Skip to main content

स्टोरी सलील ची ...

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 25/10/2012 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच सलीलचा फोन आला ,चांगला तासभर बोलला .मीही भारावलो ,चक्क अमेरिकेतून फोन! बोलणे झाल्यावर फोन खाली ठेवला आणि माझं मन सलीलच्या भूतकाळात निघून गेलं... ३० वर्षांपूर्वीची गोष्ट .सलील ,माझ्या भावाचा एक मित्र .याचे वडील एका कारखान्यात मॅनेजर. पण स्वभाव लहरी. घरी बायको आणि एक मुलगा.पण त्या काळात सुमारे ३० हजार रुपये महिना पगार असलेली नोकरी सोडून माथेरानला हॉटेल काढायचे खूळ डोक्यात शिरले. नोकरी सोडून हॉटेल काढलेही ,पण पार्टनरने फसवल्यामुळे यांच्या हाती राहिले धुपाटणे! त्यात यांना रमीचा नाद.एकदा रमी खेळायला बसले म्हणजे ३-३ दिवस हलायचे नाहीत.मग घरच्यांना शोधून आणावे लागायचे क्लबमधून ,आणि तोपर्यंत पगाराची रक्कम संपलेली असायची रमीत हरून! मग हॉटेलमध्ये फसले म्हणून एक कापड-गिरणी विकत घेतली.तीही दुसर्या मित्राबरोबर पार्टनरशिपमध्ये! तिथे पुन्हा तोच प्रकार. मग गिरणीसद्धा लिलावात निघाली.अशा सगळ्या परिस्थितीत सलीलच्या आयुष्याची मात्र लहानपणापासून फरफट झाली. वयाच्या ८व्या वर्षी आई जग सोडून गेली.मग बाबांनी दुसरे लग्न केले.आणि सलीलची रवानगी पाचगणीच्या बोर्डिंग स्कूल मध्ये .अशाही परिस्थितीत सलील अभ्यासात अतिशय हुशार होता . काही नातेवाईकानी थोडीफार मदत केली,अतिशय मन लावून त्याने बारावी पूर्ण केली. कॉलेज केले आणि एका चांगल्या कंपनीत जॉईन झाला. पण इथेही त्याच्या दुर्दैवाचे दशावतार संपले नाहीत.नेमक्या पगाराच्या दिवशी बाबा यायचे ,आणि मला कर्जाचे हफ्ते फेडायचे आहेत असे सांगत अर्धा-अधिक पगार घेवून जायचे! शेवटी तो कंटाळला आणि नोकरीचा राजीनामा देवून दूर कुठेतरी अज्ञात-वासात निघून गेला... या गोष्टीला १५ वर्षे उलटली...मध्ये त्याचा काहीच संपर्क नव्हता. आणि २ वर्षापूर्वी मी फेसबुक उघडल्यावर पाहतो,तर एक नवीन फ्रेंड रिक्वेस्ट आलेली.सलील देशमुख! मी चाट पडलो, नाव ओळखीचं होतं,पण नक्की कोण ते लक्षात येईना ...मग जरा मेंदूला ताण दिल्यावर आठवलं,अरे हा तर आपला सलील! मी चटकन फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि चॅटिंग बॉक्स उघडला .तो ऑनलाइन होताच! कुठे आहेस? माझा पहिला प्रश्न !पलीकडून उत्तर –अमेरिका ! मी आश्चर्याने थक्क झालो. परिस्थितीने इतकी कडक परिक्षा घेतलेला सलील चक्क अमेरिकेत? पण खूप बरेही वाटले! मग मी माझा फोन नंबर दिला . अन त्याने फोन केला. खूप काही बोलला . भरभरून ...तो,बाबा,आई,आणि अमेरिकेबद्दलही . नोकरी सोडल्यावर बाबांच्या स्वभावाला वैतागून त्याने त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडले .इतर कुणालाही काहीही न सांगता तो गोव्याला गेला. तिथे चांगले सहा महिने होता ,छोटीशी नोकरी करत .त्यातून ५० हजार साठवले,आणि एका जुन्या मित्राने २ लाख दिले .पासपोर्ट होताच. शेवटी क्युबाला जाणार बोट पकडून तो क्युबाला पोचला .तिथून मग एजंट्स ना पैसे चारून अमेरिकेत अनधिकृत प्रवेश ! त्यानंतर मग कुठे शेतमळ्यात मजूर म्हणून, तर कधी गॅरेज मध्ये /धाब्यावर ...मिळेल आणि पडेल ते काम करत दिवस काढले. शेवटी एका दूरच्या मित्राची भेट झाली ,आणि त्याच्या ओळखीने एका मॉलमध्ये काम मिळाले...अशी गेली १०-१२ वर्षे त्याने अमेरिकेत काढली .महिना उत्पन्न १५००-२००० डॉलर्स !जगण्यापुरते काम ! मी विचारले ,अरे लग्नाचे काय? तिकडे मिळाली नाही का कोणी? तर म्हणाला ,अरे कसले लग्न आणि कसले काय? इथे जगण्याचे वांदे झालेत ,अरे रोज संध्याकाळी भूतकाळ खायला उठतो रे ...मग मी आणि बाटली .....बस....दुसरे आहे कोण आपल्याला? मी निरुत्तर! बरं पुढे काय ठरवले आहेस? इकडे परत येणार का? तर म्हणाला होय,यायची इच्छा खूप आहे . समुद्रकिनारी एखादे छोटेसे घर असावे अशी खूप इच्छा आहे रे! आत्ता वय आहे ४५ ,आणखी ४-५ वर्षे काही पैसा जमतो का ते पाहतो ,आणि मग येणार परत !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! फोन ठेवला ,आणि माझं मन सुन्न झालं! आयुष्यातील अडचणीना घाबरून आणि निराश होवून आत्महत्येचा पर्याय स्वीकारू पाहणाऱ्यांना सांगावेसे वाटते ,की अरे जरा या सलीलच्या आयुष्याकडे पहा ...नियतीने त्याला दु:खाच्या इतक्या डागण्या दिल्या ...त्याने निवडलेला मार्ग योग्य की अयोग्य यावर दुमत असेलही ...पण लढण्याची आणि जगण्याची इर्षा माणसाला कशी तारते याचे हे एक चांगले उदाहरण आहे ,असे मला तरी वाटते!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10870
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

निराश होवून आत्महत्येचा पर्याय स्वीकारू पाहणाऱ्यांना सांगावेसे वाटते ,की अरे जरा या सलीलच्या आयुष्याकडे पहा अरे रोज संध्याकाळी भूतकाळ खायला उठतो रे ...मग मी आणि बाटली .....बस....दुसरे आहे कोण आपल्याला? विरोधाभास !

In reply to by मदनबाण

विरोधाभास दिसतो खरा ,पण सांगा त्याने बाबांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवले असते तर? .........त्यापेक्षा आहे ते काही वाईट नाही...........................! आत्महत्या कधीच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही.............ती असते फक्त पळवाट ............आणि पळपुटेपणा !!!!!!!!!!!!!!

धड्याखालचे प्रश्न... १. सलीलच्या बाबांनी नोकरी सोडली, हॉटेल टाकले, बुडाले मग त्यानंतर कुणाच्या नोकरीचा पगार रमी मध्ये उडवत? २. वरच्या प्रश्नातील सर्व घटनाक्रमानंतर कापड गिरणी विकत घेण्याएवढे पैसे कुठुन आणले सलीलच्य बाबांनी? ३. गिरणी लिलावात निघाल्यानंतर मुलाला पाचगणीच्या बोर्डिंग स्कुलमध्ये घालणे कसे परवडु शकते ? विशेष सुचना - या तिन्ही प्रश्नांचे उत्तर - सलीलच्या बाबां त्या काळच्या सरकारचे जावई होते, असे देउ नये. ४.परिस्थितीने कड्क परिक्षा घेतलेल्या भारतिय नागरिकांना १५ वर्षापुर्वी अमेरिकेत प्रवेश बंद होती,त्याचे त्याकाळच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावरचे परिणाम सांगा.? ५. पंधरा वर्षापुर्वी गोवा ते क्युबा अशी थेट फेरी सर्विस होती, ती का बंद पडली, संदर्भासहित स्पष्ट करा. ६.अमेरिकेतील धाबे - निबद्ध लिहा. (निबद्ध हा शब्द साभार - व-हाड निघालंय लंडनला मधुन) ७. पंधरा वर्षापुर्वी सहा महिन्यात ५० हजार रुपये साठवणारा, दोन लाख उधार देउ शकणारा मित्र असणारा, नंतर १०-१२ वर्षे महिना १५००-२००० अमेरिकी डॉलर कमावणारा जर जगण्याचे वांदे झाले आहेत असे म्हणतो तर अमेरिकेतला सध्याचा महागाई सुचकांक किती असावा,सोदाहरण सिद्ध करा.

In reply to by ५० फक्त

धड्याखालचे प्रश्न... माताय शीर्षकातच चौकार!! प्रश्नात काय धुमाकूळ - चौथा नोबॉल धरून ओव्हर मध्ये सात सिक्सर... ---/\---

Be constructive and positive!!! folks.............. उपहासाने काहीही साध्य होत नाही...घेण्यासारखे काही असेल तर घ्यावे, नाहीतर सोडून द्यावे............

In reply to by मंदार कात्रे

आपला मित्र असला की अय्या वॉव व्वा छान सुरेख कधी कुठे . आणी दुसर्याला ,माझ्या कडुन एक वाजवाल का?माझ्या काही शंका,ह्या प्रश्नाचीं उत्तरे द्या.छे ह्या पेक्षा पहीलीचे धडे चांगले,खर सांगु अजिबात आवडला नाही. (आमची टोळी झिदांबाद वाले)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

खरय सेना प्रमुख , मीहि ह्या कंपूगिरीचा अनुभव घेतलाय . ह्यात मंदार मामाला , लेखात नक्की अजुन काय हवय , कशामुळे तो वाचनिय होइल किंवा उत्सुकता वाढवेल हे सांगणारे लोक खुप कमी आहेत धाग्यावर , नावं ठेवणारेच जास्त आहेत . असो , मंदार मामा पू.ले.शु.

श्री. मंदार यांस, तुम्ही म्हणताय ते शंभर टक्के मान्य, पण पंधरा वर्षापुर्वी म्हणजे १९९७ च्या आसपास गोव्यात सहा महिने नोकरी करुन ५० हजार रुपये वाचवणे शक्य असेल तर गेलाबाजार महिना पगार १२ हजार रुपये आणि खर्च ४ हजार रुपये असा हिशोब होईल, मग १९९७ सालचे १२०००/- दर महिना जेंव्हा सोनं चार हजाराच्या घरात होतं दहा ग्रॅमला म्हणजे तिन तोळं सोनं घेता येईल एवढा पगार म्हणजे आजच्या हिशोबानं महिना टेक होम एक लाख रुपये झाले, आणि एक लाख रुपये टेक होम लग्न न करता ते देखील गोव्यात + दोन लाख = ५० तोळॅ सोने देउ शकेल असा मित्र म्हणजे आजच्या हिशोबाने १५ लाख उधार देउ शकणार मित्र या परिस्थितीला जर तुम्ही परिस्थीतीशी केलेला संघर्ष म्हणत असाल तर मग चांगली परिस्थीती म्हणजे काय असते सांगाल काय ?

लेख आवडला नाही. क्षमस्व. जर ष्टुरी खरी असेल तर (कितीही वाईट वागले तरी) स्वतःच्या वडिलांना टाकून अमेरिकेत पळणार्‍या मित्राला माझ्यातर्फे एक वाजवाल का हो?

In reply to by दादा कोंडके

अरे हो, विनोदी अंगानं पाहायच्या नादात हा एक मोठा मुद्दा लक्षात आलाच नाही. +१०० टु दादा.

मंदार साहेब हे आधुनिक इसाप आहेत. जुन्या इसाप च्या गोष्टी इसापनीती म्हणून प्रसिद्ध झाल्या. लोकांनी त्यातील तात्पर्य , सत्त्व समजून घेतले. तसेच आपल्या मंदार साहेबांच्या कथेबाबत आहे. मंदार साहेबांचा नायक अमेरिकेत अनधिकृत रीत्या राहून जगण्याची उर्मी व प्रेरणा समस्त मिपाकरांना देत आहे. आणि अधिकृत रीत्या आखतात आमचे केरळी बांधव ज्या नरकयातना भोगत ३० ते ३५ वर्ष राहून नियमितपणे भारतात अनमोल असे परकीय चलन पाठवून अर्थ व्यवस्थेला बळ पुरवितात. (त्यांच्याबद्दल काय मत आहे.) हे माझे मत नाही ,मी फक्त निरीक्षण नोंदवले.

In reply to by निनाद मुक्काम …

कथांमधली थीम चांगली आहे पण तपशीलातल्या घोळांची तीव्रता फारच अधिक आहे. १९९७ साली अडीच लक्ष रुपये म्हणजे आजचे (अंदाजे) ७ ते ८ लक्ष रुपये एवढे भांडवल असताना क्युबामार्गे अनधिकृतरीत्या अमेरिकेत जाण्याऐवजी, महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातून आयटी मधला डीप्लोमा, अनुभवाचे प्रमाणपत्र व वर्क व्हिसा मिळवून अधिकृतरीत्या अमेरिकेत पोचता आले असते. नशिबाने साथ दिल्यास कथेचा नायक आज अमेरिकेचा नागरीक असता व श्रीमंत एन आर आय म्हणून गणला गेला असता.

कथाविषय चांगल आहे, गोष्ट रोचक करण्याकरता थोडा अजून प्रयत्न केला पाहिजे होता. गोष्टीचा अजून कल्पनाविस्तार केल्यास मजा येईल. शक्यतो गोष्टीनंतर "बोध काय घ्यावा" हे लिहणे टाळलेत तर उत्तम. मुर्खांसारखे जे "असे असते तर तसे का नाही झाले" विचारत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेही उत्तम.

आज पराची फाऽऽर आठवण येतेय. मिपा अगदी स्वतःच घर असल्यासारख हक्कान त्यांनी समजावल असत, "मंदार कात्रे, तुम्ही छान लिहिता, पण बोर्डावर जरा बाकिच्यांना पण येउ द्या. थोडी जागा शिल्लक ठेवा. तुमच लिखाण आठवड्याला एक अस टाका, म्हणजे आम्हा पामरांना ते वाचुन पचवुन प्रतिसाद द्यायला वेळ मिळेल". हे सार सार सांगायला आमचा लाडका परा कुठे आहे?

In reply to by ५० फक्त

गुलजार नारेची तुमाला परा पेक्षा जास्त आठवण येत असेल नै ;) बाकि ५० रु नी अगदी पन्नास तॉळ्याचे प्रश्न विचारलेत .

माफ करा, पण ह्या कथेत आशाजनक, बोध घेण्यासारखं काय आहे ? परीस्थितीशी झगडून यशस्वी होणा-यांकडून काही शिकावं वाटल्यास, पण कठीण परीस्थितीपासून पळून नैराश्यात जगणा-यांपासून काय शिकावं आम्ही, असं तुम्हाला वाटतं ? बाकी पन्नासरावांशी बाडीस. (अबोध) चिगो..

कथा मुळिच आवडलि नाही. पहिलीतील मुलान्चे धडॅ बरॅ असतात या पेक्शा.

आठवड्याला एक कथा टाका ही सूचना मान्य.............. धन्यवाद! बोध घेण्यासारखे काही नसेल तर एक कथा म्हणून पहा आड्नावावरुन कमेन्ट्स केलेल्या कोणालाही आवड्णार नाही, हे क्रुपया ध्यानात असावे...

In reply to by इनिगोय

तो गाडा आणायला गेलो होतो खरा पण तो धागाचं सापडंना आता. हे लोक्स (संपादक) कधी कशाला उगाचं पंख लावतील नेमचं नाय राह्यला. ;)

In reply to by मंदार कात्रे

इतके संवेदनशील असाल तर इथे कठीण आहे. तरी बरे अजून नावावर कुणी काही कोटी केली नाही ;-)

मंदार स्प्ष्ट सांगतो कथा खुपच सरधोपट आहेत. त्या कथा वाटतच नाहित. सकाळच्या पैलतीर मध्ये अनुभव म्हणुन किंवा लोकमतच्या सातव्या पानावर बातमी म्हणुन खपेल असे वाटते पण याला कथा म्हणणे खुप जीवावर येते आहे. असो. पुलेशु.

In reply to by जेनी...

अहो, ओरिजिनल माल असा आहे तर अलंकारीक व नाट्यमय कसा असेल? फार्तर सलीलचे बाबा सीटी बॅकेची सी इ ओ पोस्ट सोडुन स्वीत्झर्लॅन्डमधे हॉटेल काढतील आणी जर्मन पार्ट्नरकडुन फसवुन घेतील.. वेगळ काय घडणार?

उत्तम !

एका हर-हुन्नरी नवोदित लेखकाची टर उडवण्यासाठी सर्वांनी धावून याव हे पाहून मिपाकर म्हणून शरम वाटली शेम्फुल शाम्पेण

१५००-२००० डॉलर्स !जगण्यापुरते काम ! आयला ... मग आम्ही तर दारिद्र्य रेषेखालीच म्हणायचं असो.. पुढच्या लेख साठी शुभेच्छा

वा वा.. वाचनखुणा खाली साठवला आहे.