Skip to main content

ही नारायण मूर्ती ?

लेखक देशपांडे विनायक यांनी शनिवार, 01/06/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नारायणमूर्ती इन्फोसिस मध्ये परत आले अशी बातमी अत्ताच TV वर पाहिली भारत हा अत्यन्त दांभिक देश बनत चालला आहे त्याचे हे उदाहरण नारायणमूर्ती यांच्या कर्तृत्वाबद्दल मी बोलावे इतके कर्तुत्व माझ्यागाठी नाही मी त्याबद्दल बोलतच नाही इन्फोसिस मधे किती वर्षापर्यंत काम करता येते या बद्दल नियम आहेत ना ? माणूस कितीही कर्तृत्ववान असला तरी त्याला काम करणे कधीतरी थांबवावे लागतेना ? इन्फोसिस आत्ता आहे इतकीच मोठी करणे ही नारायणमूर्ती यांच्या कर्तृत्वाची मर्यादा होती असे म्हणताना मला त्यांच्या या मर्यादा बद्दल बोलावयाचे नसून त्यांनी किती मोठी कंपनी उभी केली एवढेच दर्शवावयाचे आहे नारायणमूर्ती इन्फोसिस बाहेर गेले तेव्हा त्यांचा समज कंपनी प्रगती करेल,आणखी मोठी होईल असा होता हे कुणी नाकारू शकणार नाही .पण मग ते बाहेर का पडले ? नारायणमूर्ती कोणत्या तत्वांचा आधार घेऊन बाहेर पडले ? कोणत्या कारणामुळे बाहेर पडले ? ती कारणे संपली किंव्हा ती तत्त्वे चुकीची होती अशी जाणीव आता झाली म्हणून ते परत आले असावेत असे दिसते पण ती कारणे संपणारी नव्हती , ती तत्त्वे चुकीची नव्हती असे सामान्य माणूस जाणतो मग नारायणमूर्ती जाणत नसतील ?म्हणून त्यांच्या परत येण्याला मी दांभिकपणा म्हणतो

वाचने 6659
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

हे जे काही लिहिले आहेत, ते पुन्हा एकदा वाचा. आणि तुम्हाला त्यातून काही अर्थबोध झाला, तर आम्हाला पण समजवा.

In reply to by आदूबाळ

माझ्यामते तर धागाकर्ता (आयडी) फक्त व्हर्च्युअल अवतार आहे... ही तिसरी वेळ प्रचंड इल्लॉजीकल काडी टा़कून शांतपणे मजा बघत रहायची ! काय "देशपांडॅ" सायेब, पकडलं का नाय, आँ ;)

तुम्हाला इन्फोसिस व नारायण मूर्ती यांच्याबद्दल अजिबात माहिती नाही असे दिसत आहे. नारायण मूर्ती वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर २००६ मध्ये कामकाजातून पूर्ण बाहेर पडले व २०११ पर्यंत अकार्यकारी अध्यक्ष या पदावर होते. याचा अर्थ ते कंपनीच्या कामकाजात अजिबात पडत नव्हते. २०११ मध्ये ६५ वर्षे पूर्ण केल्यावर या नामधारी पदावरून देखील ते निवूत्त झाले. नंतर के व्ही कामथ यांना कंपनीचे अध्यक्ष करण्यात आले. दरम्यान कंपनीवे तितकेच कार्यक्षम असणारे नंदन निलेकाणी देखील आधार कार्ड या योजनेवर काम करण्यासाठी म्हणून बाहेर गेले. २०११ नंतर दिनेश हे अजून एक संस्थापक-संचालक निवृत्त झाले. मोहनदास पै हे मुख्य वित्तीय अधिकारी आपल्याला संचालक मंडळात न घेतल्याने नाराज होउन बाहेर पडले. काही काळ अजून एक संस्थापक-संचालक क्रिस गोपालकृष्णन हे कंपनी प्रमुख होते व सध्या दुसरे संस्थापक-संचालक शिबूलाल हे कंपनी प्रमुख आहेत. मूर्ती व नंदन यांच्या तुलनेत इतर प्रमुख फारसे डायनामिक नाहीत. गेल्या काही वर्षांपासून इन्फोसिस अडचणीत सापडलेली आहे. कंपनीच्या उत्पन्नाची व नफ्याची वाढ कमी झाली आहे. कंपनीच्या समभागाची किंमत देखील कमी झाली आहे. कर्मचार्‍यांना याही वर्षी पगारवाढ किंवा पदोन्नती मिळालेली नाही. याच काळात टीसीएस या प्रतिस्पर्धी कंपनीची तुलनेत जास्त चांगली प्रगती झाली आहे. कदाचित यामुळेच मूर्तींना संचालक मंडळाने स्वतःहून परत बोलविले असावे. मूर्ती स्वतःहून परत जाणार्‍यातले नाहीत. परंतु स्वतः स्थापन केलेली कंपनी अडचणीत असताना ते शांत बसून राहणार नाहीत. मूर्ती इन्फोसिसमध्ये परत येत आहेत ही कंपनीच्या दृष्टीने खूप चांगली बातमी आहे.

