Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुबोध खरे on Sun, 04/07/2013 - 14:48
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
हि १९९१ सालची गोष्ट आहे मी डॉकयार्ड दवाखान्यात रात्रीच्या तातडीच्या सेवा विभागात कामावर(ड्युटी) वर होतो याचा एक भाग म्हणून आय एन एस आंग्रे मध्ये असलेल्या नौदल पोलिसांच्या कोठडीला भेट देऊन तेथे असलेल्या कच्च्या कैदेतल्या सैनिकांची तपासणी करणे हा होता. अशा तपासणीच्या वेळी मी हटकून प्रत्येक सैनिकास का अटक झाली आहे? काय परिस्थितीत ते झाले आहे याची शहानिशा करीत असे.( मनोविकार शास्त्रात काम केल्यामुळे मला त्यात जर जास्त रस होता). असे त्या कोठडीतील सैनिक पाहत असताना एक संभाजी माने( किंवा जाधव असेल )वय २५ वर्षे या सैनिकासमोर आलो. त्याच्या बद्दल तेथे असलेल्या रक्षकाला विचारले कि याला कशापायी अटक झाली आहे? तो रक्षक म्हणाला कि हा एक वर्ष विना सुट्टी गैरहजर( absent without leave) होता.कालच आला आहे आणि आता त्याचे कोर्ट मार्शल होईल. मी संभाजी ला मराठीतच विचारले का रे बाबा का असा पळून गेलास? तर तो म्हणाला साहेब मला काहीच आठवत नाही. मी विचारले कि तू कुठे होतास तर तो म्हणाला मी येरवड्याला होतो.मी विचारले कि येरवड्याला कोणत्या गुन्ह्यासाठी? तर तो म्हणाला कि मी गुन्ह्यासाठी नव्हे तर तेथील मनोरुग्णालयात होतो. मी विचारले कशासाठी. तर तो म्हणाला मला आठवत नाही? किती दिवस होतास-- आठवत नाही. काय करत होतास --आठवत नाही तेथिल काय आठवते?-- तेथे मला मारहाण होत असे एवढेच आठवते. या संवादानंतर मी तेथल्या रक्षकास विचारले कि या संभाजीचे कागदपत्र कुठे आहेत. तर त्याने त्याचे काही कागद दाखवले त्यात त्याला स्किझो फ़्रेनिया आहे तो आता बरा आहे आणि नौदलाच सैनिक असल्याने त्याला नौदलाकडे सुपूर्द करण्यास कोणतीही हरकत नाही असे प्रमाणपत्र होते. मी तेथल्या रक्षकास विचारले कि इथला अधिकारी कुठे आहे. तर त्याने त्या अधिकार्याला बोलाविले मी त्या अधिकार्याशी बोललो आणि विचारले कि हा माणूस इथे कसा आला? त्याने सांगितले कि येरवड्याच्या मनोरुग्णालयातून आम्हाला पत्र आले कि असा असा नौसैनिक आमच्या रुग्णालयात आहे त्याला घेऊन जावे म्हणून आम्ही ३ माणसे पाठवून त्याला घेऊन आलो.तो येथील एका जहाजावरून सुट्टीवर गेला आणि परत आलाच नाही. त्याच्या घरी संपर्क केला तर घरच्यांनी तो येथे एक वर्षापासून आलाच नाही असे सांगितले. त्याला परत आणण्यासाठी आम्ही पोलिसांना अटक करण्याचे पत्र सुद्धा दिले होते पण हा एक वर्ष पर्यंत सापडला नाही आणि आता येरवड्यावरून पत्र आल्यावर आम्ही त्याला घेऊन आलो आता त्याचे कोर्ट मार्शल होईल आणि त्याला शिक्षा देण्यात येईल. मी त्या अधिकार्याला सांगितले कि हा माणूस मनोरुग्ण आहे आणि चौकशी खटला किंवा शिक्षा या दिव्यातून जाण्यास अक्षम आहे. त्यावर तो अधिकारी म्हणाला कि ते आम्हाला काही माहित नाही. त्यावर मी त्याच्या तुरुंग पुस्तीकेतील वैद्यकीय मथळ्यावर हा तुरुंगात ठेवण्यास अपात्र (UNFIT) आहे असे लिहून माझा शिक्का मारला. आनि त्या अधिकार्याला सांगितले कि आता तू याला तुरुंगात ठेवलेस आणि याने काही केले( आत्महत्या किंवा स्वतःला इजा तर ती तुझी जबाबदारी आहे. आता तो अधिकारी सरळ होऊन बोलू लागल कि डॉक्टर याच्या साठी काय करायला लागेल? तेंव्हा मी त्य्याला सांगितले मी आता पूर्ण तपासणी करून त्याला अश्विनी रुग्णालयातील मनोविकार विभागात भरती करण्यासाठी प्रमाणपत्र देतो. तुम्ही त्याला तेथे भरती करा.याला तो आनंदाने तयार झाला( कारण त्याच्यामागची एक कटकट टळत होती. मी संभाजीला आमच्या दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्याची पूर्ण तपासणी केली आणि त्याला अश्विनी रुग्णालयात भरती केले.काही दिवसांनी मी अश्विनी मध्ये गेल्यावर खालील माहिती उजेडात आली. संभाजी साताऱ्याजवळ एका खेड्यातून आला होता.तो सुट्टी घेऊन घरी गेला होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी देहावसान झाले होते. गावी त्याची आई मोठा भाऊ आणि वहिनी होती.