अभ्यास केलेला होता व हे त्यांचे लिखाण किंवा त्यात जागजागी येणारे संदर्भ वाचताना स्पष्टपणे जाणवते. तुकाराम हे तर त्यांच्या खास आवडीचे! तुकोबारायांच्या वचनांचाही आधार ते वेळोवेळी देतात. मुळात समर्थ आणि तुकाराम या दोन संतांनी उभ्या केलेल्या भक्ती शक्ती च्या मजबूत पायावरच आजचा आधुनिक महाराष्ट्र उभा अहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. लोकमान्य टिळक भक्तीमार्गाचे विवेचन करताना म्हणतात, “तुकारामबुवा जरी संसारी होते तरी त्यांचा कल थोडासा कर्मत्यागाकडेच होता.म्हणुन उत्कट भक्ति आणि त्याचबरोबर आमरणान्त ईश्वरार्पणपूर्वक निष्काम कर्म असे जे प्रवृत्तीपर भागवतधर्माचे लक्षण किंवा गीतेचा सिद्धांत त्याचा पूर्ण खुलासा कोणास पाहिजे असल्यास तुकारामबोवांनीच शिवाजीमहाराजांस ज्या ’सद्गुरुस शरण’ जाण्यास सांगितले त्या श्री समर्थ रामदासस्वामींच्या दासबोध ग्रंथाकडेच त्याने वळले पाहिजे.भक्तीने किंवा ज्ञानाने परमेश्वराचे शुद्ध स्वरूप ओळखून कृतकृत्य झालेले सिद्धपुरुष ’शहाणे करून सोडावे । बहुत जन ।’ (दासबोध १९.१०.१४ विवेकलक्षणनिरुपण) यासाठी नि:स्पृहपणानें आपला व्याप यथाधिकार कसा सुरु ठेवतात ते पाहून सामान्य लोकांनी आपापले व्यवहार करण्यास शिकावें, ’केल्याविण काहींच (होत) नाही,’ (दासबोध १९.१०.२५ विवेकलक्षणनिरुपण;१२.९.६ येत्नसिकवण ;१८.७.३जनस्वभावनिरुपण) असे अनेकवार सांगून शेवटच्या दशकात सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे॥ याप्रमाणे कर्माच्या सामर्थ्याची भक्तीच्या तारकत्वाशी समर्थांनी पूर्ण जोड घालून दिली आहे (दासबोध २०.४.२६ आत्मानिरूपण) गीतेत ’मामनुस्मर युध्य च’ अर्थात माझे नित्य स्मरण कर व युद्ध कर- असा जो अर्जुनास आठव्या अध्यायात उपदेश केला आहे त्यातील तात्पर्य हेच आहे.” पुढे उपसंहारात लोकमान्यांची तळमळ, तगमग, राष्ट्रप्रेम व समर्थनिष्ठा सुस्पष्टपणे दिसून येते. ते म्हणतात, “या पूर्वी (या देशात) अशी स्थिती नव्हती , असे अपहाय निजं कर्म कृष्ण कृष्णेति वादिन: । ते हरेर्द्वेषिण: पापा धर्मार्थं जन्म यद्धरे:॥ आपले (स्वधर्मोक्त) कर्म सोडून (केवळ) हरि हरि म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे व पापी होत, कारण हरीचा जन्म तर धर्म रक्षणार्थच आहे. या शूद्रकमलाकरात घेतलेल्या विष्णुपुराणांतील श्लोकावरून उघड होते.वास्तविक पाहिले तर हे लोक सन्यासनिष्ठ नव्हेत आणि कर्मयोगीहि नव्हेत... या वाचिक सन्याशांची गणना गीतेत न वर्णिलेल्या अशा एका निराळ्या तृतीय निष्ठेत केली पाहिजे. कोणत्याही कारणाने का होईना लोक असे तृतीयप्रकृती बनले, म्हणजे धर्माचाहि अखेर नाश झाल्याखेरीज रहात नाही. इराणातून पारशी धर्मास खो मिळण्यास हीच स्थिती कारण झाली असून त्यामुळे हिंदुस्थानातून वैदिकधर्महि ’समूलं च विनश्यति’ होण्याची वेळ आली होती. पण बौद्धधर्माच्या –हासानंतर वेदान्ताबरोबर गीतेतील भागवत धर्माचे जे पुनरुज्जीवन झाले त्यामुळे आमच्याकडे हा दुष्परिणाम घडून आला नाही.