Skip to main content

स्थानिक स्वराज्य संस्था कर ( एलबीटी )

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 14/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा कर लागू होताना इतका धुरळा उडालेला मी तर कदाचित पाहिल्यांदाच पहात आहे. औरंगजेबाने जिझीया कर लावला तेव्हा कदाचित असे झाले असण्याची शक्यता आहे. (अर्थात दोघांची तुलना हा उद्देश येथे नाही). स्थानिक स्वराज्य संस्था कर ( एलबीटी ) म्हणजे काय ? पुर्वी कोणत्याही नगरपालिका / महानगरपालिका हद्दीत प्रवेश करतांना जकात भरावा लागत असे. उदाहरणार्थ मी एक संगणक विक्रेता आहे आणी मी जर रु. २५,०००० किमतीचा संगणक मुंबईत विकत घेतला व तो ठाण्यात नेला तर मला त्या किमतीवर ५ ट्क्के जकात द्यावी लागत असे. म्हणजे माझी खरेदी किंमत रु. २६,२५०.०० झाली. आता मला जकात भरावी लागणार नाही मात्र एलबीटी भरावा लागेल. तो कदाचित २ - ३.५० % च्या आसपास असेल. म्हणजेच माझी एकूण खरेदी किंमत रु. २५,५०० ते रु. २५,८५० च्या दरम्यान होईल. म्हणजे ही किंमत जकात भरुन खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा साधारण ५०० रुपयांनी कमीच झाली. मग मी (व्यापारी) एलबीटी भरायला का रडतो ? जकात लागू असतांना : १. मी रु. २५,०००० चा संगणक रु. १५,००० ला खरेदी केल्याचे खोटे बिल नाक्यावर दाखवून वरच्या १०,००० किमतीवरील जकात वाचवू शकतो. २. जकात नाक्यावरील कामगाराला ( हापीसरला) चिरिमीरी देऊन ( याची पण टक्केवारी ठरलेली असते बरकां !) माल तसाच नेऊ शकतो. ३. मी खरेदी केलेली वस्तू जकात नाक्याच्या तपासणीत पकडली न गेल्यास वरील दोन्ही उपायांचा अवलंब न करता जकात वाचवू शकतो. ४. जकात चुकवून माल नेताना पकडला गेलो तर एकूण जकात किमतीच्या ५ पट दंड आकारला जात असे. एलबीटी लागू झाल्यावर : १. मला जकात नाक्यावर थांबावे लागणार नाही. २. माझ्या माल वाहतुकदाराचा वेळ व डिझेल वाचणार. ३. माझ्या सेल्स रजिस्टरमधे जी किंमत नोंदलेली असेल त्या रकमेवर कर भरावा लागेल. (म्हणजे जास्तीत जास्त प्रामाणिकपणा दाखविणे आले.) ४. मला दर महिना हिशोब ठेऊन प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत एलबीटी भरावा लागेल. ५. तो चुकविण्याचा प्रयत्न केल्यास दंड होण्याची शक्यता. ६. महापालिका अधिकार्‍यांना माझे हिशेब तपासण्याची मुभा. ( म्हणजे हा एलबीटी बाबू माजी लुंगी बनियान देखील काढून घेणार वर कर भरणे चुकणारच नाही). मनपा / त्यांचे कर्मचारी का रडतात ? १. एलबीटीचे दर जकातपेक्षा कमी असल्यामुळे उत्पन्न कमी होणार. २. बहुसंख्य जकात नाक्यावरचे काम करणारे कर्मचारी उन्हातान्हात काम करतात, घाम गाळतात व घामाचा पैसा कमावितात. त्यांचे काम कमी झाल्यावर सुर्यप्रकाशापासून मिळणारे विटामिन डी व विटामिन एम (मनी) कमी होणार. ३. जकात नाक्यावरील दलालांचे काम बंद होणार तर सध्या अशी विन-विन सिच्युएशन आहे !!!!!!!

वाचने 6144
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

म्हणजे एलबीटी फक्त त्यांनाच लागू आहे की जे अन्यथा जकात भरुन व्यवसाय करत होते.बाकीच्यांचा एलबीटी शी काही संबंध नाही. बरोबर?

जकात आणि एलबीटी जवळजवळ सर्वच वस्तूंवर लागू होता / आहे. मात्र तो कायदेशीर आणि बेकायदेशीर मार्गाने चुकविता येत होता. एलबीटी मधून सुटका नाही.

आता पर्यंत वाचलेल्या बातम्यांवरुन असे वाटते की व्यापार्‍यांचा विरोध एल.बी.टी. ला नसुन त्या मधिल तरतुदिंना आहे. उदा. वेगळे चलन, वेगळा भरणा वेगळे विवरणपत्र आणि अजुन एक अ‍ॅसेस्मेंट (मराठी शब्द?). तसेच अधिकार्‍यांना आस्थापनेत शिरुन तपासणी करण्याचा अधिकार. आणि मग त्यांना द्यावे लागणारे तडजोड शुल्क. आणि मग या त्रासातुन वाचण्यासाठी हप्ते बांधणी. शेजारी गुजरात मधे म्हणे व्हॅट मधेच काही टक्के वाढवले आहेत तसेच महाराष्ट्राने देखील करावे असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.शेवटी त्यांना हा कर खरेदीदाराकडुन वसुल करायचा आहे. त्या साठी अजुन एक प्रोसिजर का वाढवायची? जेव्हा व्हॅट कायदा आणला होता तेव्हा जकात रद्द करु असे शासनाने आश्र्वासन देखील दिले होते असे म्हणतात. अर्थात मिपातज्ञ यावर प्रकाश टाकतिलच.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कर तर भरावाच लागणार आहे मात्र त्यासाठी वेगळ्या नोंदी ठेवणे, अधिकार्‍यांशी तडजोड करणे यात बराच पैसा व श्रम खर्च होतात. मात्र जकातनाक्यावरील सेटिंग्स मधून करोडो रुपयाचा अपहार होत होता व त्याचा फायदा व्यापारी व मनपा कर्मचार्‍यांना होत होता हे सत्य आहे.

मी सेल्स रजिस्टर वर कमी किंमत दाखवली तर ?

In reply to by इरसाल

मी जो सेल्स रजिस्टर चा उल्लेख केला आहे तो पर्चेस रजिस्टर असा वाचावा. जेव्हा मी पक्के बिल बनवितो तेव्हा त्यावर माझा आणि मी ज्याला माल विकतो त्या कंपनीचा VAT NO. नमूद करतो. अशीच नोंद मी जेथून माल घेतला तो व्यापारी देखील करतो त्यामुळे ह्यात चोरी पकडली जाते. उदा. मी म्हणजे "ब" याने "अ" कडून रु. १०,००० किमतीचा माल घेतला. "अ" त्याच्या रजिस्टरमधे मी तो माल "ब" ला रु. १०,००० ला विकला अशी नोंद करतो. मी म्हणजे "ब" जेव्हा हा माल समोर विकतो तेव्हा अशाच प्रकारची नोंद करतो.

मग ठीक आहे.

शिवसेना भाजप सरकार असतानाच्या काळात नगरपालिका क्षेत्रांतून जकात रद्द केली गेली. त्याची भरपाई सरकारने ग्रॅण्टच्या स्वरूपात देऊन करण्याचे ठरवले. त्या वेळी विक्रीकरात ३ टक्क्यांची वाढ केली गेली. १० टक्क्यांऐवजी १३ टक्के असा विक्रीकर झाला. (हा त्या काळी देशात सर्वाधिक विक्रीकर होता). अशीच व्यवस्था महानगरपालिकांच्या बाबतीत करता आली असती. (हेच व्यापार्‍यांचे म्हणणे आहे बहुधा). या व्यवस्थेत अडचण अशी होती की जकातीचे उत्पन्न नगरपालिका थेट वसूल करीत होत्या त्या ऐवजी आता राज्यशासनाकडून रक्कम मिळणार होती. ती वेळेवर मिळत नाही वगैरे तक्रारी नगरपालिका करीत होत्या. एलबीटी सदृश सेस नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १९९६ पासून लागू आहे. त्याला विरोध झाल्याचे ऐकलेले नाही. व्हॅटद्वारा वसुली आणि एलबीटी वसुली यात फरक फक्त रक्कम थेट महानगरपालिकेला मिळण्याचाच आहे. सर्वोच्च न्यायालयाने एलबीटीवर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तपासणी करणे वगैरे अधिकारांचा उगीच बाऊ केला जात आहे. सर्विस टॅक्सचे पूर्ण कामकाज "एक्साइज" नावाच्या ड्रॅकोनियन दिपार्टमेंटद्वारा चालते. परंतु सर्विस टॅक्सखाली येणार्‍या सेवादात्यांना ते फारसा त्रास देत नाहीत. अमुक उलाढालीच्या वर व्यवहार करणार्‍यांनाच एलबीटी लागू करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात तरी एलबीटी न भरता माल शहरात येऊ शकेल. (पूर्वी अशी मर्यादा नसल्याने प्रत्येक रुपयावर जकात भरावी लागे). बाकी जकात नाक्यावरील रांगा, जळणारे इंधन वगैरे आनुषंगिक फायदे आहेतच.

In reply to by नितिन थत्ते

१. विक्रीकर हा संपूर्ण राज्यासाठी लागू असल्याने सर्व पालिका / महानगरपालिका क्षेत्रात त्याचा दर समान असतो. २. व्हॅटद्वारा वसुली आणि एलबीटी वसुली यात फरक फक्त रक्कम थेट महानगरपालिकेला मिळण्याचाच आहे - हे बरोबर आहे. ३.. तपासणी करणे वगैरे अधिकारांचा उगीच बाऊ केला जात आहे. - हे संपूर्णपणे बरोबर नाही. एलबीटीची तपासणी वेगळ्या खात्याकडून होईल. ( कदाचित मनपा कडून) बर्‍याचदा ही समन्स पोस्टाने न येता डिपार्टमेंच्या माणसाच्या हस्ते पाठविले जाते. हा शिपाईदेखील १००-२०० रु. चे चायपाणी केल्याशिवाय जात नाही. अहो लग्न करुन एखादी व्यक्ती मुंबई / ठाण्यात आली तर त्याच्या गाडीतील आहेराच्या वस्तू देखील जकात नाक्यावर अडविल्या जायच्या. लग्नपत्रिका दाखवून देखील चहापाणी दिल्याशिवाय सुटका नसायची. चांगली गोष्ट एवढीच की ते स्त्री ला वस्तू समजत नाहित. नाहि तर शहराबाहेरील वधू आणल्याबद्दल तीच्यावरही जकात लावायला कमी केले नसते.

In reply to by धर्मराजमुटके

आहेराच्या वस्तूवर जकात कर लावणे चूक आहे का? जालावर एका ठिकाणी याहून सरकलेली सिच्युएशन वाचली. तुम्ही मुंबईहून ठाण्याला (किंवा उलट) लग्नाला जात आहात. तर तुमच्या अंगावरच्या दागिन्यांवर जकात भरा अशी मागणी म्हणे केली जाऊ शकेल. तपासणी करणे याचा बाऊ केला जात आहे असे म्हणण्याचे कारण व्यापारी म्हणतात तसे व्हॅट वाढवून रक्कम घ्यायची असेल तर त्यातही या सर्व गोष्टी होऊ शकतातच.

In reply to by वेताळ

असे अजून तरी वाचनात आलेले नाही. जे व्यापारी थेट ग्राहकांना (कन्जुमर सेगमेंट) यांना माल विकतात त्यांना स्टॉक करावा लागतो. मात्र कॉर्पोरेट डिल्स बहुधा back to back होतात. म्हणजे जेव्हा मला ऑर्डर मिळेल तेव्हाच मी माल विकत घेतो व समोरच्याला विकतो.

In reply to by नितिन थत्ते

+१ माझ्यामते ही फक्त सांगायची कारणे आहेत. त्यांचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असावा व त्याचा उद्देशही. या संबंधी आजचा लोकसत्तामधील लेख ग्राह्य आहे

In reply to by ऋषिकेश

लेख वाचला पण एकंदरीतच संपादकांचा सुर सरकारच्या नाकर्तेपणाचे दु:ख होण्यापे़क्षा न्यायालये बलवान होत आहेत असा वाटला.

In reply to by धर्मराजमुटके

संपादकांचा सुर या ऐवजी लेखकाचा सूर असे वाचावे.

रक्कम थेट महानगरपालिकेला मिळण्याचाच आहे.
एकदम बरोब्बर! खरं तर हे सोडता एकही मुद्दा नाही (आणि व्यापारी त्याला राजी होते) पण कॉर्पोरेशनच्या लोकांची वरकमाई जाणार आणि राज्यसरकारला स्वतःच काम टाळायचंय. शिवाय कॉर्पोरेशनला दरवेळी राज्यसरकारकडे हात पसरायला लागणार. त्यात आपल्याकडे गावत एक पक्ष तर राज्यात दुसरा, तिथे परत राजकारण. थोडक्यात भारत हा एक मूर्ख आणि अतीभ्रष्ट राज्यकर्त्यांचा देश आहे. त्यांना कोणतीही गोष्ट सोपी व्हायला नको आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्यापार्‍यांना सहमती दर्शवून सरकारचा डाव हाणून पाडा.

पण व्यापारि सुद्धा सरळ नाहीत्,काही व्यापारी बन्द चा गैर फायदा उठवत जास्त किमतीला माल विकत आहेत आणि भाववाढ करुन वाह्त्या गन्गेत आपले हात धुवुन घेत आहेत.

भरमसाठ नफा कमवत असल्यामुळे त्याचा विरोध नक्कीच आहे. सर्वसाधारण एक तोळा म्हणजे १० ग्रॅम सोनेचा दागिना विकताना ते २२ पासुन २० कॅरेट सोन्यामध्ये घडवतात म्हणजे १०ग्रॅम सोने ८.५ ते ९ ग्रॅम ग्राहकाला मिळते वर व्हॅट व मजुरी वेगळी घेतली जाते.म्हणजे तोळ्या पाठिमागे ३००० ते ३५०० रुपये सोनाराला (२८००० भाव पकडुन)मिळतात. हे सगळे आता उघड सरकारला सांगावे लागणार.

In reply to by वेताळ

सोन्याचा भाव चोख(२४कॅ), २३कॅ, २२कॅ अशा शुद्धतेवर ठरतो. सोनार २३ कॅरेटचा दागिना विकताना २३कॅरेटचेच पैसे घेतो. त्यामुळे त्यात फसवणुक नाही होत. सोनाराचा नफा होतो तो मजुरी व दागिने मोडताना येणार्‍या घटीमुळे.

भ्रष्ट राजा, भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट व्यापारी आणि भ्रष्ट प्रजा. आणखी वेगळे काय होणार ?

गरीब जनता कशी काय 'भ्रष्ट' ती या झून्डशाहीपुढे हतबल आहे.