Skip to main content

अवसान, हिंमत, धाडस एक गोष्ट

लेखक मन
Published on मंगळवार, 01/01/2013
फार फार मागे, कोणे एके काळी घडलेली; पंचतंत्रात असते तशीच, त्याच काळातली ही एक गोष्ट. जंगलातले ससे चपळ झाले की सिंह सुस्तावले सांगता येणार नाही. पण येनकेन प्रकारे सिंहांना सशांची शिकार करता येणे अवघड होउ लागले; दुरापास्त होउ लागले. नव्या सावजांना कसे शोधता येइल ह्याबद्दल विचार करत हळूहळू खंगत जाणारे ते सिंह चिंतित बसले होते.ते फारच अश्क्त दिसू लागले होते. इतक्यात आलेल्या मानभावी सेवकाने, कोल्ह्याने त्यांचे लक्ष विचलित केले. "तू का आलास रे बाबा आता" असं एक वयोवृद्ध सिंह आयाळाला बाजूला सारत गुरगुरत बोलता झाला. "चिंता कसली दिसतेय सर्व वनश्रेष्ठींच्या मनी, ते जाणून घ्यावे म्हणून यावेसे वाटले." कोल्हा वदला. सिंहांनी चिंतेचे कारण सांगितले.कोल्हा खुदकन हसला. सिंहांनी कारण विचारताच ते शिताफीने टाळून शिकार मिळवून द्यायचे वचन त्याने दिले; अर्थातच शिकारीतला आपला माफक हिस्सा कबूल करुनच तो निघाला. . तिकडे ससे बर्‍यापैकी खूश होते. हल्ली शिकार्‍यांचे; विशेषत: सिंहांचे हल्ले सपशेल अपयशी होउ लागले होते. पण दरदिवशी नव्याने हल्ला करायचे सिंह काही सोडित नव्हते. रोज रोज ह्यांच्यापासून पळण्यापेक्षा एकदाच काय ते कायमचे नीट करताच येणार नाही का असं आता सशांमधल्या काहिंना वाटू लागलं. इतक्यात कोल्ह्याची चाहूल लागली म्हणून सगळे सावध झाले. आपापल्या बिळात खोलवर शिरुन बसले. पण कोल्ह्यानं त्यांना विश्वासात घेतलं. आपलं आधीच पोट भरलय हे पटवून दिलं नि हिताच्या चार गोष्टी बोलायला बाहेर बोलावलं. "अरे मला कसले घाबरताय? मी तर असा एकटाच, तोही थकत चाललेला." उसासा टाकत कोल्हा बोलला. "बाबा रे , तू असशील एकटा आणि म्हाताराही . पण म्हणून आम्हाला खायचं सोडशील का?" एक जरासा वृद्ध म्हणाला. "अरे मीच काय कुणीही तुम्हाला एकट्या दुकटा गाठून खाउन टाकतं. आम्ही दिसलो की तुम्ही सैरावैरा पळता. जरा पहा, मी हा असा एकटा. तुम्ही हे एवढे शंभराच्या घरात. आलात अंगावर धाउन एकाच वेळी, तर काय बिशाद आहे आमची कुणाला काही करायची. " ज्येष्ठ ससा गालातल्या गालात हसला. पुढल्याच क्षणी सचिंतही झाला. एक तरुण ससा मात्र सळसळत्या उत्साहाने विचार करु लागला. प्रतिकार करण्याच्या कल्पनेनं भारावून गेला. "हो नक्कीच. आम्ही इतके सारे आहोत. आम्ही का घाबरावं." तो तरुण ससा जोरकस बोलता झाला. हळूह़ळू इतरांनाही आपल्या बाजूला प्रवृत्त करु लागला. पोक्त सशाचं अनुभवाचं शहाणपण मात्र कुणीच ऐकून घ्यायच्या तयारीत नव्हतं. एकापाठोपाठ एक ससे त्या विचाराने प्रभावित होउ लागले. नव्या विचारांची जणू साथ पसरु लागली. झालं; सिंहांना अद्दल घडवायचं भरपूर संख्येनं असलेल्या सशांच्या मनी बसलं. कोल्ह्याच्या सूचनेनुसार सगळ्या धाडशी सशांनी त्या मूठभर सिंहांवर ऐन रात्रीच हल्ला करायचं ठरवलं. ते रात्री निघाले. निबिड अरण्यात, दाट झाडीतून, चिखल वाटेतून आणि घट्टगडद पसरलेल्या नि वाळलेल्या पालापाचोळ्यावरून ते मोठ्या आवेशाने निघाले. ह्या सशांपासून दूर कुठेतरी दोन डोळे मिश्किल चमकले. डोळे मिटून नि मनात गुदगुल्या करुन घेत स्वस्थ अंधारात रमले. बराच वेळ झाला होता. ससे बरेच अंतर चालून आले होते.सिंह नजरेच्या टप्प्यात आले. सशांनी ठरल्याप्रमाणे अगदि जवळ जाईपर्यंत काहीही गोंगाट केला नाही. सिंह आता त्यांच्या अगदि समोर होते. ससे सर्व शक्तीनिशी आता त्या सर्वांना यथाशक्ती गुद्दे घालणार होते. एकेकट्याचे गुद्दे काहीच नसले तरी सर्वांचा एकत्रित परिणाम फार मोठा होणार ह्याची त्यांना खात्री होती! त्या सर्वांनी सिंहाला घेरले. आणि हाय रे दैवा !! त्याच वेळी झोपेचे सोंग घेत असलेला तो सिंह जागा झाला. प्रचंड मोठ्यानं फोडलेली त्याची डरकाळी, त्यावेळचा त्याचा आवेश नि अजस्त्र्/हिंस्त्र रूप पाहून्च काही ससे गलितगात्र झाले.काही घाबरुन तिथेच धापकन पडले, ते पुन्हा न उठण्यासाठीच. एकानं कशी बशी हिम्मत करुन सिंहाच्या पंजापर्यंत जायचा प्रयत्न केला नि सिंहाला भलताच आनंद झाला. आयती शिकार मिळते म्हटल्यावर तो कशाला सोडातोय. पंजाशी खेळणार्‍या त्या चिमुरड्या सशाला तत्क्षणी कचकन चिरडत त्यानं त्याच्या नरडित नखं खुपसली. दुसर्‍या पंजानं अजून एकास धरले. बजूलाच पडलेल्या अजून एका सशाला त्याने नुसत्या तोंडातील तीक्ष्ण दातांनी उचलून चावायला, गिळायला सुरुवात केली. दोन पंजाखाली दोन नि तोंडात एक अशी मस्त मेजवानी त्या उपाशी वनराजास मिळाली. त्याचे रौद्र रूप पाहून आता मात्र उरलेलेही ससे गांगरले. गोंधळले.सैरावैरा धावू लागले. वाट फुटेल तिकडे जीवाच्या आकांताने भयचकित जीव पळाले.अगदि स्वतःच्या कित्येक जातीबांधवांना ढकलत्,बाजूला सारत, कशाचेही भान न ठेवता ते निघाले. कुणी धावता धावता ठेचकाळले. कुणी धक्का लागून ओढ्यात पडले. कुणाच्या नशीबी कपाळमोक्ष आला. आपल्या रक्ताने जमीन लालच लाल करत त्यांचा प्रवास सुरु होता, वाचण्यासाठी! मारण्यासाठी नव्हे! . धावता धावता एक ससा दुसर्‍याला म्हणाला..."काय चुकलं? असं कसं झालं? आपण तर इतके सारे होतो ना." दुसरा म्हणाला "पण म्हणून काय झालं> ? आपण ससे आहोत ना." पाहिला उत्तरला:- "पण सिंहामध्ये आणि सशांमध्ये असं काय वेगळय? हिंमत त्यांच्याइतकी आपणही आणलीच होती की. " दुसरा बोलला :- "आपण आणलं ते नुसतं सिंहाचं काळीज. माणसं ह्याला उसनं अवसान म्हणतात, तसं काहीसं. सिंहाचं काळीज सिंहालाच शोभतं. आपलं सध्या तितकं सामर्थ्य तरी आहे का? " पहिल्याला आत्ता कुठे जाणवलं. जे होतय त्यातली गोम उमगल्यासारखं त्याला वाटलं. पण तरीही त्याला प्रश्न पडलाच. "म्हणजे मग आपण कायम असच घाबरायचं? पळायचं? धूम ठोकायची? सिंहांना कधीच धडा शिकवू शकणार नाही आपण?" . धावणारा दुसरा ससा किंचित गूढ स्मित करत बोलला "धडा शिकवूयात की. अगदि जरूर शिकवूयात. पण आपण असं त्यांच्यासारखं लढणं हे त्यांच्याच पथ्यावर पडणारं आहे.अरे आपली खासियत पळणं. आपण अधिक चपळ व्हावं. अधिक जोरात पळावं. अगदि एकानंही सिंहाच्या हाती लागू नये. मग तो उपाशी राहणार नाही का? दरवेळी हल्ला केलाच पाहिजे का? आपण त्याच्यावर हल्ला करणं काय नि त्यानी आपल्यावर करणं काय, ते त्याच्याच हिताचं नाही का?" . पहिल्याला आता सारं सारं समजलं. पण आपल्या आप्तांच्या किंकाळ्या त्याला आता अस्वस्थ करत होत्या. इतक्या दूर आल्यावर त्याला ऐन रणात पडलेल्या आपल्या सुहृदांची आठवण झाली.हे जाणवून दुसरा बोलला "अरे ते पडलेत त्यातही तुझच हीत आहे. ते तिथे आहेत, म्हणून सिंह तिथे गुंतलाय. ते सुटले असते, तर ह्याक्षणी कदाचित सिंहाच्या जबड्यात तू लटकत राहिला असतास! नि ते अलगद माझ्यासोबत आले असते. तथा, अधिक शोक करु नकोस. धावणे हाच तुझा धर्म. तोच कसोशीने पाळ.धाव, अधिक जोरात धाव. उत्तम धावक हो . नि त्यातच अधिकाधिक उत्तमतेचा ध्यास घे. धावशील तर वाचशील. समोरासमोर दोन हात करु गेलास तर मरशील. सिंहाचे सामर्थ्य आल्याशिवाय फुकाचे सिंहाचे काळीज असल्याचा आव आणू नकोस" --मनोबा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3284
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

... आपली खासियत पळणं. आपण अधिक चपळ व्हावं. अधिक जोरात पळावं...धावणे हाच तुझा धर्म. तोच कसोशीने पाळ. धाव, अधिक जोरात धाव. उत्तम धावक हो . नि त्यातच अधिकाधिक उत्तमतेचा ध्यास घे. धावशील तर वाचशील ... ... गीतेचे सारच जणु गोष्टीरूपात सांगितलेत.

मनोबा, गोष्ट आवडली पण तुमच्या रूपककथेची पार्श्वभूमी लक्षात येत नाहीये.

In reply to by पैसा

कुठल्याही तात्कालिक घटनेपेक्षा मला ही कथा व्यवस्था विरुद्ध सामान्य माणूस यांच्यातली वाट्टेय. सामान्य माणूस कितीही फुरफुरला तरी व्यवस्था त्याची जागा त्याला दाखवून देते असे काहीसे जाणवतेय मला तरी.

आणखी एक इसापकथा.

इतरत्र; अजुन एक संस्थळावर दिलेला प्रतिसाद इथे पुन्हा पेस्टवतोय. सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे आणि वाचनमात्रांचेही आभार. ही गोष्ट फार फार दिवसापासून, दोनेक वर्षापासून डोक्यात घोळत होती. त्याचा शेवटचा बांधीव कच्चा मसूदा मी स्वतःलाच व्यनि केला ती तारिख होती १४ नोव्हेंबर.(व्यनि आजही माझ्या खात्यात आहे त्या तारखेचा.) दिल्लीतील दुर्दैवी घटना त्यानंतर महिनाभराने तरी(१६ डिसेम्बर) घडली आहे. कुठल्याही गोष्टीचा थेट प्रत्यक्ष, वास्तव घटानांशी जसाच्या तसा संबंध लागणे आवश्यक नसावे असे माझे मत आहे. कथा ही कथा आहे, गोष्ट आहे. इसापनिती, पंचतंत्र, सिंदबादच्या कहाण्या किंवा अरेबियन नाइट्स, ह्यासारख्या बोधप्रद( काही मते,perspective मांडणार्‍या) किंवा किंग आर्थर किंवा होली ग्रेलसारख्या गूढरम्य पण रंजक सारख्या गोष्टींसारखी ही गोष्ट आहे. ह्या सगळ्या लोककथा शैलीच्या अंगानं फुलत गेलेल्या दिसतात. काही (छोट्याशा, गुडघ्या एवढ्या आकाराच्या माणसांच्या प्रदेशात, दूरवरच्या अज्ञात बेटावर पोचणरा प्रवासी/खलाशी दाखवलेला)गलिव्हर ट्रॅवल्स , एलिस इन वंडरलँड सारख्या एकजिनसी, एकाच माणसाने लिहिलेल्याही आहेत. . माझ्या स्वतःच्या काही पूर्वी प्रकाशित झालेल्या लेखनाची ही यादी:- (सुटका (एक छोटीशी गोष्ट) http://www.manogat.com/node/18817 http://www.aisiakshare.com/node/1131 . . (प्रतिमासृष्टी (एक छोटीशी गोष्ट) ) http://mimarathi.net/node/4319 . स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा) http://www.aisiakshare.com/node/1129 . घोड्याची गोष्ट.... http://www.aisiakshare.com/node/1109 मसीहा... http://www.aisiakshare.com/node/111० ह्यापैकी माझे कुठलेच लिखाण एखाद्या विशिष्ट घटनेने ट्रिगर झालेले नाही. सुचले म्हणून्/तसे लिहिले. . मित्रांच्या* घोळक्यात ही ष्टोरी ऐकवल्यावर आलेले काही प्रतिसाद पुढीलप्रमाणे . १.शिवबानं आग्र्यातून शिताफीनं निसटून,परमुलखात विनाकारण "वेडात मराठे वीर" स्टाइल धाडस केलं नाही; सुरक्षित परतीचा मार्ग धरला हे इष्ट केलं असं तुला म्हणायचय का? त्यांचं त्या प्रसंगातलं शहाणपण तू अधोरेखित करतोयस का? . २.इक्विटी मार्केट मध्ये, शेअर बाजारात मोठा मासा छोट्याला गिळतो. एकेकटे निर्बल, असहाय नि निर्बलतेची धड जाणीवही नसलेले रिटेलर्स हे सर्वांचं सहज सावज(soft target) आहे; व बाजारात नेहमीच त्याची वाजवली जाते असं तुला म्हणायचय का? . ३. हल्ला करताना, आक्रमक होण्याचा काही काळ आनंद घेण्यापूर्वी, मोठ्या माशानच आपल्याला आक्रमक व्हायला (त्याच्या फायद्यासाठी ) उद्युक्त केलय असं तुला म्हणायचय. प्रतापगडावरील घाबरण्याचं नाटक रचणार्‍या आणि नंतर पराक्रम गाजवणार्‍या मुत्सद्द्याचं हे वर्णन आहे का? . ४. evolution takes time. एका रात्रीत इकडचे तिकडे होइल अशी अपेक्षा करणे मूर्खपणा आहे. स्वनाशाचा मार्ग आहे. व्यवस्थेतील बदल असा सहजासहजी होणार नाही; हे तुला दाखवायचय का. . ५.फुकटात ( "अंगात मस्ती अन् खेळ कुस्ती " छापाचे) अवसान आणू नये. अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहावे; असे काही का? ६.सामर्थ्यला पर्याय नाही.competent/सक्षम व्हा असे काही? किंवा शक्ती/ताकद असणे आणि competent/सक्षम/fit असणे एकच नाही, असे काही सांगायचेय का? . ७.तुमच्याशी गोग्गोड बोलणारे नि आशावादी भविष्य दखवणारे हितचिंतक असतीलच असं नाही. किंवा dont look at what he talks; look at what he says! (तो जे बोलतोय ते पाहू नका, त्याला काय म्हणायचय किंवा तो ते का म्हणत असावा(hidden agenda/ गर्भितार्थ) हे ध्यानात घ्या.) असं काही म्हणायचय का? . ८.पलायन हीसुद्धा एक उत्तम strategy/धोरण आहे. तो शब्द नकारात्मक/derogatory म्हणून वापरू नका. असं काही? . ९.लढणे म्हणजे नेहमीच समोरासमोरची मारामारी नसते. समोरच्यावर फारसा प्रत्यक्ष न हल्ला करताही नामोहरम करता येते.(सशांनी जसे करणे , धावणे अपेक्षित आहे तसे) तसे काही? रशियाने नेपोलियन किंवा नाझींविरुद्ध आपले हवामान व प्रचंड भूमी शस्त्रासारखी वापरली. त्यासारखे काही? किंवा महाभारतातील्/भागवतातील रणछोडदासाने धूम ठोकून कालयवनास भस्मसात केले; तसले काही? . १०.स्वतःपुरतं पाहणे आणि स्वतःची उन्नती रास्त मार्गाने करुन घेणे ह्यात काहीही गैर नाही. तुम्ही परोपकारी नसलात, फुकटात समाजसेवा केली नाहित म्हणून तुम्ही लागलिच वाईट्ट ठरत नाही. स्वत:चं न्याय्य अस्तित्व टिकवणं हा तुमचा हक्क आहे. तुम्ही तेवढच पाहिलत तरी पुरेसं आहे.अधिक धावून सक्षम व्हा; आप्ल्या लोकांस सक्षम करा; स्वतःचे भले साधा.असे काही? . ११. आपल्या कृतीचा नेहमीच इष्ट परिणाम गृहित धरु नये. विजय taken for granted घेउ नये; प्लान बी तयार असावा; नि "सिंहाला संपवू शकलो नाही तर काय" ह्याचाही विचार करावा असे काही? . १२.अस्तित्व survival हेच सत्य नि तेच अंतिम उद्दिष्ट बाकी सर्व फुकाचे तत्वज्ञान. जो उरतो तो जिंकतो. तोच पुढे "योग्य्/नैतिक"ही ठरतो. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना मरायला उद्युक्त करण्यासाठी अभिमान, धैर्य, शौर्य असल्या शब्दांचा बकवास उगाळला जातो हे समजून घ्या. ह्या छापाचं काही? . ह्या सर्वांशिवाय अजूनही एक आहे. पण सार्वजनिक ठिकाणी लिहिणं बरं दिसणार नाही. संसदिय, सभ्य भाषेत इथं लिहिता येणार नाही. . *आमच्या घोळक्यात तसे बर्‍यापैकी शैक्षणिक वैविध्य असले(MBA, B COM, B E , M TECH) तरी सगळे आयटीवाले आहेत. "मृत्युंजय" वाचून महाभारताबद्दल आणि "छावा"- "श्रीमान योगी" वाचून शिवशंभूकाळातील इतिहासाबद्दल "अंतिम आणि ठाम" मत बनवायचं एक वय असतं. माझ्यासकट आमच्यातील बहुतांशाचं अजूनही बौद्धिक वय तितकच आहे. --मनोबा

हेच तर महाराजांनी शिकवलं.. शत्रूला गाफील ठेवा, अधीर करा आणि मग गनिमी काव्यात त्याला ठेचा.. जावळीत जे केलं ते तंतोतंत.. सशांनी पळत राहून, चकवत राहून, सिंहाला भु़के मारणं ह्यात त्यांचा विजय आहे. ते एकट्या दुकट्या सशाचं काम नाहीच. त्यामुळे तुम्ही एकत्र याल तेव्हा तुमची चाल (स्ट्रेटजी) काय ते महत्त्वाचं आणि त्यासाठी तुमचं आत्मावलोकन होऊन स्वत:ची आणि समूहाची शक्तिस्थानं तसच मर्मस्थानं माहिती असणं, ती वापरून समुहाला मार्गदर्शन करणं हाच नेतृत्व गुण.. लढाया केवळ समोरासमोर शस्त्रानेच नाहीत तर कूटनितीने सुद्धा जिंकता येतात हे नाना फडवणीसाने सुद्धा दाखवून दिलय. बोधकथा आवडलीच..

यावरुन हत्तीच्या कानातील मुंगी आणि रेड्याच्या नाकाला चावणारा उंदीर पण आठवले. -सूर्यपुत्र.