दौलताबादचे हिंदु राज्य मुसलमानांनी बुडविण्यापूर्वी काही वर्षे आमच्या सुदैवाने श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी भगवद्गीतेस ’देशीकार लेणे’ करून ’म्-हाटियेचिया नगरी’ गीतेतील ’ब्रह्मविद्येचा सुकाळू’ करून सोडला होता.वैराग्ययुक्त भक्तीरूपानेच का होईना पण यवनब्राह्मणचांडाळादिकांस सम आणि ज्ञानमूलक गीताधर्माचा जज्वल्य उपदेश चोहोंकडे एकसमयावच्छेदेकरूंन चालू राहिल्यामुळे हिंदु धर्माचा पुरा –हास होण्याचे भय नाहीसे झाले, इतकेच नव्हे, तर करड्या मुसलमानी धर्मावरही त्याची थोडीशी छाप बसून कबीरासारख्या साधूचा संतमंडळात समावेश होऊ लागला...तथापि भागवतधर्माचे हे आधुनिक पुनरुज्जीवन मुसलमानी आमदनीतच झालेले असल्यामुळे तेही बहुतेक भक्तीपर म्हणजे एकदेशीय होऊन , मूळ भागवतधर्मातल्या कर्मयोगाचे एकदा कमी झालेले स्वतंत्र महत्त्व त्यांस पुन: प्राप्त न होताकर्मयोग सन्यासमार्गाचे अंग किंवा साधन आहेअसे म्हणण्याऐवजी तो भक्तीमार्गाचे अंग आहे असे यावेळची भागवतधर्मीय संतमंडळी, पंडित व आचार्यही म्हणू लागले. तत्काली प्रचलित असलेल्या या समजुतीस श्रीसमर्थ रामदास स्वामींचे ग्रंथ हाच काय तो आमच्या माहितीप्रमाणे एक अपवाद आहे.आणि कर्ममार्गाचे खरे महत्त्व शुद्ध व प्रासादिक मराठी भाषेत सांगितलेले ज्यांस पहावयाचे असेल त्यानें समर्थांच्या दासबोधाचे व त्यातलेंत्यातही विशेषेंकरून उत्तरार्धाचे पठन केले पाहिजे.श्रीसमर्थांचाच उपदेश श्रीशिवाजी महाराजांस मिळालेला होता; व मराठेशाहीत पुढे कर्मयोगाची तत्त्वे समजून देण्याची जेंव्हा जरूर वाटू लागली तेंव्हा..महाभारताची गद्यात्मक भाषांतरे होऊन बखरींच्या रुपाने त्यांचा अभ्यास सुरु झाला.ही भाषांतरे तंजावर येथील पुस्तकालयात अद्याप ठेवलेली आहेत.” (सरस्वती महाल ग्रंथालय, तंजावर)” दासबोधाचे इतके सुंदर वर्णन अन्य कुणी (चिकित्सकांनी) केल्याचे ऐकिवात नाही! दासबोधाचा अखेरचा जो संदर्भ गीतारहस्यात आलेला आहे तो असा. लोकमान्य लिहितात, “शहरात रहाण्याची आवड नसूनही जगाचे व्यवहार केवळ कर्तव्य म्हणून कसे करिता येतात हे समर्थ श्रीरामदासांच्या चरित्रावरून उघड होते. (दासबोध १९.६.२९ बुद्धिवादनिरूपण; १९.९.११ राजकारणनिरुपण-२पहा) ” लोकमान्यांचे हे सर्व विचार वाचून कोणालाही त्यांचे जडणघडणीतील खरे आदर्श कोण होते हे कळाल्यावाचून रहाणार नाही! श्रीसमर्थ तुम्हा आम्हांस लोकमान्य टिळकांसारखेच समर्थ, राष्ट्रभक्त, विरक्त, सशक्त, नीतीमान, तीव्र बुद्धिमान, कणखर, खंबीर, धीरोदात्त, धूर्त, साक्षेपी, राजकारणी, सिद्ध, नि:स्पृह, नि:ष्काम कर्मयोगी करोत अशी त्यांचे चरणी कळवळून प्रार्थना... ॥जय जय रघुवीर समर्थ॥ www.dasbodh.com
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
13237 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

