Skip to main content

शा. संगीताचा समय आणि समज ...

लेखक तर्री यांनी शुक्रवार, 25/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कुठचा राग कुठच्या प्रसंगी गावा याचे शास्त्रीय संगीतात काही संकेत आहेत. ते नियम आहेत असे समजू नये. जास्तीत जास्त कोमल स्वरांचे राग संधीकाळी व शुद्ध स्वरांचे राग पूर्ण प्रहरी असे सर्व साधारण विभाजन आहे. जे राग जास्त आर्त आहेत - मारावा , पूरिया ते सायंकाळी व जे प्रसन्न आहेत ते सकाळी - बिभास , भैरव , तोडी अशी त्यांची विभागणी आहे. साधारणपणे भैरव व भैरव थाटातले राग पहाटे गातात. कोमल ऋषभ हा ( जीवघेणा) स्वर हया सर्व रागांचा प्राण आहे. दोनीही मध्यम असणारे राग - यमन , छायानट , बिहाग , केदार , भूप हे रात्रीच्या पहिल्या प्रहारचे मात्तबर राग ( ओपनिंग बेंटस्मन ). म्हणून ते मैफिलीच्या सुरवातीला गातात. आता आपल्याकडे सुरवात म्हटली की गणपती बाप्पा ना पहिले नमन आणि मग यमन , अशीच ती सुरवात होते. यमन , केदार , भूप मध्ये बाप्पाची असंख्य गाणी , चीजा आहेत. आता भक्ती संगीत सकाळी ऐकण्यात एक निखळ निर्मल आनंद असतो आणि म्हणूनच यमन , केदार , बिहाग सकाळी ऐकण्याची आपणाला सवय होवून जाते. संगीताचा संबंध वेळ , समय , यांच्या आधी भावनेशी आहे. रागाची वेळ ही एक सर्वसाधारण सोय आहे एवढेच मला वाटते. भैरवीची गम्मत पहाटेच. रंगलेली मैफल मग भैरवीची फर्माईश , मग चहा कॉफी आणि उत्तर रात्रीच्या गप्पा ! आता भैरवी चे नाते शेवटास लावल्याने , संध्याकाळ च्या मैफिलीचा शेवट कुणी भैरवी ने केला तर ते समयोचित नाही पण सर्व सामान्य श्रोत्यांना खटकणार नाही. मैफिल पहाटे संपू दे नाही तर संध्याकाळी – ती शेवटची हुरहूर मनात माजवायला भैरवीच हवी. हल्ली सकाळी सकाळी एफ.एम. वर भक्ती संगीत लागते आणि त्याची सुरवातच भैरवी ने करत्तात ! आता बोला. भारतीय शा.संगीत ऐकताना सुरवातीला तरी त्याची “ओळख” करून घेणे , एवढाच उद्देश असु ध्यावा. कानाला गोड लागले , हृदयाला भिडले तर राग , थाट , घराणे , वादी , संवादी हया व्याकरणाला बसावा टेंपोत आणि ऐका मनमुराद. एकदा हया ओळखीचे रुपांतर “प्रेमात” झाले की पहा कसे ऋतू फुलून येतात. हेच प्रेम पुढे गेले आणि नशा चढली तर मग आयुष्य इतके रंगीत , सोप्पे वाटेल की ज्याचे नाव ते. सुहा कानडा (पं. थोरले अभिषेकी), हिंडोल ( पं.कैवल्य कुमार ) , काफी कानडा ( विदुषी आश्विनीताई) हया आणि अश्या लेण्यांमध्ये भान हरपले तर मिपाच्या नशेचीच अनुभूती येईल. पहिले दोन तू नळी वर आहेत. पं. कैवल्य कुमार ह्यांचे गाणे ऐकले नसेल तर जरूर ऐका. एका महान होऊ घातलेल्या गायकाचे गाणे ऐकल्याचे समाधान प्राप्त होईल. शा.संगीतामाधले आपल्याला “काही” कळत नाही हा एक मोठा गैर समाज आपण सतत वागवतो. त्याचे विसर्जन लवकर केल्यास बरे. कोणत्याही कलेचा आनंद घेण्यासाठी ती समाजावीच लागते का ? माझ्या अर्धांगिनीला क्रिकेट समजत नाही (असे मी समजतो ) पण मी सचिन बद्दल काही बाही बोललो तर त्या रात्री नक्की उपास (येथे डोळा मारणारी स्मितिका ). एकदा ती म्हणाली गावस्कर समालोचन करताना किती चुका करतो. सचिन च्या फटक्याला “ cover drive” म्हणाला आणि गांगुलीने तेथेच फटका मारला तर “on drive ”म्हणाला. क्षेत्र रक्षकांच्या जागा सांगतानाही गल्लत करतो सारखा. एकदा “silly mid off” म्हणतो आणि त्याच जागेला सचिन आला की “ silly mid on” म्हणतो. तिला क्रिकेट कळते की नाही ? हा मुद्दा महत्वाचा नाही तर ती त्या खेळाचा आनंद छान लुटते. तसेच शा. संगीताचे आहे. लट उलझी , सुलझा बालम ची मजा घेता आली की झाले. तो बिहाग असु दे नाही तर मारू बिहाग. आपण त्या प्रेमी युगुलाच्या भावना जाणल्या की काम फत्ते ! शा. संगीताचा समय आणि समज हया छोटेखानी लेखाची प्रेरणा “स्वरमग्न - उस्ताद अमजद अली खाँ (२/२) “ व त्या वरील प्रतिक्रिया येथून मिळाली आहे.

वाचने 9683
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

In reply to by बहुगुणी

अगदी असेच म्हणतो. तात्यांनी लिहण्याचं बंद केल्यानंतर तर अशा चांगल्या विषयावर लिहण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही. लेख आवडला आणि यावर येणार्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

त्या रागाची वैशिष्ठ्य द्या म्हणजे तो तेंव्हा ऐकता येईल आणि त्यामागचा विचार कळेल. (त्यावर आधारित हिंदी गाणी दिलीत तर अजून मजा येईल.) या लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by संजय क्षीरसागर

(त्यावर आधारित हिंदी गाणी दिलीत तर अजून मजा येईल.)
तिकडे उसगावला असताना पुण्याचा एक ग्रुप गेला होता. मधुरा दातार, पं विजय खोपटीकर (आडनांव नेमकं आठवत नाही.) "भैरव ते भैरवी" हा कार्यक्रम घेऊन. त्यांनीही हीच थीम ठेवली होती. रागाची माहिती सांगायची आणि त्या रागातले एखादं फेमस गाणं ऐकवायचं. लई वेळा आवडला होता तो प्रकार.

गुगलमध्ये "बेसिक्स ऑफ डब्ल्यूसीएफ सर्व्हीसेस"च्या धर्तीवर "बेसिक्स ऑफ इंडीयन क्लासिकल म्युझिक" असे गुगलून पाहिले. आणि जाणवले, एखादं आर्टीकल वाचून समजेल असा प्रकार नाही हा. "त्यांनी अमुक अमुक वर्ष संगीतसाधना केली" अशा वाक्यांचा नेमका अर्थ लागतोय. असो. आम्हाला रागदारीतलं काही कळत नसलं तरी आम्ही मिपाष्टाईल प्रतिक्रियांचा आस्वाद नक्की घेऊ शकतो. :)

शास्त्रीय संगीताबद्दल आणखीही लिहा.

शास्त्रीय संगीत अज्जिबात समजत नाही पण ऐकायला आवडतं. खासकरुन भीमसेन जोशी अन सौथच्या एक कोणी बाई (लक्ष्मीबाई ? !)होत्या त्यांचा आवाज.

मध्ये शुचितैंनी वेगवेगळ्या रागातली दत्त बावन्नी दिली होती.. एकच पद्य पण वेगवेगळ्या रागात अप्रतिम मांडलेय! लेख फार आटोपता वाटला, तात्याच्या वसंत बहारची कोणी लिंक दिली तरं बरं होईल.. जमाना झाला वाचून पुनप्रत्ययाचा आनंद घेता येईल!

पण लय कॉन्सट्रेशन मारुन ऐकायला लागतं... मग वैताग येतो! तरिही अधुन मधुन रेशामिया आणि रेहमान, हार्ड रॉक, रॅप, झॅज, पॉप, इंन्स्टृमेंटल वगैरेचा कंटाळा आला अथवा ध्यानी मनी नसताना काही चांगल क्लासिकल कानवर पडलं की मग न विसरता १५-५५ मिनीटे ऐकतो आणि फ्रेश होतो.

भारतीय शास्त्रीय संगिताबद्दल इंटरनेट वाचुन समजून घ्यायचा प्रयत्न केला पण बरचसं डोक्यावरुनच जातं .. तुम्ही बर्याच गोष्टी साध्या सरळ करुन सांगितल्यामुळे समजायला सोपं पडलं... या विषयावरचे अजुन लेख येउद्यात...

तर्री साहेबानी नमनातच म्ह्टल्या प्रमाणे समय प्रधानता हा संकेत आहे नियम नाही.हे खरेच आहे.शास्त्रीय संगीत आस्वादात ही काही वाद न संपणारे असे आहेत. ( देव आहे की नाही त्याप्रमाणे) .कुमार गंधर्व हे म्हणतात हा नुसता स्वरानंद नाही तर ते भावसंगीतही आहे. उलटपक्षी गोविंदराव टेंबे म्हणत बंदिशीचे बोल( काव्य) हे स्वर टांगण्याची एक खुंटी आहे. माझी मुलगी लहानपणी अबोल होती. मी तिला घेऊन खेळवीत असताना "गुंगी गुंगी गुडिया मोरी , बात् ना करत , मिसरीकी मीठी गली गलेमे आज पडत " अशी एकतालातील बंदिश( बहुदा छायानट रागातली) माझ्या मनात तयार झाली. आपोआप. त्याची चाल रंजक आहे पण शब्दांत काय फार दिव्य काव्य आहे का? हे सारे लिहिण्याचे कारण असे की शब्दासाठी भावसंगीत आहेच ना ! असे म्हणणारा एक वर्ग आहे.मी त्यातील एक. आता समयानुसार वा मौसमा नुसार राग गावेत असा संकेत रूढ आहे. मी कित्येक वेळा बाथरूम् ( त्याच प्रकारचा सिंगर असल्याने) सकाळी सहा वाजता मारव्याचे नि रे ग म धनी ध मधनी म मग रे सा निध ( ह धैवत मंद्र सप्तकातला बर् का ) गाउन पाहिले आहे आणि ते काही कमी रंजक वाटलेले नाही. तसेच भर उन्हाळ्यातही मप नि ध नि नि सा ही टिपिकल मिया मल्हाराची संगेति गाउन पाहिली आहे व रंजकतेत कमी वाटलेली नाही. याच प्रमाणे एका पावसाळी बाहेर मस्त पाउस व आत बरखा रितू आ यी ही मेघ रागातील बंदिश ऐकून स्वरानंद भोगला आहे. मला दोन्ही आनंदात पराकोटीचा फरक जाणवलेला नाही. शास्त्रीय संगीतात सप्तक प्रधानता,स्वरांचे अल्पत्व बहुत्व ( उदा बिहाग व मारू बिहाग यात गंधाराची भूमिका ) पूर्वांग उत्तरांग प्रधानता ( उदा दरबारी व आडाना यातील फरक ) स्वरांचा लगाव, ताना, सरगम, लयकारी ई तत्वानाच फार मोठे महत्व आहे.तितके ते समय व ऋतु प्रधानतेला नाही असे वाटते.

In reply to by चौकटराजा

कर्नाटकी संगितात देखिल हे संकेत आहेत. पण त्याचा अर्थ त्या रागाद्वारे वातावरण निर्मिणे असा घेतला जातो. उदा. प्रभातसमयीचा राग बौळी संध्याकाळी गायला तरी प्रातःसमयीचा "फील" येणे आवश्यक असते. (संदर्भ - Aprreciating carnatic music - N Ravikiran) अवांतर - उत्तर हिंदुस्तानी संगितावर "फारसी" प्रभाव आहे असे म्हणतात. तो कोणता हे सांगता येईल काय ?

In reply to by अभिरत भिरभि-या

पुणे येथील गानवर्धन संस्थेने 'संगीत सुख संवाद' नावाचे पुस्तक सम्पादित केले. त्यात संगीत या विषयावर ( अर्थात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत मुख्यत्वे) विविध अंगानी एकूण ५२ लेख कलावंतानी लिहिले आहेत. त्यात डॉ. वसंतराव देशपांडे एका जागी असे म्हटल्याचे आठवते की संगीत सगळ्यापलीकडची भाषा आहे. त्यात फक्त चांगले किंवा वाईट असे दोनच प्रकारचे संगीत असते.राग भैरव , केदार, शिवरंजनी, शिवमत भैरव ही रागांची नावे श़ंकाराच्या नावाशी साम्य दाखविणारी आहेत. श़ंकर फारसी होते काय ?

In reply to by चौकटराजा

फारसी शब्द इराणी अथवा पर्शियन या भौगोलिक अर्थाने वापरला होता. विकीपीडीया वरील या उत्तर हिंदुस्तानी संगीतावरील लेखात या संगीत पध्दतीवर फारशी (= इराणी, पर्शियन) प्रभाव असल्याचा उल्लेख आहे. पण तो त्रोटक वाटतो. त्यामुळे इथल्या जाणकारांना आधिक माहिती विचारली होती. असो.

वाचतोय आणि समजून घेतोय. शा.संगीतातले कै कळत नसले तरी कानाला गोड लागते ते उत्तम असे समजणारे आम्हीही. तेव्हा आपण आम्हाला उत्तमातले उत्तम दुवे मात्र द्यायला विसरु नका. एक आठवण : मिपावर सुबक ठेंगणी यांनी असलेलं नसलेलं लेखातून ''लट उलझी सुलझा जा बालम' वर मस्त लिहिलं होतं. -दिलीप बिरुटे

In reply to by तर्री

दोन्ही ऐकले. अभिषेकी तर काय ब्लायलाच नको, पण दुसरे कैवल्यकुमार यांनाही फार सुरेख आवाज आहे. आवाज ऐकताना प्रसन्न वाटलं. मला वाटतं, जे लोक गाणं शिकतात ते शिकताना हा राग सकाळी गायचा, हा संध्याकाळी हे पण शिकतात त्यामुळे त्यांच्यावर त्याचा कळत नकळ्त परिणाम होत असणार. पण जे शास्त्रीय संगीत शिकलेले नाहीत तरी आवडीने ऐकतात त्यांना असे वेळ वगैरे फार परिणाम करत नसावे.

In reply to by पैसा

दुसरे कैवल्यकुमार यांनाही फार सुरेख आवाज आहे. आवाज गोड आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते संगमेश्वर गुरव यांचे चिरंजीव आहेत ! गायकीसाठी कैवल्यकुमार असे आगळे वेगळे नाव वापरतात.

छान माहिती दिली आहे. माझे बाबा नेहमी म्हणायचे की तानसेन सगळेच होऊ शकत नाहीत, आपण निदान कानसेन तरी व्हावं. लट उलझी मध्यंतरी विविधभारतीवर संगीतसरिता या कार्यक्रमात शुभा मुद्गल यांनी सांगितलं होतं की लट उलझी ही राग बिहागमधली बंदिश म्हणून जरी लोकप्रिय असली, तरी वृंदावन-मथुरा इथल्या कृष्णमंदिरात ती वैष्णवभजन म्हणून गायिली जाते.

तोडी सकाळचा असला तरी मला फारसा प्रसन्न वाटत नाही , करुण्यारस असलेला राग वाटतो..भैरवमात्र नावाप्रमाणेच गंभीर आणि भक्तीरस असलेला... रागांच्या वेळा गायक लोकं बहुतांश वेळा पाळतात... कदाचित सवयीमुळे पण असेल मी सकाळी दरबारी ऐकू शकणार नाही असे वाटते..अर्थात हे वैयक्तिक मत... खरे तर आजूबाजूच्या वातावरणाचासुद्धा गायक लोकं तिथल्यातिथे विचार करून आपली कला दाखवतात.. आता समजा ओपन ऑडिटोरियम आहे, सुंदर चांदण्या दिसत आहेत... मंद प्रकाश आहे .. आणि दुसरीकडे बंद सभागृहात दुपारी बाहेरून भयंकर उन असताना आत मध्ये गाणे चाललंय ... तर वेळेच्या पलीकडे त्याचा विचारसुद्धा (किंवा परिणाम) न जाणे थोडा फार होत असावा असे वाटते.....

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मन्द्यासाहेब , तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. तोडी हा थोडा करून राग आहे. कारुण्या पेक्षा "संपूर्ण शरणागती " "मी कोणीही नाही" ही भावना "तोडी" व्यक्त करतो असे वाटते. निसर्ग , इश्वर , माता -पिता , प्रियकर प्रेयसी यांच्यासमोर नतमस्तक होणे म्हणजे तोडी. अर्थात तोडी हे महाभाराताप्रमाणे महाकाव्य आहे आणि कोणाला कसे भावेल याचा काही नेम नाही. तोडी ची दोन उदाहरणे म्हणजे १. अगा करुणाकरा - खळे साहेबांचे संगीत लता बाईनी गाईले आहे एवढीच ओळख पुरेशी आहे. २. सोहम् हर डमरू बोले - हे नाट्यसंगीत थोरा मोठयानी गाईले आहे. पण प्रथमेश लघाटे चे गाणे ऐकाच. त्याने तोडीचे शिवधनुष्य समर्थ पणे पेलले आहे. ( दुवा सापडला नाही ) बिअर , सिगारेट जशी सुरवातीला कडवट लागतात पण नंतर मेंदूचा ताबा घेतात , तसेच तोडीचेही आहे. एकदा तोडी ची ओळख झाली की बस्स... मग पं. मुकुल शिवपुत्र आणि त्यांचे पप्पा पं.कुमार गंधर्व ह्यांचे तोडी ऐका. बाप -बेटे वेडे करून टाकतील.

तोडीतील या दोन बंदिशीनमधील शब्द तरी कारुण्यरस दर्शवत नाहीत. १. चंगे नैनवाली कुडीया-- छान नयन असलेली पोरगी (मुलगी) २. एरी माई आज शुभमंगल गावो शौक पुरावो मृदंग बजावो गाओ रीझावो ---वगैरे वगैरे

In reply to by रमेश आठवले

गा रे कोकिळा गा हे गीत केदार रागात आहे नि स्नान करिती लोचने अश्रुनी पुन्हा पुन्हा हे ही ! " बेकसपे करम कीजिये सरकारे मदीना हे केदार रागात आहे नि " आप युंही अगर हमसे मिलते रहे " हे ही ! यात दोन गीते करूण तर दोन गीते उत्फुल्ल्ल आनंदमयी आहेत. अर्थ एकच रचना कशी होते व गायक आपल्या रागाचा कोणता पोत गीतात वापरतो यावरच भावदर्शन ठरत असते.अर्थात लयीचा यात संबम्ध असतोच. पूछो ना कैसे मैने रैन बितायी हे गीत मधुबनमे राधिका च्या लयीत पार फसून जाईल !