✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काल

स
संजय क्षीरसागर यांनी
Mon, 07/16/2012 - 00:10  ·  लेख
लेख
सजगता किंवा अवेअरनेस म्हणजे वास्तव आणि कल्पना यात तारतम्य करण्याची आपली क्षमता (The ability to differentiate between a fact & fiction). आपला अवेअरनेस जितका जास्त तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं. अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही. वेळ वस्तुस्थिती मानणं ही आपली केवळ धारणा आहे (जस्ट अ कन्विक्शन) आणि अशा अनेक धारणा आपल्याला आपण बंधनात आहोत असा आभास घडवतात. `काल' या अत्यंत बेसिक धारणेचं निरसन करण्याचा हा प्रयत्न. ____________________ या बोधाला अध्यात्मात काल रहितता (इटर्निटी) म्हटलंय आणि कालरहितता जाणणार्‍याला कालज्जयी (कालावर विजय मिळवणारा) म्हटलय. कालरहितता हा सिद्धत्वाचा गुणविषेश मानला गेलाय आणि कालमुक्तीला असाधारण महत्त्व आहे. इटर्निटी जाणणं हे दीर्घ आणि अथक साधनेचं फलित समजलं गेलय पण तो उलगडा व्हायला खरं तर कोणत्याही साधनेची गरज नाही. ___________________ अस्तित्वात प्रक्रिया, प्रसंग आणि घटना आहेत ही गोष्ट उघड आहे आणि त्यांचा कालावधी मोजण्यासाठी आपण काल हे भासमान परिमाण वापरलय. आपण नेहमी कोणत्याना कोणत्या प्रक्रियेत मग्न असल्यानं कालाचा सतत वापर करतो त्यामुळे काल वास्तविक आहे अशी आपली धारणा झालीये. ______________________ वेळ ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण वेळ ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे मनावर वेळेचं सतत दडपण आहे. वेळ भास आहे हे ज्याला कळतं तो वेळेपासून मुक्त होतो! वेळेपासून मुक्ती आणि वक्तशीरपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट कल्पना आहे असं कळलं की आपण ती वापरू शकतो पण ती खरी आहे असं वाटलं की मग तणाव सुरू होतो. वेळ या कल्पनेतून व्यक्तिमत्त्व निर्माण होतं म्हणजे आपण स्वतःला वक्तशीर किंवा वेंधळे समजायला लागतो किंवा बाकीचे आपल्याला तसं समजायला लागतात; मग प्रत्येक वेळी वेळ गाठताना आपली स्वतः विषयीची प्रतिमा आपल्याला सहजतेनं काम पूर्ण करणं किंवा वेळ गाठणं मुष्किल करते. वेळेच्या बाबतीत असा ताण दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना असतो, वक्तशीर व्यक्तीला स्वतःचा वक्तशीरपणा टिकवायचा असतो आणि वेंधळ्या व्यक्तीला वेंधळेपणा चुकवायचा असतो. वेळ कल्पना आहे अशी पक्की खूणगाठ एकदा मनात बसली की तुमच्या मनावरचं वेळेचं दडपण एकदम नाहीसं होतं, तुमची सृजनशीलता पराकोटीची वाढते, तुम्हाला कोणत्याही प्रसंगात अनेक पर्याय दिसायला लागतात. ________________________ वेळ भास आहे हा तुमचा अनुभव झाला, मनोमन खात्री पटली की दुसरी एक अद्भुत घटना आपसूक घडते: आपण स्वत: `कालाबाधीत' आहोत हे तुमच्या लक्षात येतं, आपण अकाल आहोत! ज्याला काल भास आहे हे कळलं त्याच्यावर कालात घडणार्‍या घटनांचा परिणाम हळूहळू न्यून होऊ लागतो. शरीराची निर्मिती कालात आहे त्यामुळे आपण शरीरापासून वेगळे आहोत. शरीर आहे, आपणही आहोत पण आपण 'शरीर झालेलो' नाही, आपल्याला शरीराची जाणीव आहे. तुम्हाला तुमचं `विदेहत्व' लक्षात येतं आता तुम्हाला हे देखील लक्षात येतं की `वय' शरीराला आहे, आपल्याला नाही, आपण सदैव एकसारखे आहोत, आपल्याला बालपण कळलं, तरुणपण कळलं आणि उत्तररंग देखील कळेल पण आपण जसेच्या तसे राहू! शरीराशी तादात्म्य कमी झाल्यामुळे तुम्ही कमालीचे उत्साही होता. याचा अर्थ शारीरिक क्षमता कमालीची वाढून एखादा इंग्लिश खाडी पोहून जाईल किंवा एकदम मॅरेथॉन जिंकेल असा नाही पण शारीरिक क्षमता आणि तुमचा उत्साह याची गल्लत होणार नाही. असेल त्या शारीरिक क्षमतेनं, शरीराला झेपेल ते काम तुम्ही उत्साहानं करू शकाल. थोडक्यात आपलं वय झालं असं वाटल्यामुळे येणारा निरुत्साह संपूर्णपणे नाहीसा होईल कारण आपल्याला वय नाही! वेळ ही कल्पना आहे हा बोध आपल्याला चिरतरुण करतो, शारीरिक वयाचा आपल्यावर चित्तस्थितीवर परिणाम होत नाही. _______________________ वेळ हा भास आहे हे ज्यानं जाणलं त्याला हे देखील कळतं की वेळेत घडणार्‍या प्रत्येक घटनेपेक्षा आपण वेगळे आहोत, त्यामुळे प्रसंग हाताळण्याची त्याची क्षमता कमालीची वाढते. प्रसंगात न सापडता आपण प्रसंग हाताळू शकतो, साक्षी या आध्यात्मिक शब्दाचा नेमका अर्थ तो आहे. वेळेपासून जेवढे आपण मुक्त तितके जाणीवेशी संलग्न होत जातो, म्हणजे किती वाजले? जेवायची वेळ झाली, यापेक्षा भूक लागली की जेवण असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं. जाणीवेनं जगणं किती सुखाचं आहे हे कळायला थोडा वेळ जावा लागतो पण एकदा त्यातली सहजता कळली की मग अनायासे आपण अस्तित्वाशी एकरूप होत जातो. नुसत्या सूर्यप्रकाशावरनं आपल्याला केव्हा जेवावं, केव्हा फिरायला जावं, केव्हा झोपावं आणि कधी उठावं ते कळायला लागतं! जाणीव एकदम प्रगल्भ व्हायला लागते. ____________________ कालरहितता कळणं तुम्हाला `अवकाश' किंवा `स्पेस' या परिमाणाला उपलब्ध करतं. अवकाश हे स्वास्थ्याचं निधान आहे, वेळेमुळे ताण आहे, अवकाशाशी संलग्न होणं तुम्हाला स्वस्थ करतं. अवकाश हे अस्तित्वातलं सर्वात रहस्यमय परिमाण आहे, एका अर्थानं ते सर्वत्र आहे आणि दुसर्‍या अर्थानं ते इतकं अपरंपार आहे, इतकं सर्वव्यापी आहे की नक्की कुठेय ते दर्शवता येत नाही. टाईम फ्रस्टेट करणारा अवकाश परिमाणाला उपलब्ध होतो असं म्हणणं ही तितकंस योग्य नाही, तो स्वत:च अवकाश होतो, कमालीचा निवांत होतो, या निवांतपणाला अध्यात्मात समाधी म्हटलय! _____________________ पैसा निदान कल्पना तरी आहे पण काल तर निव्वळ भास आहे, अर्थात हे तुम्हाला जरी पटलं तरी इतरांना लगेच पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. हा विषय वादाचा नाही, बोधाचा आहे. तुम्ही लगेच त्यावर मानसिक उहापोह करु नका त्या उलगड्यात काही काळ जगा, कालरहिततेचं वेळीअवेळी स्मरण करत तीचा निवांतपणा, त्या बोधातून येणारं स्वास्थ्य उपभोगा. जेव्हा तुम्ही या बोधातून काही दिवस जगाल तशी तुमच्या जगण्यात, हालचालीत सहजता यायला लागेल. ओशोंचं एक अप्रतिम वाक्य आहे, ते म्हणतात : समझ आचरणमें बदल जाती है! जेव्हा हा बोध तुमच्या आचरणात येईल तेव्हा मग तुम्हीही दुसर्‍याला एकदम बिनधास्तपणे सांगू शकाल की `अरे, वेळ हा निव्वळ भास आहे! ' आणि मग ते त्याला पटो न पटो तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तो तुमचा अनुभव झालेला असेल!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
41254 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