भावना पोचल्या.

अर्धवटराव
Fri, 07/19/2013 - 10:03 नवीन
थोडं शब्दबंबाळ वाटलं लिखाण. >>श्रीसमर्थ तुम्हा आम्हांस लोकमान्य टिळकांसारखेच समर्थ, राष्ट्रभक्त, विरक्त, सशक्त, नीतीमान, तीव्र बुद्धिमान, कणखर, खंबीर, धीरोदात्त, धूर्त, साक्षेपी, राजकारणी, सिद्ध, नि:स्पृह, नि:ष्काम कर्मयोगी करोत अशी त्यांचे चरणी कळवळून प्रार्थना... -- समर्थांनी त्यांच्या काळात जे करायचं ते व्यवस्थीत केलं. दासबोधासारखा मार्गदर्शक ग्रंथ रचला. टिळकांनी राष्ट्रोद्धाराची हिम्मत दाखवली म्हणुन त्यांना दासबोधातलं ज्ञान काहि कामात आलं. याऊपर समर्थांनी आणखी काय करायला हवं? अर्धवटराव
  • Log in or register to post comments

+१

राही
Fri, 07/19/2013 - 11:57 नवीन
समर्थ आपल्याला अमुक अमुक बनवोत अशा प्रार्थनेपेक्षा समर्थांनी लिहून ठेवल्यानुसार आचरण आम्ही करू ही प्रतिज्ञा अधिक योग्य ठरावी. महामानवांनी त्यांचे त्यांचे कार्य त्या त्या काळात करून ठेवलेलेच आहे. सांप्रतच्या काळानुसार आवश्यक तेव्हढेच बदल करून त्यांची शिकवणूक आचरावी हे उत्तरदायित्व आपले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

वाचतो आहे...

मदनबाण
Fri, 07/19/2013 - 13:02 नवीन
वाचतो आहे...
  • Log in or register to post comments

लेखनशैली प्रवचनकाराची वाटली.

धन्या
Fri, 07/19/2013 - 16:04 नवीन
लेखनशैली प्रवचनकाराची वाटली.
ज्या लोकमान्यांचा मेंदु मरणोत्तर आम्हाला अभ्यासार्थ द्या असे इंग्रज त्यांच्या कुटुंबियांच्या मागे लागले होते
दंतकथा. बरोबर ना?
  • Log in or register to post comments

अर्थातच दंतकथा. बाकी लेखात

बॅटमॅन
Fri, 07/19/2013 - 16:09 नवीन
अर्थातच दंतकथा. बाकी लेखात बरीच वाक्ये अशी बेशिस्तपणे इतस्ततः फेकली आहेत. ब्लँकेट स्टेटमेंट्सचा प्रतिवाद करायचाही अलीकडे कंटाळा आलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ब्लँकेट स्टेटमेंट्स

अनिरुद्ध प
Fri, 07/19/2013 - 19:19 नवीन
म्हणजे कायरे भाऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अतिशय सरसकट ढोबळ विधान.

बॅटमॅन
Sat, 07/20/2013 - 00:35 नवीन
अतिशय सरसकट ढोबळ विधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

लेख पुन्हा एकदा काळजीपुर्वक

धन्या
Fri, 07/19/2013 - 16:23 नवीन
लेख पुन्हा एकदा काळजीपुर्वक वाचला.
लोकमान्यांचे हे सर्व विचार वाचून कोणालाही त्यांचे जडणघडणीतील खरे आदर्श कोण होते हे कळाल्यावाचून रहाणार नाही!
तुमचा हा लेखन प्रपंच केवळ वरील वाक्य ठासून सांगण्यासाठी आहे हे कुणीही सांगेल. असो. महापुरुषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात हे पुन्हा एकदा लक्षात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

__/\__

बाळ सप्रे
Fri, 07/19/2013 - 16:39 नवीन
__/\__ अच्छा म्हणजे समर्थांच्या मार्केटींगसाठी लोकमान्यांबरोबर डील केलय तर !! धन्या, तुम्हालासुद्धा मानलं या काळजीपूर्वक वाचनाबद्दल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

+११११११११११११११११११११.

बॅटमॅन
Fri, 07/19/2013 - 16:51 नवीन
+११११११११११११११११११११. पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

माझे प्रतिसाद मिपा ने काढुन टाकले

प्रसाद१९७१
Fri, 07/19/2013 - 16:14 नवीन
निषेध :-( मिपा च्या संपादक मंडळानी माझे २ प्रतिसाद काढुन टाकले. सत्य बोलायची पण चोरी झाली आहे. बाहेर तर होतीच पण आता मिपा वर पण खालचे वाक्य सुद्धा हास्यास्पद आहे.
“स्वराज्य” मिळविण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या थोबाडावरच फ़ोडलेली घनगंभीर डरकाळी तर समस्त साम्राज्यवाद्यांचा थरकाप उडविणारी ठरली!
  • Log in or register to post comments

नै म्हंजे बाकी काही असूदे पण

बॅटमॅन
Fri, 07/19/2013 - 16:17 नवीन
नै म्हंजे बाकी काही असूदे पण भारतीय असंतोषाचा जनक असे ज्यांना म्हटल्या गेले होते त्यांच्याबद्दल हे वाक्य अतिशयोक्त असले तरी मूलतः असत्य नाही हे लक्षात घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

