Skip to main content

जालियनवाला बाग हत्याकांड आणि भारत- ब्रिटन संबंध

लेखक बाळकराम यांनी गुरुवार, 21/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन सध्या भारताच्या दौर्‍यावर आहेत. मे २०१० मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच केलेल्या भारत दौर्‍यानंतर अवघ्या २-२.५ वर्षातला हा ब्रिटिश पंतप्रधानांचा दुसरा दौरा. १४० व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींचे ब्रिटनच्या आजवरच्या इतिहासातले हे सर्वात मोठे व्यापारी शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आहे. अर्थात, मागच्या प्रमाणे ह्याही दौर्‍याचा उद्देश उगवती महासत्ता असलेल्या भारताबरोबर व्यापारी संबंध दृढ करुन काही व्यापारी करारमदार करता येतील का ते पाहाणे हाच. ब्रिटनची सध्याची अतिशय नाजूक आणि ढासळती अर्थव्यवस्था, वाढत चाललेले कर्ज, लागोपाठ तिसर्‍यांदा येऊ घातलेली मंदी ( किंवा जी २००८ पासून कधी दूर गेलीच नाही), वाढती बेरोजगारी या आणि अशा प्रश्नानी त्रस्त होऊन मोठ्या आशेने भारताची वाट श्री कॅमेरॉननी धरली खरी पण गेल्या खेपेप्रमाणे याही वेळेला हाती धुपाटणे येणार अशी चिन्हे दिसतायत. ह्या दौर्‍याबद्दल भारतीय माध्यमांत जेवढी उत्सुकता दिसली नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त इंग्लिश माध्यमांत चर्चा चालू असल्याचे वेगळेच चित्र पाहायला मिळतय. अर्थात, भारत-ब्रिटन संबंधातील हे एक नवे पर्व म्हणावे लागेल. अशात, कदाचित भारताच्या खुशामतीची एक संधी म्हणा वा व्यापारी कावा म्हणा वा तद्दन राजकीय खेळी म्हणा, पण कॅमेरॉनच्या या कृतीचे चांगलेच तीव्र पडसाद इथे उमटलेयत आणि त्याचबरोबर एकंदर जागतिक घडामोडीत बदलत्या सत्याची आणि वास्तवाची एक प्रखर जाणीव कदाचित आपल्या माजी शासक राष्ट्राला झाली आहे. किंबहुना, एक विचारी, अभ्यासू पण काही प्रमाणात वर्णभेदी आणि छुपे साम्राज्यवादी नियतकालिक असे सार्थ वर्णन केले जाणार्‍या "द इकॉनॉमिस्ट" मधला हा फोटो पुरेसा बोलका आहे! कॅमेरॉनने दिलेल्या कबुलीचे जे काय राजकीय्/आर्थिक लाभ ब्रिटनला होतील ते होवो, पण वरच्या बीबीसीच्या लेखाखालील काही इंग्रजांच्या प्रतिक्रिया पुरेश्या बोलक्या आहेत- एका बाजूला साम्राज्यवादी दर्प आणि अहंगंड आणि दुसर्‍या बाजूला हताश करणारी अपरिहार्य आर्थिक आणि राजकीय वस्तुस्थिती यांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया आढळतात. सर्वसामान्यपणे, अटळ राजकीय सत्य मान्य करण्यात अनेक इंग्रजांना अडचण येत असली तरी अँड्र्यू नॉर्थ सारखे काही समंजस आवाज देखील आढळतात. पण तरीही काही गोष्टी अनुत्तरीतच राहातात- कॅमेरॉन नी जालियनवाला बाग घटनेबद्दल नुसता खेद व्यक्त न करता संपूर्ण माफी मागायला हवी होती का? समजा, अशी माफी मागीतली असती तरी त्याने ९४ वर्षापूर्वी झालेल्या घटनेने जो परिणाम भारतीय मानसिकतेवर आणि इतिहासावर झाला आहे त्यात काय फरक पडला असता? असा विरोधी विचार सुद्धा पुढे आला. ब्रिटनने ईस्टर रायझिंग आणि आयरीश महादुष्काळाबद्दल पूर्वी आयर्लंडची माफी मागितली आहे मग भारतात केलेल्या अत्याचारांबद्दल माफी मागायला काय हरकत होती? आपणास काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.

वाचने 5124
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

ज्या देशाच्या साम्राज्याच्या प्रतिनिधींनी नृशंस हत्याकांड घडवले त्या देशाच्या व्यवस्थेतील प्रमुख व्यक्तीस त्याच स्थळी येऊन शोक व्यक्त करावा लागला... एक वर्तुळ पूर्ण झाले. धाग्यातील माहितीबद्दल अनेक धन्यवाद.

केवळ जालियानबागवाला हत्याकांड का? आम्ही म्हणतो कि भारतावर दिडशे वर्षात जे अत्याचार केले त्या सगळ्या कृत्यांबद्धल माफि मागा.

आधी तो 'कोहिनूर' द्या म्हणावं आणि सगळ्या लुटीचा सव्याज हिशेब सुद्धा, भवानी तलवार पण आहे म्हणे तिथे?

उगवती महासत्ता असलेल्या भारताबरोबर
महासत्ता म्हणजे काय? एखादा देश महासत्ता आहे की नाही हे कसे ठरवावे?
एका बाजूला साम्राज्यवादी दर्प आणि अहंगंड आणि दुसर्‍या बाजूला हताश करणारी अपरिहार्य आर्थिक आणि राजकीय वस्तुस्थिती यांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया आढळतात
म्हणजे एकूणच 'ठराविक' पुणेकर किंवा उत्तरेतील मुसलमानांसारखे झाले आहे.. एकेकाळी मोठ्या भागावर राज्य गाजवले खरे आता, बदलेल्या आर्थिक, भु राजकीय परिस्थितीत 'त्या प्रमाणात' कोणीच विचारत नसल्याची बोच "आम्हीच ग्रेट" असे केवळ म्हणत सतत मिरवत भागवून घेतात झाले ;) आता पळतो :P

In reply to by ऋषिकेश

महासत्ता म्हणजे काय? एखादा देश महासत्ता आहे की नाही हे कसे ठरवावे? ... ह्म्म... तुम्हाला काय म्हणायचय ते कळलं, पण भारताला सगळी हुशार लोकं उगवती महासत्ता म्हणतात म्हणून आम्ही पण म्हणतो, बुवा! ते कोण जिम ओ'नील का कोणी आहेत ना त्यानीच सुरुवात केली बघा, मी नाही काही! म्हणजे एकूणच 'ठराविक' पुणेकर किंवा उत्तरेतील मुसलमानांसारखे झाले आहे. हा हा हा! ब्रिटनने तर आपल्या नावातच "ग्रेट" लावून घेतलंय, मिरवायला सोपं!

संपूर्ण माफी मागितली तर काय फरक पडेल? वर म्हंटल्याप्रमाणे ते आले आहेत इकडे भारतिय बाजारपेठेत पैसा मिळवायला.

आधी तो 'कोहिनूर' द्या म्हणावं आणि सगळ्या लुटीचा सव्याज हिशेब सुद्धा
म्हणजे आपल्याकडचे देसी इंग्रज (राजकारणी) तो लुटून खातील, कोहिनूर हिरा आपलाच आहे ह्याबाबत काही दुमत नाही पण जो पर्यंत तो तिथे आहे तोपर्यंत सुरक्षित आहे असे मला वाटते. बाकी राहिल कि
ब्रिटनने ईस्टर रायझिंग आणि आयरीश महादुष्काळाबद्दल पूर्वी आयर्लंडची माफी मागितली आहे मग भारतात केलेल्या अत्याचारांबद्दल माफी मागायला काय हरकत होती?
ब्रिटन ला शेवटी आपल्या दारात याव लागल हीच आपली मोठी जीत आहे किंव्हा त्यांची हार आहे आणि शेवट आपण उदार मतवादी आहोत त्यांनी माफी मागितली तर आपले लोक लगेच माफ पण करून टाकतील वरून कॅमेरॉनचीच वाहवाह करतील, त्याने माफी मागितली म्हणून.

ब्रिटिश आले होते भारत लुटायला. मसाले, नीळ, कपाशी, अफू अशा अनेक गोष्टी त्यांनी (बळजबरी पिकवायला लावून) स्वस्तात विकत घेतल्या आणि वेगळ्या बाजारपेठेत आर्बिट्राजचा फायदा घेऊन प्रचंड नफ्यात विकल्या. भारतावर राज्य करण्याचा त्यांचा हेतू शुध्द आर्थिक होता. इंग्लंडच्या इतिहासाकडे पाहिलं तर त्यांचे जवळजवळ सगळे राजकीय निर्णय हे अर्थकारणाने प्रेरित आहेत असं लक्षात येईल. हे माफी प्रकरणही तसंच आहे. कॅमेरॉन भारतात येतो आणि ब्रिटनमध्ये गुंतवणुकीसाठी आवाहन करतो. व्हिसा शिथिल करण्याचं गाजर दाखवतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ५० नवीन शिष्यवृत्ती घोषित करतो. तसंच जालियनवाला बाग प्रकरणातही मोठ्या मनाने (!) माफी मागून ब्राऊनी पॉईंट वसूल करतो. शाळेतल्या दादागिरी करणार्या टग्याला आज स्कॉलर मुलाची गरज भासते आहे. त्यामुळे तो लाडीगोडीत येऊन पूर्वी जी कानफटात मारली होती त्याबद्दल माफी मागतोय, इतकंच! स्कॉलर मुलाने हुरळून जायचं, का सावध राहयचं - हा प्रश्न आहे...

In reply to by आदूबाळ

इंग्लंडच्या इतिहासाकडे पाहिलं तर त्यांचे जवळजवळ सगळे राजकीय निर्णय हे अर्थकारणाने प्रेरित आहेत असं लक्षात येईल.
हे इंग्लंडच नाही तर कोणत्याही प्रदेशाच्या, राजाच्या इतिहासाला लागू होते.

In reply to by ऋषिकेश

नाही, बर्याचदा असं होत नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अनेक पैलू असतात. उदा. अफजलखानाला शिवाजीमहाराजांवर पाठवण्याचा निर्णय सूडभावनेतून आणि सत्तासंघर्षापायी घेतला होता. (मिपावर सध्या गाजत असलेला) हिटलर ज्यूद्वेषापोटी आंधळा होता.

In reply to by आदूबाळ

उदाहरणे अजिबातच पटली नाही. का ते यथावकाश सांगेनच त्या आधी हे प्रश्न बघु -- मांडलिक राजे म्हणजे काय? महाराज मांडलिक नव्हते म्हणजे काय? जे मांडलिक नव्हते त्यांना मांडलिक करून घेण्यासाठी हे तथाकथित सत्तासंघर्ष होत हे मान्य आहे का? तरीही तुम्ही म्हणाल की मुघल वि राजेंच्या संघर्षाला आर्थिक कारणे नव्हती? -- हिटलरपूर्व काळात जर्मनीतील आर्थिक नाड्या कोणाच्या हातात होत्या? मुळात हिटरलचा आंधळा ज्यू विरोध का होता? इतर विस्तारवादी देशांना (फ्रान्स, ब्रिटन वगैरे) मिळणारी मिळकत जर्मनीसारख्या देशाला का मिळत नव्हती? याची कारणे शोधलीत तर या मागेही आर्थिकच कारणे होती हे पटेलच

In reply to by ऋषिकेश

मुघल विरुद्ध मराठा हा संघर्ष मुख्यतः आर्थिक कारणांमुळे झाला असे वाटत नाही. कितीही कल्पनेच्या भरार्‍या मारल्या तरी शिवाजी-संभाजी-राजाराम काळात उत्तरेत साम्राज्यस्थापनेइतकी मराठ्यांची ताकद नव्हती. मराठ्यांच्या उदयामुळे दक्षिणेत तयार झालेली राजकीय अस्थिरता निपटून काढणे हा मुघल वि. मराठा या संघर्षाचा मुख्य हेतू होता. मुघलांकडे बंगालसारखा सुपीक प्रांत अन सुरतेसारखी पेठ असताना मराठ्यांकडचा पैसा त्यांना आकर्षून घेत होता असे म्हणण्याला जागा नाही. मराठे आधी अन नंतरही गरीबच राहिले. मावळप्रदेशसुद्धा आर्थिकदृष्ट्या काय लै भारी नव्हता. बाकी युरोपभर आर्थिकदृष्ट्या ज्यू बळजोर असले तरी ज्यूद्वेष हे लौकर सत्तेवर येण्यासाठी हिटलरने वापरलेले चीप गिमिक होते. इतर विस्तारवादी सत्तांसारखे जर्मनीला उत्पन्न मिळत नसण्याचे कारण म्हंजे एकतर जर्मनीच्या कॉलनीज़ फारशा नव्हत्या प्लस त्यांच्यावर पहिल्या महायुद्धात बर्‍याच अटी लादल्या होत्या. आता शेवटी हिटलरने जमेल तितका विस्तार केला, आर्थिक भरभराट केली हे खरे असले तरी तुमचा प्रश्न यामागच्या उद्देशाबद्दल नसून ज्यूद्वेषामागील उद्देशाबद्दल आहे असे वाटते. ज्यूद्वेष करून हिटलरचा आर्थिक फायदा काय होणार होता किंवा झाला असता हे मला माहिती नाही. याबद्दल काही माहिती मिळाली तर वाचायला उत्सुक आहे.

In reply to by बॅटमॅन

तुर्तास घाईत, अगदी थोडक्यात, शिवाजी महाराजांनी मी इथला प्रांत केवळ सांभाळतो आणि मुघलांच्या मागणीनुसार त्यांना कर भरतो असे म्हटले असते तर इतका संघर्ष झाला असता का? 'स्वतंत्र' राजा होणे आणि मांडलिक होणे यात मुख्य फरक आर्थिक नव्हे का? सुरतची लूट तर प्युअर आर्थिक कारणांसाठी होती, ती मुघल साम्राज्याला चांगलीच झोंबली. राजकीय कारण नव्हते असे म्हणणे नाहीच, पण आर्थिक फायदा असल्याशिवाय राजकीय मित्रत्त्व आणि शत्रुत्त्व दोन्ही घेतलेले फिसत नाही इतकेच बाकी ज्यू-नाझी वगैरे नंतर वेळ झाल्यास लिहितो

In reply to by ऋषिकेश

अंमळ गल्लत होतेय. मांडलिक असणे आणि स्वतंत्र राजा असणे यातील मुख्य फरक निव्वळ आर्थिक नाही, राजकीयपण आहे. माझा मुद्दा असा आहे, की मावळातील टीचभर डोंगराळ जागेतून अशी काय करवसुली होणार होती म्हणून औरंगजेबाने तिथे यावे? तेही बंगाल-गुजरातसारख्या दुभत्या गायी असताना? प्रत्यक्ष शिवाजीकडून औरंगजेबाला आर्थिक फायद्याची अपेक्षा होती असे म्हणता येणार नाही. कारण शिवाजी म्हणजे काईंड ऑफ ओसाडवाडीचा राजाच होय- जर निव्वळ आर्थिकदृष्ट्या पाहिले तर, नाहीतर सुरत, बसरूर, इ. लुटायची त्यांना काय गरज होती?. महाराजांचे राज्य म्हंजे पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, कर्नाटक-तमिळनाडूचा थोडा भाग. दक्षिणेतील सुभे संपन्न होते, पण तितकेच किंबहुना अजून संपन्न असे कितीतरी भाग मुघलांकडे होते. मराठ्यांच्या उदयामुळे दक्षिणेत राजकीय अस्थैर्य तयार झाले, जे मुघलांच्या राज्यासाठी अपायकारक होते. त्याचे अनेक परिणाम झाले असते-ज्यांपैकी एक पैलू आर्थिक आहे. तेव्हा अप्रत्यक्षपणे, लॉजिक लांबवून बघायचे झाले आर्थिक कारणांसाठी हे युद्ध झाले असे म्हणता येईल फारतर, पण युद्धाची तात्कालिक अन मुख्य कारणे आर्थिक नव्हती.

In reply to by ऋषिकेश

सहमत ह्याचा विचार कोणी करत नाही , मुळात पहिले महायुद्ध का झाले , त्यांनंतर जर्मनी वर झिझया कर लादण्यात आला , त्याने जर्मनीची अर्थव्यवस्था व मार्क या चलनाचे अवमूल्यन त्याने एका प्रगत देशाची अचानक आफ्रिकेतल्या एका वसाहती राष्ट्रासारखी अवस्था होणे अश्या गोष्टींवर अजिबात चर्चा होत नाही , व २०० वर्ष आपली पिळवणूक करणारे इंग्रजांच्या दृष्टीने तेव्हा हिटलर खलनायक ठरला तेव्हा त्यांच्या अत्याचारापुढे सशस्त्र क्रांती करणारे फडके किंवा भगत सिंह सुद्धा गुन्हेगार होते.

In reply to by आदूबाळ

शाळेतल्या दादागिरी करणार्या टग्याला आज स्कॉलर मुलाची गरज भासते आहे. त्यामुळे तो लाडीगोडीत येऊन पूर्वी जी कानफटात मारली होती त्याबद्दल माफी मागतोय, इतकंच!
हा हा हा! भारत आणि स्कॉलर.. कुणी सांगितलं तुम्हाला?

In reply to by ऋषिकेश

सहमत. उगाच स्वतःला उद्याची अर्थिक महसत्ता किंवा स्क्वालर म्हणण्यात काहीच प्वाइंटाचा मुद्दा नाही. हे म्हणजे नासा मध्ये ६० ते ७०% भारतीय (कुणाला बोडक्याची माहिती आहे? उगाच फ्वारवर्डमधून येत म्हणून म्हणायचं) लोक आहेत म्हणून अभिमानानी सांगण्यासारखं आहे. खरं तर लाज वाटली पाहिजे आपल्याला एव्हडी गुणी लोकं इथं रहाण्यासारखी परिस्थिती नसल्याबद्दल.

इंग्रज सरकार त्याबद्दल माफि देखील मागेल.. पण वेळ आल्यावर. अहो ते पक्के व्यापारी आहेत. पहिले खेद, अप्रत्यक्ष्य दिलगिरी, मग थोडे अश्रु, आणि शेवटी माफी, असं इन्स्टॉलमेण्ट्स देऊन त्याबदल्यात त्या त्या वेळी बरोबर काहितरी पदरी पाडुन घेतील. अर्धवटराव

इंग्लंड मधील वाढता पंजाबी आणि हिंदी टक्का आणि त्यासाठीच सत्ताकारण हेही कारण असू शकतं