✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)

स
संजय क्षीरसागर यांनी
Mon, 07/01/2013 - 23:40  ·  लेख
लेख
कृष्ण आणि अर्जुनाकडे महाभारतातल्या व्यक्तिरेखा म्हणून पाहू नका. त्या प्रत्येक व्यक्तीच्या, सदैव उपस्थित असलेल्या दोन चित्तदशा आहेत. अर्जुन ही संभ्रमित चित्तदशा आहे आणि कृष्ण ही शांत आणि स्थिर स्थिती आहे. जीवनाच्या रथाचं सारथ्य अर्जुनाकडे आहे, मनाकडे आहे त्यामुळे अस्वास्थ्य आहे. krishna रथाचं सारथ्य कृष्णाकडे, स्वत:कडे घेण्याचं साहस करण्याचा फक्त अवकाश , तुम्ही स्वच्छंद व्हाल. __________________________ बिफोर वी गो, पहिल्या लेखात म्हटलंय विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील. प्रथम तुमच्या सर्व प्रतिसादांची एकसंध मांडणी करून लेखमालेच्या संदर्भात त्याची उत्तरं देतो म्हणजे पुढे जाता येईल. अनेकांचा प्रश्न असायं की मनापलीकडे जाऊन काय साधतं? खरं तर याचं उत्तर लेखातच आहे : जेव्हा तुम्हाला मनाची समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्त व्हाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल. आणखी थोडं विस्तारानं सांगतो (सुरुवातीचा भाग लेखात आहे) : संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 'पहिली संवेदना' हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो. आपलं मन (किंवा मेंदू) प्रत्येक संवेदनेचं डिकोडींग करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला संवेदनेचा अर्थ कळतो. हे डिकोडींग स्मृतीच्या आधारे चालू असतं. तुम्ही कधीही शांत डोळे मिटून बसलात तर तुम्हाला हा अनुभव येईल. समजा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला तर प्रथम तो उलगडा होतो (श्रवणसंस्था सक्रिय होऊन स्मृतीन्वये तो आवाज कुणाचा ते कळतं ). मग स्मृतीचा दृक भाग सक्रिय होतो आणि डोळ्यासमोर आपल्याला ज्ञात असलेल्या कुत्र्याची प्रतिमा येते. त्यानंतर कुत्र्याविषयीच्या सर्व स्मृती सक्रिय होतात. समजा लहानपणी कुत्रा पाळला असेल (किंवा कधी चावला असेल) तर त्याच्या स्मृती. कुणाला कुत्र्याच्या मालकिणीविषयी काही अनुभव असेल तर त्या स्मृती. कुणाला कुत्री आवडत नसतील तर कॉर्पोरेशनच्या डॉगस्कॉडमध्ये तक्रार करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा याचा प्लॅन. आणि असं करत करत कुत्र्याचं जिणं चांगलं का वाईट? आणि सरते शेवटी, आपलं जिणं कसं आहे? अश्या प्रकारे विचारचक्रात पूर्णपणे अडकून आपण स्मृतींच्या अनंत विस्तारात फिरत राहतो. काही वेळानंतर लक्षात येतं की अरे! आपण घरात शांत बसलेलो आहोत. हे इतकं सविस्तर लिहिण्याचं कारण की कोणताही निर्णय घेताना, कुणाशीही वागताना किंवा एखादी कृती करताना आपण स्मृतीच्याच अधीन होऊन जगत असतो. स्मृतीचा वापर करणं ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे आणि तिच्या अधीन होऊन जगणं बंधन आहे. पण स्मृतीची प्रक्रिया इतकी वेगवान आहे आणि आपण इतके बेसावध असतो की 'स्मृती (किंवा मन) निर्णय घेतं आहे' याची शेवटच्या क्षणापर्यंत कल्पनाच येत नाही! तुम्हाला वाटेल की असं काही नाहीये पण मानवी अस्वास्थ्याचं मूळ कारण तेच आहे. आयुष्यात प्रथम आपण सेटल होण्याचा प्रयत्न करतो ( ते अपरिहार्य आहे) पण एकदा सेटल झाल्यावर आपण तोच दिवस (अगदी किरकोळ फरकानं ) पुन्हापुन्हा जगतो. अस्तित्वात प्रत्येक क्षण नवा आहे पण वी लीव द सेम रूटीन. आपला दिवस आठवड्याच्या माळेत गुंफल्यानं त्यात थोडाफार पॅटर्न वाटतो इतकंच. मग असं जगतजगत एक दिवस आपण संपून जातो. ज्यांना याची वेळीच कल्पना येते ते चौकट लंघायचा प्रयत्न करतात, पण बहुसंख्यांना वाटतं लाईफ असंच आहे. ते 'एक उनाड दिवस' सारखा पिक्चर पाहतात (फार तर अधेमधे ट्रेक करतात किंवा सहलीला जातात) आणि ‘कल्पना उत्तम आहे’ अशी स्वतःची समजूत घालून विसरून जातात. नाऊ कमिंग टू द पॉइंट, जर तुमचं आयुष्य यापेक्षा वेगळं असेल किंवा तुम्हाला तसं वाटत नसेल तर तुम्हाला या लेखांचा काही उपयोग नाही. तुम्ही लेख वाचण्याच्या, प्रश्न विचारण्याच्या आणि वाद घालण्याच्या फंदात पडू नका. इथे असा गैरसमज आहे की पब्लिक फोरमवर कुणीही काहीही विचारू शकतो. हे म्हणजे रस्त्यावरच्या सगळ्या पाट्या वाचत आणि प्रत्येक दुकानदाराशी बोलत सुटण्यासारखं आहे. ज्यांना माझं म्हणणं पटलं असेल आणि हरक्षणी उत्स्फूर्ततेनं जगायचं असेल त्यांना लेखमालेचा उपयोग आहे. _________________________ दुसरी गोष्ट, मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही इतर कोणताही मार्ग अवलंबत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला नामसाधना योग्य वाटत असेल तर चालू ठेवा. मनाच्या अवलोकनानं रिझल्ट मिळत असेल तर उत्तम आहे. मी स्वतःचं आकलन मांडतोय, आणि जे लिहितोय ते जगतोय त्यामुळे मला कोणत्याही साधनेची गरज नाही. तस्मात, तुम्ही तुमच्या मार्गानं जाणं उत्तम. ते मार्ग रिझल्ट देत नाहीत असं मी का म्हटलं याचा सविस्तर उहापोह पहिल्या लेखात आणि इतर अनेक प्रतिसादात झाला आहे त्यामुळे त्यावर आता पुन्हा चर्चा होणे नाही. _____________________ सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखनाचा उद्देश इंटरेस्टेड लोकांचं आयुष्य आनंदाचं व्हावं असा आहे आणि तो निव्वळ वाचन किंवा चर्चेचा विषय नाही; जगण्याचा आहे. त्यामुळे जोपर्यंत बॅकट्रॅक या पहिल्या लेखात सांगितलेल्या प्रक्रियेचा तुम्ही स्वतः प्रयोग करून अनुभव घेत नाही (किंवा शंका निस्तरत नाही) तोपर्यंत पुढचे लेख लिहिण्यात अर्थ नाही. कारण स्मृती हा मनाचा व्यापक प्रभाग आहे. त्याची प्रक्रिया उलगडल्याशिवाय पुढे तादात्म्य, धारणा, अंतःप्रेरणा, भय, कल (अ‍ॅप्टीट्यूड) , माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, नाती आणि सरते शेवटी संगृहित मनाचा परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व या गहन पैलूंचा उलगडा होणं अशक्य आहे. तुमच्या प्रतिसादातून आणि प्रश्नातून तुम्ही प्रक्रिया करून पाहिली की नाही हे लक्षात येतं आणि इथे एक सोडता कुणीही प्रक्रियेविषयी काही प्रतिसाद दिलेला नाही. आधी जे दोन प्रतिसाद आले होते त्यांनी प्रक्रिया करून पाहिलेली नाही हे त्यांच्या नंतरच्या प्रतिसादांवरून कळलं. ____________________ शेवटची गोष्ट, प्रत्येक वॅलीड प्रश्नाला मी उत्तर दिलं आहे. काही प्रश्न खरोखरी विषयाशी संबंधित होते : उदाहरणार्थ 'हे तरी आम्हाला कसे कळावं की आम्ही तुमची साधना विश्वासानं करून पाहवी?' आणि उत्तर आहे : मला किती कळलंय ते तुम्हाला साधना यशस्वी झाल्या क्षणी कळेल!. आणि, अर्थात साधना सोपी आणि निर्धोक आहे. तुम्हाला त्यासाठी कुठेही जायची गरज नाही की त्यात फारसा कालापव्यय नाही. किंवा : तुम्ही सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.> असे लिहिलं आहे. हे कसं काय? आईन्स्टाईनबद्दल किंवा तश्याच अनेक शास्त्रज्ञांबद्दल देखिल तुमचे हेच मत आहे का? आणि उत्तर आहे : शास्त्रज्ञ अस्तित्वागत प्रश्नांवर (उदा, गुरुत्वाकर्षण) चिंतन करतात, रामावर नाही. आणि त्यांच्या चिंतनातून ते प्रश्नांची उकल साधतात. राम भेटावा हा त्यांच्या चिंतनाचा हेतू नसतो त्यामुळे ते भ्रमिष्ट होत नाहीत. मला वाटतं हा प्रश्न स्वतः विचार केला तरी सुटण्यासारखा आहे. आणि प्रश्न विचारताना किमान तेवढा विचार करावा अशी अपेक्षा आहे म्हणजे चर्चा विस्तारणार नाहीत. काही ठिकाणी उपहास करण्याचा अटोकाट प्रयत्न झालयं, उदा. हा प्रश्न : जाणीवेची स्थिर अवस्था म्हणजे कोमा का? अश्या प्रकारे उपहास करताना आपलं हसूं होतं इतकं लक्षात आलं तर बरं. कारण ‘कोमा’चा अर्थ ‘हँग झालेला कंप्युटर’. व्यक्तीची जाणीव स्थिर झालीये पण मेंदू निकामी झालयं, तो आता संवेदना डिकोड करू शकत नाही. सिद्धाची जाणीव स्थिर आहे आणि मेंदू फुल्ली फंक्शनल आहे. थोड्याफार प्रमाणात अशीच परिस्थिती धाग्याचा खरडफळा करणार्‍यांची आहे पण ती जवाबदारी सं.मं.ची आहे. त्यामुळे कुणाचे प्रतिसाद वाचायचे आणि कुणाचे नांव पाहून स्क्रोल करायचे इतकंच माझ्या हातात आहे. पण काही ठिकाणी सदस्य इतके असंबद्ध प्रतिसाद देतात की आश्चर्य वाटतं उदा. 'अवांतर: तुम्ही कायम हे असे पराभूत, हल्ले, हुकुमत अश्या प्रकारचे शब्द का वापरता'? त्यामुळे मला फार हसू येतं'. साधारण मराठी पाचवी-सहावीपर्यंत कुणालाही हे शब्द गेलेले असावेत अशी (निदान मराठी संकेतस्थळावर तरी) अपेक्षा आहे. अनाहत नाद या अत्यंत गहन विषयावर मी म्हटलंय : "मन शांत झालं की देह, मन आणि विश्वशांती यांची एकरूपता साधते कारण शांतता एकसंध आहे. तिचं विभाजन होऊ शकत नाही. या स्थितीत आपण अखिल विश्वाशी एकरूप होतो (म्हणजे मुळात आहोतच पण त्याची प्रचिती येते). त्याला सत-चित-आनंद (अ‍ॅबसल्यूट-काँशसनेस-इक्सटसी) म्हटलंय". त्यावर असा प्रतिसाद देणं : "कसेही असलं तरी जर मूळ्स्वरुप कायम तसेच राहणार आहे तर त्यापर्यंत जायचे कशाला? जिथे काहितरी बिघडतय तिथे जौन दुरुस्त करायला नको का?" म्हणजे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या रंगलेल्या आणि क्लायमॅक्सला आलेल्या मैफिलीत अचानक कुणाचा सेलफोन यावा आणि 'हाताला धरलं या' हा रिंगटोन वाजावा तसं आहे. अशामुळे आपला शास्त्रीय संगीतातला रस तर दिसतोच पुन्हा चारचौघात अभिरुची उघड होते. एखाद्याला त्याची फिकीर नसणं शक्य आहे पण इतरांचा रसभंग होतो हे नक्की. अश्या वेळी सेल स्वीच ऑफ असणं उत्तम. या लेखावरील प्रतिसादांमुळे सदस्यांचा वैचारिक कल, त्यांचं आध्यात्मिक आकलन याची पूर्ण कल्पना आलेली आहे. त्यावरनं एक सांगावंस वाटतं, मनापलीकडे जाणं म्हणजे वैचारिक उहापोहातनं बाहेर पडून जाणिवेनं जगणं. अर्थात, जोपर्यंत स्मृती सक्रिय होण्यापूर्वी कोणती संवेदना होती ते लक्षात येत नाही तोपर्यंत जाणीव म्हणजे नक्की काय याचा उलगडा होत नाही. आणि जाणीव हा आपला अस्तित्वाशी संपर्क बिंदू आहे. तो अंतःप्रेरणेचा स्रोत आहे. थोडक्यात अस्तित्वाशी समरूप होऊन जगायला (किंवा अस्तित्वाची इच्छा समजायला) स्मृतीऐवजी संवेदना उपयोगी आहे. स्मृती (किंवा मनाच्या) अधीन असणं म्हणजे व्यक्तिमत्त्वात बंदिस्त होऊन जगणं आणि जाणिवेनं जगणं म्हणजे स्वच्छंद जगणं असा अर्थ आहे. स्वच्छंद जगताना आपण स्मृतीचा उपयोग करतो, पण अनुसरण करत नाही. ते आयुष्य एका नव्या डायमेन्शननं जगायचं साहस आहे. सर्व लेखन हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तस्मात, निष्फळ चर्चा आणि वादविवाद करण्यापेक्षा तुम्हाला काही काळ तरी प्रामाणिकपणे माझ्या बरोबर वाटचाल करावी. एकदा आपल्या अनुभवात समन्वय आला की मैफिल रंगत जाईल. नंतर जीवनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाकडे म्हणजे स्वत:कडे घेण्याचं साहस केल्याचा आनंद, तुमचा अनुभव होईल .

Book traversal links for रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)

  • ‹ `रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)
  • Up
  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
18668 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

जाणीव हा आपला अस्तित्वाशी

सोत्रि
Tue, 07/02/2013 - 22:49 नवीन
जाणीव हा आपला अस्तित्वाशी संपर्क बिंदू आहे. तो अंतःप्रेरणेचा स्रोत आहे. थोडक्यात अस्तित्वाशी समरूप होऊन जगायला (किंवा अस्तित्वाची इच्छा समजायला) स्मृतीऐवजी संवेदना उपयोगी आहे.
बिंगो! हे भाग १ आणि भाग २ यांचे सार असावे. ह्याचा मतिथार्थ माझ्या पहिल्या भागातील प्रश्नाच्या उत्तरात दडला होता बहुदा :) - (संवेदनाशील) सोकाजी
  • Log in or register to post comments

प्रथम, आपण विचारानं जगतो आणि अखिल सजीवसृष्टी संवेदननं!

संजय क्षीरसागर
Tue, 07/02/2013 - 23:43 नवीन
हा फरक पूर्णपणे मान्य केला पाहिजे. साधी जेवणाची गोष्ट घ्या. भोजन हा दिवसातला सर्वात मोठा आनंदाचा विषय आहे. पण आपण भूकेनं जेवत नाही, वेळेवर जेवतो! आणि हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. आपल्याला भूक लागली हे घड्याळाकडे पाहून ठरतं, संवेदनेनं नाही. त्यात या फार्मा कंपन्यांनी `अ‍ॅसिडिटी, शुगर, बीपी आणि कायकाय भरवून दिलंय. त्यामुळे जेवण `फक्त झालं' इतकंच महत्त्वाचं असतं. त्यात मजा आहे (प्रत्येक भोजनात), तृप्ती आहे हे क्वचितच कळतं. काय क्रायटेरिआ आहे भोजनाचा? तर अस्वस्थ करणारी भूक. ती संवेदनाच मग शरीराला काय हवंय ते सांगते. तुम्ही नुसते जेवत नाही, रसपरिपोष करता. त्यातनं तृप्ती येते आणि अन्नदात्याविषयी कमालीचा कृतज्ञता भाव निर्माण होतो. एकदा ही मजा कळली अशी भूक लागावी म्हणून तुम्ही शारीरिक कष्ट करता आणि मग भूक लागण्याची वाट पाहता. योर इटींग बिकम्स अ सेलिब्रेशन अँड नॉट ओन्ली वन टाईम बट एवरी टाईम. तुम्ही फक्त या एका संवेदनेनं काम करा, तुमचं शरीर स्वस्थ आणि मस्त राहिल. अर्थात ते कसं जमवायचं हे तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनात स्वतःची बुद्धी वापरून ठरवावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

चालू द्या!

प्यारे१
Wed, 07/03/2013 - 01:43 नवीन
चालू द्या!
  • Log in or register to post comments

संवेदना ही मनाची कारक आहे

धन्या
Wed, 07/03/2013 - 08:42 नवीन
संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते.... ....पण स्मृतीची प्रक्रिया इतकी वेगवान आहे आणि आपण इतके बेसावध असतो की 'स्मृती (किंवा मन) निर्णय घेतं आहे' याची शेवटच्या क्षणापर्यंत कल्पनाच येत नाही!
उत्तम ! या पुर्ण उतार्‍याला मानसशास्त्रीय बैठक आहे, मेंदूविज्ञानाचा आधार आहे. या उतार्‍यानंतर जे काही लिहिलं आहे, त्यावर म्या पामर कय लिहिणार. :)
  • Log in or register to post comments

उत्तम ! या पुर्ण उतार्‍याला मानसशास्त्रीय बैठक आहे,

संजय क्षीरसागर
Sat, 07/06/2013 - 15:11 नवीन
मेंदूविज्ञानाचा आधार आहे
धन्यवाद! संवेदनेचं सतत आणि अनावधानानं स्मृतीत होणारं रूपांतर थांबणं याला जागरुकता म्हटलंय. बॅकट्रॅक या प्रोसेसनं आपण संवेदनेपाशी येतो. एकदा संवेदना काय होती याचा उलगडा व्ह्यायची सवय लागली की स्मृतीप्रवाहात वाहात जाणं कमी होतं असा उर्वरित भागाचा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

प्रोब्लेम स्मृतिचा नाहिये!

अग्निकोल्हा
Sat, 07/06/2013 - 02:07 नवीन
तो आपल्या मनाच्या इमॅजिनेशच्या अनियंत्रित अ‍ॅबिलिटी व टेंडन्सिचा आहे. उदा. मी आता तुम्हाला एक सत्य घटना सांगतो की, कालच आमच्या बिल्डिंगमधुन दुपारी एका पोस्टमने चक्क गाडी पळवुन न्हेली... झालं! आलं कि नाय डोळ्या समोर चित्र एक खाकि ड्रेसचा पोस्टमन गेट जवळुन दुचाकि ओढुन न्हेतोय ते ? मग समजा मि म्हटल पोस्टमन गणवेशात न्हवता वा ती गाडि मुलांच्या खेळण्यातिल होती.. लगेच संदर्भ बदलले. मनासमोरच चित्र बदललं, आता वेगळच दिसलं. थोडक्यात स्मृतिच्या आधाराने पॅटर्नमॅच करण्यापेक्षाही, मानवि मनाची पोकळ्या भरुन काढायची (गॅप फिल करायची) काहिशी अनियंत्रित क्षमता व प्रव्रुत्ति ज्याला आपण कल्पनाशक्ति म्हणूया खरा गोंधळ करत असते बघा. बाकि चालुद्या... "मनापासुन मुक्त" होउन आयुष्य आनंदि बनायला आधि बँकबॅलन्स दणकट असावा लागतो हे बेसिक लक्षात ठेउनच याचा अभ्यास करायचे माहित असल्याने या लेखातिल सुखि होण्याच्या उथळ, वरवरच्या व दिषभुल करणार्‍या मुद्यांवर विषेश लिहण्यासारखे याक्षणि काहि नाही.
  • Log in or register to post comments

तो आपल्या मनाच्या इमॅजिनेशच्या अनियंत्रित अ‍ॅबिलिटी व

संजय क्षीरसागर
Sat, 07/06/2013 - 10:50 नवीन
टेंडन्सिचा आहे.
तेच तर सांगतोय. अनियंत्रित मनाला ऐच्छिक करण्यावर तर लेखमाला आहे. पहिल्या लेखात मी म्हटलंय :
मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अ‍ॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर ठेवेल ते सांगता येत नाही.
त्यामुळे कुणाचं मन कसं सक्रिय होईल आणि त्याला कोणत्या स्मृती किंवा कल्पनेतून किती वेळ वास्तविकतेपासून दूर नेईल हे त्याचं आतापर्यंतच आयुष्य आणि धारणा (ज्यामुळे विचार करण्याची पद्धत ठरते) यावर अवलंबून आहे. >मनापासुन मुक्त" होउन आयुष्य आनंदि बनायला आधि बँकबॅलन्स दणकट असावा लागतो = मला वाटतं बँकबॅलन्सपेक्षा बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे. कारण भरपूर संपत्ती ही भयभित मनाचीच मागणी असते. तुमच्या मनातली फिगर आणि वास्तविकातली फिगर यात कायम तफावत असते आणि जोपर्यंत व्यक्ती मनाचं अनुसरण करते तोपर्यंत कल्पनेतली फिगर वास्तविकाशी जुळणं असंभव आहे. अशा प्रकारे अमाप पैश्याची आस धरणारे कायम अस्वस्थ राहतात. एकतर आहे तो पैसा त्यांना कायम कमी वाटतो आणि नक्की किती म्हणजे पुरेसा पैसा हे त्यांना कधीही ठरवता येत नाही. पैसा या विषयावर पुन्हा चर्चा सुरू करू नये, त्याविषयी माझे सर्व विचार इथे मांडले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तेच तर सांगतोय.

अग्निकोल्हा
Sat, 07/06/2013 - 13:34 नवीन
तेच तर सांगतोय.
तस दिसत तर नाहिये.
मला वाटतं बँकबॅलन्सपेक्षा बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे.
असेलही कारण पैशाने बुध्दि निर्माण करता येत नाही, तरिही भाड्याने नक्किच घेता येते. तसही दिर्घकालिन संतुलित मनाचे अपेटाइट हे पुरेसे अन्न, सुरक्षा आणि इतर मनोशारिरीक गरजा असतात, ज्या गाठिला असणार्‍या पैशानेच पुर्ण होतात. थोडक्यात थोडक्यात संतुलित मनाचे सार हे पुरेसा बँक बॅलन्स हेच आहे. मन संतुलित नसताना त्याच्या त्यागाचा प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारची व्यसनाधिनताच बाळगणे होय. ही सवय घातक ठरु शकते.
भरपूर संपत्ती ही भयभित मनाचीच मागणी असते.
उत्तर म्हणून आधिचाच पॅरॅ वाचावा. तसही भरपूर संपत्ती ही "रिलेटिव" गोश्ट असल्याने याचा तुम्ही हवातो सोयिचा अर्थ लावुन रकानेच्या रकाने खरडु शकाल यावर दुमत नाही. पण माझा वरचा पॅरॅ व्यवस्थित वाचलात व समजुन घेतलात म्हणजे ते रकाने किती अनावश्यक आहेत याचा आपणास आपोआप बोध होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कारण पैशाने बुध्दि निर्माण करता येत नाही?

संजय क्षीरसागर
Sat, 07/06/2013 - 15:19 नवीन
बुद्धी उपजतच असते. >थोडक्यात संतुलित मनाचे सार हे पुरेसा बँक बॅलन्स हेच आहे = संतुलित मनाची अवस्था आपण स्थिर असल्यानं येते, त्याचा बँकबॅलन्सशी काहीएक संबंध नाही. >मन संतुलित नसताना त्याच्या त्यागाचा प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारची व्यसनाधिनताच बाळगणे होय. = इथे मनाचा त्याग करणे हा विषय नसून मानसिकप्रक्रियेचा उलगडा करणे असा विषय आहे.
भरपूर संपत्ती ही भयभित मनाचीच मागणी असते.
>भरपूर संपत्ती ही "रिलेटिव" गोश्ट असल्याने याचा तुम्ही हवातो सोयिचा अर्थ लावुन रकानेच्या रकाने खरडु शकाल यावर दुमत नाही = भीती हा अस्वस्थ मनाचा आधार आहे आणि स्वतःचं अस्तित्व निव्वळ पैश्यावर अवलंबून आहे या भ्रामक समजूतीचा तो परिपाक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तुमचा नेहमी पुन्हा पुन्हा याच ठिकाणी गोंधळ उडतो. एक लक्षात घ्या

अग्निकोल्हा
Sat, 07/06/2013 - 17:45 नवीन
भीती हा अस्वस्थ मनाचा आधार आहे भीती हा अस्वस्थ मनाचा आधार तर आहेच पण इतरही अनेक गोश्टी अस्वस्थ मनाचे आधार आहेत... तुम्हाला हळु हळु लक्षात येइलच ते. आणि स्वतःचं अस्तित्व निव्वळ पैश्यावर अवलंबून आहे या भ्रामक समजूतीचा तो परिपाक आहे. वास्तवाला तुम्हि भ्रामक म्हणत असाल तर मला वाटतय तुम्हाला स्वतःच अस्तित्व म्हणजे काय हेच अजुन लक्षात आलेलं नाहिये. भ्रमाला मि समजणे त्वरित सोडुन द्या. इथे मनाचा त्याग करणे हा विषय नसून मानसिकप्रक्रियेचा उलगडा करणे असा विषय आहे. हे म्हणजे वरवर दोन-चार डुबक्या मारुन अथांग समुद्राचा तळ गाठुन आलो समजण्यासारख आहे. मन हा अतिशय जटील विषय आहे. विषेशतः अतर्मन (सब्कॉशस माइंड). बाह्यमनाचे दोन चार गुणधर्म बघितले म्हणजे मानसप्रक्रिया समजली आहे अस खरच मानु नये. कारण बहुतांश गोश्टी या अंतरमनात घडतात ज्या जाणिव पातळिला येतही नाहित म्हणून त्याचे आकलनच होत नाही तर त्याचा अभ्यास कसला करणार ? अन जोपर्यंत ही प्रक्रिया स्वछ्च नाही मनोव्यापार समजला म्हणने चुक होय. उदाहरणार्थ:- बरेचदा आपल्याला ऐनवेळी एखादे महत्वाचे नाव्/रेफरन्स आठवत नाही आपण अक्षरशः अर्धातास कसोशिने विचार करुनही आठवत नाही. थकुन आपण प्रयत्न् सोडुन इतर कामामधे स्वतःला (मनाला) वाहुन घेतो.. अन अचानक गरज नसताना त्याबाबत विचारही करत नसताना तो रेफरन्स काहि वेळाने प्रयत्न १००% सोडून दिल्यावरही व्यवस्थित आठवु लागतो.. कारण ? अंतर्मनाचे कार्य.. बर हे दर वेळी घडेलच असही नाही... म्हणजे आला का गोंधळ पुन्हा ? अंतर्मनाचे कार्य जे नक्कि कसे चालते हे अद्याप व्यवस्थित कोणाच्या आजालाही कळलेले नाही. तर तुमचा (व आपला सर्वांचाच) काय पाड ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>> "मनापासुन मुक्त" होउन आयुष्य आनंदि बनायला आधि बँकबॅलन्स दणकट

उन्मेष दिक्षीत
Sat, 07/06/2013 - 03:42 नवीन
= बँकबॅलन्स दणकट हवा ही प्रीकंडिशन कशाला ?
"मनापासुन मुक्त" होउन आयुष्य आनंदि
हवं असेल तर तीच एक इच्छा पुरे नाही का फक्त ?
  • Log in or register to post comments

हम्म

मूकवाचक
Mon, 07/08/2013 - 12:19 नवीन
मनापासुन मुक्त होण्यात धारणा आणि वासना दोन्हींपासून मुक्तीचा समावेश असेल तर दणकट बँकबॅलन्सची गरज नाही. फक्त धारणांपासून मुक्ती मिळवणार्‍याला मात्र वासनातृप्तीसाठी पुरेसा बँकबबॅलन्स ठेवणे किंवा अन्य पर्यायी व्यवस्था शोधणे (उदा. धारणामुक्तीवर प्रवचनबाजी करून सगळ्या वासना तृप्त करेल असा शिष्यपरिवार गोळा करणे) अपरिहार्यच ठरेल, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत

पोचपावती

स्पा
Sat, 07/06/2013 - 16:13 नवीन
आता सावकाश वाचतो नेहमीप्रमाणे उत्तमच अभ्यासू लेखन असणार यात शंकाच नाही संजय बस नाम हि काफी हे :)
  • Log in or register to post comments

येऊ द्या येऊ द्या

अभ्या..
Sat, 07/06/2013 - 16:16 नवीन
अर्थात. मी तर स्पावड्याच्या प्रतिक्रीयेच्याच प्रतिक्षेत आहे. अभ्यास करुन सावकाश वाचणारे तो म्हणल्यानंतर प्रतिक्रीयपण तेवढीच जबरी असणार. संजयजीबद्दल तर वाद नाहीच (स्पावड्याशी) पण स्पावड्याका नाम भी कुछ कम नही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

नक्कीच! लिहिणार संक्षी अन

बॅटमॅन
Sat, 07/06/2013 - 16:19 नवीन
नक्कीच! लिहिणार संक्षी अन क्वालिटीची ग्वाही स्पांडूकडून म्हंजे जबरीच प्रकरण दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चे चे, म्या बापडा काय लिहिणार

स्पा
Sat, 07/06/2013 - 17:36 नवीन
चे चे, म्या बापडा काय लिहिणार म्या मनाच्या ज्ञानाच्या आसपास पण नाही हो , मन नेईल तिथे आम्ही भटकतो । मी फक्त रसास्वाद घेणार संक्षी सारखे जेष्ठ इतके अभ्यासू इथे लिहित असताना , म्या पामराने काही बोलणे म्हणजे काजव्याने सूर्यासमोर टिव टिव केल्यागत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

संक्षी सारखे जेष्ठ इतके

धन्या
Sun, 07/07/2013 - 10:14 नवीन
संक्षी सारखे जेष्ठ इतके अभ्यासू इथे लिहित असताना , म्या पामराने काही बोलणे म्हणजे काजव्याने सूर्यासमोर टिव टिव केल्यागत आहे
इतकं नम्र बोलणं आणि ते बोलत असताना शब्दालंकारांची उधळण करणं हे फक्त थोरामोठयांनाच जमतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

प्रसन्न! मन:पूर्वक दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार

संजय क्षीरसागर
Sun, 07/07/2013 - 15:17 नवीन
लेखमाला इंटरॅक्टीव आहे, आय एम ट्राइंग टू कम्युनिकेट विथ यू. सदस्य जोपर्यंत त्यांचा अनुभव लिहीत नाहीत तोपर्यंत मी पुढेपुढे जात राहणं एकतर्फी होईल. मला माहिती प्रदर्शित करण्यात स्वारस्य नाही, संवाद साधायचा आहे. मनाबद्दलच्या संकल्पना कंप्युटरच्या संशोधनामुळे पूर्णपणे बदलल्या आहेत. त्या संशोधनाचा मागोवा घेत आपण मनाकडे नव्या अ‍ॅंगलनं पाहू शकतो. बुद्धाला काय ओशोंना सुद्धा मनाच्या ज्या फॅकल्टीज अगम्य वाटल्या असतील त्या आता आवाक्यात आल्या आहेत. ‘मन वढायं वढायं’ (किंवा मना सजन्ना भक्ती पंथेची जावे) असा पूर्वापार चालत आलेला दृष्टीकोन न ठेवता मनाकडे निर्वैयक्तिकपणे एक अत्यंत उपयोगी फॅकल्टी म्हणून पाहता येतं. मन हे कौशल्यांच्या (स्किलसेट्स) संग्रहाचं स्थान असल्यानं आपण कृष्णाची ‘कर्मण्येवाधीकारस्थे मा फलेशु कदाचन’ ही भारतीय मनात खोलवर रूजलेली धारणा काढून, पुलं (त्यांनी चंदूला लिहीलेल्या पत्रात) म्हणतात तसं... "आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे" असा सर्वस्वी नवा अ‍ॅंगल प्रत्येक कामात आणू शकतो. काय आहे ही तन्मयता? आणि ती नक्की कशानं येते हा उलगडा झाला की आयुष्य बदलेल. काय आहे हे बॉडी-माइंड को-ऑर्डिनेशन? आपला कल कश्यानं ठरतो? मानवी संगोपनात त्याचं कमालीचं महत्त्व आहे पण आता ती वेळ हुकली असली तरी त्याविषयी काय करता येईल? अशा प्रश्नांवर चर्चा व्हावी जेणेकरून भारतीय मानसिकता जी बव्हंशी पैसा हेच सर्वस्व मानू लागली आहे आणि स्वत:च्या कामतली रसमग्नता हरवल्यामुळे संपन्नता येऊनही स्वास्थ्य नाही हा सिनॅरिओ बदलता येईल. कंप्युटरला हृदय नाही आणि माणसला आहे, इथून पुढचं प्रकरण सुरू होतं. ज्या वेळी विचार हृदयाला स्पर्श करतो तेव्हा भावना निर्माण होते. पुलं त्या पत्रात म्हणतात : "सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो". आपण पुलं होणं असंभव आणि अशी पत्नी मिळणं हे प्रत्येकाचं भाग्य नाही (सध्या तर जवळजवळ अशक्यच!) पण मग कसा साधता येईल हा समन्वय? काय आहे भावनिक विश्वाची जादूगिरी? याचा वेध मला लेखमालेत घ्यायचा आहे. तादात्म्य हे बंधनाच मूळ कारण आहे आणि ती मनाची किमया आहे. आपण निराकार असून आकार असल्याच्या भ्रमात वावरतो. काय आहे हे तादात्म्य? काय आहे त्यावर उपाय? याविषयी तुमच्याशी चर्चा करायची आहे. प्रश्न माझा अभ्यास किती आहे याचा नाही कारण जाणीव आपल्या सर्वांना एकसारखी लाभली आहे. आणि त्या जाणिवेच्या प्रकाशानं मनाच्या गूढ महालातलं एकेक दालन पार करत जायचंय. मी सगळं शेअर करतोयं, लेखमाला काय रंग घेईल हे आता तुमच्या हाती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

प्रश्न माझा अभ्यास किती आहे

स्पा
Sun, 07/07/2013 - 15:39 नवीन
प्रश्न माझा अभ्यास किती आहे याचा नाही कारण जाणीव आपल्या सर्वांना एकसारखी लाभली आहे. आणि त्या जाणिवेच्या प्रकाशानं मनाच्या गूढ महालातलं एकेक दालन पार करत जायचंय. मी सगळं शेअर करतोयं, लेखमाला काय रंग घेईल हे आता तुमच्या हाती आहे
तुमचा हाच विनम्र स्वभाव तुम्हाला इतरांपासून वेगळे ठरवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

घ्या अजून एक नवीन शब्द फिरवायला

लंबूटांग
Sun, 07/07/2013 - 19:12 नवीन
आता हृदय म्हणजे काय? तुम्हाला मागील लेखात पण विचारले होते की या सगळ्याच्या - मन, मेंदू, जाणीव, संवेदना, आता हृदय -व्याख्या सांगितल्यात तर कळेल तरी की बाबा हृदयाचे काम अमूक अमूक, मेंदूचे तमूक. मग आम्हाला आमच्या संकल्पनांशी त्यांच्या जोड्या लावता येतील. उदा. ओह्ह आपण ज्याला मेंदू म्हणतो त्याला संक्षी अमूक अमूक म्हणतात. उदा. मराठी माध्यमातून कॉलेजात गेल्यावर जसे मला काटकोण त्रिकोण म्हणजे राइट अँगल ट्रायअँगल असे करावे लागले होते तसे. त्यातील फरकही सांगितलात तर उत्तम. काय आहे ना. मला आता मुळात राईट अँगल म्हणजे काय हेच माहित नसेल तर मग मला पुढील पायथागोरस वगैरे कसे कळणार ना. बाकी लेखात नवीन काहीच नसून मागील लेखातील प्रतिसादांचाच परत उहापोह आहे त्यामुळे काही लिहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अरे ये सब केमीकल लोचे है भाई...

अर्धवटराव
Mon, 07/08/2013 - 08:28 नवीन
आमचे गुरुदेव, भाईकाका देशपांडेंचा सोपा सिद्धांत आहे... मेंदुत विवेक आणि मनात प्रेम. या सिम्पल फॉर्म्युलाने आमच्या सारख्या कित्येकांचे जगणे "आनंदाचे डोही आनंद तरंग" करुन टाकलय. सुखाला जर-तरच्या अटी घालुन टांगत ठेवणे व मुद्दाम दु:खाला आमंत्रण देण्याच्या काड्या करणे ही माणसाची हौस आहे, खोड आहे. तसं पाहिलं तर लाईफ बाय डिफॉल्ट एकदम कूल अ‍ॅण्ड टकाटक आहे. काहि दु:खदायक प्रसंग आलाच तर त्याला टॅकल करायला विवेकाचा कौल सफिशियंट आहे (अ‍ॅक्सेप्ट इट, फिक्स इट, ऑर लिव्ह इट) मजा म्हणजे विवेकाचा हा कॉल घेण्यात देखील सुख आहे (श्रीकॄष्णाने सांगितलेला "कर्मण्येवाधिकारस्ते..." कर्मयोगाची हि सुरुवात आहे व "मधुराधिपते रखिलं मधुरं" हि त्या कर्मयोगाची परिपक्व अवस्था. असो, तो वेगळा विषय आहे). सो चिल्ल मामु. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

सहमत.

प्रभाकर पेठकर
Mon, 07/08/2013 - 11:40 नवीन
शब्दाशब्दाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

@मी फक्त रसास्वाद घेणार>>> मा

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/07/2013 - 22:27 नवीन
@मी फक्त रसास्वाद घेणार>>> मा. स्पा.... आपल्या रसिकमनाच्या प्रतिक्रीयेतल्या प्रति बिंबातलं...एव्हढ एकच वाक्य,आपली उच्च कोटीची अभिरुची-आस्वादक-गुणग्राहकता दाखवण्यास...पुरेसं आहे!!! नाही का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

संक्षी अजून एक

स्पा
Sat, 07/06/2013 - 16:14 नवीन
संक्षी अजून एक विनंती येणाऱ्या कुजत पूर्वग्रह दुषित प्रतीसादामान्ध्ये वाहवत न जाता पुढील भाग पटपट टाकत चला
  • Log in or register to post comments

खर आहे आपण सगळे अर्जुनच आहोत

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 07/07/2013 - 12:14 नवीन
सगळ्या अर्जुनांची हीच शोकांतीका असते की त्यांना प्रत्येक वेळी कृष्ण भेटतोच असे नाही. मग पुस्तकाच्या दुकानात जाउन ते गीता विकत घेतात. गीता वाचली की आपणच कृष्ण आहोत असे त्यांना वाटायला लागते. पण ह्या क्षणी स्वतःला जो सावरतो त्याला कृष्ण नक्की सापडतो / उमगतो. आपण अर्जुन आहोत हे सतत स्वतःला बजावत रहायचे. कृष्ण बनायचा चुकूनसुध्दा प्रयत्न करायचा नाही. मला वाटत,हाच या लेखमालेतुन घेण्या सारखा बोध आहे. अवांतर :- माझा रिंगटोन "हताला धरलया" नाहि, पण "रुणुझुणु रुणुझुणु" सुध्दा नाही
  • Log in or register to post comments

ओके

स्पा
Sun, 07/07/2013 - 19:36 नवीन
तुम्हाला वाटेल की असं काही नाहीये पण मानवी अस्वास्थ्याचं मूळ कारण तेच आहे. आयुष्यात प्रथम आपण सेटल होण्याचा प्रयत्न करतो ( ते अपरिहार्य आहे) पण एकदा सेटल झाल्यावर आपण तोच दिवस (अगदी किरकोळ फरकानं ) पुन्हापुन्हा जगतो. अस्तित्वात प्रत्येक क्षण नवा आहे पण वी लीव द सेम रूटीन. आपला दिवस आठवड्याच्या माळेत गुंफल्यानं त्यात थोडाफार पॅटर्न वाटतो इतकंच. मग असं जगतजगत एक दिवस आपण संपून जातो. ज्यांना याची वेळीच कल्पना येते ते चौकट लंघायचा प्रयत्न करतात, पण बहुसंख्यांना वाटतं लाईफ असंच आहे. ते 'एक उनाड दिवस' सारखा पिक्चर पाहतात (फार तर अधेमधे ट्रेक करतात किंवा सहलीला जातात) आणि ‘कल्पना उत्तम आहे’ अशी स्वतःची समजूत घालून विसरून जातात.
दुसर्या लेखातला पहिला भाग वाचला आमचा अगदीच बाळबोध प्रश्न जगायचं तर पैसा लागतोच, निदान २ वेळच्या जेवणाचा तरी पैसे मिळवायचे तर , निदान काहीतरी काम ,धंदा नोकरी किंवा अगदी भीक मागायची ठरवली, तरी ते रुतीनच होणार प्रपंच तर करावा लागणारच , मग ते "चौकट लंघन" हा प्रकार कसा साध्य करायचा
  • Log in or register to post comments

मुळात बेसिकमध्येच गल्लत होतेय

बॅटमॅन
Sun, 07/07/2013 - 21:01 नवीन
मुळात बेसिकमध्येच गल्लत होतेय. पैसा हा एक भ्रम आहे अन या भ्रमाची अपरिहार्य गरज आहे हा दुसरा भ्रम. बेसिकमध्येच लोच्या असल्याने पुन्हा एकदा सांगतो, माझे सगळे आत्मपुराण पुन्हा एकदा वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ऑ?

स्पा
Sun, 07/07/2013 - 21:03 नवीन
ऑ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

प्रसन्न, तुझ्या प्रामाणिक

बॅटमॅन
Sun, 07/07/2013 - 21:07 नवीन
प्रसन्न, तुझ्या प्रामाणिक प्रतिसादाचं कौतुक वाटतं. प्रामाणिकपणे प्रतिसाद देणारे फार थोडेच लोक आहेत. म्हणून सांगतो, की मन लावून एकदा पहिला धागा वाच. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिथे मिळतील. (जे खातो तेच....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

प्रसन्न, तुझ्या प्रामाणिक

बॅटमॅन
Sun, 07/07/2013 - 21:07 नवीन
प्रसन्न, तुझ्या प्रामाणिक प्रतिसादाचं कौतुक वाटतं. प्रामाणिकपणे प्रतिसाद देणारे फार थोडेच लोक आहेत. म्हणून सांगतो, की मन लावून एकदा पहिला धागा वाच. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिथे मिळतील. (जे खातो तेच....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

इतरांशी संवाद करता करता तुमचा

प्रकाश घाटपांडे
Sun, 07/07/2013 - 20:17 नवीन
इतरांशी संवाद करता करता तुमचा स्वतःशीही संवाद चालतो आहे असे आपल्या लेखनशैली वरुन वाटते. मतमतांतरे होत राहतात. कधी कधी आयुष्यात जुन्या गोष्टींचे अर्थ नव्याने उमगतात.
  • Log in or register to post comments

इतरांशी संवाद करता करता तुमचा स्वतःशीही संवाद चालतो

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 00:19 नवीन
अर्थात! मला तुम्ही कुठे माहिती आहात? तुमच्या प्रतिसादांना तर मी उत्तरं देतोय. >मतमतांतरे होत राहतात. कधी कधी आयुष्यात जुन्या गोष्टींचे अर्थ नव्याने उमगतात. = नक्कीच. पण खरं तर आपल्या अनुभवाचा इतरांना उपयोग झाला याचा आनंद लिहायला उद्युक्त करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

जगायचं तर पैसा लागतोच, निदान २ वेळच्या जेवणाचा तरी

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 00:11 नवीन
पैसे मिळवायचे तर , निदान काहीतरी काम ,धंदा नोकरी किंवा अगदी भीक मागायची ठरवली, तरी ते रुटीनच होणार प्रपंच तर करावा लागणारच , मग ते "चौकट लंघन" हा प्रकार कसा साध्य करायचा
चौकट लंघन म्हणजे मनस्वितेनं जगणं, उत्सफूर्ततेनं जगणं. आपण स्वतःच्या इच्छेविरूद्ध `केव्हा तरी पुढे मजा येईल' या आशेवर आजचा दिवस काढत जगतो. प्रत्येक वेळी हवं तसं काम मिळेलच याची शाश्वती नसली तरी आहे ते काम समरसतेनं करता येतं. कोणताही मेजर चेंज करण्यापूर्वी आहे त्या परिस्थितीत मजा न येण्याच्या कारणाचा शोध घेतला तर असं लक्षात येतं की: १) प्रत्येक काम पर से न्युट्रल आहे. मजा कामात नाही, आपल्यात आहे. आपण त्या कामात काय रंग आणतो यात मजेचं रहस्य आहे. २) मन (किंवा विचार) आपल्याला सतत `चालू काम कसं व्यर्थ आहे' हे सांगण्याचा प्रयत्न करतं मग आपण त्याप्रती बेफिकीर होतो. हे दुर्लक्ष त्या कामातली मजा कमी करत जातं. ३) मजा कामात नाही, आपल्यात आहे हा बेसिक फंडा लक्षात आल्यावर तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध होतात : एक, आहे ते काम समरसून करा. थोडक्यात, शरीर एक करतंय आणि मन वेगळा विचार करतंय असा स्प्लिट होऊ देऊ नका. तुम्ही, शरीर आणि मन यांचा समन्वय जगातल्या कोणत्याही कामात रंगत आणतो. इतकं करूनही तुम्हाला मजा आली नाही तर काम बदलण्याचं साहस करा. आपण प्राथमिक आहोत, काम दुय्यम आहे याचं स्मरण राहू द्या. एकदा कामात मजा आली की आपण सृजनात्मक होतो. आपल्या जीवनातला तोचतोपणा संपतो, आपण काम विविध पद्धतीनं करायला लागतो. त्यातनं नव्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो, नव्या संधी उपलब्ध होतात. ते शास्त्रिय संगीतासारखं होतं, राग यमनच असतो पण कुमार गंधर्व म्हणतात तसं तुम्ही तो प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारानं गाता. तुमच्या जीवनाचा रंग बदलतो.
  • Log in or register to post comments

अरे बाप रे!

होकाका
Mon, 07/08/2013 - 00:43 नवीन
चौकट लंघन म्हणजे मनस्वितेनं जगणं, उत्सफूर्ततेनं जगणं. कसं काय ब्वॉ? मनस्वितेनं जगण्यासाठी चौकट लंघन करण्याची काय गरज आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मन (किंवा विचार) आपल्याला सतत

अग्निकोल्हा
Mon, 07/08/2013 - 02:20 नवीन
मन (किंवा विचार) आपल्याला सतत `चालू काम कसं व्यर्थ आहे' हे सांगण्याचा प्रयत्न करतं मग आपण त्याप्रती बेफिकीर होतो. हे दुर्लक्ष त्या कामातली मजा कमी करत जातं.
अतिशय चुक. केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही भलेही कंपनी पगार/ जॉब प्रोफाइल बदलला नसेल, पण आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता, पण सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते. अलमोस्ट विदाउट ओब्लिगेशन. ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. उदाहरणार्थ :- तुमच्या बर्‍याच चुका दाखवुनही तुम्ही चुकिचे लेखन/धागे/प्रतिक्रिया का देताय ? उत्तर अतिशय सोपय तुमची मर्जी. तुम्हि तुम्हाला हव ते, हव तेव्हां लिहु शकता/थांबवु शकता थोडक्यात तुमच लेखन तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट करु शकता. तुमच्यावर ओब्लिगेशन/सक्ति/जबाबदारी नाही कि तुम्ही रोज अमुक अमुक उतारे मिपावर छापलेच पाहिजेत/ सर्व काही योग्य व त्रुटिरहीतच लिहलं पाहिजे. सगळ्याच्या सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर दिलेच पाहिजे. आता क्लॅरिटी आलि काय, की पावलापावलाला त्रुटि दाखवुनही तुम्ही लेखन एंजॉय का करताय ते ? व म्हणूनच तुम्ही लेखन करणे थांबवणारही नाही. हे सगळ `चालू काम कसं व्यर्थ आहे' वगैरे फंडे लिहले आहेत त्या संदर्भात आहे बरका. बर इतपत तुम्हाला मन कस काम करत याच आकल झालं असेल तर "कामातली मजा कमी होणे" संदर्भात पुढचा निरीक्षण सामजावतो. यालाच म्हणतात मेंटेनिंग चॅलेंज अन स्किल्स रेशो. म्हणजे काय तर आपण एखाद्या कामात निपुण होत गेलो पण पुरेस चॅलेंज वाढत गेलं नाही तरी कामाचा कंटाळा येतो. ह्या उलट निपुणता निर्माण झालि नाही पण चॅलेंज वाढत गेलं तर कामाचे फ्रस्ट्रेशन येत. तेव्हां हि गोश्ट काम करताना फार व्यवस्थित सांभाळावी लागते. अन्यथा बट्याभोळ होतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सो व्हाट डु वि क्नोव ? अँड... व्हॉट हॅव वि लर्न्ट ?

अग्निकोल्हा
Mon, 07/08/2013 - 02:46 नवीन
थोडक्यात सारांश काय ? तर कोणत्याही कामातिल ऑब्लिगेशन संपले व त्यातिल निपुणता त्यातिल आव्हानाच्या सम-प्रमाणात वाढत राहिली तर ते काम करायचा कंटाळा जन्मोजन्मिही येणार नाही, व ते तसच घडत राहिल. आता मनाचे हे सुत्र मटेरिअ‍ॅलिस्टीक स्टफ बरोबरच इतर कोणत्याही ठिकाणीही तसेच चपखल बसते. उदा:- पोचलेल्या(?) लोकांना ध्यान करणे का आवडते/ ते तासनतास ध्यानात न अवघडता बसणे कसे काय साध्य करु शकतात ? यामागिल कार्यरत सुत्र वरिलच आहे, ध्यान साधण्याची वाढणारी निपुणता व तितक्याच सम प्रमाणात ध्यान साधण्याचे वाढणारे आव्हान, परंतु या इक्विलिब्रिअममधे असताना क्षणाक्षणाला अक्षरशः लय होत जाणारे ध्यान करायचे आहे हे ऑब्लिगेशन याचा तो खरा म्हैसुरपाक असतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

=))

सोत्रि
Mon, 07/08/2013 - 15:16 नवीन
तुमच्या बर्‍याच चुका दाखवुनही तुम्ही चुकिचे लेखन/धागे/प्रतिक्रिया का देताय ? उत्तर अतिशय सोपय तुमची मर्जी. तुम्हि तुम्हाला हव ते, हव तेव्हां लिहु शकता/थांबवु शकता थोडक्यात तुमच लेखन तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट करु शकता. तुमच्यावर ओब्लिगेशन/सक्ति/जबाबदारी नाही कि तुम्ही रोज अमुक अमुक उतारे मिपावर छापलेच पाहिजेत/ सर्व काही योग्य व त्रुटिरहीतच लिहलं पाहिजे. सगळ्याच्या सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर दिलेच पाहिजे. आता क्लॅरिटी आलि काय, की पावलापावलाला त्रुटि दाखवुनही तुम्ही लेखन एंजॉय का करताय ते ? व म्हणूनच तुम्ही लेखन करणे थांबवणारही नाही. हे सगळ `चालू काम कसं व्यर्थ आहे' वगैरे फंडे लिहले आहेत त्या संदर्भात आहे बरका.
हीच फटाक्यांचीं माळ ज्याबद्दल भाग एक मध्ये बोलणे झाले होते. ह्यामागची 'संवेदना' काय हे तुम्हाला जाणवले की त्यातली निरर्थकता तुमच्या ध्यानात यावी. मग त्यातुन तुम्हाला 'रुणझुण' हा नाद नक्कीच ऐकू येईल. - (भ्रमर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

ठ्ठो!

सोत्रि
Mon, 07/08/2013 - 15:19 नवीन
ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं
. अवांतरः अतिशय अश्लिल प्रतिसाद! ;) - (अश्लिल) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

=)) =))

अग्निकोल्हा
Mon, 07/08/2013 - 16:01 नवीन
या अवांतर प्रतिसादातिल... अश्लिल अन लिंगभेदि विचारसरणिचा कडकडित निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

असते एकेकाची मजबुरी!

होकाका
Tue, 07/09/2013 - 20:15 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

एकदा कामात मजा आली की आपण

स्पा
Mon, 07/08/2013 - 06:27 नवीन
एकदा कामात मजा आली की आपण सृजनात्मक होतो. आपल्या जीवनातला तोचतोपणा संपतो, आपण काम विविध पद्धतीनं करायला लागतो. त्यातनं नव्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो, नव्या संधी उपलब्ध होतात. ते शास्त्रिय संगीतासारखं होतं, राग यमनच असतो पण कुमार गंधर्व म्हणतात तसं तुम्ही तो प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारानं गाता. तुमच्या जीवनाचा रंग बदलतो.
ह्म्म्म्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संपूर्ण प्रतिसाद 'कोट'

सोत्रि
Mon, 07/08/2013 - 10:21 नवीन
संपूर्ण प्रतिसाद 'कोट' करण्याजोगा! सद्ध्याच्या जाँबमधे हे समरसणे अक्षरशः अनुभवतो आहे! - (चौकट लंघन केलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

काही सार्थ आणि काही व्यर्थ प्रतिसाद आले आहेत!

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 10:10 नवीन
पहिली गोष्ट, आपल्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा भाग आपण कामात व्यतीत करतो. ज्याला कामात मजा येत नाही त्याला आयुष्यात मजा येणं अवघड आहे कारण आयुष्याचा रंग बदलणं हे सर्वस्वी दिवसाचा रंग बदलण्यावर अवलंबून आहे. >कोणत्याही कामातिल ऑब्लिगेशन संपले (ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं) व त्यातिल निपुणता त्यातिल आव्हानाच्या सम-प्रमाणात वाढत राहिली तर ते काम करायचा कंटाळा जन्मोजन्मिही येणार नाही, व ते तसच घडत राहिल. = "सध्या चालू आहे ते काम व्यर्थ वाटणं आणि ते सोडून इतर कोणत्या तरी कामात मजा येईल" असं वाटणं हे कामाचं बंधन (ऑब्लिगेशन) वाटण्याचं मूळ कारण आहे. नातेसंबंधांच्याबाबतीत ही गोष्ट बहुतेकांच्या प्रकर्शानं लक्षात येईल. जिथे बदलण्याचा `पर्याय आहे' (मुख्यत्वे वैवाहिक नातं) तिथे मन ' आहे ते कसं व्यर्थ आहे' हे सतत सांगत राहतं. हीच गोष्ट मी पहिल्या प्रतिसादात थोडक्यात सांगितली आहे.
२) मन (किंवा विचार) आपल्याला सतत `चालू काम कसं व्यर्थ आहे' हे सांगण्याचा प्रयत्न करतं मग आपण त्याप्रती बेफिकीर होतो. हे दुर्लक्ष त्या कामातली मजा कमी करत जातं.
(तुम्ही इतक्या चटकन कबूल होणार नाही पण पुन्हा पाहा : वैवाहिक नातं!) >त्यातिल निपुणता त्यातिल आव्हानाच्या सम-प्रमाणात वाढत राहिली तर ते काम करायचा कंटाळा जन्मोजन्मिही येणार नाही, व ते तसच घडत राहिल. = शांतपणे वाचलं तर कळेल की हेच मी पहिल्या प्रतिसादात सांगितलंय
एकदा कामात मजा आली की आपण सृजनात्मक होतो. आपल्या जीवनातला तोचतोपणा संपतो, आपण काम विविध पद्धतीनं करायला लागतो. त्यातनं नव्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो, नव्या संधी उपलब्ध होतात. ते शास्त्रिय संगीतासारखं होतं, राग यमनच असतो पण कुमार गंधर्व म्हणतात तसं तुम्ही तो प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारानं गाता. तुमच्या जीवनाचा रंग बदलतो.
प्रतिसादकानं शेवटी म्हटलंय
म्हणजे काय तर आपण एखाद्या कामात निपुण होत गेलो पण पुरेस चॅलेंज वाढत गेलं नाही तरी कामाचा कंटाळा येतो. ह्या उलट निपुणता निर्माण झालि नाही पण चॅलेंज वाढत गेलं तर कामाचे फ्रस्ट्रेशन येत.
चायलेंज तुम्ही निर्माण करता आणि तो निर्माण होण्याचं बेसिक सूत्र: `आहे त्या कामात मला मजा का येत नाही' याचा सखोल मागोवा घेणं! ( वैवाहिक नातं लगेच बदलण्याचा आतातायीपणा करण्यापूर्वी नक्की कुठे जुळवायला हवं याचा वेध घेणं जसं सूज्ञपणाचं आहे तसं आहे ते). तुम्हाला खरं तर तुमच्या मनाविरूद्ध जाऊन एकच निर्णय घ्यायचा आहे : `जे आहे त्याचा बेशर्त स्विकार' आणि तोच खरा चायलेंज आहे. यानंतरच्या सगळ्या पायर्‍या आपसूक आहेत याची मी तुम्हाला स्वतःच्या अनुभवानं ग्वाही देतो. तुम्ही कार्यनिपुण होताच होता, संशोधक देखील होता, तुमचा काम करण्याचा ढंग इतरांपेक्षा वेगळा होतो. प्रत्येक कामावर तुमची मोहोर उमटते. प्रत्येक काम, प्रत्येक दिवस आनंदाचा होतो.
  • Log in or register to post comments

जियो

स्पा
Mon, 07/08/2013 - 10:48 नवीन
अतिशय संयमी आणि समर्पक प्रतिसाद याहून पुढे काही बोलणे माझ्यामते तरी व्यर्थच आहे __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही कार्यनिपुण होताच होता,

सोत्रि
Mon, 07/08/2013 - 10:25 नवीन
तुम्ही कार्यनिपुण होताच होता, संशोधक देखील होता, तुमचा काम करण्याचा ढंग इतरांपेक्षा वेगळा होतो. प्रत्येक कामावर तुमची मोहोर उमटते. प्रत्येक काम, प्रत्येक दिवस आनंदाचा होतो.
जियो! __/\__ - (कार्यनिपुण) सोकाजी
  • Log in or register to post comments

तुम्ही कधी अत्यंत सखोल विचार करून पाहा

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 11:29 नवीन
आपल्या देशात भ्रष्टाचार इतक्या पराकोटीला जाण्याचं एकच कारण आहे `आपलं स्वत:च्या कामाशी इमान नाही'. आपण कार्यभेद करून ठेवलाय. अमकं काम श्रेष्ठ तमकं कनिष्ठ (थोडक्यात जे कमालीचा पैसा देतं ते श्रेष्ठ आणि ज्यात तितकासा पैसा नाही ते व्यर्थ). आणि त्यामुळे आपण स्वतःची प्रतिष्ठा कामावर तोलतो, आपली सामाजिक इमेज आपण करत असलेल्या कामाशी अत्यंत व्यर्थपणे जोडली जाते. मग आपण ही पैश्याच्या शर्यतीत अहमिकेनं उतरतो आणि कामातला आनंद हरवून जातो. पाश्चिमात्य देशातला कॅब-ड्रायवर दिमाखात सर्वीस देतो आणि खेळासारख्या कमालीचा आनंद देणार्‍या आयुष्यातल्या महत्तम परिमाणात (इतके पैसे मिळून देखील) लाचार फिक्सिंगच्या नामुष्किनं इतक्या प्रतिभा संपन्न आणि वैभवशाली देशाची मान खाली झुकते. मग आपण अध्यात्मात अर्थ शोधायला जातो आणि तिथे सांगितलेलं असतं `प्रकट जग व्यर्थ आहे, आनंद `आत शोधा'. खरं तर ज्यांना प्रकट जगात आनंद साधता आला नाही त्यांना स्व कसा गवसेल? प्रकट जगच त्यांना सतत अस्वस्थ करत राहील. मग `आतही नाही आणि बाहेरही नाही अशी परिस्थिती उद्भवते. सार्‍या आयुष्याचा आनंद हरवतो. अशी बव्हंश `भारतीय मानसिकता', न व्यक्त जगात काही बदल घडवू शकते आणि अध्यात्माचा तर संपूर्ण बाजा वाजतो. तुम्ही व्यक्त जगात समाधानी व्हा. प्रामाणिकपणे आणि समरसून तुमचं काम करा. स्व तर आपण आहोतच, आपण स्वतःच आनंद आहोत, हा उलगडा आपसूक होईल.
  • Log in or register to post comments

संक्षी - वर व्यक्त केलेल्या

मोदक
Tue, 07/09/2013 - 07:32 नवीन
संक्षी - वर व्यक्त केलेल्या विचारांशी नक्की सहमत आहात ना..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तर काय...

अर्धवटराव
Tue, 07/09/2013 - 09:23 नवीन
तुम्हाला काहि कळणार आहे का गणेशप्रिय भाऊ... इमान आणि इंटरेस्ट सारख्याच गोष्टी आहेत (मलाही हे आजच कळलय) मला आतापर्यंत वाटायचं कि इमानाचा संबंध स्विकारलेल्या जबाबदारीशी आहे व इंटरेस्ट हा मनाचा स्वाभावीक कौल आहे. पण तसं नसावं बहुतेक. मी थोडंफार जग पाहिलय. आपण करत असलेल्या कामाशी आपली सामाजीक इमेज जोडल्या जाणं हे सर्वत्र बघितलय. पैसा देणारं काम करायला मेहनत लागते, डेडीकेशन लागतं. ज्या देशांमधे सामाजीक सुरक्षा सिस्टीम व्ययस्थीत राबवली जाते, पोटापुरतं मिळवता नाहि आलं तरी मायबाप सरकार सगळी व्यवस्था करते तिथे कामाशी सामाजीक प्रतिष्ठा न जोडणं वगैरे ठीक वाटतं. भारत, चीन वगैरे देशात असे चोचले पुरवता येत नाहि. अमेरीका, काहि युरोपीय देशांत असे चोचले पुरवले जातात शिवाय तिथे व्यक्ती स्वातंत्र्य सर्वोच्च मानतात. माईण्ड युर ओव्न बिझनेस हि तिथलं व्यवच्छेदक लक्षण. त्याऊपर कायद्याचा धाक. तरिही तिथल्या भ्रष्टाचाराच्या नोंदी बघितल्यास भारत त्यांच्यापुढे किस झाड कि पत्ती. भारत सोडुन इतरत्र पैशाच्या लोभापायी भ्रष्टाचार होत नाहि वा कमी होतात हे ही मला आज उमगलं. तुम्हाला पण हा बोध आजच झाला का? पाश्चिमात्य देशातला कॅब ड्राइव्हर दिमाखात सर्वीस देतो कारण त्या देशाचे सरकार त्याचा महिन्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेच्या बाहेर जाउ देत नाहि (त्या करता ति सरकारे इतर देशांची भलेहि कितीही पिळवणुक करोत). जेंव्हा त्याचा खर्च उत्पन्नाच्या बाहेर जातो किंवा त्याला कॅब ड्रायव्हरच्या वाढत्या संख्येला, कॉम्पीटीशनला तोंड द्यावे लागते तेंव्हा त्याचा दिमाख कसा गळुन पडतो हे प्रत्यक्ष पाहाणेच उत्तम... अर्थात, हे माझं आजवरचं ऑब्झर्वेशन होतं... कॅब ड्रायव्हरच्या दिमाखाची महती इतर काहि कारणाने आहे हे आजच कळलं... तुम्हाला हा बोध झालाय का मोदकशेठ? राहिला प्रश्न भारतीय क्रीडापटुंच्या भ्रष्टाचाराचा, तर हि लागण इतर देशांतल्या खेळाडुंना झाली नाहि, हे नवीनच ज्ञान मिळालं. असो. व्हॉट अबाउट यु मोदकभौ? आता यासर्वांचा आध्यात्माशी, त्यातल्यात्याल भारतातल्या आध्यात्मीक धारणांशी कसा सखोल संबंध आहे याचं निरुपण बघा. आतापर्यंत तरी "आपणच आनंद आहोत", "बाहेर कुठे आनंद शोधायची गरज नाहि, आपल्यातच आनंद आहे, शांतता आहे" वगैरे पुराण वाचुन झालं असेल ना... ते सगळं आता विसरायचं. आता आनंद बाहेर शोधायचा... सापडला का? नाहि? अर्रेच्या... मग "आत" देखील आनंद मिळण्याची शक्यता शुण्य झाली. काय म्हणालात? यापुर्वी सर्व प्रक्रियांचं निरुपण थोतांड होतं का? अहो हे मी कसं सांगणार... तुम्हीच मला समजाऊन सांगा... जमेल का मोदकअण्णा? अरे हो... तुम्ही भारतीय नाहि का मोदकशेठ... या भारतीयपणामुळे तुमचा बाजा वाजायचे चान्सेस तसेही अत्यंत "हाय" आहेत. तेंव्हा सावधान. एक उपाय सांगु का? आपल्या मनाला पटवा कि ते म्हणजे केवळ एक स्मृतीसंच आहे. त्यात ज्याकाहि इच्छा, आकांक्षा, जि़ज्ञासा, विजगिशु वृत्ती वगैरे आहे ना... त्याला नाव द्या "आपण". मग हे अर्धवट मन म्हणजे पराभूत भारतीय मानसीकता. आणि उर्वरीत मन म्हणजे "तुम्ही". काय म्हटलं? काहिच नाहि कळलं? परत वाचा. तरिही नाहि कळलं? अहो मग असु द्या. ते तसंही मॅटर करत नाहि. हं, तर मी काय म्हणत होतो... हां...एक उपाय सांगत होतो. एकदा का तुम्ही वर सांगीतल्याप्रमाणे "मन" आणि "आपण" अशी मनाची व्यवस्थीत विभागणी केली कि "तुम्ही" आपसुक आनंदी, अभारतीय, स्वच्छंद वगैरे वगैरे होता...अ‍ॅण्ड देन... यप्पी... मजाच मजा. भूक लागली कि वाट्टेल ते खा (आहार तज्ञता वगैरे झूठ आहे). एखाद्या स्त्रीप्रती संवेदना जागृत झाली कि लगेच... हं... सांभाळुन हां... भारतात असाल तर खैर नाहि.. लब्बाड कुठले.. असो... अशा बर्‍याच गमती जमती करता येतील. वर व्यक्त केलेल्या विचारांशी नक्की सहमत आहात का मोदकदादा???? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मी तुमच्याशी फुल्ल सहमत आहे.

मोदक
Tue, 07/09/2013 - 20:49 नवीन
मी तुमच्याशी फुल्ल सहमत आहे. संक्षींच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

वाचतो आहे. अतिशय सखोल उहापोह चालु आहे. जियो .

निश
Mon, 07/08/2013 - 11:52 नवीन
वाचतो आहे. अतिशय सखोल उहापोह चालु आहे. जियो .काहीतरी महत्वाच वाचत आहे अस वाटत आहे. अजुन विचार येउ द्यात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा