✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मध्य वयातील वादळ -पुढे

स
सुबोध खरे यांनी
गुरुवार, 05/09/2013 - 13:46  ·  लेख
लेख
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ----------------- काही गोष्टीत आपल्या मित्रांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन आपण पुढे जात आहोत. चीड चीड कोणी स्वतःहून करीत नाही तर चिडचिड हि होते. जेंव्हा एखादी परिस्थिती आपल्या हातात नसते आणि तो बदलण्याचे आपल्याला सामर्थ्य नसते तेंव्हा माणसाची/ बाईची चिडचिड होते १ ) पुरुषांना पण असे(रजोनिवृत्ती सारखे) होते हे थोड्याप्रमाणात सत्य आहे पण पुरुषांची संप्रेरके साठीच काय सत्तरीपर्यंत कार्यरत असतात त्यामुळे त्या वयालाही पुरुषाला मूल होऊ शकते. पण स्त्रीच्या बाबतीत हि शक्यता एकदम संपत असते. या गोष्टीचाही पुष्कळ स्त्रियांवर खोलवर मानसिक परिणाम होत असतो. आता आपल्याला मुल होऊ शकणार नाही. हि निसर्गाने दिलेली आपल्यासारखा चालता बोलता जीव निर्माण करण्याची अफाट शक्ती आता संपली असे निराशावादी विचार मनात येतात. २)ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. याच वयात स्त्रियांनाही चष्मा(चाळीशीचा) लागलेला असतो वजन वाढलेले असते,चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. पण यात अधिक म्हणून रजोनिवृत्ती येते. आणि ती अशी त्वरित आल्यामुळे त्यांचे भावविश्व सैरभैर होते. अशीच परिस्थिती पुरुषाची त्या वयात होते जर त्याची नोकरी गेली धंद्यात खोट आली किंवा आर्थिक स्थिती नाजूक झाली तर. कारण जसे सुंदर दिसणे हा स्त्री स्वभावाचा भाग असतो तसे आपल्या पायावर आर्थिक डोलारा सांभाळणे हे पुरुषाच्या स्वभावाचा भाग असतो. या काळात जर आर्थिक स्थिती नाजूक झाली तर पुरुषाचे भावविश्व असेच कोलमडते. परंतु त्याला जगापुढे आपले असे स्वरूप दाखवता येत नाही त्यामुळे पुरुषांचा असा कोंडमारा होतो असो स्त्रियांमध्ये हे शारीरिक बदल होतात त्याबरोबर त्यांच्या लैंगिक आयुष्यात फार मोठे बदल होतात. त्यांच्या संप्रेरकांमुळे मेंदूतील कामजीवनाची केंद्रे कमी काम करू लागतात त्याचा परिणाम पाच बाबतीत होतो. १.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते. या कारणा मुळे स्त्रीया कामसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. याचवेळी नवर्याकडून मानसिक आधाराची गरज असल्यामुळे त्या जवळीक( intimacy) करण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्ष शरीरसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. या अशा द्विधा वागण्यामुळे पुरुष अतिशय गोंधळात पडतो. बायको जवळ आल्यामुळे तो उद्दीपित होतो पण संबंध नाकारल्यामुळे तो दुखावला जातो. पुढच्या वेळी अशी अवहेलना होऊ नये म्हणून तो बायकोशी भावनिक जवळीक टाळतो. त्यामुळे आधीच तणावपूर्ण वातावरणात भर पडते. स्त्रियांनी जर आपल्या नवर्याला सुरुवातीलाच स्पष्ट सांगितले कि मला फक्त जवळीक हवी आहे संबंध नको तर पुरुषाची उद्दीपित होणे आणि नंतर थंड पडणे अशी कुचंबणा टळेल आणि निदान संबंधात तणाव वाढणार नाही. कोरडे पणामुळे योनीला जंतुसंसर्ग होतो आणि त्यामुळे खाज येणे जळजळ होणे पांढरे पाणी जाणे हे प्रकार सुद्धा वाढतात. याचा वेळेत इलाज करणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने स्नेहन(lubrication) साठी क्रीम वापरणे आणि जन्तुसंसार्गासाठी प्रतिजैविक घेणे हे त्यांच्या संबंधाना पुनर्प्रस्थापित करण्यासाठी फार महत्त्वाचे ठरते. शेवटी कामसुख हे एक असे सुख आहे कि ज्यासाठी दोन्ही साथीदारांचा सहभाग आवश्यक आहे. जसे पुरुषांनी दोन पायर्या उतरणे आवश्यक आहे तसेच स्त्रियांनी दोन पायर्या चढणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा दुरावलेले संबंध पुनर्प्रस्थापित करणे फार कठीण जाते. कारण हे सुख मिळवण्यासाठी बाहेर जाणे हे कोणाच्या हि हिताचे नाही. मानसिक आजार -२० टक्के स्त्रियांना या काळात नैराश्य येते( मेंदूत होणारा केमिकल लोच्या) हे असे का होते आहे हे स्त्रियांना काळात नाही आणि ती नाटके करीत आहे असे पुरुषांना वाटत असते. दुर्दैवाने हे नैराश्य( depression) आहे कि लक्ष वेधून घेण्यासाठी( attention seeking) केले जाते ते सहज सांगणे कठीण जाते. यासाठी पुरुषांना फार धैर्याने आणि संयमाने वागणे आवश्यक असते. पण हाच काळ त्यांच्या कर्तृत्वाचा असल्याने त्यांना आपल्या बायकोला तेवढा वेळ देत येतोच असे नाही आणि ती स्त्री एकटी पडते. ४० -५० टक्के स्त्रियांना निद्रानाशाचा त्रास होतो. त्या बोलत असताना नवरा घोरू लागला हे हटकून दिसणारे चित्र आहे. मग यातून बायका नाही नाही ते अर्थ काढू लागतात. नवर्याचे माझ्याकडे लक्ष नाही मी आता तेवढी सुंदर नाही पासून त्याचे बाहेर बहुतेक लफडे असावे इथपर्यंत. यावर उपाय काय? १) आपली शरीर प्रणाली मंद होत आहे आणि पाळी अनियमित होत आहे हे जाणवल्यावर स्त्रियांनी स्त्री रोग तज्ञाकडून तपासणी करणे आवश्यक आहे हे रजोनिवृत्ती मुले आहे हे नक्की झाले म्हणजे पुढच्या उपाया कडे वळता येते. २) पहिली गोष्ट म्हणजे आपली शरीर प्रणाली मंद होत आहे तर ती परत वेगवान करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे सर्वात चांगला व्यायाम म्हणजे चालणे. रोज ३५ ते ४० मिनिटे वेगाने ( गाडी पकडण्यासाठी चालतो त्या वेगाने) चालायला सुरुवात करा. रिक्षा/ दुचाकीचा वापर अत्यावश्यक असेल तरच करा. याने आपल्या स्नायुंना व्यायाम मिळून मेंदूत इंडोर्फिन नावाची संप्रेरके तयार होतात( रजोनिवृत्तीमुळे हि संप्रेरके कमी झाली असल्याने स्त्रीला उदास/ निरुत्साही वाटत असते ते नक्कीच कमी होते. शरीर थकल्यामुळे झोप चांगली लागते आणि सकाळी उठल्यावर जो निरुत्साह वाटतो तो कमी होतो. ३) आहार दहा टक्क्यांनी कमी करा यात तेलकट मसालेदार गोष्टी कमी करून फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे.(तोच वापरून दोन्ही बाजूनि गुळगुळीत झालेला सल्ला)ज्यांना वाताचा त्रास आहे अशा भगिनींनी (जवळ जवळ ६० टक्के ना हा त्रास होतो ) सकाळी उठल्यावर दात घासल्यावर अंशे पोटी एक लिटर कोमट पाणी प्यावे या पाण्यात एक लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घालावा याने आपले पोट साफ होईल रात्रभर शरीरात साठलेली दुषित द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडाला मदत होईल आणि स्वस्तात निपटेल (काहीच नाही तर अपाय नक्कीच होणार नाही) ४) एखादा छंद लावून घ्या --(परत तेच -छंद असा सहज लावून लागत नाही) म्हणून साधारण चाळीशीनंतर स्त्रियांनी आपल्याला काय आवडते आणि काय करायचे होते जे राहून गेले याची यादी करायला घ्या आणि त्यातील एक एक गोष्टी करण्याचा प्रयत्न करा यातील एखादी गोष्ट आपल्याला जमू शकेल. आता जी जमू शकली आहे ती गोष्ट रजोनिवृत्ती नंतर पूर्ण झोकून देऊन करत येईल. ५) इतर आजार -चक्कर येणे गरम वाटणे (hot flushes) यासठी तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे HRT (hormone replacement therapy) घेत येईल. हि घ्यावी किं घ्यावी याबद्दल जगभर मोठी चर्चा चालू आहे आणि मी वादात न पडता एकच सांगतो तुमच्या स्त्री रोग तज्ञाच्या सल्ल्याप्रमाणे करा. HRT ने रजोनिवृत्तीचे बरेचसे परिणाम काही काळा पुरते दूर करता येतात. एकदा तुम्ही त्या मानसिक स्थिती शी जुळवून घेतले कि हि औषधे बंद करता येतात. ६) नैराश्य यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मनोविकार तज्ञाकडे जाऊन उपाय करता येईल. पण हा आजार आहे हे घरच्यांनी/ नवर्याने जाणून घेणे आवश्यक आहे. बाकी अदिती ताईनी दिलेल्या दुव्यांमध्ये शारीरिक आजाराची माहिती सुरेख तर्हेने दिलेली आहेच. घरच्यांसाठी-आपल्या बायकोला/ आईला समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. कदाचित एवढ्यावरच काम भागेल. तिच्या अशा काळात तिला आपल्या मदतीची अतिशय जास्त गरज आहे. ऑफिसात बॉस ची बकबक गपचूप ऐकून घेताच मग थोडीशी बायकोची ऐकली तर काय बिघडले ? बरेच लोक हेच म्हणतील कि ऑफिसात डोके पिकवून आलो तर घरी तेच मग फरक काय? स्त्रियांसाठी -- आपल्याला काय होते आहे याचे शांत डोक्याने परीक्षण करा कुठे चुकते आहे त्याचा विचार करा आणि संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा पहा काही फरक पडतो का?

Book traversal links for मध्य वयातील वादळ -पुढे

  • ‹ मध्य वयातील वादळ
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
53331 वाचन

💬 प्रतिसाद (118)

प्रतिक्रिया

जुळे अवयव

सुबोध खरे
Tue, 05/14/2013 - 00:11 नवीन
सर्व जुळे अवयव ज्यात मूत्रपिंडे डोळे कान बिजाण्डकोश इत्यादी अवयव यात जर एक अवयव निकामी झाला तर दुसरा अवयव त्याची कसर जवळ जवळ पूर्णपणे भरून काढतो ( म्हणून काणी माणसे सुद्धा क्रिकेट/ टेनिस सारखा आत्यंतिक खेळ खेळू शकतात. म्हणूनच अगदी जर कर्करोग नसेल तर शक्यतो दोन्ही बीजांडकोश कधीच काढले जात नाहीत आणि एक बीजांड कोश काढल्यामुळे स्त्रीच्या प्रजनन क्षमतेत काहीही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सेरेपी

धन्यवाद

सेरेपी
Tue, 05/14/2013 - 01:36 नवीन
हो मला त्यावरूनच प्रश्न पडला होता. एक किडनी निकामी झाली तरी दुसरी टेक-ओव्हर करते वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लेख आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/12/2013 - 08:17 नवीन
डॉक्टर साहेब, माहितीपूर्ण लेख आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अस्तित्वाची संरचना

संजय क्षीरसागर
Sun, 05/12/2013 - 11:12 नवीन
निसर्गाचा उद्देश स्वतःची पुनर्निमिती (प्रोलिफरेशन) आहे आणि प्रणय त्याची प्रक्रिया आहे. संपूर्ण अस्तित्व सतत स्वतःला प्रणयातनं पुनर्निमित करतं. ती पुनर्निमिती आकार असेल किंवा उर्जा. या प्रक्रियेसाठी दोन पोलॅरिटीज आवश्यक आहेत. अस्तित्वाच्या दृष्टीनं दोन्ही पोलॅरिटीज आवश्यक आणि समान आहेत. भेद किंवा द्वैत माणसानं निर्माण केलंय. भूक ही नेगटीव (ऋण किंवा स्त्रैण) पोलॅरिटी मानली तर अन्न ही पॉजिटीव (घन किंवा पुरूष) पोलॅरिटी आहे आणि त्या दोहोंच्या मिलनातून शारीरिक उर्जा तयार होते. भूक अन्नाला आकर्षित करते. सर्व ऋण आणि घन पोलॅरिटीज याच पद्धतीनं काम करतात. स्री देह पुरूषाला आकर्षित करतो आणि त्यांच्या मिलनातून निसर्ग पुनर्निमित होतो. आणि मानवी संप्रेरकांवर चर्चा करतांना हे दोन पोलॅरिटीज मधलं आकर्षण विषयाचा केंद्र बिंदू ठरतो.
  • Log in or register to post comments

निसर्गाचा उद्देश स्वतःची

मराठी_माणूस
Mon, 05/13/2013 - 20:22 नवीन
निसर्गाचा उद्देश स्वतःची पुनर्निमिती (प्रोलिफरेशन) आहे
असे असेल तर निसर्गाने स्वतःच दोन पोलॅरिटिची बंधने का घालून घेतली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

निसर्गाने स्वतःच दोन पोलॅरिटिची बंधने का घालून घेतली

अर्धवटराव
Mon, 05/13/2013 - 21:37 नवीन
विषयाला अवांतर ठरु शकतो हा प्रतिसाद... तरिही... ज्या कुठल्या कारणाने (उल्कापात ? अ‍ॅसीड रेन्स ?) डायनासोर्सने शेवटचे "हे राम" म्हटले त्याकाळी असंख्य जीव आपापल्या उत्क्रांतीच्या तत्कालीन अवस्थेसह कायमचे नष्ट झाले. असले प्रलय पृथ्वीवर अनेकवेळा झालेत. अन्यथा आजघडीला कदाचीत आपण विचार देखील करु शकणार नाहि असे विविध शरीररचना/क्षमता असलेले प्राणि (मानव देखील) आपण बघु शकलो असतो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

ठ्ठो ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/13/2013 - 21:05 नवीन
निसर्गाचा उद्देश स्वतःची पुनर्निमिती (प्रोलिफरेशन) आहे आणि प्रणय त्याची प्रक्रिया आहे
तुम्ही रिचर्ड डॉकिन्सची किंवा उत्क्रांतीशास्त्र या विषयावरची पुस्तकं मुद्दामच वाचत नाही का ठरवून आम्हां लोकांना हसवता? गुलाबाची कलमं, मोगर्‍याचं रोप वाकवून दुसरं झाड तयार करणं वगैरे asexual (मराठी?) पुनरुत्पादनाची, समोर दिसणारी उदाहरणं शालेय अभ्यासक्रमात शिकवली जातात हो! आंबेडकरांनी काय सांगितलं, "शिका, मोठे व्हा". त्यातली "शिका" ही पायरी गाळायची नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमच्या बुद्धीबद्दल इतका

शिल्पा ब
Mon, 05/13/2013 - 22:59 नवीन
तुमच्या बुद्धीबद्दल इतका भयंकर आदर आहे की काही विचारु नका (तरी मी आपलेपणाने सांगतेय !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दोन धृवांचे आकर्षण हा

सुबोध खरे
Tue, 05/14/2013 - 00:30 नवीन
दोन धृवांचे आकर्षण हा निसर्गाने जैविक वैविध्य कायम ठेवण्यासाठी निर्माण केलेला अतिशय उत्कृष्ट उपाय आहे. यामुळे दोन जिवातील गुणसूत्रे एकत्र होऊन त्याच्या पासून वेगळी असलेली तिसरी गुणसूत्रे निर्माण होतात आणि यातील चांगली गुणसूत्रे असलेले जीव स्पर्धेत टिकून राहून उत्क्रांत होतात. पण यासाठी दोन ध्रुव असण्याची गरज आहे असे नाही कारण एक पेशीय जीव पासून ते काही सरीसृप(reptiles) पर्यंत जीव द्विभाजन आणि अ लैंगिक पद्धतीने पुनरुत्पादन करताना आढळतात. god has linked procreation with recreation.otherwise no man will marry. हे आम्हाला वंध्यत्व वर उपचार या विषयात शिकवले होते. कनिष्ठ प्राण्यात(कुत्रे मांजर बिबळ्या सिंह वाघ हरीण गाय म्हैस इ) नराचे काम फक्त शुक्राणू देणे एवढेच असते त्यामुळे त्यांच्यात मादी हि पिल्लाला वाढवते आणि नराचे योगदान शून्य असते. याचे कारण त्या पिल्लांचे बरेचसे काम हे नैसर्गिक प्रेरणेने होते पहिले काही आठवडे /महिने सोडले तर ते पिल्लू आपले अन्न वासाने किंवा अन्तः प्रेरणेने मिळवू शकते.आणि मादी पुन्हा प्रसावाकडे वाले पर्यंत पहिल्या वेतातील पिल्ले स्वावलंबी झालेली असतात. मानवी बालपण हे प्राणीमात्रात सर्वात लांब म्हणजे जवळ जवळ पंधरा ते अठरा वर्षे असते या काळात एकट्या स्त्री ला बालकाचे पूर्ण पालन पोषण हे अशक्य आहे म्हणून वर लिहिलेले वाक्य बरोबर आहे असे वाटते. बाकी क्रमशः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कॅथलिक?

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/14/2013 - 03:16 नवीन
god has linked procreation with recreation.otherwise no man will marry. हे आम्हाला वंध्यत्व वर उपचार या विषयात शिकवले
कॅथलिक किंवा अन्य ख्रिश्चन पंथाचं पाठ्यपुस्तक आणि/किंवा शिक्षक होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कॅथलिक किंवा अन्य ख्रिश्चन पंथाचं

सुबोध खरे
Tue, 05/14/2013 - 18:24 नवीन
नाही ते पूर्ण हिंदू आणी आर्मीचेच स्त्रीरोग तज्ञ होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हे आणखीनच मजेशीर.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/15/2013 - 22:54 नवीन
हे आणखीनच मजेशीर. साधारण अशा प्रकारचं तत्त्वज्ञान ख्रिश्चन धर्मात आहे. रेनेसाँपूर्वीच्या युरोपमधे ते लोकप्रियही होतं. इतिहास, मानववंशशास्त्र आणि उत्क्रांतीशास्त्राच्या प्रगतीमुळे यावर आता युरोपीय लोकांचा विश्वास नाही पण भारतीय (हिंदू आणि सैन्यातले) डॉक्टर विश्वास ठेवतात हे भारीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अदिती -ताई

सुबोध खरे
गुरुवार, 05/16/2013 - 10:08 नवीन
god has linked procreation with recreation.otherwise no man will marry.याचा अर्थ धार्मिक असा अजिबात नाही. जर संभोगात आनंद मिळणार नसेल तर मानवी नर कोणत्याही स्त्री च्या जवळ जाणार नाही. प्राणीमात्रातील संभोगाची नैसर्गिक प्रेरणा(INSTINCT) नर आणि मादीला एकत्र आणतात आणि संभोगानंतर नर दुसरया मादीकडे वळतो. नराची नैसर्गिक प्रेरणा हि जमेल तितक्या माद्यांशी संभोग करून जितकी जास्त स्वतःची संतती वाढवता येईल तितकी वाढवावी अशी आहे यात अपत्य संगोपनात नराचा वाटा शून्य आहे. याचे एक कारण प्राणीमात्रात बहुसंख्य गोष्टी या नैसर्गिक प्रेरणेने होतात. हरिणाचे पिल्लू जन्माला येताच काही मिनिटात उठून उभे राहते, नैसर्गिक प्रेरणेने आईचे दूध पिऊ लागते आणि अर्ध्या तासात पळू लागते. तशी परिस्थिती मानवी बाळाची नाही. ते आईच्या( किंवा कोणत्याही बाहेरील मदतीशिवाय) पहिली जवळ जवळ १० वर्षे पर्यंत परावलंबी असते. मानवी मूल हे पूर्ण नैसर्गिक प्रेरणेवर जगू शकणार नाही आणी मानवी बालपण हे जवळ जवळ १५ वर्षे इतके लांब असते. शिवाय एक स्त्री गरोदरपण आणी मुलाच्या जन्माच्या वेळी जवळ जवळ ११ -१२ महिने पूर्ण परावलंबी असते आणी त्यापुढे १३ ते १४ वर्षे अपत्य संगोपनात जर एखाद्या स्त्रीला द्यावी लागतात. पुरुषाला जर संभोगात आनंद नसेल तर पुरुष एवढी जबाबदार का घेईल? असा साधा अर्थ आहे. मानव सोडून फारच कमी प्राणी केवळ आनंदासाठी सम्भोग करत असावेत. आणी हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल?हे नागडे सत्य आहे. असे सहसा मी लिहित नाही पण आता विषय निघाला आहे म्हणून लिहित आहे.विसाव्या शतकातील स्त्रियांसाठी सर्वात मोठा आणी क्रांतिकारी शोध म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने हा होय. याशिवाय स्त्री मुक्ती हि अशक्य होती ( आणी आहे) अन्यथा स्त्री हि चूल आणी मूल यातून कधीच बाहेर आली नसती. कारण संभोगेच्छा टाळणे शक्य नाही आणी त्यातून येणारे गर्भारपण तिला आयुश्या साठी बंधनात टाकणारे असते. मग कुठली मुक्ती आणी काय? असो सध्या इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पुरुषाला जर संभोगात आनंद नसेल तर पुरुष एवढी जबाबदार का घेईल?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/16/2013 - 11:41 नवीन
असा साधा अर्थ आहे.
हेच तर इतका वेळ सांगतोय! आणि तुमच्यासारखा अनुभवी माणूस सहमत झाला म्हणजे प्रश्नच मिटला.
मानव सोडून फारच कमी प्राणी केवळ आनंदासाठी सम्भोग करत असावेत.
त्यांचा संभोग कंपल्सिव असतो. मानवी प्रणय ऐच्छिक असू शकतो आणि तो पारस्पारिकार्षण आणि नातं (जे केवळ मानवात आहे) यातला महत्त्वाच दुवा आहे. आयुष्याच्या उत्तरंगात दोघातलं एकमेकांप्रती आकर्षण आणि प्रेमच निर्णायक ठरतं. प्रणय दुय्यम ठरतो.
आणी हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल?हे नागडे सत्य आहे
सही! पण हे इतकं एकांगी नाही. स्त्रीला सुद्धा प्रणयाचा आनंद असतोच.
विसाव्या शतकातील स्त्रियांसाठी सर्वात मोठा आणी क्रांतिकारी शोध म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने हा होय.
यू वील अग्री, इतक्या क्रांतीकारी शोधानंतर सुद्धा प्रणयातला आनंद सर्वतोपरी एकाच गोष्टीवर अवलंबून आहे : पारस्पारिक आकर्षण! नाही तर प्रणयानंतर नातं कसं टिकणार? कारण ती काही दिवसभर चालणारी गोष्ट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कांहीसा असहमत.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 05/16/2013 - 11:41 नवीन
जर संभोगात आनंद मिळणार नसेल तर मानवी नर कोणत्याही स्त्री च्या जवळ जाणार नाही.
हे फक्त मानवी नराच्या बाबतीतच आहे आणि इतर प्राणिमात्रांमध्ये संभोगात आनंद मिळत नाही? अन्य प्राणिमात्रांमध्ये एका मादीसाठी होणारी दोन नरांची जीवघेणी मारामारी पाहता विश्वास बसत नाही.
अपत्य संगोपनात नराचा वाटा शून्य आहे.
असहमत. नैसर्गिक, शारीरीक भेदभाव वगळता, कमी-अधिक प्रमाणात मानवी नराचाही अपत्य संगोपनात सहभाग असतो.
ते आईच्या( किंवा कोणत्याही बाहेरील मदतीशिवाय) पहिली जवळ जवळ १० वर्षे पर्यंत परावलंबी असते. मानवी मूल हे पूर्ण नैसर्गिक प्रेरणेवर जगू शकणार नाही आणी मानवी बालपण हे जवळ जवळ १५ वर्षे इतके लांब असते.
सहमत. परंतू मानवी मुल एकट्या आईच्या मदतीवर मोठे होत नसते. त्याला वडिलांचे साहाय्यही असावे लागते. बहुतांशी असते. जर एखादा पुरूष आपली जबाबदारी टाळत असेल तर ते चुकीचे आहे.
हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल?
म्हणजे फक्त संभोगासाठी पुरूष लग्न करतो? पण त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? फक्त संभोगासाठी कितीतरी वेश्या उपलब्ध असतात. कायद्यानेही त्याला संमती आहे. आर्थिक भार वगळता कुठलीही जबाबदारीही नाही. प्रत्येक स्त्री-पुरुषाची शारीरीक गरजे इतकीच, किंबहुना जास्त, भावनिक गरज असते. प्रेम करणे आणि करवून घेणे हा प्रत्येक स्त्री-पुरूषाचा मुलभूत हक्क आहे. भावनेशिवाय (परंतु संभोगासह) सहजीवन ही एक शिक्षा ठरावी इतके भावनेला महत्त्व आहे. विषय अत्यंत गहन आहे. वरवरची विधाने करू नयेत.
विसाव्या शतकातील स्त्रियांसाठी सर्वात मोठा आणी क्रांतिकारी शोध म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने हा होय.
विसाव्याशतकातील अनेक क्रांतीकारी शोधातील एक म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने असे म्हणावे लागेल. सहमत आहे.
याशिवाय स्त्री मुक्ती हि अशक्य होती ( आणी आहे) अन्यथा स्त्री हि चूल आणी मूल यातून कधीच बाहेर आली नसती. कारण संभोगेच्छा टाळणे शक्य नाही आणी त्यातून येणारे गर्भारपण तिला आयुश्या साठी बंधनात टाकणारे असते.
गर्भारपणामुळे आणि संतती निर्माण करण्याने एकटी स्त्रीच बंधनात अडकते? फार एकांगी विचार वाटतो आहे. मुलांच्या तळमळीने घराकडे धावणारे पुरुष पाहा, मुलांपासून मोठ्या कालावधीसाठी दूर राहून पाहा. पत्नीशी कितीही बेबनाव झाला तरी, मुलांसाठी म्हणून घटस्फोट न घेणारे पुरुष पाहा. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी हाडाची काडं करणारे पुरुष पाहा, मुलांच्या आजारपणात काळजीने काळवंडणारे, त्यांच्या उशाशी बसून राहणारे पुरूष पाहा. पुरुषाचा शारीरीक, मानसिक, भावनिक सहभागाशिवाय कुटुंब चालत नसतं. गर्भारपण टळणे म्हणजे स्त्री मुक्ती असा संकुचित विचार का? एक 'व्यक्ती' म्हणून समानाधिकार, वैचारिक, आर्थिक स्वातंत्र्य, भावना व्यक्त करण्याच्या, सामाजिक स्वातंत्र्य उपभोगण्याच्या समान संधी आदी अनेक पैलू 'स्त्री-मुक्ती'च्या विचारांमागे असतात/असावेत. पुरुषाचा सर्वस्तरावरील सहयोग महत्त्वाचा आहे. हल्लीच्या जमान्यात दोन मुलांच्यावर अधिक मुले होऊ न देण्याकडे सर्वच पती-पत्नीचा कल असतो. म्हणजे दोन मुलांनंतर गर्भारपण टळले. झाली का अशा सर्व स्त्रीयांची मुक्ती?? क्षमा असावी पण आपले विचार काही पटले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अन्य प्राणिमात्रांमध्ये एका

सुबोध खरे
गुरुवार, 05/16/2013 - 12:39 नवीन
अन्य प्राणिमात्रांमध्ये एका मादीसाठी होणारी दोन नरांची जीवघेणी मारामारी पाहता विश्वास बसत नाही.
अन्य प्राण्यांच्या बाबतीत एकदा मादीशी संबंध संपल्यावर नर तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही. तो इतर नरांशी जीवघेणी मारामारी फक्त आपले वंशसातत्य ठेवण्याच्या आंतरिक प्रेरणेने करतो. (सिंह आणी चित्ते यांच्यात तर दोन किंवा तीन किंवा चार नर सुद्धा यासाठी सामंजस्य(!) करतात). तेंव्हा त्यांच्यात संभोग हा नैसर्गिक प्रेरणेनेच होतो आनंदासाठी नाही.
अपत्य संगोपनात नराचा वाटा शून्य आहे.
हे वाक्य मानवाला नव्हे तर कनिष्ठ प्राण्याना उद्देशून आहे. संभोगात आनंद आहे म्हणून मानव एकदा संबंध ठेवल्यावर स्त्री ला सोडून जात नाही आणी अपत्य संगोपनात सहभागी होतो. (जसा कनिष्ठ प्राण्यामध्ये नर सोडून जातो)
हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल
? हे आणी इतर सर्व वाक्ये मानवाच्या आंतर प्रेरणेबद्दल लिहिली आहेत. एक तरुण माणूस आणि स्त्री भेटले तर त्यांचा पहिला विचार हा नैसर्गिक आकर्षणाचा असतो. विवाह अपत्य संगोपन इत्यादी हे मानवाच्या विचारशक्ती चे प्रतिक आहेत नैसर्गिक प्रेरणेचे नव्हेत. एका रात्री पुरते भेटले आणी नंतर वेगळे झाले. यातून जर संतती निर्माण झाली तर तो पुरुष त्याची किती काळजी घेईल? मात्र अशी स्त्री पूर्वी एकतर बेकायदेशीर गर्भपाताच्या दिव्यातून जात असे किंवा आत्महत्या करत असे अन्यथा त्या मुलाला गपचूप जन्म देत असे आणी अनाथाश्रमात सोडत असे. लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा आयुष्भर बाळंतपण स्तनपान परत बाळंतपण या चक्रातून सुटका नसे. माझ्या आजीला १२ अपत्ये झाली. तिचे आयुष्य काय होते? आमचे आजोबा कितीही चांगले होते तरी चूल आणी मुल यातून तिची सुटका झाली का? माझी आई (तिचा त्या अपत्यात १२ वा क्रमांक होता) - आम्हा दोन मुलांना जन्म दिल्यावर थोडे मोठे झाल्यावर( ६-७ वर्षाचे) तिने स्वतःचे शिक्षण सुरु केले. मी १० वी होई पर्यंत तिने आपले एम ए आणी बी एड पूर्ण केले मी १२ झाल्यावर तिने शिक्षिकेची नोकरी धरली आणी २००० साली ती सन्मानाने मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. माझ्या आजीत आणी माझ्या आईत हा फरक का दिसतो? दोनच मुले. हे त्याचे उत्तर आहे. आता वेळ नाही म्हणून मी आपल्या प्रत्येक वाक्याचे उत्तर देत नाही आपण माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे त्यामुळे असे झाले आहे असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नैसर्गिक प्रेरणा..

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 05/16/2013 - 13:19 नवीन
(डॉ.)सुबोध खरे साहेब,
संभोगात आनंद आहे म्हणून मानव एकदा संबंध ठेवल्यावर स्त्री ला सोडून जात नाही आणी अपत्य संगोपनात सहभागी होतो.
संभोगात आनंद आहे ह्यात वाद नाहीच परंतू, पुरूष फक्त म्हणून स्त्रीला सोडून जात नाही हा तर्क मला तरी पटत नाही. माझ्या आधीच्या प्रतिसादात प्रतिपादिलेली 'भावना' ह्या गरजेकडे आपण काणाडोळा करीत आहात.
विवाह अपत्य संगोपन इत्यादी हे मानवाच्या विचारशक्ती चे प्रतिक आहेत नैसर्गिक प्रेरणेचे नव्हेत.
फक्त संभोग सुखासाठी पुरूष लग्न करतो ह्या विचारांशी मी असहमत आहे. मनुष्यप्राणी हाही एक 'प्राणी' आहे. त्याला नैसर्गिक प्रेरणा असणे स्वाभाविक आहे. पण विवाहासाठी ती आणि तेवढीच गरज आहे असे नाही. ज्या 'विचारशक्ती'च्या नैसर्गिक देणगीतून त्याने विवाहसंस्था जन्माला घातली आहे त्याच विचारशक्तीने त्याला/तिला 'भावना' दिलेली आहे.
माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे
जरा उलगडून सांगणार का? कुठला तो विशिष्ट विचार? माझ्या प्रश्नांची, शंकांची तुम्हाला उत्तरे द्यायची नसतील तर जबरदस्ती नाही. पण माझ्या हेतू बद्दल शंका का यावी हे कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे

सुबोध खरे
गुरुवार, 05/16/2013 - 18:22 नवीन
साहेब, मी फक्त माणसाच्या आंतरिक प्रेरणेवर लिहित होतो म्हणून ते वाक्य god has linked procreation with recreation.otherwise no man will marry.लिहिले आहे. आपण माणसाच्या प्रगल्भ विचारसरणी बद्दल लिहित आहात. आपण सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केला तर बरोबर लिहिले आहे. पण मी फक्त मानवाच्या आंतरिक प्रेरणे बद्दल ( जो आपल्याला अध्यारुथ गोष्टींचा एक भाग आहे)या अर्थाने लिहिले होते आपला असा समज झाला कि मी आपले लिखाण पूर्वग्रह दुषित आहे असे लिहिले आहे. तसे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 05/16/2013 - 19:05 नवीन
मी आपले लिखाण पूर्वग्रह दुषित आहे असे लिहिले आहे. तसे नाही.
धन्यवाद. आंतरीक प्रेरणा मला मान्य आहेच. इतर प्राण्यांप्रमाणे मानवातही ती आहे. पण, मानवात फक्त तेवढ्याच प्रेरणेने विवाह होत नाहीत. त्यात प्रेम भावनाही असते. पुरुषाला फक्त संभोगात रस असतो आणि मुलांच्या संगोपनात त्याचा सहभाग नसतो (ह्या मुद्द्यावर तुमचे उत्तर आले आहेच), अपत्य संगोपनातून सुटका झाल्यास स्त्री मुक्ती येईल वगैरे विधानांना माझा विरोध आहे आणि राहील. आपण आई आणि आजीचे जे उदाहरण दिले आहे ते सर्वसमावेशक नाही. शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती झाली. पण स्त्री मुक्ती एवढ्या दोनच मुद्यांवर उभारलेली नाही. तसे असते, तर दोन मुलांनंतर सर्वच स्त्रीयांची मुक्ती झालेली दिसून आली पाहिजे. पण तसे होत नाही. कारण स्त्री-मुक्ती हा एक गहन आणि बहुआयामी विषय आहे. पुरुष वर्चस्व आणि स्त्रीचे दुय्यम स्थान संपुष्टात आले तर तिथून स्त्री मुक्तीस प्रारंभ होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

याचा प्रेमाशी काय संबंध आहे

आजानुकर्ण
गुरुवार, 05/16/2013 - 20:49 नवीन
हे आंतरिक प्रेरणा वगैरे ठीक आहे. पण याचा प्रेमाशी काय संबंध आहे? आपल्या इतिहासात बहुपत्नित्वाची प्रथा चालू होती. मग नवऱ्याचे सर्वच बायकांवर प्रेम होते की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक आर्ग्युमेंटः- अनेक बाय्कांवर प्रेम असूही शकते.

मन१
Fri, 05/17/2013 - 12:21 नवीन
एका सद्गृहस्थांकडून ऐकलेले आर्ग्युमेंटः- अनेक बायकांवर प्रेम असूही शकते. तुम्हाला दोन्-तीन बहीण कींवा दोन्-तीन भाउ असतील तर तेव्हा सारेच आवड्तात की नाही? भावंडात बंधूभाव असतोच की नाही? किंवा तुम्हाला अनेक अपत्ये आहेत, आणी सारीच प्रियही आहेत असे असू शकते. तिथे "प्रेमाच्या वाटणीचा" प्रश्न येत नाही.मग दोन बायका असतील तर मग त्या दोघीही प्रिय असणे ह्यात चूक ते काय? --आर्ग्युमेंट संपले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

काय आर्ग्युमेंट आहे.. झकास.

गवि
Fri, 05/17/2013 - 12:42 नवीन
काय आर्ग्युमेंट आहे.. झकास. मलाही अनेक स्त्रिया आवडणे आवडेल.. पण त्या सर्व स्त्रियांना मी एकटाच आवडावा असा माझा आग्रह राहील.. या समस्येमुळे एकच स्त्री मला आवडते आणि तिलाही मी एकच पुरुष आवडतो असं स्वतःच्या मनाशी खोलवर मानणे अशी लग्न नामक करारवजा रचना आपण करुन घेतली आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

:)

पैसा
Fri, 05/17/2013 - 12:52 नवीन
अहो गवि, आणि आता तुम्हा लोकांकडे तेवढा वेळ कुठे आहे? पूर्वीच्या संस्थानिकांना पोटासाठी नोकरी करायला लागत नव्हती त्यामुळे त्यांना सगळ्या बायकांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत असेल. आता एकुलती एक बायकोच रोज उठून ओरडत असते की नवर्‍याला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लग्न नामक करारवजा रचना

मन१
Fri, 05/17/2013 - 13:43 नवीन
लग्न नामक करारवजा रचना ही शिंची अलिकडेच मगच्या सात आठ दशकात उपटलेली बंधने आहेत. त्यापूर्वी कित्येक स्त्रियांशी विवाह करायचेच की राजेरजवाडे(किंवा ज्यांना झेपेल ते). शिंचा ब्रिटिशांनी एकावेळी एकपत्नीत्व घ्यायला लावून लैच अन्याय केलाय आख्ख्या भारतावर. प्राचीन परंपराच लोपली की हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अहो बरेच झाले की..

गवि
Fri, 05/17/2013 - 13:58 नवीन
अहो बरेच झाले की.. बहुपत्नीत्व शिल्लक ठेवले असते तर वरील न्यायानेच (पक्षी: अनेक भाऊ असले तर बहिणीचे सर्वांवर सारखेच प्रेम असू शकते..) अनेक पुरुषांवर सारखेच प्रेम करणार्‍या या बायका आपल्या सद्य पतीकडे बहुपतित्वाची मागणी करु लागल्या असत्या.. लई भानगडी उद्भवल्या असत्या राव.. आणि टीव्ही सीरियल्समधल्या गुंतागुंती तर १०^१०३ इतक्या वाढल्या असता असा एक अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

गडबडगुंडा

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/16/2013 - 21:13 नवीन
god has linked procreation with recreation.otherwise no man will marry.याचा अर्थ धार्मिक असा अजिबात नाही.
१. देवाचा उल्लेख करूनही हे वाक्य धार्मिक कसं नाही हे मला समजलं नाही. २. दुसरं महत्त्वाचं कारण हे की विज्ञान, मनोव्यापार, इतिहास इत्यादि विषयांच्या अभ्यासातून हे वरचं वाक्य साफ चूक आहे हे दिसलेलं आहे. अभ्यास नाकारून "बाबा वाक्यं प्रमाणम्" मानणं हे धर्म आणि धार्मिकपणाचं एक लक्षण आहे. त्या दृष्टीनेही हे वाक्य धार्मिक आहे.
जर संभोगात आनंद मिळणार नसेल तर मानवी नर कोणत्याही स्त्री च्या जवळ जाणार नाही.
आत्तापर्यंत जी काही उत्क्रांतीशास्त्र, मानववंशशास्त्राची पुस्तकं वाचलेली आहेत त्यात असं काहीही लिहीलेलं नाही. या सगळ्यांच्या संशोधनानुसार मानवी नर आणि अन्य प्राण्यांमधला नर यांची प्रेरणा समान असते, स्वतःची गुणसूत्र पुढे ढकलणं. प्रेयिंग मँटीस या कोळ्यांच्या जातीत आणि अन्य काही प्राण्यांच्या जातीमधे मादी नरांकडून स्पर्म घेतल्यानंतर त्याला खाते, त्यातून पोषण मिळवते आणि तरीही हे नर मेटींग करतात.
शिवाय एक स्त्री गरोदरपण आणी मुलाच्या जन्माच्या वेळी जवळ जवळ ११ -१२ महिने पूर्ण परावलंबी असते आणी त्यापुढे १३ ते १४ वर्षे अपत्य संगोपनात जर एखाद्या स्त्रीला द्यावी लागतात. पुरुषाला जर संभोगात आनंद नसेल तर पुरुष एवढी जबाबदार का घेईल?
१. याच धाग्यात खालच्या प्रतिसादांमधे 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकाची लिंक दिलेली आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी त्यात शेतीपूर्वकालीन आणि शेतीच्या शोधानंतरचा मनुष्यांमधले लैंगिक संबंध, कुटुंबसंस्था आणि पुनरूत्पादनाचा इतिहास दिलेला आहे. खासगी मालमत्ता जमा करण्याची सुरूवात झाल्यानंतर, आपल्या कष्टांनी जमा केलेली मालमत्ता आपल्याच मुलांना मिळावी या विचारांपोटी पुरुष स्वतःच्या मुलांची जबाबदारी घेतो. २. (जशी अनेक स्त्रियांना अपत्य संगोपनाची इच्छा नसते तसंच) अनेक पुरुषांनाही अपत्य संगोपनाची इच्छा आणि हौस असते असं समाजात दिसतं. या पुरुषांवर तुमचं हे वाक्य प्रचंड अन्याय करणारं आहे. (हे एक उदाहरण) ३. हे "पूर्ण परावलंबीपण" अलिकडे फारच कमी झालेलं दिसतं. प्रसिद्ध स्त्रियांचं उदाहरण द्यायचं तर नोबेल पारितोषिक विजेत्या मेरी क्यूरी, गेर्टी कोरी या स्त्रिया प्रसूतीच्या दोन-तीन दिवस आधीही प्रयोगशाळेत काम करत होत्या. सर्वसामान्य आयुष्यात बघायचं तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधेही पाच-सहा महिने गर्भार असणार्‍या स्त्रिया नियमितपणे ऑफिसात जाताना दिसतात. प्रसूतीच्या पुढच्या आठवड्यात स्त्रिया कामालाही लागलेल्या दिसतात. अशी एक बाई आमच्या ऑब्झर्व्हेटरीतही पाहिली आहे; शुक्रवारी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे निघाली, सोमवारी मुलं झाली. ही बाई पुढच्या सोमवारी तिचं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी लिखाण करायला लागली होती. बांधकामाच्या साईटवरही तान्ही पोरं एकीकडे आणि त्यांच्या आया विटा वहाताना दिसणं हे प्रकार दिसतात. Evolution of sexual reproduction, Kin selection आणि तत्संबंधी पानांवर बरीच तपशीलवार माहिती आहे. तुमच्या प्रतिसादातली अधलीमधली वाक्य ठीकठाक असली तरी त्यातला कार्यकारणभाव सुसंगत नाही; लैंगिकता, शरीरसंबंध, अपत्यसंगोपनाची आवड वगैरे गोष्टींमधेही बरीच गडबड दिसते आहे. स्त्री-स्वातंत्र्यामधे कुटुंब नियोजनाची साधनं स्त्रियांच्या हातात येणं महत्त्वाचं असलं तरी हेच एकमेव कारणही नाही. माझा प्रतिसाद फारच त्रोटक आहे. मानववंशशास्त्र, उत्क्रांती, यांचा इतिहास या विषयांवर आणि स्त्रियांचं समाजातलं खालचं स्थान कशामुळे आलं याबद्दलही लिहीण्यासारखं बरंच काही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

<<<<em>१. देवाचा उल्लेख

शिल्पा ब
गुरुवार, 05/16/2013 - 21:24 नवीन
<<<१. देवाचा उल्लेख करूनही हे वाक्य धार्मिक कसं नाही हे मला समजलं नाही. देवाचा उल्लेख असलेलं सगळंच धार्मिक असतं असं थोडंच आहे. नुसतीच गुणसुत्र पुढं ढकलणे हाच एक नाही तर संभोगात आनंद नसेल तर संभोग फारसा होणार नाही.. हेच प्रेयिंग मँटीसच्या बाबतीतसुद्धा सत्य आहे. - डिस्कवरीवरच पाहीलंय म्हणुन. बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या वरच्या प्रतिसादातलं

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/17/2013 - 00:29 नवीन
माझ्या वरच्या प्रतिसादातलं संबंधित वाक्यः "देवाने मानव (किंवा अन्य प्राणी) यांच्यात संभोगात आनंद निर्माण केलेला आहे, असं म्हटल्यावर हे धार्मिक प्रतिपादन नाही असं कसं म्हणायचं?" असं वाचावं. जेनेरिक देव, धर्म, त्यांचा परस्परसंबंध वगैरेबद्दल चर्चा म्हणजे इथे अवांतर होईल; ते अन्यत्र बोलता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

धागा बराच भरकटलेला आहे

सुबोध खरे
Fri, 05/17/2013 - 10:11 नवीन
धागा बराच भरकटलेला आहे आणि मूळ मुद्दा बाजूला राहिला आहे म्हणून मी शेवटी वेगळ्या प्रतिसादात मला काय म्हणायचे होते ते सांगतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यापेक्षा वेगळा धागाच टाका.

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/17/2013 - 20:28 नवीन
त्यापेक्षा वेगळा धागाच टाका. नैसर्गिक प्रेरणा आणि त्यामुळे घडलेले बदल, सामाजिक परिणाम वगैरे विषय बराच मोठा आहे. त्यामुळे मूळ लेखनाचा जीव नको गुदमरायला. संपादकांना विनंती: या विषयावरचे प्रतिसाद वेगळे काढता आले तर दोन्ही विषय स्वतंत्रपणे चर्चा/प्रश्नोत्तरांसाठी वेगळे ठेवता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

देवा मला नास्तिक बनव

मन१
Fri, 05/17/2013 - 12:24 नवीन
"देवा मलाही ह्या पोरीसरखं नास्तिक बनव"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यात स्री देह पुरूष देहाला

राही
Mon, 05/13/2013 - 21:17 नवीन
त्यात स्री देह पुरूष देहाला आकर्षित करण्यासाठी तयार झालेला आहे जेव्हा होमो सेपियन्स ही प्राणिजात घडत होती त्या प्रारंभीच्या काळात कदाचित मादी होमोसेपियनदेह नर होमोसेपिअन देहाला आकर्षित करण्यासाठी बनला असेलही.(तसेही,केवळ देह देहाला आकर्षित करीत नसतो. त्यामधला मन हा भाग ते करीत असतो.नुसत्या कलेवररूपी देहांमध्ये आकर्षण उरत नाही.) पण हजारों-लाखों वर्षांनंतर होमोसेपियन्सच्या मज्जासंस्थेत काही सूक्ष्म बदल घडले असतीलच ना, की ज्या योगे मादी होमोसेपियनला असे वाटू लागले असेल की नर होमोसेपियनला आकर्षित करण्यापुरतेच आपले अवतारकार्य नाही,किंबहुना ते प्रयोजन अगदी दुय्यम असून इतरही अनेक उद्दिष्टे असू शकतात? विनोदाच्या अंगाने पाहिले (ते खरेच आहे म्हणा) तरी स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते. म्हणजे तिचा पुष्कळसा काळ संगोपनात खर्ची पडतो. मग तिला मारूनमुटकून सदासर्वकाळ प्रणयिनी,अभिसारिका किंवा इतर कोणी शृंगारनायिका ठरवण्यात काय अर्थ? मेंदू हा प्राणिदेहाचा आणि प्राणिदेह हा निसर्गाचा भाग मानला तर मेंदू म्हणजेच निसर्ग. निसर्गच हे बदल घडवीत आला आहे. त्यामुळे होमोसेपियन मादीने स्वतःचे आयुष्य आपल्या मेंदूच्या प्रेरणांनुसार ठरवणे हे निसर्गाविरुद्ध नाही. असो. एक दृष्टिकोन मांडला इतकेच. आणखी : "न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यते | हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ||"
  • Log in or register to post comments

दूष्टीकोन आवडला

पैसा
Mon, 05/13/2013 - 21:21 नवीन
आणखी थोडी भर. प्रत्येक पुढच्या पिढीत अधिक चांगल्या प्रजेसाठीच निसर्गाचा हा सगळा खेळ चाललेला असतो. म्हणजे सुप्रजनन हा मूळ हेतू आहे आणि त्यासाठी योग्य त्या नराला/मादीला आकर्षित करणे हा त्यासाठी पूरक हेतू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

रिचर्ड डॉकिन्सने उत्क्रांतीशास्त्रावर लिहीलेली पुस्तकं

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/13/2013 - 21:52 नवीन
राही, तुम्हाला रस असेल तर रिचर्ड डॉकिन्सने उत्क्रांतीशास्त्रावर लिहीलेली पुस्तकं जरूर वाचा. (या संदर्भात विशिष्ट कोणतं पुस्तक ते आठवलं की किंवा बघून सांगते.) दोन लिंग असणं उत्क्रांतीमधे फायद्याचं का ठरतं हे त्याने फार सुंदर लिखाण केलेलं आहे. मराठीत याबद्दल लिखाण आहे का नाही माहित नाही. संक्षींचा (निदान या संदर्भातला) दृष्टीकोन प्रचंड हास्यास्पद आहे याची वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार काही कारणं: १. निसर्गाचा काही उद्देश आहे असं म्हणलं तर निसर्गाला काही जाणीव आहे असं म्हणावं लागतं. हे चूक आहे. २. स्त्री आणि पुरुष अशी दोन लिंग तयार होण्यात पुनरुत्पादन आणि झालेली संतती पुनरुत्पादनाच्या वयाला येणं यात फायदा होतो, त्यामुळे अशा प्रकारचं विभाजन झालेली जनता टिकून राहिली. ३. गेल्या काही दशकांमधे, विशेषतः दुसर्‍या महायुद्धानंतर माणसाच्या बाबतीत सामाजिक परिस्थिती फारच बदलल्यामुळे सगळ्या नैसर्गिक गोष्टींचं तस्संच्या तस्सं पालन करणं हे माणसाच्या प्रगतीमधे खोडा घालण्यासारखं झालेलं आहे. . . . ही यादी बरीच वाढवता येईल आणि यातल्या प्रत्येक मुद्द्यावर लोकांनी मोठमोठी पुस्तकं लिहीलेली आहे. पण आत्ता वेळ नाही, तेवढी आवश्यकताही नसावी. संक्षींचाच एक फार प्रसिद्ध न झालेला पण पोटेंशियल असणारा विनोदः लाघवी मूल काय आणि काय काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

थोडे फार वाचन

राही
Mon, 05/13/2013 - 22:13 नवीन
या विषयावर थोडेफार वाचन झालेले आहे. लेन्स्की वि.श्लाफ्ली वाचले आहे. मला वाटते माझ्या प्रतिसादातून आपला वरील मुद्दा क्र. तीनच डोकावतो आहे. बाकी सहमत.
  • Log in or register to post comments

WPTA

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/13/2013 - 22:18 नवीन
WPTA (wise people think alike) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

मुळात ही पोस्ट मानवी देह, रजोनिवृती, संप्रेरकं, कामेष्णा,

संजय क्षीरसागर
Tue, 05/14/2013 - 00:17 नवीन
स्त्री-पुरूष संबंध आणि उत्तररंगातल्या कौटुंबिक संबंधांवर त्यांचा होणारा परिणाम याविषयी आहे. अर्थात भारंभार अनावश्यक माहितीनं इतका वैचारिक गोंधळ झालेला असतो की नेमकं काय चाललंय, कशासाठी चाललंय आणि काय साधायचंय ते लक्षात येणं असंभव.
  • Log in or register to post comments

डिसॅग्री.

अर्धवटराव
Tue, 05/14/2013 - 02:59 नवीन
>>अर्थात भारंभार अनावश्यक माहितीनं इतका वैचारिक गोंधळ झालेला असतो की नेमकं काय चाललंय, कशासाठी चाललंय आणि काय साधायचंय ते लक्षात येणं असंभव. -- भारंभार माहिती आवश्यक असते. कन्क्ल्युजन निघण्यापुर्वी वैचारीक गोंधळ देखील आवश्यक असतो. विचार प्रकियेचं ते आवश्यक अंग आहे. कन्क्युजनची घाई कशाला? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अधिक माहिती

आजानुकर्ण
Tue, 05/14/2013 - 16:47 नवीन
गैरसमज आणि तथ्ये या दुव्याचा लाभ आपण घेणे अत्यंत आवश्यक आहे. सत्याची जाणीव कधीही झाली तरी चालू शकते असे आमचे प्रामाणिक मत आहे. http://sogc.org/publications/female-orgasms-myths-and-facts/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आमचा अनुभवच इतका जबरदस्त आहे की त्याचे दुवे दिले जातात

संजय क्षीरसागर
Tue, 05/14/2013 - 17:30 नवीन
तस्मात आपण निश्चिंत असावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अहंकार

आजानुकर्ण
Tue, 05/14/2013 - 17:52 नवीन
निसर्गदत्त महाराज अहंकाराबाबत काही सल्ला देतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

देतात ना!

संजय क्षीरसागर
Tue, 05/14/2013 - 18:18 नवीन
ते म्हणतात अहंकार हा तुमचा भ्रम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

बरोब्बर, आजानुकर्ण चा अहंकार

प्यारे१
Tue, 05/14/2013 - 18:23 नवीन
बरोब्बर, आजानुकर्ण चा अहंकार हा संजयजींचा भ्रम आहे मात्र व्यत्यास सत्य होईलच असे नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हा हा

आजानुकर्ण
Tue, 05/14/2013 - 18:59 नवीन
उपरनिर्दिष्ट प्रतिसादक प्रतिसाद देताना विभ्रम आणि भ्रम यामध्ये वारंवार गल्लत करताना दिसत आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गल्लत

राही
Tue, 05/14/2013 - 19:58 नवीन
काही तरी गल्लत आहे. इन्फर्टाइल असणे आणि फ्रिजिड असणे हे दोन वेगवेगळे दोष अथवा विकार असावेत. फ्रिजिडिटी दूर झाली तरी इन्फर्टाइल अवस्था जैसे थे राहिली तर गर्भधारणा होऊ शकणार नाही. येथे इन्फर्टाइल चा अर्थ वंध्य असा घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

छान.

ऋषिकेश
Tue, 05/14/2013 - 17:31 नवीन
छान. उपाययोजना व्यवहार्य आहेत.
  • Log in or register to post comments

god has linked procreation with recreation.

सुबोध खरे
Tue, 05/14/2013 - 19:07 नवीन
याचा अर्थ असा आहे कि जर माणसाला संभोगाचे काम हे फक्त शुक्राणू दाना पुरते असते तर संभोगानंतर पुरुष आणी स्त्री आपापल्या वाटेने गेले असते ( जसे मांजर, वाघ कुत्रा इ जनावरात होते.) तरुणपणात संभोगेच्छा हि पुरुष स्त्री च्या बरोबर राहण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. सहवासाने प्रेम निर्माण होते आणी त्यानंतर समागमाचे प्रमाण कमी झाले तरी स्त्री पुरुष एकत्र राहतात. वंध्यत्व यात काम करताना ज्यावेळी स्त्रीबिजाची वाढ पूर्ण होते(OVULATION) तेंव्हा त्या जोडप्याला संबंध ठेवण्यास सांगण्यात येते. कारण स्त्रीबीज फक्त चोवीस तास फलनशील असते या काळात संबंध आला नाही तर एक पूर्ण महिना फुकट जातो. ( वर्षात गर्भ धारणा होण्यासाठी फक्त १२ दिवस संधी असते. एकदाच भेटले आणी गरोदर राहिले हे सिनेमापुर्ते ठीक आहे). यासाठी त्या जोडप्याला स्त्री बीज पक्व होण्याच्या अगोदरचे दिवस संबंध न ठेवण्यास सांगितले जाते आणी ते पक्व झाल्यादिवशी आणी दुसर्या दिवशी संबंध ठेवण्यास सांगितले जाते. असे तीन चार महिने केल्यावर त्या जोडप्याची सम्भोगातील मजा कमी होऊन ते एक काम म्हणून व्हायला लागते यासाठी त्यांना समुपदेशन करून त्यांच्यातील आकर्षण कायम ठेवायला सांगायला लागते. कारण जर संभोगाचा मूळ हेतू हा गर्भधारणा असेल तर ती स्त्री गरोदर झाल्यावर संबंध ठेवण्याचे कारण उरणार नाही आणी मग त्या युगुलातील परस्पर संबंधावर परिणाम होतो यास्तव हे सर्व समुपदेशन करावे लागते. आता राहिला दुसरा प्रश्न-- मार्जार कुळातील काही प्राण्यात म्हणजे मांजर, चित्ता आणी बिबळ्या या प्राण्यात स्त्री बीज पक्व होण्याची क्रिया हि संभोगाच्या वेळेस होते त्यामुळे या प्राण्यांच्या माद्या संबंधासाठी तयार नसतात. त्यांच्यात नर त्यंच्यावर संबंधासाठी जबरदस्तीच करतात आणी या संबंधाच्या वेळी होणार्या वेदनेमुळे स्त्री बीज पक्व होते आणी गर्भधारणा होते. याकारणास्तव या प्राण्यांचे प्रणयाराधन अतिशय वादळी आणी नादमय(!) असते बोके दिवसेंदिवस मांजरीच्या मागे घोगरा आवाज काढीत फिरत असतात आणी मांजर त्याला दाद देत नाही. यातून त्यांचे भांडण चालू असते. संधी मिळेल तेंव्हा बोके जबरदस्तीने संभोग करतात आणी त्यातून गर्भधारणा होते. यानंतर बोका आणी मांजरी परत भेटत नाहीत. त्यामुळे काही प्राण्यात सम्भोगामुळे संप्रेरकाचे प्रमाण एकदम उच्चीला जाऊन गर्भधारणा होते. मानवात सम्भोगामुळे संप्रेरके वाढतात काय हे मला नक्की माहित नाही. तिसरा मुद्दा हा आहे कि स्त्री बीज पक्व होण्यासाठी दोन तर्हा वापरल्या जातात. एक म्हणजे बाहेरून संप्रेरकाचे इंजेक्शन देऊन ते प्रमाण वाढवत नेले जाते जेणेकरून अशा पातळीवर आणले जाते कि बीजांड कोषात स्त्री बीज पक्व होईल.(RECEPTOR UPREGULATION ) याउलट जेंव्हा जास्तीत जास्त प्रमाणात संप्रेरके देऊनही जर स्त्री बीज पक्व होत नसेल तर सर्व औषधे बंद केली जातात आणी तीन महिने काहीच दिले जात नाही (RECEPTOR DOWNREGULATION) यामुळे शरीरातील संप्रेरके अगदी कमी होतात आणी शरीर अगदी कमी संप्रेरकांना प्रतिसाद देऊ लागतात. दोन्ही तर्हेने काम होते हे सिद्ध झाले आहे. एक महिन्यापूर्वी (एप्रिल मध्ये) माझ्याकडे एक पस्तिशीच्या स्त्री रुग्ण आल्या होत्या त्यांना चार महीने पाळी आली नव्हती. त्यांनी IVF (टेस्ट ट्यूब बेबी) चे तीन प्रयत्न केले त्यात गर्भधारणा झाली पण दुर्दैवाने गर्भपात झाला होता. यामुळे अतिशय निराश होऊन त्यांनी मुलाची आशा सोडून दिली होती आणि वंध्यत्वावरील उपचार पण सोडून दिले होते. त्यांच्या यजमानांचे वय ४४ असल्याने त्यांना दत्तक देण्यास नकार मिळाला होता( याचे कारण आणि कायदा काय आहे हे माहित नाही). त्या चक्कर येते म्हणून माझ्याकडे सोनोग्राफी साठी आल्या होत्या आणी काय आश्चर्य त्या चार महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना मुलाचे हात पाय हृदय इ सर्व दाखवले तेंव्हा त्यांचा विश्वास बसला. त्यांना आणी त्यांच्या यजमानांना अश्रू आवरत नव्हते. ते परत परत मला धन्यवाद देत होते( ?).मी त्यांना हेच सांगत होतो कि निसर्ग म्हणा किंवा देव म्हणा जे करू शकते ते कितीही निष्णात डॉक्टर करू शकत नाही. मला धन्यवाद देण्याचे काहीच कारण नाही. अशी बरीच उदाहरणे( का चमत्कार) मी स्वतः माझ्या व्यवसायात पाहिली आहेत. यामुळे मी स्वतः साधारणपणे कोणाच्या श्रद्धेवर( अंधश्रद्धेवर) टीका करीत नाही.
  • Log in or register to post comments

उत्तम

आजानुकर्ण
Tue, 05/14/2013 - 19:35 नवीन
शास्त्रीय माहिती देणारा प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहवासाने प्रेम निर्माण होते आणि

संजय क्षीरसागर
Tue, 05/14/2013 - 19:57 नवीन
त्यानंतर समागमाचे प्रमाण कमी झाले तरी स्त्री पुरुष एकत्र राहतात.
सुबोधजी या पेक्षाही प्रेमाला वेगळा अर्थ आहे. एकमेकांचा सहवास, एकमेकांना हात देत जगणं, मुलं, त्यांचं संगोपन अश्या अनेकानेक प्रसंगातून दोघांचे सूर जमत जातात. आकर्षण केवळ शारीरिक असेल तर प्रणय हा विवाहाचा केंद्रबिंदू ठरेल पण तुम्ही आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे :
मानवी बालपण हे प्राणीमात्रात सर्वात लांब म्हणजे जवळ जवळ पंधरा ते अठरा वर्षे असते या काळात एकट्या स्त्री ला बालकाचे पूर्ण पालन पोषण हे अशक्य आहे म्हणून वर लिहिलेले वाक्य बरोबर आहे असे वाटते
त्यामुळेच तर विवाह हे अत्यंत बहुपेडी नातं आहे आणि एकमेकांतला अनुबंध हे उत्तररंगातल्या रम्य जीवनाचा (जो या लेखनाचा विषयी आहे) महत्त्वपूर्ण आधार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अप्रतिम!

साती
Tue, 05/14/2013 - 20:29 नवीन
लेख आणि प्रतिसाद दोन्ही उत्तम. डॉक्टरसाहेब तुमचे या लेखमालेबाद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा