✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नोव्हार्टीस - संशोधन आणि अनुकरण

व
विकास यांनी
Wed, 04/03/2013 - 00:16  ·  लेख
लेख
भारताच्या सुप्रिम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. खटला होता तो नोव्हार्टीस ही नवीन औषधे तयार करणारी कंपनी, त्यांनी लावलेल्या एका महत्वाच्या औषधाचे पेटंट आणि त्याचे भारतात चालू असलेले अनुकरण. वरकरणी विषय कुठल्याही बाजूने सोपा वाटू शकतो, पण तितका तो सोपा नाही असे वाटते. तर झाले असे: ९० च्या दशकात (९३ साली) नोव्हार्टीस या स्विस कंपनीने ल्युकेमियाच्या विशिष्ठ प्रकारांवर चमत्कार वाटावा असा उपाय ठरणारे औषध शोधून काढले. त्याला जगभरातून पेटंट मिळाले. भारतात २००५ साला पर्यंत औषधांसाठी पेंटंट हा प्रकारच नव्हता. २००५ साली भारताने तसे पेटंट देणे मान्य केले पण ते केवळ १९९५ सालानंतरच्या औषधांसाठीच. तो पर्यंत ज्या औषधांची पेटंटस कालानुसार संपली असतील त्यांचे जगभरातील कायद्याने मान्य असलेले अनुकरण करणे ज्याला "जेनेरीक ड्रग्ज" म्हणले जाते अशी औषधे करणे चालू होते. या खटल्यासंदर्भात चर्चेत असलेले नोव्हार्टीसचे ब्रँडनेम औषधासाठीचा वार्षिक खर्च हा $७५,००० इतका होता तर तेच औषध त्याच क्वालीटीने तयार केलेले भारतात वर्षाला $२५०० इतक्यालाच पडत होते /पडते. अर्थात हा फरक केवळ गरीबांसाठीच महत्वाचा नव्हता तर मध्यमवर्गिय/उच्च मध्यमवर्गियांसाठी पण महत्वाचा आहे. पण जेंव्हा जेनेरीक ड्रग्ज बाजारात असतात तेंव्हा ब्रँड नेम औषधांचा तोटा होतो. मग त्यावर उपाय म्हणून ते थोडाफार बदल करून नवीन औषध तयार करतात आणि पेटंट फाईल करतात जेणे करून जेनेरी़क ड्रग बंद करावे लागते. असे पेटंट अमेरीकेत मान्य झाले. कदाचीत इतरत्र देखील विकसीत राष्ट्रांमधे मान्य झाले असेल. पण आपल्या पेटंट ऑफिसने ते मान्य केले नाही. त्याचा परीणाम म्हणून खटला चालू होता. आज निकालात आपल्या सुप्रिम कोर्टाने असले लहानसहान फेरफार केलेल्या औषधास परत पेटंट (एव्हग्रिनींग) करायची संमती मिळणार नाही असे सांगितले. अर्थातच त्यामुळे नोव्हार्टीसचे धाबे दणाणले आहे. कारण भारतीय कंपन्या कदाचीत ते औषध भारत आणि इतर विकसनशील/अविकसीत राष्ट्रात विकू शकतील. त्यामुळे त्यांचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे संशोधनास कमी वाव मिळू शकेल... मला वरकरणी असलेल्या माहीतीवरून हा निकाल योग्य वाटला. पण आपल्यालादेखील सुप्रिम कोर्टाचा निकाल योग्य वाटतो का? मला जरी योग्य वाटला असला तरी त्याचे कारण सामाजीक आहे. पण त्यामुळे आपण कॉपीबाजच रहातो याची खंत देखील आहे. त्या संदर्भात नोव्हार्टीस जे म्हणते ते बर्‍याच अंशी खरे वाटते. एखादे औषध संशोधन करून, त्याच्या ट्रायल करून, बाजारात आणण्याचा कालावधी बराच मोठा असतो, त्यात नुसताच एखाद्या कंपनीचा आणि सरकारचा पैसा गुंतलेला नसतो तर अनेकांची अनेक वर्षांची (कधी कधी खरेच १२+ वर्षांची) तपश्चर्या असते. त्यातून फायदा निर्माण करून ते परत त्या गुंतवणु़कीचा उपयोग नवीन संशोधनासाठी करतात... पण मग जे जेनेरीक ड्रग्ज तयार करतात ते मात्र या कसल्याच भानगडीत पडत नाहीत. फक्त धंदा करणे हाच उद्देश असतो. त्यातून (विशेष करून या विशिष्ठ उदाहरणात) अनेकांना फायदा होऊ शकतो हे खरे आहे, पण बाकी डेव्हलपमेंटच काय?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31740 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

वेगळे मुद्दे

सुबोध खरे
Tue, 04/09/2013 - 18:53 नवीन
साहेब डॉक्टरांचे भ्रष्टाचार आणि एखाद्या कंपनीचे लोकांना वेठीस धरणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कंपनीने आपला नफा कमावून झाल्यावर सुद्धा अनैतिकपणे आणि बेकायदेशीर रित्या कोणत्याही मार्गाने पैसा मिळवण्यासाठी सर्वसामान्य रुग्णाला वेठीला धरणे हे वेगळे.रुग्णाला एखादा डॉक्टर जर फसवीत असेल तर त्याला दुसर्या डॉक्टरकडे जाता येते किंवा पोलिसात तक्रार करता येते किंवा ग्राहक मंचात जाता येते. पण एखादी बहुराष्ट्रीय कंपनी आपल्या पैशाच्या बळावर वेगवेगळ्या सरकारी नियमांचा दुरुपयोग करीत नफ्यासाठी रुग्णांना वेठीस धरत असेल तर त्याविरुद्ध सर्वसामान्य माणसाने काय करावे?हि गोष्ट लक्षात आल्यामुळे आता कॅनडा युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशात कायद्यात काय सुधारणा करता येईल याचा विचार आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने चालू झालेला आहे येथे या गोष्टीचा विचार आहे
  • Log in or register to post comments

त्याबद्दल

विकास
Tue, 04/09/2013 - 19:48 नवीन
पण एखादी बहुराष्ट्रीय कंपनी आपल्या पैशाच्या बळावर वेगवेगळ्या सरकारी नियमांचा दुरुपयोग करीत नफ्यासाठी रुग्णांना वेठीस धरत असेल तर त्याविरुद्ध सर्वसामान्य माणसाने काय करावे?हि गोष्ट लक्षात आल्यामुळे आता कॅनडा युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशात कायद्यात काय सुधारणा करता येईल याचा विचार आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने चालू झालेला आहे. येथे या गोष्टीचा विचार आहे
पण हे सुरवातीपासून मला वाटते सर्वच जण या चर्चेत म्हणत आले आहेत. त्यात नवीन काहीच नाही. पण केवळ तेव्हढ्याने आपण प्रश्नाच्या मुळाशी जात नाही. कारण देणारे ते आहेत आणि आपण नुसतेच घेणारे. हे चित्र जो पर्यंत बदलत नाही, बदलावे असे वाटत नाही तो पर्यंत सुप्रिम कोर्टावरच अवलंबून रहावे लागणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आणखी एक अ‍ॅन्गल!

पिवळा डांबिस
Tue, 04/09/2013 - 21:46 नवीन
विकास, तुला आणखी एक अ‍ॅन्गल देतो चल (साला, तू भी क्या याद करेगा!!!!) कोर्टाने काय तो निर्णय दिला, जेनेरीक ड्रग मेकर्स आणि काही एन्जीओजनी सेलेब्रेट केलं... मिडिया तर बेभान होऊन नाचतंय!!! पण भारत सरकारने संयमित प्रतिक्रिया दिल्यायत, ते फार सेलेब्रेट करतांना दिसत नाहियेत असं का? :) (या प्रश्नाचे उत्तर जर तू दिले नाहीस तर तुझ्या मस्तकाची हजार शकले होऊन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील, विक्रमा!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

भारत सरकारला फार्मा संशोधन

आदूबाळ
Tue, 04/09/2013 - 22:52 नवीन
भारत सरकारला फार्मा संशोधन क्षेत्रातली परकीय गुंतवणूक कमी व्हायची भीती वाटते आहे बहुतेक. अजून एक कारण असावं: सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारताचं "पेटंट संरक्षण" या क्षेत्रातलं नाव बद्दू होईल. मग फार्मा कंपन्या भारतात पेटंट रजिस्टर करण्याऐवजी स्वित्झर्लंड किंवा हॉलंड अशा ठिकाणी पेटंट रजिस्टर करतील, चीन किंवा बांगलादेशात कमी खर्चात उत्पादन करतील आणि भारतात फक्त विक्री करतील. अशाने मूल्यसाखळी (value chain) मधलं भारताचं महत्त्व कमी होईल. पर्यायाने कररूपी उत्पन्न, कारखान्यांतली आणि संशोधन आस्थापनांमधली नोकरभरती सुद्धा कमी होईल. बरोबर आहे का पिडांकाका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

कारण...

विकास
Wed, 04/10/2013 - 00:38 नवीन
आदूबाळ यांनी वास्तवीक खूप व्यवस्थित उत्तर दिले आहे आणि त्याच्याशी पूर्ण सहमत आहे. पण "विकास" चा तो ड्युप्लिकेट आयडी नसल्याने मला थोडे अधिक उत्तर देणे भाग पडत आहे. :-) अगदी सोपे उत्तर देयचे तर, भारत सरकार आहेच मुळी संयमित, त्यामुळे ते संयमित प्रतिक्रीया देत आहे. ;) पण थोडे अधिक म्हणायचे तर, ते मेहम्मूदचे गाणे आठवते का? ना बिबी ना बच्चा, ना बाप बडा ना मैय्या, द होल थिंग इज दॅट के भैय्या सबसे बडा रुपय्या! तसेच काहीसे येथे आहे. त्यात जसा राज्यकर्ते देशाचा स्वार्थ बघत असतील तसेच स्वतःचा पण स्वार्थ बघत असणारच... कुणाला कोर्टाचा निर्णय आवडो-न आवडो, बरोबर-चूक वाटोत, काही वाटले तरी त्यात गैर नाही. पण एक नक्की चांगले आहे, की भारतीय न्यायव्यवस्था वतंत्र आहे हा संदेश यातून सर्वांनाच गेला आहे. बरं या निर्णयात उगाच अ‍ॅक्टीव्हिजम आहे असे वाटत तरी नाही. इतके उत्तर दिल्यावर गाडी मुळ पदावर आणण्यासाठी मला सोपानदेव चौधरींच्या "विज्ञानयोगी" कवितेतील ओळी आठवल्या (येथे आधीपण सांगितल्या आहेत). कविता सगळी पाठ आहे, पण शेव॑टच्या ओळीच लिहीतो. तसेच त्यांनी ती जेंव्हा लिहीली असेल त्यावेळेपेक्षा माझ्यालेखी भारताची आणि भारतीयांची प्रगती आणि वृत्ती खूपच चांगल्या अर्थाने बदलली आहे, असे मनापासून स्पष्ट करतो, तरी देखील...सरकारी पातळीवर हे जास्त चांगले झाले आहे असे वाटते. पण खाजगी उद्योगांना, सर्वच शिक्षणसंस्थांना अजून बरेच काही शिकायचे आहे. नुसतेच प्रायव्हेटायझेशन म्हणत सरकारी अंमल नको म्हणायचे आणि तसा तो नसावाच, पण दुसरीकडे सन्मान्य पण दुर्मिळ अपवाद वगळता स्वतःच्या धंद्यात उपयुक्त ठरण्यासाठीच्या मुलभूत संशोधनात काहीच गुंतवणूक नाही की इनोवेशन नाही ... म्हणून ते यंत्रकार, आम्ही दुरूस्तीकार त्यांचा संचार आंतराळात, दृष्टी आंतर्गोलपटावर आणि आम्ही मात्र उभे या पृथ्वीच्या सालपटावर सर्व प्रमुख शोधांचे धनी, पाश्चिमात्य विज्ञानयोगी आम्ही? आम्ही फक्त उपभोगी संशोधक, निर्माते, सारे तिर्‍हाईत आम्ही मात्र राहीलो फक्त गिर्‍हाईक :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हम्म!

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/11/2013 - 01:53 नवीन
वर श्री. आदूबाळ यांनी दिलेली कारणं बरोबर आहेत. अनेक कारणांपैकी काही ती आहेत. बाकी तुमच्या प्रतिसादात तुम्हाला काय म्हणायचे तेच कळलं नाही... :) तुमच्या प्रतिसादातील दुसर्‍या भागाशी (विज्ञानयोगी वगैरे कविता) अंमळ असहमत. हा भारतात फार पॉप्युलर असलेला आत्मताडनाचा प्रकार असला तरी तो सत्य आहेच असे नाही. भारतातही सक्षम, हरहुन्नरी, धडाडीचे लोक खूप आहेत. पण त्यांना मोकळेपणाने काम करू दिलं जात नाही, कधी नकळत, बर्‍याचदा मुद्दामहून! हा खरा प्रॉब्लेम आहे. असो.
भारत सरकार आहेच मुळी संयमित, त्यामुळे ते संयमित प्रतिक्रीया देत आहे. पण एक नक्की चांगले आहे, की भारतीय न्यायव्यवस्था वतंत्र आहे हा संदेश यातून सर्वांनाच गेला आहे.
न्यायसंस्थेचे काम हे तिच्यापुढे सादर केला गेलेला पुरावा, फिर्यादी आणि आरोपी पक्षांची आर्ग्युमेंटस, त्या देशाचे संविधान आणि कायदा (आणि फारफारतर कॉमन लॉ) यांचाच विचार करून निर्णय देणं हे असतं. ते या न्यायसंस्थेने चोख केलं आहे. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की फक्त वर नमूद केलेल्या पॅरामीटर्सच्या मर्यादेत राहूनच निर्णय देण्याची लिमिटेड जबाबदारी असल्याने बर्‍याच वेळेला न्यायसंस्थेला स्वतंत्र आणि परखड रहाणं परवडू शकतं. ज्युडिशियल ब्रान्चला असलेली ही लग्झरी एक्झिक्युटिव्ह ब्रान्चला (पक्षी सरकारला) नसते. सरकारला प्रत्येक निर्णयाचे कुठे, काय आणि कसे परिणाम होतील याचा विचार करावाच लागतो. सरकार बर्‍याचवेळेला बोटचेपी भूमिका घेतंय असं आपल्याला वाटतं ते यामुळेच. आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये न्यूटनचा तिसरा नियम हा फिजिक्सइतकाच लागू पडतो. :) प्रत्येक घटनेचे, प्रत्येक निर्णयाचे प्रतिसाद उठतातच. आता हे ग्लीव्हेकचं मधाचं पोळं भारतीय जेनेरीक ड्रग इंडस्ट्रीच्या हातात पडलंय न्यायसंस्थेच्या निर्णयामुळे, ग्रेट! पण यातून उठलेल्या मधमाशा या कशा, कुठे आणि कधी येऊन चावणार आहेत ही चिंता सरकारला करावी लागणार आहे. माझ्या मते सरकारच्या संयमित प्रतिक्रियेचं ते कारण आहे. आदूबाळ यांनी दिलेली कारणं ही खूप महत्वाची असली तरी ती ऑबव्हियस आहेत. पण या निर्णयाचे पडसाद हे नोव्हार्टिसच्या, फार्मा इंडस्ट्रीच्या, फार काय भारत-स्विस संबंधांच्या पलीकडे उमटण्याची शक्यता आहे आणि माझी खात्री आहे की सरकारमधले अनुभवी आणि बुद्धिमान चाणक्य हे सगळं फिगर आऊट करण्यात गुंतलेले असणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/11/2013 - 01:55 नवीन
या प्रतिसादातील तर्क पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

>>फक्त वर नमूद केलेल्या

नितिन थत्ते
गुरुवार, 04/11/2013 - 09:17 नवीन
>>फक्त वर नमूद केलेल्या पॅरामीटर्सच्या मर्यादेत राहूनच निर्णय देण्याची लिमिटेड जबाबदारी असल्याने बर्‍याच वेळेला न्यायसंस्थेला स्वतंत्र आणि परखड रहाणं परवडू शकतं. ज्युडिशियल ब्रान्चला असलेली ही लग्झरी एक्झिक्युटिव्ह ब्रान्चला (पक्षी सरकारला) नसते. सरकारला प्रत्येक निर्णयाचे कुठे, काय आणि कसे परिणाम होतील याचा विचार करावाच लागतो. सरकार बर्‍याचवेळेला बोटचेपी भूमिका घेतंय असं आपल्याला वाटतं ते यामुळेच. हॅट्स ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+१

श्रावण मोडक
गुरुवार, 04/11/2013 - 09:49 नवीन
+१ पांडित्यपूर्ण विश्लेषण 'करणारी' दहाएक संपादकीयं या वाक्यावरून ओवाळून टाकायाला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

उत्तरे..

विकास
गुरुवार, 04/11/2013 - 19:26 नवीन
( वास्तवीक वेताळाला एकाच मुद्यावर उत्तर देण्यास विक्रमादीत्य बांधील असतो पण येथे आपण त्या नियमास अपवाद करूयात. ;) )
पण त्याचबरोबर हेही खरं आहे की फक्त वर नमूद केलेल्या पॅरामीटर्सच्या मर्यादेत राहूनच निर्णय देण्याची लिमिटेड जबाबदारी असल्याने बर्‍याच वेळेला न्यायसंस्थेला स्वतंत्र आणि परखड रहाणं परवडू शकतं.
माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणले आहे त्या प्रमाणे: "बरं या निर्णयात उगाच अ‍ॅक्टीव्हिजम आहे असे वाटत तरी नाही." थोडक्यात ते पॅरॅमिटर्स वगैरे सर्व समजून घेतले तरी लोकशाही देशात अ‍ॅक्टिव्हिस्ट कोर्ट असतात, ते त्याला साजेसे निर्णय देतात. ते ह्या निर्णयात अ‍ॅक्टीव्हिझम म्हणून झालेले नाही. त्यामुळे किमान कोर्टापुढे तरी आपले काही चालू शकणार नाही इतका संदेश परदेशी कंपन्यांना गेला आहे हे महत्वाचे असे म्हणले होते. या विषयावर जे काही परदेशी माध्यमात लिहून आले आहे त्यात कोर्टावर कुठलाही संशय घेतलेला दिसत नाही, हे देखील त्या अर्थाने महत्वाचे आहे.
सरकारला प्रत्येक निर्णयाचे कुठे, काय आणि कसे परिणाम होतील याचा विचार करावाच लागतो. सरकार बर्‍याचवेळेला बोटचेपी भूमिका घेतंय असं आपल्याला वाटतं ते यामुळेच.
हा मुद्दा मान्यच आहे. पण आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, "त्यात जसा राज्यकर्ते देशाचा स्वार्थ बघत असतील तसेच स्वतःचा पण स्वार्थ बघत असणारच... " थोडक्यात तुम्ही ज्याला बोटचेपी भुमिका म्हणत आहात त्याला मी स्वार्थी भुमिका म्हणले इतकेच. किंचित फरक असलाच तर तुम्हाला ती कदाचीत केवळ आंतर्राष्ट्रीय राजकारणाच्या होऊ शकणार्‍या दबावामुळे घेतली इतकेच वाटते तर मला तो केवळ एक भाग वाटतोय. दुसरा भाग अर्थातच राजकारण्यांना मिळणारे पैसे. आंतराष्ट्रीय कंपन्या केवळ भारतातच नाही तर सर्वत्रच कसे राजकारण्यांना सांभाळतात ह्यावर भरपूर माहिती मिळेल. त्या व्यतिरीक्त भारतातील सध्याच्या सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे पाहीली, राजीव गांधींसंदर्भात विकीलिक्सने अगदी सत्तरीच्या दशकातील त्यांच्या "उपयोगा"बद्दल काय म्हणले आहे ते पहाता, नोव्हार्टीस काय अशीच कंपनी चालू करायचे पेपर्स घेऊन नंतर लॅब उघडून काम करत बसली असे म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी. पण तो वेगळा विषय होऊ शकेल.
पण या निर्णयाचे पडसाद हे नोव्हार्टिसच्या, फार्मा इंडस्ट्रीच्या, फार काय भारत-स्विस संबंधांच्या पलीकडे उमटण्याची शक्यता आहे आणि माझी खात्री आहे की सरकारमधले अनुभवी आणि बुद्धिमान चाणक्य हे सगळं फिगर आऊट करण्यात गुंतलेले असणार...
"सरकारमधले अनुभवी आणि बुद्धिमान चाणक्य" ह्या शब्दांवर माझा देखील विश्वास आहे. ते त्यांचे काम नक्कीच करत असतील. पण बोटचेपेपणा करण्यासाठी नोव्हार्टीस, स्वीस वगैरेची काळजी करण्याचे कारण नाही असेच वाटते.. ६५ चे युद्ध असोत, ७१ चे युद्ध असोत, (इंदीरा गांधींनी सातव्या आरमारावरून निक्सनला लिहीलेले पत्र माहीत आहे ना?), पोखरण १ असोत, पोखरण २ ला तर काय वाजपेयी नुसते पत्रकारांसमोर आले - प्रकल्प यशस्वी झाला म्हणाले आणि सरळ आत निघून गेले... या प्रत्येक वेळेस आंतर्राष्ट्रीय दबावाचा काय परीणाम काय होणार ह्यावरून चर्विचर्वण झाले होते, पण ते ते नेतृत्व आणि त्यांचे चाणक्य असल्या दबावाला बळी पडले नाहीत. त्या व्यतिरीक्त मला व्यक्तीगत याचे काही फार मोठे परीणाम होणार आहेत असे वाटत नाही. नोव्हार्टीसने तर आत्ताच जाहीर केले की काळजी घेऊ पण येथे धंदा पण करू आणि पेटंट पण फाईल करत राहू. एकच अपवाद होऊ शकतो, तो म्हणजे आपली सध्याची अर्थव्यवस्था... असे म्हणतात की ती १९९१ च्या काळाच्या जवळ जाऊ लागली आहे. तसे झाले तर काळजीचे कारण आहे. आता त्यातील दुसर्‍या मुद्याबद्दल (जो माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे कारण ते फाउंडेशन आहे).
तुमच्या प्रतिसादातील दुसर्‍या भागाशी (विज्ञानयोगी वगैरे कविता) अंमळ असहमत. हा भारतात फार पॉप्युलर असलेला आत्मताडनाचा प्रकार असला तरी तो सत्य आहेच असे नाही. भारतातही सक्षम, हरहुन्नरी, धडाडीचे लोक खूप आहेत.
मी भारतीयांमधे सक्षमता, हरहुन्नरी वृती आणि धडाडी नाही असे कुठे म्हणतोय? ते म्हणजे आरशासमोर उभे राहून नावे ठेवण्यासारखे होईल. "माझ्यालेखी भारताची आणि भारतीयांची प्रगती आणि वृत्ती खूपच चांगल्या अर्थाने बदलली आहे,.." असेच आधी म्हणले आहे. मुद्दा वृत्तीसंदर्भात अजिबातच नाही पण त्या वृत्तीच्या वापरासंदर्भात आहे. म्हणूनच तुम्ही जे म्हणालात, "पण त्यांना मोकळेपणाने काम करू दिलं जात नाही, कधी नकळत, बर्‍याचदा मुद्दामहून! हा खरा प्रॉब्लेम आहे." याला जबाबदार कोण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

त्यात कोर्टावर कुठलाही संशय

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/11/2013 - 21:20 नवीन
त्यात कोर्टावर कुठलाही संशय घेतलेला दिसत नाही,
संशय कुणीच घेत नाहीये, तुम्हीही नाही आणि आम्हीही नाही. त्यावर आपलं एकमत आहेच.
दुसरा भाग अर्थातच राजकारण्यांना मिळणारे पैसे.
नो कॉमेन्ट! त्या कचर्‍यात मी उतरू इच्छित नाही!! :)
त्या व्यतिरीक्त मला व्यक्तीगत याचे काही फार मोठे परीणाम होणार आहेत असे वाटत नाही.
गुड! तुम्हारे मूंहमें घी-शक्कर!
...हा खरा प्रॉब्लेम आहे." याला जबाबदार कोण आहे?
ते सगळ्या सूज्ञ माणसांना माहिती आहे, त्यावर आणखी चर्चा काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सारांश

नितिन थत्ते
गुरुवार, 04/11/2013 - 09:22 नवीन
रविवारच्या स्वामीनॉमिक्स मधील खालचा परिच्छेद या केसचा सारांश सांगतो. Many NGOs hailed the judgment for the wrong reason. The Cancer Patients Aid Association, which led the fight against Glivec, declared: “We are happy that the apex court has recognised the right of patients to access affordable medicines over profits for big pharmaceutical companies through patents.” False: no such right was recognized by the court. It simply said Novartis had not proved that the new variation was innovative enough. The court clarified that it would grant patents for variations that were more efficacious, but set a higher standard for proof than many western courts do.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा