Skip to main content

टोल वसुली योग्य की अयोग्य....

लेखक निश यांनी शुक्रवार, 15/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस राज्य शासनाच्या टोल वसुली वरुन मनसे व राज्य सरकार ह्यांच्यात झगडा चालु आहे. रस्ता बांधणीसाठी लागलेली रक्कम सरकारने टोल वसुलिच्या रुपात वसुल करुन झाली असतानाही सरकार लोंकाच्या खिशातुन अजुनही टोल घेत आहे स्वताचे व ठेकेदारांचे हित संबंध सांभाळण्यासाठी. बर हे टोल वसुल करूनही रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. टोल रुपात घेतले जाणारे रुपये खुप आहेत. पुणा मुंबई एक्सप्रेस वेला टोल आहे रुपये १६५ खाजगी वाहनाना. ईतर वाहनांचा वेगळाच व तोही एका वेळचा. जर राज्य शासन ह्याच प्रकारे लुट करणार असेल तर मला वाटत काही दिवसानी गल्लो गल्ली टोल नाके दिसतील. अतिशययोक्ती सोडुन देऊ पण ज्या प्रकारे जनतेच्या पैशाची लुट होत आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे. अजुनही सरकारचा टोलबाबतची अरेरावी चालुच आहे. टोल नाके बंद व्हायलाच हवे आहेत. तुमची मत काय आहेत ह्या विषयीची?

वाचने 5771
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

टोल अन जिलब्या या विषयी माझं एक सारख मत आहे. ;)

बांधा वापरा व हस्तांतरित करा या धोरणाची मुहूर्तमेढ देशात प्रथम महाराष्ट्राने रोवली अन रस्त्यांचा चांगला विकास करून दाखवला. मात्र गेल्या काही वर्षांत ज्याप्रकारे या धोरणाचा गैरवापर सुरू आहे त्यामुळे या मुद्द्यावर सखोल चर्चा होऊन पुनरावलोकन आवश्यक आहे. अवांतर -वाहन नियमित वेगात असताना स्वयंचलित प्रकाराने हे शुल्क भरण्याची सुविधा सुरू व्हायलाच हवी. उगाच दरवेळी गाडी थांबवल्याने वेळ व ऊर्जा उगाचच वाया जाते. बाकी सगळीकडे तंत्रज्ञानाचा वापर सुरू असताना नेमके इथेच वेगळे धोरण हे भ्रष्टाचाराच्या शंकेला वाव देणारे आहे.

अवांतर -वाहन नियमित वेगात असताना स्वयंचलित प्रकाराने हे शुल्क भरण्याची सुविधा सुरू व्हायलाच हवी. उगाच दरवेळी गाडी थांबवल्याने वेळ व ऊर्जा उगाचच वाया जाते. बाकी सगळीकडे तंत्रज्ञानाचा वापर सुरू असताना नेमके इथेच वेगळे धोरण हे भ्रष्टाचाराच्या शंकेला वाव देणारे आहे.

जंन्तेनं टोल देनं योग्य हाये पन आमच्या सारख्या राजकार्नी लोकांशी वळख आस्लेल्यांनी द्यायचे कारन न्हायी. जे चाल्लय ते बरूबर हाये.

अनेक ठीकाणी टोल वसुली पूर्ण होऊन गेली तरी टोल वसूल केला जात आहे. त्यामुळे वाहतुकीच्या वेगाला खीळ बसून नाहक इंधनही वाया जात आहे. महाराष्ट्रात प्रतिकिलोमीटर टोल आकारणीही इतर राज्यांच्या तुलनेत उगाच जास्त आहे. या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहीजे. मला वाटतं हा अन्याय आपण उगाच सहन करत आहोत. त्याविरुद्ध मनसेने चालू केलेला लढा हा योग्य आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मराठी गिरणी कामगारांना त्यांची हक्काची घरे का मिळवून देत नाही? किंवा गेला बाजार निदान लढा तरी का करत नाही?