मला एकटीला कळून काय

कवितानागेश
गुरुवार, 07/19/2012 - 20:46 नवीन
मला एकटीला कळून काय उपयोग? मला कळलेले इतरांनाही कळावे यासाठी हा प्रश्नप्रपंच! शेअरिंग, यु नो....;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ह्म्म्म... रोचक चर्चा !एक

मदनबाण
Wed, 07/18/2012 - 22:29 नवीन
ह्म्म्म... रोचक चर्चा ! एक क्षण आणि त्यामागुन येणारा दुसरा क्षण यांच्या मधे काहीच नसते... ही सतत चालणारी शॄंखला म्हणजे काल. मानवाने त्याच्या आजुबाजुच्या परिस्थितीत "तो" स्वतःकुठे आहे,हे जाणुन घेण्यासाठी केलेली शॄखलांची गणिते त्याला सध्याचा "क्षण" कुठल्या "कालात" आहे,हे जाणुन घेण्यास मदत करतात असे मला वाटते. उदा.सध्या हिंदु कालगणनेचा विचार करता आपण कलियुगात आहोत.हिंदुची काल गणना ब्रम्हदेवापासुन सुरु होते आणि ब्रम्ह देवाच्या विलया बरोबरच विलय पावते. (यापुढे काही असेल तर ते मला अजुन माहित नाही.) क्षणांची चालणारी अव्ह्याहत शॄंखला ही न थांबणारी आहे,त्यामुळे आपल्यासाठीची आत्ताची वेळ ही फक्त या अव्याहत श्रूंखलेचा एक भाग आहे एव्हढच ! या बोधाला अध्यात्मात काल रहितता (इटर्निटी) म्हटलंय आणि कालरहितता जाणणार्‍याला कालज्जयी (कालावर विजय मिळवणारा) म्हटलय. किंवा ज्या व्यक्तीला सेल्फ रिअलाझेशन होतं त्याला कालरहितता कळते असं म्हंटल तर योग्य ठरेल काय ? अवांतर :--- जालावर बरीच माहिती आहे... वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी माहिती ! वाचन करत असताना मला असे कळले की सध्या ब्रम्हदेवाचे वय वर्ष ५१ आहे,आणि सध्या वराह कल्प चालु आहे. पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी माहिती ! नक्की कुठल युग चालु आहे बरं ? आणि जर कलियुग खरचं चालु असेल तर ते केव्हा सुरु झाल ? या बाबतीत सुद्धा जालावर वेगवेगळी माहिती मिळते. योग्य माहिती कुठे मिळेल ? वाचकांसाठी दुवा :- http://veda.wikidot.com/vedic-time-system
  • Log in or register to post comments

@ मदनबाणः ज्या व्यक्तीला सेल्फ रिअलाझेशन होतं त्याला

संजय क्षीरसागर
Fri, 07/20/2012 - 00:26 नवीन
कालरहितता कळते असं म्हंटल तर योग्य ठरेल काय ? येस, इट इज आयदर वे, तुम्ही कालरहितता जाणली तर तुम्ही कालातीत व्हाल (कालात घडणारी घटना तुमच्यावर सहज परिणाम करु शकणार नाही) किंवा तुम्ही सत्य जाणलंत तर तुम्ही कालरहितता जाणाल कारण सत्य कालाबाधित आहे. डू यू नो? सत्य म्हणजे काही फार भारी गोष्ट नाही ती फक्त एक अचल अवस्था आहे, ईट इज जस्ट अ‍ॅन अनमूवींग स्टेट म्हणून तर काल सरकतोय असं वाटतं आणि कालरहितता जाणली की काल सरकतो पण आपण स्थिर राहतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खरे आणि भास

चित्रगुप्त
Wed, 07/18/2012 - 21:52 नवीन
"खरे" म्हणजे काय, आणि "भास" म्हणजे काय, हे आधी नक्की ठरवल्याशिवाय सर्व चर्चा वांझोटीच राहणार. धागाकर्त्याने त्याला 'खरे' आणि 'भास' यातून काय अभिप्रेत आहे, हे समजवावे, तसेच दोन्हीची किमान पाच-पाच उदाहरणे द्यावीत, असे सुचवतो.
  • Log in or register to post comments

@ चित्रगुप्त सर!

संजय क्षीरसागर
Wed, 07/18/2012 - 22:55 नवीन
>"खरे" म्हणजे काय, आणि "भास" म्हणजे काय, हे आधी नक्की ठरवल्याशिवाय सर्व चर्चा वांझोटीच राहणार. = तुम्हाला सत्य म्हणजे काय आणि भास म्हणजे काय असं विचारायचय; जे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत नाकारु शकत नाही ते सत्य आणि जगात फक्त एकच गोष्ट निर्विवाद आहे ती म्हणजे आपलं असणं!` मी नाही' म्हणायला देखील आपण हजर असायलाच हवं. हा `मी' पार कृष्णापासून तुमच्या माझ्यापर्यंत सर्वांचा सारखा आणि एकच आहे, माझ्या सर्व अध्यात्मिक लेखनाचा निर्देश त्या `मी' कडे आहे. तो कालातीत आणि सार्वभौम आहे पण ही गोष्ट आपल्याला इतकी सहज मंजूर होणार नाही कारण आपण प्रत्येक जण स्वतःला व्यक्ती समजतो. हे व्यक्तीमत्व अनेक धारणांच बनलय आणि काल वस्तुस्थिती मानणं ही एक महत्त्वाची धारणा आहे. काल भास आहे कारण तो निव्वळ पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे भासतो म्हणून. अर्थात ती धारणा इतकी डीप आहे की आपण स्वतःला जन्म ते मृत्यू या घटनेतच बद्ध समजतो. मी माझं म्हणणं आगदी सोप्या शब्दात मांडतोय आणि एकेका धारणेची उकल करतोय म्हणून मला विषय सिमीत ठेवावा लागतोय. कल्पनेची मी किती तरी उदाहरण देऊ शकेन (पण त्यातून विषय भरकटेल) उदाहारणार्थ; देव ही कल्पना आहे पण तो या लेखाचा विषय नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अध्यात्माची पहिली पायरी

रामपुरी
गुरुवार, 07/19/2012 - 02:15 नवीन
अध्यात्माची पहिली पायरी सुद्धा ओलांडायला जमलेली दिसत नाही तुम्हाला! सगळ्या प्रतिसादात फक्त "मी, माझे, मला,..." अगोदर अहंकार सोडा. घड्याळबिड्याळ सोडल्याच्या फालतू गफ्फा कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

खरे आणि भास

चित्रगुप्त
Wed, 07/18/2012 - 23:49 नवीन
आपण जेंव्हा एकादे स्वप्न 'बघत' असतो, तेंव्हा ते आपल्याला अगदी 'खरे' वाटत असते, आपले शरीरही त्या स्वप्नाला वस्तुस्थिती असल्यासारखा प्रतिसाद देते, उदा. भितीदायक स्वप्नामुळे घाम फुटणे, कामुक स्वप्नामुळे स्खलन होणे, इ.इ. परंतु 'जाग' आल्यावर मात्र आपण म्हणतो, की अरे हा तर केवळ 'भास' होता... म्हणजे काही काळापूर्वी जे अगदी 'खरे' होते, तो आता 'भास' ठरला. असेच आपल्याला जी गोष्ट आत्ता 'जागेपणी' अगदी 'सत्य' वाटत आहे, ती कालांतराने 'भास' ठरू शकते, कुणी सांगावे? मनुष्य प्राण्याचा उद्भव होण्यापूर्वी करोडो वर्षांपासून पृथ्वीचे सूर्याभोवती भ्रमण चालू आहे, त्यामुळे आपल्या सर्व शारीरिक क्रिया त्या भ्रमणाशी निगडीत आहेत. आपण जरी "पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली" तरी आपल्या शारीरिक संवेदनांमुळे आपल्याला काळाची जाणीव होतच रहाते. दुसरे उदाहरण म्हणजे समजा (जीएं च्या 'स्वामी' कथेतील पात्राप्रमाणे) एकाद्याला एका बंदिस्त जागी ठेवले (जिवंत राहण्यापुरत्या त्याच्या शारीरिक गरजा भागतील अशी सोय करून), जिथे बाहेरचे काहीही दिसत नाही, कोणताही बदल, सावली, प्रकाश इ.इ. जाणवू शकत नाही... तर हळूहळू तो तारीख, महिना, वेळ इ.इ. चा हिशेब ठेऊ शकणार नाही, त्या अर्थाने त्याचे कालाचे आकलन लुप्त झाले असे म्हणता येईल, परंतु त्याच्यासाठी 'भूतकाळ' - पूर्वीच्या स्मृतींच्या स्वरूपात , 'वर्तमानकाळ' - त्याच्या सद्यपरिस्थितीच्या जाणिवेच्या स्वरूपात, आणि 'भविष्यकाळ' - त्याच्या पुढील जीवनाविषयी कल्पनांच्या स्वरूपात, अस्तित्वात असेलच.
  • Log in or register to post comments

आरसे

अर्धवटराव
गुरुवार, 07/19/2012 - 02:57 नवीन
>>त्याच्यासाठी 'भूतकाळ' - पूर्वीच्या स्मृतींच्या स्वरूपात , 'वर्तमानकाळ' - त्याच्या सद्यपरिस्थितीच्या जाणिवेच्या स्वरूपात, आणि 'भविष्यकाळ' - त्याच्या पुढील जीवनाविषयी कल्पनांच्या स्वरूपात, अस्तित्वात असेलच. -- काळ "बघण्याचे" स्मृती (भूतकाळ) वा कल्पना (भविष्यकाळ) हे आरसे आहेत, त्यात काळाचं प्रतिबिंब/छाप पडतं. काळाच्या अस्तित्वाची एकमेव खुणगाठ म्हणजे ट्रान्स्फोर्मेशन. काळाशिवाय बदल घडु शकत नाहि. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@ चित्रगुप्त सर, भास : व्यक्तीगत आणि सार्वजनिक

संजय क्षीरसागर
गुरुवार, 07/19/2012 - 09:15 नवीन
तुम्ही ज्याला भास म्हणताय ती वास्तव आणि कल्पना यातलं तारतम्य करण्याची व्यक्तीगत क्षमता लोप पावल्यानं होणारी मानसिक स्थिती आहे, त्यामुळे स्वप्नाला `व्यक्तीगत भास' म्हटलय, तुमचं स्वप्न इतर कुणी पाहू शकत नाही. `काल हा सामूहिक भास आहे' ; आपण सर्वच स्वतःला `जन्म ते मृत्यू' या कालावधित बद्ध समजतो. तुम्ही जी दुसरी गोष्ट म्हणताय (शारीरिक संवेदनांमुळे आपल्याला काळाची जाणीव होतच रहाते किंवा परंतु त्याच्यासाठी 'भूतकाळ' - पूर्वीच्या स्मृतींच्या स्वरूपात , 'वर्तमानकाळ' - त्याच्या सद्यपरिस्थितीच्या जाणिवेच्या स्वरूपात, आणि 'भविष्यकाळ' - त्याच्या पुढील जीवनाविषयी कल्पनांच्या स्वरूपात, अस्तित्वात असेलच) ती संवेदनेशी संबंधीत आहे मग ती शारीरिक संवेदना असो की स्मृतीची ; याबाबतीत मला असं म्हणायचय : संवेदना वास्तविक आहे पण तीचं इंटरप्रिटेशन चुकीचय. शारीरिक संवेदनेमुळे मला कळेल की आज माझं वय इतकं झालय पण ते माझं वय नाहीये, शरीराच आहे! तद्वत मला कालची गोष्ट आठवते म्हणून मला काल होता असं वाटतं, वास्तविकात तसं नाही, `ती स्मृती आता जागृत झालीये' आणि त्यामुळे वर्तमान हाच एक सार्थ काळ आहे किंवा मी उद्याचा विचार देखील आताच करु शकतो त्यामुळे उद्या असं काही नाहीये, तो आता `मनात आलेला विचार' आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

....पण ते माझं वय नाहीये, शरीराच आहे ....

चित्रगुप्त
गुरुवार, 07/19/2012 - 10:24 नवीन
....पण ते माझं वय नाहीये, शरीराच आहे .... म्हणजे तुम्हाला "मी" हा चिरंतन, अविनाशी इ.इ. आत्मा वा ब्रम्ह वगैरे आहे, "अहमात्मनासि", "अहम ब्रम्हास्मि" आणि तेच एक सत्य आहे, बाकी सर्व भास आहेत, "ब्रम्हसत्य, जगन्मिथ्थ्या" हे लहान पणापासून शेकडो वेळा ऐकलेले तत्वज्ञानच सांगायचे आहे तर. लहानपणापासून ते काही वर्षांपूर्वीपर्यंत मला तथाकथित अध्यात्मिक वगैरे वाचायचा फार नाद होता, आणि वाचलेले दुसर्‍यांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात तर भलताच रस वाटायचा... पुढे त्यातले व्यर्थत्व लक्षात येऊन या दोन्ही गोष्टींना फाट्यावर मारून नॉर्मल जगणे सुरु केल्यावर जीवन जास्त आनंददायक आणि सृजनशील झाले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

+1

आत्मशून्य
गुरुवार, 07/19/2012 - 11:12 नवीन
We are who we are :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चित्रगुप्त सर, सुधीरनं वर एक सुरेख प्रतिसाद दिलाय

संजय क्षीरसागर
गुरुवार, 07/19/2012 - 11:17 नवीन
>तत्व पक्क झालं तर ज्या माणसाच्या आचरणात हे तत्वज्ञान भिनतं तो साधू होतो - शांत होतो, कर्तव्या-कर्तव्या मधल्या झगड्यातही कुठलीही द्विधा राहत नाही. याउलट फक्त डोक्यातच राहिलं तर वाद-विवाद करणारा पंडित होतो आणि आचरणात आणणं तितकंही सोपं नसावं. तर, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

माननीय संजय सर

आत्मशून्य
गुरुवार, 07/19/2012 - 13:19 नवीन
ह्या धाग्यावर प्रतिक्रीया देणारे एक दोन न्हवे तर जवळपास सर्व लोकं तुम्हाला अतिशय प्रेमाने सामजावुन सांगत आहेत की तुमच्या संकल्पनेमधे खरचं एक छोटीशी चुक आहे तरीही तुम्ही तुमचा अट्टहास सोडत नाही आहात याचे कारण आपणच म्हणालात तसं तुमचं तत्वज्ञान केवळ तुमच्या डोक्यातच राहिलं आहे व ते तुम्हाला आचरणात आणायला जमत नाहीये असं आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जास्त काळजी चिंता करून नका,

वीणा३
गुरुवार, 07/19/2012 - 03:08 नवीन
जास्त काळजी चिंता करून नका, कशाचाच जास्ती विचार करू नका. पण तेच तुम्ही खूप मोठे मोठे शब्द वापरून सांगताय. = इतकं सोपं असतं सगळं तर मग काय बोलायच? म्हंजे तुम्हाला जास्त चिंता करू नका हेच सांगायचय, पण ते सोपं नाही असं वाटतंय, म्हणून तुम्ही ते अवघड करून सांगताय (का देव जाणे) तुमच लॉजिक न पटण्या मागचं अजून एक कारण म्हंजे कदाचित तुमचा आयुष्य आदर्श म्हणावं असं असू शकेल. चांगली सांपत्तिक स्थिती, उत्तम शिक्षण, बर्यापैकी बुद्द्धी आणि सगळ्यात महत्वाचं म्हंजे आसपास चांगली माणसं. काळ या लेखावर उदाहरण. तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे काम करता येतं याची २ कारण - १. तुम्हाला चांगला बॉस मिळालाय, जो तुम्ही फक्त काम पूर्ण करताय का नाही या गोष्टीशीच संबंध ठेवतो. उगाच कारण नसताना थांबवून ठेवत नाही. २. आणि / किंवा तुमची परिस्थिती (चांगली बुद्द्धी / चांगलं अनुभव / चांगली आर्थिक स्थिती) ज्यामुळे तुम्हाला नोकरी ची गरज असण्या पेक्षा बॉसलाच तुम्ही काम सोडून जाऊ नये याची भीती असावी. बऱ्याच लोकांना हि लक्झरी नसते त्यातून ताण येतो. जेवायची वेळ झाली कि जेवण ई. - तुम्हाला घरचे लोक चांगले मिळालेत जे तुम्हाला भूक लागली कि जेवण वाढायला तयार आहेत मग वेळ कुठली का असेना. बर्याचश्या लोकांकडे कामवाली बाई यायच्या आत / पाणी जायच्या आत घासायची सगळी भांडी तयार लागतात. किंवा तुम्ही स्वतः जेवण खूप छान बनवून स्वतः वाढून घेता + भांडी स्वताच घासता (किंवा डिशवोषर आहे) + पाण्याचा प्रोब्लेम नाही. बरेचदा आपल्यावर कोणीतरी अवलंबून असतं. पाळणाघरात मुलाला ठेवलंय, तो आपली वाट बघतोय, ६ वाजत आले तरी काम संपत नाहीये, ह्या वेळी ताण येतो. कारण मुलाचा रडकुंडीला आलेला चेहरा दिसत असतो. घरच्या परिस्थितीमुळे नोकरी करावीच लागते, दुसरं कोणीच मुलाला आणायला जाऊ शकत नाही, अश्या वेळी घड्याळ दिसत राहत. सांगायचं मुद्दा हा कि बऱ्याच लोकांना लहान मुलासारखं स्वछंदी आयुष्य जगायला आवडेल, पण प्रत्येक वेळी ते शक्य नसतं. बऱ्याच लोकांना ऑफिसमध्ये हवं तेंव्हा जायचं-यायचं फक्त काम नीट करायचं हे आवडेल. पण व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसतं. जर तुमचं आयुष्य वर लिहिल्याप्रमाणे आदर्श असेल तर ताण न घेणं हे तुमच्यासाठी सहज शक्य असेल.
  • Log in or register to post comments

@वीणा

संजय क्षीरसागर
Fri, 07/20/2012 - 00:45 नवीन
तुम्ही म्हटलय ते स्वच्छंद जीवन मला पूर्वी उपलब्ध नव्हतं किंवा ते सध्या परिस्थिती अनुकूल झाल्यानं प्राप्त झालेलं नाही (कारण मग ते परिस्थिती बदलल्यावर कधीही हातातून निसटेल) तो बदल लेखात सांगितलेलं तत्व जीवनात उतरवल्यामुळे झालाय. इथे एक सदस्य फक्त माझ्या लेखावर कमेंट द्यायलाच प्रकट होतात आणि मी काहीही लिहिलं तरी त्यात त्यांना फक्त अहंकार दिसतो. आता मजा अशीये की तुमच्याशी आकलन शेअर करतांना मी स्वतःचाच अनुभव लिहिणार आणि ते अनुभवातून आल्यामुळे तुम्हाला उपयोगी ठरणार. मी उपनिषदांवर चर्चा करुन किंवा कुणा माहात्म्याचा जीवनालेख मांडून तुम्हाला काही उपयोग नाही. तर सांगायचा मुद्दा असा की मी स्वच्छंद जगतो किंवा कशामुळे स्वछंद जगतो या अँगलनं तुम्ही पाहिलंत तर तो अहंकार वाटेल आणि त्याचा न तुम्हाला उपयोग न तो माझ्या लेखनाचा हेतू. मी अध्यात्मिक तथ्य अत्यंत सोप्या शब्दात मांडून तुमच्या जीवनात ते आणलं तर काय फायदा होईल ते सांगतो, आता ते कसं आणायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. तुम्ही ते तत्व खरं आहे का याची सत्यता पडताळण्यासाठी मला विविध अंगानी अनेक प्रश्न विचारता मग मी तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात ते कसं उतरवलय ते सांगतो आणि त्यामुळे ते तुम्हाला पटण्याची शक्यता निर्माण होते. तुम्ही इतका मनःपूर्वक प्रतिसाद दिलाय म्हणून सांगतो तुम्ही `काल भास आहे' हे तत्व तुमच्या असेल तशा जीवनात उतरवा तुम्हाला मजा येईल कारण ती वास्तविकता आहे. आहो, एकदम साधी गोष्ट आहे कालरहितता, कालशून्यता, कालमुक्ती, कालातीत, कालज्जयी वगैरे शब्द काही मी शोधलेले नाहीत फार थोर लोकांनी ते शोधलेत, (इथले सदस्य कितीही विरोधी सूर लावोत), ते सर्व शब्द वास्तविक आणि स्वास्थ्यदायी स्थितीकडेच निर्देश करतात, फक्त आचरणात आणायचा अवकाश आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

अरे हा 'काल'परवापासून सुरु

प्यारे१
गुरुवार, 07/19/2012 - 11:35 नवीन
अरे हा 'काल'परवापासून सुरु आहे ना ???? आणखी किती दिवस चालणार आहे????? ;) सं क्षी सर, तुम्हालाही माहिती आहेच. दोन वेगळे खेळ खेळताना वेगवेगळे नियम असतात. ह्या खेळाचे नियम त्याला लावून चालत नाही. तुम्ही सांगताय तो दुसर्‍या खेळाचा भाग आहे. तुम्ही व्यवहारात 'ह्या' गोष्टी आणून गोंधळ का वाढवताय???? मी शरीर नसलो तरी मला तिकीट काढावंच लागतं गाडीतून प्रवास करताना. माझं नाव नसलं तरी मला आरक्षण करताना नाव सांगावंच लागतं. वेळ पाळावीच लागते. . . . पक्कं असावं ते आत. क्रिया घडतातच . प्रतिक्रियांचा खेळ थांबला पाहिजे. हे वन वे ट्राफिक आहे महाराजा! इथं लोकांनी बदलणं अपेक्षितच नाहीये. आपण बदला. आपल्यापुरता जगाचा, विश्वाचा, कालाचा नि आणखी हवं त्याचा 'बाध' करा. (प्रतिक्रिया थांबवा) साध्य तिथंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं : हे पूर्णतः वैयक्तिक असतं. एकाची दुसर्‍याबरोबर स्पर्धा, तुलना, विभागणी, शेअरींग करु शकत नाही, केलं तरी उपयोग नाही.
  • Log in or register to post comments

प्यारे, खेळ एकच आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 07/19/2012 - 13:15 नवीन
वेळ ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण वेळ ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे मनावर वेळेचं सतत दडपण आहे. वेळ भास आहे हे ज्याला कळतं तो वेळेपासून मुक्त होतो! वेळेपासून मुक्ती आणि वक्तशीरपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे मी लेखातच म्हटलय. `तुम्ही एक शब्द कळला नाही म्हणताय' आणि आता हा वेगळाच प्रतिसाद दिलाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गलती हो गयी| माफ करीयेगा| जे

प्यारे१
गुरुवार, 07/19/2012 - 14:28 नवीन
गलती हो गयी| माफ करीयेगा| जे प्राप्त करण्यासाठी लोकांनी आयुष्ये घालवली ते 'निर्वाण पद' तुम्हाला इतक्या सहजपणे प्राप्त झालं आहे हे पाहून भरुन आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ळ चं ल झालं की कै हो

बॅटमॅन
गुरुवार, 07/19/2012 - 21:30 नवीन
ळ चं ल झालं की कै हो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कळला नाही..

चिगो
गुरुवार, 07/19/2012 - 18:37 नवीन
लेख एकतर कळला नाही, आणि जो काही थोडाफार कळला तो पटला नाही.. "भुक लागेल तेव्हा जेवा, झोप लागेल तेव्हा झोपा.." चांगलं तत्व.. इथे मेघालयात माझ्या ऑफीसातले काही लोक हे फारच मनावर घेतात. म्हणजे मग ते कधीही खायला जातात, आणि झोप आली की झोपतात ऑफीसात.. मग मी त्यांना फाडतो. हेही एक चूकच.. घड्याळ न वापरल्याने कालजयी होईलही कदाचित.. पण काय आहे ना, की समजा मी म्हटलं, "काल भास आहे. सिरीयसली घ्यायची गरज नाही.." आणि मिटींगला, ऑफिशीयल फंक्शनला उशीरा गेलो.. कशाला सिनीयरकडे जेवायलाच गेलो उशीरा, तर बूच लागेल ना राव ! म्हणून मग काल हे सत्य मानून जगण्यात फायदा आहे, असं दिसतंय.. बाकी कधी कधी कालहिनता/ भासमानता मी अनुभवतो आणि एंजॉय देखील करतो.. उदाहरणार्थ, १) चांगला चित्रपट असेल, तर लांबी बघत नाही त्याची.. २) आवडती गाणी ऐकतांना ३) प्रिय व्यक्ती/ मित्रांसोबत गप्पा मारतांना ४) आवडते पुस्तक वाचतांना ५) खरेतर दारुच्या मैफलीचा आस्वाद घेतांनाही काल-भासमानता जाणवते, पण बायको /यजमानीन "डिनरची वेळ झालीय, चला.." असं भुस्सकीनी पाणी घालते.. बाकी आमची आकलनशक्ती कमी असल्याने, कालबाधित आणि कालबंधित जगण्यातच राम वाटतोय.. नमस्कार..
  • Log in or register to post comments

याच विषयावर एक गोष्ट

चित्रगुप्त
गुरुवार, 07/19/2012 - 19:44 नवीन
सं. क्षी. : इसापनीतितील गोष्टींप्रमाणे तुम्हाला अभिप्रेत असणारा आशय एकाद्या गोष्टीद्वारे प्रकट करू शकाल का? हे मनोरंजक आणि उद्बोधक तर होईलच, तुमच्या सृजनशीलतेला एक नवीन आयाम लाभेल. बघा करून.
  • Log in or register to post comments

अति झालं, अन हसू आलं....

चित्रगुप्त
Sat, 07/21/2012 - 11:07 नवीन
बापरे.....कालरहितता, कालशून्यता, कालमुक्ती, कालातीत, कालज्जयी, अध्यात्मिक सत्य, ब्रम्हावस्था, वास्तविकता, भास, आभास, अहंकार, तत्वज्ञान, कर्तव्य, अकर्तव्य, ट्रान्स्फोर्मेशन, भासमान परिमाण, धारणेची उकल, अध्यात्माच्या पायर्‍या ..... दगड अन धोंडे... अति झालं, अन हसू आलं.... तस्मात हसते रहो, मुस्कुराते रहो... मस्त रहा मस्त जगा ....
  • Log in or register to post comments

लोक तिकडे काय काय प्रश्न

शब्दबम्बाळ
Sat, 12/12/2015 - 22:58 नवीन
लोक तिकडे काय काय प्रश्न विचारत बसलेत पण सगळ्या प्रश्नाचं उत्तर तर इथे आहे! ३ वर्षांपूर्वीच उत्तर देण्यात आलाय! पण हे काळामध्ये मोजता येणार नाही! कारण तो तर भास आहे पृथ्वीच्या फिरण्यामुळे झालेला... म्हणजे कदाचित थोड्यावेळापूर्वीच लिहिले असेल!(परत गंडलो!) काही कळेनास झालाय आता, या अनंत थंड काळ्याकुट्ट अवकाशात माझे विचार इकडे तिकडे भरकटले आहेत! यातून बहुधा विवेक ठाकूरच योग्य मार्ग दाखवू शकतील! ;)
  • Log in or register to post comments

पण काल तर निव्वळ भास आहे,

प्रसाद गोडबोले
Wed, 03/22/2017 - 18:39 नवीन
पण काल तर निव्वळ भास आहे, अर्थात हे तुम्हाला जरी पटलं तरी इतरांना लगेच पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. हा विषय वादाचा नाही, बोधाचा आहे. तुम्ही लगेच त्यावर मानसिक उहापोह करु नका त्या उलगड्यात काही काळ जगा, कालरहिततेचं वेळीअवेळी स्मरण करत तीचा निवांतपणा, त्या बोधातून येणारं स्वास्थ्य उपभोगा. जेव्हा तुम्ही या बोधातून काही दिवस जगाल तशी तुमच्या जगण्यात, हालचालीत सहजता यायला लागेल.
फार फार पुर्वी हा लेख वाचला होता, त्याची आज परत आठवण आली ! लेख पटला आहे , कळला आहे , आणि वर म्हणल्या प्रमाणे ती सहजता अधुन मधुन अनुभवला येत आहे . :) संक्षी ह्या विषयावर अजुन लेखन येवु दे जरा विस्तृत !
  • Log in or register to post comments

लेख प्रकाशित होऊन आज

संजय क्षीरसागर
Wed, 03/22/2017 - 19:22 नवीन
ऑलमोस्ट पाच वर्ष (16 Jul 2012 ते 22 Mar 2017) झाली ! लोकांना अनुभवापेक्षा प्रतिसाद रेटण्याची घाई असते हे मी पूर्वीच म्हटलं होतं ! आय एम रियली हॅपी फॉर यू .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पुढची चर्चा चतुर्मितावर ?

अनन्त्_यात्री
गुरुवार, 03/23/2017 - 15:19 नवीन
स्थल-काल हे एक एकात्मिक चतुर्मित (की बहुमित) वितान (क॓टिन्युअम) असताना केवळ कालावर चर्चा का? स्थल-कालावर का नाही?
  • Log in or register to post comments

स्थल-काल ही केवळ शब्द योजना आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 03/23/2017 - 15:48 नवीन
स्थल ही वस्तुस्थिती आहे पण काल हा भास आहे. वस्तुतः काल अशी गोष्टच या जगात नाही, तो फक्त कन्विनियंस आहे. म्हणजे घटना घडायला स्थलाची आवश्यकता आहे पण कालाची नाही. काल ही उपयोगी कल्पना असली तरी ती मानवनिर्मित आहे. उदा. लग्न करायला स्थलाची (आणि स्थळाची !) आवश्यकता आहे, पण मुहूर्त अनावश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा