✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हातावर हात

व
वेल्लाभट यांनी
Fri, 05/03/2013 - 14:31  ·  लेख
लेख
सरबजीत. सोडला म्हणायचं की सुटला म्हणायचं ते कळत नाही. गेली अनेक वर्ष काहीही चूक नसताना तो (ना)पाक हैवानांचे अत्याचार सहन करत होता. आपण कल्पनाही करू शकत नाही की त्याच्यावर काय प्रसंग ओढवले असतील. पाकांनी त्याला मृत्यू दिला म्हणजे एक प्रकारे 'सोडला'च. कारण आणखी असे किती महिने किती वर्ष त्यावर अत्याचार होत राहिले असते याचा नेम नाही. आणि मेला, म्हणून तो सुटलाच. एकीकडे अत्याचार सहन करायचे आणि दुसरीकडे आपला देश आपल्यासाठी, आपल्याबरोबर इथे अडकलेल्या ५४ पेक्षा जास्त युद्धकैद्यांसाठी काहीही.... करत नाही, या गोष्टीपायी मनस्ताप भोगायचा; यापेक्षा मरण बेहत्तर, असा त्यानेही विचार केला असेल. युगं लोटली, पण अजूनही आपली अवस्था एखाद्या 'उंदराला घाबरणा-या मांजरीसारखी' आहे. (इथे ४ वेळेला वाघासारखी असं लिहून खोडलं मी; ही उपमा डिझर्वच करत नाही आपण.) आज जवान मारले, उद्या घुसखोरी, परवा काय आरोपच केले उलटे, मग आपले '#क्के' जरा काही बोलले की अमेरिकेच्या पदरामागे लपून आपल्याकडे बोट केलं;.... चीन चा उल्लेख नाही करत, कारण तो एक वेगळा विषय आहे. स्वतंत्र. आपले मिलिटरी वाले मधे एक दोन वेळा म्हणाले न्यूज चॅनल वर, की आम्हला पाकिस्तान चं वाळवंट करायला १० मिनिटंही बास होतील. ते ऐकून काही काळ खूप चेव आला. रस्त्यावर चालतानाही चाल नकळत जलद व्हायची; जणू एखाद्या 'त्यांच्यातल्याला' मारायला चाललो आहे. पण तो चेव लवकरंच मावळला. अहो; वर्षानुवर्ष जे झालं नाही, ते आता का होईल? आताही तेच होणार. तुम्ही मारा लाथेवर लाथ आम्ही ठेवू हातावर हात.. आता बास ! असं म्हणून शब्दशः अखिल भारतीय 'उठाव' जर झाला, लोकंच्या लोकं रस्त्यावर बसली, स्वप्नवत काही झालं, तरंच आशा... पण नाही. थिंक रियल. धिस इज इंडिया.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16477 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

काय बोलणार?

मुक्त विहारि
Fri, 05/03/2013 - 14:44 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

दु:ख वाटतंय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/03/2013 - 14:54 नवीन
शहीद सरबजीतला सोडवावं म्हणून बहीण दलबीरनं जो लढा दिला त्याला तोड नाही. सरबजीतनं नकळतपणे भारतीय सीमा ओलांडली आणि आजचा या दिवसाला सामोरं जावं लागलं आहे. सरबजीतला तुरुंगात दिला जाणारा त्रास, खोट्या साक्षी, पाकिस्तान कोर्टानं बाजू मांडण्याची न दिलेली संधी आणि भारताची शेपूट घालू भूमिका. अशी असंख्य कारणं सांगता येतील. आज सकाळी दुरदर्शवर सरबजीतबद्दल एक कार्यक्रम चालू होता त्यात त्याने कुंटुंबाला जी पत्रं लिहिली त्यातला आपल्या मुलींना पालक म्हणून जी पत्र लिहिली ती डोळे भरुन यावी अशीच होती. मूलीनं इंग्रजी विषयात विशेष प्राविण्य मिळवावं संगणकाचं शिक्षण घ्यावं आणि मुलांनी कसं आज्ञाधारक असावं. असो. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सरबजीतच्या जिवंतपणी त्याला

गवि
Fri, 05/03/2013 - 14:54 नवीन
सरबजीतच्या जिवंतपणी त्याला इकडे आणण्यासाठी आपला देश काही करु शकला नाही. त्याच्या बहिणीची असहाय्यता कल्पनेपलीकडली होती. विशेषतः तो मृत्यूशी झगडत असण्याच्या काळात. दोनतीन दिवसांपूर्वी लोकसत्ताच्या अग्रलेखात उल्लेख आल्याप्रमाणे सरबजीत हा भारताने पाठवलेला हेर नव्हताच असं पुराव्यानिशी सिद्ध करता येणार नाही, पण तो हेर असता तरी भारताने आपल्या माणसाला वाचवण्यासाठी शर्थ करायला हवी होती. तो चुकून तिकडे कसा गेला वगैरे हे आता सिद्ध होणं कठीणच होतं. किंवा पटण्यासारखा घटनाक्रम मिळणं अशक्यच. त्यामुळे त्याची अटक, शिक्षा वगैरे अपरिहार्यच होतं असं वाटतं. आता प्रश्न होता केवळ त्याला भारतात आणण्याचा. यामधे तो निष्पाप नागरिक आहे म्हणून त्याला वाचवणं आणि भारतात परत आणणं असा उद्देश ठेवून सरकारने प्रयत्न करायला हवे होते असं म्हणावं तर आता घडलेली घटना म्हणजे एका निष्पाप व्यक्तीचा दुर्दैवी बळी अश्या स्वरुपाची आहे. अशा वेळी स्टेट ऑनर, सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार हा भाग समजण्याच्या पलीकडचा आहे. प्रसंगोचित गांभीर्याने अंत्यसंस्कार करणे हे वेगळं -- आणि त्याला शहीद / नॅशनल हीरोज यांना देण्यात येणारा प्रतीकात्मक अंत्यसंस्कार देणं हे वेगळं.. यामागे सरकारची अपराधी भावना आहे का? कोणता नैतिक मुद्दा आहे? इथे एखाद्याचा मृत्यू किंवा त्याविषयी पर्वा नसणे असा रोख नाहीये हे कळकळीने सांगू इच्छितो.. पण तो भारताचा शहीद आहे अशा रितीने अधिकचा सन्मान म्हणजे तो भारताच्या कामासाठी तिकडे पाठवला गेला होता असं जगभरात समजलं जाईल का?
  • Log in or register to post comments

+१

मी_आहे_ना
Fri, 05/03/2013 - 20:09 नवीन
गवि, अगदी मनातलं बोललात. निष्पाप माणूस गेल्याबद्दल भारतीय म्हणून दु:ख आहेच... पण 'शहीद', शिवाय पंजाब सरकारकडून १ कोटी, केंद्राकडून २५ लाख ..कोणत्याही जवानालातरी शहीद झाल्याबद्दल मिळालेत का आज पर्यंत? (असल्यास माहितीत भर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पाकड्यांना बाँब टाकून उध्वस्त

विसोबा खेचर
Fri, 05/03/2013 - 15:13 नवीन
पाकड्यांना बाँब टाकून उध्वस्त केले पाहिजेत.. असो.. छोटेखानी लेख छान...
  • Log in or register to post comments

घटना निंदनीय नक्कीच!

ऋषिकेश
Fri, 05/03/2013 - 15:42 नवीन
घटना निंदनीय नक्कीच पण दुदैवाने धक्कादायक नाही. जो देश स्वत:च्या नागरीकांनाच रोज मृत्यूपासून वाचवु शकत नाहिये त्या राष्ट्राकडून शत्रु राष्ट्राच्या नागरिकाचा बचाव होईल ही अपेक्षाच बालिश आहे.
अशा वेळी स्टेट ऑनर, सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार हा भाग समजण्याच्या पलीकडचा आहे. प्रसंगोचित गांभीर्याने अंत्यसंस्कार करणे हे वेगळं -- आणि त्याला शहीद / नॅशनल हीरोज यांना देण्यात येणारा प्रतीकात्मक अंत्यसंस्कार देणं हे वेगळं.. यामागे सरकारची अपराधी भावना आहे का? कोणता नैतिक मुद्दा आहे?
+१ केंद्राने २५ लाख, राज्य सरकारने १ कोटी रुपये देण्याचे प्रयोजनही समजले नाही. २३ वर्षे घराबाहेर राहिलेल्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे घरच्यांना अचानक आर्थिक मदत का बरे केली जावी? मग अशी मदत पाकिस्तानात सडणार्‍या इतर हेरांच्या कुटुंबियांना का केली नाही? वगैरे अनेक प्रश्न उभे राहतात बाकी, आतापर्यंत पाकिस्तानने ज्यांना ज्यांना सोडले आहे त्यांनी भारतात येताच "होय आम्ही हेर होतो" हे घोषित केले आहे हे ही नजरेआड करता येत नाही. तेव्हा सरबजित हेर नसेलच असे म्हणता येऊ नये. यापेक्षा अधिक महत्त्वाचे मुद्दे बाजुला ठेऊन, २३ वर्षांनंतर घडलेली ही घटना पाकिस्तानशी संबंध तोडून टाकायचे निमित्त ठरू नये असेही वाटते. अवांतरः आजच भारतातही अशीच घटना (पाकिस्तानी कैद्याला मारहाण) घडल्याचे वाचले. आपल्यात नी त्यांच्यात काय फरक राहिला? :(
  • Log in or register to post comments

आपण इंडियन दिसता..

मुक्त विहारि
Fri, 05/03/2013 - 19:50 नवीन
१. बाकी, आतापर्यंत पाकिस्तानने ज्यांना ज्यांना सोडले आहे त्यांनी भारतात येताच "होय आम्ही हेर होतो" हे घोषित केले आहे हे ही नजरेआड करता येत नाही. हे केंव्हा झाले? काही उदाहरणे देवू शकाल का? २.अवांतरः आजच भारतातही अशीच घटना (पाकिस्तानी कैद्याला मारहाण) घडल्याचे वाचले. आपल्यात नी त्यांच्यात काय फरक राहिला? एकाने दगड मारला म्हणून दुसर्‍याने पण मारला ... कारण न्याय द्यायला कुणीच तयार नाही...यात दुसृयाचे काय चुकले?. युनोने काश्मिर प्रश्नाची कशी वाट लावली ते दिसत आहे ना? असो आनंद आहे. असेच इंडियन रहा. आम्ही हिंदुस्थानी आहोत आनि तसेच राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

अवांतरः आजच भारतातही अशीच

वेल्लाभट
Fri, 05/03/2013 - 16:12 नवीन
अवांतरः आजच भारतातही अशीच घटना (पाकिस्तानी कैद्याला मारहाण) घडल्याचे वाचले. आपल्यात नी त्यांच्यात काय फरक राहिला?
फरक का रहावा? का ठेवावा फरक? आणि तो ठेवला म्हणून काय फरक पडणार आहे?
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद ऋच्या शेवटच्या

गवि
Fri, 05/03/2013 - 16:32 नवीन
हा प्रतिसाद ऋच्या शेवटच्या वाक्याला उद्देशून आहे हे खरं. त्यामुळे तोच याला उत्तर देऊ शकेल. माझ्या मूळ प्रतिसादात मी जे म्हटलंय ते थोडंसं वेगळं आहे. सरबजीतविषयी संपूर्ण सहानुभूति, एक नागरिक म्हणून असल्यानंतरही स्टेट ऑनर , शहीदाचा दर्जा इत्यादि देण्यामागे कोणतं कारण असावं? हे महत्वाचं आहे, कारण दुर्दैवी, भरकटल्याने पाकिस्तानात पोचलेला, अडकलेला, बळी पडलेला भारतीय नागरिक या दृष्टीने असलेली भावना वेगळी आणि स्टेट ऑनर, शहीद म्हणून ओळखणे, खास औपचारिक सन्मान देणे यामधे बराच फरक आहे. मी आपल्याच आधीच्या आणि नंतरच्या मनोवृत्तीतल्या फरकाविषयी बोलतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

फरक का रहावा? का ठेवावा फरक?

ऋषिकेश
Fri, 05/03/2013 - 16:54 नवीन
फरक का रहावा? का ठेवावा फरक? आणि तो ठेवला म्हणून काय फरक पडणार आहे?
अश्या बाबतीत भारताने पाकिस्तानसारखे असु नये असे मला वाटते. का? कारण भारताने अधोगती करू नये असे मला वाटते. पाकिस्तानने मूर्खपणा केला तर आम्हीही करू किंवा ते नालायकासारखे वागले तर आम्हीही नालायक होऊ असे मत माझ्यासाठी तरी अनाकलनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

या विषयावर बरेच बोलण्यासारखे

गवि
Fri, 05/03/2013 - 17:01 नवीन
या विषयावर बरेच बोलण्यासारखे आहे आणि त्याहून जास्त बोलून झाले आहे. मताशी सहमत आहे. बर्‍याचदा आपण मनात आणलं तर पाकिस्तान सहज "घेऊ" शकतो किंवा पाकिस्तानला "बेचिराख" करु शकतो किंवा "ताब्यात घेऊ शकतो" किंवा तत्सम मतं ऐकण्यात येतात. पण असं करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारुन घेण्यातला मूर्खपणा होईल असंच वाटतं. एक गँग्रीन स्वतःच्या शरीराला शस्त्रक्रियेने अधिकृतरित्या जोडून घेतल्याचा प्रकार होईल. पाकिस्तानला युद्धाच्या मार्गाने नष्ट करुन किंवा "जिंकून" पुढे आपण काय करणार आहोत? अगदी भारताचं कमीतकमी नुकसान होऊनही हे स्थित्यंतर झालं.. समजा भारताला अणुयुद्धाचं कधीही भरुन न येणारं नुकसान सोसावं लागलं नाही.. तरी.. पाकिस्तानला हरवून तरी काय करणार? तेच इतके बिकट स्थितीत आहेत.. आपण अराजक असलेल्या भूप्रदेशात सुराज्य आणत बसणार की तिथल्या टोळ्यांशी लढत राहणार की आपल्या देशावरचा आर्थिक भार हजारपट वाढवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

+१०००

राही
Fri, 05/03/2013 - 23:47 नवीन
खरोखर अगदी मनातले लिहिलेत.अशा भावनाप्रधान धाग्यावर आणि तशाच प्रतिसादांवर लिहिल्याने हाती फारसे काही लागणार नसतेच. गेली कित्येक वर्षे ह्या नागरिकाची पाकिस्तानकडची ओळख आणि भारत सरकारकडची ओळख वेगवेगळी आहे.पाकिस्तान त्याला हेर मानते,त्यांच्या लेखी त्याचे नावही वेगळे आहे,आपले सरकार फारसे काही बोलत नव्हते.आपण आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी ना. कशासाठी कंठरवाने सांगावे की तो आमचा हीरो होता, त्याने देशासाठी महान कार्य केले आहे वगैरे? राजकीय पक्षांनीही जी काय मदत करायची ती शांतपणाने करावी, ढोल वाजवू नयेत.आपल्याच पायावर कुर्‍हाड मारू नये. ही म्हण ग.वि. नी लिहिल्याप्रमाणे पाकिस्तानला 'बेचिराग' 'भस्मसात'वगैरे करण्याच्या आकांक्षेबाबतही खरी आहे. पाकिस्तानला जिंकायचे म्हणजे केवळ त्यांची भूमी ताब्यात घ्यायची का? आणि तिथे असणार्‍या अठरा कोटी लोकांचे काय करायचे? त्यांना बळाने ताब्यात ठेवायचे? आज कश्मीरमध्ये दिसतात तशी कराचीपासून पेशावरपर्यंत सैन्यदले तैनात करायची? आपल्या सीमा ईरान- अफ्घानिस्तानला भिडवून घ्यायच्या? चीनने काराकोरममध्ये राजमार्ग बांधलेलाच आहे. हा प्रदेश भारताने ताब्यात घेतला तर भारताचे महाद्वारच चिन्यांसाठी उघडे झाले की. थेट भारतातच प्रवेश. मग पुन्हा तिथे सैन्य ठेवा. मुख्य म्हणजे हे आक्रमण किंवा पराभव पाकिस्तानी लोकांच्या पचनी पडेल काय? आधीच तिथे आपसात असंतोष आहे, अराजक आहे, त्याचा सारा रोख भारतीय प्रशासनाकडे वळेल त्याचे काय? आम्ही कुणाकुणाशी लढत रहावे आणि का म्हणून? त्या लोकांना आम्ही का म्हणून सुधारत बसावे? (शिवाय लोकसंख्येतले प्रमाण घटण्या-वाढण्याचा आवडता मुद्दा आहेच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>> पाकिस्तानला जिंकायचे