स्वतःच्या कंपनीत परत जाण्यात कसला आलाय दांभिकपणा ? उलट राजकीय नेत्यांकडे बघा. एखाद्या पक्षातून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढतात. तो चालला नाही की परत 'स्वगृही' जातात. आपले आद्य, स्वगृही जाणारे नेते म्हणजे यशवंतराव चव्हाण. किंबहुना, त्यांच्या वक्तव्यामुळेच पुढे 'स्वगृही परतणे' हा वाकप्रचार झाला.

मनमोहनसिंगाना देखिल कुणीही न बोलवता परत पंतप्रधान व्हायचे आहे अनि इकडे स्वःताच्या कंपनीत परत येण्यास तुम्ही का विरोध करत आहात? स्टीव्ह जॉब्जस पण अ‍ॅपल सोडुन गेला होता ,पण आपली कंपणी अडचणीत आहे म्हटल्यावर परत येवुन त्याने अ‍ॅपलला कोणत्या उंचीवर नेवुन ठेवले हे तुम्ही बघितले आहे ना? देशपांडे काका कशाला काळजी करता.

In reply to by वेताळ

वेताळराव माझ्या माहिती प्रमाणे स्टीव्ह जॉब्जस अ‍ॅपल मधुन काढले गेले होते,यात बोर्डरुप मधील सत्ता संघर्ष आणि जॉब्स ची Macintosh वेगळी टिम कारणीभूत होती असे म्हणतात.जॉब्स ने मग NeXT ची स्थापना केली.याच NeXT ला १९९६ च्या आसपास अ‍ॅपल ने विकत घेतले आणि जॉब्स अ‍ॅपल मधे परत आला.(December 20, 1996) बाकी इन्फीचे म्हणाल तर त्यांना नारायण मूर्तींची गरज भासावी यावरुन सध्याची कंपनीची स्थिती आणि आयटी मार्केट यांचा अंदाज येईल.

इन्फोसिस निर्माण करण्यात आणि मोठी करण्यात नारायण मूर्तींचा सिंहाचा वाटा आहे. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून देण्यात इन्फोसीसने जे काम केले त्यांतही मूर्तींचे योगदान अतुलनीय होते. अशा या संस्थेच्या गरजेच्या काळात जर स्वतःहून वरिष्ठ पद सोडलेल्या तिच्या संस्थापकाने परत कंबर कसली तर त्याचे कौतूक करायचे सोडून त्याची अशी निर्भत्सना करणे हे केवळ हास्यास्पद आहे !!! शिवाय पब्लीक लिमिटेड कंपन्यांमध्ये अशी पदे मेजॉरिटी भागधरकांच्या संमतीनेच होतात. तेव्हा इतरांची जळजळ होण्याचे कारण समजले नाही. काही वैयक्तीक कारण? मला तर हा, श्त्की ध्गा क्ध्न्याचा क्शीssssssण प्र्य्त्न द्स्तो अहे ;)

त्यांचा सुपुत्र रोहन मूर्ती इन्फीमध्ये सक्रिय होणार आहे म्हणे. शेवटी इथेही घराणेशाही सुरु होऊ नये इतकीच माफक अपेक्षा.

आपण महानगरपालिकेच्या उंदीर मारण्याच्या खात्यात असलो तरी नामुने काय करायचे याच्या पारावर बसून चर्चा करायच्या याची गंमत वाटली. नामुला सॉफ्टवेयर क्षेत्रातले गांधी म्हणतात त्यामुळे गोडसे व्हायला हरकत नाही. बा द वे नारायणमूर्ती इन्फोसिस मध्ये परत आले धागाकर्ता धाग्यावर कधी परत येणार ?

नारायण मूर्ती व त्यांचा मुलगा हे फक्त वार्षिक १ रू. वेतनावर काम करणार आहेत. त्यांचा मुलगा हा पी.एच.डी. आहे व त्याच्याकडे इतरही अनेक पदव्या आहेत. पण तो प्रत्यक्ष कामकाजात भाग न घेता मूर्तींचा सहाय्यक म्हणून काम करणार आहे. यात घराणेशाही अजिबात दिसत नाही.

वार्षिक १ रू. वेतनावर प्रत्येक मॅनेजमेंट गुरु १ र वेतनाच्या गोष्टी करतो. पण यांच्याकडे कंपनीचे शेयर्स किती असतात याबद्दल बोलत नाही. बा द वे नामुसारखे लोक साधेपणा आचरणात आणण्यापेक्षा साधेपणाच्या जाहिरातीवर अधिक खर्च करतात. सरोजिनी नायडूंचे एक वाक्य आठवले, "मि. गान्धी, इट इज व्हेरी कॉस्टली टू मेंटेन युवर पॉवरटी"

In reply to by आशु जोग

सरोजिनी नायडूंचे एक वाक्य आठवले, "मि. गान्धी, इट इज व्हेरी कॉस्टली टू मेंटेन युवर पॉवरटी"
हे वाक्य बर्‍याचदा मिपावर वाचले आहे. मूळ रेफरन्स कुठे मिळेल?

In reply to by आनंदी गोपाळ

गूगल बुक्सवर The Indian Postcolonial: A Critical Reader हे पुस्तक बघा. पान २५५ मुद्दा क्रमांक ७ बघणे.

In reply to by आशु जोग

प्रत्येक मॅनेजमेंट गुरु १ र वेतनाच्या गोष्टी करतो. पण यांच्याकडे कंपनीचे शेयर्स किती असतात याबद्दल बोलत नाही.
त्यांनी कंपनीत काम केल काय किंवा नाही केल काय, ते शेयर्स आणी शेयर्स पासून होणारा फायदा त्यांच्याकडेच रहाणार आहे. हे वेतन त्याव्यतिरिक्त आहे.

नारायण मुर्ती हे कितीही काही म्हणलात तरी एक प्रायव्हेट सिटीझन आहेत. ते जनतेच्या पैशावर आमदारकी-खासदारकी-टर्रेबाजी करत हिंडत नाहीत. तेच इन्फोसिसच्या बाबतीत म्हणता येईल. आता यात जनतेचा शेअरमधील पैसा अथवा काही करसवलती मिळाल्या असतील त्या मधे आणू नयेत, कारण त्याच्या कितीतरी पटीने त्यांनी अनेकांची घरे समृद्ध चालतील अशा संधी निर्माण केल्या आहेत. यात कुठेही आदर्शवाद नाही, निव्वळ धंदा आहे आणि तो तसाच असणे हे योग्य आहे... थोडक्यात यात काही दांभिकपणा नाही, एका अर्थाने खाजगी व्यवसायास लागणारे खाजगी व्यक्तिकडून घेण्यासाठी घेतलेला खाजगी निर्णय आहे. त्यात जर इन्फोसिसचा डोलारा मुर्तींच्या पुनरागमनाने सांभाळला जाणार असला तर ते देशासाठी देखील चांगलेच आहे, म्हणून स्वागतार्ह आहे. तरी देखील कुठेतरी काही बदल घडले पाहीजेत असे वाटते... कारण या सर्व प्रसंगात भारतीय मानसिकतेचा एक समान धागा दिसतो....एक खांबी तंबू. यात दोन्ही बाजूंच्या मर्यादा दिसतात. तसे समजणार्‍या जनतेमधे (या उदाहरणात इन्फोसिसच्या बोर्ड आणि व्यवस्थापकांमधे) तसेच नेतृत्वात जे पुढचे नेतृत्व तयार करत नाही ... भारतात रतन टाटांनी जरी आत्ताच सोडले असले तरी टाटा अशा संकटातून जाईल असे वाटत नाही कारण त्यांनी अंगिकारलेली दूरदृष्टी ज्यात धंदा, समाज, देश सगळ्याचाच विचार आहे आणि त्या दूरदृष्टीस योग्य अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. अमेरीकेत बिल गेट्सचे उदाहरण पाहीले तर ते वेगळ्या अर्थाने दिसते. त्याने देखील मायक्रोसॉफ्टचे प्रमुखपद सोडले आणि दैनंदीन कारभारातून पूर्णपणे अंग काढून घेतले. तरी देखील, गेट्स फाउंडेशन हा सामाजीक प्रश्नांना वाहून घेतलेला एका अर्थाने नवीन उद्योग चालू करून स्वतःचे नवीन एक नाव तयार केले. मधल्याकाळात मायक्रोसॉफ्ट देखील अ‍ॅपल आणि गुगल मुळे वरखाली चालले असले तरी परत मीच काय ते करू शकतो करत तो तेथे गेला नाही. परीणामी त्याच्या नंतरच्या नेतृत्वात आणि टिम मधे जे काही गुणदोष असतील त्यातून ते आणि मायक्रोसॉफ्ट एक उद्योग म्हणून शिकला आणि आज परत बिंगच्या माध्यमातून गुगलशी आणि सरफेसच्या माध्यमातून आयपॅडशी टक्कर देत जगभर मोठा होत आहे. गेट्सच्या म्हणण्याप्रमाणे तो स्वतःच्या मुलांना सर्वकाही (विशेष करून मायक्रोसॉफ्ट) वारसा हक्काने अथवा चंचू प्रवेशाने देऊ इच्छित नाही. गुरूराज "देश" देशपांडे (ते पण बिलियनेअर आहेत) यांनी देखील असेच केले. मुलगा स्वतंत्र आहे. त्यांनी स्वतः देखील अनेक उद्योग काढले आहेत आणि सामाजीक उद्यमशीलता वाढवण्यात त्यांचे भारतात हुबळीस आणि अमेरीकेत अनेक मोठ्या विद्यापिठांमधे त्यांचे नाव आहे, ओबामाच्या इनोवेशन कमिटीचे ते (सध्या माहीत नाही पण) एक प्रमुख देखील होते... त्यांनी तर ज्या उद्योगातून त्यांना पैसा मिळाला ती कंपनी (सिकॅमोर) नंतर बंद करून मोकळे देखील झाले. मग असे इन्फोसिसमधे का होऊ शकले नाही? कुठेतरी वाटते की, जे काही आउटसोअर्सिंगच्या माध्यमातून यश मिळत गेले ते यशच कुठेतरी मर्यादा वाढवत गेले आहे. आज स्वतःचे असे प्रॉडक्ट्स नाहीत अथवा स्वतंत्र विचार करून काही नवीन बाजारात आणण्यासाठी रीस्क घ्यावी लागते, ती घेण्याची वृत्ती नाही... म्हणून म्हणतो, एक खाजगी कंपनी, व्यक्ती, निर्णय म्हणून यात कुठे दांभिकपणा नाही, ट्रबलशुटींग म्हणून योग्यच आहे... पण समाजातील एक अ-राजकीय नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघायचे त्यांच्याकडून अधिक अपेक्षा आहेत यात केवळ एखादे पद/स्थान परत घेणे-न घेणे इतका पोकळ मुद्दा नसून नक्की त्यांनी काय काय केले हे बघण्याचा देखील मुद्दा आहे. हा दोष असलाच तर तो केवळ एका व्यक्तीचा म्हणून आपण मो़कळे होऊ शकत नाही असे देखील वाटते... असो.

८५ व्या वर्षी शंतनुरावही किर्लोस्करमधे परतले होते त्याचे अनेकांनी कौतुक केले होते.

In reply to by आशु जोग

खरे आहे. त्यावेळेस शंतनूरावांचा ८५ वर्षाचा फोटो असलेली जाहीरात असायची. त्यात म्हणलेले आठवते, At 85 he is still running the company, after all it is a Kirloskar Product!

जास्त शेअर्सची मालकी म्हणजे कंपनीवरची त्याप्रमाणात जास्त मालकी आणि ती कंपनी कशी चालवावी (अर्थातच कायद्याच्या कक्षेत) याबाबतचे जास्त हक्क. पब्लीक लिमिटेड कंपनीत "बोर्ड डिरेक्टर्स"ची निवड "१ शेयर = १ मत" यापद्धतीने होते. त्यामुळे जाची कंपनीत जास्त गुंतवणूक आहे त्याच्या मताला कंपनीच्या व्यवहारांत जास्त महत्व मिळते आणि त्यात काहीच गैर नाही. या कंपन्या व्यापारी तत्वांवर चालतात आणि त्यांच्यात सरकारी गुंतवणूक असली तरी तीही व्यापारी तत्वावरच असते. आपल्या पैशांच्या वापरावर लक्ष ठेवायला आपला डायरेक्टर निवडून आणणे यात काहीच गैर नाही. हे केवळ नागरीक असलेले गुंतवणूकदार (उदा. मूर्ती) करतात असेच नाही तर त्यांत मोठी गुंतवणूक करणार्‍या वित्तसंस्था आणि सरकारी गुंतवणूक असेल तर सरकारही हेच करते. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की संस्थापकाचा कंपनीत बहुतकरून शेअरहोल्डर्सच्या सभेत बहुमत मिळेल इतपत (किंवा निवडणूकीत भारी पडेल इतपत तरी) पैसा गुंतलेला असतो (म्हणजे तेवढे शेअर असतात)... आणि कंपनी स्थापन करून तिला मोठी बनवण्याइतकी पात्रता असणारा कोणताही संस्थापक आपल्या अयोग्य वारसावर कंपनी चालविण्याची पूर्ण जबाबदारी टाकणार नाही. कारण तसे करण्यात स्वतःच्या पैशांना धोका विकत घेतल्यासारखे होईल. कंपनी चालविणार्‍या डायरेक्टरला कायद्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वेतन घेता येते आणि ते वेतन भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत मान्य झाले तरच चालू होते. म्हणजे असे वेतन कायद्याच्या आणि नैतीक दृष्टीने योग्य असते. त्या वेतनाचा डायरेक्टरची कंपनीत किती गुंतवणूक आहे याच्याशी काहिही संबंद्ध नसतो. जास्त शेअर असलेला डायरेक्टर त्याच्या गुंतवलेल्या जास्त पैश्यामुळे कंपनीची जास्त चांगली सेवा करण्याची जास्त शक्यता असते. तेव्हा मूर्तींवरची घराणेशाहीची टीका किंवा त्यांची म. गांधींशी केलेली तुलना किती गैर आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माझे इन्फोसिस मध्ये शेअर नाहीत किंवा श्री मुर्ती यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. पण एका कामगिरी आणि नैतीकतेच्या बाबतीत असाधारण पात्रता असलेल्या भारतीय उद्योजकाविरुद्ध चुकीचे आरोप होत आहेत हे पाहवले नाही म्हणुन हा प्रपंच.

नारायण मुर्ती यांचे पुन्हा एकदा सक्रीय होणे ही आनंदाचीच बाब आहे पण इन्फीवर अशी वेळ आल्याचे पाहून शाहू महाराजांचे 'सुदाम्याचे काम चांगले केलेस पण आमच्या शाळेत सुदाम्याचे काम करायला विद्यार्थी मिळावा याचे आम्हाला दु:ख वाटते' हे वाक्य आठवले. १९८७ च्या क्रिकेट विश्वचषकानंतर विंडीजबरोबर भारताची ८ एक दिवसीय सामन्यांची मालिका होती. भारतात असूनही ओळीने पहिले ७ सामने हरल्यावर मालिकेअगोदर निवृत्ती स्विकारलेल्या सुनील गावस्करला एका सामन्यापुरते पुन्हा बोलावण्यात आले. दुर्दैवाने त्या सामन्यातही भारताचा पराभव झालाच. नारायण मुर्ती यांना व इन्फोसिसला अनेक शुभेच्छा.

In reply to by श्रीरंग_जोशी

२ जुन नंतरचे प्रतिसाद उडाल्यामुळे या प्रतिसादावरील उपप्रतिसाद आता दिसत नाहीत. वर उल्लेखलेली मालिका ७ सामन्यांची होती व भारताचा ६-१ ने पराभव झाला होता. तसेच सुनील गावस्कर निवृत्तीनंतर कधीही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. या मालिकेला जोडून असलेला प्रदर्शनीय सामना खेळला असावा. सदर उदाहरण इतर कुणाकडून ऐकले होते. इथे टंकण्याअगोदर खातरजमा न केल्याबद्दल क्षमस्व.

In reply to by श्रीरंग_जोशी

>>> तसेच सुनील गावस्कर निवृत्तीनंतर कधीही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. या मालिकेला जोडून असलेला प्रदर्शनीय सामना खेळला असावा. १९८७ च्या विश्वचषकानंतर लगेचच गावसकर निवृत्त झाला होता. अगदी त्याचवेळी विंडीजचा संघ भारतात आला होता. त्या मालिकेतील एका कसोटी सामन्यात आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच नरेंद्र हिरवानीने १६ बळी घेतले होते. गावसकर निवृत्तीनंतर कधीही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला नाही. पण १९८७ च्या विश्वचषकानंतर लगेचच भारतात ६ देशांच्या वरिष्ठ खेळाडूंच्या संघाची एकदिवसीय स्पर्धा झाली होती. त्यात गावसकर तीनही सामने खेळला. त्यात विश्वनाथ पण खेळला होता. बहुतेक किरमाणी व वेंकटराघवन पण होते. त्या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताचा वरिष्ठ खेळाडूंचा संघ विंडीजच्या वरिष्ठ संघाकडून हरला होता.

In reply to by श्रीरंग_जोशी

माझ्या अंदाजाप्रमाणे नामुपण होते त्या क्रिकेट टीममधे. फिल्डींग छान केली होती त्यांनी.

दांभीकपणा .......... याची व्याख्याच अत्यंत दांभीक आहे. मुर्तींच्या स्किल्ल्स ची इन्फोसिस ला गरज असेल आणि ती स्किल्स कम्पनीच्या भल्यासाठी वापरता यावीत ही ना मू ंची इच्छा असेल तर त्यात काय गैर आहे. कृपया नामू ना कोणत्याही राजकीय साच्यात बसवू नका. अभ्यासाने कर्तृत्वाने लायक असेल तर त्याम्च्या मुलाने त्यांची कंपनी सांभाळली तर त्यात काय गैर आहे. उगाच त्याना "राहूल महाजन " बनवू नका.

बाकी जे काही मत असेल ते असो, यावरून
भारत हा अत्यन्त दांभिक देश बनत चालला आहे
हे अनुमान कसे काढले हे कळले नाही

सूत्रे हातात घेतल्यावर लगेचच सरासरी ८% पगारवाढ देऊन कर्मचार्‍यांचे मनोधैर्य उंचावण्याच्या दृष्टीने नारायण मूर्तींनी चांगली सुरूवात केली आहे. गेल्या काही वर्षात कर्मचार्‍यांना पगारवाढ व पदोन्नती मिळालेलीच नव्हती. पण मूर्ती आल्यामुळे आता निश्चितच चांगला फरक पडेल.