In reply to by मुक्त विहारि

का गिरणी कामगार काय जावई आहेत मनसेचे? चायला गिरणी कामगारांनी स्वतःच्या घराची सोय स्वतः करायला नको का? असो तो विषय वेगळा. गिरणी कामगारांनी संप काय मनसेला विचारून केला होता का? तेव्हा देखील बाळासाहेबांनी संप करू नका थोडा वेळ थांबा असे सांगितले होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>महाराष्ट्रात प्रतिकिलोमीटर टोल आकारणीही इतर राज्यांच्या तुलनेत उगाच जास्त आहे. या विषयी साशंक आहे. ('गुळगुळीत' रस्त्यांच्या राज्यात दोन वर्षे राहिलेला) नितिन थत्ते

नव्याने का आणला गेला? लोकांचे लक्ष मोठ्या प्रश्नांकडून , फालतू प्रश्नांकडे वळवायला तर नव्हे? आज काल ह्या राजकारणी लोकांचे काही सांगता येत नाही...

मनसेचे आंदोलन योग्य आहे. आजवर कुठल्याही टोलनाक्यावर मी तरी टोल आकारणी कधी संपणार याची पाटी पाहिलेली नाही. ठाणे शहर तर टोल नाक्यांनी वेढलेले असुन ठाण्यात दाखल व्ह्यायचे असेल तर टोल देण्या शिवाय पर्याय नाही ! जनतेची लुट सुरु असुन ती बंद होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत ! :(

शे-पाचशे इकडे तिकडे खर्च झाले तर चालतील पण मला टोल द्यायचं लैच जीवावर येतं. श्री अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आता हे टोलनाक्यावाले बोर्ड लावायला लागले. किती खर्च किती येणे वगैरे. आपण जाणार्‍या येणा-यांना याबाबती काही इंट्रेष्ट नसतो. बाकी, 'लोकल' म्हटल्यावर आमच्याकडील टोल नाक्यावाला मला सूट देतो. बाकी, कोणाकडे टोल चुकवायच्या खास युक्या खास असतील तर सांगा रे....! :) >>>>टोल वसुली योग्य की अयोग्य.... अयोग्य. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>कोणाकडे टोल चुकवायच्या खास युक्या खास असतील तर सांगा रे....! १) पांढर्‍या स्कोर्पीओमधून फिरा. २) मागच्या काचेवर आणि पुढे मागे नंबरप्लेट वर घड्याळ / भगवा / भाऊ, आप्पा, तात्या आणि दादांचा आशीर्वाद रंगवून घ्या. ३) पुणे -MH 12 वाल्यांनी खेड शिवापूर, पिंपरी चिंचवड MH14 वाल्यांनी सोमाटणे, लोणावळा आणि शक्य असेल तर शेडूंग येथे टोलवाल्याकडे; त्याने आपले १० पिढ्यांचे देणे असल्याच्या थाटात रागाने बघावे, १० सेकंदात फाटक आपोआप उघडेल. चेहर्‍यावर गुर्मी, वाढलेली दाढी, गळ्यात सोने आणि लाल डोळे असतील तर ५ सेकंद पुरेसे होतात. (चुकून थोडावेळ लागलाच तर बिन्धास्तपणे टोलवाल्याच्या घरातल्यांची योग्य भाषेत विचारपूस करावी) ४) अ‍ॅम्ब्युलन्स, शववाहीकेच्या मागे Convoy / Escort असल्याच्या थाटात गाडी चालवावी. :-)

In reply to by मोदक

ऑलरेडी दुसर्‍या रंगाची गाडी असल्याने हा 'पांढरा रंगाचा' पर्याय शक्य नाही. घड्याळ, भगवा झेंडा, निळा झेंडा, भाऊ, दादा, तात्या, आप्पा, असल्यावर टोल वरुन सूट मिळेल याची काही खात्री नाही. एक दिवस आम्ही मित्र जरा जिद्दीला लागलो. जे व्हईन ते व्हईन टोल द्यायचा नाही असं ठरवलं. ट्राफीक ज्याम झाली. नाक्यावाला म्हणाला पोलिसांना फोन करतो, आम्ही म्हणलं 'कर' [इथं एकदोघांचा धीर खचला] हॉर्नचा आवाज सुरु. मागच्या गाडीवाले झाले आमच्या गाडीजवळ जमा. 'घ्या ना भो गाडी पुढं' आम्ही एक नै का दोन नै. मग सज्जन लोकांची एक फलटन आमच्या गाडीजवळ आली. ''असं लोकांना त्रास देणं बरं नाही. आमची पुढे कामं खोळंबली आहेत. आजारी रुग्ण मागे असू शकतात. यावर योग्य मार्गानं लढलं पाहिजे'' भारावलेल्या विचारांनी, आम्ही टोलनाक्यावाल्यापुढं शेपूट घातलं. एक दिवस आमच्या जिल्ह्या सेना खासदारांच्या सौ. आणि सोबत काही कार्यकर्त्यांच्या गाड्या या रस्त्याने जात होत्या. टोलनाक्यावालाची मग्रुरी काय विचारता. नाक्यावाला आपला हट्टालाच पेटलेला. गाडी सोडेना. सेनेचं म्हटल्यावर कठीन काम. बाईंनी गाडीला बाजूला लावली. फोनाफोनी झाली. वाळूजच्या एमायडीसीतून प्रचंड कार्यकर्ते हजर. दोन तीन जेसीबी हजर. दोन तासात नाका भुईसपाट. पंधरा दिवस टोल फ्री होता आमचा रस्ता. -दिलीप बिरुटे

नंदन मोड सुरू> टोल बंद करण्याचा मानसिक तोल या टोळभैरव सरकारने दाखवावा यासाठी मनसेने दिलेला हा टोला अगदी योग्य आहे!! नंदन मोड समाप्त>

हे ठेकेदार अहो-रात्र मेहनत करून रस्ते बांधतात. शिवाय मुंबई-पूणे तर जावू दे पण संपुर्ण महाराष्ट्रात इतका पावूस पडतो की पहिल्याच पावसात रस्त्याला खड्डे पडतात. मग हा रस्ता परत बांधायला लागतो. मग त्यांना पैसे नकोत का मिळायला?

युती सरकारने उड्डाण पूल मुंबईत बांधून जमाना झाला. त्या वेळच्या अर्ध विजारीतील किशोर आता बाप्या झाला त्यातले काही बाप झाले., मात्र अजूनही मुंबईत शिरण्यासाठी टोल द्यावा लागतो. हीच कथा नवी मुंबईची जनतेच्या कष्टाच्या पैक्यावर डल्ला मारणाऱ्या टोळ भैरावांचा नायटा झालाच पाहिजे. आज गांधीजी असते तर त्यांनी टोळ न देण्याचे असहकार धोरण स्वीकारले असते. व टोळ यात्रा करत गाडीतून लाखोंच्या साक्षीने टोळ नाक्याहून टोळ न भरता जाऊन सविनय कायदेभंग चळवळ उभारली असती. आज बापुजी ,महात्मा ( मला एवढीच विशेषण माहिती आहे ) उगाच विषाची परीक्षा नको म्हणून राष्ट्रपिता हा शब्द टाळतो. आज हयात असते. तर टोल पावत्यांची जाहीर होळी गेली असती. ह्याने मग हदयपरिवर्तन नक्कीच झाले असते.

In reply to by निनाद मुक्काम …

टोळ भैरावांचा नायटा झालाच पाहिजे. तुम्हाला टोळभैरवांचा नायनाट म्हणायचं असावं. आपण त्यांना टोळभैरव न म्हणता टोल भैरव म्हणालात तरी चालेल. ;)

खड्ड्यातून वाट काढता काढता अचानकच गुळगुळीत रस्ता लागला की खुशाल टोलनाका जवळ आलाय हे ओळखावं. :) यांचे करते करवीते दुसरेच असलेतरी प्रत्येकवेळी टोल नाक्यावर बसलेल्या पोरांच्या दोन थोतरीत द्यावसं वाटतं.

टोलमुळे अर्थव्यवस्थेमधे पैशाचे चलनवलन वाढते, अनेकांना रोजगार मिळतो त्यामुळे टोल बंद करु नये. भारताला नव्या युगात जाण्यासाठी टोलचा राजमार्ग बंदकरुन चालणार नाही. आमच्या महान नेत्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही लवकरच महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा टोल आकारणी करता येईल का याची चाचपणी करुन प्रगतीची गंगा गल्लीबोळात आणणार आहोत. विरोधकांना आमची प्रगती सहन होत नसल्याने ते कोल्हेकुई करत आहेत त्यांचा योग्य तो बंदोबस्त आम्ही करुच. कदाचित एक दोन टोल नाके आम्हाला "त्यांना" वसुल करु द्यावे लागतील पण व्यापक हिताकडे पाहून आम्ही तो त्याग करु हे नक्की. जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय टोल ! इथे टोल ! तिथे टोल !!

In reply to by नाना चेंगट

तो दिवस आता दूर नाही जेव्हा .... तुमच्या घराच्या दाराबाहेरच विजेच्या मीटर सारखे टोल मशिन लावले जाईल .... घराबाहेर पडण्यासाठी टोल भरायचा तसेच आपल्याच घरात परत येताना पण टोल भरायचा ... नाहीतर तुमच्याच चावीनेसुद्धा तुमच्याच घराचे दारच उघड्णार नाही अशी व्यवस्था केलेली असेल. आता एखादा 'सदाशिव पेठी ' (म्हणजे आमच्यासारखाच गरीब बिचारा) माणूस जर हा टोल टाळण्यासाठी घरातच बसून काम करू लागला तर? तर सलग दोन तीन दिवस घराबाहेर पडला नाही म्हणून तिथून पुढे रोज घरातील सगळ्यांना डबल टोल आकारला जाईल ... शिवाय इंटरनेट्चा अतिरिक्त वापर करणारा समाजद्रोही माणूस म्हणून त्याच्यावर एखादा खटलादेखील भरण्यात येईल. ह्याच लॉजिकने, श्वासोछ्वास करून तुम्ही हवा प्रदूषण करता म्हणून प्रदूषण कर / अधिभार लावण्यात येईल .... म्हणजे पेठेतील पादचारीदेखील कर आकारणीच्या परीघात (स्कोप हो ...) आणले जातील ... || श्री टोळ्भैरवनाथ प्रसन्न ||

सरकारने काही केले नाही तरी लोकं रडगाणी गातात, आणि काही केले तरी रडगाणी गातात. मुळात आपल्या शहराची हद्द सोडून बाहेर बोंबलत जावेच कशाला ? ह्या अशा विनाकारण बोंबल हिंडणार्‍या लोकांमुळेच रस्त्याची अवस्था खराब होते आहे. आज काय पाऊस पडला, निघाले उकिरडे फुंकायला ताम्हिणी घाटात. उद्या काय नवी गाडी घेतली की निघाले एक्सपेस हायवे बघायला... येडचाप कुठले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परिकथेतील राजकुमार साहेब, जबराट , सही, ज्याम भारी, अफलातुन वगैरे वगैरे....

टोल बंद करुन राज्याचा विकास थांबवायचा का ? (लिंकला क्लिक केल्यावर पेप्राच्या तळाला बातमी आहे) या बातमीत टोल बंद करायचा निर्णय राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घ्यावा लागेल आणि तो जनतेला सांगावा लागेल असं म्हटलंय. अहो, घ्या की निर्णय. टोल बंद करायचा निर्णय घेतल्यावर तो निर्णय जनतेला सांगायची काहीच गरज नाही. की, बातमी समजून घेण्यात माझा कै घोळ होतोय. बाकी, या टोल बद्दल पूर्वी मिपावरच मिपाकरांनी टोल भरा प्रवास करा यावर चांगला काथ्याकूटला आहे. -दिलीप बिरुटे

टोल वा टोलवी नेहमीच वाईट ... काय तो सोक्श्मोक्ष एकदाच लावा.. मा. मंत्री महोदय याचे अर्थ शास्त्र सांगते की टोल वसुलि चा कालावधी आधिच ठरवल तरि जास्त (टोल वसुली ) झालि तरी सरकार काही करू शकत नाही ( या रस्त्यांवरच्या वाहनांचे अंदाज कोण ठरवते हेच मुळी आम्हा पामरांस थावे नाही)

सौजन्य: संतोष प्रधान यांचा लोकसत्तेतील लेख टोलसाठीचा मराठी शब्द कळल्यामुळे समाधान वाटले.