श्रीगुरुजी
Tue, 05/07/2013 - 19:35 नवीन
>>> पाकिस्तानला जिंकायचे म्हणजे केवळ त्यांची भूमी ताब्यात घ्यायची का? आणि तिथे असणार्‍या अठरा कोटी लोकांचे काय करायचे? त्यांना बळाने ताब्यात ठेवायचे? आज कश्मीरमध्ये दिसतात तशी कराचीपासून पेशावरपर्यंत सैन्यदले तैनात करायची? आपल्या सीमा ईरान- अफ्घानिस्तानला भिडवून घ्यायच्या? पाकिस्तान जिंकल्यावर पाकिस्तानची भूमी संपूर्ण ताब्यात घ्यायची गरज नाही. पाकिस्तान जिंकून काय करायचे म्हणजे पाकिस्तान भविष्यात बराच काळ भारताकडे वाकडी नजर करून बघणार नाही अशी व्यवस्था करायची. पाकिस्तानची विध्वंसक क्षेपणास्त्रे, अणुबॉम्ब, विनाशिका, लष्करी विमाने वगैरे इ. ताब्यात घेऊन पाकिस्तानचे लष्करी सामर्थ्य इतके कमी करायचे की बराच काळ पाकिस्तानच्या युद्धाची भीति नष्ट होईल; सीमा ताब्यात घेऊन पाकिस्तानमधून भविष्यात अतिरेकी, सैनिक इ. भारतात घुसण्याचा धोका कमी करण्यासाठी शक्य तिथे भक्कम कुंपण उभारायचे; पाकव्याप्त काश्मिरमधील महत्त्वाची शिखरे ताब्यात घ्यायची; पाकिस्तानने आश्रय दिलेले दाऊद सारखे अतिरेकी ताब्यात घ्यायचे, पाकिस्तानमधील अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे नष्ट करायची आणि पाकिस्तानमधील अणुभट्ट्या उध्वस्त करायच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

+१०००

अर्धवटराव
Tue, 05/07/2013 - 23:49 नवीन
पाकिस्तानची राखरांगोळी करणे वगैरे हेच मुळात अशक्य आहे. हे म्हणजे मर्त्य मानवाने झोंबी ला मारण्याचे प्रयत्न करण्यासारखे आहे. ते अगोदरच मेले आहेत... मरुन जीवंत झालेले आहेत. आपण त्यांच्यावर कितीही आग ओकली तरी आपण संपून जाऊ, पण ये तसेच राहतील. आर्थीक प्रगती वगैरे गोष्टींपासुन पाकिस्तान फार दूरवर भरकटला आहे. त्यामुळे नुकसान होण्यासारखं त्यांच्याकडे फारसं कहिच नाहि. आपलं नेमकं उलट आहे. राहिला मुद्दा सैन्य क्षमतेचा... तर आजघडीला पाक आपल्यापेक्षा कितीतरी जास्त तयारीत आहे. त्यांच्या फौजा सतत युद्धसरावात आहेत. देशाचे संपूर्ण आर्थीक पाठबळ पाठीशी घेणे पाक फौजेला सहज शक्य आहे. तेंव्हा, भारताने कविकल्पनेत पाकशी युद्ध छेडायची स्वप्नं बघु नयेत. (दुर्दैवाने) निर्णायक युद्धं निश्चित होईल/करावं लागेल... पण ते भारताच्या प्रगतीच्या मार्गातला मोठा अडथळा कायमचा दूर करण्याच्या योजनेनुसार करावं लागेल... आणि त्याल अजुन भरपूर वेळ आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

>>> आर्थीक प्रगती वगैरे

श्रीगुरुजी
Wed, 05/08/2013 - 12:51 नवीन
>>> आर्थीक प्रगती वगैरे गोष्टींपासुन पाकिस्तान फार दूरवर भरकटला आहे. त्यामुळे नुकसान होण्यासारखं त्यांच्याकडे फारसं कहिच नाहि. आपलं नेमकं उलट आहे. पाकिस्तानकडे नुकसान होण्यासारखं फारसं काही नसेल कदाचित, पण दुसर्‍या देशांचं नुकसान करण्याइतकं उपद्रवमूल्य त्या देशाकडे भरपूर आहे. म्हणून जर युद्ध झालंच तर तो देश कायमचा ताब्यात न घेता त्याची विध्वसंक शक्ती नष्ट केली तरी भविष्यात बरीच वर्षे उपद्रव होणार नाही. एखाद्या त्रासदायक जंगली जनावराला पकडून पाळण्यापेक्षा किंवा पिंजर्‍यात डांबून ठेवण्यापेक्षा त्याचे दात, नख्या, शेपूट वगैरे तोडून त्याला सोडून दिलं तर तो काहीही उपद्रव देऊ शकत नाही आणि त्याला सांभाळण्याचा देखील ताप नाही. तसेच पाकिस्तानचे करायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

थोडा अभ्यास वाढवा..

मुक्त विहारि
Fri, 05/03/2013 - 19:55 नवीन
खालील पुस्तके नित्यनेमाने वाचा... १. राजा शिव छत्रपती वाचा --- ले. बाबासाहेब पुरंदरे २. दासबोध --- रामदास स्वामी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

वरील प्रतिसाद रुशिकेष ह्यांना आहे..

मुक्त विहारि
Fri, 05/03/2013 - 19:56 नवीन
वरील प्रतिसाद रुशिकेष ह्यांना आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सुचवणी बद्दल आभार

ऋषिकेश
Sat, 05/04/2013 - 06:32 नवीन
सुचवणी बद्दल आभार दोन्ही पुस्तके वाचलेली आहेत. नव्हे संग्रही आहेत. मात्र माझ्या क्षीणबुद्धीला याचा या धाग्याशी संबंध समजला नाही :( नाहि म्हणायला मुर्खांच्या लक्षणात पाकिस्तानचे वर्तन बसते आणि आपलेही. म्हणून दोघेही मूर्ख आहोत म्हणून असे - कसेही - वागावे असे काही म्हणणे असेल तर सांगा..;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

-१

क्लिंटन
Sat, 05/04/2013 - 07:35 नवीन
नाहि म्हणायला मुर्खांच्या लक्षणात पाकिस्तानचे वर्तन बसते आणि आपलेही.
बरं मग आपण काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे?पाकिस्तानला सामोपचाराची भाषा कळत नाही आणि ते आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत हे आतापर्यंत शेकडो वेळा सिध्द झाले आहे.पाकिस्तान इतकी वर्षे आपल्याला काश्मीरमध्ये गुंतवून ठेवत होता पण गेल्या ४-५ वर्षातील घटना बघता आपण पाकिस्तानचा डाव काही प्रमाणात त्यांच्यावरच उलटवला आहे असे वाटू लागले आहे. सध्या दहशतवादी कारवायांमध्ये भारतात जितके लोक मारले जात आहेत त्यापेक्षा जास्त लोक पाकिस्तानात मारले जात आहेत.यात भारताचा हात असेल तर मला तरी त्या गोष्टीचा अत्यंत आनंद वाटतो (मानवतावाद्यांना योग्य ठिकाणी फाट्यावर मारले गेले आहे).जर त्यांना दुसरी भाषा समजत नसेल तर मग आपण काय करणे अपेक्षित आहे? पाकिस्तानला सद्बुध्दी यावी म्हणून उपोषणे करणे अपेक्षित आहे का?मी तर यापुढे जाऊन असे म्हणेन की आपण एक भारतीय मारला तर भारतीय लोक चवताळून दहा पाकड्यांना ठार मारतील आणि या नियमाला कधीच अपवाद होणार नाही अशी भिती पाकड्यांच्या मनात बसली तरच कदाचित हे प्रकार बंद होतील.नरभक्षक वाघ माणसांना मारतो आणि एक मूर्खपणा करतो.पण मग त्यावर काय करणे अपेक्षित आहे?त्याला गोळ्याच घालणे ना? वाघाने माणसे मारून मूर्खपणा केला म्हणून आपण वाघाला मारून दुसरा मूर्खपणा करावा का हे म्हणणेच मूर्खपणाचे आहे. Eye for an eye makes the whole world blind वगैरे गोष्टी सामोपचाराची भाषा समजत असलेल्या समोरच्या बरोबरच ठिक आहेत.पाकिस्तानसारख्याबरोबर डिल करायचे असेल तर त्यांना अजिबात दयामाया न दाखविता घे की ठोक असे केले नाही तर ते असाच पाठित खंजीर खुपसत राहणार हे इतक्या वर्षांनंतरही आपल्याला समजत नाही ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे. जनरली ऋषिकेशबरोबर असहमती दाखवायची वेळ सहसा येत नाही पण यावेळा मात्र आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

+१००

मराठमोळा
Sat, 05/04/2013 - 10:04 नवीन
पण हे सगळं करायला **त दम असणारे लीडर्स हवेत ना. शेपुट घालणारे, मुके आणि तिजोर्‍या भरणारे व्यापारी देश चालवणार असतील तर काय बोलणार? मला बरेच दिवस झाले एक प्रश्न पडलाय.. Do We (Indians) really have leadership qualities? and deserve independence?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

Do We (Indians) really have leadership qualities? and deserve in

विनोद१८
Sun, 05/05/2013 - 15:44 नवीन
Do We (Indians) really have leadership qualities? and deserve independence ??
बरोबर हे कोणीच लक्शात घेत नाही...!! विस्टन चर्चिलने याचे भाकीत आपल्याला स्वातन्त्र्य देतानच केले होते आणि आम्ही आमचा नालायकपणा त्या भाकिताप्रमाणे अगदी सिद्ध करुन दाखवित आहोत. १९४७ नन्तरचा जमाखर्च जर नीट डोळसपणे पाहिला तर चर्चिलला खोटे पाडण्यात किती यशस्वी ठरलो ??? आम्ही भारतीय हार्डकोअर व दूरद्श्टीचे शासक म्हणुन कधी ओळ्खले जात होतो ??? आम्हाला आमचे स्वातन्त्र्य, देशाच्या सीमा नीट्पणे राखता येत नाहीत त्याचा फायदा शत्रु घेणारच यात त्यान्चा काय दोष ??? माती मऊ लागल्यावर ते कोपराने खणणारच...!!!! जोपर्यन्त आमच्या असल्या भिकार्**ट राजकार्ण्याना आम्ही पुन्हा पुन्हा निवडुन देत राहु तोपर्यन्त हे असेच चालू राहिल यात कसलीच शन्का नाही. तेव्हा याबाबत तुम्हीआम्हीसुध्धा काही प्रमाणात जबाबदार आहोत. विनोद१८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

बरं मग आपण काय करावे अशी तुझी

ऋषिकेश
Mon, 05/06/2013 - 12:25 नवीन
बरं मग आपण काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे?
अपेक्षा बर्‍याच आहे पण त्यांनी आपल्या कैद्याला मारले म्हणून आपण त्यांच्या कैद्याला जेलमध्ये मारून आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली केस पोकळ करून घेऊ नये. शिवाय अपेक्षा अशी सरबजीत सिंगच्या केसबद्दल आंतरराष्ट्रिय लवादात जाणे, कारण तो हेर आहे अथवा नाही हे कृत्य आंतराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे असे वाटते.
यात भारताचा हात असेल तर मला तरी त्या गोष्टीचा अत्यंत आनंद वाटतो
मला आनंद वाटत नाही. तेथील आम जनतेऐवजी आतंकवाद्यांना मारण्यात आले असते तर अधिक योग्य वाटले असते. असो.
जर त्यांना दुसरी भाषा समजत नसेल तर मग आपण काय करणे अपेक्षित आहे?
जर सर्व इतर मार्ग, उपाय वगैरे संपले असतील तर सर्वात न्याय्य मार्ग पाकिस्तनशी आपण सरळ युद्ध घोषित करावे व दोन सशस्त्र सैन्याने युद्ध करावे. जर भारताचा इतका कोंडमारा होतो आहे तरी का युद्ध केले जात नाही? याचे कारण माझ्यामते इतर सर्व उपाय संपलेले नाहित (असे मलाही आणि आतापर्यंतच्या सरकारांना वाटलेले आहे). पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी प्रयत्न करणे, तेथील आतंकवादी अड्ड्यांवर आंतरराष्ट्रीय कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणे, दोन देशांतील आम-जनतेमध्ये वादविवादाद्वारे का होईना थेट संपर्कात वृद्धी करणे वगैरे इतर अनेक. वाजपेयी सरकारनेही सीमेवर सैन्य नेऊन ठेवले पण हल्ला केला नाही याचे कारण हेच असावे की इतर मार्ग वापरता येणे अजूनही शक्य आहे.
पाकिस्तानला सद्बुध्दी यावी म्हणून उपोषणे करणे अपेक्षित आहे का?
नाही. तशी अपेक्षा नाही.
मी तर यापुढे जाऊन असे म्हणेन की आपण एक भारतीय मारला तर भारतीय लोक चवताळून दहा पाकड्यांना ठार मारतील आणि या नियमाला कधीच अपवाद होणार नाही अशी भिती पाकड्यांच्या मनात बसली तरच कदाचित हे प्रकार बंद होतील.
कदाचित आहेच ना? :) असो. तुर्तास केवळ असहमती नोंदवतो.
नरभक्षक वाघ माणसांना मारतो आणि एक मूर्खपणा करतो.पण मग त्यावर काय करणे अपेक्षित आहे?त्याला गोळ्याच घालणे ना?
त्याला शक्य असल्यास जेरबंद करणे, त्याला माणसांना मारू न देण्यासाठी शक्य ती व्यवस्था करणे, त्याला काँपिटिटर उभा करणे वगैरे. आणि त्यानंतरही हल्ले थांबले नाहित तर स्वतःहून वाघ संपवणे (थेट युद्ध), पण त्याआधी शक्य ते सगळे इतर उपाय करणे. शिवाय आपण समोरच्या वाघाला नक्की मारू शकतो का? हे ही माहिती हवे. त्याला संपवायला गेल्यावर समजायचे की एक वाघ मारला तरी आपल्याला माहित नसलेले असे वरेच वाघ जंगलात आहेत. तर?
वाघाने माणसे मारून मूर्खपणा केला म्हणून आपण वाघाला मारून दुसरा मूर्खपणा करावा का हे म्हणणेच मूर्खपणाचे आहे.
हे मुर्खपणाचे असेलही किंवा नसेलही. :) जंगलात किती वाघ आहेत? एका वाघाला मारल्यावर इतर वाघांनी हल्ले करण्याची शक्यता किती? केवळ वाघ मारत सुटल्याने हे हल्ले "नक्की" थांबतील याची खात्री किती? शिवाय हे वाघ मारत बसण्यास लागणारा वेळ, शक्ती, पैसा यांचे गणित करून याचा खरोखरच फायदा आहे का? वगैरे प्रश्नांचा अभ्यास करावा लागेल. उगाच वाघ हल्ले करतोय म्हणून चाललो जंगलात बंदूक घेऊन हे नेहमीच फायद्याचे असेल असे नाही. ;) (शेवटचे वाक्य केवळ मूड अतिसिरीयस होऊ नये म्हणून! वैयक्तीक घेऊ नये)
Eye for an eye makes the whole world blind वगैरे गोष्टी सामोपचाराची भाषा समजत असलेल्या समोरच्या बरोबरच ठिक आहेत.पाकिस्तानसारख्याबरोबर डिल करायचे असेल तर त्यांना अजिबात दयामाया न दाखविता घे की ठोक असे केले नाही तर ते असाच पाठित खंजीर खुपसत राहणार हे इतक्या वर्षांनंतरही आपल्याला समजत नाही ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे.
ह्म्म.. इथेही असहमती नोंदवतो. भुमिका आधीच पुरेशी स्पष्ट केली आहे.
जनरली ऋषिकेशबरोबर असहमती दाखवायची वेळ सहसा येत नाही पण यावेळा मात्र आली आहे.
अशी विधायक असहमती स्वागतार्ह वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

पुन्हा एकदा पूर्णपणे सहमत.

गवि
Mon, 05/06/2013 - 12:32 नवीन
पुन्हा एकदा पूर्णपणे सहमत. चवताळून उठून प्रत्येक प्रश्न सुटत नाही. किंवा काय करायचे हे स्पष्ट नाही म्हणून.. किंवा आपल्या देशाकडून काहीच होत नाहीये असं म्हणून (किंवा समजून) "काही ना काही" करण्याची इच्छा हेही योग्य नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

Let's agree to disagree

क्लिंटन
Mon, 05/06/2013 - 20:39 नवीन
त्यांनी आपल्या कैद्याला मारले म्हणून आपण त्यांच्या कैद्याला जेलमध्ये मारून आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली केस पोकळ करून घेऊ नये.
कोण आंतरराष्ट्रीय कोर्ट? १९४८ मध्ये युनोने काश्मीरात युध्दबंदी करावी हा ठराव फाट्यावर मारून आपण ७-८ महिने लढतच होतो. मला वाटते १९४८ पेक्षा २०१३ मध्ये आपली ताकद बरीच जास्त आहे आणि भारतातील १००+ कोटींच्या बाजारपेठेची विकसित देशांना (विशेषतः सध्याच्या आर्थिक परिस्थितीत) नक्कीच गरज आहे.आधी पाकडे आंतरराष्ट्रीय कोर्टात गेले आहेत का नाही हे मला माहित नाही आणि गेले असले तरी ते जसे दर वेळी "नॉन स्टेट अ‍ॅक्टर" वर दोष टाकून मोकळे होतात तसेच आपण केले तर काय बिघडले?
तेथील आम जनतेऐवजी आतंकवाद्यांना मारण्यात आले असते तर अधिक योग्य वाटले असते.
हो बरोबर आहे.पाकिस्तानने भारत किती प्रमाणात पोखरला आहे हे आझाद मैदान प्रकरण, २६/११ मधील अबु जुंदाल बीडचा निघणे इत्यादी घटनांवरून समजतेच.आपण पाकिस्तान तितक्या प्रमाणावर पोखरला आहे की नाही याची कल्पना नाही.असेल तर फारच उत्तम.पण नसेल तर सामान्य जनतेला टार्गेट न करता केवळ भारताविरूध्दच्या तत्वांनाच टार्गेट करणे तितके सोपे जाईल असे वाटत नाही.
जर सर्व इतर मार्ग, उपाय वगैरे संपले असतील तर सर्वात न्याय्य मार्ग पाकिस्तनशी आपण सरळ युद्ध घोषित करावे व दोन सशस्त्र सैन्याने युद्ध करावे.
पाकिस्तानशी संबंधित चर्चेत न्याय्य मार्ग वगैरे वाचले आणि हसायलाच आले. इतकी वर्षे पाकिस्तान आपल्यावर "लो इन्टेन्सिटी वॉर" लादत आलेले आहे त्याचे कारण काय? एक तर प्रत्यक्ष युध्दात कदाचित आपण जिंकणार नाही ही पाकड्यांना झालेली जाणीव आणि दुसरे म्हणजे अशा प्रकारच्या अप्रत्यक्ष युध्दातून युध्द शत्रूच्या दारात नेता येते म्हणजे जे काही नुकसान व्हायचे ते तिथे होईल.अनेक लोक भारत सरकारला "षंढ" वगैरे म्हणतात तसे मी तरी नक्कीच म्हणत नाही विशेषतः गेल्या पाचेक वर्षातील घडामोडी बघता.गेल्या पाचेक वर्षात पाकिस्तानात जे काही होत आहे ते बघता माझा फुकटचा तर्क हा की त्यामागे आपला काहीतरी हात असावा. खरेखोटे नक्की काय हे १००% खात्रीने सांगता येणार नाही आणि जर रिझल्ट दिसत असतील तर ते भारत सरकारने जगजाहीर केले नाही तरी काही बिघडत नाही.पण आपला हात त्या घटनांमध्ये असेल तर भारताने पाकिस्तानचा डाव त्याच्यावर निदान काही प्रमाणात तरी उलटविला आहे असे वाटते.बाकी पाकिस्तानशी लढताना न्याय्य मार्ग वगैरे सगळे बाजूला ठेवायचे.कर्णाचे रथाचे चाक जमिनीत अडकल्यानंतर अर्जुनाने त्याच्यावर बाण चालविणे कदाचित न्याय्य नसेल पण इतकी वर्षे कर्णाने कधीच न्यायाची पाठराखण न केल्यामुळे त्याच्याविरूध्द लढताना न्याय्य मार्ग सोडला तरी काही बिघडत नव्हते. त्याचप्रमाणे पाकिस्तानशी लढताना न्याय्य मार्ग गेला तेल लावत.उगीच सद्गुणविकृती नको.
मी तर यापुढे जाऊन असे म्हणेन की आपण एक भारतीय मारला तर भारतीय लोक चवताळून दहा पाकड्यांना ठार मारतील आणि या नियमाला कधीच अपवाद होणार नाही अशी भिती पाकड्यांच्या मनात बसली तरच कदाचित हे प्रकार बंद होतील. कदाचित आहेच ना? असो. तुर्तास केवळ असहमती नोंदवतो.
आणि पाकिस्तानशी उगीच सौजन्याने वागत राहिले तर हे प्रकार बंद व्हायची अजिबात शक्यता नाही त्याचे काय?
हे वाघ मारत बसण्यास लागणारा वेळ, शक्ती, पैसा यांचे गणित करून याचा खरोखरच फायदा आहे का? वगैरे प्रश्नांचा अभ्यास करावा लागेल.
मान्य.म्हणूनच पूर्ण युध्द न करता पाकड्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवावा असे म्हटले आहे.
अशी विधायक असहमती स्वागतार्ह वाटते
धन्यवाद. एकूणच शत्रूला फालतूची मानवता दाखवायला माझा तरी प्रचंड विरोध आहे. ठिक आहे.मी माझी मते मांडली आहेत.ती कोणाला मान्य होतील किंवा होणार नाहीत.पण यापुढे यावर चर्चा करण्यात फारसा हशील नाही कारण दोन्ही बाजू तेच तेच मुद्दे परत मांडणार आणि त्यातून निष्पन्न काही होणार नाही. तेव्हा Let's agree to disagree.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

>>>>पाकिस्तानने भारत किती

प्यारे१
Mon, 05/06/2013 - 20:53 नवीन
>>>>पाकिस्तानने भारत किती प्रमाणात पोखरला आहे हे आझाद मैदान प्रकरण, २६/११ मधील अबु जुंदाल बीडचा निघणे इत्यादी घटनांवरून समजतेच. ह्यात पाकिस्तानचा हात आहे मात्र फक्त पाकिस्तानचा हात आहे ह्यावर विश्वास नाही. मूळ कारण पाकिस्तान बरोबरच जगात असलेली व वाढू लागलेली विशिष्ट धार्मिक (आणि आर्थिक सुद्धा) विचारसरणी आहे. पाकिस्तानचा त्यात समावेश असल्यानं आणि शेजारी राष्ट्र असल्यानं पाकिस्तान ह्या देशाचा आपल्याला उपद्रव होतो आहे. पाकिस्तान 'अ‍ॅज अ स्टेट'पेक्षा जास्त 'पाकिस्तान्स अ‍ॅण्ड रिलेटेड नेशन्स पिपल विथ सर्टन मोट्टो' असा फोकस असायला हवा. पेट्रो डॉलरनं ह्या सगळ्याला प्रचंड खतपाणी मिळून जोर वाढला आहे हे अगदी निश्चित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

Aye!

ऋषिकेश
Tue, 05/07/2013 - 10:42 नवीन
Let's agree to disagree.
आय अ‍ॅग्री टु धिस! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

आनि इथल्याच एका चर्चा दुवा

ऋषिकेश
Mon, 05/06/2013 - 12:30 नवीन
आनि इथल्याच एका चर्चा दुवा द्यायचा राहिला तो देतो :) http://www.misalpav.com/node/18514
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

राजकारण गेलं चुलीत

पैसा
Fri, 05/03/2013 - 17:34 नवीन
मला पहिली बातमी वाचली तेव्हाच शंका आली होती की तो त्या हल्ल्यात गेला असावा. त्याला कोणाला तसे भेटू दिले नाही. आणि सारवासारवी करायला इतके दिवस काढले. बिचारा साधा शेतकरी. कबड्डीच्या मॅचमधे जिंकला म्हणून दोस्तांबरोबर दारू प्यायला आणि झिंगलेल्या अवस्थेत कुंपण नसलेली बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात पोचला. त्याना बॉम्बस्फोटाचं खापर फोडायला एक बळीचा बकरा हवाच होता. स्वतःच्या माजी पंतप्रधानांच्या खुन्याचा शोध लावू शकत नाहीत ते मेले एका हिंदू भारतीयाला काय न्याय देणार होते? तिथल्या मानवाधिकार वाल्यानी त्याच्या बहिणीकडे एक कोटी रुपये मागितले त्याच्या सुटकेसाठी म्हणे. आता दिलेत ते तेव्हा दिले असते तर निदान त्याचा जीव वाचला असता ना? कसल्या दळभद्री राजकारणात सापडून बिचार्‍याच्या कुटुंबाची वाताहात झाली. त्याच्या मुलींचं वाईट वाटतं. बहिणीने २३ वर्षे फार लढा दिला. सगळं फुकट गेलं. इतकी सरकारे बदलली. कोणीही त्याला परत आणू शकले नाहीत. हलकट पाकिस्तान्यांबरोबर सगळ्या सरकारांचाही निषेध. अशी वेळ कोणावरही येऊ नये.
  • Log in or register to post comments

हे कसले मानवाधिकारवाले? काल

यशोधरा
Fri, 05/03/2013 - 20:03 नवीन
हे कसले मानवाधिकारवाले? :( काल टीव्हीमध्ये सांगत होते की २५ कोटी लाच मागितली? ती कोणी? इतका पैसा ह्या लोकांकडे असता तर त्यांनीच नसता का येनकेन प्रकारे सोडवून आणला त्याला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१

मराठमोळा
Fri, 05/03/2013 - 22:07 नवीन
>>मला पहिली बातमी वाचली तेव्हाच शंका आली होती की तो त्या हल्ल्यात गेला असावा. हा प्रकार फारच कॉमन झालाय. निर्भयाचं पण तेच केलं असावं, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांच्याही बाबतीत असे घडल्याचे नाकारता येत नाही. लोकांचा राग/दु:ख कमी झालं की मग डिक्लेअर करायचं. रेप केसेस, सरबजीत, अब्जावधींचे घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई या सर्वांचा राग मनात आहेच, वेळोवेळी उफाळून पण येतो पण काही करता येत नाही. त्या सरबजीतचा राजकीय फायदा तर राजकारणी कुत्र्यांनी वाटून घेतला. न्युज वाल्यांना टीआरपी मिळाली. सरबजीतचा अ‍ॅनिमेशन्/स्पेशल साउंड एफेक्ट सहित सिनेमाच बनवला त्यांनी. भारत महासत्ता होणार म्हणे. हं.. अहो इथे माणसांचे भुकेले लांडगे, कोल्हे आणि कुत्रे झालेत तिथे कसली महासत्ता आणि प्रगती होणार? इथे मिपावरच मागे कुणीतरी लाच देणे किती योग्य आहे हे पटवण्याचा प्रत्न केला होता आणि त्याला लाजीरवाणी समर्थने आली होती असे आठवते. अप्पलपोट्या आणि स्वतःचे कुटुंब सोडून कुणाबद्दल काडीचीही सदभावना नसलेल्या माणसांचा (?) देश आहे हा. साधं हवं ते ईंटरनेट कनेक्शन घेऊ शकत नाही मी माझ्या घरात कारण नगरसेवक सगळ्या सर्विस प्रोव्हायडर्स ना ३०-४०-५० लाख रुपये लाच मागतो, न दिल्यास त्यांच्या वायर कापून टाकतो. घर बदलताना माथाडी कामगार येऊन तमाशा घालतात, धमक्या देऊन पैसे घेऊन जातात. पोलिस काही करत नाहीत. काळा पैसा दिल्याशिवाय मुंबैत घर मिळत नाही. सेल्युलर सर्विस वाले, ईलेक्ट्रिसिटीवाले हवे तसे पैसे बिलात लावतात, मी तक्रार केली तर मला आत्महत्या करावीशी वाटेल अशी वेळ हे आणतात. रेल्वेचं तिकिट मी बुक करु शकत नाही कारण जवळपास सगळी तिकिटे एजंट ला विकली जातात. पासपोर्टचं पोलिस व्हेरिफिकेशन कमीत कमी ३०० रुपये दिल्याशिवाय होत नाही. प्रत्येक सिग्नलला भिकार्‍यांचा उपद्रव, वाढलेल्या झोपडपट्ट्या, रस्त्यात खड्डे बनवल्याबद्दल मरेपर्यंत भरावे लागणारे टोल, जवळपास प्रत्येक ठिकाणी पहायला मिळणारा जातीभेद, वर्षानुवर्षे अडकलेला पीएफ, बिझीनेस करावा म्हंटल तर नेत्यांचे पाय धरावे लागणे अशा कित्येक गोष्टींमुळे देश सोडुन जावा असे वाटते. (इथे उगाच फालतुगिरी आणि अवांतर प्रतिसाद नकोत) बर्‍याच वेळा पॉझिटीव विचार करुनही पुन्हा अशा काही बातम्या येतात की बस्स.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रचंड संताप आहे

पैसा
Fri, 05/03/2013 - 22:20 नवीन
अगदी टोकाला जाऊन असंही वाटलं की चीनने भूभागावर कब्जा केलाय तिथून लोकांचं लक्ष उडावं म्हणून आपल्या सरकारने पाकिस्तानी सरकारशी बोलून हे घडवून आणलं असेल. त्या बिचार्‍या सरबजीतच्या घरच्याना पैसे देऊन गप्प केले की उद्या त्याच्यासाठी उभा राहणारा ना कोणी लादेन असेल ना एखादा राजकीय कार्यकर्ता. दोन्ही सरकारांना विन विन सिच्युएशन. भारतीय लोकांचे लक्ष चीनकडून उडेल आणि कसाबचा बदला घेतला म्हणून पाकिस्तानातले अतिरेकी गट पण जरा थंड होतील. सरबजीत इतकी वर्षं जिवंत कसा राहिला हेच कोडं आहे. तसंच आणखी एक कोडं आहे हा फाशीची शिक्षा झालेला कैदी, मग इतर कैदी त्याच्यापर्यंत पोचले कसे? हे सगळं वाचताना कोणी फार ओढून ताणून बादरायण संबंध लावलाय म्हणतील, पण आताच्या राजकारण्यांवर माझा प्रचंड विश्वास आहे, की ते असले काहीही घडवून आणू शकतात आणि कोणत्याही थराला जाऊ शकतात. आम्ही सामान्य माणसं म्हणजे त्यांच्यापुढे किडेमुंग्या आणि पटावरची प्यादी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

वर्षानुवर्षे अडकलेला पीएफ

टवाळ कार्टा
Sat, 05/04/2013 - 07:04 नवीन
वर्षानुवर्षे अडकलेला पीएफ
ही काय भानगड आहे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

ममो, कळकळ पोचते आहे पण नुसती

यशोधरा
Sat, 05/04/2013 - 08:24 नवीन
ममो, कळकळ पोचते आहे पण नुसती कळकळ व्यक्त करुन फायदा नसतो. आहे ती सिस्टीम बदलण्यासाठी तू स्वतः काही खारीचा का होईना वाटा उचलत असशील तर ठीक नाहीतर हे केवळ अरण्यरुदन आणि काही विधानं तर अतिरंजित वाटत आहेत. जवळपास प्रत्येक ठिकाणी कसला जातीभेद दिसतो तुला? आमच्या भागात एक अतिशय मुजोर नगरसेवक होता आणि एक दिवस गंम्मत म्हणून त्याने पिस्तुलातून गोळ्या फायर केल्या त्या सोसायटीमधल्या एका घराच्या खिडक्यांच्या काचा भेदून गेल्या, नशीबाने घरी कोणी नव्हतं, पण आम्ही शेजार्‍यांनी पोलीस तक्रर केली, पोलीसांना सतत भेटून दबाव आणला. आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आमच्या कोणा नेत्याशी ओळखी नाहीत, पोलिसांनी आपला हात काढून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण आज नगरसेवक शेवटी तुरुंगात आहे. समाज काय, देश काय आपोआप बदलत नसतो. तो स्व्तःच बदलायला लागतो. परदेशात निघून जाणे हे त्यावरचे उत्तर नव्हे. तुझ्याप्रमाणेच इतरांनाही इंटरनेट्चा प्रॉब्लेम येत असेल ना? सगळे मिळून नगरसेवकाला एकत्र जाब का नाही विचारत? वाटेल तशी लावलेली बिलं भरताच कशी काय दर वेळेला? ऑफिसमध्ये जाऊन भेटत का नाही? मीटर रीडिंग का नेत नाही बरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

करतोय ना.. मला जे जे शक्य आहे

मराठमोळा
Sat, 05/04/2013 - 09:51 नवीन
करतोय ना.. मला जे जे शक्य आहे ते सगळं करतो मॅडम. कुठेही लाच देत नाही, देऊ देत नाही. कायदे पाळतो,बिल जास्त आले तर मीटर रीडिंग बरोबर नेतो (उगाच बिलं भरत नाही). एक दोन वेळा मी रस्त्यात सिग्नल पाळला म्हणुन मारामार्‍या पण केल्यात. अजुनही बरेच प्रॉब्लेम आहेत आणि त्याची अशीच सोल्युशन्स पण आहेत. पण मग हेच करण्यात आयुष्य खर्च करायचे का सगळ्यांनी? असो.. सगळं लिहिता येत नाही आणि भावनाही पोहोचवता येत नाहीत. @टवाळ कार्टा - वर्षानुवर्षे अडकलेला पीएफ - मी तीन वर्षांपुर्वी पी एफ विड्रॉवल साठी अर्ज केला होता. तो तीन वेआळ गहाळ झाला. मागच्या महिन्यात पुन्हा अर्ज केलाय, पाचशे रुपये दिलेत तर काम लगेच होईल असे कंसल्टंट ने सांगितले. मी देणार नाही. बघुयात आणखी किती वेळा फॉर्म गहाळ होतो ते. यावेळी पैसे दिल्याशिवाय केस पुर्ण होईल अशी व्यवस्था केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हो ममो, ज्यांना शक्य आहे

यशोधरा
Sat, 05/04/2013 - 09:54 नवीन
हो ममो, ज्यांना शक्य आहे त्यांनी जमते तेवढे न थकता करायचे. निदान पुढच्या पिढ्यांना त्याचा फायदा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

जमणार नाही. प्रामाणिक मत

मराठमोळा
Sat, 05/04/2013 - 10:12 नवीन
जमणार नाही. प्रामाणिक मत मांडतो. माझ्यासारख्या शीघ्रकोपी माणसाला हे करत रहाणे शक्य नाही. एकतर मी वेडा होईन किंवा मग डोंबीवली फास्टमधला माधव आपटे होईन. असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ते तुझं लिमिटेशन.

यशोधरा
Sat, 05/04/2013 - 10:18 नवीन
ते तुझं लिमिटेशन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

माझे लिमिटेशन दाखवून

मराठमोळा
Sat, 05/04/2013 - 14:04 नवीन
माझे लिमिटेशन दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. यु वोन द डिबेट. :) आणि हो, मी माझे हक्क मागतो हे माझे लिमिटेशन असतील तर आपल्या देशाची काय अवस्था आहे हे दिसून येतेच आहे आणि हे सगळ संपेल असा आशावाद करणं म्हणजे मुर्खाच्या नंदनवनात राहिल्यासारखे वाटते. बाकी ज्याची त्याची समज आणि मर्जी. असो.. अवांतर प्रतिसाद आनी चर्चेबद्दल धागाकर्ता आणि संमं ची माफी मागतो. रहावलं नाही म्हणून लिहिलं. प्रतिसाद उडवले तरी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

यु वोन द डिबेट >> खरं? हय

यशोधरा
Sat, 05/04/2013 - 16:32 नवीन
यु वोन द डिबेट >> खरं? हय विधानावर हसू की रडू तेच कळत नाही! डिबेट कसलं कर्माचं? मोठी पोस्ट लिहिली होती पण इथे उमटली नाही आणि आता पुन्हा लिहायचा कंटाळा आला आहे, तर थोडक्यात लिहिते. हक्क आणि कर्तव्यं हे जणू काही एकाच नाण्याच्या २ बाजू असल्याप्रमाणे आहेत, तेह्वा हक्क मिळत नसले तर तर ते मिळावेत म्हणून तू त्यासाठी कितपत प्रयत्न (हेही एक कर्तव्यच आहे)करतोस त्याप्रमाणात ते तुला मिळतील. नुसतंच मला स्वभावामुळे हे जमणार नाही, ते जमणार नाही म्हणत बसल्या जागी कोणालाच हक्क मिळत नाहीत. त्या अर्थाने ते लिमिटेशन आहे. हक्क मागणे हे लिमिटेशन नव्हे. ज्याची त्याची समज म्हणालास हे हे मात्र खरं. :) दुसरं म्हणजे दुसर्‍यांना मूर्ख वगैरे म्हटल्याने आपला शहाणपणा वगैरे सिद्ध होतो अशी काही समजूत आहे का तुझी? तर तसं नसतं अरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

>>> @टवाळ कार्टा -

श्रीगुरुजी
Tue, 05/07/2013 - 19:42 नवीन
>>> @टवाळ कार्टा - वर्षानुवर्षे अडकलेला पीएफ - मी तीन वर्षांपुर्वी पी एफ विड्रॉवल साठी अर्ज केला होता. तो तीन वेआळ गहाळ झाला. मागच्या महिन्यात पुन्हा अर्ज केलाय, पाचशे रुपये दिलेत तर काम लगेच होईल असे कंसल्टंट ने सांगितले. मी देणार नाही. बघुयात आणखी किती वेळा फॉर्म गहाळ होतो ते. यावेळी पैसे दिल्याशिवाय केस पुर्ण होईल अशी व्यवस्था केली आहे. मी ४ वर्षांपूर्वी पीएफ विथड्रॉ करण्यासाठी कंपनीमार्फत अर्ज दिला होता. २-३ महिने काहीच झाले नाही म्हणून वेबसाईट शोधून वरिष्ठ अधिकार्‍यांना २-३ वेळा ईमेल पाठविले. तरीही उपयोग झाला नाही. शेवटी ग्रिव्हन्स बोर्डाकडे तक्रार केली व ग्राहक न्यायमंचात ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर दहाव्या दिवशी पीएफ खात्यात जमा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

मी माहिती अधिकारात माहिती

ऋषिकेश
Wed, 05/08/2013 - 13:57 नवीन
मी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. अर्ज केल्याच्या विसाव्या दिवशी पैसे आले आणि २५व्या दिवशी पैसे या या तारखेला पाठवल्याचे उत्तर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बर्‍याच वेळा पॉझिटीव विचार

तेजराज किंकर
Sat, 05/04/2013 - 08:38 नवीन
बर्‍याच वेळा पॉझिटीव विचार करुनही पुन्हा अशा काही बातम्या येतात की बस्स..... साहेबः कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

खूप टोकाची प्रतिक्रिया वाटते

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/05/2013 - 17:34 नवीन
खूप टोकाची प्रतिक्रिया वाटते आहे. गरजेपेक्षा जास्त निराशाजनक. वानगीदाखल खालील अतिरंजित वाक्ये
काळा पैसा दिल्याशिवाय मुंबैत घर मिळत नाही. सेल्युलर सर्विस वाले, ईलेक्ट्रिसिटीवाले हवे तसे पैसे बिलात लावतात, मी तक्रार केली तर मला आत्महत्या करावीशी वाटेल अशी वेळ हे आणतात. रेल्वेचं तिकिट मी बुक करु शकत नाही कारण जवळपास सगळी तिकिटे एजंट ला विकली जातात.
काळा पैसा दिल्याशिवाय घर घेतलेले बघितले आहेत भाऊ. काळा पैसा एकदमच गेला नाही पण फार कमी झाला आहे. कित्येक ठीकाणी पूर्ण लीगल व्यवहार होतो (पार्किंग वगळता, ती कटकट अजून आहे) रेल्वेच्या बाबतीत बोलायचे झाले तर IRCTC वरून आरामात बुकिंग होते हल्ली. एजंटांचा त्रास बराच कमी झाला आहे. शांत होऊन विचार कर रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

एक भारतीय माणूस पाकड्यांकडून

अप्पा जोगळेकर
Fri, 05/03/2013 - 22:11 नवीन
एक भारतीय माणूस पाकड्यांकडून हाल अपेष्टा होऊन मरावा हे वाईट झाले. हेर असेलसुद्धा कदाचित. बाकी स्वतःच्या कुटुंबातली व्यक्ती २३ वर्षे संपर्कातच राहिली नसेल तर तिच्याबद्दल थोडेतरी ममत्व का वाटेल ? अशी विचित्र शंका मनात तरळून गेली.
  • Log in or register to post comments

कुटुंबातली व्यक्ती २३ वर्षे

ढालगज भवानी
Fri, 05/03/2013 - 22:25 नवीन
कुटुंबातली व्यक्ती २३ वर्षे संपर्कातच राहिली नसेल तर तिच्याबद्दल थोडेतरी ममत्व का वाटेल ?
होय वाटेल विशेषतः जर लहानपणी एकत्र खेळले असू, रडलो-हसलो असू तर. नक्की वाटेल. ती व्यक्ती संकतात असेल तर हृदयात कालवाकालव होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

च्यायला, वात आणलाय राव या पाकिस्ताननं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/04/2013 - 07:54 नवीन
शहीद सरबजीत इतक्या दिवस जीवंत राहीला हा त्याच्या नशीबाचा भाग म्हणावा. त्यानं पत्रव्यवहार केला. दलबीरने प्रयत्न केले तिला बिचारीला अपयश आलं. भाऊ गमवावा लागला. सरबजीतची चूक असेल, तो हेर असेल पण काय असेल ते असेल पण पाकिस्तानकडून आपण भलत्याच अपेक्षा करतो. हजार वेळा कळलं आहे, आपल्यासाठी तो देश कधीच नीट वागणार नाही. स्वत:च्या देशात सतत अराजक माजलेली असते. सतत बाँबस्फोट, शिया-सुन्नी वाद आणि असंख्य गोष्टी चाललेल्या असतात. वर सतत कुरापती काढायची सवय आहे. सैन्य तरी घुसवेल, टोळ्यातरी घुसवेल, काहीतरी चाललेलं असतं आणि आपण उच्चायुक्तांना सांगतो त्यांनी नीट राहावं. सालं पाकिस्तान अवघड जागेवरचं दुखनं आहे. याला ना उद्ध्वस्त करता येतं ना, काही नीट संबंध ठेवता येतात. पाकिस्तान एक व्यक्ती असली असती तर मुस्काड तरी फोडून येता आलं असतं. पण तसंही करता येत नाही. पाकिस्तानशी व्यववहार करतांना जगभराची प्रतिमा सांभाळावी लागते, जागतिक पातळीवरील राजकारण पाहावं लागतं. मालक देश भारताला सांगतात बोलणी सुरु करा, आपण रेल्वे सुरु करतो. खेळ सुरु करतो, कलाकारांना बोलावतो. आपण अमूक करतो आपण धमूक करतो. काहीही उपयोग नाही. पाकिस्तानशी सर्व पातळ्यांवरचे संबंध कायमचे तोडले पाहिजे. च्यायला, आपल्याला देशप्रेम समजायला,आपल्याला चीड यायला सतत सरबजीतांना मरावं लागत. सैन्याचे बळी जावे लागतात. आपल्या देशाच्या सीमा तरी त्यांनी लंघाव्या लागतात. हट्ट. च्यायची XX..... हा वेल्लाभट म्हणतो तसं हातावर हात ठेवायचे आणि तोंडावर बोट. -दिलीप बिरुटे (भडकलेला)
  • Log in or register to post comments

पाकिस्तानशी सर्व पातळ्यांवर

गवि
Sat, 05/04/2013 - 08:03 नवीन
पाकिस्तानशी सर्व पातळ्यांवर संबंध तोडून टाकले पाहिजेत.. ------------------------------- कोणत्या पातळ्यांवर संबंध ठेवलेत हल्ली की जे तोडावे? येऊन जाऊन क्रिकेट. कोणतेही व्यापार संबंध किंवा अन्य संबंध ओलरेडी तुटलेच आहेत. सात्विक संताप सर्वानाच आहे. पण नेमके काय केले पाहिजे हे कोणी सांगेल का ? bomb टाकून उध्वस्त ? त्यांच्यावर कब्जा ? आर पार लडाई ? खरेच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असंय काय....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/04/2013 - 08:10 नवीन
आपल्याला राजकारणाची काही आयडिया नाही. पणा व्यापारिक संबंध तोडले असतील तर चांगली गोष्ट. रेल्वे,बस गाड्या बंद करायच्या. आपली इकडचे लोक तिकडे जाणार नाहीत आणि तिकडून त्यांना येऊ द्यायचे नाही. पाकशी असलेले संबंध कसे तोडले पाहिजेत त्याचा काही विचार केला नाही. वाचायला काही मिळालं तर वाचून सांगतो. >>>>> bomb टाकून उध्वस्त ? त्यांच्यावर कब्जा ? आर पार लडाई ? खरेच ? असं काहीही करुन उपयोगाचे नाही. आपलेच लोक आपल्याला नीट पोसता येईना. बेकारी, भ्रष्टाचार, आणि असंख्य भानगडी आपल्याही मागे आहेत त्यावर कब्जा करुन आपला प्रश्न सूटणार नाही.पण, पाकिस्तानची खोड मोडायचा वरच्यावर प्रयत्न केला पाहिजे. आता ते कसं करता येईल तेही काही सांगता येणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

जशास तसे...

अमित
Sat, 05/04/2013 - 10:48 नवीन
आपण नेहमी ऐकतो की पाकिस्तानने कुरापती काढल्या, आय एस आयच्या कारवाया, मुंबईवरील हल्ला, कारगिलच्या वेळेसची घुसखोरी आता चीनने एकोणीस कि. मी. घुसखोरी केली वगैरे.. मुळात ही घुसखोरी होत होती तेव्हाच आपल्याला का कळलं नाही? कदाचित दुर्गम भाग, किंवा इतर अडचणी असतीलही पण तरीही अशा अडचणी शेजारी देशांनाही असतीलच की. दुसरं म्हणजे त्याला उत्तर म्हणून आपणही घुसखोरी का नाही करत?
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Sat, 05/04/2013 - 13:53 नवीन
>>दुसरं म्हणजे त्याला उत्तर म्हणून आपणही घुसखोरी का नाही करत? आत्ताच मिपावरचा घोषणा हा विभाग परत उघडून पाहिला. सरकारतर्फे मिसळपाववर अशी घुसखोरी करणार असल्याची/केल्याची घोषणा कधी झालेली नाही त्याअर्थी भारत घुसखोरी करीत नसल्याची तुमची माहिती खात्रीशीरच असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा