Skip to main content

(आपले) स्वातंत्र्य, (इतरांचे) चारित्र्य आणि (तथाकथित) संस्कृती

लेखक रमताराम
Published on शनीवार, 25/08/2012
परवाच फेसबुकवर एका ग्रुपवर नटनट्यांच्या शिर्डीप्रेमाचा विषय निघाला होता. गप्पा तशा खेळीमेळीत चालू असताना अचानक एक नवा सदस्य अवतीर्ण झाला नि त्याने काही स्टेटस् टाकले ते वाचून अख्खा ग्रुप हादरला. एकदोघांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, स्त्री सदस्यांनी त्याच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. परंतु महाराज अजिबात बधले नाहीत. एकामागून एक अशी तिरस्करणीय विधाने करणे चालू होते. यात त्यावर आक्षेप घेणार्‍या सदस्यांवर वैयक्तिक शेरेबाजीही चालू होती. सारा रोख स्त्रियांच्या - चित्रपटात काम करणार्‍या नट्यांच्या - चारित्राबद्दल होता. त्यांची विधाने आठवली तरी अंगावर शहारे येतात. 'असल्या स्त्रिया जवळून जरी गेल्या तरी इतकी घाण येते, म्हणून तर त्या इतक्या मेकअप करतात नि सेंट लावतात.' हे त्यांचे सर्वात सभ्य विधान. यावरून इतर विधानांचा तर्क तुम्ही करू शकाल... खरंतर करू नकाच असे म्हणेन मी. हा प्राणी आहे तरी कोण म्हणून त्यांचे प्रोफाईल पाहता बसलेला धक्का अजूनच तीव्र होता. हे महाराज भारत सरकारच्या न्यायव्यवस्थेमधे न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले होते. म्हटलं वा काय निवड आहे. एकुणच 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं पहायचं वाकून' अशा वृत्तीची बहुसंख्या असलेल्या समाजाला गुन्ह्यांचा निवाडा करायला याहुन अधिक लायक माणूस कुठून मिळणार, नाही का? या साहेबांची वृत्ती खर्‍या अर्थाने आपल्या समाजाची मानसिकतेचे प्रातिनिधित्व करते मला वाटते. कणेकरांनी आपल्या तिरकस शैलीत 'हिंदी चित्रपट ही आपली राष्ट्रीय संस्कृती आहे...' असं म्हटलेलं आहे. ते अक्षरश: खरं आहे. जिवंत असलेल्या नि हाती पैसे असलेल्या प्रत्येकाने हिंदी चित्रपट पाहणे हे रोजच्या जेवणाइतकेच जगण्याचे अविभाज्य कार्य आहे. अशा चित्रपटांशी संबंधित मासिके पाहिली तर आपल्या मनोऽवस्थेची कल्पना येईल. यात चित्रपट व्यवसायासंबंधित व्यक्तींच्याबाबत जो मजकूर छापून येतो त्यात मसालेदार गोष्टी म्हणजे नट-नट्यांची परस्परांवर चिखलफेक, पडद्यामागचे राजकारण आणि अर्थातच कोणाचे कोणाशी जुळले अथवा फाटले, अमक्यांचे लग्न कसे 'ऑन रॉक' आहे वगैरे मजकूर प्राधान्याने असतो. आणि या मासिकांचा इतिहास भारतातील चित्रपटसृष्टीतल्या इतिहासाइतकाच जुना आहे. या असल्या गॉसिप कॉलमचे लेखक समाजात संभावित म्हणून मिरवतात, एखाद्या आणिबाणीच्या प्रसंगी एखाद्या टीवी च्यानेलवर बसून समाजाला शहाणपण शिकवण्याचा अगोचरपणाही करतात. एकुणच लायकी नि प्रातिनिधित्व याचा संबंध या देशात फारसा लागत नसल्याने हा बेशरमपणाही खपून जातो. पण या लेखकांचे सोडा. आपल्या चित्रपटप्रेमींची अवस्था काय वेगळी आहे. आमचा एक जालीय मित्र आहे. बिचारा अधूनमधून एकेका नटीच्या प्रेमात असतो. तिचे फोटो आपल्या वॉलवर चिकट्वत असतो. आम्ही सारे अधूनमधून त्याची माफक चेष्टा करतो. तो ही राजा माणूस ती थट्टा खेळकरपणे घेत असतो. एका नटीचा फोटो बरेच दिवस दिसल्यावर आम्ही त्याला चिडवत होतो 'बाबा रे, एवढी आवडली आहे तर घे उरकून. नुसते फोटो लावण्याऐवजी प्रपोज कर तिला. लगीन कर. म्हणजे आम्हाला फुकटचे जेवण तरी मिळेल.' अचानक एक कॉमेंट आली 'आधी तिची एड्स टेस्ट करून घे रे.' हा दुसरा मित्र एरवी तसा सरळ मार्गी, निदान तसे भासवणारा. समोरच्या त्या स्त्रीच्या चारित्र्याबाबत असे जाहीर विधान करणे यात काही अश्लाघ्य, गैर असे वर्तन करतो आहोत असे त्याच्या गावीही नसेल. खरंतर कायद्यानुसार हा गुन्हा आहे हे त्याला ठाऊक असायला हवे. पण इतरांचे चारित्र्य कःपदार्थ नि आपण घट्ट चाकोरीतून चालतो म्हणून आपण चारित्र्यवान अशी काहीशी समजूत असल्याने नकळे. किंवा समाजात प्रसिद्ध व्यक्तींबद्दल काहीही बोलण्याचा खुला परवाना उरलेल्या क्षुद्र समाजघटकांना असतो असा हाडीमासी नकळत रुजलेला समजही बोलत असेल. चित्रपट नि त्यासंबंधित व्यक्ती हे तरुणाईच्या दृष्टीने रोल-मॉडेल अथवा आपली जीवनशैली कशी असावी याचे प्रतिबिंब अथवा कुठे पोचायचे आहे याचा आराखडा असतो. परंतु जे आपल्या वृत्तीतच आहे ते चित्रपटापुरते मर्यादित कसे राहील? एरवी आपली महान संस्कृती वगैरेच्या गप्पा मारणारे नि त्यासाठी यंव केले पाहिजे नि त्यंव केले पाहिजे वगैरे गप्पा मारणारे लोक जेव्हा 'तू ब्ल्यू फिल्म पाहिली नाहीस, काय खोटं सांगतोयस?' असा अविश्वास दाखवतात तेव्हा त्याच्या आयुष्याचा आराखडा लगेच समजून येतो. जालावर थोड्याफार गप्पांपलिकडे फार मैत्री नसलेली व्यक्ती प्रथमच भेटताना तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चौकशी करते, एखाद्या अविवाहिताला 'तू गे नाहीस ना?' असे बिनदिक्कत विचारते, 'तुम्हाला एक बाई पुरत नाही का?' असे विचारते यात समोरच्यावर आपण अश्लाघ्य आरोप करत आहोत याचा तिला गंधही नसतो. किंबहुना बहुतेकांची प्रतिक्रिया 'यात काय विशेष' अशीच असणार आहे हे ठाऊक आहे. एकीकडे संस्कृतीच्या गप्पा मारायच्या नि लैंगिक शिक्षण या नावानेच बिचकून जाऊन शास्त्रशुद्ध नि तज्ञांकडून माहिती अथवा शिक्षण (जे प्रामुख्याने वाढत्या वयातील शारिरीक मानसिक बदल इ. बाबत असते, संभोगाचे प्रशिक्षण नव्हे) देण्याला विरोध करायचा नि घरात काँप्युटरवर ब्ल्यू-फिल्म्सचा साठा करायचा हा दांभिकपणा आपल्या रक्तातच मुरलेला आहे. मुक्त विचारांच्या नावाखाली इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायची परवानगी मिळाली आहे असा आपला समज आहे का?. अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त आपले नि बंधने तेवढी इतरांना असा आपला समज आहे का? लहान लहान अर्ध्या चड्डीतली पोरे गांधींजींबद्दल गलिच्छ विनोद सांगताना मी ऐकले आहेत. हे विनोद गांधींजींच्या भारतीयांच्या मनातील आदराचे स्थान हिरावून घेऊ पाहणार्‍या संघटनेकडून कसे प्रसृत केले जातात हे मी त्या संघटनेत असतानात स्वतः अनुभवले आहे. आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी आपण किती खाली घसरलो आहोत याची त्यांना जाणीवही नसते (किंबहुना आपण करतो म्हणजे ते श्रेष्ठच असते असा गंडही असतो.) नेहरू म्हटले की फक्त 'एडविना' आठवणारे महाभाग भरपूर आहेत. ही विषवल्ली आपण आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी जरी रुजवली असली तरी मुळातच हा दांभिकपणा महामूर असलेल्या ठिकाणी ही काँग्रेस-गवतासारखी इतर व्यक्तींच्या चारित्र्यावर, वैयक्तिक आयुष्यावर अतिक्रमण करत जाणार आहे हे समजून घ्यायला हवे. अर्थात मुळात ही समज त्यांच्याकडे आहे का, असल्यास त्याबाबत काही करण्याची त्यांची इच्छा आहे का हे प्रश्न आहेत. माझ्यापुरती या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. या संघटनांच्या संदर्भात नि एकुणच भारतीय मानसिकतेच्या संदर्भातही!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 13819
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

वा! साला! हे असलं काही बोलणारा म्हातारा बघितला की आम्हाला कमराद म्हातारा आठवतो!! :)

चित्रपट नि त्यासंबंधित व्यक्ती हे तरुणाईच्या दृष्टीने रोल-मॉडेल अथवा आपली जीवनशैली कशी असावी याचे प्रतिबिंब अथवा कुठे पोचायचे आहे याचा आराखडा असतो. परंतु जे आपल्या वृत्तीतच आहे ते चित्रपटापुरते मर्यादित कसे राहील? अहो मूळ वृत्तीत नाही नसते. ते जर सिनेमातून बघून शिकत असतील तर मग सिनेमावाल्यांवर नियंत्रण नको का? तत्याकथित तरुण पिढी नुसते सिनेमे बघून गोष्टी सोडत नाही. सिने-नट्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही चवीने चघळत असते. आणि तसे वागतही असते. सिनेमावाल्या नट्यांची चारित्र्ये काही सतीसावित्रीसारखी शुद्ध नव्हेत. आणि ज्या लोकांना आपल्या घरातल्या मुलांनी या वातावरणाच्या परिणामचे शिकार होऊ नये असे वाटत असेल त्यांनी या उच्छॄंखल पणाला विरोध केला तर त्यात चुकीचे काय. का स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वच स्त्रियांनी वेश्या बनावे आणि पुरुषांनी दलाल किंवा भोक्ते. आता या कमी उत्पन्नगटातल्या लोकांच्या भावना अनावर होऊन त्याची परिणती जी बलात्कारात होते त्याची सुरुवात या सिनेमातच नाही का? आम्हालाही सिनेमानट्या नट कधीही अनुकरणीय वाटले नाहीत. पण त्याचा मारा ज्या पद्धतीने होत आहे त्यात विनाशाचीच बिजे आहेत. जे प्रामुख्याने वाढत्या वयातील शारिरीक मानसिक बदल इ. बाबत असते, संभोगाचे प्रशिक्षण नव्हे अहो त्याची परिणती १२-१३-१४ वर्षांच्या मुलांमधे सुरु झालेल्या संभोगातच झाली. ज्या तथाकथित प्रगत देशांनी हा मार्ग अवलंबिला तिथला डेटा बघा. . मुक्त विचारांच्या नावाखाली इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायची परवानगी मिळाली आहे असा आपला समज आहे का?. अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त आपले नि बंधने तेवढी इतरांना असा आपला समज आहे का? नाही मग हा प्रश्न उलटा नाही का विचारला जाऊ शकत. मॉरल पोलिसिंग म्हणून बोंब मारणार्‍यांनी पेठकर काकांसारख्या सभ्य माणसाने केलेल्या व्यावहारीक उपदेशावर काय मुक्ताफळे उधळली होती ते पहावे. हे अँटीमॉरल पोलिसिंग नाही का?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वच स्त्रियांनी वेश्या बनावे आणि पुरुषांनी दलाल किंवा भोक्ते. आता या कमी उत्पन्नगटातल्या लोकांच्या भावना अनावर होऊन त्याची परिणती जी बलात्कारात होते त्याची सुरुवात या सिनेमातच नाही का? प्रचंड असहमत. सिनेमे यायच्या आधी बलात्कार होत नव्हते का? मी काही फार सिनेनट नट्यांची बाजु योग्यच आहे असं म्हणत नाही पण तुमचं वरचं विधान भयंकर आहे. स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या सगळ्या स्त्रिया वेश्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे असं दिसतंय. याची परिणती १२-१३-१४ वर्षांच्या मुलांमधे सुरु झालेल्या संभोगातच झाली. ज्या तथाकथित प्रगत देशांनी हा मार्ग अवलंबिला तिथला डेटा बघा. वरीलप्रमाणेच बेजबाबदार/ वैचारीक मांद्य दाखवणारं विधान.

In reply to by शिल्पा ब

दोन अपेक्षित प्रतिसाद. धाग्यातील मुद्द्यांना एवढ्या लवकर सिद्धता मिळेल याची खुद्द आम्हालाही खात्री नव्हती. धागा काश्मीरच्या मार्गावर वळवून नेऊन आम्हाला भरपूर प्रतिसाद मोजता येतील याची सोय केल्याबद्दल तुम्हा दोघांना दीर्घ आयुरारोग्य लाभो ही त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना.

In reply to by रमताराम

एकतर पुपेंच्या जे काय लिहिलंय त्याला उत्तर द्यायला हवं होतं म्हणुन दिलं, कारण मला ते महत्वाचं वाटलं. तुमचं काय ते "खेळीमेळीत " नटनट्यांच्या चारीत्र्याबद्दल काय ते वाद चालु द्या.

In reply to by शिल्पा ब

वरीलप्रमाणेच बेजबाबदार/ वैचारीक मांद्य दाखवणारं विधान. असुदे. तुमचा तोल गेलेला दिसत असल्याने प्रतिसादाचे कष्ट घेत नाही.

In reply to by सस्नेह

असो तुमची प्रगल्भता तुम्हाला लखलाभ असो. अतिस्वातंत्र्यासाचे चोजले आणि कुरवाळणे चालूद्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुपे ना अनुमोदन वैचारीक मांद्य हा शब्द आवडला. पेठकर काकांच्या व्यावहारीक उपदेशावर उधळलेली मुक्ताफळे हे वैचारीक मांद्याचे सर्वोत्कॄष्ट उदाहरण होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अहो त्याची परिणती १२-१३-१४ वर्षांच्या मुलांमधे सुरु झालेल्या संभोगातच झाली. ज्या तथाकथित प्रगत देशांनी हा मार्ग अवलंबिला तिथला डेटा बघा.
इथे तुमचं काहीतरी चुकतं आहे असं वाटतं. १२-१३-१४ वर्षांच्या मुलींशी संभोग करण्याची प्रथा तुमच्या पेशवाईपासून (किंबहुना त्याही आधीपासून) चालू आहे. ती पुरातन भारतीय परंपरा गेल्या काही दशकांत पाश्चात्यांच्या अंधानुकरणापायी मोडली जाऊन, लग्नाची वयं १८-२०-२२-२४ वगैरे व्हायला लागली. पाळी यायच्या आत पोरींना उजवण्याऐवजी त्यांचे बाप त्यांना शिकवायला लागले. मग हळूहळू त्याची परिणती त्या मुली नोकऱ्या करून 'आवस वाढा गो माय' अशी प्रेमाची आणि इष्काची भीक मागायला लागल्या. सगळी संस्कृती रसातळाला चालली आहे, दुसरें कांय! शिव शिव शिव...

In reply to by राजेश घासकडवी

इथे तुमचं काहीतरी चुकतं आहे असं वाटतं. १२-१३-१४ वर्षांच्या मुलींशी संभोग करण्याची प्रथा तुमच्या पेशवाईपासून (किंबहुना त्याही आधीपासून) चालू आहे. ती पुरातन भारतीय परंपरा गेल्या काही दशकांत पाश्चात्यांच्या अंधानुकरणापायी मोडली जाऊन, लग्नाची वयं १८-२०-२२-२४ वगैरे व्हायला लागली. पाळी यायच्या आत पोरींना उजवण्याऐवजी त्यांचे बाप त्यांना शिकवायला लागले. मग हळूहळू त्याची परिणती त्या मुली नोकऱ्या करून 'आवस वाढा गो माय' अशी प्रेमाची आणि इष्काची भीक मागायला लागल्या. अंबळ गल्लत होते आहे का? लग्नाची वयं १८-२०-२२-२४ वगैरे व्हायला लागली पण संभोगाचे वय कायद्याने १६ आहे असे जालावर वाचल्याचे वाटले. आणि आमच्या पेशवाई संस्कृतीत १२ वर्षाची कवळी म्हणत नसत १६ वर्षाचीच म्हणत असत. संस्कॄतात देखील शोडषा असेच वाचल्याचे आठवते. धाकलया बाजीरावास त्याच्या कजाग आईने आनंदीबाईने " त्याच्याच तेरा वर्षाच्या बायकोबरोबर संभोग केल्याकारणे जमिनीवर आडवा पाडून लाथेने मारले होते" असे वाचल्याचे पक्के स्मरते. आणि हो आता बापच शिकवू लागल्याने पित्याच्या मार्गदर्शनाखाली? संभोगाचे वय १२-१३ होईल. आणी हो स्वातंत्र्यवाद्यांनुसार लग्नंसंस्थाच अस्तित्वात राहणार नाही त्यामुळे लग्नाचे वयाचा प्रश्नच नाही. सगले कसे छान छान होईल.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

त्या काळीच नव्हे, तर त्या काळच्या कितीतरी आधीपासून आणि नंतरही मुलींची १२ वर्षाच्या आत लग्नं व्हायची. जरा इतिहासाचा अभ्यास वाढवा. अगदी १८९१ पर्यंत ११ वर्षांच्या मुलीशी संभोग समाजाला मान्य होता. http://en.wikipedia.org/wiki/1891_Age_of_Consent_Act
धाकलया बाजीरावास त्याच्या कजाग आईने आनंदीबाईने " त्याच्याच तेरा वर्षाच्या बायकोबरोबर संभोग केल्याकारणे जमिनीवर आडवा पाडून लाथेने मारले होते" असे वाचल्याचे पक्के स्मरते.
धाकला बाजीराव म्हणजे दुसरा बाजीरावच का? वा, काय पण नामी माणूस शोधलात उदाहरण द्यायला!
आणि हो आता बापच शिकवू लागल्याने पित्याच्या मार्गदर्शनाखाली? संभोगाचे वय १२-१३ होईल.
अरेरेरेरे... हे अत्यंत खालच्या दर्जाचं वाक्य आहे. कितीही पांढऱ्या रंगात लपवलं तरीही.

In reply to by राजेश घासकडवी

ते "पित्याच्या मार्गदर्शनाखाली" वगैरे वक्तव्य अंगावर पाल पडल्यासारखे अभद्र वाटले, ओंगळवाणे वाटले. जरी पुपेंनी निषेधात्मक ते वक्तव्य केले असले तरी हे नमूद करु इच्छिते.

In reply to by राजेश घासकडवी

+१ लोकांना सेक्स एजुकेशन म्हणजे "पेनिट्रेशन कसं करावं याचं शिक्षण आहे " असं वाटत असेल बहुदा. त्याशिवाय अशा प्रतिक्रियांचा अर्थ समजत नाही. शास्त्रीय कारण, कृती अन त्याचे परीणाम या अंगाने हा विषय समजुन देत असावेत. कारण त्याशिवाय कोणतेही गव्हर्नमेंट, शाळाखाते अशा शिक्षणाला होकार देणार नाही ही खात्री आहे. शाळेत असताना ८ ते१० वीच्या मुलींसाठी "पाळी " या विषयावर काही डॉक्टरांनी येउन शिक्षण दिले होते ज्यात शरीररचना, पाळीचे कारण, नक्की काय होते वगैरे माहीती होती.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>आता या कमी उत्पन्नगटातल्या लोकांच्या भावना अनावर होऊन त्याची परिणती जी बलात्कारात होते त्याची सुरुवात या सिनेमातच नाही का? तुमची लिहण्यात की माझी समजण्यात चुक होते आहे? तुमच्या सिनेमांबद्दलची मते याविषयी माझे काही म्हणणे नाही पण पुपे, कमी उत्पन्नगटातले (पक्षी: गरीब) लोक सिनेमे पाहून बलात्कार करत सुटतात हे काही योग्य वाटत नाही. सिनेमा एक कारण आहे असे समजले तरी आर्थिक स्थिती व वासनांध असणे हे सरळ-सोपे समीकरण पटत नाही. गरीब असलाच तर तो या संबंधात संस्काराने , सारासार विचाराने, विवेकाने गरीब व्यक्ती असतो असे म्हणतो. धनदांडगे शब्दप्रयोग उगाच निर्माण झाला नाही. बलात्कारी पुरुष हे योग्य संस्कार नसलेले, दुसर्‍याच्या स्वातंत्र्याची, इच्छेची कदर नसलेले, आपल्या लैंगिक भूकेखातर माहित असूनही अनैतिक व बेकायदा कृत्य करायला निर्ढावलेले निर्लज्ज असतात. त्यांना पैशाने गरीब, श्रीमंत लेबल लावण्याशी संबध नाही. बलात्कार एक घृणास्पद प्रकार आहे व बलात्कारी इसम हा आपल्या हीन कृत्याचे खापर सिनेमा, आर्थिक परिस्थिती यावर फोडू शकत नाही. लैंगिक गुन्हे हा एक हीन प्रकार व वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पडद्यावर एखाद्या व्यक्तीने लैंगिकतेचे/कामुकतेचे प्रदर्शन केले म्हणुन ते बघणार्‍याला अन्य कोणावर बलात्कार करायला आपोआप प्रोत्साहन/ हक्क/परवाना/ नाईलाज असतो हे अमान्य आहे. असो. तुमचे वाक्य मला पटले नाही म्हणुन हा प्रतिसाद.

In reply to by सहज

धन्स. सहजराव. प्रतिसादाशी १०० टक्के सहमत. -दिलीप बिरुटे

शीर्षकातील कंस आवडले. शेवटच्या परिच्छेदाच्या आधीपर्यंत लेखन संतुलीत. शेवटच्या परिच्छेदात एका विशिष्ट संघटनेला लक्ष्य करीत तोल घालवला. ती एकच संघटना डोळ्यांसमोर ठेवून आधीची प्रस्तावना केली, असे लेखन झाले. दांभिकपणा ही काही त्या संघटनेची 'मक्तेदारी' नाही. त्यामुळे बिका म्हणाले तसा कमराद न दिसता, 'कॉम्रेड'च ठळक झाला.

In reply to by श्रावण मोडक

मान्य. मात्र, हे थोडं वेगळ्या अंगाने घेतल्यामुळे असं दिसतंय. माझ्या डोळ्यासमोर मात्र एकदम डिसिल्वाला, बावाजीला आणि पांगळ्याला खडे बोल सुनावणारा कमराद म्हाताराच आला. म्हणून ते तसं लिहिलं आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्हाला दिसलेला कमराद मला कॉम्रेड दिसण्याचं कारण शेवटचा परिच्छेद. त्यामुळे तुमचे म्हणणे बरोबर!

In reply to by श्रावण मोडक

शीर्षकातील कंस आवडले. शेवटच्या परिच्छेदाच्या आधीपर्यंत लेखन संतुलीत. धन्यवाद मालक. शेवटच्या परिच्छेदात एका विशिष्ट संघटनेला लक्ष्य करीत तोल घालवला. ती एकच संघटना डोळ्यांसमोर ठेवून आधीची प्रस्तावना केली, असे लेखन झाले. अहं. शेवटचा परिच्छेदात विशिष्ट संघटना आपल्या कर्माने आली असे म्हणावे लागेल. आपलं त्यांचं काही वैर नाही. असतं तर थेट नाव लिहून दोन हात केले असते. मुळात शेवटचा परिच्छेद हा या प्रवृत्तीचे वैयक्तिक पातळीवरून संघटना पातळीवर होणारे संक्रमण दाखवण्यासाठी आलेला आहे. ही प्रवृत्ती वैयक्तिक पातळीवर न राहता संघटनाच्या पातळीवरही उतरते, एवढेच नव्हे तर त्याचा जाणीवपूर्वक हत्यार म्हणूनही वापर होऊ शकतो हा मुद्दा आहे. आता या चारित्र्यहननाची परमावधी म्हणजे सर्वात अधिक पूजनीय व्यक्तीचे चारित्र्यहनन. 'माझ्यापुरते' या देशातील सर्वात पूजनीय व्यक्तिमत्त्व म्हणजे 'महात्मा गांधी'. त्यामुळे म्हणून त्यांच्या चारित्र्यहननाचे उदाहरण मी निवडणार आणि त्यामुळे अपरिहार्यपणे त्यांच्या विरोधकांचे वर्तनावर कमेंट येणार हे ओघाने आलेच. त्या संघटनेवर टीका करण्यापेक्षा त्या वृत्तीवर टीका करणे हा हेतू असल्याने त्यांचे नाव लिहिणेही महत्त्वाचे नव्हते. त्यांच्यावर टीका करायसी असेल तेव्हा थेट नाव घेऊन करू, हाकानाका. यात तुम्हाला आमच्यात एखादा कॉम्रेड का दिसला कोण जाणे .(मुळात त्या संघटनेचे विरोधकदेखील सारेच कॉम्रेड असतात असे थोडेच आहे.) आम्हाला कॉम्रेड म्हणा, महामहोपाध्याय, वेदशास्त्रसंपन्न, वगैरे म्हणा की स सायलेंट असलेला समाजवादी, आम्हाला फारसा काही फरक पडत नाही. आमच्या खांद्यावर कोणताच झेंडा नाही त्यामुळे कोणत्याही झेंड्याचे सूत सूक्ष्मदर्शकाखाली ठेवायला आम्हाला कोणाचीही आडकाठी नाही. दांभिकपणा ही काही त्या संघटनेची 'मक्तेदारी' नाही. अगदी खरं. कॉम्रेडांचा दांभिकपणाही आम्ही चांगलाच ओळखून आहोत की.

In reply to by रमताराम

गांधींवर टीका करणारे केवळ त्या संघटनेचे नाहीत. त्या संघटनेच्याच भाषेत गांधींविषयी बोलणारे इतरही संघटनावाले/पक्षवाले आहेत. आफ्रिकेत रेल्वेच्या ज्या डब्यातून गांधींना बाहेर फेकले गेले तो प्रथम श्रेणीचा डबा होता, असे सांगत त्या अनुषंगाने गांधींच्या संदर्भात खिल्ली उडवणारे आहेत. गांधीच सर्वाधिक सनातनी कसे हेही सांगणारे आहेत. आता हे सारे तुम्हाला माहिती आहेतच. तरीही, तुम्ही गांधींचे विरोधक म्हणून एका विशिष्ट संघटनेचाच उल्लेख केलात हे खटकले. त्याही पलीकडे, गांधी तुम्हाला पूजनीय असोत वा नसोत, त्यांचे चारित्र्यहनन होण्याचे कारणच नाही. म्हणजे, तुमच्या संपूर्ण लेखात इतरही व्यक्तींना जो न्याय तुम्ही लावता आहात (आणि त्याच्याशी मी सहमत आहे) तोच न्याय गांधींना लावला गेला पाहिजे. जे गांधींचे, तेच सावरकरांचे. त्यांच्या रत्नागिरीतील वास्तव्याबाबत कुजबूज करणारे आहेतच. ते काही वेगळे नाही. संघटनेचे नाव तुम्ही घेतले पाहिजे असे नाहीच. नाव लपवूनच बरंच काही सांगता येतं. तरीही, इथं नोंद असावी म्हणून माझ्या मनातले नाव लिहितो - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचा परिवार हा त्या परिच्छेदात लक्ष्य झाला आहे. संघ परिवार असा ओझरता लक्ष्य करण्यालाही माझी हरकत आहे. तो समग्रपणे टीकेचाच विषय आहे. मक्तेदारी नाही या मुद्यावर सहमती असल्याने बाकी भिन्न मते कायम ठेवून रजा घेतो. :-)

In reply to by श्रावण मोडक

तरीही, तुम्ही गांधींचे विरोधक म्हणून एका विशिष्ट संघटनेचाच उल्लेख केलात हे खटकले मोडक, तुम्हाला मागचा प्रतिसाद वाचूनही हाच मुद्दा धरून ठेवायचा असल्यास माझीही ना नाही. उत्तर सोपंय ना, मी स्वत: त्या संघटनेत होतो, त्यामुळे जे आहे त्याबाबत माझा स्वतःचा अनुभव असल्याने मी त्याबद्दल बोलू शकतो. ज्यांच्याबाबत मी ते अनुभवले नाही त्यांच्याबाबत मी बोलणे म्हणजे पुन्हा माझ्या धाग्याच्या मुद्द्याचे मीच सिद्धता होणे आहे. त्याही पलीकडे, गांधी तुम्हाला पूजनीय असोत वा नसोत, त्यांचे चारित्र्यहनन होण्याचे कारणच नाही. म्हणजे, तुमच्या संपूर्ण लेखात इतरही व्यक्तींना जो न्याय तुम्ही लावता आहात (आणि त्याच्याशी मी सहमत आहे) तोच न्याय गांधींना लावला गेला पाहिजे. लावू नका असं कुठं म्हटलंय. मोडक, मुद्दा त्यांच्या कर्तृत्वाच्या मूल्यमापनाचा नाही, त्यांच्या चारित्र्याबद्दल अश्लाघ्य विनोद पसरवण्याच्या बाबत आहे. जसे नट्यांबाबत असे घडू नये असे म्हणतो मी तेव्हा तोच न्या गांधींना का लावू नये, तोच न्याय अटलजींना का लावू नये, तोच न्याय सुभाषबाबूंना का लावू नये (आता ही तीन उदाहरणे ती विचारधारेचे प्रतिनिधी म्हणून घेतली आहे, त्यावर आणखी विषयांतर नको) असेच तर म्हणतोय मी. मुद्दा चारित्र्यहननाचा आहे, ते करणार्‍यांच्या प्रवृत्तीचा आहे. इथे गांधींचे उदाहरण मी घेतले कारण माझ्यादृष्टीने ते मोठे, त्यांची विरोधी संघटना हाच मुद्दा मांडताना त्यांच्या त्यांच्या मोठ्या व्यक्तीचे उदाहरण घेईल. इतके साधे आहे हे. मुद्दा सोडून तपशीलावर भटकणे हा प्रकार तुमच्याकडून अपेक्षित नाहीच, मागच्या प्रतिसादातील पूर्ण खुलाशानंतरही हा प्रश्न यावा याचे अधिकच आश्चर्य वाटले. संघटनेचे नाव तुम्ही घेतले पाहिजे असे नाहीच. नाव लपवूनच बरंच काही सांगता येतं. तरीही, इथं नोंद असावी म्हणून माझ्या मनातले नाव लिहितो - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचा परिवार हा त्या परिच्छेदात लक्ष्य झाला आहे. संघ परिवार असा ओझरता लक्ष्य करण्यालाही माझी हरकत आहे. तो समग्रपणे टीकेचाच विषय आहे. नक्कीच. तुमच्या मनात काय नाव यावे हा तुमचा प्रश्न. मला विचारले तरी मी सांगणार नाही असेही नाही. पण आणखी एकदा सांगतो 'संघटनेवर टीका करणे हा माझा उद्देश नाहीच. जेव्हा असेल तेव्हा नाव लपवणार नाहीच. इथे मुद्दा चारित्र्यहननाची वृत्ती व्यक्तिगत पातळीवरून संघटना पातळीवर नेणे अशी आहे' याचे एक प्रातिनिधिक उदाहरण -जे माझ्या अनुभवातले आहे म्हणून, सांगोवांगीचे मी का लिहू? - घेतले आहे. ते तुम्हा आरएसएसचे वाटो, युक्रांदचे कि स्टुडंट्स फॉर जस्टिसचे, मला काय त्याचे? न पटणार्‍या मुद्द्यावर संघावरही टीका करायची तेव्हा करतोच. इथल्या संघांशी संबंधित व्यक्तींना ते चांगलेच ठाऊक आहेच. जिथे वृत्तीबद्दल आक्षेप आहे नि संघटनेबाबत नसेल तर उगाच व्यक्ती विरुद्ध संघटना हा वाद का निर्माण करावा (जसा इथे तुमच्या दोन प्रतिसादांमुळे विनाकारण निर्माण झाला आहे.) माझे मुद्दे मी सहसा घट्ट धरून ठेवतो, विनाकारण भरकटू देत नाही. I am responsible for what I say, not for what you understand. हे मला तंतोतंत पटते. आताच लेखाचा मूळ मुद्दा वगळून भलत्याच दोन मुद्यांवर प्रतिसाद आलेले आहेत यात माझ्या लिखाणापेक्षा समोरचा त्यात काय पाहतो याचा मुख्य हातभार आहे हे नोंदवतो नि रजा घेतो.

In reply to by रमताराम

मोडक, तुम्हाला मागचा प्रतिसाद वाचूनही हाच मुद्दा धरून ठेवायचा असल्यास माझीही ना नाही.
"मक्तेदारी नाही या मुद्यावर सहमती असल्याने बाकी भिन्न मते कायम ठेवून रजा घेतो." असे मी मागल्या प्रतिसादात याचसाठी लिहिले होते.
...लावू नका असं कुठं म्हटलंय.
तसं तुम्ही म्हटलेलं नाहीच. मी ते अतिरिक्त लिहिलं आहे. तसा खुलासा करावयास हवा होता.
I am responsible for what I say, not for what you understand.
इथं चर्चा संपते.

In reply to by रमताराम

असो.. यात नवल काही नाही :) दुसर्‍या एका जालावरील रमताराम या आय्डी चे हे वाक्य - " सदर प्रश्नाला राष्ट्रीय दृष्टिकोनातून न पाहता धर्माधारित संघर्षाचे रूप दिल्याबद्दल भाजप नि भाजपच्या तथाकथित समाजसेवी परिवारावर अप्रत्यक्ष टीका करतील." असो..

In reply to by आनन्दा

आनन्दा, प्रयत्न चांगलाय. नाही म्हणजे चुका काढण्यासाठी कष्ट चांगले घेताय. फक्त तो धागा कुठला ते ही सांगा नि ते मुद्दे कोणाच्या तोंडून येणार याचा स्पष्ट उल्लेख धाग्यातच आहे हे ही. अन्य कोणी काय बोलणार तेव्हा ते त्या त्या व्यक्तीच्या विचारधारेच्या, भाषेच्या स्वरूपातच लिहिले जाते हे आधी ठाऊक नसेल तर इथे समजून घ्यायला हरकत नाही. पुन्हा एकदा विषयांतराचा चांगला प्रयत्न, माझ्याकडे डाळ शिजत नाही पण! धाग्याच्या शीर्षकात आधीच चारित्र्य(!) असा शब्द आहे, याचे एक्स्ट्रापोलेशन (व्याप्ती विस्तार) म्हणून माझा लेख फारतर खासगी आयुष्याबद्दल बोलतो आहे. अन्य चार जणांना प्रतिसाद देताना वारंवार खासगी जीवन नि सार्वजनिक जीवन याबाबत फरक नोंदवून झाला आहे. तुमचा प्रतिसाद एकतर हे न समजल्याचे लक्षण दर्शवतो किंवा (कदाचित 'आपल्या' जिव्हाळ्याचा संघटनेवर टीका झाली असा 'समज' झाल्याने) तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून काहीही करून रमताराम कसे दांभिक आहेत हे सिद्ध करण्याचा आटापिटा करण्याचा. एकदा शेवट्चे लिहितो: धागा चारित्र्य किंवा खासगी जीवनाबद्दल आहे, पुन्हा एकवार कुणी इतर कुणाच्या सार्वजनिक/व्यावसायिक जीवनाबद्दलचे माझे विधान इथे आणून मी कसा दुटप्पी वगैरे सांगू पाहिल त्या सार्‍यांना वाढदिवसाच्या शुभेछा आधीच देऊन ठेवतो.

In reply to by रमताराम

आपलं त्यांचं काही वैर नाही. असतं तर थेट नाव लिहून दोन हात केले असते????????????

+१००१ "किंवा समाजातील प्रसिद्ध व्यक्तींबद्दल काहीही बोलण्याचा खुला परवाना उरलेल्या क्षुद्र समाजघटकांना असतो असा हाडीमासी नकळत रुजलेला समजही बोलत असेल" कुत्रे भुंकतातच.फक्त त्यांना आपण हत्ती नसून कुत्रे आहोत याची जाणीव नसते. इतरांचे अज्ञान हे आपल्या दु:खाचे कारण होऊ देऊ नये असे कुणीसे म्हटले आहे.

बरीच वर्षे झाली, नुकतीच नोकरी लागली होती. नोकरीमध्ये कंपूबाजी, राजकारण सर्व काही नवे होते. नवख्या डोळ्यांनी सारे टीपून घेत होते. नुकतीच घरट्याबाहेर पडल्याने , अजून तरी निगरगट्ट बनायचे होते. असो. तर, जेवणाच्या वेळेला सर्वजणी आम्ही डबा खात होतो आणि काही बोलता बोलता चर्चेचा तोलच बिघडला. एका गैर-महाराष्ट्रीअन (होय आय वॉन्ट टू इन्सिस्ट) सहकारी स्त्रीने बाळासाहेब ठाकर्‍यांबद्दल अतिशय अर्वाच्च्य , सवंग , चारीत्र्यहनन करणारे विधान, केले. मी डबा टाकून तडक उठले. ते विधानाच्या सत्यासत्यतेचा पडताळा या मूर्ख बाईने केला होता का? कोणी तिला हक्क दिला अशी बेजबाबदार विधाने भर पब्लीकमध्ये करण्याचा? क्षात्र तेजाची कमीच आमच्यात की तिची जीभ हासडून नाही दिली. मुकाट्याने हृदयात भळभळणारी जखम घेऊन कासवासारखी अधिक स्वतःच्या कोषात गेले, लोकांपासून ४ हात दूर रहायला शिकले पण मनाशी खूणगाठ बांधूनच.

खास शंभरी गाठण्यासारखा विषय. माझी एका धावेची भर. "स्त्रीचे दुय्याम स्थान" वगैरे बद्दल मारामारी होणार आहे, अपेक्षित आहे की "बघा कसे सात्विक सोज्वळ सिने नट नट्यांबद्द्ल वाईट बोलताहेत" असे साम्गायचे आहे हे समजले नाही.. . एकूणातच सेलिब्रिटिंबद्दल "विषयसुखाला हपापलेले " अशी प्रतिमा आहे. ती त्यातीलच कित्येकांनी प्रस्रुत केली आहे. त्यात स्त्री- पुरुष अस भेद नाही. . "सेलिब्रिटिंबद्दल वाईट बोलणे जाणे " हा ही मुद्दा नसावा. पुधे विस्तारित प्रतिक्रिया:- . सारा रोख स्त्रियांच्या - चित्रपटात काम करणार्‍या नट्यांच्या - चारित्राबद्दल होता. चारित्र नव्हे हो "चारित्र्य" . आपल्या चारित्र्याबद्दल बाहेर जाणारे बहुतांश मेसेज हे सिने नट नट्या स्वतःहून पसरवत नाहीत का? "स्फोटक बाइट्स" हे स्वतःच देत नाहीत का? आपल्याला पब्लिकनं "बोल्ड" सम्जावं ह्याची ते काळजी घेत नाहीत का? आता ते बोल्ड असतीलही. त्यांना तसे राहायचे स्वातंत्र्य असेलही. पण कुणाला तरी ते चूक वाटत असेल तर चूकीला चूक म्हणायचे स्वातंत्र्यही आहेच की. वर पुन्हा "बघा हो बघा. आम्हाला कसे घाण घाण म्हणतात हे" असली काही बडबडही अधूनमधून सिने नटनठ्या करुन (आजच्या भाषेत "सेलिब्रिटिज्" ) घेतात. बरं, आपली प्रत्येक गोष्ट पब्लिकनं सिरियसली घ्यावी अशी अगदि मनातून नसते का इच्छा ह्यांची? नेहा धुपियाने आपल्या सुडौल आकाराच्या नितंबांचा विमा का इन्श्रन्स उतरवला म्हणे. बरं, ही माहितीही जर प्रसिद्धी माध्यमात येणार असेल, आणि तिला आपल्या नितंबांच्या सौदंर्याबद्दल जाहिर कौतुक वगैरे व्हावेसे वाटत असेल तर कौतुकाऐवजी टिकाही होइलच की. "छे छे , हे काय आहे वगैरे" पण अशी अ‍ॅण्टिपब्लिसिटी तर त्यांना अजूनच हवीहवीशी वाटते की नाही. एक तर ह्यांचा मुख्य उद्योग दिवसभर पार्ट्या करणे, धुंदित बेहोश होउन विमुक्त आयुष्य जगणे आहे की काय असे वाटते. सतत फेसाळत्या बियरसमवेत वगैरे ह्यांचे फोटो. दर दिवसाआड टाइअम्स ऑफ इंडिया वगैरे मध्ये ती कुठली तरी ह्य मॉडेलिंगवगैरे वाल्यांची पानेच्या पाने बह्रुन चमचमीत वर्णने असतात. फिल्म फेअर वगैरे सारखी श्कडो गॉसिप मॅगझिन्स असतात . ती ह्यांच्या इंडस्ट्रीचा अविभाज्य भाग बनलीत,. ती ह्यांच्यापासून वेगळी नाहित. म्हणजे छापयचे त्यांनी, पण त्यांनी छापलेल्या घटना कुणाला विचित्र वाटल्या तर त्याने बोंबही मारायची नाही का? . आमचे काही दिव्य रूममेट्स सदैव त्या पुरवण्या बघून "ढिमका पार्टी में अदिती कश्यप को नही बुलाया ये अच्छा नही लगा" किम्वा "नूरी शर्मा ने कल जो ब्लॅक टॉप और ब्लू नेल पेंट्स लगाके आदेश श्रीवास्तव की पार्टी में जो पोझ दी है उस्का जवाब नही" असे काही अगम्य बोलू लागले की कान किटतात. मुदलात ही नाव घेतलेली मंडळी कोण हेच ठाउक नाही, त्यांच्या नितंबांविषयी आम्ही चर्चा का करावी हे ही मला समजत नाही. आम्ही कराविशी त्यांना वाटत असेल आणि आमच्यातलेच काही करतही असेतील तर त्याम्ना का थांबवायचे हे ही सम्जले नाही. "राखी सावंत" नावाचा एक प्रकर सध्या अस्तित्वात आहे म्हणे. असू देत बापडा. त्यानं काय करावं हे त्याचं स्वातंत्र्य आहे. नाही ते धंदे करायला नाही अडवू शकत आम्ही. पण लागलिच "मी भल्तीच सात्त्विक हो. असे कसे बोललात मला.समजता तरी काय." असे कुणी बडबडू लागले तर नक्की काय म्हणावे हेच समजत नाही. आम्ही आपले गपगुमान खालमनाने चालू पडतो. . बाकी कोण कुठल्या माणसाने काय विधाने केलीत ते ठाउक नाही, तुम्ही इथे का मांडलत तेही समजलं नाही. . गॉसिप कॉलमचे लेखक समाजात संभावित म्हणून मिरवतात मिरवू देत की. तुम्ही गॉसिपकॉलमवाल्यांचे चारित्र्य वाईट वाईट असते असे सूचित करताय का? आता हे जनरलायझेशन नाय झालं का? आँ? ह्यांना कित्येक बातम्या स्वतः स्टार्सच पुरवतात ही वस्तुस्थिती आहे. उग्गाच्या उगाच स्टार्स हे विक्टीम आणि समाज्/मासिक हे अत्याचारकर्ते असे चित्र का रंगवले जाते. स्टार्सनाही हे सगळे हवेच असते की. त्यासाठी गलेलठ्ठ पगार देउन काही मॅन्जर्सची टीमही सतत तयार असते. . 'आधी तिची एड्स टेस्ट करून घे रे. "पत्रिका, कुंडल्या सोडा.लग्नापूर्वी एड्सची चाचणी करा" असा आग्रह कित्येक एन्जीओ, खुद्द सरकारच करते. विधानात काय चूक हेही समजले नाही. शिवाय एड्स क होतो ह्याच्या जनजागृती मोहिमेतूनही लागलिच "जोडिदाराशी एकनिष्ठ नसल्याने एड्स संभवतो. (नैतिकदृष्ट्या योग्य आहे म्हणून नव्हे तर स्वतःचा जीव वचवण्यासाठी तरी )एकनिष्ठ रहा." असा मेसेज खुद्द सरकारी यंत्रणा देतात. "भली माणसे" समज्ली जाणारी एन जि ओ ची कर्यकर्त्यंची फौज देते. all celebrities are sex starved creatures. ही प्रतिमा स्वतः सेलिब्रिटिज पसरवत असतील तर हा सल्ला देण्यात काय चूक? त्यांचं ते मुक्त, स्वच्छंद, जुनाट माणसाला स्वैराचार वाटेल असं आयुष्य हेच लोक पब्लिश करत असतात. ह्यात उगीच "तथाकथित जुनाट्,बूर्झ्वा भारतीय संस्कृती, दुय्यम स्त्री" असले काहीही नाही. एखाद्य मुलींच्या ग्रुपमध्ये एखाद्या मुलीने अजूनही अविवाहित म्हणवून घेणार्‍या थोराड ,टोणग्या टायगर म्हणवून घेणार्‍या खानासोबत जायची इच्छा व्यक्त केली तरी "एड्स ची चाचणी करुन घेणे " हा सल्ला कायमच राहतो की. म्हणजे लिंग भेद वगैरे काही नाही. . खुला परवाना उरलेल्या क्षुद्र समाजघटकांना असतो असा हाडीमासी नकळत रुजलेला समजही बोलत असेल. कुणाला क्षुद्र म्हणताय भौ? एकापेक्षा दुसरा उच्चासनावर आता तुम्हीच बसवलात की. आधीचे मोरल पोलिस नैतिकतेचे डोस देत उच्चासनासनावर बसयचे. आता इतरांना क्षुद्र म्हणणारे तुम्ही कोण ??? एखाद्याकडे पुरेसा पैसा नसेल तर तो क्षुद्र का? तुम्ही जर त्या न्यायाधिआबद्दल बोलत असाल तर तुमचे विचार ज्याला पटत नाहीत तो क्षुद्र असे म्हणताय का? वा रे वा. . जालावर थोड्याफार गप्पांपलिकडे फार मैत्री नसलेली व्यक्ती प्रथमच भेटताना तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चौकशी करते, एखाद्या अविवाहिताला 'तू गे नाहीस ना?' असे बिनदिक्कत विचारते, 'तुम्हाला एक बाई पुरत नाही का? झाट काही संदर्भ लागला नाही. ' असे विचारते यात समोरच्यावर आपण अश्लाघ्य आरोप करत आहोत अर्र र्र... ररा, ही गोष्ट संस्कृतीरक्षकांना विचारली गेल्यास त्यांना अश्लाघ्य वगैरे आरोप वाटायला हवा. तुम्ही ते ह्या घाणेरड्या विचारांच्या डबक्यातून बाहेर पडलेलात ना? तुमच्यासाठी "कुनालाही काहीही करण्याचे स्वातंत्र्य आहे , लैंगिक ओरिएंटेशन ही लपवून ठेवायची गोष्ट नाही" अशी मते आहेत ना? मग "तुम्ही गे आहात का" असे कुणी विचारले तर काय प्रॉब्लेम? (मला स्वतःला हा प्रश्न विचित्र वाटतो. कारण मुळात "गे" प्रकरण विचित्र वाटतं. "जोडिदाराशी एकनिष्ठ असावं" अशा हल्ली भंपक म्हणवल्या जाणार्‍या कल्पना आम्ही घेउन फिरतो. सगळे त्याही बाबतीत "मुक्त" वगैरे असावेत हे पटत नाही.) पण एकीकडे "हे अगदि सामान्य आहे. " किम्वा" ह्याबाबत मोकळेपणा असायला हवा" असं कुणी सतत बोलत असेल, तर त्याला त्यात काय अश्लाघ्य वाटतं हेच मला समजलं नाही. प्लीझ, एक लक्षात घ्या, तुमच्या वैयक्तिक आयुश्यत कुणी डोकावू नये असे वाटत असेल तर तसे वाटने हा हक्कच आहे. तो प्रायव्हसीचा भ्म्ग आहे, हे मान्य,. पण तो "आगाउपणा" झाला. त्यात "अश्लाघ्यता" कुठून आली ते समजले नाही. . बहुतेकांची प्रतिक्रिया 'यात काय विशेष' अशीच असणार अजिब्बात नाही. माझ्यासारख्या सामान्यांची(जनरेत्याने वागणार्‍यांची) आनि ज्यांना तुम्ही संस्कृतीरक्षक म्हणता त्यांची प्रतिक्रिया कधीच अशी असनार नाही. उलट त्यांना ते "अश्लाघ्यच" वाटेल. मूळ प्रश्न हा की तुमच्या नैतिक - अनितिकच्या संकल्पनाच वेगळ्या असताना तुम्हाल ते तसं कसं वाटलं? . मुक्त विचारांच्या नावाखाली इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायची परवानगी मिळाली आहे छे हो. शिंतोडे लोक उडवत नाहीत. उग्गाच कुणीतरी कोपर्‍यातली मॉडेल उठते आणि "विश्वचषक जिंकल्यास नग्न होउन क्रिकेट टीमला भेटेन " म्हणते, कुणी समजा शिमानी केसरिया किंवा खारा शर्मा नावाची सेलिब्रिटी "मुक्त लैंगिक व्यवहार. जाहीर ठिकाणी चुंबन घेत सुटलं तर वाईट काय. पार्टनर आठवडाबह्र बदलत राहिएल तर चूक काय" अशी बोलू लागेल तर तिला एड्स असण्याविषयी शंका घेउ नये का? लोक शिंतोडे उडवत नाहीत. ते तुमच्या सदर्‍अयवरचे दिसत असलेले शिंतोडे दाखवतात. हे विनोद गांधींजींच्या भारतीयांच्या मनातील आदराचे स्थान हिरावून घेऊ पाहणार्‍या संघटनेकडून कसे प्रसृत केले जातात हे मी त्या संघटनेत असतानात स्वतः अनुभवले आहे. एकाच बाजूल का चूक म्हणतो हो? असले विनोद करणे चूक आहे, तस्सेच टोकाचे आत्यंतिक, झीट येइल इतपत उदात्तीकरण काही लोकांचे केले जाते,तेही चूकच आहे. होतं काय, तुम्ही निधर्मी लोक दरवेळी ऐलतीरावरच्या , कांगावाखोर लोकांच्या नाअवाने ओरडता. पण मुलात कांगावा हा आत्यंतिक उदात्तिकरणाची प्रतिक्रिया हे विसरता. "साबरमती के संत तुने कर दिया कमाला दे दी हमें आजादी बिना खड् ग बिना ढाल" अशा आशयाच प्रसार चालतो, त्याला कुणीच चूक का म्हणत नाही? मुळात वस्तुनिष्ठ माहिती पोचवली गेली तर नाही तेवढे गौरवीकरण होणार नाही, आणि मग दबलेला राग विनोदातूनही तितका बहेर येणार नही सॉरी, फारच स्पष्ट लिहिलय. . नेहरू म्हटले की फक्त 'एडविना' आठवणारे महाभाग भरपूर आहेत. वरीलप्रमाणेच. . तुमचं एरव्हीचं लिखाण आवडतं, बरचसं पटतही. पण ह्यावेळेस मुळात म्हणायचय काय हेच समजलं नाही.

In reply to by मन१

चारित्र नव्हे हो "चारित्र्य" खरं की काय? काय बुवा ही भाषा, छ्या: तुम्ही गॉसिपकॉलमवाल्यांचे चारित्र्य वाईट वाईट असते असे सूचित करताय का? बळंच? त्यांच्या कृतीबद्दल केलेल्या टिप्पणीवरून थेट त्यांच्या चारित्र्याबद्दल विचार सुरू करणं हा काय माझा प्रांत नाही. तुमचे तुम्ही पहा. उरलेला प्रतिसाद माझ्यापुरता दखलपात्र नाही. तुमचे चालू द्या.

In reply to by मन१

माझा वरील प्रतिसाद बाद समजावा. ररा दुखावले गेले असावेत असे वाटते, खेद आहे.मी अधिक अचूक व थोडक्यात लिहायचा प्रयत्ना ह्या नव्या प्रतिसादात करतो आहे. गॉसिप कॉलमचे लेखक समाजात संभावित म्हणून मिरवतात मिरवू देत की. तुम्ही गॉसिपकॉलमवाल्यांचे चारित्र्य वाईट वाईट असते असे सूचित करताय का? आता हे जनरलायझेशन नाय झालं का? आँ? ह्यांना कित्येक बातम्या स्वतः स्टार्सच पुरवतात ही वस्तुस्थिती आहे. उग्गाच्या उगाच स्टार्स हे विक्टीम आणि समाज्/मासिक हे अत्याचारकर्ते असे चित्र का रंगवले जाते. स्टार्सनाही हे सगळे हवेच असते की. त्यासाठी गलेलठ्ठ पगार देउन काही मॅन्जर्सची टीमही सतत तयार असते. १."लग्नापूर्वी एड्स ची चाचणी घ्या असा सल्ला खुद्द सरकारी यंत्रणा देतात." त्यात चूक काय आहे. . २.ज्याला तुम्ही गलिच्छ गोष्टींची चर्चा करणे म्हणता, त्या गलिच्छ गोष्टी गॉसिप म्हणून स्वतः सेलिब्रिटिज पसरवतात.( ही गोष्ट चूक वाटते का.) . ३. "गे आहेस का" हा प्रश्न भारतात कुठल्याही जुनाट किंवा संस्कृतीरक्षक म्हणवल्या जाणार्‍या माणसाला दुखावणारा आहे. सदर लेख त्यांची बाजू घेताहेत का? . ह्याहून अधिक कॅप्सुलाइझ्ड, संक्षिप्त लिहिता आले नाही.

In reply to by मन१

मनोबा पहिलेच एक जनरल विधान करतो मग इतर मुद्द्यांचा परामर्ष घेऊ. मुळात 'बाजू घेणे' ही मानसिकता सुटत तोवर लेखाचा मुद्दा ध्यानात येणार नाही. इथे आलेले बहुतेक आक्षेप 'मग तुमचे म्हणणे काय करावे?' किंवा 'तुम्ही असे म्हणणार का?' असे आहेत. मी इतरांबाबत वैयक्तिक मत अथवा टिप्पणी करत नाही. तसेच पुराव्याशिवाय, अधिकाराशिवाय इतरांच्या चारित्र्याबाबत (बरोबर जमला ना आता?) निश्चित विधाने करण्याचा अगोचरपणा न करण्याचा आहे. तोच आणि तेवढाच आहे. मग नट्या चारित्र्यवान असतात का नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न नाही. तो भोचकपणा ज्याला करायचा त्याने करावा. पण ते वागणे हे भोचकपणा आहे, अनधिकाराने इतरांच्या अधिकाराचे उल्लंघन आहे हा माझा मुद्दा आहे. तुम्ही गॉसिपकॉलमवाल्यांचे चारित्र्य वाईट वाईट असते असे सूचित करताय का? याचे उत्तर आधीच दिलेले आहे. 'संभावित' या शब्दाचा अर्थ 'चारित्र्यवान' असा नाही! (नक्की काय ते शब्दकोष उघडून पहा.) त्यामुळे आव आणणे ही वाक्यरचना त्यांच्या चारित्र्याबद्दल कोणतेही विधान करत नाही. पूर्णविराम! ."लग्नापूर्वी एड्स ची चाचणी घ्या असा सल्ला खुद्द सरकारी यंत्रणा देतात." त्यात चूक काय आहे. सरकारच्या संबंधित यंत्रणांचा अधिकार नि एखाद्या सामान्य माणसाचा अधिकार सारखाच का? एक सर्वसाधारण सूचना नि वैयक्तिक पातळीवर केलेले विधान सारखेच का? उद्या मी तुम्हाला मिपाच्या फोरमवर 'मनोबा, आता एड्सची चाचणी करून घ्या' असे म्हट्ले तर ते तुम्हाला खपेल का? त्याचा इतरांप्रती जाणारा अर्थ काय ते तुम्हाला नक्कीच ठाऊक आहे. मग हे वेड पांघरून पेडगावला जाणे का? २.ज्याला तुम्ही गलिच्छ गोष्टींची चर्चा करणे म्हणता, त्या गलिच्छ गोष्टी गॉसिप म्हणून स्वतः सेलिब्रिटिज पसरवतात.( ही गोष्ट चूक वाटते का.) अर्थातच. जो न्याय सर्वसामान्य माणसालाच लागू तोच त्यांनाही. आता तेच तसे करतात म्हणून आम्हीही करतो असा तर्क असेल तर कठीण आहे. त्यांनी चूक केली म्हणून तुम्हालाही ती करण्याचा हक्क मिळत नाही. तसेही ते ज्यांच्याबद्दल बोलतात त्या सहकलाकार इ. नी असला तर्क दिला तर 'एकवेळ' समजू शकेन (तिथे परस्परांबद्दल चिखलफेक इ. होत असेल तर 'समान संधी'च्या मुद्द्यावर नि समान नैतिकतेच्या पातळीवर असतील तर) पण ज्या रमतारामांबद्दल - उदाहरण म्हणून आपण कतरिना घेऊ - कत्रिनाने कोणतेही गॉसिप पसरवलेले नाहीत त्या ररांना तिच्याबद्दल गलिच्छ गॉसिप पसरवण्याचा हक्क 'जशास तसे' या न्यायाने देखील मिळत नाही, कायदेशीर, नैतिक पातळीवर तर मुळीच नाही. . ३. "गे आहेस का" हा प्रश्न भारतात कुठल्याही जुनाट किंवा संस्कृतीरक्षक म्हणवल्या जाणार्‍या माणसाला दुखावणारा आहे. सदर लेख त्यांची बाजू घेताहेत का? याचे उत्तर सुरवातील दिलेच आहे. बाजू घेण्याची मानसिकता सोडून चर्चा करू शकलात तर स्वागत आहे. अन्यथा प्रतिसाद न देण्याचा अधिकार मी राखून ठेवला आहे. (म्हणूनच लेख चर्चास्थळ सदरात न टाकता 'जनातलं मनातलं' मधे टाकला आहे.) एका वाक्यात सांगायचं तर हा लेख 'लीव देम अलोन' एवढंच म्हणतो आहे. ते चारित्र्यवान आहेत कि नाही हा मुद्दा नाहीच. (नसले तरी) त्याबाबत निश्चित विधान करण्याचे, न्यायाधीशाची भूमिका घेऊन त्यांच्यावर दोषारोप करण्याचा अधिकार कायद्यानेच काय नैतिक दृष्टीने कोणाला नाही एवढाच मुद्दा.

In reply to by रमताराम

मनोबाच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत! त्यावर तुमचा पहिला प्रतिसाद 'उरलेला प्रतिसाद माझ्यापुरता दखलपात्र नाही. तुमचे चालू द्या', हे काही पटले नाही. मुद्द्यांना व्यवस्थित उलगडून दिलेल्या प्रतिसादाला दखलपात्र न मानणे हे तुमच्या
पण ते वागणे हे भोचकपणा आहे, अनधिकाराने इतरांच्या अधिकाराचे उल्लंघन आहे हा माझा मुद्दा आहे.
ह्या मुद्द्याशी विसंगत आहे असे वाटते.
कत्रिनाने कोणतेही गॉसिप पसरवलेले नाहीत त्या ररांना तिच्याबद्दल गलिच्छ गॉसिप पसरवण्याचा हक्क 'जशास तसे' या न्यायाने देखील मिळत नाही, कायदेशीर, नैतिक पातळीवर तर मुळीच नाही
हेही हास्यास्पदच आहे. कतरिना ही सेलेब्रिटी आहे आणि त्यामुळेच तिचे आयुष्य हे 'पब्लिक' आहे आणि ते तसे असण्यातच तिचे भले आहे. त्यामुळे कोणालाही त्याविषयी भाष्य करण्याचा अधिकार आहे. ररांचे तसे नाहीयेय. पण ते भाष्य करताना तारतम्य बाळगायचे ते कसे आणि किती हे कोण ठरवणार? त्यासाठी मोजमाप कसे लावायचे? त्यासाठी कोणती फुटपट्टी वापरायची? ती तशी प्रत्येकाने आपापल्या समजानुसार लावलेलीच बरी. त्यामुळे जे पटते ते घ्यावे आणि नाही पटत ते सोडून द्यावे असे करता येउ शकते. एखाद्याचे तारतम्य सोडून केलेले भाष्य म्हणजे आजची संस्कृती किंवा समाजाची मानसिकता असे जनरलायझेशन करणे हाही दुसर्‍या कोणाच्या तरी मते भोचकपणा होऊ शकतो. असो, मुळ लेखात नेमके काय म्हणायचे आहे ते निटसे कळले नव्हते, पण मनोबाचा प्रतिसाद आणि त्यावरचा प्रति-प्रतिसाद वाचून रहावले नाही. - (जे मनात येईल ते बेधडक बोलणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

मला माझ्या दृष्टीने विसंगत असलेल्या मुद्द्यांवर उत्तर द्यायला भाग पाडणे हे माझ्या अधिकाराचे उल्लांघन आहे या माझ्या दाव्याबाबत आपले काय म्हणणे आहे? अवांतरः मुळशीच्या बाजारात आजचा बाजरीचा भाव काय हो? आता द्या उत्तर नाहीतर माझ्याही प्रतिसाद मागण्याच्या मूळ अधिकाराचे उल्लंघन होते. हा प्रश्न जितका मूळ मुद्द्याशी विसंगत वाटतो तुम्हाला तसाच मला वरचा प्रतिसाद वाटतो. जरा इतर प्रतिसाद वाचायची तसदी घेतलीत तर त्यात उत्तर आधीच दिले आहे. असो. (आपल्या चर्चेचा मुद्दा भरकटवण्याचे सारे प्रयत्न हाणून पाडणारा) रमताराम

In reply to by मन१

मनोबा मनकवडे :) अर्धवटराव

एक नंबर लेख. भारतीय समाज तसेही एक नंबरचा ढोंगी आणि दुटप्पी आहे. (सॅडलि) गांधीजींबद्दलचे विनोद मीदेखील ऐकले आणि कधीकाळी सांगितलेदेखील आहेत . पण प्रसिद्ध व्यक्तींबद्दल - मग सिनेतारका असोत अथवा राजकारणी- टीका जी होते ती बर्‍याचदा वैयक्तिक होते याचे कारण मोर दॅन एनीथिंग लोक त्यांच्यावर जळत असतात. सिनेतारका/राजकारणी यांचे चारित्र्य काही धुतल्या तांदळासारखे असते असे वाटत नाही. पण त्या टीकेत असूया, जळजळ हाच मुख्य भाग असतो. हे टीकाकार त्यांच्या पासंगालासुद्धा पुरत नाहीत म्हणून अशी गलिच्छ विधाने करतात. जितकी विधाने गलिच्छ, तितकी जळजळ जास्त असे माझे म्हणणे आहे. हे अर्थातच सामान्य माणसांबद्दल आहे. माध्यमांबद्दल बोलायचे झाले तर सवंग प्रसिद्धीचा खोल हव्यास हे कारण देता येईल. पण मनोबांचा प्रतिसाद नीट पाहिला नव्हता. आता तो पाहिला तर सहमत होतोय त्याशी.

In reply to by बॅटमॅन

एक नंबर लेख. भारतीय समाज तसेही एक नंबरचा ढोंगी आणि दुटप्पी आहे. (सॅडलिपण डबल रोल मधे ( डबल स्टॅन्डर्ड नव्हे) भारतीय समाज नोबेल प्राईज देण्याच्या लायकीचा .खरे तर एकूण मानवी मन हे दुहेरी निष्ठेचे मंदीर आहे त्यात भारतीय ए-वन !

लेख पटला. असे काही वाचल्या-ऐकल्यावर कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्याबद्दल लोक सरसकटपणे काहीही कसे काय बोलू शकतात असे वाटायचे. तसेच कौन बनेगा करोडपतीमध्ये अमकेढमके इतके पैसे मिळाल्यावर काय कराल असे विचारल्यावर ऐश्वर्या-माधुरी-कतरिनाला घेऊन फिरायला जाऊ असे म्हणणार्‍यांची कीव येते.

In reply to by मस्त कलंदर

तसेच कौन बनेगा करोडपतीमध्ये अमकेढमके इतके पैसे मिळाल्यावर काय कराल असे विचारल्यावर ऐश्वर्या-माधुरी-कतरिनाला घेऊन फिरायला जाऊ असे म्हणणार्‍यांची कीव येते.
का ब्वॉ ? - (अमकेढमके इतके पैसे कधी मिळतील ह्याची वाट बघणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

या सगळ्याजणी दुकानांत मांडलेल्या निर्जीव वस्तूंसारख्या गळ्यांत त्यांच्या किमतींच्या पाट्या घालून उभ्या नाहीत, की जेणेकरून कोणत्याही सोम्यागोम्याने यावं आणि पुरेसे पैसे मिळाल्यावर त्यांना घेऊन फिरायला जावं. या सर्वजणी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात आणि त्यासंबधाने कुणी काय म्हणावं याबद्दल ररांनी आधीच लिहिलं आहे.

खरं सांगायचं तर मला लेख नीटसा कळाला नाही त्यामुळे कोणत्या मुद्द्याच्या आधारे प्रतिसाद लिहावा हे उमजत नाही. लोकांच्या सरसकटीकरण भुमिकेला उत्तर नाही, स्वभाव असतो तो, फार क्वचित बदलता येतो/बदलतो. लोकांचा दुटप्पीपणा म्हणाल तर तो बर्‍याचदा आवश्यक असतो, बर्‍याचदा बदलत्या कंपनीनुसार ( म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या लोकांसमोर बसत आहात) बदलती भुमिका घ्यावी लागते, ह्यालाही सरसकट दुटप्पीपणा म्हणणे तितकेसे बरोबर नाही. सर्वच गोष्टी सर्वच ठिकाणी बिनधास्तपणे सांगता येत नाही, काही आतलेही असते आणि काही निवडक लोकांसमवेतच ते समोर मांडता येते. समोरचा समुह आपले मत कुठल्या प्रकारे घेईल ह्यावरही माणसाची जाहिर भुमिका बर्‍याचदा बदलु शकते. ह्याला तत्वशुन्य तडजोड असे न म्हणता व्यवहारीपणा म्हणणे योग्य ठरेल असे मला वाटते. बाकी चित्रपट आणि समाज किंवा महात्मा गांधी आणि कौतुक/टिका इत्यादी बाबींवर आजकाल मत द्यावेसे वाटत नाही. एखादी बाजुचे समर्थक समजुतदार असतील तर त्याचा विचार करुन संतुलीत मत मांडता येते पण त्याला आजकाल फारशी किंमत नसल्याने असल्या व्यर्थ गोष्टीत फारशी शक्ती वाया घालवावी असे वाटत नाही. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक आणि त्यावर असणारा अंधविश्वास हाच अशा वादांना कारणीभुत आहे, अन्यथा दोघेही आपापल्या बाजुला बरोबर आहेत. -छोटा डॉन

तुम्ही जनात टाका नाहीतर मनात! लोकांना चर्चा करायला आवडतात राव! एक जुनी म्हण सांगते. मारणार्‍याचा हात धरता येतो, बोलणार्‍याचं तोंड धरता येत नाही. एखादा असं करत असेल तर त्याला एखाद्या वेळेला बाबा असं करू नको असं सांगण्याशिवाय आपण काय करू शकतो? दुसर्‍याच्या वागण्या बोलण्यावर आपण नियंत्रण आणू शकत नाही. शेवटी "लवकर बरा हो" एवढंच म्हणणं आपल्या हातात रहातं. मग डोक्याला त्रास तरी कशाला करून घ्यावा. आपण तसे वागत नाही ना इतकं प्रामाणिकपणे बघावं. बस! एखाद्याला कळपाने टार्गेट करणे, त्याने म्हटलेच नाही ते म्हटलंय असा बोभाटा करत गावभर फिरणे असे आंतरजालीय दहशतवादाचे प्रकार मी गेल्या २ वर्षात बरेच पाहिले आहेत. त्याला वैतागून काही संवेदनाशील लोक संस्थळावर यायचं बंद करतात. त्याला आपण कधी थेट विरोध करू शकतो का? आपल्याला विचार करायला आणि डोकं फिरवायला दुसरे बरेच प्रकार खर्‍या आयुष्यात असतात ररा. ही वृत्ती म्हणजे व्हायरस आहे. त्याला काही औषध नाही. ते तसं का आहे यालाही काही उत्तर नाही. जौ द्या, झालं. त्यांचं त्यांच्यापाशी. आपण आपला सरळ रस्ता सोडू नये म्हणजे झालं! बहुतांश दुनियाच अशी झाली आहे. प्रत्येकजणच कुठेतरी सावज होतो आणि कुठेतरी शिकारी. लोकांबरोबर राहण्यासाठी अनेक मुखवटे बाळगावे लागतात. मग मनातलं विष कसंही कुठेही बाहेर पडतंच. आपण त्या झुंडीत सामील व्हायचं की नाही इतकंच आपण ठरवू शकतो.

In reply to by पैसा

बहुतांश दुनियाच अशी झाली आहे. प्रत्येकजणच कुठेतरी सावज होतो आणि कुठेतरी शिकारी. लोकांबरोबर राहण्यासाठी अनेक मुखवटे बाळगावे लागतात. मग मनातलं विष कसंही कुठेही बाहेर पडतंच. आपण त्या झुंडीत सामील व्हायचं की नाही इतकंच आपण ठरवू शकतो.
एकदम मस्त जमलंय मनातलं लिहायला!! प्रचंड सहमत!!!

अरे/अग काय बोलतोयस! जरा विचार करुन बोल असे आपल्याला लहानपणापासुन कधी ना कधी ऐकवले गेले असते व पुढे आपणही कोणाला ऐकवतो. १००% परफेक्ट कोणी बोलत असेल असे वाटत नाही व आपण सगळेच ह्या अनुभवातुन गेलो असतो. म्हणूनच बहुदा काही स्पष्ट विचाराचे लोक आपल्या सगळ्यांना आदरणीय वाटत असतील (कदाचित असुयेस पात्र असतील) बेसीकली मुद्दा हा आहे की प्रत्येकाच्या त्याला ग्रेट वाटेल अश्या व्यक्तीनेही "गॅफ" (मराठी शब्द??) केलेले आढळून येतात मग अमुक पदावरच्या इसमाने अमुक बोलले नाही पाहीजे(आठवा: अमुक मत संपादक म्हणुन की सदस्य म्हणून असे आपण आपल्या लाडक्या संपादका विचारले असेलही ;-) ) असे संकेत (पोलीटीकली करेक्टनेस) यायला लागतो. यात स्थल-काल-समाज हा ही एक मोठा भाग असतो. मतभिन्नता हाही एक भाग आहे. काही लोकांकरता अमुक एक बोलणे फेअर गेम असेल तर काही लोकांकरता आउट ऑफ लाईन असेल. इथे मला दोन प्रसंग आठवतात की आमीर खानची बाजु समजुन न घेता परवा खुद्द ररा यांनी आमीरखानला बोल लावले होते. ते देखील वारंवार अर्धवट माहीती देण्यात प्रसिद्ध असलेल्या एका वर्तमानपत्राच्या गॉसीपी लेखावरुन. मला नाही वाटत स्व:ताचे मत/निवाडा देण्या अगोदर आमीरखानची बाजु ररांनी ऐकली होती. ऐकली असेल, खुलासा मिळवला असेल तर माझा हा मुद्दा बाद. गंमत अशी की त्याच वृत्तपत्र संस्थेच्या इंग्रजी आवृत्तीत कसा राज ठाकरे की मुंबई दंगा बद्दल आकसाने / चुकीची/ एकांगी माहीती दिली आहे असेही त्यांच्या लेखात होते. मी आपला नोंद करत होतो. पण तरी ररा जे काय बोलतात, लिहतात ते मला आवर्जून नोंद घेण्यासारखे वाटते. त्यामुळे अशी गडबड वाटली तरी नथिंग इज परफेक्ट किंवा माझ्या आकलनातली चूक म्हणून सोडुन देतो. ररा प्रमाणे इथे आदरस्थाने मानली गेलेल्या अन्य लोकांचीही उदाहरणे मला/तुम्हाला सापडली आहेत/असतीलच पण ते असो. असो अनुभव व वयानुसार लोकांना थोडाफार आतला आवाज सापडत असावा अशी अपेक्षा.

In reply to by सहज

असे लोक स्वतःहून एक्स्पोज झाले कि वाईत वाटतं. असो. मी व्यक्ती नि संघटनांची नावे न घेता मुद्देच मांडले होते. आता सहजरावांनी माझे नाव घेऊन वैयक्तिक टीका केल्याने त्यांच्यापुरते मी वैयक्तिक पातळीवर उतरण्याचे स्वातंत्र्य घेतो आहे. घेऊ का सहजराव? चालेल तुम्हाला? अमीरखानवर मी टीका केली नव्हती. अर्थात अमीरखानच्या आडून स्वतःची तथाकथित समाजसेवा सर्टिफाय करून घेणार्‍यांनी तसा बोभाटा करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. माझी टीका अमीरखानला 'समाजसेवक' म्हणून त्याचा 'सत्यमेव जयते' बघतो म्हणून आम्ही कित्ती समाजसेवेची चाड असलेले आहे वगैरे इतरांना नि स्वतःला पटवणार्‍यांवर होती. परदेशात बसल्याबसल्या समाजसेवेचे श्रेय मिळवून देण्याचे हे आयते साधन ररांनी टीका केल्याने अपमान झाल्यागत वाटणार्‍यांनी मी अमीरखानवर टीका करतो अशी मखलाशी केली होती (जशी आपण मांडलेल्या मुद्द्याचे खंडन वा त्यावरील टीका ही आमच्या नेत्यावर किंवा संस्कृतीचे अवमूल्यन आहे असा कांगावा लोक करतात तसेच). अमीरखानने स्वतःच आपण समाजसेवा वगैरे करतो असे आपण समजत नसल्याचे स्पष्ट केले होते. मग सहजरावांसारख्यांना राग का आला ते ठाऊक नाही. राहिला मुद्दा त्याने स्वतःच सत्यमेच जयते'च्या यशाने प्रेरित होऊन एक समाजसेवी ड्राईव चालू केल्याचा. लेखातील बातमी त्याने डेट्स न दिल्याबद्दल होती. मी फक्त त्याचा दुवा दिला होता नि 'थोर समाजसेवक अमीरखान....' एवढेच 'अर्थात त्याला तसे म्हणणार्‍या आमच्या मित्रांना चिमटे काढणारे शीर्षक दिले होते. या पलिकडे काही नाही. पण आता एकदा रेट्रिब्यूट करायचे तर काहीतरी खणून काढायला हवे ना. ठीक आहे सहजराव. यू वॉन्ट टू प्ले डर्टी, लेट मी फाईट इन द मड. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. लेखाचा मुद्दा हा चारित्र्याबद्दलचा आहे, वैयक्तिक आयुष्याबद्दलचा आहे. जे इतरांना वेरिफाएबल नसते. म्हणून त्याबाबत केलेले विधान बिनबुडाचे असते. व्यावसायिक आयुष्याचे तसे नाही. जे सार्वजनिक आहेच त्याचे सार्वजनिक मूल्यमापन होतच असते, ते गांधींनाही चुकले नाही वा तुम्हा आम्हाला. त्यात अमीरखानची सुटका होईल कशी. शिवाय हे त्याचे मूल्यमापन पब्लिक मीडिया मधे आले होते. तिथेच त्याला त्याचा प्रतिवाद करण्याचा हक्कही आहेच की. (आजतागायात तो प्रतिवाद मी तरी पाहिलेला नाही.... आय नो ब्लेम इट ऑन द मीडिया.) अर्थात हा मुद्दाच माझ्या लेखाशी मुळीच सुसंगत नाही नि केवळ वैयक्तिक मुद्द्यांवरून दिला गेला आहे एवढेच तूर्त नोंदवतो.

In reply to by रमताराम

अहो मला राग इतक्या पटकन येत नाही ते सुद्धा तुमचा तर अजिबात नाही. काही लिहलेले वाचून याची नीट टोटल लागत नाही आहे असे दिसले इतकेच... सवय...., आमीरखान -सत्यमेवजयते मी बघत नाही- परदेशात बसल्या बसल्या आयते साधन वगैरे मुद्दे मला लागू होत नसल्याने व वेगळाच वाद भरकटत असल्याने त्याबद्दल काही बोलत नाही. मी पुन्हा माझ्या वरच्या प्रतिसादाकडे जाउन पुन्हा लक्ष वेधू इच्छीतो की ररांसारख्या माणसाच्या बोलण्या-लेखनाची नोंद मी घेतोच. त्यामुळेच आमीरखानची बाजु समजुन न घेता त्याच्यावर (हो घसरला होतात त्याच्यावर) घसरायची गरज नव्हती ते देखील पुरेशी माहीती नसलेल्या बातमीवरुन. इतकाच माझा मुद्दा होता व त्या बातमीत निवाडा करण्यापुरती माहीती आहे असे तुम्हाला वाटले पण दुसर्‍या बातमीत माहिती अपुरी/एकांगी/चुकीची वाटली व लगेच तुमचा दुसरा निवाडा न्याय आला हेही पाहीले म्हणून मला खुपलेले मत दिले. माझ्या आकलनाचा दोषही मी घेतला आहेच माझ्याकडे. मी शब्दप्रभू नाही. बरेच वाद हे शब्दछल करुन फिरवताना पाहीले आहे मला त्यात प्रकारात अडकायचे नाही. ररां अजुनही मला आदरणीय आहेत त्यामुळे माझ्या या औधत्याबद्दल (??) माफ करा. :-) बाकी कोणतीही सिनेव्यक्ती, त्यांचे चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, गांधी-नेहरू अन्य मोठे समाजसेवक त्यांच्या विषयी त्यांचे कार्य सोडून अन्य बाजार गफ्फा, अश्लील आरोप याला मी महत्व देत नाही की मी कधी तसे केले नाहीत. उलट त्याचा निषेध मिपावर वेगवेगळ्या धाग्यात केला आहे. [फक्त बुवाबाजी, पैसे घेउन भविष्य, नाडी, धर्म - सत्याचा एकमेव मार्ग असे दावे, विधीलिखीत, अंधश्रद्धा परिणाम-दुष्परीणाम असल्या गोष्टींबद्दल प्रसंगी कठोर शब्दात टिका केली आहे.] असो त्यामुळे धाग्याच्या त्या संदेशाशी सहमत आहेच पण ते ही वेगळे सांगत बसणे म्हणजे पाच वर्षे मिपावर असणे व्यर्थ आहे. माझा मुळ प्रतिसाद हा कितीही प्रयत्न केले तरी कोणतरी कोणाच्या रोषास पात्र होणे, वादग्रस्त घटना घडणे हे होतेच व त्याला काही कारणे आहेत हे दाखवायचा होता. जाणते-अजाणतेपणी लोकांच्या हातून इतरांचे "स्वातंत्र्य, चारित्र्य, संस्कृती" अवमान/भंजन होतो. असे लेख व चर्चा पाहून ज्याने त्याने यापुढे आपल्या शब्दांचे भान ठेवावे इतकेच अजुन काय.

In reply to by रमताराम

"वैयक्तिक आयुष्याबद्दलचा आहे. जे इतरांना वेरिफाएबल नसते." संभ्रमात आहे..

एकीकडे संस्कृतीच्या गप्पा मारायच्या नि लैंगिक शिक्षण या नावानेच बिचकून जाऊन शास्त्रशुद्ध नि तज्ञांकडून माहिती अथवा शिक्षण (जे प्रामुख्याने वाढत्या वयातील शारिरीक मानसिक बदल इ. बाबत असते, संभोगाचे प्रशिक्षण नव्हे) देण्याला विरोध करायचा नि घरात काँप्युटरवर ब्ल्यू-फिल्म्सचा साठा करायचा हा दांभिकपणा आपल्या रक्तातच मुरलेला आहे.
सकृतदर्शनी ही विसंगत वाटणारी गोष्ट मला दांभिकपणा वाटत नाही. प्रत्येकात काही ना काही अंतर्विसंगती असते. एखादा माणुस काही बाबतीत दयाळू असतो तर काही बाबतीत क्रूर. ज्यांना त्याच्या क्रुरपणाचा फटका बसलाय ते त्याला दयाळू म्हणायाला धजावणार नाहीत तसेच ज्यांना त्याच्या दयाळू पणाचा अनुभव आलाय ते त्याला क्रुर म्हणायला धजावणार नाहीत.म्हणजे तो एकाच वेळेला क्रूर व दयाळू आहे. जो देव मानतो तो रॅशनल असूच शकत नाही किंवा जो रॅशनल आहे तो देव मानूच शकत नाही असे आपण जर गृहीतक मानले तर ते किती लोकांना मान्य होईल. म्हणजे जो नास्तिक तोच रॅशनल. मग पुढे त्याच्या नास्तिकतेची तीव्रता किती? त्यात छटा किती? यावरुन वाद चालू होईल. मग जो रॅशनल आहे ( असे इतर लोक समजतात)व अस्तिकही आहे तो भोंदू किंवा दांभिक. समजा एखादा दारुडा आहे व तो म्हणतो आहे कि दारु पिणे हे वाईट व्यसन आहे. तर स्वतः दारु पीत असल्याने त्याला लोक दांभिक म्हणणार. पण तो दारुडा आहे व त्याचे ' दारु पिणे हे वाईट व्यसन आहे' हे मत आहे दोन्ही सत्य आहे. हेच उदाहरण गुन्हेगार, भ्रष्ट, चोर ... वगैरे बाबतीत म्हणता येईल. असो ररांनी वादग्रस्त धाग टाकलेला दिसतोय!

In reply to by प्रकाश घाटपांडे

पकडलात मला? छ्या: आपली 'दांभिकपणा' या विषयावर झालेली चर्चा आठवली. पण पुन्हा एकदा: आमच्या मुद्दा तत्त्वांचा नसून (इतरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चित विधान करण्याच्या) हक्काचा किंवा त्यामागील नैतिकतेचा आहे त्यामुळे पास. अवांतरः नास्तिक तोच रॅशनल' हे मला स्वतः नास्तिक असूनही मान्य नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

उदाहरण ज्बरदस्त आहे. पण तो दारुडा आहे व त्याचे ' दारु पिणे हे वाईट व्यसन आहे' हे मत आहे दोन्ही सत्य आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

रमताराम यांचे धन्यवाद! आज या धाग्यामुळे श्री. घाटपांडे, सहज, पैसा इ.इ. अतिशय संतुलित आणी उत्तम रित्या मांडलेले प्रतिसाद्/विचार वाचायला मिळाले! जियो!!

माझी एका व्यक्तीशी ओळख झाल्यावर , त्या व्यक्तीने नाटक -सिनेमा या क्षेत्रातले आपण माहितगार आहोत असे सांगून मला, प्रसिद्ध असलेल्या अनेक मराठी नट -नट्या व डायरेक्टर - नट्या यांच्या जोड्याच लावून सांगितल्या. याबाबतीत त्याच्याकडे काही पुरावा आहे का , असे विचारल्यावर त्याने 'काय राव, अशा गोष्टींचा कुठे पुरावा असतो का,' असा प्रतिप्रश्न केला. त्यावरही संयम राखून मी त्याला सुनावले की त्यातली एक प्रसिद्ध नटी , ही माझी बहीण आहे. त्यावर मात्र त्याची बोलतीच बंद झाली. निव्वळ एकत्र काम केले म्हणून लगेच अशा जोड्या लावायच्या ? ह्यांत वाईट हेच आहे की सर्वसामान्य माणूस असल्या गोष्टींची शहानिशा न करता त्याचा आणखी प्रसार करतो.

बाहेर 'समाज' नावाची गुंतागुंत तर आहेच शिवाय आतही 'मी' नावाची गुंतागुंत आहे. ही गुंतवळ करडी आहे. आणि ती स्थलकालातीत आहे. (ती फक्त आजच्या भारतीय संस्कृतीपुरती मर्यादित आहे असे नाही. )

In reply to by विसुनाना

बाहेर 'समाज' नावाची गुंतागुंत तर आहेच शिवाय आतही 'मी' नावाची गुंतागुंत आहे.
हल्ली हे तथ्य मी विसरतो हो सारखे. ;-) पण थोडा विचारात पडलो आहे: समाज आणि मी या दोन शब्दांना अवतरणात का बरे टाकले असावे?

लेख मुद्देसूद असल्याने आवडलाच.फ़क्त .. “"या साहेबांची वृत्ती खर्‍या अर्थाने आपल्या समाजाची मानसिकतेचे प्रातिनिधित्व करते मला वाटते"” अश्या काही वाक्यांमूळे सरसकटीकरण झाले आहे असे वाटते.अर्थात तुमचा रोखच सर्व भारतीय मानसिकतेवर असल्याने असे वाटण्यालाही अर्थ नाही.तुम्ही ते लेखाच्या शेवटच्या वाक्यात स्पष्ट केले आहेच. पण तरी त्याशिवाय..... "चारित्र्य"’ आणि "संस्कृती" ही गृहीतकेच असतात.तुमची ह्याबाबतची गृहीतके सर्वमान्य गृहीतकांपेक्षा वेगळी असावीत असा अंदाज आहे.(परिचय आणि तुमच्या लिखाणातून जाणवलेली बाब.) त्यामूळे ह्या लेखापूरती तुम्ही सर्वमान्य ( किंवा सर्वसामान्य ) गृहीतके का ग्राह्य धरली असावीत असा प्रश्न मात्र पडला. चारित्र्य हे “"ज्याच्या त्याच्या पुरतं”" आणि संस्कृती “"ना कोणा एकाच्या मालकीची”" (मी हे उलटसुलट केलं आहे का?;)) त्यामूळे मताभिन्नता असणारच.वादविवादाची घुसळण ही होईल.त्यामूळे आता ह्या मंथनातून “चारित्र्य” आणि “संस्कृती”च्या ठोस व्याख्यांची अमृतप्राप्ती होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. :)

सुरेख!!! एकसे एक बढकर, संतुलित , प्रगल्भ विचार वाचायला मिळाले. छानच आहे हा धागा. डॉन, सहज, पैसा यांची मते, तिमांचे अनुभवकथन आणि त्यातील सात्विक संताप, सर्व काही आवडले. ररांचा मुद्दा मला कळतोय पण पैसा म्हणतात त्याप्रमाणे "बोलणार्‍याचे तोंड कोणी धरावे" असेच वाटते. पण गॉसीपर्स चा आपण सौम्य निषेध करणे जमेल. निदान या धाग्यामुळे एक शांती मिळाली की अनेक चांगले लोक आहेत ज्यांना भल्याबुर्‍याची चाड आहे.

नृत्यदिग्दर्शिका सरोज खान ह्यांनी एका मुलाखतीत 'एखादी हिरॉइन मी 'त्यातली' नाही, मी 'तशा' तडजोडी कधी केल्या नाहीत असे म्हणत असेल तर ती १०० टक्के खोटे बोलत आहे असे समजावे' असे विधान केले होते. हे माझे मत नाही. नृत्यदिग्दर्शिका सरोज खान ह्यांचे विधान आहे. खरे-खोटे त्याच जाणोत. जिथे आयुष्य सार्वजनिक होते तिथे त्याचे वाभाडे सर्वसामान्य जनतेकडून काढले जातातच. कोणाचा स्वार्थ दडलेला असतो, कोणला असूया असते, कोणाकडे 'सत्य' असते, कोणाला अशा प्रसिद्ध मोठ्या लोकांच्या खाजगी आयुष्यातील इतरांना माहित नसलेल्या पण 'चमचमीत' गोष्टी मलाच माहित आहेत हे सिद्ध करायचे असते. जिनका नाम होता है, वही बदनाम किए जाते है| तरी पण, उथळ चर्चांना, विधानांना, आरोपांना किती गांभिर्याने घ्यावे हे ज्याचे त्याने ठरवायचे.

In reply to by प्रभाकर पेठकर

नृत्यदिग्दर्शिका सरोज खान ह्यांनी एका मुलाखतीत 'एखादी हिरॉइन मी 'त्यातली' नाही, मी 'तशा' तडजोडी कधी केल्या नाहीत असे म्हणत असेल तर ती १०० टक्के खोटे बोलत आहे असे समजावे' असे विधान केले होते. हे माझे मत नाही. नृत्यदिग्दर्शिका सरोज खान ह्यांचे विधान आहे. खरे-खोटे त्याच जाणोत. खरे खोटे त्याच जाणोत. अगदी खरं आहे पेठकरशेठ. कसं आहे. एक स्त्री विधान करते ' मी त्यातली नाही, तशा तडजोडी केल्या नाहीत.' म्हणजे तिने खरंच तशा तडजोडी केल्या की नाहीत ते सोडून द्या (त्यावर भाष्य करण्याचा 'Locus Standi' मला नाहीच) पण असे विधान करताना किमान 'तशा' तडजोडी अपरिहार्य आहेत, केल्या तर काय बिघडले असे न भासवता त्या चुकीच्या आहेत, लपवण्याजोग्या आहेत असे तिला वाटते इतके नक्कीच म्हणता येईल. शिवाय हे विधान तिने केवळ स्वतःबद्दल केले आहे हे मुद्दाम नोंदवून ठेवण्यासारखे. याउलट सरोज खान बाईंचे विधान विचारात घेतले तर तशा तडजोडी अपरिहार्य आहेतच, त्याशिवाय कोणतीही नटी यशस्वी होऊ शकत नाही सबब प्रत्येक यशस्वी नटीने त्या केल्या आहेत असे सुचवणार्‍या आहेत. थोडक्यात -कदाचित- ते गैर नाही असेही त्यांचे म्हणणे असावे (नक्की ठाऊक नाही, ते विधान असे म्हणते'च' असे म्हणता येणार नाही पण एक ध्वन्यर्थ असा असू शकतो, पण तसे म्हणण्याचा हेतू नसेल) थोडक्यात सरोज खान बाई बिनदिक्कतपणे इतरांच्या आयुष्याबद्दल विधान करत आहेत. एकही अशी असू शकत नाही असे म्हणताना त्या प्रत्येकीने 'तशी' तडजोड करत असता या बाई तिथे नेमक्या कशा उपस्थित होत्या हा मला प्रश्न आहे. मुद्दा सांगोवांगीचाच असला तर मग या मताला तशीही किंमत देता येणे अवघड आहे. थोडक्यात अशी दोन परस्परविधाने दोन व्यक्तींकडून आली आहेत ज्यातली एक अशा तडजोडी वाईट वा न करण्याजोग्या हे 'किमान' तत्त्वतः मान्य करणारी आहे तर दुसरी बिनदिक्कतपणे इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा अगोचरपणा करणारी आहे. आता सरळसरळ विरोधी विधानांमधून एकच निवडणे शक्य आहे. आणि ते निवडण्याला कोणताही ऑब्जेक्टिव निकष समोर नसल्याने केवळ सांगणारीच्या विश्वासार्हतेबद्दल आपल्या मतानुसार निवडावे लागेल. आमच्या दृष्टीने जी स्वतःपुरते बोलते आहे नि किमान अशा तडजोडी करणे तत्त्वतः तरी नाकारते ती अधिक विश्वासार्ह आहे. म्हणून आम्ही सरोज खान बैं पेक्षा त्या नटीवर विश्वास ठेवणे अधिक पसंत करू. अपनी अपनी सोच है पेठकरसेठ. शेवटी सालं संस्कृती संस्कृती म्हणजे काय हो समाजातून जी दिसते ती, कागदाच्या पुस्तकाच्या आत लिहून ठेवलेली नव्हे.

In reply to by रमताराम

थोडक्यात सरोज खान बाई बिनदिक्कतपणे इतरांच्या आयुष्याबद्दल विधान करत आहेत. एखाद्याच्या घरात काय चालल आहे हे अनुमान आपण बाहेरुन काढत असतो. पण त्या घरातलीच व्यक्ती जेंव्हा स्वतःच्या घरातील घडामोडींबद्दल काही सांगते तेंव्हा त्यात सत्यता असते असे म्हणायला हरकत नाही. चित्रपटसृष्टीतील आतील बातमी मी सांगणं आणि सरोजखान ह्यांनी सांगणं ह्यात हाच फरक आहे असे मी मानतो. एकही अशी असू शकत नाही असे म्हणताना त्या प्रत्येकीने 'तशी' तडजोड करत असता या बाई तिथे नेमक्या कशा उपस्थित होत्या हा मला प्रश्न आहे. प्रत्येक घटनेच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर असलेच पाहिजे असे नाही. सरोजखान स्वतःही, नटी नसल्या तरी, 'यशस्वी' कलाकार आहेत. त्यांचे अनुभव, त्यांच्या तडजोडी आणि तिथल्या नट्यांची आणि निर्मात्यांची, फायनान्सर्सची आणि जेजे म्हणून एखाद्या नटीला 'संधी' देतात त्या सर्वांची मनोवृत्ती गृहीत धरूनच सरोजखान ह्यांचे विधान आले आहे असे मला वाटते. कोणावरही चिखलफेक करू नये ह्याच मताचा मीही आहे. पण चिखलात उभे असल्याचे पाय अत्यंत स्वच्छ असतील असे मानणे हेही फार भाबडेपणाचे होईल. चिखलफेक जाऊद्या. कोणी कोणाबद्दल चांगले बोलतो तेंव्हा आपण विश्वास ठेवतोच नं? शिवाजी महाराज, महात्मा गांधीं, लोकमान्य टिळक, अण्णा हजारे, बाबा आमटे अशी अनेक अनेक आदराची स्थानं आहेत. त्यांच्या बद्दल ऐकताना, वाचताना आपण लगेच विश्वास ठेवतो. बोलणारा किंवा पुस्तकाचा लेखक ह्यांना तुम्ही होता का हजर महाराजांनी पराक्रम गाजवला तेंव्हा, महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं तेंव्हा असे म्हणत नाही किंवा अण्णा हजारे, बाबा आमटे ह्यांच्या चारित्र्याबद्दल ऐकताना, वाचताना आपण हे प्रश्न उपस्थित करीत नाही. नट्यांची स्वतःची वागणूक, वर्तमानपत्रातल्या बातम्या, गॉसिप मॅगॅझीन्स मधील सनसनाटी लेख आणि छायाचित्र पाहूनही ह्या सर्व नट्या सतीसावित्री आहेत असे कोणाला म्हणायचे असेल तर माझी काहीच ना नाही. पण त्याच बरोबर, ह्या विरुद्ध मते बनविण्याचा अधिकार इतरांनाही आहे, त्याना उगीच नांवे ठेऊ नये.

In reply to by रमताराम

"एकही अशी असू शकत नाही असे म्हणताना त्या प्रत्येकीने 'तशी' तडजोड करत असता या बाई तिथे नेमक्या कशा उपस्थित होत्या हा मला प्रश्न आहे. " बहुधा चर्चा आता मनातलं सोडून "काथ्याकूट" होऊ लागली आहे असे दिसते. वर दिसणारा शब्दच्छल हे त्याचेच सूचक आहे...

स्वतःला अप्राप्य गोष्टींवर चिखल उडवण्याची 'आंबट द्राक्षं' वृत्ती फार काही नवी नाही, त्यामुळे त्यावर फार अस्वस्थ व्हायचे कारण नाही. नट-नट्याच काय, शाळेतल्या/गल्लीतल्या/गावातल्या सुंदर मुलींबद्दल अगदी टिनपाट गोणपाट पोरंही काय काय बोलतात ते ऐकलं तर कान करपून जातील. बर्‍याच वेळा स्वतःला जमलं नाही म्हणून सभ्य राहणार्‍या लोकांना हे तथाकथित नीतिरक्षकांचे कातडे पांघरून सिंहगर्जनेच्या आवेशात 'ह्यां हॉ ह्यां हॉ' ओरडणे फार आवडते. :-) लेख आवडला.

In reply to by नगरीनिरंजन

+ १०० % आवडेश. बाकी गांधी अन त्यांच्याविरोधी असणार्‍या अशा प्रतिक्रियांची शंभरी हवी होती हे समजलं नाही याचं मनस्वी दु:ख झालं (आम्हाला).

In reply to by शिल्पा ब

शिल्पातै.. बाकी काहिही असो, शंभरीसाठी धागे लिहिणार्‍यातले ररा नाहीत हे आम्हाला पक्के माहीत आहे. तुझ्याकडून अनावधानाने अन्जस्ट प्रतिक्रिया लिहिल्यासारखी वाटली म्हणून लिहितोय. ते असो, धाग्याविषयी आम्ही काय बोलणार, मोठेमोठे लोक बोलतातच आहेत, त्यामुळे माझा बेंबट्या झाला आहे.सगळ्यांचीच मतं पटतात

ररांचा चर्चाप्रस्ताव वाचायला आवडला आणि धाग्यावरचे प्रतिसादही उत्तमच. -दिलीप बिरुटे

उद्या खायचे काय ? हा प्रश्न ज्या दिवशी संपतो त्या वेळी हया लेखातील पश्न निर्माण होतात. भूक - निद्रा - मैथुन हया मुलभूत गरजा पूर्ण झाल्या की मग असे गोल -गोल समाजप्रश्न सतावतात. पूर्ण नाही झाल्या तर टोकदार वैयक्तिक प्रश्न सतावतात. बाकी सगळे सापेक्ष आहे !

In reply to by तर्री

जरी तुमचे मत योग्य असले तरी मॅस्लोची नीड हायरार्की थियरी (गरजक्रम सिद्धांत??) आठवल्याशिवाय राहिले नाही. असो!

मॅस्लोची नीड हायरार्की थियरी येतेच त्या नंतर पण ती खूप सापेक्ष आहे. चरित्र (- वैयक्तिक), संस्कृती (- सामाजिक ) सतत बदलले आणि म्हणून सापेक्ष असते !

लेखन आवडलं, शेवट उगीच एका संघटनेच्या नावी झाला असं वाटलं. खूप जनरिक आणि पटण्यासारख्या लेखनाचा असा टोकदार शेवट नाही आवडला. बाकी लेख नेहमीप्रमाणेच उत्तम :)

लेखन उत्तम. अधून मधून एका व्यक्तीचे उदाहरण देत केलेले सरसकटीकरण टाळता आले असते तर बरे झाले असते असे उगाचच वाटून गेले. बाकी संघटनेच्या दिलेल्या उदाहरणाबद्दल काय बोलणार ? आधीच्या भागात तुम्ही एकावरुन सरसकटीकरण केले शेवटच्या भागात सरसकटीकरणावरुन एकावर आलात. फिट्टं फाट !

लेख आवडला. एकूणच 'सुसंस्कृतपणा' ही दुर्मिळ होत चालला आहे. काहि लोकांचे आचार्/विचार (विषेशतः आंजावर) बघितले की गटारात लोळणार्‍या डुकरांची आठवण येते. अर्थात आजकाल हंस कमी आणि डुकरंच जास्त दिसताहेत. दररोज नेत्यांच्या फोटोंवर आपली प्रतिभा उधळून त्यांचे वाभाडे काढणारे एक तरी चित्र फेसबूक मधे असतेच. गंमत म्हणजे जे लोक असले फोटो शेअर करतात ते इतर वेळी प्रत्यक्ष भेटले की वरकरणी बरेच सुसंकृत वाटतात!