Skip to main content

मनाला समाधान देणारी घटना (आपले मत अपेक्षीत आहे)

Published on गुरुवार, 20/12/2012
हि कथा वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते हे नक्की सांगावे *************************************************************** तो काळच असा होता कि त्यावेळी माझे मन पूर्णपणे अध्यात्ममय झाले होते. दर वर्षी श्रावणात ग्रंथ वाचण्यासाठी गावात मला बऱ्याच ठिकाणी मागणी असायची. (ऐकाणारांच्या मते ) मी वाचून अर्थ सांगितला कि सगळे समजते. त्यामुळे रात्री दोन ठिकाणी आणि सकाळी एका ठिकाणी ग्रंथ वाचण्यासाठी मी जात असे. याच्यापेक्षा जास्त वेळ मी देऊ शकत नसे. तर त्यावेळी मी पूर्ण अध्यात्म मय झालो होतो. शिवाय पहिल्यापासून माझ्या मनात भक्तीची खूप आवड निर्माण झाली होती. लहान पणापासून ग्रंथ वाचण्याचा परिणाम असेल कदाचित. वर्ष दीड वर्ष मी रोज नित्यनेमाने शिवपूजेसाठी मंदिरात जात होतो. पूजा साधीच करायचो पण मन लाऊन करायचो. पूजा झाल्यानंतर अक्षता म्हणून जे तांदूळ असायचे त्यातील थोडे तांदूळ मी बाहेर चिमण्यांसाठी ठेवायचो. (नि त्यामागे दुसरेही एक कारण असे होते कि चिमण्या मंदिरात येऊन मी पिंडीवर ठेवलेले तांदूळ खाऊ नये ) पण त्या चिमण्याच, बाहेरचे तांदूळ संपल्यानंतर त्या आत यायच्या नि पिंडीवरील तांदूळ खाऊन टाकायच्या. मी पिंडीवर अतिशय सुरेख मांडलेले तांदूळ विस्कटायचे राग यायचा पण तो गिळावा लागायचा. कारण मनात यायचे कि जर यांच्या रुपात परमेश्वर तांदूळ खायला येत असेल तर (श्रीकृष्णाने नाही का विदुराच्या कण्या खाल्ल्या होत्या ) मगमग जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हि ओवी आठवत घरी जायचो. असे खूप दिवस चालू होते. नंतर नंतर चिमण्यांची नि माझी जणू चांगली मैत्रीच झाली कारण माझी पूजा चालू असताना त्या अगदी माझ्या जवळ यायच्या नि परत उडून त्यांच्या घरात जायच्या त्यांचे घर तिथे मंदिरातच होते. पुरातन असलेले ते दगडी मंदिर होते. त्यामुळे चिमण्यांना राहण्यासाठी खूप (फटी) घरे होती. ग्रंथ वाचण्यामुळे मी बऱ्यापैकी अहिंसावादी झालो होतो. देवाचे सतत नामस्मरण करायचो. भजन म्हणायचो नेमाने आळंदी पंढरीची वारी करायचो. आणि हि शंकराची नित्य पूजा. तर रात्री भजनाला जागल्यामुळे मी एकदा उशिरा उठलो. त्यामुळे गडबडीतच आंघोळ उरकली कारण पूजेला शक्यतो मी उशीर करत नसायचो. कपडे घालण्यासाठी मी बाहेर आलो तो तेवढ्यात चिमण्यांचा चिव चिवट कानावर आला. आणि दोन तीन चिमण्या माझ्या अगदी डोक्याजवळ येऊन ओरडू लागल्या. मी जरा चक्रावलोच कारण आमच्या घरात चिमण्या कधी येत नसायच्या आज या कश्या घरात घुसल्या. मी कपडे घाले पर्यंत त्यांचा चिवचिवाट चालूच होता. कपडे घालता घालता माझ्या डोक्यात एक विचार सर्रकन आला. या मंदिरातील चिमण्या तर नव्हेत. आणि त्या च इकडे आल्या नसेल पण मग त्या एवढ्या दूर कशाला आल्या असतील. त्यांच्यावर काही संकट तर आले नसेल ना? असा विचार माझ्या डोक्यात आला. नामस्मरण करत कपडे घालून पूजेचे साहित्य घेऊन मंदिरात जायला निघेपर्यंत त्या चिमण्या घरातच होत्या. नामस्मरण करत चाललो असल्यामुळे मंदिर येईपर्यंत मी चिमण्यांना विसरलो होतो. मंदिरात प्रवेश केला नि मला धक्का बसला. कारण चिमण्यांची अतिशय छोटी छोटी दोन पिल्ले खाली पडली होती. अतिशय नाजूक नि सुंदर असणाऱ्या त्या पिलांना पंख देखील फुटले नव्हते. खाली दगडी फरशीवर त्यांची वळवळ चालू होती. आता मला वाटू लागले कि घरी आलेल्या चिमण्या मंदिरातीलच असाव्यात मदतीसाठी त्यांनी माझ्याकडे धाव घेतली असावी. पिलांना उचलून त्यांच्या घरट्यात ठेवण्यासाठी मी झटकन पुढे झालो.त्यांना हात लावणार तेवढ्यात मनात विचार आला. यांना स्पर्श करावा कि नको. कारण कुठेतरी ऐकले होते कि वाचले होते. कावळा किंवा चिमणी यांना माणसाचा स्पर्श झाला तर त्यांचे भाऊबंध त्यांना मारून टाकतात. तसाच थांबलो विचार करू लागलो काय करावे याचा, त्या छोट्या जीवांकडे पाहून जीव तुटत होता. पिलांना घरट्यात जर ठेवले नाही तर त्यांचा म्र्युत्यू निश्चित होता. एक मन म्हणत होते कि चिमण्या मदतीसाठी बोलवायला घरी आल्या म्हणाल्यावर आपण स्पर्श केला तरी त्या पिलांना मारणार नाही. परंतु ह्या सगळ्या जर तर च्या गोष्टी होत्या मुक्या जीवांच्या भावना काय आहेत ते कसे कळणार. विचार करता करता माझे लक्ष्य कोपऱ्यात गेले तिथे एक पत्रिकेचा कागद होता. लगेच तो घेतला नि त्याचे दोन भाग केले एक भाग पिलाच्या खाली अगदी हलक्या हाताने सारला.दुसरा भाग पिलू पडू नये म्हणून आडवा धरला. आणि उठून अगदी अलगद ते पिलू घरट्यात सोडले. दुसऱ्या पिल्लाच्या बाबतीत तीच कृती केली.आणि दोन्ही पिल्ले त्यांना माझा स्पर्शही न करता घरट्यात ठेवण्यात मी यशस्वी झालो मनाला खूप समाधान वाटले. हे सगळे करेपर्यंत चिमण्यांचा चिवचिवाट चालूच होता. घरट्यात पिले ठेवल्यानंतर तो कमी झाल्यासारखे वाटले. नंतर मी जवळ जवळ अर्धा तास मन लाऊन पूजा केली. आरती झाल्यानंतर मी घरट्याकडे पहिले नि इतका आनंद झाला कि काय सांगू कारण त्या पिलांची आई त्यांना काहीतरी खायला घेऊन आली होती. आणि ती पिल्ले आपली इवलीशी चोच वासून बाहेर डोकावत होती. चिमणीने आपल्या चोचीतला घास पिल्लांच्या चोचीत सारला होता. मनाला आज कधीही न वाटणारे एक अलौकिक समाधान वाटत होते. हा एक छोटा प्रसंग वाचून तुम्हाला काय वाटले. माझ्या घरात घुसून चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या मंदिरातीलच असतील का? मदतीसाठी मंदिरातील चिमण्या माझ्या घरी आल्या असतील का? किंवा घरातील चिमण्या नि मंदिरातील चिमण्या वेगवेगळ्या असतील आणि हा निव्वळ योगायोग असू शकेल काय? आपले मत अपेक्षित आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3362
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

त्या नीमीत्त्मात्र असतील्...कदाचीत देवाच्या मनात तुमची परिक्षा घायचं असेल...काहि का असेना तुम्हाला अलौकिक समाधान मीळालय ना ते जास्त महत्वाचे.

सुरूवातीला 'कथा' म्हणालात, पण हा आपला स्वानुभव असावा; कथा म्हणून छान आहे, लिखाणाची सरळ-सोपी साने गुरुजींच्या 'श्यामची आई' सारखी पद्धत आवडली. अनुभव असेल तर आपण या घटनेच्या मागचा 'अर्थ' शोधू पाहता आहात असं दिसतं, तर्क ताणला तर 'मदतीसाठी मंदिरातील चिमण्या आपल्या घरी आल्या असतील' हे कदाचित शक्य आहे. पण मला वाटतं आपण सत्कार्य करतांना त्यामागे फार कारणमीमांसा शोधू नये. Do good because you want to, इतकंच कारण पुरेसं असायला हवं, हो ना? पुन्हा एकदा, छोटेखानी 'feel good' प्रसंगनिवेदन आवडलं.

In reply to by बहुगुणी

..गुरुजींच्या 'श्यामची आई' सारखी पद्धत..
अगदी 'श्यामची आई' सारखच बाळबोध आणि सोवळ्यातलं लिखाण. :)

हे लेखन तुमचं स्वत:च आहे काय? पूर्वी कुठेतरी वाचल्याचं स्मरते. नक्की आठवत नाही. ओके आत्ता आठवलं. दुसऱ्या एका संकेतस्थळावर वाचलं आहेत. तिथेही तुम्हीच लिहिलंय. आक्षेप मागे.

In reply to by गणपा

एक 'मँगो सदस्य' की हैसियतसे प्रतिसाद लिहिणार्‍या संपादकांनी स्वतःचा प्रतिसाद संपादीत करावा का? मग प्रत्येक ठिकाणी व्यक्त केलेली मतं एक संपादक म्हणूनच असतील काय?

In reply to by दादा कोंडके

प्रश्न असा आहे की जर त्यांनी एक सदस्य म्हणुन एखाद्या संपादकाला तशी विनंती केली असती तर संपादकांनी ती विनंती मान्य करुन त्यांचा प्रतिसाद बदलला असता का? जर सदस्यांच्या विनंतीवरुन संपादक काही बदल प्रतिसादात करत असतील तर मला वाटते तुम्ही इथे असे समजा की "गणपा नावाच्या मेब्मराने गणपा नावाच्या संपादकाला प्रतिसाद बदलण्याची विनंती केली. गणपा संपादकाने ती मान्य करुन आवश्यक ते बदल केले." हाकानाका.

In reply to by मृत्युन्जय

मुळात मी प्रतिसाद बदलला नाही. फक्त वाढवला आहे. (शेवटची ओळ.) जालावर लेखन चौर्य बरचं बोकाळलय. म्हणुन आधी विचारणा केली होती. पण थोडी शोधाशोध केल्यावर कळलं की पुर्वी जिथे वाचली होती तिथेही यांनीच प्रकाशित केली होती. म्हणुन दुसरा प्रतिसाद देण्यापेक्षा त्याच प्रतिसादात अपडेट केलं येवढच. हे दादा कोंडके यांना आधी सांगीतलं होतं, इतरांचा गैरसमज होऊ नये म्ह्णुन पुन्हा ईथे पुन्हा लिहितोय.

प्राणी-पक्षी अतिशय संवेदनशील असतात आणि आपल्याशी कधीकधी संवाद साधतात याचा अनेकवेळा अनुभव आला आहे. अनुभवकथन आवडले. :)

सगल्यांनी पचुपक्च्यांना मदत क्लावी, कुनाकुनाला त्लाश देवून ये. आशे केल्याने देवबाप्पा आप्ल्याला आशिवाद्देतो. (येवलंच म्हन म्हनाली मम्मी ;) ) सीरियसली जे लिहीलंय ते छान प्रांजळ लिहीलंय वो.

अनिल, तू लई चांगलं काम करतुयास. टिंगल करनार्‍याकडं आज्याबात ध्यान दिऊ नगस. चिमन्यांसाटी तांदूळ टाकतोस, तसं आनकी येक काम कर. मिणरल वाटर पिऊन लोक बाटल्या रस्त्यावर फेकून देत्यात. त्या बाटल्या आनायच्या. निम्म्या कापायच्या आनि खालच्या भागाच्या कडेवर ३ भोकं पाडून सुतळ्या बांदायच्या. आता ह्या बाटल्या कुटल्याबी झाडाच्या फांदीला बांदायच्या आन् त्यात जमल तसं पानी वतत राह्याचं. म्हंजी पक्ष्यांना पानी बी पियाला हुतंय.

तुमच्या मनाला समाधान वाटलं न..झालं तर मग. लोकांची मतं गरजेची नाहीत. आणि हो थोड्या चिमण्या पाठवून द्या इकडे...हल्ली दिसेनाशा झाल्या आहेत.

In reply to by इष्टुर फाकडा

सहमत आहे.
तुमच्या मनाला समाधान वाटलं न..झालं तर मग. लोकांची मतं गरजेची नाहीत.
आणि तशीपण आजकाल ज्यांच्या मताची दखल घ्यावी अशी लायक माणसे आजूबाजूला फार कमी उरलेली आहेत. अनुभव आणि वर्णन दोन्ही आवडले.

सर्व प्रथम सर्वांना धन्यवाद, कोणाच्याही प्रतिसादाला उत्तर देउ शकलो नाहि कारण दोन दिवस काही कारणाअंती संगणकावरती बसता आले नाही. शेतातल्या कामांची धावपळ आहे .

नाहीतर प्रत्येक प्रतिसादाला 'धन्यवाद, धन्यवाद' म्हणून उपप्रतिसाद देतात काहिजणं