हि १९८८ सालची गोष्ट आहे. मी नौदलाच्या अश्विनी या ८२५ खाटा असलेल्या कुलाब्याच्या रुग्णालयात इंटर्नशिप करीत होतो. स्त्रीरोग शास्त्राच्या प्रभागात(वार्ड) मध्ये माझी नेमणूक होती. सर्वात लहान(कनिष्ठ) डॉक्टर असल्याने प्रभागातील हमाली कामे(रुग्णाला बेशुद्धीकरणा पूर्वीची तपासणी करून घेणे त्यासाठी लागणार्या सर्व तपासण्या करून घेणे रुग्णाकडून शस्त्रक्रिये पूर्वीची परवानगी लिखित घेणे ई.) हा वारसा हक्क माझ्याकडे होता.
एके दिवशी सकाळी आमचे विभागप्रमुख सर्जन कप्तान सुरंजन मुखर्जी यांनी मला एका अधिकार्याचा वीर्य तपासणी अहवाल प्रयोग शाळेतून आणण्यास सांगितले. मी आदेशाप्रमाणे तो अहवाल घेऊन आलो त्यात शुक्राणू नाहीत असा निर्वाळा होता. अर्थात याची पार्श्वभूमी मला माहित होती. ती अशी
वरील अधिकारी हा आपली नसबंदी ३ महिन्यांपूर्वी करून गेला होता. परंतु त्याची पत्नी गरोदर आहे असा तिचा मुत्र तपासणी अहवाल सांगत होता.नसबंदी केल्यावर पहिले ३ महिने पर्यंत स्त्रीसंबंध ठेवताना गर्भनिरोधक वापरणे गरजेचे असते कारण अगोदर तयार होऊन वीर्य नलीकेत शिल्लक राहिलेले शुक्राणू गर्भधारणा करू शकतात. आपले जाट भाई सैनिक अशी कोणतीही काळजी घेत नसत आणि बायका गरोदर झाल्या तर त्यांना मारहाण करून 'साफ सफाई" करण्यासाठी येत असत.पण हा सुशिक्षित अधिकारी होता आणि त्या अधिकार्याने अशी सर्व काळजी घेतली होती पण तरीही त्याची पत्नी गर्भार आहे हे पाहून तो तिला रुग्णालयात घेऊन आला होता.
आता हा अहवाल पाहून मुखर्जी सर( विभागप्रमुख) पण जरा चक्रावलेच. त्यांनी त्या स्त्रीला भेट देण्याच्या अगोदर स्त्रीरोग विभागातील आम्हा सर्व डॉक्टरना आपल्या खोलीत बोलावले आणि सांगितले कि मी आता जे करणार आहे ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तुम्ही ते करावे कि नाही हे सुद्धा मी सांगू शकत नाही पण मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असे करीत आहे.त्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी मी कदाचित चुकीचे काम करणार आहे.पण मी हे पूर्ण सदभावमूलक मनोवृत्तीने (BONAFIDE INTENTION) करीत आहे तुमच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही तुम्हाला पटेल तसे करा.
यानंतर आम्ही अधिकार्यांच्या कौटुंबिक वार्ड राउंड ला गेलो तेंव्हा त्या स्त्री च्या कक्षात जाऊन तिला असे सांगितले कि "बेटी तू जे काही करते आहेस ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तू ते करावेस कि नाही हे सांगण्याचा माझा अधिकार नाही पण वयाच्या अनुभवाने मला असे वाटते कि तू जे करीत आहेस ते बरोबर नाही. आता तुझ्या यजमानांचा अहवाल शुक्राणू नाहीत असे दाखवीत आहे त्यावर काय करायचे आहे. ती काहीच बोलली नाही.त्यांनी असे सुचवले कि आत्ता तर गर्भपात करणे आवश्यक आहे.तो आपण करू त्याबरोबर तुझे गर्भनलिका बंद करण्याची शस्त्रक्रिया पण करू आणि या स्थितीत तू म्हणत असशील तर मी तुझ्या यजमानांना काहीच सांगत नाही.तुझे कौटुंबिक जीवन सुरळीत होण्याचा मला हा एकच उपाय दिसतो आहे यावर तिने होकार दिला.
यावर तिच्या नवऱ्याला असे कधी कधी होते त्याला सांगितले कि नसबंदी ची शस्त्रक्रिया कधीकधी फेल जाते(नीट होत नाही)आणि म्हणून एकाच बेशुद्धीकरणात आपण गर्भपात आणि नलीकाबंदी ची शस्त्रक्रिया करून टाकू. हे सांगून तिचा गर्भपात आणि गर्भनिरोधक शस्त्रक्रिया केली.
आजही हि गोष्ट मला वारंवार आठवते कारण सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करताना एखादा रुग्ण कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात (stage) असलेला आढळतो. कर्करोगाच्या विभागात काम करीत असताना घेतलेल्या अनुभवातून माहित असते कि या रुग्णाचा रोग शस्त्रक्रियेच्या पलीकडे गेला आहे आणि याचे काही दिवस किंवा महिने शिल्लक आहेत. अशा रुग्णाला अहवाल सांगण्याची पाळी येते तेंव्हा मी अनेकदा असे सांगितले आहे कि तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज नाही औषधाने उपाय होऊ शकतो.(हे करताना मी अनेकदा तोंड फिरवून डोळे पुसले आहेत)
शब्द हे फसवे असतात, हे बोलणे खोटे आहे हे मला पूर्ण माहित असते पण दुसरे काय करता येईल हे मला अजून तरी समजलेले नाही. रुग्णाला सत्य सांगितले कि आपले शेवटचे काही दिवस बाकी आहेत तर त्याला धक्का बसतो त्याचे शेवटचे दिवस कष्टात जातात.(अज्ञानात आनंद असतो).कर्करोगाच्या विभागात असे शेवटच्या टप्प्यातील अनेक रुग्णांनी मला विचारलेले आहे कि साहेब आम्ही या रुग्णालयातून घरी जाऊ शकू का? मी उत्साहात त्यांना नक्कीच म्हणून उत्तर हि दिले आहे.त्यावर त्यांनी मोठ्या आनंदाने मला हात वर करून धन्यवाद दिले आहेत. पण पहिल्यांदा जेंव्हा हा प्रश्न आला तेंव्हा माझ्या मनात एकच विचार आला कि आपण रोज या रुग्णालयात यतो पण आपण येथून कधीच जिवंत बाहेर पडणार नाही हा विचार किती भयानक आहे
माणूस म्हणून आपण किती तोकडे आहोत हि जाणीव वारंवार टोचत राहते.
माझ्या भावाच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यवस्थापकाच्या वडिलांना कर्करोग झाला होता तेंव्हा त्याने मला सांगितले कि तू वडिलांना काहीही सांगू नको. मी त्याला म्हटले कि मी सांगत नाही पण त्यांना ते समजून चुकेल.कालपर्यंत ते काही बोलत असताना तुम्ही पूर्ण लक्ष देत होतात असे नाही पण आज नंतर तू किंवा तुझी बहिण त्यांनी पाणी मागितले तर धावून धावून कराल.हे न कळण्या इतके ते मूढ नाहीत.
हि मानवी वृत्ती आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला किमत कळते जेंव्हा ती आपल्याकडे नसते किंवा ती नाहीशी/ गहाळ झाली.
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात (सत्य बोला प्रिय बोला कटू सत्य बोलू नका )
प्रतिक्रिया
28 Mar 2013 - 12:49 pm | अक्षया
सत्य बोला प्रिय बोला कटू सत्य बोलू नका. हे एकदम पटले.
28 Mar 2013 - 1:17 pm | पिलीयन रायडर
अच्छा असं होय.. शीर्षक वाचून मला वाटलं की तुम्ही दुसर्याच मुद्द्यावर बोलत आहत!!
असो..
तुम्ही जे केलतं ते मला तरी योग्य वाटलं. तुमचे अनुभव नेहमीच वेगळे असतात..असंच लिहीत रहा!
28 Mar 2013 - 1:33 pm | मन१
तुमचे अनुभव नेहमीच वेगळे असतात..असंच लिहीत रहा!
+१.
28 Mar 2013 - 2:26 pm | सोत्रि
+२
-(कधी कधी खोटे बोलणारा) सोकाजी
28 Mar 2013 - 1:19 pm | कवितानागेश
हम्म.... खरंय.
28 Mar 2013 - 2:33 pm | चावटमेला
कटु सत्य बोलू नये हे मात्र खरंच :(
28 Mar 2013 - 2:55 pm | ऋषिकेश
फारसं पटलं नाही.. डॉक्टरांनी पेशंट कितीही दुखावण्याची शक्यता असली तरी सत्यच सांगावे अशी माझी एक पेशंट म्हणून अपेक्षा असते. जर पेशंटने डॉक्टरला दुखणे सांगताना काही लपवू नये अशी अपेक्षा असते तशीच अपेक्षा पेशंट म्हणून माझीही असते.
असो..
28 Mar 2013 - 5:22 pm | सुबोध खरे
आपले म्हणणे कायद्याच्या भाषेत सत्य आहे आणि प्रत्येक रुग्णाला त्याला कर्करोग झाला आहे हे मी सांगतोच कारण पुढचे इलाज करण्यासाठी रुग्णाला आपल्याला काय झाले आहे ते माहित असणे आवश्यक असते
पण हा रोग असाध्य आहे आणि आपले काही दिवस शिल्लक आहेत हे सांगणे फार कठीण आहे. त्याला शस्त्रक्रियेची गरज नाही हे सांगतो ते जेंव्हा शस्त्रक्रिया शक्य नाही तेंव्हा.बाकी सत्य परिस्थिती त्या रुग्णाच्या सर्वात जवळच्या नातेवाईकाला नेहमीच सांगितली जाते.
यात सर्व काळे किंवा पांढरेच असते असे नाही मधल्या बर्याच छटा असतात. एक सत्य गोष्ट ओघात सांगतो आहे.
मी पुण्यात कमांड हॉस्पीटल मध्ये (१९९७) काम करीत असताना लोणावळ्याच्या आय एन एस शिवाजी मधून एक मेडिकल व्यवस्थापकीय अधिकारी आपल्या पत्नी च्या सोनोग्राफी साठी आला. त्याच्या सासर्यांची( वय ७२ वर्षे) सोनोग्राफी केल्यावर त्यांना मूत्रपिंडाचा एक आनुवंशिक रोग झाल्याचे निदान झालेत्यात त्यांची मूत्रपिंडे काम कर्णाशी झाली होती आणि पुढच्या ४ते ५ वर्षात त्यांना मूत्रपिंडे रोपण करावी लागणार होती. आता हा रोग अनुवांशिक असल्याने त्या अधिकार्याच्या पत्नीला आपली काळजी वाटू लागली आणि ती आपल्या नवर्या बरोबर पुण्याला सोनोग्राफी साठी आली होती
क्षमा करा
क्रमशः
28 Mar 2013 - 6:40 pm | सुबोध खरे
तिची सोनोग्राफी केल्यावर मला असे लक्षात आले कि तिला हा रोग (ADPKD -autosomal dominant polycystic kidney disease) आहे पण मी आमच्या सरांना( कर्नल आनंद) एकदा तिला पाहण्यासाठी बोलावले. त्यांनी तिला पाहिले आणि काहीही न बोलता नॉर्मल रिपोर्ट लिहून दिला आणि त्यांना सांगितले कि काळजीचे काहीही कारण नाही.
ते गेल्यावर मी सराना विचारले की सर त्यांचा रिपोर्ट तर नॉर्मल नाही मग तुम्ही नॉर्मल कसा दिलात? त्यावर सरानी असे सांगितले कि त्यांच्या वडिलांची मूत्रपिंडे वयाच्या ७५-७७ व्या वर्षी निकामी होत आहेत
आपण जर त्यांच्या मुलीच्या बाबतीत ते ५-७ वर्षे अगोदर होईल असे गृहीत धरले तरी सत्तर वर्षापर्यंत काही होत नाही.
मूत्रपिंडे नाकाम होण्यापासून तू तिला वाचवू शकत नाहीस.मूत्रपिंडे निकामी झाल्यावर तिला पुनर्रोपण( ट्रान्सप्लांट) करावेच लागेल तेंव्हा आताच तिला ब्लड प्रेशरने का मारायचे? म्हणून मी त्या रिपोर्ट वर सही केली तुला करायला सांगितली नाही.
हीच परिस्थिती आता १५ वर्षांनी उद्भवली.माझ्याकडे एक स्त्री पोटात दुखते म्हणून आली तेंव्हा मला असे जाणवले कि तिला वर म्हटलेला रोग(ADPKD) आहे.(पोटदुखीशी संबंध नाही). मी काहीही न बोलता तिच्या रिपोर्ट मध्ये लिहून दिले कि तिला ADPKD आहे. त्या त्यांच्या डॉक्टर कडे गेल्या त्यांनी त्यांना इत्यभूत माहिती दिली आणि सांगितले कि तुमच्या दोन्ही मुलीना हा रोग होण्याची शक्यता आहे तर तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. त्या परत सोनोग्राफीसाठी आल्यावर त्यांना हा रोग दोन्ही मुलीना आहे हे कळले.
आता शृंगापत्ती अशी आहे कि मुलींच्या लग्नाच्या वेळी त्यांना मूत्रपिंडाचा अनुवांशिक आजार आहे हे सांगितले तर त्यांच्याशी कोण लग्न करणार ? आणि हि गोष्ट लपवली तर त्याचे ओझे आयुष्यभर ते आई वडील आणि दोन्ही मुलीना आपल्या डोक्यावर वागवावे लागणार. त्यांच्या आईची मूत्रपिंडे ४७ वयाला व्यवस्थित काम करीत आहेत आणि बहुधा अजून २० वर्षे तरी जातील असे मला वाटते.
सत्य जाणून घेतल्याने कुणाचा फायदा झाला? मी फक्त रिपोर्ट मध्ये लिहिले होते कि त्या बाईना रोग आहे तो अनुवांशिक आहे हे माहित नसते तर त्या मुली आनंदात जगल्या असत्या. आता आयुष्य भरासाठी एक ओझे डोक्यावर घेऊन त्या चालत आहेत म्हणून मी हे म्हटले आहे सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात.
वैद्यकीय शास्त्रात २+२ = ४असतेच असे नाही कधीकधी ती बेरीज करताच येत नाही
आपला गोंधळलेला
सुबोध
29 Mar 2013 - 9:24 am | ऋषिकेश
क्षमस्व. तुम्हाला हे बेकायदेशीर आहे हे माहित आहे तरीही तुम्ही हे केलेत त्यामागचे कारण अजिबात पटले नाही.
स्पष्टच मत देतो राग नसावा:
तुम्ही फक्त तुमच्या मनाला त्रास होऊ नये, टोचणी राहु नये या कारणाने असे केले असे दिसते. यातून जरी तुमचे हळवे म्हणा विचारी म्हणा मन दिसते तरी त्या रुग्णाविषयी कोणतीही माहिती नसताना स्वतःच्या मनाची टोचणी टाळायला (आणि काहि प्रमाणात अहंगंड कुरवाळायला?) हे तथाकथित थोर्थोर काम करणे अनएथिकलही आहे. माझ्यामते रुग्ण-डॉक्टरचे नाते हे विश्वासावर असते आणि अशी गोष्ट लपवणे हे विश्वासघातकी कृत्य आहे.
उद्या रुग्णाने उगाच डॉक्टरांना त्रास नको म्हणून मी काही गोष्टी सांगितल्या नाहित हे ऐकणे जितके हास्यास्पद वाटेल तितकेच "मी त्याच्या आयुष्याचा / परिणामांचा विचार करून असे असे केले" हे म्हणणे आत्ममग्न / दांभिक वाटते.
29 Mar 2013 - 10:03 am | सुबोध खरे
साहेब,
मी केलेले कोणतेही कृत्य बेकायदेशीर नाही.रुग्ण माझ्याकडे फक्त सोनोग्राफी साठी आला होता त्याची सोनोग्राफी मी केली आणि त्याचा रिपोर्ट दिला.यात माझ्या मनाची टोचणी किंवा थोरपणाचा भाग कुठे आला ते समजले नाही. मुळ रुग्ण ज्या डॉक्टरांचा असतो त्यांची हि जबाबदारी असते.वरील बाबतीत उत्साहाच्या भरात त्या डॉक्टरांनीतिला हा रोग(ADPKD) आहे आणि त्याचे परिणाम सांगितले असते तरी चालले असते तिला हा रोग अनुवांशिक आहे आणि तुमच्या मुलीना पण तो १०० %होईल हे सांगितले नसते तरी चालले असते असे मी म्हटले आहे.प्रत्येक बाबतीत १०० टक्के माहिती देणे हे अमेरिकन कायद्यात आहे पण भारतीय कायद्यात तसे नाही.
शक्य असेल ती सर्व माहिती रुग्णाला द्यावी पण जर आपण १ एस्प्रोने रुग्ण दगावू शकतो( शक्यता १:१०००००) हे जर प्रत्येक रुग्णाला सांगितले तर केवळ भयगंड (fear psychosis) करण्याशिवाय दुसरे काहीही निष्पन्न होणार नाही. यात अन एथिकल काहीच नाही. प्रत्येक वेळी भूल देण्याच्या वेळेला त्याचा होणारा प्रत्येक परिणाम( शेकडो किंवा हजारो परिणाम होतात) जर रुग्णाला सांगितला तर रुग्णाची अवस्था फार कठीण होईल.हा एथिक्स चा मामला जगभर वर्षानुवर्षे चालू आहे आणि वेगवेगळ्या न्यायालयांनी यावर इतकी वेगवेगळी न्यायपत्रे दिली आहेत कि सर्व सामान्य डॉक्टरच काय पण नामांकित वकील सुद्धा अचंबित झाले आहेत. रुंगणाला आवश्यक हि माहिती दिलीच पाहिजे यात कोणताही वाद नाही तरीही रुग्णाला तुझा रोग बरा होणार नाही आणि तू येत्या काही दिवसात मरणार आहेस हि माहिती देणे कितपत आवश्यक आहे हा वादाचा मुद्दा आहे.जोवर तुम्ही हि माहिती रुग्णाच्या सर्वात जवळच्या नातेवाईकाला ( बायकोला/ नवर्याला/ आईला )देता तोवर यात विश्वासघात आहे असे मला वाटत नाही.
थोड्या दिवसात आपल्याकडे सुद्धा अमेरिकन तर्हेची DEFENSIVE MEDICAL PRACTICE येतेच आहे.
असो,आपले मत आपल्यापाशी.
29 Mar 2013 - 1:02 pm | ऋषिकेश
बाकी प्रतिसाद त्याच पठडीतला असल्याने पुन्हा त्याच मुद्यांवर खंडन करण्यात हशील दिसत नाही. मात्र,
याच्याशीच असहमत आहे आणि मला हा रुग्णाच्या दृष्टीने विश्वासघात वाटतो.
शिवाय तुम्ही प्रशिक्षित असूनही रुग्णाला त्यातील धोके योग्य प्रकारी समजावून सांगायच्या ऐवजी ती महत्त्वपूर्ण जबाबदारी अत्यंत भावनिक होऊ शकणार्या आणि अश्या बाबतीत रुग्णाशी कसे कम्युनिकेट करावे याचे जराही प्रशिक्षण नसणार्या व्यक्तीवर (आई/नवरा/बायको वगैरे) ढकलत आहात, जे अनएथिकलही आहे!
28 Mar 2013 - 2:56 pm | आदूबाळ
सुबोधसाहेब, "सत्यं ब्रूयात"चा सिद्धांत कर्करोगाविषयी पटेलसा आहे, पण त्या अधिकार्याच्या पत्नीबाबत नाही पटला बुवा.
समजा त्या महिलेने उद्योग केलेच असतील, तर या उपायाने तिला (धडा मिळण्याचं सोडून) उत्तेजन दिल्यासारखं होत नाही का? डॉ मुखर्जींनी आजचा भस्मासुर गाडला, पण तो उद्या उपटला तर?
28 Mar 2013 - 4:50 pm | सुबोध खरे
हाच प्रश्न मी मुखर्जी सराना तेंव्हा विचारला होता.
ते शांत पणे म्हणाले कि हि मुलगी तरूण आहे आणि एखादे वेळेस चूक झाली असेल. म्हणून मी तिला शस्त्रक्रियेपूर्वी सांगितले कि बेटी एकदा चूक झाली ठीक आहे परत परत चूक केलीस तर परिणाम काय होतील ते तुला माहित आहे तेंव्हा काळजी घे . पुढे ती आणि तिचे नशीब.
28 Mar 2013 - 3:59 pm | प्यारे१
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!
पुन्हा स्वाक्षरी ठेवावी काय?
28 Mar 2013 - 4:21 pm | पैसा
प्रत्येक माणूस आणि प्रसंग वेगळा असतो. सगळ्या बाजूंचा विचार करून सर्वात कमी नुकसान करणारा निर्णय अनेकदा घ्यावा लागतो. एका डॉक्टरला त्याचे पेशंट असलेल्या वेगवेगळ्या माणसांशी सतत प्रसंगानुरुप वागावे लागते. यापूर्वीही कुटुंब महत्त्वाचे हे ठरवून तुम्ही अनेकदा असे निर्णय घेतलेले वाचले आहेत! मला वाटते तुम्हाला डॉक्टर होणे सोपे गेले असेल पण असे निर्णय घेणे फार अवघड!
28 Mar 2013 - 7:00 pm | अप्पा जोगळेकर
वेगळाच अनुभव. तारतम्य बाळगावे असेच म्हणावे लागते.
30 Mar 2013 - 12:11 am | मन१
किमान शब्द; कमाल संदेश. पटला.
28 Mar 2013 - 8:06 pm | विकास
वर अप्पा जोगळेकर यांनी म्हणल्याप्रमाणे, असे निर्णय घेताना तारतम्य बाळगावे लागते याच्याशी सहमत. तरी देखील ते आम्हाला म्हणायला सोपे असले तरी डॉक्टर्सना प्रत्यक्षात निर्णय घेणे अवघडच असते असे वाटते.
असले प्रश्न नैतिकतेकडे झुकलेले (ethical) असतात. तरी देखील एकदा का वकील, कायदा घुसला आणि हॉस्पिटल हे डॉक्टर्सपेक्षा मॅनेजर्स साठी मॅनेजमेंट झाले की सगळे बदलते... या संदर्भात एक अगदी विरुद्ध टोक बॉस्टनमध्ये बघायला मिळाले होते. साधारण १९९८ चे आहे. एका मोठ्या इस्पितळातील आउट पेशंट वार्ड मधे एका व्यक्तीबरोबर मी पत्नीबरोबर होतो. त्या व्यक्तीचे जरी सगळे नीट होते तरी केवळ तात्पुरत्या देखरेखीसाठी त्यांना एका बेडवर झोपायला सांगितले होते. आमच्या गप्पा चालू होत्या.
त्याच वेळेस समोरच्या एका बेडमधे एक अतिशय वृद्ध स्त्री होती. तीचे कसले तरी ऑपरेशन होते. ती सोबत आलेल्या एका किंचित कमी वृद्ध असलेल्या स्त्री बरोबर छान हसतखेळत नर्सने पुढच्या वार्डमधे/ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्याची वाट बघत बसली होती. तिचे ऑपरेशन कदाचीत महत्वाचे असेल ही पण तीची प्रकृती गंभीर काही दिसत नव्हती... तेंव्हा एक तरूण डॉक्टर तपासायला म्हणून आला. तो देखील अत्यंत हसतखेळत आधी बोलला. मग म्हणाला, "आता तुम्हाला ऑपरेशनला आत नेतील. ते करत असताना अचानक तुमचे हृदय अथवा मेंदू बंद पडले, तर तुम्हाला लाईफ सपोर्टवर जायला आवडेल, का लाईफ सपोर्ट न घेता मृत्यू स्विकारायला आवडेल?" शब्द थोडेफार वेगळे असतील, पण ऑलमोस्ट याच अर्थाचे स्पष्टपणे तो बोलला. एक मिनीटापूर्वी हसत खेळत बोलणार्या त्या दोघी एकदम आवाक झाल्या. समोर बसलेले आम्ही दोघे देखील एकदम गप्प झालो आणि काळजी वाटली की ज्या व्यक्तीबरोबर आम्ही आहोत तीने काही ऐकले तर नाही ना? सुदैवाने काही ऐकलेले नव्हते....
29 Mar 2013 - 2:35 am | पिवळा डांबिस
विकासराव, डॉ खरे आणि त्यांचे वरिष्ठ आणि तुम्ही बॉस्टनमधील प्रसंग वर्णन केलाय त्यातल्या डॉक्टरांसमोरचा प्रसंग हे वेगवेगळ्या संदर्भात आहेत. खर्यांना आणि त्यांच्या वरिष्ठांना पेशंटला काही गोष्टी न सांगण्याची लग्झरी (इथे लग्झरी हा शब्द कसासाच वाटतो पण मला दुसरा शब्द आत्ता सुचत नाहिये. क्षमस्व डॉ खरे!) आहे. बॉस्टनातल्या डॉक्टरसमोर हा नुसता नैतिकतेचाच इश्यू नसून कायदेशीर लायेबिलिटीचाही इश्यू आहे. पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली गेली नाही तर उद्या काही झाल्यास तोच पेशंट (किंवा त्याहीपेक्षा त्याचे नातेवाईक) उद्या मेडिकल मालप्रॅक्टिसची केस करून त्या डॉक्टरला आणि हॉस्पिटलला जेरीस आणू शकतात.
एकीकडे मिनिमल कायदेशीर रीकोर्स आणि दुसरीकडे (कधीकधी) अतिरेकी कायदेशीर रीकोर्स...
यांत डावं-उजवं ठरवणं खरंच कठीण आहे.
29 Mar 2013 - 10:02 am | कवितानागेश
पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली गेली नाही तर उद्या काही झाल्यास तोच पेशंट (किंवा त्याहीपेक्षा त्याचे नातेवाईक) उद्या मेडिकल मालप्रॅक्टिसची केस करून त्या डॉक्टरला आणि हॉस्पिटलला जेरीस आणू शकतात.>
अगदी मान्य.
पण गम्भीर विषयांची चर्चा पेशंट ऐवजी त्याच्या इतर नातेवाईकांशी करावी. आणि पेशंटला फक्त धीर द्यावा.
'काही बिघडले तर काय?' ही धास्ती डॉक्टरनी आणि नातेवाईकंनी स्वतःपुरती राखून ठेवावी.
30 Mar 2013 - 1:44 am | निनाद मुक्काम प...
ज्याच्या जीवाचा हा प्रश्न आहे त्याला अंधारात ठेवून नातेवाईकांशी चर्चा
पटले नाही बुआ
उद्या श्रीमंत रोगी ,लोभी , मतलबी नातेवाईक असतील तर
नात्याचे ओंगळवाणे प्रदर्शन पहिले आहे व त्याबद्दल वाचले सुद्धा आहे.
30 Mar 2013 - 2:35 am | पिवळा डांबिस
तुम्ही भारतातील संदर्भाने विचार करून लिहिताय याची मला कल्पना आहे. आणि भारतात ते कदाचित क्षम्य असेल.
परंतु विकासने वर दिलेल्या बॉस्टनमधल्या उदाहरणात तुम्ही सुचवलेला उपाय योग्य ठरणार नाही. उलट ती डबल लायेबिलिटी ठरेल....
१. पेशंटला आजाराची पूर्ण कल्पना दिली नाही.
२. पेशंट सोडून इतरांशी (मग ते नातेवाईक असले तरीही) चर्चा केल्याने झालेला पेशंट-डॉक्टर कॉन्फिडेन्शियलिटीचा भंग.
अमेरिकेतल्या समाजाचे रितीरिवाज वेगळे आहेत. इथे आपल्या खाजगी गोष्टींची (आणि आपली हेल्थ ही इथे खाजगी आणि पर्सनल बाब मानली जाते) इतरांशी चर्चा झालेली बहुसंख्य लोकांना आवडत नाही.
1 Apr 2013 - 8:30 pm | बंडा मामा
अमेरिकेतील ह्या प्रायवसी विषयी बरेच ऐकले आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, प्रायवसीचे इतके स्तोम आहे तर ही गोष्ट त्या डॉक्टरने विकास ह्यांच्या समोर कशी काय विचारली? त्यामुळे त्या पेशंटची प्रायवसी गेली नाही का?
1 Apr 2013 - 8:38 pm | विकास
मुद्दा म्हणून बरोबर आहे. पण कायद्याच्या दृष्टीकोनातून काही गैर नव्हते/नसावे...
तो ओपिडी वॉर्ड होता, त्यामुळे सगळेच ओपन होते. दुसरे म्हणजे डॉक्टरने माझ्या समोर असे सांगितले नव्हते, तर ओपिडी असल्याने सगळेच relatively जवळ जवळ होते, त्यामुळे ऐकू गेले होते. त्या पेशंटचे नाव, वय, आजार वगैरे काहीच मोठ्याने बोलले गेले नव्हते.
28 Mar 2013 - 8:33 pm | रेवती
हम्म. वेळ पाहून निर्णय घ्यावे लागले आहेत. माझे काका गेली अनेक वर्षे कोकणात डॉक्टर म्हणून व्यवसाय करतात. तिथे असे निर्णय पेशंटची आर्थिक परिस्थिती पाहून घ्यावे लागतात हे पाहिले आहे. एका पेशंटचा कर्करोग शेवटच्या टप्प्यात होता. आर्थिक परिस्थिती तर अगदीच गरीब. मजुरी करून दोनवेळा पोट भरत असे. त्यावेळी मुंबईला जाऊन कॅन्सर हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे किंवा कोणताही खर्चिक सल्ला देणे व्यवहार्य नव्हते. त्याला बसने मुंबईपर्यंतचा प्रवास करण्यासाठीही उधारी करावी लागणार होती. महागाच्या औषधांनी तो फारतर आणखी काही महिने कुटुंबावर भार होऊन जगला असता. अशावेळी काही झाले नाही, घरी जाऊ शकतोस. तुझ्या बायकोजवळ औषधे देतो असे सांगणे व बायकोला किंवा भावाला, मुलाला खरे काय ते समजावणे गरजेचे असते. कधीकधी धीर सुटलेल्या नातेवाईकांना काका रागवताना पाहिले आहेत, रुग्णासमोर काही दिवस कसे वागायचे हे सांगताना.
28 Mar 2013 - 9:14 pm | अर्धवटराव
अप्रिय सत्य सांगु नये हे निखालस चुक आहे. अप्रिय सत्य अप्रिय शब्दात सांगु नये हे कदाचीत बरोबर असेल. संबंधीत रुग्णावर कुठल्या कुठल्या जबाबदार्या आहेत, त्याचे पुढील आयुष्याबद्दल काय प्लॅन्स आहेत हे डॉक्टरला १००% टक्के कधीच उमगणार नाहि. तेंव्हा कॉन्सीलींग पद्धतीने का होईना, रुग्णाला त्याच्या उर्वरीत आयुष्याबद्दल पूर्ण समज देणे आवष्यक आहे.
अर्धवटराव
28 Mar 2013 - 10:00 pm | निनाद मुक्काम प...
सामान्य माणसांच्या आयुष्यात
एखादा रोगी किंवा त्यांचे नातेवाईक सत्य लपवले म्हणून तक्रार करू शकतात,
आता मला रहस्य कळले की भारतात रोगी दगावला की काही रोग्यांचे नातेवाईक
डॉक्टरांना का बदडतात.
माझ्या मते भारतात अनेक वेळा वृत्तपत्रात अश्या बातम्या आपण वाचतो.
नुकताच अश्या प्रकारापासून संरक्षण मिळावे म्हणून डॉक्टरांनी मागण्या केल्या होत्या ,
माझ्या मते डॉक्टर व पेशंट मध्ये सर्वात आधी विश्वासाचे नाते निर्माण व्हायला हवे,
जी व्यक्ती आपले प्राण ,शरीर ह्या डॉक्टरांच्या हाती सोपवतो त्यांना सत्य हे कळेलच पाहिजे ,
अप्रिय सत्य खुबीने रोग्यास सांगणे योग्य वेळ पाहून सांगणे व त्याला त्याही परिस्थितीत धीर देणे हे खरे डॉक्टरांच्या माझ्या लेखी नैतिक कर्तव्य आहे.
28 Mar 2013 - 10:05 pm | प्यारे१
सुंदर प्रतिसाद.
निनाद भाऊ नि असेच आणखी काही लोक जे सगळ्याच्या मुळाशी जाऊन नंतर त्या गोष्टीचा अज्जिबात त्रास होणार नाही अशा प्रकारे विश्लेषण करुन सुंदर सुंदर प्रतिसाद देतात.
मान गये!
कीप इट अप निनाद.
- प्यारे मु पो अल्जिरिया.
29 Mar 2013 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टरसाहेब, आपण लिहिता ते अनुभव अतिशय प्रामाणिकपणे लिहिलेले असतात. लिहित राहावे.
बाकी, एखाद्याचे आयुष्यात आता काहीच होऊ शकत नाही तेव्हा त्या रुग्णाला आता तुम्ही शेवटचे दिवस मोजा म्हणन्यापेक्षा या सृष्टीत अनेक चमत्कार होत असतात असंच काही किंवा दुसरं काही म्हणून आपल्यावर औषधोपचार चालूच आहेत, आपण बरे होऊ शकता असा एक दिलासा त्याचे उरलेल्या आयुष्यात आनंदात जावे यासाठी पुरेसे आहे,असे वाटते.
-दिलीप बिरुटे
29 Mar 2013 - 1:52 pm | पिलीयन रायडर
मला वाटते की सांगावे की न सांगावे हा निर्णय पूर्णपणे परिस्थिती वर अवलंबुन असावा. काही व्यक्ती ह्या स्वभावाने हळव्या असतात्.त्या मूळ आजाराच्या तीव्रतेपेक्षा हाय खाऊनच मरण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी जर न सांगुन रुग्णाचे मनोधैर्य टिकुन रहाणर असेल आणि नक्की काय चालु आहे ह्याची कल्पना नातेवाईकांना असेल तर हरकत काय आहे? डॉक्टर आणि रुग्णाचे नाते विश्वासाचे असले तरी समोरचा व्यक्ती "आजारी" आहे हे विसरुन कसे चालेल. साधारणतः आपण आजारी व्यक्ती शांत व आनंदी राहील हे पहातो. अशा वेळेस "विश्वास टिकवण्यासाठी सत्य सांगितलेच पाहिजे" हा अट्टाहास धरुन ,कितीही सुयोग्य शब्दात का होईना पण "तु मरणार आहेस रे बाबा" हे सत्य परिस्थिती सुधारेल की बिघडवेल?
आणि भारतात डॉक्टर ना जी मारहाण होते ती केवळ "रुग्णाला सत्य सांगितलं नाही" म्हणुन होत नसावी.
बाकी अनुवंशिक आजाराच्या बाबतीत माहिती न देणे हे मात्र मलाही पटले नाही. त्या व्य्क्तीला ताण द्यायचा नसेल पण कमी तीव्र शब्दात, शक्य असेल ती काळजी घ्यायला नक्की सांगता आले असते. न सांगण्याने त्या व्यक्तीच्या मनात नंतर "विश्वासघाताची" भावना येऊ शकते.
29 Mar 2013 - 2:27 pm | आनंद घारे
वरील सर्व चर्चेमध्ये असे दिसते की रोग्याचे बरे वाईट होणारच याबद्दल डॉक्टरांना खात्री आहे पण ते अप्रिय सत्य रोग्याला सांगावे की नाही याबद्दल दुमत आहे. लेखाच्या मथळ्याला हे धरूनच आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात बहुतेक वेळी असा अनुभव येतो की डॉक्टरांना त्यांच्या तपासण्यांमधून रोग्याच्या अवस्थेबद्दल किती समजू शकेल याला मर्यादा असतात. त्यावरून ते एक अंदाज बांधतात. तो अंदाज अचूक असेलच असे नाही. हे त्यांनाही ठाऊक असते. अशा परिस्थितीमध्ये रोग्याला वाईटात वाईट काय घडू शकेल हे सांगून सावध करणे (किंवा घाबरवणे) यापासून चांगल्यात चांगले काय घडू शकेल हे सांगून खूष करणे (किंवा भ्रमात ठेवणे) यांच्या दरम्यान सुद्धा अनेक पर्याय असतात. आपले जीवन सत्य असत्य किंवा प्रिय अप्रिय असे केवळ काळे-पांढरे नसते.
29 Mar 2013 - 2:35 pm | कवितानागेश
मला स्वानुभवावरुन असं वाटतं की जोपर्यंत आजारपण स्वतःवर शेकलेले नसते तोपर्यंत हा खरं वगरै सांगण्याचा अट्टहास असतो.
मला स्वतःला काही वर्षांपूर्वी सारखी विचित्र आजरपणे चालू होती तेन्व्हा शुगर तपासून घ्यायचा सल्ला दिला होता. तो सल्ला ऐकल्यापासून प्रत्यक्ष तपासून रीपोर्ट हातात येईपर्यन्त्ची माझी अवस्था मला नीट आठवतेय. इतकी दु:खी मी पूर्वी कधीच नव्हते! :D
त्यातून शुगर ८४ पाहिल्यावर वेगळे आश्चर्य! ;)
29 Mar 2013 - 3:10 pm | निनाद मुक्काम प...
कालपरवा पर्यंत डॉक्टरांना देवदूत समजले जायचे , आता सुद्धा समजले जात असावे.
पण सध्या वारंवार जेव्हा रोग्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांची मारहाण होते ,ह्यात एकमेव कारण म्हणजे नातेवाईक व डॉक्टर व रोगी ह्यांच्यात सुसंवाद नसणे.
ह्याहून वेगळे कारण असेल तर मला जाणून घेण्यास नक्कीच आवडेल.
माझ्या मते वैद्यकीय शेत्रात सेकंड ओपिनियन असा काहीसा प्रकार असतो.
तुम्हाला एखादी शक्यता वाटली , तुम्ही ती रोग्यासमोर मांडली.
पुढे रोगी त्याप्रमाणे चाचणी करून घेऊन शंका निरसन करून घेऊ शकतो.
@मला स्वानुभवावरुन असं वाटतं की जोपर्यंत आजारपण स्वतःवर शेकलेले नसते तोपर्यंत हा खरं वगरै सांगण्याचा अट्टहास असतो.
पूर्णतः असहमत
स्वतःवर ओढवलेले आजारपण व त्यासाठी जर चाचणी केली तर निदान होई पर्यंत
चाचणीत नक्की काय निघेन ह्या शंकेने , भिंतीने , उत्सुकतेने रोगी बैचैन होतो.
डॉक्टरांच्या व वकिलांच्या पासून काहीही लपवू नये असे म्हणतात पण हाच न्याय
उलट सुद्धा लागू होतो ,
अमेरिकेत कायद्यात रुग्णाला सत्य सांगणे भाग असते ,मात्र भारतात तसे नाही आहे , असे विधान करणाऱ्या खरे डॉक्टरांनी मागे एकदा अमेरिकन लिंका त्यांच्या म्हणण्याच्या प्रीत्यर्थ दाखवल्या होत्या ,
आता त्यांना रुग्णांना सर्व सत्य सांगा असे सांगणारा अमेरिकन कायद्याचे मोल., त्यामागील भूमिका ,मानसिकता पटत नसेल ,किंवा गरज वाटत नसेल तर त्यांची मर्जी
आपल्या सोयीनुसार ,पटेल तेवढे घ्यावे हेच खरे
29 Mar 2013 - 7:10 pm | सुबोध खरे
साहेब
आपण म्हणता तसे सेकंड ओपिनियन साठी मी रुग्णांना वर्षानुवर्षे पाठवीत आलो आहे. आपण सोनोग्राफी करताना एखाद्या जन्म न झालेल्या बालकास व्यंग दिसले तर मी त्या पालकांना तोंडी सांगत असे आणि जवळच्या सरकारी रुग्णालयात(गोव्याला गोवा मेडिकल कॉलेज ला) दुसरी सोनोग्राफी करून घ्या ( सेकंड ओपिनियन) असे लिहून हि देत असे.हे ज्यावेळी मी सरकारी नोकरीत जेथे पैश्यासाठी केले असा आरोप होण्याची शक्यता नव्हती तेंव्हा सुद्धा किंवा सरकारी नोकरीची प्रचंड सुरक्षितता होती तेंव्हा सुद्धा.
आपल्यासाठी तो एक रुग्ण असतो पण त्या नातेवाईकासाठी आपले बाळ किंवा जवळच्या नातेवाईकाचा जीव असतो हे मी नेहेमी लक्षात ठेवीत असतो होतो हे जर मि तेंव्हा करीत असे तर आता स्वतःच्या व्यवसायात तर नक्कीच करणार.
वरील पैकी प्रत्येक रुग्णाला मी पुढच्या तपासण्या करा/ आपल्या डॉक्टर शी सल्लामसलत करा असे लिहून देतोच.(स्वतःला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यात कोणताही शहाणपणा नाही).
प्रश्न सत्य फोडून सांगणे आवश्यक आहे कि नाही असा आहे.
आपण विधानांचा विपर्यास फार लवकर करता.
29 Mar 2013 - 3:18 pm | दादा कोंडके
सहमत.
'जे काय आहे ते रुग्णांना प्रामाणिकपणे सांगा' हे थिरिऑटीकली ठिकय. पण हे सरसकट सगळ्या रुग्णांना लागू होत नसावं. अगदी भारतात तर नाहीच नाही. वरती रेवतींनी सांगितल्यासारख्या केसेस तर नेहमी घडताना दिसतात.
29 Mar 2013 - 6:46 pm | सुबोध खरे
अमेरिकन कायद्याप्रमाणे सत्य सांगणे बंधनकारक आहे पण अनावश्यक माहिती देणे हे बंधनकारक नाही.(यात आवश्यक काय आणि अनावश्यक काय यात फार वाद आहेत) याबद्दल पुष्कळशा खटल्यांचे निकाल उलटसुलट आलेले आहेत त्यातून तेथे एका राज्याचा कायदा हा दुसर्या राज्याला लागू होत नाही त्यामुळे मिपा वर लोक जितके सहज "निकाल"(judgemental) देत आहेत तितके सोपे नाही.
माझा कोणताही असा दावा नाही कि प्राप्त परिस्थितीत मी जे केले तेच बरोबर आणि दुसरे सगळे चूक.माझ्या अ नेक चुका झाल्या आहेत आणि होत राहतील. मी एकदा एका चौकशीत असे सांगितले होते कि जो माणूस काम करतो तो चुका करतो आणि जो चुका झाल्या नाहीत असे म्हणतो तो एकतर काम करीत नाही किंवा खोटे बोलत आहे.
जोवर तुमची चूक हि निष्काळजीपणा मुळे किंवा बेदरकारपणामुळे होत नाही ( act ऑफ ommission, act ऑफ commission किंवा criminal negligence) नाही तोवर ती कायद्याला सुद्धा मान्य आहे.(as long as it is genuine error of judgement or simple mistake it is acceptable to court of law)
पण लोक जितक्या सहज बेकायदेशीर,अनएथिकल( अनीती कारक) इत्यादि शब्द वापरीत आहेत मला त्याचे आश्चर्य वाटते.आपण इतक्या सहज कसे न्यायासनावर बसून निकाल देऊ शकतो(judgemental) याची गम्मत वाटत आहे
माझ्या भावाच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यवस्थापकाच्या वडिलांना कर्करोग झाला होता तेंव्हा त्याने मला सांगितले कि तू वडिलांना काहीही सांगू नको. (हा रोग ४ थ्या टप्प्यात होता.) या बाबतीत मी त्याच्या वडिलांना सांगितले असते कि तुमचे आता शेवटचे काही दिवस बाकी आहेत तेंव्हा आता तुम्ही "राम"म्हणण्याची तयारी करा तर ते "एथिकल " ठरले असते कि मुलाचे ऐकून त्यांना मी फारसे काही सांगितले नाही ते बरोबर?
आपला गोंधळलेला
सुबोध
29 Mar 2013 - 7:25 pm | पिलीयन रायडर
खरे काका,
तुमच्या प्रतिसांदांवरुन आता वाटायला लागलेले आहे की तुम्ही पण हळुहळु तयार होत आहात मि.पा वर!!
तर इथे २ छान प्रकार मला शिकायला मिळाले...
१. फाट्यावर मारणे..
२. आणि "ज्याची त्याची सनज्..जाण्..पासुन ते..अनुभवविश्व.. वगैरे वगैरे..." लक्षात घेउन परत फाट्यावरच मारणे...
तुम्ही अर्थातच वयाने आणि अनुभवाने फार मोठे आहात. तुम्हाला मेडिकल मधले कायदे आणि एथिक्स शिकवायची आपली लायकी नाही. तुम्ही फक्त मस्त लिहीत रहा.. आम्ही शिकत राहु..!!
30 Mar 2013 - 12:06 am | मन१
संपूर्ण प्रतिसादाला +१
29 Mar 2013 - 11:04 pm | निनाद मुक्काम प...
आपल्या व्यवसायाशी काडीमात्र संबध नसलेले अनेक उपटसुंभ जेव्हा आपल्याला व्यावसायिक मतांच्या वर घरबसल्या ऐकीव माहितीवर आक्षेप घेतांना पाहून तुम्ही पार गोंधळून गेला आहात ,
काहीसे त्रस्त
आता तुम्हाला माझी काही दिवसांच्या पूर्वी मन स्थितीची कल्पना येईल.
पण इतक्या सहज कसे न्यायासनावर बसून निकाल देऊ शकतो
काही दिवसांच्या पूर्वी
दारू पिणाऱ्या महिलांना आपण सार्वजनिक ठिकाणी दारू न घेण्यासंबंधी जे अगाध सल्ले
दिले होते , त्याची आठवण झाली.
30 Mar 2013 - 10:47 am | सुबोध खरे
तुमचे दारू पुराण थांबवा हो.
कोणत्याही धाग्यावर हाच विषय का आणता.आपल्या शेपटावर पाय पडला असल्यासारखे का वागता?
मला एकच सांगा दारू मुळे गर्भावर परिणाम होतो हे माहित असताना (किंवा नसताना)कोणीही मिपाकर आपल्या पत्नीला, बहिणीला किंवा मुलीला गरोदर असताना दारू पाजेल काय?(आपण स्वतः सुद्धा नाही सुबोध खरे आपल्या मताप्रमाणे मूर्ख असेल पण अमेरिकेचा सर्जन जनरल तर नाही) पण तेच पणशीकरांचे केशरयुक्त श्रीखंड जरूर कौतुकाने खाऊ घालील.
तसेच सर्वसामान्य मिपाकर आपल्या आईला किंवा आजीला दारूची (अगदी महागडी स्कॉच असेल तरी) बाटली देणार नाहीत पण पणशीकरांचे केशरयुक्त श्रीखंड मधुमेह असेल तरी थोडेसे का होईना चवीसाठी देतीलच. दारूला अन्नाच्या पातळीवर आणण्याचा आपला प्रयत्न बरोबर नाही शेवटी आपल्यातील बहुसंख्य लोक अन्न हे पूर्ण ब्रम्ह मानतात.
श्रीखंड ६ महिन्याच्या मुलाला सुद्धा उष्टावणासाठी चाटवले जाते.
.अन्न हे देवाला नैवेद्य म्हणून ठेवले जाते.दारू नाही. उगाच दारूला पावित्र्य देण्याचा हा प्रयंत्न कशासाठी.मला नाही वाटत कि कोणी मिपाकर दारूची बाटली नैवेद्य म्हणून देवघरात ठेवतात.( काही आदिम जमातीत ठेवतही असतील पण ते इथे गैरलागू आहे)
चर्मकार जमातीत हि आपली पादत्राणे दाराशीच ठेवतात देवघरात नेत नाहीत(जरी त्यावर त्यांचे पोट अवलंबून असेल तरीही).
गेली २२ वर्षे मी सोनोग्राफी करीत आलो आहे. ४० पैकी रोज १० गरोदर स्त्रिया आहेत हे गृहीत धरले तरी हा आकडा ६० हजाराच्या वर जातो त्यामुळे त्यांच्या ज्ञानाबद्दल मला कदाचित आपल्यापेक्षा जास्त माहित असावे.प्रत्येक स्त्री जेंव्हा आई होते (किंवा होऊ घालते तेंव्हा तिला आपल्या बाळासाठी असंख्य शंका असतात आणि ती आपल्या बाळासाठी काहीही करायची तयारी ठेवते हे इतिहासात हिरकणीने दाखविले होते.
"पब्लिक है ये सब जानती है" टाळ्या साठी वाक्य चांगले आहे. पण ते वस्तुस्थितीपासून बरेच दूर आहे.
मी भारतात सार्वजनिक ठिकाणी( पंचतारांकित हॉटेलमध्ये नव्हे) स्त्रियांनी दारू प्यायली तर लोक त्यांच्याकडे काय नजरेने पाहतात हे भारतात सर्वाना माहित आहे तेंव्हा सुज्ञास सांगणे न लगे.
सार्वजनिक ठिकाणी लिहिण्याचीकिंवा बोलण्याची हि माझी पहिलीच वेळ नाही त्यामुळे मी गोंधळून जाण्याचा प्रश्न नाही.
मी आपल्यावर वैयक्तिक टीका केलेली नव्हती किंवा केंव्हाही असंसदीय भाषा वापरलेली नाही तरीही पूर्ण वेळ आपण माझ्यावर वैयक्तिक टीका करीत आलात त्याचाही मी राग मानत नाही पण तरीही एक सांगावेसे वाटते कि प्रत्येक धाग्यात दारू आणली नाहीत तर बरे होईल.
जर मी आपली बिनशर्त माफी मागितली तर आपले समाधान होत असेल तर मी आपली माफी मागतो.
शेवटी आपली मर्जी.
30 Mar 2013 - 4:51 pm | चिगो
निनादरावांचा हा स्कोअर-सेटलिंगचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट दिसतंय.. मला दारु आवडते, आणि ती मी माझ्या आवडीप्रमाणे पितो. पण बायकोने गर्भारपणात दारु पिऊ नये, असेच मीही म्हणेल.. (आणि तीही मानेल ;-))आता येथे मला एक "पुरुष" म्हणून "नॅचुरल अॅडव्हान्टेज" आहे हे मान्य.
दुसरी गोष्ट म्हणजे, मी दारु पाजण्याचा व्यवसाय करतो म्हणून दारुचे परीणाम फक्त मलाच माहीत आहेत, त्यावर कोणी इतरांनी कसलीही विरोधी टिप्पणी करायची नाही, हा अडेलतट्टूपणा काही कळला नाही. मी प्रशासकीय कामात आहे, पण इथल्या अनेक धाग्यांवर हे वाटलंय की अनेक मिपाकरांची प्रशासनाची जाण माझ्यापेक्षा फार जास्त आहे.. त्यातून शिकायला मला कधीच कमीपणा वाटला नाही, किंवा "हे काय साले बरळताहेत, मेरेकु देख.." असे वाटले नाही..
खरेसाहेब, आपले अनुभव अत्यंत मोलाचे आहेत. आमच्या कामातही " To be or not to be"चे प्रसंग बर्याचदा येतात. हा " एथिकल-अनेथिकल"चा झगडा तर चिरंतन आहे. शेवटी जे केल्याबद्दल किंवा न केल्याबद्दल स्वतःची लाज वाटेल असं करुअ नये किंवा घडू नये, इतकंच..
30 Mar 2013 - 6:23 pm | सुबोध खरे
प्रशासकीय कामात असे प्रसंग वारंवार येतात( बर्याच वेळेला रुग्णालयात आम्ही आमचे प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गळ्यात मारीत असतो)त्यामुळे आपले मत एकदम पटले.
आणि अनुभव हि कोणा एका व्यवसायाची जहागीरी नाही
तदेव कर्म कुर्वीत ह्येनात्मा सम्प्रसीदती
आत्मानं पीडयेत यच्च तत प्रयत्नेन वर्जयेत.
जे काम केल्याने अंतरात्म्याला आनंद वाटतो असेच काम करा.
आत्म्याला पीडा होईल असे काम प्रयत्नपूर्वक टाळा.
हेच मी आजतागायत करण्याचा प्रयत्न करितो आहे.
शेवटी तत्वज्ञान हे वर्षानु वर्षांच्या अनुभवातून आलेले शहाणपण आहे
एका मानवी जीवनात मिळवणे इतुके सोपे नाही.
1 Apr 2013 - 8:39 pm | बंडा मामा
कॅथलिक लोकांच्या चर्चमधे वाइन तीर्थ म्हणून देतात. कुणी मिपाकर कॅथलिक असल्यास त्यासाठी वाइन नक्कीच पवित्र आहे.
1 Apr 2013 - 9:31 am | ऋषिकेश
गंमत वाटायचा पूर्णस अधिकार आहे ;)
पण मी अनएथिकल शब्द वापरला असल्याने त्यामागच्या भुमिकेचे हे स्पष्टीकरण (पुन्हा)एकदा देतो आहे.
डॉक्टरकी ही समाजोपयोगी असली तरी शेवटी एक "सर्विस" आहे. (तशा बहुतांश सर्विसेस समाजपयोगीही असतात, डॉक्टरकी त्यातलीच एक). तेव्हा रूग्ण डॉक्टरचा 'ग्राहक'ही असतो आणि त्या केसपुरता रुग्ण हाच डॉक्टरचा ग्राहक असतो (त्याचे नातेवाईक नाही). अश्यावेळी विक्रेता (सर्विस देणारा) आणि ग्राहकामधील या नात्यात ग्राहकाच्या अपरोक्ष ग्राहकाची खाजगी माहिती इतरांना सांगणे किती एथिकल आहे?
कित्येक रुग्णांना आपल्या आजाराबद्दल कोणालाही कळलेले नको असते. अगदी सख्ख्या नात्यातील व्यक्तींना सुद्धा, आणि हे मी अमेरिकेतले नाहि भारतातले म्हणतोय! कायद्याने अज्ञान -लहान- मुलांच्या बाबतीत त्यांच्या पालकांना कल्पना देणे समजू शकतो मात्र एरवी रुग्णाची माहिती त्याच्या परवानगी शिवाय / त्याच्या अपरोक्ष इतरांना देणे आणि ती माहिती कोणाला देणे योग्य हे स्वतःच ठरवणे यात जजमेन्टल कोण होते आहे? कोणत्या कसोटीवर डॉक्टरने ठरवावे की ही माहिती त्या रुग्णाच्या बायकोला देणे योग्य की वडिलांना की आईला की भावाला की बहिणीला? मग डॉक्टर आपणहून एखादी व्यक्ती निवडतो तेव्हा तो जजमेन्टल होत असतो हा दावा चुकीचा ठरेल काय?
ही माहिती केवळ रुग्णालाच सर्वप्रथम सांगितली पाहिजे आणि त्याच्या अनुमतीने इतरांनाही सांगितली तर हे योग्य वाटते अन्यथा ते अनैतिकच.
29 Mar 2013 - 11:30 pm | शिल्पा ब
तुमचे लेख आवडतात.
तुमचे निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारे असुनसुद्धा रुग्णाच्या मनस्थितीचा विचार करुन त्या वेळी जे योग्य असेल तसेच घेतलेले आहेत.
ऋषिकेश यांचं मत काही फारसं पटलं नाही.
संपादित
30 Mar 2013 - 5:36 pm | प्यारे१
शब्दांचं संपादन झालं. ठीकच.
मतांचं संपादन जेव्हा होईल तेव्हाच खरा अंतर्विरोध थांबला, वर्णविरोध शमला असं म्हणता येण्याइतपत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता उद्भवेलच असंही नाही नि नाही असंही नाही.
-धरुन सोडक प्यारे
30 Mar 2013 - 6:03 pm | कवितानागेश
मतांचं संपादन जेव्हा होईल >>
भलतेच अँबिशियस दिसताय तुम्ही! :P
29 Mar 2013 - 11:54 pm | उपास
खरे साहेब, तुमचे अनुभव खूप काही सांगून जातात, माणूस म्हणून ते प्रगल्भ करतात.
अमेरिकेतली आणि भारतातली डॉक्टरकी, डोक्टरांचा एप्रॉच (मराठी शब्द?) ह्यात खूपच फरक आहे (वरती आलेलं आहेच), डॉक्टरांना काय तारेवरची कसरत करावी लागते हे लक्षात येतच. हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हायडर उभा असतोच असतो तेथे पेशंट आणि डॉक्टर मधे.
रोगी आणि डॉक्टर ह्यांच्यामधला संवाद महत्त्वाचा आहे हे खरं पण जिथे जीवन मृत्युचा प्रश्न असतो तिथे हेच बरोबर आणि ते चूक असं काळं पांढरं करायचा हट्टाहास करण चुकीचं वाटतं.
30 Mar 2013 - 1:34 am | निनाद मुक्काम प...
उपास
आपण फार चांगला मुद्दा मांडला.
आमचे नातेवाईक भारतात इस्पितळात होते , तेव्हा त्यांना भेटायला गेलो , तेव्हा
डॉक्टर उगाच भारंभार चाचण्या करायला सांगतात , त्यांचे चाचणी केंद्रात
कमिशन असते , त्यांचे महागड्या कंपन्याशी साटेलोटे असते , ह्या कंपन्या त्यांना प्रशिक्षण किंवा इतर कारणासाठी परदेशात पाठवतात.
पुढे डॉक्टर ह्याच कंपन्यांची महागडी औषधे गळ्यात मारतो अश्या अनेक गोष्टी कानावर आल्या ,
त्यात खर्या की खोट्या हा मुद्दा नव्हे
मुद्दा महत्त्वाचा हा की पूर्वी नोबेल समजलेल्या ह्या व्यवसायावर आता सामान्य माणूस काहीश्या संशयाने पाहतो ,
त्यामुळेच डॉक्टरने आपला सुसंवाद रोग्यांशी त्यांच्या नातेवाईकांशी जास्ती जास्त
ठेवणे ही काळाची गरज आहे ,
माझ्या परिचयाची एक व्यक्ती आहे जिचे काम इस्पितळात जो रोगी जाण्याच्या मार्गावर असतो , अश्या रोग्यांच्या नातेवाईकांना त्याही अवस्थेत त्या रोग्यांचे देहदान
करण्याविषयी मत अनुकूल करणे असे आहे ,
म्हणजे रोज तिला अश्या नातेवाईकांशी सुसंवाद साधावा लागतो
ज्यांना त्यांचा नातलग काही दिवसात जाणार आहे ह्यांची पक्की खात्री असते ,
30 Mar 2013 - 8:36 am | उपास
वरचे प्रतिसाद वाचता शीर्षक पुन्हा एकदा उद्धृत करावसं वाटलं - 'सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात' :)
लोभ आहेच!
30 Mar 2013 - 9:01 am | प्रसाद गोडबोले
डॉक्टर (,वकील आणि सद्गुरु ह्या तीन )माणसांशी कधीच खोटं बोलु नये असे लहान पणापासुन ऐकत आलोय ... आता हीच माणसे (किमान डॉक्टर तरी नक्कीच ) असे हातचे राखुन "नरो वा कुंजरो वा " करतात असे पाहुन धक्का बसला !!
एकवेळ क्यॅन्सर बाबत समजुन घेण्यासारखे आहे पण त्या बाईबाबत सहानभुतीने/ तीचा संसार वाचवायचा म्हणुन खोटे बोलणे तिच्या नवर्याला फसवणे हे अजिबातच पटले नाही.
असो.
(अवांतर : खरे काका , तुम्ही काही आडनावाला जागला नाहीत ...)
30 Mar 2013 - 10:03 am | सुबोध खरे
गिरीजा ताई
वर सांगितलेले आमच्या सरानी केले होते आणि त्यात सुद्धा त्यांनी स्पष्टपणे असे म्हटले होते कि मि जे करतो आहे ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही आणि तुम्ही करावे किंवा नाही हे तुम्ही ठरवा.
यात मी नावाला जागलो नाही हा प्रश्न कुठे आला. मी जर तिच्या नवर्याला हि "बातमी"तुमची बायको तुमच्या "शस्त्रक्रियेनंतर गरोदर" आहे हे सांगणे नीतिमत्तेच्या विरुद्ध(UNETHICAL) झाले असते कारण तो रुग्ण सरांचा होता आणि मी तो हमाल (भारवाही) होतो.
31 Mar 2013 - 8:48 am | प्रसाद गोडबोले
वर सांगितलेले आमच्या सरानी केले होते
>>> चुकुन वाचता वाचता हे नजरेतुन सुटले ... चुकलो .... माफी
30 Mar 2013 - 11:31 am | कवितानागेश
हा प्रतिसाद आणि वरचा आदूबाळ यांचा प्रतिसाद वाचून हसावं की रडावं कळेना.
१. एकमेकांशी कसे वागायचं आणि एकमेकांना काय सांगायचे हा एक तर त्या नवराबायकोचा प्रश्न आहे. त्या बाईला 'धडा' वगरै शिकवायचा अधिकार कुणलाही नाही.
२. तसंच नवर्याच्या मनात विनाकारण संशय पेरण्याचं कारणही नाही. ऑपरेशन झालेले असले तरी एक शक्यता होतीच हे मूल त्याचेच आहे. (नसबंदी केल्यावर पहिले ३ महिने पर्यंत स्त्रीसंबंध ठेवताना गर्भनिरोधक वापरणे गरजेचे असते कारण अगोदर तयार होऊन वीर्य नलीकेत शिल्लक राहिलेले शुक्राणू गर्भधारणा करू शकतात.)
त्यामुळे तसेही नक्की काय ते माहित नसताना आणि समजा तसे नसले तरीही त्यासाठी तिला छोट्याश्या चुकीसाठी आयुष्यभराची शिक्षा का?
माणसाचे आयुष्ञ महत्त्वाचे की धारदार 'सत्य'!
30 Mar 2013 - 3:19 pm | आदूबाळ
माऊताय, तुमचं म्हणणं बरोबर आहे. "धडा" शिकवणं हा शब्दप्रयोग योग्य नाही.
मला म्हणायचंय ते असं:
बहुतांश सेवादात्यांच्या व्यवसायात हा तिढा नेहेमी येतो.
"अशिलाच्य/रुग्णाच्या नीतिमत्तेशी मला काहीही देणंघेणं नाही" हे एक टोक आणि "अशिलाची/रुग्णाची नीतिमत्ता माझ्या कंट्रोलमध्ये नसली तरी माझ्या कार्यकक्षेत येते" हे दुसरं टोक.
प्रत्येक वकील/डॉक्टर/सीए या दोन टोकांपैकी कुठल्यातरी एका बाजूला झुकतं माप देतो. इथे डॉ खरे आणि डॉ मुखर्जींनी दुसर्या टोकाला झुकतं माप दिलं आहे. माझा मुद्दा एवढाच होता, की ते करूनही हा असला प्रकार (घडलाच असेल तर) पुन्हा घडू नये म्हणून डॉक्टरसाहेबांनी केलेला उपाय तोकडा नाही का? (या संदर्भात "धडा" हा शब्द होता.)
त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मला पटतं. "एखादेवेळी चूक झाली असेल" हा शेवटी त्या त्या व्यावसायिकाचा अनुभवसिद्ध अंदाज (judgement call) असतो. त्याचं समर्थन करता येत नाही बर्याचदा.
तुमचा कल अर्थातच पहिल्या बाजूकडे आहे. नथिंग राँग इन दॅट.
31 Mar 2013 - 8:53 am | प्रसाद गोडबोले
माणसाचे आयुष्ञ महत्त्वाचे की धारदार 'सत्य' ?
>>> हा खरच महत्वाचा प्रश्न आहे ... पण डॉक्टर (वकील अन सद्गुरु ह्या तीन ) व्यक्तींनी पेशंटशी खोटे बोलु नये ....सत्यच बोलावे मग ते कितीही कटु अन धारधार असले तरीही ...(कारण इथल्या असत्यावर उभारलेले आयुष्य फारकाही सुखद असेल असे वाट्त नाही )
.
असे माझे वैयक्तिक मत आहे .
31 Mar 2013 - 9:29 am | प्रसाद गोडबोले
हे एक विचारायचे राहिलेच ...
"ही" "छोटटीशी चुक " आहे काय ?
(ह्या विषयावर एक द्विशतकी काथ्याकुट होवु शकेल काय ? )
31 Mar 2013 - 11:57 am | निनाद मुक्काम प...
गिरीजा
त्यांना कदाचित ही छोटीशी चूक वाटत असेल
बडे बडे शहरोमे ,छोटी छोटी बाते .........
30 Mar 2013 - 9:07 am | चौकटराजा
ब्रू म्हणजे संस्कृतात बोलणे असा होतो. पण व्यावसायिक क्षेत्रात विशेषता: जिथे एकाच्या अहवालावर दुसर्याचा निर्णय अवलंबून असतो. उदा सी ए ज्या वा वकिलाच्या वा पॅथोलिजिस्टच्या सल्यावर दुसर्या कोणाची तर निर्ण्यप्रक्रिया अवलंबून असते तिथे सल्याचे documentation झालेच पाहिजे. श्रेयस प्रेयस सत्य असत्य हा तात्विक घोळ त्यात कशासाठी ? माझ्या पत्नीचे प्रसूति नियोजनाचे ऑपरेशन केले त्यावेळी नातेवाईकच सर्जन होता त्याने तोंडी विचारले मी आता टाका घालणार आहे तुला मूल नको ना आणखी ? ही काय पध्दत झाली का व्यवसायाची ? त्यासाठी शिस्तीत स्वाक्षरी मजकडून घेतल्याचे मला तरी आठवत नाही.
30 Mar 2013 - 2:00 pm | प्रभाकर पेठकर
मागे एकदा माझ्या वरील एका शस्त्रक्रियेवेळी २ वेळा ऑपरेशन थिएटरच्या दाराशी नेऊन मला रक्तदाब वाढला म्हणून परत आणले आहे. शेवटी डॉक्टर माझ्या खाटे जवळ येऊन म्हणाले,' काय पेठकर, घाबरताय का?' मी म्हणालो,'डॉक्टर साहेब तुम्ही माझ्या उरावर बसून शस्त्र चालवणार आणि मी घाबरायचही नाही?' हा सर्व संवाद हसत खेळत झाला. तिसर्या दिवशी शस्त्रक्रिया झाली. असो.
दोन्ही बाजू बरोबर वाटतात. मृत्यूच्या शक्यतेच्या बातमीने रुग्ण लवकर दगाऊ शकतो त्यामुळे त्याला अंधारात ठेवावे हे जितके योग्य वाटते तितकेच एखाद्याला शेवटची आवराआवर करायची संधी मिळावी म्हणून त्याला सत्य सांगावे हेही बरोबर वाटतं.
भारतातील एक केस वाचल्याची आठवते की रुग्ण कॅन्सरच्या अंतिम अवस्थेत होता. मरण अटळ होतं. पत्नीला, वडीलांना ह्याची कल्पना दिली होती. फार पोक्त विचारांती त्यांनी डॉक्टरांना विनंती केली की रुग्णाला कल्पना देऊ नका परंतु मृत्यू समयी त्याला वेदना होणार नाहीत, त्याची तडफड होणार नाही आणि शांतपणे मरण येईल असे पाहा. त्या रुग्णाचे मरण तसेच शांत झाले. एक उलटी झाली आणि डोळे मिटले.
ह्या उलट माझ्या एका मित्राला कॅन्सरचे निदान झाले असता त्याने डॉक्टरांना थेट प्रश्न केला,' डॉक्टर माझ्याजवळ सहा महिने आहेत का?' डॉक्टर म्हणाले, 'काळजी करू नका, सहा वर्षेही असतिल नशिबात.' पुढे तो कॅनडात गेला, स्थायिक झाला. नेमाने औषधपाणी घेतले तिथल्या डॉक्टरांच्या ट्रिटमेंट मध्ये राहिला. दहापेक्षा जास्त वर्षे जगला. शेवटी जेंव्हा खरोखरचे ६ महिने राहिले तेंव्हा त्याने डॉक्टरांना विचारले,'डॉक्टर मी काय करू?' डॉक्टर म्हणाले,' प्लान फॉर युवर फ्युनरल.' आणि त्याची पाठ थोपटली.
हा तिथल्या एका संस्थेत गेला. पैसे भरून सदस्यत्व घेतलं. ती संस्था मृत्यूपश्चात सर्व विधी (अगदी हिन्दू धर्मानुसार दहनविधीही) करते. सर्व परिचितांना आपण जात असल्याचे कळविले. कधी चुकून अधिकउणे बोललो असेन तर माफ करा अशा आशयाच्या इमेल्स पाठवल्या. (ती मेल वाचताना धाय मोकलून रडलो होतो). आणि शांतपणे गेला.
कॅन्सरचे निदान झाल्या नंतर मुलाचे लग्न उरकण्यात आले. नातू पाहिला. आर्थिक व्यवस्था करून ठेवली. आणि प्रस्थान ठेवले. त्याला सत्य सांगितल्यामुळे तो हे सर्व करू शकला.
तरीपण, तारतम्य बाळगून डॉक्टरांनी रुग्णाशी संवाद साधावा हेच मलाही योग्य वाटते. मी स्वतः डॉक्टरांशी बोलून माझ्या आजारासंबंधी, मृत्यू संबंधी सत्य जाणून घेऊ इच्छित असेन. अशा रुग्णाशी मात्र डॉक्टरांनी सत्य आणि केवळ सत्यच कथन करावे.
30 Mar 2013 - 3:33 pm | यशोधरा
अख्ख्या धाग्यावर ज्या काही वाचनीय पोस्ट्स आहेत त्या वाचून दोन्ही बाजू बरोबर वाटत आहेत काही अंशी.
वैयक्तिकरीत्या मला स्वतःला काही आजार असेल तर डॉ ने मला सर्व सांगितलेले मला आवडेल. माझ्या आप्तांपैकी कोणी असेल तर त्यांना न सांगता मात्र मला वा किंवा आमच्यापैकी काळजी घेणार्यांना कोणाला सांगावे असेही माझे मत आहे. परिस्थितीनुरुप निर्णय घ्यावा.
30 Mar 2013 - 5:48 pm | संपादक मंडळ
कृपया सदस्यांनी कुठल्याही प्रकारे वैयक्तिक टीका करू नये अन्यथा धागा वाचनमात्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
30 Mar 2013 - 11:19 pm | शिल्पा ब
माझा या विषयावर या धाग्यावरचा हा शेवटचा प्रतिसाद - धागा प्रतिबंधीत होउ नये म्हणुन.
मी कोणावरही ( जर्मनीवाले / दारुवाले ज्यांनी माझ्यावर वैयक्तीक हल्ला केला) वैयक्तीक टीका केलेली नाही.
डॉक्टरसाहेबांनी त्यांचे अनुभव लिहिलेत त्यातही आपल्याला फारच सगळंच समजत अशा प्रकारचे नेहमीचे विनोदी प्रकार अती होउ लागल्याने मी डॉक्टर अन वेटर यांचा अधिकार या विषयी लिहिलं. आपल्या कामाची लाज वाटत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न.
संपादीत प्रतिसादात काहीही वैयक्तीक नव्हते तरी नेहमीप्रमाणेच या महाशयांनी त्यांच्या प्रतिसादात वैयक्तीक गरळ ओकलीच यात नविन काही नाही. बरं या लेखावरसुद्धा तेच ते...त्याला वर चिगो अन डॉक्टरांनी फटकारलं आहेच.
यावर कडी म्हणजे आता फार सोज्वळपणाचा आव आणुन लिहिलेला खालचा प्रतिसाद. माझ्यावर जर कोणी वैयक्तीक हल्ला केलाच तर त्याला मी प्रत्युत्तर देणारच. मी जर नुसतंच ऐकुन घ्यावं असं तुमचं म्हणणं असेल तर ते शक्य नाही. या महशयांवर आधीसुद्धा प्रतिबंध घालण्यात आला होता याची आठवण करुन देते.
30 Mar 2013 - 6:04 pm | निनाद मुक्काम प...
माझे ज्यांच्याशी आधी वाद झाले त्यांच्याशी आज माझे चांगले संबंध आहेत , किंबहुना
समान मुद्द्यावर आम्ही एकमेकांना अनुमोदन करतो ,
माझ्यामुळे ह्या धाग्यावर संपादन मंडळाला यावे लागले ह्या बद्दल खेद व्यक्त करतो.
व ह्यापुढे माझ्या तर्फे ब ह्यांना शांततेचे आव्हान करतो ,
एकमेकाशी वयक्तिक उणी दुणी काढणे , जुने हिशेब चुकते करणे ह्या सर्व प्रकाराला सोडून आपण नव्या दमाने ह्या मिसळपाव परिवारात एकाच कुटुंबातील सदस्याच्या प्रमाणे वागूया असे भावनिक आव्हान करत आहे ,
माझ्या कडून झालेल्या आधीच्या वर्तनाबद्दल दिलगिरी
टाळी दोन हातानी वाजत नाही तेव्हा तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे
धन्यवाद
लोभ असावा
30 Mar 2013 - 6:32 pm | दादा कोंडके
बस कर मामू, अब रुलायेगा क्या? ;)
30 Mar 2013 - 6:40 pm | प्यारे१
दादा,
ड्राफ्टींग कुणी दुसर्यानं केलंय की काय अशी शंका येत आहे.
कुणाच्या प्रतिसादाचं ते तेवढं विचारु नका. ;)
कंट्रोल उदय कंट्रोल!
31 Mar 2013 - 9:09 am | आनन्दा
शिल्पाताई, आव्हानाला तोंड देणार का?
30 Mar 2013 - 6:56 pm | मनीषा
त्या अधिकार्यापासून, त्याच्या पत्नीसंबधित सत्य लपविण्याचा निर्णय मला तरी एथिकल वाटला नाही.
आणि रोगासंबधी पेशंटला जर शक्य तितकी खरी माहीती दिली, तर येणार्या प्रसंगाला तो/ती अधिक योग्य तर्हेने सामोरे जाऊ शकेल असे मला वाटते.
बाकी तुमचे ज्ञान आणि अनुभव पाहता, तुमचा निर्णय चूक अथवा बरोबर हे निदान मी तरी सांगू शकणार नाही.
30 Mar 2013 - 8:32 pm | जेनी...
चान
लेख आणि चर्चा रंगतदार .
निनाद न शिल्पिची जुगलबंदी मसालेदार ....
प्रतिसादातली बरीचशी मतं कसदार .......
31 Mar 2013 - 2:38 pm | सुबोध खरे
मित्रहो
चूक अथवा बरोबर हे मलाही माहित नाही. हा विषय मी वेगवेगळ्या ठिकाणी काढला होता. बहुतांशी वकिली पेशाच्या लोकांचे मत होते कि आपण १००% सत्य रुग्णाला सांगितले पाहिजे (कारण कायद्याच्या दृष्टीने ते तुम्हाला सुरक्षित आहे मग रुग्ण धक्क्याने मेला तरी हरकत नाही) दुसरे म्हणजे नंतर होणारे मालमत्तेचे वाद कमी होतील( विशेषतः रुग्ण श्रीमंत पुरुष असेल तर) . वरिष्ठ नागरिक विशेषतः स्त्रियांचे मत असे पडले कि प्रत्येक वेळा खरे बोलून फायदा होईलच असे नाही. आणि रुग्ण स्त्री असेल तर तिला हे सांगू नये स्त्रिया भावनाप्रधान असतात कारण आपल्याकडे अजून तरी स्त्रियांकडे फारशी मालमत्तेची मालकी नाही त्यामुळे त्यात सर्वसाधारणपणे मालमत्तेचा वाद होत नाही.
डॉक्टर लोकांचे मत विभागलेले होते.त्यात काही लोक कायद्याच्या दृष्टीने जेवढे आवश्यक तेवढेच बोला असे म्हणत होते. पण जवळ जवळ सर्वच डॉक्टरांचे मत असे होते कि रुग्णाला त्याच्या आजाराबद्दल सांगा पण तो किती जगेल याचा अंदाज मुळीच सांगू नका (कारण प्रत्येक डॉक्टरने अघटीत घडलेले पहिले आहे.पाश्चिमात्य संस्कृतीत विशेषतः अमेरिकेत राहणाऱ्या डॉक्टरांचे मत हे १०० % सत्य सांगण्याचे होते. कारण अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा परस्पर अविश्वासावर आधारित आहे defensive medicine
तेथे प्रत्येक डॉक्टर रुग्णाकडे हा उद्या माझ्यावर खटला करणार आहे म्हणून मी आतापासूनच माझी सुरक्षा पाहायला पाहिजे या विचाराने वागत राहतो आणि रुग्ण सुद्धा डोक्तोर आपल्याला कापायला बसला आहे अशा तर्हेने वागतो. त्यामुळे तेथील वैद्यकीय व्यवसाय हा भारंभार चाचण्या वर जास्त आधारित आहे.याने रुग्णाचे बिल प्रचंड वाढते. आणि ज्या लोकांचा विमा नाही ते अक्षरशः रस्त्यावर येतात.भारतात पोटात जंत झाले तर सर्वसामान्य डॉक्टर त्याला ५ रुपयांचे जंताचे औषध देतो आणि २०० रुपयाची शौचाची तपासणी करून घ्या सांगत नाही.अमेरिकेत जर शौचात जंताची अंडी सापडली नाहीत आणि जंताचे औषध दिले तर तो रुग्ण डॉक्टर वर १० लाख डॉलर चा खटला भरण्याची भीती असल्याने डॉक्टर त्याला २ डॉलर चे जंताचे औषध देत नाही.
या नंतर मला असे वाटले कि कि समाजाच्या सर्व स्तरातील/ व्यवसायातील लोकांपुढे हा प्रश्न ठेवावा आणि सर्वसाधारण समाजातील लोकांची मते काय ती जाणून घ्यावीत.त्याप्रमाणे अशी वेगवेगळी मते आली आणि मला ती जाणून घेण्यात अतिशय आनंद झाला.
यात मी परत हेच म्हणतो कि ज्या लोकांना मी चूक वाटतो मला त्यांच्याबद्दल मताबद्दल आदरच आहे, कोणताही आकस नाही. किंवा ज्यांना मी बरोबर वाटतो त्यांच्या बद्दल तितकाच आदर आहे
सर्वाना धन्यवाद
31 Mar 2013 - 2:44 pm | यशोधरा
माफ करा पण भारंभार चाचण्या आणि पेशंटला लुबाडणे, कारण नसताना घाबरवणे (हे स्वतः अनुभवले आहे म्हणून लिहिले) हे तर भारतातही बोकाळले आहे. डॉ. विषयीचा आदर, विश्वास कमी होत चालला आहे आणि त्याला बरेचसे डॉ ही जबाबदार आहेत.
डॉ ने अगदीच उद्या तुम्ही मरणार हे रुग्णाला सांगू नये कदाचित पण योग्य शब्दांत आजारपण, त्याचे प्रमाण वगैरे रुग्णाला थोडक्यात सांगून काय इलाज करावा लागेल व तो का करावा लागेल, त्याने काय उपाय होईल वगैरे सांगण्यास काय हरकत आहे?
31 Mar 2013 - 3:37 pm | चौकटराजा
पण जवळ जवळ सर्वच डॉक्टरांचे मत असे होते कि रुग्णाला त्याच्या आजाराबद्दल सांगा पण तो किती जगेल याचा अंदाज मुळीच सांगू नका
या विधानातच मला गफलत वाटते. मी एक body at war " नावाचे पुस्तक वाचले होते. त्याचा विषय miracle of human immune system असा होता. रात्रंदिन आम्हा युद्धाचाच प्रसंग अशी आपली बॉडी लढत लढत साठ सत्तर वर्षे गाठते. असे त्या पुस्तकाचे सार. त्यात शेवटी एक प्रकरण होते. Mind - the unexplored ally . त्यात लेखकानी लिहिलेले होते की कित्येक वेळा आम्ही फिजीशियन आमच्या उपलब्ध शास्त्रानुसार एखाद्याला candidate of death ठरवतो पण अचानक त्याचे पॅरामीटर्स " फेवरेबल" व्हायला लागतात तो बरा होऊन घरी जातो. कोण करते त्याला बरे.... त्याचे मन.
माझे मत - माणसाला स्थूलमानाचे मरण मुख्य कारणाने येते ते म्हणजे प्राणवायूचा पुरवठा बंद पडणे तसेच महत्वाचा अवयव ( व्हायटल ओर्गन) बंद पडणे. पण यात "नक्की कधी ?" याचे उत्तर परमेशालाच ( तो अस्तित्वात असेल तर )
ठाउक ! डॉक्क्टराना नक्कीच नाही. बाकी वकीलांच्या मताला माझा १००० टक्के पाठिंबा !
31 Mar 2013 - 8:30 pm | निनाद मुक्काम प...
अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा परस्पर अविश्वासावर आधारित आहे defensive medicine
डॉक्टर साहेब हे तुमचे व्यावसायिक मत आहे का वैयक्तिक.
म्हणजे अमेरिकन वैद्यकीय व्यवसायाच्या बाबतीत असे विधान केले ह्याचा अर्थ तुम्हाला ह्या संबंधी बरीच माहिती दिसत आहेत ,
ह्या विधानाला पूरक असे स्पष्टीकरण आपल्याकडे असल्यास ऐकायला जरूर आवडेल.
कोणताही रुग्ण हा एखादी चाचणी करतो , तेव्हा त्याचा डॉक्टर ह्यांना पहिला प्रश्न असतो ,
काळजी करण्यासारखे काही आहे का
एनी थिंग सिरियस
व गंभीर आजारी रुग्णाच्या मनात पहिले प्रश्न येतो
मी आता मरणार का
कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आले नाही आहे.
ह्याची बहुतेक रुग्णाला कल्पना असते.
एखादा रुग्ण मानसिक दृष्ट्या किती कणखर आहे हे डॉक्टरांना लगेच कळून येते.
त्यानुसार त्यास सत्य सांगावे ,
म्हणजे सत्य कथनाचा डोस रुग्ण पाहून कमी जास्त प्रमाणात रुग्णास द्यावा.
31 Mar 2013 - 11:54 pm | सुबोध खरे
निनाद साहेब
आपले कोणी नातेवाईक जर अमेरिकेत असतील तर त्याना सत्यस्थिती बद्दल विचारा. माझे कमीत कमी २५ वर्गमित्र अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत त्यांचे अनुभव आणि माझ्या सक्ख्या नातेवाईकाचे अनुभव असेच दर्शवितात.
मला भेटलेल्या अनेक रुग्णानि सांगितलेले अनुभव आणि वैद्यकीय साहित्य(literature) यावर आधारित असा माझा अनुभव आहे.
यातील एक चक्शुर्वैसत्यम हकीकत खालीलप्रमाणे.
मी पवई येथे हिरानंदानी रुग्णालयात विभागप्रमुख म्हणून काम करीत असताना २००७ मध्ये एक अमेरिकन रुग्ण भरती झाला.
त्याला मोठ्या आतड्याचा कर्करोग झाला होता म्हणून तो उपचारासाठी भारतात आला होता.
एक वर्षापूर्वी त्याला पोटाची काहीतरी तक्रार होती म्हणून तो अमेरिकेतील एका मोठ्या रुग्णालयात गेला तेथे त्याला एन्डोस्कोपी करण्यासाठी पाठविले.एन्डोस्कोपी मध्ये त्याला एक पोलीप(polyp मश्रूम सारखी वाढ) असल्याचे निदान झाले.
पण अमेरिकन कायद्याप्रमाणे तेथे डॉक्टर ते पोलीप तसेच ठेवून बाहेर आले आणि त्याला अहवालात एक अडीच पानी पत्र दिले त्यात पोलीपचे वेगवेगळे प्रकार कशामुळे होतात त्यात अनुवांशिक,पोटाच्या विकारामुळे होणारे, कर्करोगामुळे होणारे अशा सर्व रोगांची बरीच माहिती होती हि माहिती पाहून हा रुग्ण घाबरून गेला कात करावे काय नाही या शृ न्गापत्तीत त्याने दोन महिने घालवले त्याकाळात त्याच्या रोगाची इत्यंभूत माहिती त्याच्या विमा कंपनीने मिळवली आणि त्याची विम्याची पॉलिसी नुतानिकरणासाठी आली तेंव्हा त्यांनी त्याला पोलीपचा उपचारखर्च देण्याचे नाकारले.( exclusion as preexisting illness)
त्यामुळे या रुग्णाला स्वतःच्या खर्चाने त्याची परत एन्डोस्कोपी आणि बायोप्सी करावी लागली. दुर्दैवाने त्यात कर्करोग असल्याचे निदान झाले.पुढचा खर्च विमा कंपनीने नाकारल्यामुळे त्याच्या परवडण्याच्या बाहेर होता. त्याकाळात तो भारतीय रुग्णालयाच्या वेबसाईट च्या संपर्कात आला आणि भारतात येणारा खर्च परवडणारा असल्याने तो आमच्या रुग्णालयात आला. दुर्दैवाने तो भारता त येई पर्यंत त्याला फार उशीर झाला होता. त्याचा सी टी स्कॅन मीच केला होता त्यात त्याचा कर्करोग सर्वत्र पसरला होता. हा रुग्ण पुढील दीड महीना आमच्या रुग्णालयात उपचार घेत होता आणि कर्करोगाने त्याचा बळी घेतला.
याच जागी त्याची एन्डोस्कोपी जर भारतात झाली असती तर भारतीय डॉक्टरने त्याच वेळी(त्याच खर्चात) त्याची बायोप्सी केली असती आणि विम्याच्या खर्चात त्याचे उपचारहि झाले असते आणि तो नक्कीच जास्त जगला असता( कदाचित बरा सुद्धा झाला असता) .
असे काही बळी मी अमेरिकन पद्धती (सिस्टीम) चे पाहिले आहेत म्हणून कोणती पद्धती बरोबर आणि कोणती चूक हे ठरविणे माल कठीण जाते.
अमेरिकेत आपला जर आरोग्याचा विमा( विशेषतः कंपनीने केलेला) असेल तर आपल्याला उत्कृष्ट उपचार मिळू शकतात. पण आपण वृद्ध असला आणि सामाजिक सुरक्षा पद्धतीत असलात तर आपले हाल कुत्रा खाणार नाही.जुने जीर्ण रोग असतील तर आपली विमा कंपनी आपल्याला विमा देणार नाही आणि औषधांचा खर्च आपल्याला परवडणार नाही.
माझा एक मित्र अमेरिकेत सांध्यांच्या रोगाचा तज्ञ आहे त्याने सांगितलेली कहाणी हृदयद्रावक आहे त्याचे कित्येक रुग्ण वृद्ध्श्रमात राहतात शेजारच्या घरातील वृद्ध माणूस मेला तर ते प्रथम त्याच्या औषधांची पेटी उघडून आपल्याला लागणारी औषधे काढून घेतात आणि मगच पोलिसांना मृत्यू झाल्याचा फोन करतात. त्याने परत परत सांगितले कि हि १००% सत्य गोष्ट आहे.
1 Apr 2013 - 12:25 am | शिल्पा ब
अगदी खरं आहे. विमा कंपन्या असले प्रकार करतातच. रुग्णालयाचा खर्च प्रचंड आहे. कारण कोणतंही असो प्रचंड खर्च ठरलेलाच.
1 Apr 2013 - 10:25 am | चौकटराजा
माझा एक मित्र अमोरिकेत दोन वर्षे रहायला होता.त्यांच्या नोकरीवरच्या मित्राला हार्ट अटॅक आल्यासारखे झाले. त्याला हॉस्पिटलात टाकताना कोण वांधे आले या सहकार्याना. अमेरिकेतील डोक्टर्स हे कायद्याच्या भयाने पार भित्रट झाले आहेत. असे माझ्या मित्राचे निरिक्षण आहे.
2 Apr 2013 - 12:22 am | सुबोध खरे
अमेरिकेत एका सर्जन चा किंवा स्त्रीरोग तज्ञाचा व्यावसायिक क्षतीपुर्ती विमा(professional indemnity insurance) १००,०००/- डॉलर्स ( एक लाख डॉलर्स)वर्षाचा आहे. हि रक्कम साधारण अभियंत्याच्या(Engineer) वार्षिक पगाराच्या दुप्पट एवढा आहे.
माझा २० लाख रुपयाचा वरील विमा फक्त रुपये २२००( दोन हजार दोनशे फक्त) वार्षिक आहे. हा विमा JCI ( joint commission international ) च्या मान्यतेसाठी (रुग्णालयाच्या) करणे आवश्यक होते.
यावरून वरील विधानाची सत्यता जाणवावी.
31 Mar 2013 - 2:53 pm | सुबोध खरे
आपले म्हणणे सत्य आहे(दुर्दैवाने) आणि हि साथ वेगाने पसरत आहे
31 Mar 2013 - 2:53 pm | सुबोध खरे
आपले म्हणणे सत्य आहे(दुर्दैवाने) आणि हि साथ वेगाने पसरत आहे
31 Mar 2013 - 2:55 pm | टवाळ कार्टा
चायला....गरोदर असणे हा रोग आहे का??? ;)
31 Mar 2013 - 3:10 pm | सुबोध खरे
लग्न झाले आहे कि नाही त्यावर अवलंबून
31 Mar 2013 - 3:14 pm | यशोधरा
हा नक्की एका डॉ ने लिहिलेलाच प्रतिसाद आहे ना? तुमचा व्यवसाय आणि अनुभव वगैरेंचा मान ठेवून्ही हा प्रतिसाद खूप खटकणारा आहे, हे नमूद करते.
31 Mar 2013 - 8:42 pm | निनाद मुक्काम प...
अनेक जाणकार ,माननीय मिपाकरांचे सुद्धा मत जाणून घेण्यास आवडेल. अर्थात त्यानं सूचक मौन पाळायचे असेल तर त्यावर कोण कशाला आक्षेप घेईल.
31 Mar 2013 - 11:18 pm | सुबोध खरे
यशोधरा ताई
हा प्रतिसाद फक्त विनोदी नाही तर तितकाच सत्य आहे.
विवाहपूर्व गर्भारपण हे किती तर्हेने त्रासदायक होऊ शकते हे पहिले तर तो रोग म्हणावा या पातळीवर पोहोचतो.
नुसतेच त्यामुलीसाठी नव्हे तर आई वडिलांसाठीही काय घोर आहे ते सर्वाना माहिती आहेच पण ज्यावेळी या मुली गर्भपात करून घेतात त्यातून त्यंच्या मनावर एक कायमचा आघात होऊन राहतो. हे सर्वसामान्यपणे लोकांना जाणवत नाही. पण जेंव्हा या मुली लग्नानंतर वंध्यत्वा साठी उपचार घेण्यास येतात तेंव्हा प्राथमिक तपासणीत हा प्रश्न विचारला जातो कि आपण कधी गरोदर राहिला होतात काय? ( म्हणजे पूर्वी गर्भपात झाला आहे काय) कारण जी स्त्री एकदाही गरोदर राहिली नाही तिला प्राथमिक वंध्यत्व म्हणतात (primary infertility) आणि जिला एक मूल आहे किंवा अगोदर गर्भपात झाला आहे तिला दुय्यम (सेकंडरी) वंध्यत्व.
दुय्यम वंध्यत्व हे उपचार करण्यासाठी जास्त सोपे आहे तसेच त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त असते.
ज्या स्त्रिया याज्मानांसह येतात त्या बाहेर(यजमानांसमोर) सांगतात अगोदरचे कोणतेही गरोदरपण नव्हते पण आत तपासणी साठी आल्यावर मात्र लग्नापूर्वी गर्भपात केला होता अशी मान खाली घालून कबुली देतात.अर्थात ज्यांना विनासायास मुल होते त्यांना हा विचार मन कुरतडत नसेल नाही असे म्हणता येणार नाही.
हे प्रमाण गेल्या १० वर्षात चिंता करावे इतके वाढले आहे.
म्हणून जी गोष्ट लग्नानंतर अत्यंत आनंदात जाहीर केली जाते ती लग्नापूर्वी काळजीची गोष्ट आहे म्हणून हा प्रतिसाद दिला.
आपणास नक्की काय खटकले ते कळले नाही
31 Mar 2013 - 11:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे
शी.. कित्ती कित्ती बुरसटलेले विचार आहेत तुमचे... हाव ओल्ड फ्याशण्ड... इ इ च्या पठडीतले काही वाटले असेल ;-)
(ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.)
1 Apr 2013 - 8:49 am | यशोधरा
विमे, हल्लीच ना हो तुम्ही इतरांची खिल्ली उडवू नये वगैरे लेख लिहिलात? ते तुम्हांला स्वतःला लागू होत नाही का?
1 Apr 2013 - 11:27 am | विश्वनाथ मेहेंदळे
काय यशोधरा ताई, मी फक्त मस्करी करत होतो. तुम्ही इतके मनावर घ्याल असे वाटले नव्हते. मुळात ती तुमची खिल्ली नसून "लेकी बोले सुने लागे" प्रकार होता. तुमची आजवरची वाटचाल पाहता तुम्ही इतकी टोकाची मते मांडत नाहीत, इतर काही जण मांडतात. तुम्हाला हे कळेल अशी अपेक्षा होती. पण जाऊ दे, तुम्हाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो.
अवांतर :- माझ्या धाग्यात मी "इतरांची खिल्ली उडवू नये" असे अजिबात दुरान्वयानेही म्हटले नाही हो. माझी आजवर इथली वाटचाल गेली इतरांची खिल्ली उडवण्यात. आपलेच दुकान कशाला बंद करू मी. ;-)
1 Apr 2013 - 12:14 pm | यशोधरा
असे झाले काय! :) बरं बरं. मला डायरेक बोलायची सवय, तेह्वा ते लक्षात नाही आले. आत्ता आले ;)
1 Apr 2013 - 9:16 am | यशोधरा
डॉ. तुमचा मुद्दा समजतो आहे, तरीही अशा अवस्थेला रोग म्हणणे, अशा स्त्रीला रुग्ण म्हणून वागवणे मला पटत नाही. निदान भारतात तरी अजूनही बहुतांशी लग्नाआधी फसवणूक, अज्ञान, जबरदस्ती इ. प्रकारांमुळे आणि घटनांमुळे गरोदरपण स्रियांवर लादले जाते. (दुर्दैवाने लग्नानंतरही हक्काच्या बायकोवर जबरदस्ती होते, तो एक वेगळाच विषय आहे, तेह्वा इथे नको.) एकूणच ज्या सामाजिक संस्कारांचा पगडा मनावर असतो, त्यामुळे, आधीच मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झालेल्या अशा मुली/ स्त्रियांना डॉ च जर रोगी म्हणून वागवू लागले, कुमारी माता होणं हा एक रोग आहे अशा प्रकारे बोलू लागले तर अशा कुमारी माता बाकी काही नाही तरी मनोरुग्ण बनायला/ डिप्रेशनमध्ये जायला वेळ लागणार नाही हे निश्चित.
एखाद्याच्या आयुष्यातल्या अपघाताला रोग म्हणणं कितपत संयुक्तिक? अपघातामुळे आयुष्य खुरटून जायला नको. त्याची सावली आयुष्यभर राहून त्याने आयुष्य खुरटायची गरज नाही. डॉ तर एखाद्या व्यक्तीला किती धीर देऊ शकतात! मनोबल वाढवू शकतात! त्याऐवजी डॉ नेच लग्नाआधी गरोदर राहिलेल्या मुलीकडे रोगी आणि असे गरोदरपण रोग अशा दृष्टीने पाहणे, असा विचारही करणे मला तरी चुकीचे वाटते.