तो सुट्टीवर गेल्यावर त्याच्या आईचे हृदयविकाराने देहावसान झाले. संभाजी मानाने आईच्या अतिशय जवळ आणि लाडका होता. त्याला या गोष्टीचा इतका धक्का बसला कि त्याला वेडाचा झटका आला. त्याच्या भावाने त्याच्या वर काही उपचार केले पण तो सुधारत नाही हे पाहून त्याला उचलून सरळ येरवड्याला भरती केले.तेथे त्याने हा नौदलात सैनिक आहे म्हणून कोणतीही माहिती दिली नाही. कारण? जमिनीत हिस्सा देण्यापेक्षा भावाला वेडा ठरवून येरवड्याला पाठविले तर आपसूक काम होते. येरवड्याला त्याच्यावर त्यांनी उपचार केले जेंव्हा तो सुधारू लागला तेंव्हा त्याने आपण कोण काय करतो हे सांगितले तो बरा झाला तरी त्याची गेल्या वर्षातील घटनांची स्मृती गेलेली होती( RETROGRADE AMNESIA) असे स्किझो फ्रेनियात होते हे मला माहित होते त्यामुळे तो खोटे बोलत नाही हे मला माहित होते( नौदल पोलिसांना ते पटत नव्हते कि एक वर्ष भर आपण कुठे होतो ते त्याला आठवत नाही हे त्यावर त्यांनी नौदलाशी पत्रव्यवहार करून त्याला मुंबईला पाठविले होते. त्याला एक महिना अश्विनी रुग्णालयात ठेवल्यावर तेथून त्याला मुक्त केले( डिसचार्ज) दिला. त्यानंतर त्याचे रीतसर कोर्ट मार्शल झाले आणी त्याचा एक वर्षाचा पगार( जे त्याने काम केलेले नव्हते) कापून नोकरीत कायम ठेवण्यात आले आणि त्याच्यावरील सर्व आरोपातून त्याची मुक्तता करण्यात आली. २) असाच एके दिवशी मी डॉक यार्ड दवाखान्यात रात्रपाळीला बसलो होतो तेंव्हा आय एन एस आंग्रे मधून नौदलाचे पोलीस एका सैन्यातील(ARMY) च्या सुभेदार साहेबाना (वय ४८ वर्षे) घेऊन आले. त्याला आंग्रे येथील कोठडीत ठेवण्य़ा पूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ते घेऊन आले होते.सुभेदार साहेबांबरोबर त्यांचा मुलगा सुद्धा आला होता. मी त्याला विचारले कि यांना कशासाठी अटक झाली आहे? त्यावर तो म्हणाल माझे वडील सुट्टी न घेता पळून आले होते. मला एक गोष्ट कळेना कि जो माणूस २८ -२९ वर्षे नोकरी केलेला आहे तो पळून का जाईल?त्यावर तो मुलगा म्हणाला कि ते ८ महिन्यात निवृत्त होणार आहेत तरी का पळून आले ते कळत नाही.मी सुभेदार साहेबाना विचारले कि काय मामला आहे तेंव्हा ते असंबद्ध असे पुटपुटत होते. मला कुठेतरी काहीतरी चुकत होते असे वाटत होते. मी सुभेदार साहेबांची पूर्ण तपासणी करीत होतो तेंव्हा मला त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे जाणवले. मी मुलाला विचारले कि त्यांची तब्येत कशी आहे? त्यावर तो मुलगा म्हणाला कि ते आजकाल विचित्रपणे वागतात धड कुणाशी बोलत नहीत काहीतरी पुट पुटत राहतात. आत्ता २ महिने सुट्टी साठी घरी आले होते आणी परत गेल्यावर एक आठवड्यात परत घरी आले म्हणून मी त्यांना घेऊन आलो आहे.मला त्यांचे वागणे विचित्र वाटत होते पण कोणत्याही मनोरोगाच्या व्याख्येत त्यांचे वागणे बसत नव्हते. मी म्हटले असेल एखाद वेगळा रोग जो आपण पाहिलेला नाही( नाहीतरी माझा मनोविकाराचा अनुभव आहेच किती?)पण त्याला मनोविकार तज्ञांकडे पाठवणे जरुरी आहे. त्यांची शारीरिक तपासणी मध्ये फारसे काही निष्पन्न झाले नाही.मी त्या नौदल पोलिसांना सांगितले कि सुभेदार साहेब मानसिक दृष्ट्या कोठडीत ठेवण्यास अपात्र आहे. मी तुम्हाला तसे प्रमाणपत्र देतो त्याला अश्विनीच्या मनोरुग्ण विभागात भरती करा. त्यावर त्यांनी त्याला मान्यता दिली.( नाहीतरी अशा कटकटी त्यांना नकोच असतात) सुभेदार साहेब अश्विनीत भरती झाले दोन दिवसांनी मी काय झाले ती हाल हवाल पाहण्यासाठी गेलो तेंव्हा त्यांचा सी टी स्कॅन झाला होता आणी त्यांच्या मेंदूत एक ट्युमर(TEMPORAL LOBE GLIOMA) असल्याचे निदान झाले होते. यथावकाश सुभेदार साहेबांच्या मेंदूतील ट्युमर शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला गेला आणी त्यानंतर सहा महिन्यांनी ते सन्मानाने निष्कलंक रित्या निवृत्त झाले. क्रमशः
  • Log in or register to post comments
  • 9978 views
  • सैर भैर २

Book traversal links for सैर भैर

  • सैर भैर २ ›

प्रतिक्रिया

Submitted by चौकटराजा on Sun, 04/07/2013 - 14:58

Permalink

अजब तेरी कारीगरी रे ..

मी मेल्यानंतर समजा मला चित्रगुप्ताचे विचारले की तुला व्यक्त व अव्यक्त अशा कोणत्या दोन वस्तू पृथ्वीतलावर विस्मयकारक वाटल्या . "व्यक्तात पाणी हा पदार्थ व अव्यक्तात मन " !
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sun, 04/07/2013 - 18:54

In reply to अजब तेरी कारीगरी रे .. by चौकटराजा

Permalink

वा

वा:! लेख आणि पहिला प्रतिसाद फार फार आवडले...
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sun, 04/07/2013 - 17:06

Permalink

डॉक्टरसाहेब, तुमचे लेख डोळे

डॉक्टरसाहेब, तुमचे लेख डोळे उघडतात आणि एक नवीन नजरही देतात.. अजून काय लिहू :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 04/07/2013 - 17:27

Permalink

सहानुभूती वाटते.

विस्मयकारक. पहिल्या केस मधील भावाचे स्वार्थी वागणे मनाला फारच बोचणारे आहे. मनाला जयवंत दळवींनी 'महासागर' ही उपमा दिली आहे ती अगदी समर्पक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sun, 04/07/2013 - 17:42

Permalink

छान लिखाण

पुर्ण माहिती घेवुन निर्णय घेणे महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 04/07/2013 - 19:02

Permalink

मनाचिये गुंती..

मन केवढं केवढं जसा खाकसाचा दाणा! मन एवढं एवढं आभायात माईना..!
आपल्या सगळ्या कृती मनाच्या सांगण्यामुळे किंवा न सांगण्यातून होतात. त्या मनानेच असहकार पुकारला तर काय होतं हे छान सांगितलंत. यातली पहिली केस ही निव्वळ मनाच्या आजाराची आहे तर दुसरी शारीरिक आजारामुळे झालेल्या मानसिक परिणामाची. शरीर आणि मन, एकाचा आजार दुसर्‍यावर परिणाम करतो हे ऐकलं आहे आणि पाहिलं आहे. या दोन्हीत शक्य तेवढा सुसंवाद ठेवायचा प्रयत्न करायचा एवढंच आपल्या हाती.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sun, 04/07/2013 - 19:48

Permalink

भावाच्या कृतीचे वाईट वाटले पण

भावाच्या कृतीचे वाईट वाटले पण नवल मात्र वाटले नाही , असामी असामी वाचत ,पाहत लहानाचे मोठे झालो आहोत. पण खरे साहेबांनी दोन्ही प्रसंगात योग्य समयसूचकता दाखवली. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 04/07/2013 - 21:07

In reply to भावाच्या कृतीचे वाईट वाटले पण by निनाद मुक्काम …

Permalink

+११११११११११११११.

+११११११११११११११.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 04/07/2013 - 21:27

In reply to +११११११११११११११. by बॅटमॅन

Permalink

+११११११११११११११.

+११११११११११११११.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on Sun, 04/07/2013 - 20:35

Permalink

एकसेएक विलक्षण अनुभव आहेत.

एकसेएक विलक्षण अनुभव आहेत. निदान ह्या दोन माणसांचे आयुष्य सुधारले, काही लोकांच्या नशिबात ते ही नसते. अजुनही मानसिक आजारांबद्दल भारतात भयंकर औदासिन्य आहे. मोठ्या शहरांत जरातरी संख्येत डॉक्टर आहेत, खेड्यापाड्यांमध्ये काय होत असेल देव जाणे. उत्तम लेख, पुढील लेख लवकर टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Mon, 04/08/2013 - 14:10

Permalink

छान लेख...

तुमचे अनुभव नेहमीच विलक्षण असतात
  • Log in or register to post comments

Submitted by Mrunalini on Tue, 04/09/2013 - 12:22

Permalink

सुंदर लेख.. पु.भा.प्र.

सुंदर लेख.. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 04/09/2013 - 12:36

Permalink

विचित्र आणि चमत्कारिक

विचित्र आणि चमत्कारिक परिस्थितीचे यथार्थ वर्णन.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Tue, 04/09/2013 - 20:24

Permalink

नशीब, तुम्ही वेळेवर भेटलात त्यांना!!

देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो!! समाजाला आपल्या ज्ञानाचा असाच उपयोग होवो!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 04/09/2013 - 21:12

In reply to नशीब, तुम्ही वेळेवर भेटलात त्यांना!! by अनन्न्या

Permalink

+११११११११११११११.

+११११११११११११११. नि आम्हाला सारासारविचार करण्याची नि समजून घेण्याची अक्कल! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 04/09/2013 - 21:46

Permalink

बापरे !!

इतक्या कॉम्प्लेक्स यंत्रणेचा अभ्यास करुन आपलं डोकं ठिकाणावर ठेऊन दुसर्‍याच्या मनाचा इलाज करायचा... व वेळप्रसंगी निर्णय देखील घ्यायचा... अवघड आहे राव. पण म्हणुनच इतके सगळे गुन्हे करुनही आपल्याला मनुष्यप्राणी खुप आवडतो बॉ. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 04/09/2013 - 22:39

Permalink

हृदयस्पर्शी लेख

विमनस्क मनांवर उपचार करणार्‍यांच्या मनस्थितीचे कौतुक वाटते. एकंदरीतच मनोव्यापाराचा सेंद्रिय गाभा मला नेहमीच गूढरम्य वाटत आला आहे. तुमच्या लेखांतून एका संवेदनशील डॉक्टराचे दर्शन घडते आहे. अशी माणसे आणि विशेषतः असे डॉक्टर आजकाल दुर्मिळ नक्कीच झाले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 04/09/2013 - 22:41

In reply to हृदयस्पर्शी लेख by एस

Permalink

+१

लेख वाचून असेच विचार मनात आले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 04/09/2013 - 23:56

In reply to हृदयस्पर्शी लेख by एस

Permalink

तंतोतंत सहमत !!

>>अशी माणसे आणि विशेषतः असे डॉक्टर आजकाल दुर्मिळ नक्कीच झाले आहेत. डॉक्टर जगवतात की नागवतात असा विचार करायला लागणार्‍या प्रसंगातून गेल्यानंतर असे डॉक्टर पाह्यले की कौतुक वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 04/10/2013 - 15:24

Permalink

ह्म्म

बराच काळ एकटे राहणे, परिवारापासून दूर, आपली दु:खे शेअर करायला जवळच्या व्यक्तींची कमतरता यामुळे सैनिकांमध्ये स्किझोफ़्रेनिया (आणि एकूणच लहान-मोठ्या मानसिक विकारांचे) प्रमाण सर्वसामान्य प्रमाणापेक्षा अधिक आहे असे ऐकून आहे. तुमचा अनुभव काय?
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 04/10/2013 - 15:49

In reply to ह्म्म by ऋषिकेश

Permalink

माझ्या माहितीप्रमाणे

माझ्या माहितीप्रमाणे स्किझोफ्रेनिया हा विकार बाह्य कारणानी होत नाही. तो ऑरगॅनिक विकार आहे.त्याचे कारण मेंदूतील रचनेतच सापडते.पण बाह्य कारणानी तो बळावत असावा हे नक्की. जास्त माहिती खरे साहेब च देतील म्हणा !
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 04/10/2013 - 16:08

In reply to माझ्या माहितीप्रमाणे by चौकटराजा

Permalink

ओके. असेलही कल्पना नाही!

ओके. असेलही कल्पना नाही! (म्हणूनच शहानिशा करायला विचारले) किंवा असेही असेल की शारीरिक दुखणे सैनिक डॉक्टरांपर्यंत सहन करत असतील, मात्र मानसिक दुखणे लहान गट असल्याने लगेच लक्षात येत असावे. सामान्य नागरीकांचे अगदी उलटे आहे. शारीरिक दुखण्यांसाठी ते डॉक्टरकडे धावतत पण मानसिक आजार बाहेर कळला तर काय या भितीने घरातले लपवून ठेवतात. अर्थात डॉक्टरसाहेब सांगतीलच!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 04/10/2013 - 19:54

In reply to ओके. असेलही कल्पना नाही! by ऋषिकेश

Permalink

मनोविकार आणी लष्कर

काही मानसिक आजार हे लष्कराच्या कठीण काटेकोर आणी खडतर अशा प्रशिक्षणाच्या कालावधीत लक्ष्यात येतात. असे प्रशिक्षणार्थी ते प्रशिक्षण पूर्ण करण्यास असमर्थ असल्यामुळे लष्करात भरती होण्यास अपात्र ठरतात. असे आजार त्यामुळे लष्करात कमी दिसतात (उदा चिंता(ANXIETY) ,नैराश्य(DEPRESSION) घाबरगुंडी(PANIC) ई. स्किझोफ्रेनिया सारखे आजार सर्व सामान्य लोकांनइतकेच असतात. काही न्युरोसीस सारखे आजार लष्करात जास्त दिसतात ते एकटेपणामुळे किंवा खडतर आयुष्यामुळे आणि काही आजार लष्करी व्यवसायामुळे(professional hazards) दिसतात उदा.(PTSD post traumatic stress disorder)आघातजन्य तणाव सारखे आजार (हे अत्यंत तणावपूर्ण वातावरणात राहणाऱ्या लोकांना जास्त होतात उदा नक्षलवादी भागात काम करणारे पोलिस ई ) हे जास्त प्रमाणात आढळतात. दारू मुळे होणारे आजार हे लष्करात जास्त प्रमाणात दिसतात( यात माझे कोणतेही वैयक्तिक मत नाही हे जगभरच्या लष्करी आकडेवारीत असेच दिसते)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 04/10/2013 - 16:06

Permalink

डॉ साहेब आपण मनोविकार

डॉ साहेब आपण मनोविकार शास्त्रात काम केले नसते तर या कैद्यांना कोण वाली होता? आताशी कुठ मनोविकारांबद्दल जागृती होउ लागली आहे. लेख वाचताना मला डॉ श्रीकांत जोशी यांचे मनोविकारांचा मागोवा हे पुस्तक आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 04/10/2013 - 18:44

In reply to डॉ साहेब आपण मनोविकार by प्रकाश घाटपांडे

Permalink

मनोविकारांबद्दल जागृती

साहेब, असा कोणी कोणाचा वाली नसतो. मी त्यांना पहिले नसते तर अजून थोड्या काळाने इतर लोकांच्या ते लक्षात आलेच असते. काही वेळेला उशीर झाल्यामुळे रोग बारा होण्यास किंवा आटोक्यात येण्यास जास्त वेळ लागतो इतकेच.जितके सर्वसामान्य माणसांचे या रोगांबद्दल ज्ञान वाढेल तितके त्यावर उपचार लवकर होतील आणी या रुग्णांचे हाल कमी होतील
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 04/10/2013 - 18:39

Permalink

तुम्ही समयसूचकतेने घेतलेल्या

तुम्ही समयसूचकतेने घेतलेल्या निर्णयांचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चावटमेला on Wed, 04/10/2013 - 20:37

Permalink

उत्तम लेख. आवडला. पुलेशु

उत्तम लेख. आवडला. पुलेशु
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 04/10/2013 - 23:47

Permalink

मस्त लेख...

आवडला..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com