✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ये कहां आ गये हम

र
रामदास यांनी
Wed, 02/27/2013 - 21:46  ·  लेख
लेख
मराठी भाषा दिनानिमीत्त आणि या प्रतिसादासाठीन्माझी काही टिपणे गविच्या चरणी अर्पण पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. अधुनमधून केले यूज इंग्लिश वर्ड्स तर काय इश्यू आहे. मराठी भाषेनेच नव्हे तर कोणत्याही लँग्वेजने नेहमी अडाप्टेबल राहिलं पाहिजे, तरच सर्व्हायवल आहे. इंग्लिश वर्ड्स रोजच्या भाषेत मिंगल झाले आहेतच तेव्हा प्रत्येकवेळी डिक्शनरी घेऊन त्याचं ट्रान्स्लेशन करावं असं मी नाही इन्सिस्ट करणार बुवा.
हे माझे रीसेंट थॉट्स आहेत. माझी रीक्वेस्ट सगळ्यांनी व्होल्हार्टेडली काँट्रीब्युट करावे मी मराठीतून ईम्ङ्रजी शिकतो आहे ते अप्रीशिएट करावे
मराठी भाषा दिवसाच्या निमीताने थोडा आढावा घ्यावा म्हणतो आपल्या आयुष्याचा भाषेच्या माध्यमातून. भाषेचे रुप दर पिढीगणीक बदलते हा अस्वस्थतेचा मुद्दा नाही. भाषा नदीसारखी वाहती असते. नविन शब्द येतात -वाहून जातात किंवा तळाशी जातात. नवनवे अविष्कार चाकोरीपलीकडे जातात आणि भाषा समृध्द करतात पण काळजी वाटते ती सध्याच्या वापरात असलेल्या मराठीतून व्यक्त होणार्‍या समाज जीवनाची. भाषा असते संवादासाठी. संवादासाठी वेगवेगळी माध्यमे उपलब्ध होउनही संवाद त्रोटक झाले आहेत. लघुरुप वापरण्याची - त्यातल्या त्यात इंग्रजी लघुरुपांचा वापर-पध्दत मराठी संभाषणात वाढत जात आहे.पूर्वि तार पाठवण्यासाठी किंवा छोट्या जाहीराती लिहीताना जो शब्दांचा आटोपशीर वापर होत होता तो रोजच्या वापरात आला आहे. जे आधी हास्यास्पद होतं ते आता लोल झालं आहे.एकीकडे संवादाच्या अभावानी माणसे दूर होताना दिसत आहेत त्याच वेळी संवादाची शक्यता लघुरुप् वापरून कमी होताना दिसते आहे.असे परस्पर विरोधी चित्र एकाच वेळी दिसते आहे तेव्हा बरेच प्रश्न मनात उभे राहतात.कदाचीत ह्या अभावाने भाषेचा वापर कमी होऊन काही दिवसांनी व्यक्त होण्यासाठी फक्त स्मायलींचाच वापर तर होणार नाही ना ? आणखी एक अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे साध्यासोपे मराठी शब्द हळूहळू हद्दपार होताना दिसत आहेत. उदाहरणार्थ पतली गली हा शब्द आला आणि बोळ हा शब्द दिसेनासा झाला. ग्लास टेबलावर आले ,त्याची गिलासं झाली आणि फुलपात्र हा शब्द अडगळीत किंवा मोडीत गेला. अ‍ॅलर्जी आली आणिइ वावडं गेलं.पूर्वी मी कामासाठी शिपायाला पाठवत होतो आता तेच काम बंदा किंवा बंदी करते आहे. सुयोग्य शब्दांचा वापर आता लोकांना अनावश्यक वाटयला लागला आही की काय असे वाटायला लागले आहे. त्या त्या क्षेत्राची जर्गन आता राजमान्य भाषा झाली आहे.काही बदल संगणकाच्या भाषेनी आणले आहेत तर काही नवीन विक्रीकलेनी आणले आहेत. एखाद्या कार्यक्रमाची घडण मराठीत सांगीतली तर समोरून उत्तर येते की प्लीज हा अल्गोरीदम समजत नाही. केवळ शब्दांच्या रुपाने मराठी बदलते आहे असे नाही तर व्यक्त होण्यासाठी वापरली जाणारी ढब आणि उदगाराचे स्वरुप पण बदलते आहे. लैंगीक क्रिया किंवा लैगीक छटा असणारे वाकप्रचार किंवा शब्दांची नवनविन रुपे अतिशय स्पष्ट शब्दात येते आहे. परवा बोलता बोलता एक मुलगी म्हणाली ते सर तर वर्गात सगळ्यांवर चढायलाच येतात. त्याच संभाषणात पुढे ती म्हणाली प्रेसेंटेशन देताना माझी तर फाटलीच होती. चढणे म्हणजे माउंटींग फॉर कॉप्युलेशन किंवा फाटणे ह्या शब्दाचा उगम ** फाटणे हा संदर्भ न समजता जेव्हा संभाषणाचा वापर होताना दिसतो तेव्हा या पिढीला आम्ही सांस्कृतीक वारसा म्हणून काय दिले असा प्रश्न पडून मन उद्वीग्न होते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती

प्रतिक्रिया द्या
36334 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

संपुर्ण मराठी माध्यमातुन

मृत्युन्जय
गुरुवार, 02/28/2013 - 11:10 नवीन
संपुर्ण मराठी माध्यमातुन शिकलेला माझा मित्र जेव्हा "सॅन्ड्विच करण्यापुर्वी नाइफने ब्रेडचे त्रँग्युलर पिसेस करुन घेतो आणि साइड्स कट करुन घेतो " असे म्हणाला होता तेव्हाच मी निष्प्राण झालो होतो. आपण लै " यो " असे दाखवण्यासाठी काही लोक कसोशीने मराठीचा वापर टाळतात. " पट्टीच्या सहाय्याने कागदाचे तुकडे कर" असे म्हटल्यावर माझी मैत्रीण आश्चर्याने " किती हेवी मराठी बोलतोस तु " असे म्हणाली होती. ते ही आठवते. वरील दोघेही लोक शुद्ध महाराष्ट्रीयन कुटुंबातले मराठी माध्यमातुन शिकलेले. त्यांची ही अवस्था तर इंग्रजीतुन शिकलेले आणि त्याच वातावरणात मोठे झालेले लोक याहुन चांगले मराठी बोलतील अशी अपेक्षा करणेच चुकीचे. अर्थात हे बोली भाषेबद्दल झाले. जसे बोलतो तसेच लोक लिहितात तेव्हा मात्र खुप त्रास होतो.
  • Log in or register to post comments

.

jaypal
गुरुवार, 02/28/2013 - 11:21 नवीन
काय बोलणार ?
  • Log in or register to post comments

मराठी शब्द..

अक्षया
गुरुवार, 02/28/2013 - 11:33 नवीन
रामदास काका सहमत आहे. आमच्या घरातील सगळेच मराठीचा सार्थ अभिमान असलेले. सगळ्यांचे शिक्षण मराठी माध्यमातुन झाले. परवाचीच गोष्ट. माझा भाऊ त्याचा ३ वर्षाचा मुलाला गोष्ट सांगत होता. 'सिंहाचे प्रतिबिंब त्यालाच पाण्यात दिसते आणि तो विहिरीत उडी मारतो वगैरे..खुप प्रयत्न केले पण त्या मुलाला प्रतिबिंब शब्दाचा अर्थ कसा सांगायचा असा प्रयत्न चालु होता. शेवटी भावाने एक पाण्याची बादली भरुन आणली त्यात वाकुन दाखवले, यात मी दिसतोय त्याला प्रतिबिंब म्हणतात असे सांगीतले त्यावर तो ३ वर्षाचा मुलगा शांतपणे म्हणाला बाबा म्हणजे तुला रिफ्लेक्शन म्हणायचे आहे का? माझा भाऊ निरुत्तर होऊन त्याचाकडे पहात राहीला..
  • Log in or register to post comments

हम्म , छान चर्चा !

सुहास..
गुरुवार, 02/28/2013 - 11:41 नवीन
हम्म , छान चर्चा ! माझ शिक्षण ईग्रंजीतून झाले आहे , माझा लिहीताना वाचताना महाप्रचंड घोळ होतोच. पण एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली आहे की ..जितके सोप्प ईग्रंजाळलेले शब्द वापरून मराठी बोलता येते तितकेच अवघड मराठी शब्द वापरताना होते, अर्थात त्यात मजा ही खुप आहे . हेच पहा ना , त्याला दहा दिवसांपासुन व्हेन्टिलेटर वर ठेवले आहे. कस बोलायचे हे व्हेन्टिलेटर ?
  • Log in or register to post comments

लाईफ सपोर्टवर ठेवले आहे.. असं

गवि
गुरुवार, 02/28/2013 - 11:46 नवीन
लाईफ सपोर्टवर ठेवले आहे.. असं म्हणता येईल.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

ओळखीचे शब्द

नितिन थत्ते
गुरुवार, 02/28/2013 - 12:17 नवीन
काही वेळा ओळखीचे शब्द वेगळ्या संदर्भात वापरले की चकित व्हायला होते. स्क्रू मध्ये वॉशर (शुद्ध मराठीत- वायसर) ओवून घे असं एका मराठी कामगाराला सांगितल्यावर तोही बेशुद्ध व्हायचाच तेवढा राहिला होता.
  • Log in or register to post comments

आपल्यासाठी भाषा आहे.

गवि
गुरुवार, 02/28/2013 - 12:18 नवीन
आपल्यासाठी भाषा आहे. भाषेसाठी आपण नाही. "श्री चामुन्डराये करवियले श्रीगंगराये सुत्ताले करवियले" किंवा "जैसे भडबुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात होतो तसा एक धडाका जाहला" (चूभूदेघे) अशा मराठीकडून बदलत बदलत आपण बर्‍याच वेगळ्या मराठीकडे आलो आहोत. पुलंनी तीसचाळीस वर्षापूर्वी लिहीतानाही "उमाठा" आणि तत्सम शब्द गायब होत असल्याचं लिहीलं आहे. हे सतत वाटत असतं. आता जागतिकीकरण होत असल्याने ही प्रक्रिया आणखी तीव्र झाली आहे. सुहासने दिलेलं उदाहरणच पुढे घेतो. बहुतांश लोक जर "व्हेंटिलेटरवर ठेवला" म्हणायला लागले तर "व्हेंटिलेटरवर ठेवला" हीच "भाषा". माणसं एकमेकांशी बोलण्यासाठी / भापोसाठी जे माध्यम वापरतात ते भाषा. सर्वात सहज आणि सर्वात चपखल इकडचा भाव तिकडे ट्रान्स्फर होईल ते माध्यम उत्तम. मराठी हे आपापतः आपण शिकत आल्यामुळे सहज वाटणारं माध्यम आहे. भाषा सोडा..कोणी नृत्य करतो तर कोणी चित्र काढतो. उद्देश व्यक्त होण्याचा असतो. पण दैनंदिन व्यवहारात चित्रं, नाच अशा माध्यमातून व्यक्त होणं सोपं नाही. म्हणून शब्दयुक्त भाषा. आता फेसबुकच्या सानिध्यात असणार्‍या असंख्य व्यक्तींना लोल किंवा ओएमजी किंवा स्माईली ही भाषा परस्पर संवादात अपील होत असेल तर त्यांची जन्मभाषा आपापतः प्रमाण मराठी होती म्हणून त्यांनी प्रवाहाच्या उलट जाऊन ती मूळ स्वरुपात जतन करणारे शब्द हुडकत किंवा जपत रहावं? मुख्य उद्देश काय? संवाद की भाषा जपणं? मूकबधिर सुद्धा एकमेकांत आणि इतरांशी आपल्या खास भाषेत व्यक्त होतात. प्रमाण मूकबधिर भाषा ही सोयीची असली तरी ती वापरताना अनेक बदल तिथेही केले जातात तर बोलीभाषेची काय कथा? इंग्रजीतून किंवा अरबी-फारसीतून शब्द आले म्हणून बर्‍याचदा वाईट वाटून घेतलं जातं. त्यातही काही अर्थ नाही. स्वतः इंग्रजीतच मूळ लॅटिन आणि लॅटिनोद्भव भाषांतून अगणित शब्द आले आहेत. जागतिक भाषा म्हणून इंग्रजी पसरत असताना मराठीत तिची भेसळ झाली तर काय होईल? : आपण आपल्या लहानपणी जी भाषा बोलत होतो त्यातले "ते" आपले शब्द नाहीसे होतील आणि त्याजागी एकेका शब्दाच्या अंतराने पेरलेले अन्यभाषिक शब्द येतील. त्याउपर जाऊन पूर्ण भाषाच रिप्लेस होईल. हलगीवादन, वासुदेव, भुत्या, कल्हई, शिकलगारी, जात्यावर दळण या परंपरा शहरातून नाहीश्या झाल्या. लहान शहरांत आणि गावात त्या अजून आहेत. पण त्याही कमी होतील. म्हणून त्या टिकवत ठेवण्याचं काय कारण? त्याला पर्याय आले आणि लोकांनी ते घेतले. जर नवीन पिढी, शहरी समाज अशा रितीने भाषेत बदल करत असतील तर त्यात वाईट वाटणं साहजिक आहे, पण ते वाईट वाटणं कोणत्याही "संरक्षक" चळवळीकडे वळू नये. ते वाईट वाटणं फक्त "आपलं ते पूर्वीचं आता राहिलं नाही" अशा अनेक इतर बाबतीत येणार्‍या नॉस्टाल्जियाइतकंच मर्यादित असावं. मराठी पुस्तकांतून साठवलेलं ज्ञान आणि मनोरंजक साहित्य मागे पडण्याची काळजी वाटणं हेही खरंच आहे, पण या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक धरुन ठेवू शकत नाही. दोन हजार वर्षापूर्वीचे किती ग्रंथ आज टिकून आहेत? ते जाऊ दे. पन्नास वर्षात किती पुस्तकं निघाली आणि किती सामान्य लोकवाचनात टिकून आहेत? संस्कृत ग्रंथांमधे असलेलं सारं ज्ञान फक्त अभ्यासकांसाठी मर्यादित झालं तसं पुढे मराठीचंही होऊ शकेल आणि तसं होऊ नये म्हणून आटापिटा करण्याची आवश्यकता नाही. टिकायचं ते टिकतंच आणि काळाच्या ओघात चारदोन खास ग्रंथ वगळता जवळजवळ सर्व साहित्य मुख्यप्रवाहातून बाजूला फेकलं जातंच आणि अस्तंगत होतंच. भाषा आणि तिचं परिवर्तन ही फारच संवेदनशीलरित्या घेतली जाणारी गोष्ट आहे. पण कोणत्याही गोष्टीची अस्मिता ही वाईटच हे म्हणावंसं वाटतं. इतर भाषा (जपान, जर्मनी, तामिळनाडू इ इ) कसे आपापल्या भाषेला धरुन असतात आणि अन्य भाषांना शिरकाव करु देत नाहीत आणि सर्व कामकाज आपल्या स्वतःच्या भाषेत करवतात इत्यादि कडवेपणा ऐकून माझी मराठी भाषा तशी नाही याचा मला आनंद होतो. माझी भाषा इतरांचा विटाळ न मानता अमर्यादितरित्या मिसळण्यास तयार होत असेल तर मला अभिमान आहे.. टिकण्यात मजा नाही, इतरांशी मिसळण्यात आहे.. हे निराशाजनक नाही हे फक्त काल्पनिक काळजी टाळणं आहे.
  • Log in or register to post comments

भाषेच्या प्रवाहीपणाबद्दल

बॅटमॅन
गुरुवार, 02/28/2013 - 12:55 नवीन
भाषेच्या प्रवाहीपणाबद्दल सहमती दर्शवून एका काहीशा अवांतर मुद्याबद्दल बोलतो.
मराठी पुस्तकांतून साठवलेलं ज्ञान आणि मनोरंजक साहित्य मागे पडण्याची काळजी वाटणं हेही खरंच आहे, पण या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक धरुन ठेवू शकत नाही. दोन हजार वर्षापूर्वीचे किती ग्रंथ आज टिकून आहेत? ते जाऊ दे. पन्नास वर्षात किती पुस्तकं निघाली आणि किती सामान्य लोकवाचनात टिकून आहेत?
बाकी भाषांचं माहीत नाही, पण अशी इतकी उत्तमोत्तम पुस्तके आज लुप्तप्राय आहेत की सांगता पुरवत नाही.
संस्कृत ग्रंथांमधे असलेलं सारं ज्ञान फक्त अभ्यासकांसाठी मर्यादित झालं तसं पुढे मराठीचंही होऊ शकेल आणि तसं होऊ नये म्हणून आटापिटा करण्याची आवश्यकता नाही. टिकायचं ते टिकतंच आणि काळाच्या ओघात चारदोन खास ग्रंथ वगळता जवळजवळ सर्व साहित्य मुख्यप्रवाहातून बाजूला फेकलं जातंच आणि अस्तंगत होतंच.
हा काहीसा पूर्वानुभवाचे जास्तच सामान्यीकरण करण्याचा प्रकार आहे. ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील इतके नवनवे ग्रंथ उजेडात आले आणि पुढे क्लासिक होऊन बसले, की वरील वाक्य मान्य करवत नाही. जे टिकलं, ते भारीच असतं असं काही नाही. तमिळमधील सर्वात फेमस शिलप्पधिकारम आणि मणिमेगलाई ही महाकाव्येसुद्धा स्वामिनाथन अय्यर यांच्यामुळे १९ व्या शतकातच जण्रल पब्लिकला कळाली, नैतर कुणाला माहिती नव्हती. तीच गोष्ट महानुभाव ग्रंथांची. माझा मुद्दा इतकाच आहे, की उत्तमोत्तम पुस्तके मराठीत वेगवेगळ्या वेळी पब्लिश झालीत-त्यांच्या दर्जाबद्दल वाद होऊच शकणार नाही इतकी भारी. पण समहौ ती विस्मृतीत गेली, उदा. "मुंबै शहराचे वर्णन" हे एक अप्रतिम पुस्तक आज किती जणांना माहिती आहे? अजबने जर ५० रु. मध्ये ते छापले नसते तर घंटा कळाले नसते कुणालाही-असे प्रयत्न होताहेत, पण खूप कमी प्रमाणात. तीच गोष्ट नासदीयसूक्तभाष्यासारख्या कामशास्त्रविषयक माहितीने खच्चून भरलेल्या आणि १९४० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाची. अशी अजून कितीतरी उदाहरणे सांगता येतील. १९४०-५० च्या आधीचीच कशाला, नंतरच्या काळातलीसुद्धा काही उत्तम पुस्तके आज दुर्मिळ आहेत. माझा आक्षेप आहे तो या उत्तम पुस्तकांच्या अनुपलब्धीवर. हे सुधारले नाही तर मराठी वाङ्मयाबद्दल वृथा आक्रोश करत बसतील लोक. जरा शोधाशोध केली तरी खूप भारी पुस्तके सापडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बाकी भाषांचं माहीत नाही, पण

गवि
गुरुवार, 02/28/2013 - 13:10 नवीन
बाकी भाषांचं माहीत नाही, पण अशी इतकी उत्तमोत्तम पुस्तके आज लुप्तप्राय आहेत की सांगता पुरवत नाही.
म्हणजेच ही लुप्त होण्याची प्रक्रिया सतत चालू आहे आणि "हल्ली"च्या "वाढत्या मराठी विद्रूपीकरणाच्या" बर्‍याच आधीच्या, म्हणजे तुलनेत भाषासंवर्धक वातावरण असलेल्या काळातही चालूच होती. भाषेचे मूळ रूप टिकण्याचा आणि त्यातले उत्तम ग्रंथ लुप्त न होण्याचा परस्परसंबंध नाही.
हा काहीसा पूर्वानुभवाचे जास्तच सामान्यीकरण करण्याचा प्रकार आहे. ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील इतके नवनवे ग्रंथ उजेडात आले आणि पुढे क्लासिक होऊन बसले, की वरील वाक्य मान्य करवत नाही. जे टिकलं, ते भारीच असतं असं काही नाही. तमिळमधील सर्वात फेमस शिलप्पधिकारम आणि मणिमेगलाई ही महाकाव्येसुद्धा स्वामिनाथन अय्यर यांच्यामुळे १९ व्या शतकातच जण्रल पब्लिकला कळाली, नैतर कुणाला माहिती नव्हती. तीच गोष्ट महानुभाव ग्रंथांची.
यातलं "जे टिकलं ते भारी असतंच असं नाही" या भागाविषयी: अगदी अगदी.. जे टिकलं ते भारी असतंच असं अजिबातच नाही. बरंच (त्या त्या वेळी चांगलं, दर्जेदार असलेलं आणि कधीकधी गाजलेलं देखील) पुढे काळाच्या ओघात लुप्त होतं आणि शतकांनंतर कुठेतरी उघड होऊन पुन्हा प्रसिद्ध होतं. तरीही जे बदलत राहिलं तेच टिकून राहिलं हा उलट विचारही करुन पहावा. आणि म्हणूनच भाषा बदलत बदलत सध्या आहे त्या तथाकथित "धेडगुजरी" रुपात टिकत आली. आणि तशीच बदलली तर टिकेल. रोजच्या व्यवहारात जित्या-श्वास घेत्या रुपात जगेल. अशी "उत्तम" पुस्तकं मात्र पुढे "अपघाताने" सापडून पुनर्जीवित व्हावी लागतील.
माझा मुद्दा इतकाच आहे, की उत्तमोत्तम पुस्तके मराठीत वेगवेगळ्या वेळी पब्लिश झालीत-त्यांच्या दर्जाबद्दल वाद होऊच शकणार नाही इतकी भारी. पण समहौ ती विस्मृतीत गेली, उदा. "मुंबै शहराचे वर्णन" हे एक अप्रतिम पुस्तक आज किती जणांना माहिती आहे? अजबने जर ५० रु. मध्ये ते छापले नसते तर घंटा कळाले नसते कुणालाही-असे प्रयत्न होताहेत, पण खूप कमी प्रमाणात. तीच गोष्ट नासदीयसूक्तभाष्यासारख्या कामशास्त्रविषयक माहितीने खच्चून भरलेल्या आणि १९४० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाची. अशी अजून कितीतरी उदाहरणे सांगता येतील. १९४०-५० च्या आधीचीच कशाला, नंतरच्या काळातलीसुद्धा काही उत्तम पुस्तके आज दुर्मिळ आहेत. माझा आक्षेप आहे तो या उत्तम पुस्तकांच्या अनुपलब्धीवर. हे सुधारले नाही तर मराठी वाङ्मयाबद्दल वृथा आक्रोश करत बसतील लोक. जरा शोधाशोध केली तरी खूप भारी पुस्तके सापडतील.
हे सुधारले नाही तर म्हणजे? काय सुधारायचं? ही पुस्तकं शोधून पुनर्मुद्रित करायची? केवळ पन्नासला बाजारात आलं म्हणून जे वाचलं जातं ते पुस्तक म्हणजेच वाङ्मय? तरीही ठीक आहे. करावीत अशी चांगली पुस्तकं शोधून पुनर्मुद्रित, एक समाजकार्य म्हणून.. आणि ती सर्व भाषांतली करावीत.. अनुवादित करावीत.. या सर्वाचा रोजच्या चालू मराठी भाषेच्या "शुद्धता" किंवा "मूळरुप टिकबण्या"शी संबंध नाही. (आणि तू तसं म्हणतो आहेस असंही नव्हे :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

गविशेठ, मी आधीच म्हणालो होतो

बॅटमॅन
गुरुवार, 02/28/2013 - 13:20 नवीन
गविशेठ, मी आधीच म्हणालो होतो की माझा प्रतिसाद एका अवांतर मुद्द्याशी निगडित आहे म्हणून...भाषेच्या प्रवाहीपणाबद्दल आणि तुमच्या या प्रतिसादातील अन्य मुद्द्यांशी अर्थातच सहमत आहे हे मी प्रतिसादाच्या सुरुवातीसच नमूद केले होते.
हे सुधारले नाही तर म्हणजे? काय सुधारायचं? ही पुस्तकं शोधून पुनर्मुद्रित करायची? केवळ पन्नासला बाजारात आलं म्हणून जे वाचलं जातं ते पुस्तक म्हणजेच वाङ्मय?
अंमळ डिसमिसिव्ह सूर आहे का हो इथे? उत्तम पुस्तके या ना त्या स्वरूपाने आपल्यासमोर यावीत इतकाच मुद्दा आहे. वाङ्मयाची व्याख्या इथे करतच नाहीये. पण विविध कारणांमुळे लै भारी पुस्तके नष्ट होतात, ते प्रमाण कमीतकमी असावे. सुधारणा म्हणजे हीच. एक पिढी अगोदरचेही बरेच उत्तम ग्रंथ आज औट ऑफ प्रिंट आहेत, उदा. मराठी लावणी बाय म वा धोंड. शंभरदीडशे वर्षे सोडा, ४०-५० वर्षांअगोदरची पुस्तकेसुद्धा बर्‍याचदा धड मिळत नाहीत इथे. न र फाटक, विट्ठलराव घाटे, इ. किती उदाहरणे सांगावीत.
तरीही ठीक आहे. करावीत अशी चांगली पुस्तकं शोधून पुनर्मुद्रित, एक समाजकार्य म्हणून.. आणि ती सर्व भाषांतली करावीत.. अनुवादित करावीत..
अर्थातच. आणि खरोखरच उत्तम पुस्तके असतील तर ते होपफुली समाजकार्यसुद्धा राहणार नाही, फायदेशीर धंदा होईल तो :) शेवटी हे जरा कौतुकाचे रडणे आहे हे मान्य-विशेषतः मूळ चर्चाविषयासंदर्भात-पण माझा नाइलाज झाला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मराठी लावणी बाय म वा धोंड -

यशोधरा
गुरुवार, 02/28/2013 - 19:18 नवीन
मराठी लावणी बाय म वा धोंड - हे पुस्तक कधी कधी रसिक मध्ये उपलब्ध असते. मला एकदा अवचित मिळून गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नशीब चांगले तुमचे मला लैवेळा

बॅटमॅन
गुरुवार, 02/28/2013 - 19:19 नवीन
नशीब चांगले तुमचे :) मला लैवेळा विचारूनपण नै मिळाले. असो. परत एकदा पाहतो ट्राय करून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अगदीच हवे असल्यास कधी दिसले

यशोधरा
गुरुवार, 02/28/2013 - 19:23 नवीन
अगदीच हवे असल्यास कधी दिसले तर मी घेऊन ठेवू शकते, माझ्या फेर्‍या होत असतात रसिकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद पण मीही तसा फिरत असतो

बॅटमॅन
Fri, 03/01/2013 - 01:22 नवीन
धन्यवाद पण मीही तसा फिरत असतो तिथे, तेव्हा नेक्ष्ट टैम बघतोच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तेंडुलकर

मन१
गुरुवार, 02/28/2013 - 13:45 नवीन
विजय तेंडुलकर ह्यांचे विचार शेम टू शेम असेच आहेत. मटामधील मुलाखतीत "आजची मराठी मृतप्राय असेल तर तिला मरु देत. उद्या मराठी लोक बोलतील ती मराठी ठरेल. कै हरकत नाही" अशा आशयाचं ते बोलले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कमी शब्दांत आणि थेट

गवि
गुरुवार, 02/28/2013 - 13:49 नवीन
कमी शब्दांत आणि थेट मांडण्याची ताकद होती म्हणून ते "तें" होते.. आम्ही प्यारे भरुन लिहीत बसतो. ;) (प्यारे१ या सन्मित्राशी याचा संबंध नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

कसला डोस्क्याचा भाषेचा अभिमान वगैरे...

चौकटराजा
गुरुवार, 02/28/2013 - 15:24 नवीन
आपल्यासाठी भाषा आहे. भाषेसाठी आपण नाही. हे भाषेपुरतेच नाही तर या वाक्याची व्याप्ती फार मोठी आहे. अमेरिकेत तीन पिढ्या राहिलेल्या कोकणस्थाला आपण रत्नांग्रीचा अभिमान शिकवायला गेलो तर कसे वाटेल ? . देशाभिमान जात्याभिमान, धर्माभिमान राष्ट्राभिमान सारे मानसिक खेळ आहेत. त्याला मर्यादित महत्व ही आहे पण गविंचे वरचे वाक्य फार काही सांगून जाते. मी जन्माने हिंदू आहे पण माझ्या धर्मात " फतवा काढण्याची प्रथा सुरू झाली तर मी या धर्माला राम राम करेन.माझ्या भाषेचे तेच .माझ्या भाषेत अपरिहार्यपणे इतर भाषातील शब्द आले तर काय फार विटाळ झाला असे मी मानणार नाही पण सचिन तेंडूलकर जशी मराठी बोलतो तशीच मी म्हणायला पाहिजे असा ठराव साहित्य संमेलनात झाला तर मी मराठीला रामराम करेन. थीडक्यात 'त्याला व्हेंटीलेटर ठेवला आहे " हे वाक्य मला चालेल पण 'विकेट फार डोसाईल होती त्यामुळे मी लॉट ओफ रन्स मारू शकलो' हे मराठी मला आवडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नॉर्थ कडे

इरसाल
गुरुवार, 02/28/2013 - 12:21 नवीन
भेंडी हा शब्द एका शब्दाच्या* बदल्यात वापरला जातो त्याच्या भावना पोहचतात आणी अश्लिलही वाटत नाही. **इथे लिहीण्यासारखा नाहीए.
  • Log in or register to post comments

उद्विग्नतेत सहभागी आहे .

सस्नेह
गुरुवार, 02/28/2013 - 13:37 नवीन
भाषा-सतर्कता (कॉन्शसनेस -मराठी शब्द ?) असणारी पिढी शाबूत आहे तोपर्यंत उद्विग्नता राहणारच !
  • Log in or register to post comments

कॉन्शसनेस - जाणीवपूर्वकता ??

बाळ सप्रे
गुरुवार, 02/28/2013 - 13:45 नवीन
कॉन्शसनेस - जाणीवपूर्वकता ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

भान..भाषाभान.. नुसता जाणीव

गवि
गुरुवार, 02/28/2013 - 13:47 नवीन
भान..भाषाभान.. नुसता जाणीव शब्दही चालेल. "कॉन्शसनेस" हा शब्द नि:संदिग्ध वाटत असताना आणि कोणालाही न समजण्याची शक्यता नसताना कशाला शोधताय आल्टर्नेट बादवे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

असेच एका सुट्टित घरी चुलत

अधिराज
गुरुवार, 02/28/2013 - 14:34 नवीन
असेच एका सुट्टित घरी चुलत वगैरे भावंड जमली अस्ताना चुलत बहिणीचा व भावाचा टिवीवर कोणते चॅनल लावायचे यावरुन वाद सुरु झाला. हा वाद शेवटी भावाने जिंकला, त्याच्या हातात रिंमोट आदळत बहिण एकदम बोलुन गेली "घे, बघ तुला पाहिजे ते. तुझीच लाल. बस." तिच्या तोंडून "तुझीच लाल" हा शब्द ऐकून तिथेच असलेले काका खूप भडकले व तिला फैलावर घेतले. पण त्या बिचारीला ह्यातून नेमका काय अर्थ निघतो तेच माहित नव्हते. ती म्हणाली मी तो शब्द "घे , तुझंच म्हणणं खरं" ह्या अर्थाने वापरला होता.
  • Log in or register to post comments

लेखातील विचारांशी सहमत.

मनीषा
गुरुवार, 02/28/2013 - 15:04 नवीन
लेखातील विचारांशी सहमत. भाषा ही प्रवाही असावी. तिचे बदलते स्वरूप हेच तर तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सतत बदलणार्‍या जगात ते बदल व्यक्त करताना भाषा बदलणे देखिल स्वाभाविकच आहे असे वाटते. नदीचा प्रवाह जसा अडथळा आला तर वळण घेऊन पुढे वाहू लागतो तसेच भाषेचे आहे. माझा मुलगा प्राथमिक शाळेत असताना त्याला 'सुंदर' या शब्दाचा विरूद्ध अर्थी शब्द लिहायला सांगितले तर त्याने 'घाण' असे लिहिले. त्यांच्या टीचर ने ते चूक दिले. आणि ते का चूक आहे हे मला त्याला सांगता आले नाही. तसेच सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप त्याने सम्राटीण असे लिहीले होते. पण यात मला त्याची चूक आहे असे म्हणता येणार नाही. कारण रोजच्या अनुभवातील नियम त्याने तेथे वापरला. मुलांना भाषेचे बारकावे जाणिवपूर्वक समजाऊन सांगणे, ही त्यांच्या आईवडिलांचीच जबाबदारी आहे. (त्या साठी त्यांना चांगली मराठी अवगत असायला हवी.) पण भाषेतील भेसळीचा प्रश्न फक्त मराठीलाच भेडसावत नसावा. माय फेअर लेडी या चित्रपटातील इंग्रजी भाषेचा आभ्यासक असलेला प्रोफेसर हिगिन्स सुद्धा वैतागून म्हणतोच, "व्हाय कान्ट इंग्लीशमन स्पीक इंग्लीश?" अर्थात भाषेची अतिरेकी भेसळ नक्कीच टाळायला पाहिजे. भाषाशुद्धी, आणि भाषेचे सौंदर्य या खूप पुढच्या गोष्टी आहेत. पण निदान आपण जी भाषा बोलतो ती ऐकताना कानाला आणि ऐकल्यानंतर मनाला ओंगळवाणी वाटू नये. माझी मराठी देखील म्हणावी तितकी शुद्ध नाही याची जाणीव आहे, पण मी जास्तीतजास्त शुद्ध मराठी बोलण्याचा आणि लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करते. मायमराठी आणि My मराठी यात संघर्ष न होता सलोखा असावा. आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा ही मनापासून इच्छा.
  • Log in or register to post comments

अवांतर पण कामाचं....

मन१
गुरुवार, 02/28/2013 - 17:13 नवीन
भाषायुद्धाबद्दल अभिजन विरुद्ध सामान्यजन असा झगडा मांडलेलं पुलंचं "ती फुलराणी" कुणी पाहिलय का?
  • Log in or register to post comments

आठवले

चौकटराजा
गुरुवार, 02/28/2013 - 18:44 नवीन
मनोबा, या तुझ्या प्रतिसादावरून एक आठवले. मागे मराठवाड्याकडील एक साहित्यिक म्हणाला होता ते पुण्याचे " पाणी " हा शब्द चुकीचा आहे " पानी" हा शब्दच बरोबर आहे. संस्कृत मधे पानीयं असेच म्हणतात ना ? " आता बोला कोणती भाषा " प्रमाण भाषा " ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

पानीयं वरून पाणी हे मराठीच्या

बॅटमॅन
गुरुवार, 02/28/2013 - 18:54 नवीन
पानीयं वरून पाणी हे मराठीच्या अभिजन बोलीत केले गेलेले रूप आहे, सबब ते शुद्ध म्हणून रूढ झालेय. संस्कृतमध्ये जिथे मूळ न, ल, इ. असेल, तिथे ण, ळ लावायची मराठीची खोड सर्वश्रुत आहे, त्याप्रमाणेच हे झालेय. शुद्ध आणि अशुद्ध हा वाद व्याकरणाबद्दल बोलताना थोडा तरी अर्थपूर्ण राहतो, बाकी शब्दरूपांबद्दल बोलायचे झाले तर तो आर्बिट्ररी असतो बर्‍याचदा. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पन हल्ली 'प्रश्ण' म्हनायची लय

प्यारे१
गुरुवार, 02/28/2013 - 20:16 नवीन
पन हल्ली 'प्रश्ण' म्हनायची लय वंगाळ पद्द्त आल्याली हाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ये कहां आ गये हम

फिरंगी
गुरुवार, 02/28/2013 - 19:40 नवीन
"पाचर मारली" हा असाच वाक्प्रचार ........ कधीही वापरला जातो ....
  • Log in or register to post comments

चर्चा..

उपास
गुरुवार, 02/28/2013 - 21:46 नवीन
रामदासजी, अगदी समयोचित चर्चा घडवून आणलित, वरचे बरेच प्रतिसाद आवडले. पण, एकूणात लेखात थोडं अरण्यरोदन वाटलं, लेखाच्या नावासहित. भाषा प्रवाही, वापरायला सोप्पी असावी.. पु.लं, तें ह्यांनी आपल्या कलाकृतींतून / विचारातून वारंवार सांगितलय आणि ते पटलही. पुढच्या पिढीला जेवढं देता येईल तेवढं द्यायचं, घ्यायला तिला तयार करायचं, ह्यापलिकडल्या सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर आपला अंकुश नाही हे समजून/ मान्य करुन समाजाबरोबर चालत राहवं असं वाटतं. आता अपशब्द (स्लँग) विषयी, मुलं काय आणि मुली काय, त्यातला अर्थ समजावून घेऊन तो वापरलात जातो असं नाहीच. ती अपेक्षाच का ठेवायची, शब्दावर जोर यावा, राग/ लोभ भावनावेग व्यक्त करता यावा ह्यासाठी हे शब्द जोरकस रीत्या उच्चारले जातात... हे वारंवार होत राहिलं की ते बोथट/ गुळगुळीत बनतात, त्यांच्या अर्थात न शिरलेलंच बरं.. नुसता उच्चारण्यातच आस्वाद(!) घ्यायचा ;) जाता जाता, मराठी मध्ये हिंदी/ इंग्रजी शब्द आलेले जसे अप्राप्य वाटतात तितकेच संस्कृत शब्द वाटत नाहीत, ते सुद्धा परकेच की! विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

अतिशय मार्मिक

NAKSHATRA
Sat, 01/23/2021 - 08:18 नवीन
काका , सध्या मराठी भाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष्य होते आहे आणि आता तर काय सगळेस लघु रूप झाले आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा