Skip to main content

ओरखडा ते अॅसिडीटी

लेखक स्वानंद वागळे यांनी रविवार, 14/07/2013 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी अनेकजण तेंव्हा पासून TV पहात आहेत जेंव्हा दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. शनिवारी संध्याकाळी हिंदी सिनेमा पाहताना ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग यायचा ती म्हणजे टूथपेस्ट ची जाहिरात. मला राग येण्याचं कारण म्हणजे आयुर्वेदाचा मला अभिमान आहे आणि त्या जाहिरातीत म्हणायचे की "लवंग, कडुलिंबासारख्या सगळ्या जुन्या गोष्टी विसरा आणि वापरा कॅल्शियम युक्त नवीन XXXX. हे फार दिवस चाललं नाही कारण कॅल्शियम फॉर्म्युला कितीही चांगला असला तरी दाताला वरून घासून काही उपयोग होणार नाही; हे जिथे माझा बालबुद्धीलासुद्धा कळत होतं तिथे इतरांची काय कथा…… आयुर्वेदावर टीका करून काम होत नाही हे कळल्यावर जाहिरातदारांनी जुन्या दंतमंजनांच्या खरखरीतपणावर बोट ठेवलं. चष्म्याच्या काचेवर दंतमंजन घासून दातांवर होणाऱ्या चऱ्यान्चं प्रात्यक्षिक करून दाखवलं गेलं. त्यामुळे दात वाचवण्यासाठी "बारीक सफेद XXXX वापरण्याचा सल्ला दिला गेला. पण एवढं करून सुद्धा तडा गेला तो टूथपेस्टच्या विश्वासार्हतेलाच. हे होतं फर्स्ट जनरेशन म्हणजे 1G. मग जमाना आला तो "श्वासातल्या दुर्गंधीचा" आणि सुरुवात झाली ती ‘जेल’वाल्या टूथपेस्ट ची. पांढऱ्या रंगाच्या आणि अपारदर्शक पेस्ट नंतर निळ्या व लाल सारख्या आकर्षक रंगातील पारदर्शक जेल्सवाल्या टूथपेस्ट आल्या. पण स्वरूप बदलल्यावर "श्वासातल्या दुर्गंधीचा" त्रास नक्की जातो का….? हे मात्र कोडंच राहिलं. त्रास जातो याचा पुरावा म्हणून जाहिरातीत जवळ येणाऱ्या मुली फक्त दाखवल्या गेल्या. या जेलच्या जोडीला झिग-झ्याग वाले, लवचिक मानवाले आणि टंग-क्लीनरवाले ब्रश आले. हे होते सेकंड जनरेशन अर्थात 2G. हा जमाना पण हळू हळू मागे पडला. तिसऱ्या जनरेशनच्या सुरुवातीलाच शोध लागला तो दातांच्या फटींमध्ये लपून दातांना भोक पडणाऱ्या किटाणूंचा आणि अगम्य नावे असलेल्या मुलद्रव्यांचा……. या मुलद्रव्यांच्या कमतरतेमुळे म्हणे दात ठिसूळ होतात आणि मोडतात. त्यामुळे टूथपेस्ट मधून ती मुलद्रव्ये पुरविली गेली. लहान मुलांच्या स्वप्नात येतील असे भयानक दिसणारे किटाणू दातांच्या फटीत दिसू लागले (असेच दिसणारे किटाणू एका फिनेलच्या कंपनीने कमोडमध्येही दाखवले होते). त्यांची सफाई फक्त आमचीच पेस्ट करते असा दावा केला जात होता. पण ती टूथपेस्ट वापरून ना मुलांचे दात किडणे कमी झाले ना दातदुखी. चौथे जनरेशन सुरू होता होता सुरुवातीला, जुन्याकाळी लोक मिठाने दात घासत असत ही नवी माहिती उजेडात आली. मग लगेच टूथपेस्ट मध्ये पण "नमक" आलं. आजोबा आपल्या नातावाला जुन्याकाळी त्यांचे दात मिठामुळे कसे मजबूत होते हे कवळी लावून सांगत होते. वॉश-बेसिन जवळ दात घासत उभा असलेला माणूस आह्ह्ह! असं जोरात ओरडतो आणि मग मागुन एक पत्राकारांसाराखी दिसणारी एक मुलगी आणि काही लोक “क्या आपकी टूथपेस्ट में नामक है?” म्हणत थेट बाथरूम मध्ये घुसतात आणि जी नाटकं करतात ते आपल्याला माहितीच आहेत. संपूर्ण जाहिरातभर तो दात दुखणारा माणूस घाबरलेलाच दिसत होत. मला नक्की माहित आहे की तो माणूस देवाचे आभार मानत असणार कारण त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून तो कमोडवर बसून दात घासत नव्हता. या वेळेपर्यंत कॉर्पोरेट डिसीज नावाची नवीन शाखा मेडीकल जगामध्ये सुरु झाली होती. मीठ हृदयासाठी चांगले नाही हा शोध लागला होता. त्यामुळे सर्व टूथपेस्ट कंपन्यांना पेस्टमधले मीठ गुंडाळून ठेवावे लागले. पण मधुमेहासारख्या रोगांमुळे या कंपन्यांना दिलासा मिळाला आणि शुगर फ्री पेस्ट चा जन्म झाला जो अजून चालू आहे. पण काल जे पाहिलं ते पाहून मी कोलमडायच्या बेतात होतो. जाहिरातीत, वेफर्स खाणाऱ्या एका मुलाला टूथपेस्ट कंपनीचा दातांचा डॉक्टर म्हणाला "दातांना अॅसिडीटी होते"……...

वाचने 11575
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

'दातांची अ‍ॅसिडिटी' हा प्रकार माहित नाही पण पेप्सी, कोकाकोला सारख्या कांही मिरमिरणार्‍या (फिझी) पेयांमध्ये असणार्‍या अ‍ॅसिड मुळे दातांवरील आवरण (एनॅमल) क्षतीग्रस्त होते आणि दातांचे विकार फार लहान वयात सुरु होतात. ते गंभीर आणि कायमस्वरुपीही असू शकतात. असे वाचलेले आहे.

बरोबर आहे… लहानपणी "रसना" बद्दलही असेच ऐकले /वाचले होते… रसनाच्या पेल्यात १ दिवस जर दात ठेवला तर तो चक्क विरघळून जातो म्हने… बाकी टूथ पेस्ट कोणतीही वापरा पण नंतर विको वज्रदंती ने दात घासायला विसरू नका

त्यांची सफाई फक्त आमचीच पेस्ट करते असा दावा केला जात होता. पण ती टूथपेस्ट वापरून ना मुलांचे दात किडणे कमी झाले ना दातदुखी.
तुम्ही कुठच्या विशिष्ट टुथपेस्टविषयी बोलत असाल तर त्याबद्दल विदा नाही. पण तरीही या आधुनिक टूथपेस्टा वगैरे वापरून लोकांचं दंतारोग्य सुधारतं आहे असं मानायला वाव आहे. मी अमेरिकेचा तुम्ही म्हटलेल्या कालखंडातलाच विदा देतो आहे. यात वीस वर्षांत मुलांच्या दातांत खड्डे असण्याचं प्रमाण 74% वरून 45% इतकं कमी झालेलं आहे. भारतातही हाच प्रकार होत असावा. दंतारोग्य

In reply to by राजेश घासकडवी

हा फरक टुथपेस्ट वापरण्यामुळे झाला नसेल तर या विदाचा शून्य उपयोग आहे. टुथपेस्ट अगदीच निरुपयोगी आहे असे मी म्हणत नाही. पण टुथपेस्ट न वापरताही पुर्वीच्या काळी लोकांचे दात आणि हिरड्या सध्याच्या काळातल्या लोकांपेक्षा जास्त चांगल्या होत्या याबद्दल दुमत नसावे. अर्थात याबद्दल माझ्याकडे आंतरजालावरचा किंवा विकीवरचा विदा उपलब्ध नसल्याने मी सप्रमाण सिद्ध करु शकत नाही याबद्दल क्षमस्व

In reply to by इस्पिक राजा

हे ठीक आहे. पण मग बर्‍याचश्या प्राण्यांचे दात कशानेच न घासता सुद्धा किडत नाहीत. दात किडण्याचे कारण रिफाइन्ड आणि शिजवलेले अन्न अधिक प्रमाणात खाणे हे आहे. जसे शिजवलेल्या अन्नावर प्रक्रिया करणे (पचवणे) पोटातल्या बॅक्टेरियांना सोपे जाते तसेच तो डातल्या बॅक्टेरियांनाही सोपे जाते. ही गोष्ट अग्नीचा शोध माणसाला लागला तेव्हापासूनची आहे. (केवळ) घरचे शिजवलेले अन्न खाणार्‍या पाळीव प्राण्यांचेही दात किडतात असे वाचले आहे.

In reply to by नितिन थत्ते

बाकी राजीव दीक्षित सुद्धा असेच कोकाकोल्यामध्ये दात ठेवला की तो विरघळतो असे सांगत. लिंबू सरबताने काय होते हे सांगत नसत. [कोकाकोलामधील फॉस्फोरिक अ‍ॅसिड टॉयलेट क्लीनरमध्ये वापरतात असेही ते सांगत. पण बहुधा '१००/१००० लिंबांची शक्ती' असलेले टॉयलेट क्लीनर आल्यावर त्यांच्याम्हणण्याकडे लोकांनी दुर्लक्ष केले असावे].

अहो हे फ्लोरिन चे पिण्याच्या पाण्यातील प्रमाण वाढवल्याने झाले आहे।त्यत टूथ पेस्ट चा उल्लेख नाहीये …. बाकी टूथ पेस्ट आणि अंघोळीचा साबण हे दोघेही फारसे प्रभावी ठरत नाहीत कारण त्यांचा संपर्क फक्त काही मिनिटा पुरताच असतो।

In reply to by चेतनकुलकर्णी_85

बाकी टूथ पेस्ट आणि अंघोळीचा साबण हे दोघेही फारसे प्रभावी ठरत नाहीत कारण त्यांचा संपर्क फक्त काही मिनिटा पुरताच असतो।
अहो आठ दिवस टूथपेस्ट आणि आंघोळीचा साबण न वापरता राहून पहा. 'प्रभाव' निश्चितच जाणवेल. तुम्हाला नाही तरी इतर लोकांना तरी. तुमची बरीच मिनिटं वाचतीलच आणि इतर लोकं भेटून, गप्पा मारून वगैरे वेळ फुकट घालवतात तोही वाचेल.

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जी, बहुतेक त्यांना ते 'श्वासातला तजेला दिवसभर' छाप जाहिरातींच्या अनुषंघानें म्हणायचे असावे. दात घासूच नका असे नव्हे! - (नियमीत दात घासणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

जाहिरातीत जे सांगितलं जातं ते अतिशयोक्त असतं याबद्दल कोणाचंच दुमत नसावं. पण 'साबण/टूथ पेस्ट अंगाला काहीच मिनिटं लागतात त्यामुळे काहीच परिणाम होत नाही' हेही तितकंच अतिशयोक्त विधान आहे. 'दिनभरका तजेला' वगैरे जाहिरातींतून खरंतर 'दररोज वापरलंत तर अंगाला/दाताला दुर्गंधी येणार नाही' इतपतच घ्यायचं. तेवढं ते खरं आहेच की. जाहिरातींतल्या अतिशयोक्तीवर टीका करताना आपण दुसऱ्या दिशेने अतिशयोक्ती केली तर मग काय राहिलं?

In reply to by राजेश घासकडवी

अहो साहेब _^ _ १. अमुक तमुक प्रकारची पेस्ट वापरल्याने तुमचे दात चुन्या सारखे सफेद होतील २. अमुक तमुक प्रकारचा साबण वापरल्याने तुमची कांती उजळून निघेल ३. अमुक तमुक प्रकारचा स्प्रे वापरल्याने ललना तुमच्या अंगावर येईन पडतील हे जसे घडत नाही त्या संदर्भात मी म्हटले होते…

In reply to by चेतनकुलकर्णी_85

अंघोळीचा साबण वापरल्याने काय होते? आपल्या शरीरातून स्वेद ग्रंथीतून निघणारे तैलयुक्त स्त्राव त्वचेवर पसरतात आणि त्वचेचे कोरडेपणापासून संरक्षण करतात.( हिवाळ्यात साबण अतिरिक्त वापरला तर त्वचा कोरडी पडते हे हा स्वेद पूर्ण धुतला गेल्यास होते) तसेच घाम ग्रंथीतून निघाल्यानंतर त्वचेवर वाळून आपले शरीर थंड ठेवले जाते. या स्वेद आणि घामावर धूळ आणि धूर बसून शरीरावर एक तेलकट थर जमा होतो.पुण्यात मुली वाहनावर दहशतवादी मुखवटा घालतात याचे हेच कारण आहे यावर जीवाणूंची वाढ येउन शरीरास दुर्गंध/ वास येतो. केवळ पाण्याने अंघोळ केल्यास हे स्वेद निट निघत नाही म्हणून साबण लावून अंघोळ केल्यास हा तेलकट थर धुतला जातो त्याबरोबरच शरीरावरचे जीवाणू सुद्धा धुतले जातात. सकाळी कामावर जाण्यापूर्वी स्नान करण्याची आपली पद्धत अतिशय आरोग्यकारक आहे यात केवळ स्वतः चा नव्हे तर इतरांचा विचार केलेला आहे. स्नानानंतर विविध तर्हेची अत्तरे किंवा सुगंधी द्रव्ये( चन्दनाची उटी) लावण्याची आपली परंपरा फार चांगली आहे. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी सायंकाळी सुद्धा साबणाने स्नान करणे हितकारक आहे.आणि ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी स्नानानंतर साय आणि हळद अर्धा तास लावावी आणि मग नुसत्या पाण्याने धुवून टाकावे किंवा तिळाचे तेल लावावे आणि आत जिरवावे. टूथपेस्ट बद्दल खाली लिहिले आहेच

In reply to by चेतनकुलकर्णी_85

ओ विद्वान ! फ्लोरीन नव्हे फ्लोराईड आहे ते.

टूथ पेस्ट आणि अंघोळीचा साबण हे दोघेही फारसे प्रभावी ठरत नाहीत कारण त्यांचा संपर्क फक्त काही मिनिटा पुरताच असतो
+१ - (विको वज्रदंतीची चव भयंकर आवडणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

आयुर्वेदिक कोणत्याही उत्पादनाला काटेकोर नियंत्रण नसल्यामुळे वज्रदंती मध्ये वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांनी दात जास्त घासले जाऊन वरील इनामल झिजून गेलेल्या लोकांच्या लक्षणाला (वज्रदंती अब्रेजन) वरील नाव मुंबई तील नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाने दिले आहे. दात सर्वसाधारण पणे टोकाकडे झिजतात पण दर्शनी भाग सहसा झिजत नाही. हातावर वज्रदंती घेऊन घासल्यामुळे दात अक्षरशः "घासले" जातात त्यामुळे इनामलचा वरचा थर घासला जाऊन दात शुभ्र दिसतात पण एकदा इनामल घासून गेल्यावर दात गरम किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर कळ मारते.( आतील डेनटीन उघडे पडल्यामुळे). कोलगेट टोटल किंवा पेप्सोडेंट जर्मीचेक यामध्ये एका तर्हेचे रेसीन असते( हे त्यांचे ट्रेड सिक्रेट आहे) जे दाताच्या इनामल ला चिकटते आणि ट्रायक्लोसान( गुगल करून पहा) नावाचे जंतुनाशक या रेसीन ला जोडलेले असल्यामुळे दात किडण्यास किंवा श्वासाच्या दुर्गन्धीस जबाबदार असणारे जंतू बराच काळ मारले जातात किंवा प्रतिबंधित राहतात हे बर्याचशा चाचण्यातून सिद्ध झालेले आहे. आयुर्वेदिक उत्पादनांना काटेकोर शास्त्रीय चाचण्या बंधनकारक ठरवण्याची वेळ आली आहे. बाकी आपण आपला दात लिंबाच्या रसात किंवा चिंचेच्या कोळात ठेवला किंवा सफरचंद संत्रे अशा फळांच्या रसात ठेवला तरीही तो त्यात विरघळून जाईल म्हणून हे पदार्थ खाणे बंद करणार काय? शीतपेये प्यावीत अशा मताचा मी मुळीच नाही परंतु आपण एखादी गोष्ट का करतो त्याचे शास्त्रीय कारण माहित असावे या साठी हा प्रपंच.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब - अतिशय सुंदर उत्तर. खरे तर आता आयुर्वेदिक उपचार पद्धतीला कायद्याने बंदी घालायची वेळ आली आहे.

In reply to by कपिलमुनी

चाचण्या घ्यायला हे वैद्य तयार आहेत का? आत्ता त्यांचे हात कोणी धरले आहेत चाचण्या करायला clinical trials.

ते आधी कडुलिंबाची काडी चावणे वैग्रे प्रकार चालायचे त्यामुळे दातात खड्डे पडण्याचे प्रमाण कितपत असावे शंकाच आहे. किमान दंतारोग्य तरी जुन्या भारतात उत्तम असावे असे मानण्यास वाव असावा.

In reply to by बॅटमॅन

अहो, भैरप्पांनी त्यांच्या कादंबरीत कर्णाचे दांत खूपच खराब असल्याचे म्हटले आहे. त्यासाठीच त्याने दांतांवर सोन्याचा मुलामा चढवला होता म्हणे!

In reply to by बॅटमॅन

मी हाच उल्लेख मृत्यूंजयमध्ये* वाचला आहे. एका याचकाला अगदी शेवटी.. आसन्नमरणावस्थेतला कर्ण दात पाडून देतो. *मृत्यूंजय ही कादंबरी आहे हे ठावूक आहे - लगेच वेड्यात काढू नये!! ;-)

In reply to by मृत्युन्जय

'मृत्युंजय'च.. कर्ण कसला ग्रेट होता वाली.. त्यातलं कृष्णाने सांगितलेलं शेवटचं प्रकरण..

In reply to by बॅटमॅन

पर्व बरोबर आहे. पण पर्व मध्ये बलरामाची दाढ दुखत असून ती तो स्वतःच पाडतो असा उल्लेख आहे असे आठवते.

दंतारोग्य तरी जुन्या भारतात उत्तम असावे असे मानण्यास वाव असावा.
तांबूल, तमाखू अन मशेर्‍या इसरलायस जणू? ;)

In reply to by अभ्या..

हाहाहा विसरून कसे चालेल? पण दंतारोग्यात भारतात नक्की सुधारणा झालीये किंवा कशी याबद्दल जरा साशंक आहे इतकेच.

In reply to by बॅटमॅन

ही बघ एक रोचक बातमी. त्यातील तथ्ये / अंदाज भयावह + आय-ओपनिंग आहेत (पण धक्कादायक नाहित) आरोग्यातील सुधारणा माहित नाही पण जागरुकता वाढली असे माझे वैयक्तीक मत आहे

भडकमकर मास्तरांनी यावर खरंतर लेख लिहायला हवा आहे. निष्णात दंतचिकित्सक आहेत ते! दातांची स्वच्छता कश्याप्रकारे करायला हवी हे मुलांना खरोखर शिकवण्याची गरज आहे. बाकी या जाहिरातींमधला मसूडे हा शब्द मला अजिबात आवडत नाही. ;)

In reply to by रेवती

भडकमकर मास्तरांनी यावर खरंतर लेख लिहायला हवा आहे. निष्णात दंतचिकित्सक आहेत ते! दातांची स्वच्छता कश्याप्रकारे करायला हवी हे मुलांना खरोखर शिकवण्याची गरज आहे.
अगदी हेच लिहायला आलो होतो. :)

स्वानंदराव तुमचं निरीक्षण सही आहे; आवडलं. जसजसं वाचत गेलो तसतशा त्या जाहिराती समोर दिसत गेल्या. सुरेख लिहिलंयत तुम्ही. मस्तच. आणि हो,त्यातल्या कंटेंट चं म्हणायचं झालं तर तुमच्या म्हणण्याशी सहमत. गि०हाईकाला भुलवायला (** बनवायला) काय काय म्हणून करतील ना कंपन्या.... नेम नाही.

एका वेगळ्याच विषयाला हात घालणारा लेख . याबद्द्ल आभार. बाकी १९६० पासून कोलगेट ने अनेक न पटणार्‍या जाहिराती केल्या आहेत. आता खरे तर जाहिरात करताना भावनिक आवाहन करायला बंदी घालणे हे कठीणच आहे. पण अमुक टूथ पेस्ट वापरतो म्हणून सुपारी दाताने कातरतो किवा शतक मारतो असा जर दावा कोणी केला तर त्यावर केस केली पाहिजे. बाकी मुलीच्या बापाने मुलीवरच्या " अगाध" मायेपोटी वाढदिवसाला कोलगेट दिली अशी जाहिरात आली तर त्याला कोण काय करणार.? बाहेर भेळ खायला गेलो नि .... ऑडी घेउन आलो .. अशा जाहिरातीही आता येतात.

आमच्या आजीकडे कोलगेट पावडर असायची...मउ अन छान वास - चव असणारी. मग आमचंही बराच वेळ "दात घासणं" चालायचं. दुसरं म्हणजे एक कोंबडीच्या पिल्लाची जाहीरात असणारी दुथपेस्ट मला फार आवडायची - कारण ते गोंडस कोंबडीचं पिल्लु. लिंबु + मिठ हे सुद्धा चांगलं - कधी टुथपेस्ट सापडली नाही किंवा संपलेली असली की मी वापरायचे झालंच तर गावी वापरलेल्या राखुंडीनेही दात स्वच्छ होतात कडुनिंबाची काडी कधी वापरली नाही..सध्या एवढंच आठवतंय.

भाजलेल्या तंबाखूने (मिश्री) दात घासून पहा. एकदम लख्ख होतील. बोनस म्हणून दात घासल्यावर थोडा वेळ 'किक' पण बसेल. तंबाखू हा प्रकार गावठी वाटत असेल तर तंबाखूमिश्रित 'इप्को' टूथपेस्ट वापरा. मस्त 'किक' बसेल. %)

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, इप्को किंवा मिश्रीने दात स्वच्छ होतात पेक्षा त्याने तंबाखूची किक बसते म्हणून लोक दात घासतात. पण ते गुटखा खाण्या इतकेच धोकादायक आहे. क लो अ

In reply to by सुबोध खरे

>>> इप्को किंवा मिश्रीने दात स्वच्छ होतात पेक्षा त्याने तंबाखूची किक बसते म्हणून लोक दात घासतात. पण ते गुटखा खाण्या इतकेच धोकादायक आहे. खरेसाहेब, मला याची कल्पना आहे. मी आधील प्रतिसाद गंमत म्हणून लिहिला होता. तंबाखू/मिश्री/मशेरी इ. अत्यंत घाणेरडे पदार्थ आहेत. या पदार्थांचे सेवन केलेली व्यक्ती जवळपास आली तरी उलटीची भावना होते. अशा पदार्थांनी दात घासणे हे अत्यंत अस्वच्छ व हानिकारक आहे.

खायचा सोडा आणि मीठ समप्रमाणात घेऊन दात घासले तर कुठल्याही दंतमंजनाची किंवा टूथपेस्टची गरज भासत नाही.. दातांचे, हिरड्यांचे आरोग्य शाबुत राहते असे वाचले आहे.

भारतात दाताच्या काळजीबद्दल वाढत चाललेली जागरुकता स्वागतार्ह आहे. सदर लेख विनाकारण हेटाळणीयुक्त वाटला. क्षमस्व!

मुंबईतले उत्तर भारतीय हे आज सुद्धा बबुळाच्या काड्यांनी दात साफ करताना दिसतील. तसेही या कंपन्या काय दखवुन / सांगुन काय काय विकतील हे सांगता येत नाही. भारतात तंदुरुस्ती की रक्षा करणारा साबण युरोपात फक्त कुत्र्यांना धुण्याकरता वापरला जाई असे म्हंटले जाते.

समजा दात घासणे बंदच केले तर ? केवळ सकाळी उठुन खळाखाळा चुळा भरायच्या जेवण झाल्यावरही चुळा भरायच्या किंव्वा काहीही खाल्ले तरी दात फक्त पाण्याने स्वछ करायचे असे केल्यास दात किती दिवस टिकतील ??

In reply to by प्रसाद गोडबोले

काहीही होणार नाही. मूळ दात किडण्याचे कारण दाताच्या फटीत पिष्टमय पदार्थ अडकून त्यावर जीवाणूची क्रिया होते आणि त्याचे आम्ल तयार होते हे आम्ल दाताच्या इनामल वर प्रक्रिया करते आणि त्यातून दात किद्ण्यास सुरुवात होते. जर आपण खळाळून चूळ प्रत्येक खाण्यानंतर भरली तर वरील सर्व पदार्थ आपोआप धुतले जातील आणि दात घासण्याची गरज फारशी उरणार नाही. मूळ हे काम लाळसुद्धा करत असतेच. म्हणून तर जेवणानंतर च्युईंग गम चघळल्याने दात किडणे कमी होते.

एक शंका.. स्त्री आणि पुरूषांच्या दातांच्या ड्युरॅबिलीटीमध्ये फरक असतो का..? तसेच अनेक आज्ज्या दात न पडता गेल्याचे आपण ऐकतो - त्याचे काय कारण असावे..?

In reply to by पाषाणभेद

लोकं १५-१५ दिवस आंघोळीशिवाय कसे राहू शकतात कळत नाही. मला तर ८ दिवसांत॑ अंगाला खाज येऊ लागते.

माझे दात कितीही घासले, कशानेही घासले तरी पिवळे ते पिवळेच होते. पण एक दिवस अचानक पांढरे झाले-अपघातानेच- तो असा आम्ही गणपतीपुळ्याला गेलो असतांना सकाळी सकाळी लवकर बीचवर पळायचे होते,पटकन ब्रश करावा म्ह्णून उठ्ल्या उठ्ल्या पेस्ट हातात घेतली,ब्रश करायला सुरुवात करुन बराच वेळ झाला तरी पेस्ट्चा फेस होईना आणि तोंड कडू व्हायला लागले पेस्ट परत बघितली तर ते ओडोमॅस होतो. पण खरच सांगते दात खुप स्वच्य झाले.

In reply to by आदूबाळ

स्वाती ठकार म्हणजे मुक्तपीठावरची 'प्रतिक्रीया क्विन' :)) ऑडोमास दंतमंजन, क ह र.. अजून काय काय प्रताप केलेत ते वाचायला आवडतील..

In reply to by त्रिवेणी

माझे दात कितीही घासले, कशानेही घासले तरी पिवळे ते पिवळेच होते
हे चुकीचे मराठी आहे. हे वाक्य हल्ली असे लिहिले जाते: माझे दात कितीही घासले, कशानेही घासले तरी पिवळे ते पिवळे यलोच होते. ;)

छान लिहिलंय …. फसवा फसवी आहे सगळी ।ग्रहकनि ठरवायचे कशाला पैसे मोजतो आपण आणि काय नाही घ्यायचे

नुकतेच कुणीतरी विचारले होते - "जाहिरातीतील डेन्टिस्ट गळ्यात स्टेथोस्कोप का घालतात?"

In reply to by सुनील

रुग्णास उच्च रक्तदाबाचा विकार असेल तर दात काढण्यापूर्वी रक्तदाब आणि हृदयाचे ठोके मोजण्यासाठी लागत असावा.