तुम्हाला ही माहिती आहे,

प्रसाद१९७१
Fri, 07/19/2013 - 16:22 नवीन
तुम्हाला ही माहिती आहे, इंग्रज का आले आणि का सोडुन गेले ते. कोणाला त्याचे श्रेय घ्यायचे किंवा द्यायचे असेल तर ठीक आहे. अगदी १९१० साली सुद्धा १ लाख पण इंग्रज ( कूटूंब ) धरुन भारतात नव्हते. जवळ जवळ सर्व सैन्य आणि पोलिस भारतीय च होते. खरे तर मेजोरिटीला काही तक्रार च नव्हती इंग्रजांबद्दल.
  • Log in or register to post comments

खरे तर मेजोरिटीला काही तक्रार

बॅटमॅन
Fri, 07/19/2013 - 16:31 नवीन
खरे तर मेजोरिटीला काही तक्रार च नव्हती इंग्रजांबद्दल.
मेजोरिटीला अक्कल तरी होती का काय चाल्लंय ते समजण्याची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

मेजोरिटीला अक्कल तरी होती का

मदनबाण
Fri, 07/19/2013 - 17:15 नवीन
मेजोरिटीला अक्कल तरी होती का काय चाल्लंय ते समजण्याची? आता आली आहे अशी सध्या देशाची स्थीती पाहुन वाट्टे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१ न्हाई !!!

मालोजीराव
Fri, 07/19/2013 - 17:19 नवीन
मागच्या एक दोन दशकात रेवोलुशन घडून त्यानंतर त्या देशांची झालेली हालत बघता आपली स्थिती बरी आहे नाय का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मेजॉरिटी नेहमीच अशी असते.

बॅटमॅन
Fri, 07/19/2013 - 17:20 नवीन
मेजॉरिटी नेहमीच अशी असते. काही किती म्हटलं तरी आहे हे असंच असतं. असो. अवांतरः लोकमान्यांवरचा रामदासांचा प्रभाव उल्लेखनीय नक्कीच होता. शेजवलकरांच्या लेखात त्यांनी तसे प्रतिपादन केलेले आढळते, ते पटण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्त मारला बाण

अविनाशकुलकर्णी
Sun, 07/21/2013 - 18:42 नवीन
मस्त मारला बाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्त मारला बाण

अविनाशकुलकर्णी
Sun, 07/21/2013 - 18:43 नवीन
मस्त मारला बाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

नेत्यांच्या स्वातंत्र्याच्या

बाळ सप्रे
Fri, 07/19/2013 - 17:27 नवीन
नेत्यांच्या स्वातंत्र्याच्या मागणीला जनतेचे बळ नसताना स्वातंत्र्य मिळाले असं खरच वाटतं तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

जनतेचे बळ मिळाले पण यामागचे

बॅटमॅन
Fri, 07/19/2013 - 17:36 नवीन
जनतेचे बळ मिळाले पण यामागचे कर्ते धर्ते नेतेच होते...नेते आणि त्यांची कार्यकर्त्यांची फळी. ते नस्ते तर काय केले अस्ते जनतेने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अहो नेता हवाच.. नुसती जनता

बाळ सप्रे
Fri, 07/19/2013 - 17:44 नवीन
अहो नेता हवाच.. नुसती जनता जाउन लढु शकत नाही.. पण नेत्यांच्या प्रत्येक आवाहनाला जनता साद देत नाही.. स्वातंत्र्याच्या मागणीला एवढा प्रतिसाद मिळाला तो काहीतरी तक्रार होती ईंग्रजांविरुद्ध म्हणूनच.. उगाच १००रु आणि बिर्याणीसाठी लोकांचा पाठिंबा नक्कीच मिळाला नाहिये त्यांना.. आणि तेव्हा तेवढा पैसादेखिल असण्याची शक्यता नव्हती नेत्यांकडे..
  • Log in or register to post comments

मान्यच... काहीतरी तक्रार होती

बॅटमॅन
Fri, 07/19/2013 - 17:55 नवीन
मान्यच... काहीतरी तक्रार होती हे दिसत होतं आणि ते पटवून देण्यात नेते कमालीचे यशस्वीही झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

स्वातंत्र्यपूर्व काळात मुळात

निरागस
Fri, 07/19/2013 - 18:33 नवीन
स्वातंत्र्यपूर्व काळात मुळात सर्वसामान्यांच्या गरजा अतिशय कमी व मर्यादीत होत्या. इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होण्याचा लढा तसाही कोणा एकाचा नव्हताच. पण त्यात सहभाग मात्र प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाचाच होता. असे असले तरी धागाकर्त्यांनी टिळकांचा जरा जास्तच उदोउदो केलाय. एवढे काही इंग्रज टिळकांना घाबरुन नव्हते. किंबहुना नव्हतेच. टिळकांची विद्वत्ता खरी दिसते ती गीतारहस्य ग्रंथात. बाकी त्यांचे वैदीक गणित व वेदांचा काळ पंधरा हजार वर्षे मागे नेणे हे आता कालबाह्य झालेले संशोधन आहे. वेदांचा काळ जास्त मागे नेता येत नाही हे आता अलिकडच्या सर्वच संशोधकांना मान्य आहे.
  • Log in or register to post comments

टिळकांना तेल्यातांबोळ्यांचे

कवितानागेश
Sat, 07/20/2013 - 01:22 नवीन
टिळकांना तेल्यातांबोळ्यांचे पुढारी (= सरवसामान्यांचे नेते) असं म्हटलं जायचं. शिवाय ते मंडालेला तुरुंगात होते तेंव्हा ते सुटून येइपर्यन्त अनेकांनी चपला न घालणे, चहा सोडणे... अश्या प्रकारचे नेम केले होते... असे मी वाचले आहे. लोकांना त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची जाणीव करुन देण्यात लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारांचा फार मोठा भाग असावा असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरागस

हॅ हॅ हॅ

प्रसाद गोडबोले
Sat, 07/20/2013 - 02:21 नवीन
"भटमान्य टिळक" असे एक पुस्तक नुकतेच वाचनात आले आहे ... तुमचा पत्ता द्या तुम्हाला पाठवतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

छापिल ते सगळे बरोबर असे मानत

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 07/22/2013 - 00:09 नवीन
छापिल ते सगळे बरोबर असे मानत नसाल अशी अपेक्षा. मुंबईत रहात असाल तर मला द्या पुस्तक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

टिळक पंचांगाबाबत मी

कवितानागेश
Mon, 07/22/2013 - 00:27 नवीन
टिळक पंचांगाबाबत मी आत्तापर्यंत फक्त जोक्सच ऐकले आहेत. पण किती लोक ते वापरतात मला माहित नाही. शिवाय गणेशोत्सवातही गोंधळच पाहिला आहे. पण म्हणून त्याबद्दल टिळकांना जबाबदार धरायला नकोय. गीतारहस्य अजून वाचलं नाहीये. त्यामुळे त्याबद्दल काहीच बोलता येणार नाही. पण 'ऑन पर्सन' इतरांनी लिहिलेले वाचण्यापेक्षा 'फ्रोम पर्सन' वाचणं जास्त बरं आसं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

टिळक पंचांगाबाबत मी

अनिरुद्ध प
Mon, 07/22/2013 - 17:51 नवीन
आपण कोठल्या विभगाच्या हे माहित नाही,परन्तु आप्ल्या महिती साठी सान्गतो कि टिळक पन्चान्ग हे कोकणात अजुनही वापरण्यात येते,टिळकान्नी नक्ष्त्राअन्चा ऊत्तम अभ्यास करुन हे पन्चान्ग तयार केले आहे.आणि ते उत्तम आहे असे त्यचा वापर करणारे कोकणी माणसे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

एकद बघेन टिळक पंचांग नक्की.

कवितानागेश
Tue, 07/23/2013 - 00:00 नवीन
एकद बघेन टिळक पंचांग नक्की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

...हे आता कालबाह्य झालेले

पिशी अबोली
Sun, 07/21/2013 - 19:17 नवीन
...हे आता कालबाह्य झालेले संशोधन आहे.
संशोधन कालबाह्य झाले आहे म्हणजे काय? कोणतेही आधुनिक संशोधन आकाशातून पडत नाही. त्याला काहीतरी एक पाया लागतो. प्रत्येक वस्तुनिष्ठ संशोधक आपापल्या परीने पुढील नवीन संशोधनासाठी पायाच तयार करत असतो. त्यामुळे आधुनिक पद्धतींनी काहीही मान्य केलेले असले तरी या जुन्या संशोधनाकडे इतक्या तुच्छतेने पाहू नये असे मला वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरागस

संशोधन तुच्छ लेखण्याचा सवाल

बॅटमॅन
Sun, 07/21/2013 - 19:25 नवीन
संशोधन तुच्छ लेखण्याचा सवाल नाही. पण टिळकांच्या काळात हडप्पाचा शोध लागला नव्हता, बरीच उत्खनने व्हायची होती. त्यामुळे त्यांनी आर्यांच्या मूलस्थानाबद्दल केलेली विधाने ही आज बर्‍याच अंशी चूक आहेत असे दिसून येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

त्यामुळे त्यांनी आर्यांच्या

पिशी अबोली
Sun, 07/21/2013 - 20:08 नवीन
त्यामुळे त्यांनी आर्यांच्या मूलस्थानाबद्दल केलेली विधाने ही आज बर्‍याच अंशी चूक आहेत असे दिसून येते.
मान्य आहे. पण ती विधाने 'आज' चुकीची ठरत आहेत. त्याकाळच्या उपलब्ध साधनांवरून त्यांनी शक्य ते निष्कर्ष काढले. माझा आक्षेप हा आज झालेल्या संशोधनाचा हवाला देऊन जुन्या संशोधकांची विद्वत्ता मोजण्याला आहे. जुन्या संशोधनाचे श्रेय नाकारण्याचा प्रकार मला उथळ वाटतो. कॉपर्निकसने त्याचे सिद्धांत चुकीचे ठरवले म्हणून टॉलमीचे महत्व कमी ठरत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओके. आणि खरे सांगायचे तर ते

बॅटमॅन
Sun, 07/21/2013 - 20:23 नवीन
ओके. आणि खरे सांगायचे तर ते पुस्तक वाचल्यास कल्पनाशक्तीच्या भरार्‍याच जास्त वाटतात. आजची फार परिमाणे लावली नसती तरी तसे जाणवल्याशिवाय राहत नाही. वेदातल्या उल्लेखाचे एक्स्ट्रापोलेशन कल्पनेच्या बाहेर केलेय. कोपर्निकस अन टॉलेमी चे उदाहरण इथे अप्रस्तुत वाटते. टॉलेमी आजही पूर्ण टाकाऊ ठरणार नाही, कारण अप्रॉक्सिमेशन म्हणून त्यात नमूद केलेले रिझल्ट्स आजही त्या मर्यादेत व्हॅलिड आहेत. टिळकांनी पूर्वसूरींपेक्षा जरा वेगळा अन काही मर्यादेत अजूनही व्हॅलिड असणारा कुठला सिद्धांत मांडला हे वाचायला आवडेल, नपेक्षा तुलना अप्रस्तुत होईल इतकेच म्हणतो. तसे काही वाचायला मिळाल्यास आनंदच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

सॉरी... माझा अभ्यास या

पिशी अबोली
Mon, 07/22/2013 - 22:55 नवीन
सॉरी... माझा अभ्यास या प्रश्नाचं उत्तर देण्याइतका नाही. पण नीट अभ्यास करुन उत्तर द्यायला आवडेल नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आर्यांच्या मूलस्थानाबद्दल केलेली विधाने ही आज

अनिरुद्ध प
Mon, 07/22/2013 - 18:02 नवीन
आपण खूप मोठे अभ्यासक आहात य बद्दल वादच नाही,परन्तु आपण ईन्ग्रजानी जे लिहुन ठेवले त्याच आधारावर लिहीणार कि ऊपक्रम या सन्स्थळावर श्री चन्द्र्शेखर यान्चे आपण हराप्पा मोहेन्जोदरो येथिल जे नवीन सन्सोधन झाले आहे ते तरि अभ्यासावे मग लिहावे निदान आपण लोकमान्याच्या एव्हडे मोठे नेते नाहि याची जाण ठेवावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वाह वाह. मी तसाही मूर्खच आहे

बॅटमॅन
Mon, 07/22/2013 - 18:09 नवीन
वाह वाह. मी तसाही मूर्खच आहे हो, परंतु वाटल्यास/जमल्यास माझ्या मुद्द्यांचा प्रतिवाद करा की. टिळक किती मोठे नेते होते आणि मी कसा फालतू आहे हे वेगळे सांगायची गरज नाही- ते स्वयंसिद्ध आहे आणि मला माहितीदेखील आहे. तस्मात माझ्या प्रतिपादनातल्या नक्की कुठल्या मुद्द्यात काय चूक आहे ते सांगण्याची कृपा करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

आगरकरांच्या विचारांना विरोध

प्रसाद१९७१
Mon, 07/22/2013 - 18:22 नवीन
आगरकरांच्या विचारांना विरोध आणि गणेशउत्सव चालू करणे हे कुठल्या कॅटेगरीत येते काय माहीती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते एक टोक तर तुमचेही दुसरे

बॅटमॅन
Mon, 07/22/2013 - 18:27 नवीन
ते एक टोक तर तुमचेही दुसरे टोक आहे इतकेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

धन्यवाद

अनिरुद्ध प
Mon, 07/22/2013 - 19:14 नवीन
माझा प्रतिसाद हा आप्ल्याला व्यक्तिशहा नव्हता,तसेच मी आप्ल्याला विनन्ति केलि होति कि आपण उपक्रमावरिल नविन सन्शोधनाचा अभ्यास करावा मग बोलावे माफ करा लिहावे असे माझे म्हणणे आहे सध्या उपक्रम उप्ल्ब्ध नसल्याने लिन्क देवु शकत नाही त्याबद्दल क्षमस्व,बाकी जे म्हणणे आहे ते आपली पर्वानगी असेल तर व्य नि करिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अवश्य व्यनि करा. याबद्दल

बॅटमॅन
Mon, 07/22/2013 - 20:17 नवीन
अवश्य व्यनि करा. याबद्दल वाचायला माझे काय जाते? नवीन माहिती तर मिळेल नैतर रिपीट होईल. आयदर वे, घाटा काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

ते वाचलंस की बे तू.

प्रचेतस
Mon, 07/22/2013 - 20:19 नवीन
ते वाचलंस की बे तू. सुरकोटलाचा अश्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आह ते आहे होय? मग वाचलेय.

बॅटमॅन
Mon, 07/22/2013 - 20:34 नवीन
आह ते आहे होय? मग वाचलेय. ऋग्वेदातला अनार्य टोळ्या घोड्यावरचा कर भरत असल्याचा उल्लेखही वाचलाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

.....त्यांच्या या ग्रंथाबद्दल

चित्रगुप्त
Fri, 07/19/2013 - 19:07 नवीन
.....त्यांच्या या ग्रंथाबद्दल महात्मा गांधी कानपूर अधिवेशनात म्हणाले होते की गीतेवर इतक्या अधिकाराने भाष्य करणारा दुसरा ग्रंथ कधी झाला नाही व लवकर होण्याचा संभवही नाही!... हे वाक्य वाचून, का कुणास ठाऊक, लताबाईंचे 'ऐ मेरे वतनके लोगो' ऐकून पू.पं. न्हेरूंचे डोळे पाणाव्ले, याची आठवण येऊन आमचेही डोळे पाणाव्ले.
  • Log in or register to post comments

आमचेही डोळे पाणावले...

प्रसाद गोडबोले
Sat, 07/20/2013 - 02:41 नवीन
“स्वराज्य” मिळविण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या थोबाडावरच फ़ोडलेली घनगंभीर डरकाळी तर समस्त साम्राज्यवाद्यांचा थरकाप उडविणारी ठरली! अशा या लोकमान्यांच्या अंतरंगात डोकावून पाहता आले तर काय भाग्य ठरेल ते!
खरच काही ही लिहिलय राव ... टिळकांविषयी पुर्ण आदर राखुन .... साम्राज्यवादाविषयी आणि एकुणच जागतिक राजकारणाविषयी टिळकांचे अंडर्स्टँडींग गांधी इतकेच ढोबळ होते ... उगाचच असल्या मागण्या बिगण्या करुन कुठे स्वातंत्र्य मिळत असते होय ? बिस्मार्क, कैसर विल्यम आणि हिटलर झाले नसते तर असे ५-६ टिळक गोखले परांजपे बघायला मिळाले असते आपल्याला . हे कटुसत्य आहे !! कुठे चेंबर्लिन कुठे चर्चिल अन कुठे आपले टिळक गांधी ... रुझवेल्ट हिटलर स्टॅलिन तर फार दूर राहिले !! ( प्लीज नोट : हे विधान फक्त राजकारणाबाबत आहे . तत्त्वज्ञानाबाबत आपली माणसं लई पुढं होती ) अंतरराष्ट्रीय राजकारणाची आणि साम्राज्यवादाची खर्‍याअर्थाने जाण असणारा व्हिजनरी माणुस एकच ....नेताजी . पण दुर्दैवाने ते फक्त व्हिजनरीच राहिले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

साम्राज्यवादाविषयी आणि एकुणच जागतिक

अनिरुद्ध प
Mon, 07/22/2013 - 18:08 नवीन
गिरिजा भाऊ, ईथे त्याना कुठले साम्राज्य निर्माण करवयाचे होते? त्याना फक्त ईन्ग्रजान्कदुन स्वातन्त्र्य अपेक्शित होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+१०००००००००

सोत्रि
Sun, 07/21/2013 - 20:44 नवीन
अंतरराष्ट्रीय राजकारणाची आणि साम्राज्यवादाची खर्‍याअर्थाने जाण असणारा व्हिजनरी माणुस एकच ....नेताजी . पण दुर्दैवाने ते फक्त व्हिजनरीच राहिले .
ह्या साठी अगदी मनापासून सहमती. असा द्रष्टा नेता आपल्याला स्वात्रंत्र्यानंतर न लाभणे ह्यासारखे दुर्दैव नाही. जर ते असते तर नक्कीच आजचे चित्र वेगळे असते. अवांतरः बाकी मूळ लेख वाचला नाही. प्रतिसादही सगळे वाचले नाहीत. - (नेताजींचा निस्सीम भक्त) सोकाजी
  • Log in or register to post comments

आपल्या नशीबाने इंग्रज आणि अमेरिका जिंकले,

प्रसाद१९७१
Mon, 07/22/2013 - 12:41 नवीन
नेताजींच्या मता प्रमाणे जपान जर दुसर्‍या महायुद्धात जिंकला असता तर भारताचा मांचुरीया झाला असता. नेता़जींचे कर्तृत्व असले तरी जपान आणि जर्मनी च्या मागे जाणे फार धोकादायक होते. आपल्या नशीबाने इंग्रज आणि अमेरिका जिंकले, नाहीतर जर्मन आणि जपान्यांनी कत्तल केली असती भारतात.
  • Log in or register to post comments

लेख चांगला आहे..

विटेकर
Mon, 07/22/2013 - 13:04 नवीन
भावनेच्या भरात काही अतिशयोक्ती झाली असेल तरीही लेख उत्तम आहे, यात वाद नाही. चांगल्या लेखात काही तरी कुस्पट काधून त्यातील शब्दांवर खेळत बसणे , त्यातही आपलाच कंपू जमवून विषय भलतीकडे नेणे हीच गोष्ट काही मिपाकरांना भूषणावह वाटते,असो. वास्तविक लेख दासबोध आणि टिळकांचे जीवन असताना " आर्टिक होम इन वेदाज" वर घसरायचे काय कारण होते का ? पण तेव्ह्ढ्यावर थांबले नाही, त्याचाही काथ्याकूट ! या असल्या कम्पूबाजीमुळे मिपावर अ़क्षर: असार सोडून सार शोधावे लागते, आणि मग जाम कंटाला येतो. असो , मूळ लेखाकडे.. टिळक हे सर्वार्थाने समर्थांचे महंत होते असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. त्याकाळातील अनेक महापुरुषांनी दासबोधापासून राष्ट्रकार्याची प्रेरणा घेतली हे खरेच आहे. दासबोधात वर्णन केलेला कर्मयोग आणि गीतारह्स्यांत टिळक महाराजांनी गीतेचे केलेली प्रुव्रुत्तीवादी टिका यात कमालीचे साम्य आहे. गीतारहस्याचे दुसरे नावच मुळी " कर्मयोगशास्त्र" असे आहे. गीतारहस्यमध्ये अनेक ठिकाणी दासबोधाचे संदर्भ आहेत. अफलातून ग्रन्थ आहे गीतारहस्य ! टिळ्कांचे प्रकांड पांडित्य आणि अफाट बुद्धीमत्ता पाहून चकित व्हायला होते. उंदीर विभागात काम करणार्या लोकांना त्यांचे चुकले काय ? हेच फक्त दिसणार ! काही प्रतिसाद संपादित करावेत / उडवावेत अशी सं मं ला विनंती करावी की काय अशा विचारात आहे. खरे म्ह्णजे काही आय डी ब्लोक करायला हवेत, पण लक्षात कोण घेतो?
  • Log in or register to post comments

टिळ्कांचे प्रकांड पांडित्य

बॅटमॅन
Mon, 07/22/2013 - 13:09 नवीन
टिळ्कांचे प्रकांड पांडित्य आणि अफाट बुद्धीमत्ता पाहून चकित व्हायला होते. उंदीर विभागात काम करणार्या लोकांना त्यांचे चुकले काय ? हेच फक्त दिसणार !
आणि स्तुतिपाठक विभागातल्या भाट-चारणांना फक्त गोडवे गायचे तेवढे कळणार.
काही प्रतिसाद संपादित करावेत / उडवावेत अशी सं मं ला विनंती करावी की काय अशा विचारात आहे. खरे म्ह्णजे काही आय डी ब्लोक करायला हवेत, पण लक्षात कोण घेतो?
अशा वाक्यांतून ध्वनित होणार्‍या जाल-तालिबानी वृत्तीला लक्षात घेतले नाही तर बरेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा