पैसे सोडून बोल...

धन्या जनातलं, मनातलं
पंधरा दिवसांपुर्वीची गोष्ट. लोकेश, माझा क्युबिकलमेट मला अचानक म्हणाला, "सरजी थोडा हेल्प चाहीये." लोकेश आणि मी गेले वर्षभर एकाच क्युबिकलमध्ये बसतोय. दोघांचंच क्युबिकल. त्यामुळे आम्ही फक्त कलीग न राहता बर्‍यापैकी मित्र झालो आहोत. माझ्याच वयाचा आहे तो. लग्नाला तीन वर्ष झालेली. एक छोटी मुलगीही आहे त्याला. त्यामुळे अधूनमधून पाच दहा हजार मागायचा माझ्याकडे. आठवडयाभरात परतही करायचा. आताही त्याने असेच पैसे मागितले. पण थोडे जास्त. तीस हजार. "क्यूं रे इतना? कुछ प्रॉब्लेम हैं क्या?" "अरे नही सरजी. एक दोस्त को बहुत जरुरत हैं. आप दे दो. मैं पक्कासे ये मंथ एंड को दे देता हुं आपका पैसा." "बस क्या दोस्त, मैंने वैसा कुछ कहा क्या. दे देता हुं मैं. लेकीन थोडा संभालके यार. आजकल लोग पैसे के मामले बे बहूत अजीब हो गये हैं." मी त्याच्या बँक अकाऊंटमध्ये तीस हजार टाकले. लोकेशच्या मित्राला ते पैसे तिसर्‍याच मित्राच्या अकाऊंटमध्ये हवे होते. असेल काही अडचण. त्यानूसार लोकेशने ते तीस हजार त्या तिसर्‍या मित्राच्या अकाऊंटमध्ये विशेष ओळख नसताना पैसे टाकले. ते पैसे त्याच्या मित्राला मिळालेही. महिना संपला. लोकेशने न विसरता मला पैसे ट्रान्स्फर केले. पण एक मोठा लोचा झाला. पैसे ट्रान्सफर करण्याच्या अकाऊंट लिस्टमध्ये माझ्या नावाच्या खाली लोकेशच्या मित्राच्या मित्राचे नाव होते. लोकेशने माझे नाव सिलेक्ट केले. पण माऊसला स्क्रोल बटन असल्यामुळे चुकूण स्क्रोल झाले आणि त्या तिसर्‍या मित्राचे नाव सिलेक्ट झाले. नेक्स्ट बटन दाबले. पुढचं पान पैसे ट्रान्सफरसाठी दिलेल्या माहितीच्या कन्फरमेशनसाठी असतं. काही चुकीची माहिती असेल तर ते डीटेल्स बदलता येतात. इथे मात्र सवयीने लोकेशने डोळेझाक केली आणि तीस हजार लोकेशच्या मित्राच्या त्या अकाऊंटवाल्या मित्राला ट्रान्सफर झाले... पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर लोकेशला चूक कळली. त्या अकाउंटवाल्या मित्राला फोन केला. त्यानेही आता मिटींगमध्ये आहे, मीटींग संपली की पाहतो असं म्हणून फोन ठेवून दिला. त्यानंतर मात्र ते साहेब लोकेशचा फोनही उचलेनात आणि मेसेजला रीप्लायही देईनात. लोकेशने आपल्या मित्राला हे सारं सांगितलं. पण हे अकाऊंटवाले महाशय मित्रालाही दाद देईनात. बँकेला फोन केला. बँकवाले म्हणाले, बँक याच्यात काहीच करु शकत नाही. ऑनलाईन मनी ट्रान्सफरच्या वापरासाठीच्या नियमावलीत असं क्लियर लिहिलं आहे की अशा चुकांना बॅंक जबाबदार नाही. फार तर आम्ही तुम्हाला त्या ट्रान्सॅक्शनचे डीटेल्स लेखी देऊ. बँकेने त्या मित्राचे खाते चेक केले. साहेबांनी ते तीस हजार त्याच दिवशी खात्यातून काढले होते. ते अकाउंटवाले साहेब चेन्नईला एका नामांकीत कंपनीत संगणक अभियंता आहेत... ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- परेश माझा चुलत चुलत भाऊ. मूंबईला एका मेडीकल सर्जिकल इक्विपमेंट बनवणार्‍या कंपनीत टेक्निशीयन. एक दिवस अचानक त्याचा फोन आला. "दादा, मी आणि माझे मित्र भागीदारीत एक सर्जीकल एक्विपमेंटची कंपनी विकत घेतोय. माझ्या हिश्श्याचे पैसे उभे करण्यासाठी मला तुझ्याकडून मदत हवी आहे." "किती हवेत?" "पन्नास हजार." आधी पैशांच्या बाबतीत वाईट अनुभव असल्यामुळे मी एव्हढे पैसे त्याला देणे शक्यच नव्हतं. पण लहान भाऊ काहीतरी करतोय म्हणून त्याला नाही म्हणणं माझ्या जीवावर आलं होतं. शेवटी मी मनाचा हिय्या करुन पंचवीस हजार दिले त्याला. गणपतीत दिलेले पैसे दिवाळीत परत करायचे असं ठरलं. दिवाळी आली आणि गेली. शिमगा आला. शिमग्यानंतर त्याचं लग्न झालं. साहेब मला पैसे परत करण्याचे नाव काढीनात. मी फोन केला की उचलायचाच नाही. दोन तीन वेळा सलग कॉल केला की फोन स्विच ऑफ करायचा असे प्रकार साहेबांनी सुरू केले. एकदा कधीतरी फोन उचलला त्याने. दादा मी अमुक अमुक तारखेला पुण्याला येतोय तेव्हा पैसे देईन. त्या तारखेनंतर दोन महिने गेले तरी साहेबांचा पत्ता नाही. पुढच्या वर्षीचे गणपती आले. दिवाळी आली. त्याच्या छोटया भावाचंही लग्न झालं. माझी कुठे भेट झाली की साहेब बेशरमसारखे हवापाण्याच्या गप्पा मारायचे. पण पैसे देण्याचे नाव काढायचे नाहीत. आमचा हा पैशाचा व्यवहार त्याच्या बाबांना म्हणजे माझ्या काकांनाही माहिती होता. पण ते ही सोयिस्करपणे डोळेझाक करत होते. त्यांच्याकडे दोन दोन मुलांची लग्न करायला पैसे होते. पण मी त्यांना गरजेच्या वेळी दिलेले पैसे परत करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. शेवटी मी काकांच्या छोटया मुलाला हे सारं सांगितलं. तो बर्‍यापैकी सेन्सिबल आहे. त्याने साडे बारा साडे बारा असे दोन टप्प्यात पैसे दिले. अर्थात ते पैसे त्याने घरातूनच घेऊन दिले असणार. मी त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी पैसे दिले ही माझी चुकच झाली होती.... -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मी अमेरिकेत असतानाची गोष्ट. सप्टेंबर महिना असावा. एका सकाळी सकाळी अश्विनचा, माझ्या मित्राचा फोन आला. "अरे मी अशा अशा अडचणीत आहे. मला पन्नास हजार रुपये दे. दिवाळीत माझे बोनस आणि अ‍ॅरीयर्सचे पैसे मिळणार आहेत. ते मिळाले की मी तुझे पैसे तुला परत करेन." अश्विन खुपच जवळचा मित्र होता. मी भारतात असताना त्याच्या घरी येणं जाणं होतं. त्याची बायको मला भाऊ मानायची. पैसे नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. पण पन्नास हजार जरा जास्तच वाटत होते. नाही दिले तर काय करणार असाही प्रश्न होताच. "हे बघ माझे पैशाचे सारे व्यवहार सध्या बाबा पाहतात. मी माझ्या भारतातल्या अकाउंटमधून ऑनलाईन पन्नास हजार काढले तर ते बाबांना लगेच कळेल. आता मी तुला वीस हजार रुपये देतो. बाबांना काहीतरी सांगेन मी. बाकीचं नंतर बघू." मी त्याला अशा पद्धतीने वीस हजार दिले. यथावकाश मी भारतात आलो. दिवाळी झाली. माझे पैसे देणे बाजूलाच राहिलं, माझ्या मित्राच्या बायकोने घरची परिस्थिती कशी वाईट आहे, अश्विनला एक कोर्स करायचा आहे म्हणून तू पाच हजार दे असं म्हणून पुन्हा एकदा पैसे घेतले. या गोष्टीला आता तीन वर्ष झाली. अश्विनचं बाकी सारं व्यवस्थित चालू आहे. मला कधीतरी अचानक पैशाची गरज पडते. मी आपले पैसे अश्विनकडे आहेत म्हणून फोन करतो. त्याचं रडगाणं सुरु होतं. "अरे तू पाहतोयस ना मी किती वाईट परिस्थितीतून जातोय. माझ्याकडे पैसे असते तर मी दिले नसते का?" मी हताशपणे फोन ठेवून देतो. माझे ते पंचवीस हजार बुडाल्यात जमा आहेत. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ही सुद्धा मी अमेरिकेत असतानाचीच गोष्ट. माधव माझा खुप जुना मित्र. मी बारावी झाल्यानंतर मेडीकलच्या सीईटीच्या कोचिंगसाठी कोल्हापूरला गेलो तेव्हा त्याच्याशी ओळख झाली. तो तेव्हा मराठीतून एम ए करत होता. मी काही मेडीकलला गेलो नाही. इंजिनीयरींगला असताना मी त्याला निळं अंतर्देशीय पत्र पाठवत असे. तो ही उत्तरं देत असे. मी अमेरिकेला जाणार आहे हे कळल्यावर तो मला भेटायला मुंबईला आला. आम्ही माझ्या गावी गेलो. मला आमच्या या पत्रातून टिकलेल्या मित्रीचं खुप अप्रुप वाटायचं. एक दिवस त्याचा फोन आला. म्हणे मला दहा हजार रुपये हवेत. एक डॉलर म्हणजे पन्नास रुपये. दहा हजार काही विशेष नव्हते. कधी परत करणार वगैरे काहीही न विचारता मी तेव्हढे पैसे त्याला दिले. पुढे भारतात आल्यावर एकदा सहज म्हणून पैसे कधी परत करणार आहेस म्हणून विचारलं. देतो लवकरच म्हणाला. आणि त्यानंतर कधीही त्याने माझा फोन उचलला नाही. फक्त रिंग होऊ दयायचा. मी कंटाळून फोन करणं बंद केलं. मला ते पैसे परत हवेच होते असं काही नव्हतं. पण पैसे मागितल्यानंतर मात्र खुप विचित्र वागला तो. पुन्हा पंधरा दिवसांनी वगैरे फोन केला तेव्हा लक्षात आलं की त्याने फोन नंबर बदलला आहे. मी त्या दहा हजारांसाठी कुठे कोल्हापूरला जाणार होतो. आणि त्याहीपेक्षा म्हणजे त्याने त्याचा जो काही प्रॉब्लेम होता तो मोकळेपणाने सांगायला हवा होता.हे असं फोन न उचलणं आणि नंतर नंबर बदलणं या गोष्टीचं खुप वाईट वाटलं. सहा सात वर्ष अंतरदेशीय पत्रातून टिकलेली आमची मैत्री त्याने अशा पद्धतीने संपवली. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आता मात्र मी शहाणा झालोय. कुणी म्हटलं की अरे थोडी मदत हवीय की त्यानं पुढचं काही म्हणायच्या आधीच मी म्हणतो, "पैसे सोडून बोल". मग तो कुणीही, कितीही जवळचा असो. पैसे देण्यास नाही म्हटलं तर नातं दुरावेल, हरकत नाही. जे नंतर होणार आहे ते आता होईल...
वर्गीकरण
लेखनप्रकार

74 टिप्पण्या 19,059 दृश्ये

Comments

सुहास.. नवीन

ए धन्या , जरा १००० रू. दे ना ! , पुढल्या आठवड्यात परत करतो ;) ओके, जोक्स अपार्ट !! संभाळुन करत जा की रे व्यवहार !! ;) ( कर्ज डोक्यावर असलेला )

प्यारे१ नवीन

In reply to by सुहास..

अरे त्या वाश्याला १००० देण्यापेक्षा मला च दे. नक्की परत देतो. वाश्याची काही ग्यारन्टी नाही रे! ;) मी पैसे देईन हा पगार झाला की लगेच. :) (वाश्या तुला किती पुरतील रे? ;) )

धन्या नवीन

In reply to by कपिलमुनी

सकाळमध्ये मुक्तपीठ नावाचं काहितरी स्तंभ की पुरवणी आहे. कधी वाचलेलं नाही. तुम्ही शिवी घातली आहे की चांगलं म्हटलंय?

परिकथेतील राजकुमार नवीन

धन्याशेठ, लेखाला 'विकत घेतलेले शहाणपण' असे नाव शोभले असते बघा.

धन्या नवीन

In reply to by प्रचेतस

त्या लोकेशने दिले का पैसे मग?
लोकेशने माझे पैसे दिले. मात्र त्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याला खुप कटकटींना सामोरं जावं लागेल असं दिसतंय. कदाचित पोलिसातही तक्रार करावी लागेल.

सुधीर नवीन

पैशाच्या बाबतीत काही नियम जे पाळायलाच हवेत. १. कोणालाही अगदी कितीही जवळचा मित्र-नातेवाईक असला आणि कितीही संकटात असला तरी उधारी कधीच देऊ नये. २. जर का तुम्हाला फारच दया येत असेल तर स्वेच्छेने जमतील तेवढेच मदत म्हणून (अर्थात परत करण्याच्या अटीवरच) द्यावेत पण दिल्या नंतर व्यवहार विसरून जावा जणू काही पैसे परत मिळणार नाहीत. देणार्‍याने पैसे परत दिले तर "लाभ" झाला समजावा.

स्पा नवीन

In reply to by सुधीर

चायला लेका... पैसे जास्त झालेले का रे तुला... ३ ३ वेळा फसलास ते ?

जयंत कुलकर्णी नवीन

काही मार्ग - ज्याला पाहिजे आहेत आणि जर त्याला आपल्याला द्यायचे असतील तर दुसर्‍या कडून द्यावेत एका चेकवर सही आणि तारीख न घालता त्याच्याकडून घ्यावा. मराठी माणुस सही केली की प्रकरण जास्त गांभिर्याने घेतो..हाही अनुभव.. हे लोक बँकेचे पैसे वेळेवर भरतात पण आपले देत नाहीत...दुर्दैवाने लोकांच्या पैशाची बेफिकिरी मराठी माणसात जास्त दिसते... हे अनुभवाने सांगतोय..

मन१ नवीन

In reply to by जयंत कुलकर्णी

मध्यंतरी मी कुणाकुणाला उसनी म्हणून काही रक्कम देताना असाच आधीच पोस्ट डेटेड चेक घेतला. (माझा सहकारी म्हणाला "विश्वास ठेव, महिन्याभरानं कस्सही करुन देणारच आहे" म्हटलं देणारच आहेस ना, मग एक चेक दे की दोनेक महिन्यानंतरचा. म्हणत असशील तर मी दोनच काय चार महिनेही थांबू शकतो की.) मी रक्कम दिली. चेक घेतला. चार महिन्याने सारे सुरळित झाले. फक्त आख्ख्या हापिसात माझ्या नावाने बोंब झाली. ग्रुपमधील बर्‍याच जणांनी नाके मुरडली. (काहीजण ह्यास माझी बदनामी झाली असेही म्हणाले.) माझा इलाज नव्हता.

गवि नवीन

धन्या.. अरे असंख्य वेळा असले मनस्ताप देणारे अनुभव आलेत रे. अगदी शंभर टक्के अस्सेच. अर्थात इतक्या मोठ्या रकमा आणि इतक्या वेळा नव्हे पण कमी स्केलवर असेच अनुभव आहेत बर्‍यापैकी. जवळचेच लोक असतात काय करणार. या उलट माझा एक पॉझिटिव्ह अनुभव मित्राचं नाव न घेता सांगतो. माझा कॉलेजातला एक मित्र. आता अनेक वर्षं आम्ही एकमेकांपासून हजारेक किलोमीटर लांबच्या शहरांत राहतो. अनेक वर्षे प्रत्यक्ष भेटही नाही. दोघांचीही नोकरदार स्थिती आणि संसार एकसारख्याच स्थितीत. तरीही आमच्या दोघांमधे आपसूक एक विश्वासार्ह मनी एक्स्चेंज डेव्हलप झालेलं आहे. अगदी मेडिकल इमर्जन्सीपासून ते खरेदीच्या मोहात पडून क्रेडिट कार्ड बिलाच्या तडाख्यात सापडलो आहे असं खरंखुरं जे काही असेल ते कारण सांगून आणि इव्हन न सांगताही आम्ही एकमेकांना फक्त एस एम एस किंवा एका ओळीचा फोन करतो. समोरचा किती देऊ शकेल याची कल्पना ठेवून सरळ रक्कम मागितली जाते. समोरुन शक्य नाही असं उत्तर आलं तरी दुखावणे वगैरे प्रकार होत नाही, कारण नाही म्हणतोय म्हणजे खरंच पैसे हाती नाहीयेत यावर गाढ विश्वास आहे. पण नकार हा अपवादच.. बर्‍याचदा फक्त ओक्के असं उत्तर देऊन अर्ध्या तासात पैसे ट्रान्सफर झालेले असतात. डिफॉल्ट वेळ १ महिना. एक महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत पैसे परत जमा झालेले असतात. हे सर्व दोन्ही बाजूंनी.. आणि दहा-बारा वर्षांत एकदाही "कधी देतोस माझे पैसे?" असं तोंड उघडून म्हणायची वेळ दोघांवरही आलेली नाही. घरच्या इतरांना पत्ताही न लागता हा व्यवहार बिनबोभाट चालू असतो.. असा मित्र लाभणे ही परमेश्वरी कृपाच. अर्थात हा अपवाद झाला. पैसा हा कोणतंही नातं बिघडवू शकतो आणि पैशाबाबत खेळ हा आगीशी खेळ आहे हे खरंच.

धन्या नवीन

In reply to by गवि

अगदी असाच माझाही एक मित्र आहे. नात्यातलाच. काकीचा छोटा भाऊ. मी दिड वर्ष बाहेर होतो. बाबांना माझं बॅ़क अकाऊंट हा झेपणारा प्रकार नव्हता. मी बिनधास्तपणे माझं एटीएम कार्ड, इंटरनेट बँकिंगचे युजर आयडी, पासवर्ड सारं काही दिड वर्षासाठी त्याच्याकडे दिलं. त्यानंही माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. अगदी आजही जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा पैशांची देवाणघेवाण करतो. पैसे जवळ असतील तर पुढच्या पाच मिनिटात खात्यात जमा होतात. त्यानंतर "माझे पैसे दे" असं म्हणायचीही कधी वेळच येत नाही. गरज संपली आणि पैसे उपलब्ध झाले की आम्ही लगेच पैसे परत करतो. पण असे मित्र विरळाच असतात.

यकु नवीन

हॅहॅहॅ धन्या किती पैसे वाटतोस बे? अशा लफड्यात अडकलेले पैसे वसुल करण्याचं कॉन्ट्रॅक्ट देतो काय मला? ;-) ही बघ केस ष्टडी - आमची एक मुंबईची मैत्रिण. घरची बरी. इंटरनेटवर सतत चॅटींग वगैरे करायची. आमची ओळख पण याहू वर झालेली. तिला एकदा कुणी बँगलोरचा आयटीवाला भेटला. तो तेव्हा प्रोजेक्टसाठी यूएस मध्ये होता, नंतर तिला भेटायला मुंबईत वगैरे आला. त्यांची ओळख वगैरे वाढली. ही आमची मैत्रिण लग्नाळू वगैरे होतीच. पण हा बाब्या मॅरीड होता. पण त्याच्या बायकोसोबत किटकिटी सुरु असल्याने डिव्होर्स घेणार आहे वगैरे तो तिला बोलायचा म्हणे. रोजच्या बोलण्यातून ह्या बँगलोरवाल्या बाबाने तिच्याकडून 60 हजार रुपये दोस्तीमध्‍ये घेतले. तिनेही दिले. दोन महिन्यात तिला तो पैसे परत देणार होता. सहा महिने उलटले तरी त्याने तिला पैसे दिले नाहीत. यूएस में हु, बँगलोर में आ रहा हूं, सॅलरी नही मिली, खर्च ज्यादा हुआ - डिव्होर्स हो गया- वाइफ को पैसा देना पडा काहीही सबबी सांगायचा. हिने तोपर्यंत घरी काहीबाही सांगून ते 60 हजार रुपये कुठे गेले त्याची जुगाड केली. पण तिचे वडील पासबुक दाखव (अभ्युदय बँक) म्हणाले तेव्हा ही टरकली - आणि एके दिवशी फोनवर रडायला लागली. आय लव्ह यू म्हणालो तरी पण थांबेना ;-) मग मी व्यवस्थित सगळी स्‍टोरी विचारली तेव्हा तिने त्या यूएस-बँगलोरवाल्याचे फोन नंबर दिले. फोनवर मी त्याच्याशी बोललो तर त्यानं अशा अशा मुलीकडून पैसे घेतले असल्याचं कबूल केलं. मी पैसे देऊन टाक म्हणालो तर माझ्यासमोरही तो दर फोनमध्‍ये त्याच सबबी सांगू लागला. कदाचित त्या खर्‍या असतीलही. पण त्यात फालतु आमची मैत्रिण अडकली होती ना. ती मला रोज फोन करायची, आणि अर्थातच रडायची ;-) एके भले सकाळी पठाणी विचार केला आणि त्या बँगलोरवाल्याला एसेमेस टाकला - म्हटलं तुझी कंपनी, तुझं घर वगैरे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत (खरोखर काढले होते), पैसे परत कर - नाहीतर तुझ्या कंपनीत जाऊन हे लफडं सांगेन. त्यानं अजीजीनं असं करु नको वगैरे सांगितलं - पण पैसे परत करण्‍याचं मात्र नाव घेईना. नंतर तर फोन पण टाळू लागला. फोनवर होत नाही म्हटल्यावर आता काहीतरी हातपाय हलवणे आले. त्याला एके दिवशी एसेमेस टाकून दिला - म्हटलं भौ, आज साडेसहा वाजताच्या फ्लाइटनं आम्ही दोघं (मी आणि ती मैत्रिण, आमच्या दोघांचं लग्न ठरल्याचीही बतावणी केली ;-) ) बंगलोरला येतोय. तिकिटाचे पैसे + साठ हजार रुपये तयार ठेव. नाही, तर ‍सगळे डॉक्‍युमेंट सोबत आणतोयच, पोलीसांना भेटल्याशिवाय मार्ग नाही. तुझ्‍या कंपनीमध्‍ये पण जाऊ. त्यानंतर मात्र त्याची टरकली. सेम डे त्यानं 20 हजार रुपये माझ्या खात्यावर ट्रान्स्फर केले. आणखी आठ दिवस वेळ दे, राहिलेले 40 हजार देतो म्हणे. म्हटलं नाही ! आठ दिवस वगैरे काही नाहीच. आणि 20 हजार रुपये दिलेस म्हणून मी बिलकुल खूश झालेलो नाही. तु किती लफडेबाज आहेस ते माहित झालंय - तिला तिकडे सांगतो डिव्होर्स झालाय आणि तुझ्या फोनवर बायको आन्सर करते. सगळे पैसे आज म्हणजे आजच पाहिजेत, नाहीतर आहेच साडेसहाची फ्लाइट. हवंतर उद्यापर्यंतचा वेळ देऊ शकतो. तरी अॅडजस्ट होऊ शकत नाही म्हणे.. म्हटलं ठिक. पण हा लास्ट चान्स. 20 आलेलेच होते. ;-) आठ दिवसात त्यानं काय लफडं केलं माहित नाही, पण राहिलेले 40 हजार पण माझ्या खात्यावर आले. मैत्रिण खूश ! म्हटलं च्यायला तुमच्या मुंबईतल्या मुलींच्या, बापाचे पैसे वाटेल तसे उधळत रहाता आणि नंतर भोकाडं पसरता. आत्ता अशात त्या बँगलोरवाल्याचा त्या मैत्रिणीला फोन आला होता म्हणे - की खरोखर डिव्होर्स झालाय आणि मला तुला भेटायचं आहे. तिनं सांगितलं 'यश अँण्‍ड आय गॉट मॅरीड, आय अॅम प्रेग्नंट, डोंट कम' ;-) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) म्हटलं बरंय, दिल को बहलाने के लिये गालिब खयाल अच्छा है ;-) (पठाण ) यक्कू

स्वानन्द नवीन

In reply to by यकु

आणि एके दिवशी फोनवर रडायला लागली. आय लव्ह यू म्हणालो तरी पण थांबेना Wink ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय लव्ह यू?? :-o काय म्हणावं आता?? :-D

यकु नवीन

In reply to by स्वानन्द

ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय लव्ह यू?? काय म्हणावं आता??
हो ना राव.. मुली रडायला लागल्या की काय करावं तेच समजत नाही मला ;-) अर्थात तिला तशा वेळी आय लव्ह यू म्हटल्यानंतर 'यशा, डुकरा मला इथं पप्पा विचारतील त्याचं मरणाचं टेन्शन आलंय आणि तुझं हे.. वगैरे वगैरे ओव्या ऐकाव्या लागल्याच होत्या ;-)

स्पा नवीन

In reply to by यकु

यशा, डुकरा मला इथं पप्पा विचारतील त्याचं मरणाचं टेन्शन आलंय आणि तुझं हे.. वगैरे वगैरे ओव्या ऐकाव्या लागल्याच होत्या लैच रोम्यांटिक र =))

गवि नवीन

In reply to by यकु

प्रयत्न योग्य दिशेत आहेत. यश येईलच. इथे नाही तर कुठेतरी .. पण यश येईल.. चालू दे. बाकी आपण कसेही असलो आणि वागलो तरी डुक्कर वगैरे आपणा पुरुषांना कधी ना कधी स्त्रीवर्गाकडून म्हटले जाणारच.. त्याचे फार मनावर घेऊ नये.

वपाडाव नवीन

In reply to by गवि

तिनं सांगितलं 'यश अँण्‍ड आय गॉट मॅरीड, आय अ‍ॅम प्रेग्नंट, डोंट कम'
यशा, इतकं यश सद्य स्थितीत पुरेसं आहे असं नै वाटत का? गविसुद्धा याच यशाबद्दल बोलत असावेत हा अंदाज...

चिगो नवीन

पैशांच्या बाबतीत मी थोडा नालायक आहे. ह्या बाबतीत मी जरा जुनाट मार्गावरच विश्वास ठेवतो. "कर्ज देऊ वा घेऊ नये." एकदा कॉलेजमध्ये असलेल्या एका मित्राने २० हजार मागितले मला. आता हा काही जवळचा मित्र-बित्र नव्हे, फक्त कॉलेजात होता एवढंच, आणि त्याचा आजपर्यंत कधी फोन-बीन काही नाही.. आणि मुख्य म्हणजे त्याला पैसे दिल्यावर त्याच्या मागे धावयला मेघालयातून नागपुरला जाणार कोण? म्हटलं, गोली मारो.. नाहीत म्हणून सांगितलं. डोकेदुखी विकत घेऊ नये, ह्या विचाराचा मी आहे. आणि स्पष्ट सांगायचं अश्या वेळी, "काही कोलॅटरल देऊ शकत असशील, तर बघुया" म्हणून..

रणजित चितळे नवीन

स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको ॥ २ ॥ बरेच शिकवून जातो.

हारुन शेख नवीन

In reply to by रणजित चितळे

परंतु जामिन राहू नको ॥ २ ॥ असेच म्हणतो ! ----------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्पा नवीन

(पठाण ) यक्कू __/\__ आणि एके दिवशी फोनवर रडायला लागली. आय लव्ह यू म्हणालो तरी पण थांबेना =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))

पैसा नवीन

बराच महाग धडा मिळाला की रे तुला! येशा, एखादी पठाणी रिकव्हरी एजन्सी वगैरे काढ काही तरी. चांगली चालेल!

हारुन शेख नवीन

Neither a borrower nor a lender be; For loan oft loses both itself and friend, And borrowing dulls the edge of husbandry. This above all: to thine own self be true, And it must follow, as the night the day, Thou canst not then be false to any man. -- William Shakespeare, “Hamlet”, Act 1 scene 3 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वपाडाव नवीन

मित्रा, लै मित्र गमावलेत मी सुद्धा यातच... फार वाइट रे पैसा... जाउ दे... -------------------------------------- बादवे, माझे सरुटॉबाने कट्ट्याचे उधार कधी परत देणार ??

स्मिता. नवीन

अनुभव चांगलाच महाग पडला रे तुला! खूप लोक गरजेच्या वेळी उधार घेतात आणि नंतर कितीही पैसे आले तरी परत देण्याचं नाव घेत नाही (सगळ्यांना असे अनुभव असतातच हे वरच्या अनेक प्रतिक्रियांवरून कळतेच आहे). कसं काय रहावतं काय माहिती. कुणाकडून साधे ५०-१०० रुपयेसुद्धा घेतले असतील तर ते आधी परत केल्याशिवाय माझ्या जिवाला चैन पडत नाही. असो. असे कोणाला पैसे उधार देतेवेळी थोडं सावधच राहिलेलं बरं. एखादा जवळचा मित्र पैसे मागत असेल तर का, कश्यासाठी वगैरे थोडी चौकशी करून समाधानकारक उत्तरं मिळाली तरच आणि आपल्याला सहजासहजी करता येईल अशीच मदत करावी. जुजबी ओळखीवर कोणाला आर्थिक मदत न करणेच भले असे वाटायला लागले आहे!

कुंदन नवीन

आता तर मी कोणाचा "पैसे देतो म्हणुन फोन आला तरी "पैसे सोडुन बोल" असेच बोल्तो.

पिंगू नवीन

मी दोन-तीन जणांना पैसे दिले होते. त्यातील एक जण अजून काही पैसे देऊ शकला नाही. त्याला धरुनच आहे. तसं मी पण एका मित्राचा देणेकरी लागतो आणि रक्कम फार मोठी आहे. त्यामुळे मित्राला स्पष्ट कल्पना दिली की मला आता ह्यावेळेस तुझे पैसे देता येणार नाहीत आणि त्यासाठी मला ६ महिने आणखी लागतील. तेव्हा मित्र मला एकच गोष्ट म्हणाला की तुझ्यावर माझा इतका विश्वास आहे की तू मला वर्षभरानंतर पैसे दिले तरी चालतील. त्यामुळे मी स्वतःला काही मित्रांच्या बाबतीत भाग्यवान समजतो. बाकी जे आहेत त्यांना ठकास ठक अशीच वागणूक देतो.. ;) - पिंगू

छोटा डॉन नवीन

चालायचेच. बर्‍याचदा ठरवुन ठेवले आहे की हे पैशाचे कौतुक बास आता, पण ऐनवेळी वेळ आली की जमत नाही. बर्‍याचदा पैसे दिले आहेत, बुडाले आहेत पण अजुनही 'नाही' म्हणु शकत नाही. काहीवेळा केवळ 'परत द्यायची इच्छा नाही' हेच कारण खरे वाटावे अशी वागणुक असते, बाकी इतर गोष्टी छानछौकीत चालु असतात, पैसे परत करायचे सोडुन. असो, सध्यतरी ह्याचे सोल्युशन नाही, कुणाला सापडल्यास आम्हाला आवर्जुन कळवा. - छोटा डॉन

धन्या नवीन

In reply to by छोटा डॉन

काहीवेळा केवळ 'परत द्यायची इच्छा नाही' हेच कारण खरे वाटावे अशी वागणुक असते, बाकी इतर गोष्टी छानछौकीत चालु असतात, पैसे परत करायचे सोडुन.
अगदी खरंय बाबा. सगळं अगदी व्यवस्थित चालू असतं. आपण आपलेच पैसे मागितले की रडगाणी सुरु होतात. :(

गणामास्तर नवीन

बर्‍याचदा असे होते की नाही म्हणायला जमत नाही. समोरच्या व्यक्तीला माहीत असते की आपण कुठल्याच अडचणीत नसून पैसे देऊ शकतो, आपल्यालाही माहीत असते की सगळे पैसे एका हप्त्यात व लवकर मिळायची सुतराम शक्यता नाही. तरी सुद्धा काही लोक सतराशे साठ रडगाणी ऐकवुन लुबाडण्यात यशस्वी होतात. बर्‍याचदा पोळून झाल्यावर आत्ता कुठे थोडे नाही म्हणायला जमू लागले आहे.

बॅटमॅन नवीन

In reply to by गणामास्तर

हेच आणि असेच म्हणतो. तरी सुदैवाने अजूनतरी वाईट अनुभव नै आले कधी, पण "नाही" म्हणायचे लक्षात नक्कीच ठेवले पाहिजे. पैसे आणि पुस्तके या दोन्ही बाबतीत. (घेतलेले पैसे परत न करणार्‍यांचा तिरस्कारक आणि पुस्तकचुंबक) बॅटमॅन

मोदक नवीन

In reply to by बॅटमॅन

>>>पैसे आणि पुस्तके या दोन्ही बाबतीत. खरे आहे... पैशाचे २ / ३ अनुभव आले पण सुदैवाने परत मिळाले. पुस्तकांसाठी झकास स्ट्रॅटेजी वापरतो. लकडी पुलावर जुनी पुस्तके मिळतात, त्यातून अत्यंत जीर्ण अशी व्यवस्थापन / व्यक्तीमत्व विकास / जुने Readers Digest वगैरे आणून ठेवायचे (एका पुस्तकाची किंमत रू १० किंवा जास्तीत जास्त १५.) कुणी पुस्तके वाचायला मागीतली की ह्या गठ्ठ्यातले "हवे ते घेऊन जा" असे उदार मनाने सांगायचे. पुलं आणि क्रिकेट्चे कलेक्शन मागणारा कोणी आला तर एकच उत्तर.. "इथे येवून वाच. नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणाची सोय करतो.. पण पुस्तक मिळणार नाही."

धन्या नवीन

In reply to by मोदक

साहेब, तुमचं नवंकोरं पुलंचं "एक शुन्य मी" माझ्याकडे आहे. परत दयायचं आहे. सरुटॉबाने कट्टयाला आणायला विसरलो. पुढच्या वेळी न विसरता आणेन. :)

धन्या नवीन

In reply to by गणपा

मलाही तसंच वाटतंय. मोदक, तुझं पुस्तक हडप करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. फक्त तुझं पुस्तक घेतल्यानंतर आपण एकदाच भेटलोय. आणि तेव्हा मला आठवण झाली नाही. तुझं पुस्तक तुला मिळेल याविषयी निश्चिंत राहा. :)

प्रचेतस नवीन

In reply to by धन्या

पुलं आणि क्रिकेट्चे कलेक्शन मागणारा कोणी आला तर एकच उत्तर.. "इथे येवून वाच. नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणाची सोय करतो.. पण पुस्तक मिळणार नाही."
इतकं असूनही मोदकने तुला पुस्तक, ते ही पुलंचं, आणि ते ही नवं कोरं दिलं म्हणजे कमाल आहे.

मोदक नवीन

In reply to by प्रचेतस

धन्या - त्याची एक कॉपी आधीच माझ्याकडे आहे, आणि "साठवण" सारखं ते आऊट ऑफ प्रींट नाहीय म्हणून.. आणि तू त्याची काळजी घेतो आहेस याची खात्री आहे म्हणून ते पुस्तक तुझ्याकडे आहे. बाकी आपले परम मित्र पुस्तक नाही म्हटल्यामुळे आलेला राग इथे काढत असावेत. ;-)

प्रचेतस नवीन

In reply to by मोदक

राग वैग्रे कसला हो मोदकराव. पुलंचे लिखाण आम्हाला कधीच भावले नाही. दमा आणि चिंवि जास्त सरस वाटत आले. नेहमीच. त्यामुळे आमच्या संग्रहात पुलंचं एकही पुस्तक नाही व पुढेही यायची शक्यता नाही.

मोदक नवीन

In reply to by प्रचेतस

अबे.. तुला एकट्याला उत्तर नाहीये ते.. मिपावरच्याच परम मित्रांचीच मोठ्ठी लिस्ट आहे.. ;-) काय राव वल्ली... संगत बदल. सगळ्याच गोष्टी लैच शिरेसली घ्यायला लागलास हल्ली. मिपावरचा मी पुस्तक दिलेला धन्या हा फक्त दुसरा मित्र आहे.. पहिला मित्र हा आधी मित्र आणि नंतर तो पण मिपाकर आहे हे कळाले. :-) किस्नाला दिलेली पुस्तके ही त्याच्याच साठी घेतली होती. इतके बोलून मी माझे अडतीस शब्द संपवतो. :-)

प्रचेतस नवीन

In reply to by मोदक

अबे.. तुला एकट्याला उत्तर नाहीये ते.. मिपावरच्याच परम मित्रांचीच मोठ्ठी लिस्ट आहे..
माझ्या प्रतिसादालाच तुझं उत्तर होते रे मोदका. :)
काय राव वल्ली... संगत बदल. सगळ्याच गोष्टी लैच शिरेसली घ्यायला लागलास हल्ली.
मी गंमतीनेच घेतोय. उलट तू मला पुलंची पुस्तके द्यायला तयार आहेस पण मीच नाही म्हणतोय रे.
किस्नाला दिलेली पुस्तके ही त्याच्याच साठी घेतली होती.
मी कुठं त्याबद्दल काही म्हणालोय? मी फक्त माझं पुलंबद्दलचं मत सांगितलं.
इतके बोलून मी माझे अडतीस शब्द संपवतो.
प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करण्याची तुझी हातोटी वाखाणण्याजोगी.

रेवती नवीन

In reply to by प्रचेतस

वल्लीसाहेब, द्या टाळी! मला पुलंचं सगळं लिखाण नाही आवडलं (म्हणजे थोडफार आवडलं) म्हणून पुढं फार वाचलही नाही. असं म्हटलं की आम्ही वाईट, म्हणून गप्प बसायचे पण आता तुम्ही सापडलात याचा आनंद झाला.

प्रचेतस नवीन

In reply to by रेवती

हॅहॅहॅ. मलाही आधी पुलंच लिखाण आवडत नाही असं कुणासमोर म्हटल्यावर फार अपराध्यासारखं वाटायचं. पुढं पुढं ही अपराधी भावना कमी कमी होत संपूनच गेली. आता मी अगदी बिनदिक्कतपणे सांगू शकतो पुलंचं लिखण मला भावत नाही ते. :)

मोदक नवीन

In reply to by प्रचेतस

अवांतर होतय हे मान्य करून व धन्याची आधीच क्षमा मागून... वल्ल्या.. हे पण तुला भावणार नाही का रे..? काही लिखाण नाही भावले असे म्हण एकवेळ पण सगळेच..?

प्रचेतस नवीन

In reply to by मोदक

पुलंच्या एकूण सर्वसाधारण लिखाणाबद्दलचे माझे मत होते रे. आणि हे माझे व्यक्तिगत मत आहे. दुसर्‍यांच्या मताचा आदर आहेच. आणि ७/८ ओळी म्हणजे संपूर्ण लिखाण तर होत नाही ना? इतर साहित्यिक पुलंपेक्षा जास्त सरस वाटतात इतकेच. बाकी पुलंनी फार रटाळ लिहिलेले आहे असे मी कधीच म्हटलेले नाही.

प्यारे१ नवीन

In reply to by मोदक

मोदकाला पण हार्दिक शुभेच्छा...! काय रे वल्ली, असं कसं तुला आवडत नाही??? आवडायलाच हवं तुला! ;) हवं तर आणखी लिंका देऊ??? ;) आपली लायकी नाय पण विथ ड्यु रिस्पेक्ट , पु ल देशपांडे यांचे किंवा त्यांच्या नावावर खपवले जात असलेले काही लेख, विनोद अथवा कोट्या ह्या सुमार दर्जाच्या आहेत हे कुणीही मान्य करेलच. त्याबरोबरच पुलंच्या लहान मूल अथवा विदूषकाच्या चेहर्‍याआडचा तत्वज्ञाचा चे हरा कधी मधी दिसला की चकित देखील व्हायला होतं आणि तेव्हा पुल खूप भावतात....! सरसकटीकरण करु नये हेच उत्तम. :)

रेवती नवीन

हम्म्.......फार काही लिहिण्यासारखे नाही. आपण सगळेजण कधी ना कधी फसतो आणि ते पैसे अक्कलखाती जमा करून मोकळे होतो.

योगप्रभू नवीन

इतरांनी आपली फसवणूक केली तर राग येणे स्वाभाविक आहे, पण त्यामुळे मनाची आणि संवेदनशीलतेची दारे कृपया बंद करु नका. एकवेळ मोठ्या रकमा उधार देण्याचे टाळा, पण जेन्युईन गरजूला आवाक्यातील मदत जरुर करा. मी लवकरच एक स्वतंत्र धागा टाकतो. तो वाचल्यावर तुमच्यापैकी अनेकांचे मत नक्कीच बदलेल, अशी अपेक्षा...

टुकुल नवीन

In reply to by योगप्रभू

योगप्रभुंशी सहमत. तुमचा धागा वाचण्यास उत्सुक. इतरांसारखी माझी पण फसवणुक झाली, त्याचबरोबर माझ्याकडुनही इतरांना पैसे परत द्यायला कधीकधी उशीर झाला पण जेव्हा फसवणुक झाली तेव्हा त्या रकमेने मला एव्ह्ढ काही नुकसान झाल नाही किंवा एखाद काम अडकल नाही पण ज्यानी पैसे घेतले त्याला नक्कीच त्या पैशांची मदत झाली. आता त्यानी परत दिले तर उत्तमच पण नाही दिले तर नाही (अजुन काय करणार) एक गोष्ट मात्र नक्की जाणवली कि मैत्री मधे व्यवहार आला कि तो लवकरात लवकर संपवावा, नाहीतर पैसे घेणारा आणी देणारा यांच्या मनात तो प्रत्येक वेळी येतो आणी नकळतपणे वर्तवणुकीशी जोडला जातो. --टुकुल

धन्या नवीन

In reply to by टुकुल

इतरांसारखी माझी पण फसवणुक झाली, त्याचबरोबर माझ्याकडुनही इतरांना पैसे परत द्यायला कधीकधी उशीर झाला पण जेव्हा फसवणुक झाली तेव्हा त्या रकमेने मला एव्ह्ढ काही नुकसान झाल नाही किंवा एखाद काम अडकल नाही पण ज्यानी पैसे घेतले त्याला नक्कीच त्या पैशांची मदत झाली. आता त्यानी परत दिले तर उत्तमच पण नाही दिले तर नाही (अजुन काय करणार)
गोष्ट हजार बाराशेची असेल तर असं बोलणं ठीक आहे हो. तुमचे वीस पंचवीस हजार लोकांनी परत केले नाहीत तर तुम्ही "पण जेव्हा फसवणुक झाली तेव्हा त्या रकमेने मला एव्ह्ढ काही नुकसान झाल नाही किंवा एखाद काम अडकल नाही पण ज्यानी पैसे घेतले त्याला नक्कीच त्या पैशांची मदत झाली." असं नक्कीच म्हणणार नाही. हो ना?

टुकुल नवीन

In reply to by धन्या

नक्किच वाईट वाटत, छोटी जरी रक्कम असली तरी हि त्रास होतोच पण करणार काय? आपल सध्या तरी ठीक चालु आहे नशीबाने हा विचार आणुन शांत होतो आणी गरज पडल्यावर वसुली करुत अशी आशा ठेवुन सोडुन देतो, पण पुढच्या वेळेला एखाद्याला खरोखर गरज असेल तर परत परिस्थिती प्रमाणे चक्र चालु :-) --टुकुल

कुंदन नवीन

In reply to by टुकुल

>>नक्किच वाईट वाटत, छोटी जरी रक्कम असली तरी हि त्रास होतोच पण करणार काय? आपल सध्या तरी ठीक चालु आहे नशीबाने हा विचार आणुन शांत होतो आणी गरज पडल्यावर वसुली करुत अशी आशा ठेवुन सोडुन देतो, पण पुढच्या वेळेला एखाद्याला खरोखर गरज असेल तर परत परिस्थिती प्रमाणे चक्र चालु +१

निनाद नवीन

मी अनेकदा दे या एका श्ब्दावर किती असा प्रश्न विचारून पैसे दिले आहेत. ते तसेच परतही मिळाले आहेत. मैत्रीत एकदाच बुडाले आहेत पण त्यावेळी माझी अपेक्षा नव्हतीच त्यामुळे ते तसे बुडणे नव्हेच. एका चांगल्या मित्राने कॉलेजची फी भरायला म्हणून पैसे मागितले. मी ते दिले . पण त्याने मात्र ते कधीच परत देण्याचे नाव काढले नाही. असे असूनही मी त्याला परत पुढची दोन वर्षेही फी चे पैसे दिलेच. तो पैसे परत करत नाही (किंवा करू शकत नाही) हे सर्वांना माहिती होते. त्यामुळे कुणीच पैसे देत नव्हते. फी भरली नसती तर त्याचे कॉलेज बंदच झाले असते. म्हणून मी देतच राहिलो. आता त्याला चांगली नोकरी आहे पण त्याने मात्र ते पैसे कधीच परत देण्याचे नाव काढले नाही. असो. चालायचेच, रक्कम छोटी असल्याने बहुदा विसरला असावा. मी ही विसरणेच चांगले, नाही का? मलाही मागे पैसे मित्राकडून घ्यावे लागले होते पण ते मी तातडीने परतही केले आहेत. आमच्यात देणे आणि घेणे होत राहिले आहे. त्यावरून कधी प्रश्न निर्माण झाले नाहीत. जेव्हा त्वरित देणे शक्य नसेल तेव्हा तसे सांगूनच घेतले गेल्याने गैरसमजांचाही प्रश्न नसतोच. पण गवि म्हणतात तसे असे मित्र मिळणेची नशिबाचाच भाग असतो. धोतराची गोष्ट उधार आणलेल्या गोष्टी परत करायच्या असतात हे मलाही शिकावेच लागले. (कधी कुणाकडून उधारच काही घेण्याची वेळ आली नव्हती म्हणा!) एकदा कॉलेजात एका प्रसंगात मला धोतर नेसायचे होते. घरात धोतर नव्हते. नेमके एक आजोबा आमच्याकडे आलेले होते. ते म्हणाले की आहे माझ्याकडे धोतर घेउन जा. काम झाले की आणून दे. मी पण मस्त कडक इस्त्री केलेले धोतर घेउन आलो. प्रसंग साजरा झाला. आणि मी आज धूवून देऊ , उद्या इस्त्री करून देऊ म्हणत म्हणत धोतर करायला उशीर करत राहिलो. एक दिवस मात्र त्या अजोबांनी मला बरोब्बर रस्त्यात गाठले. ते म्हणाले की, 'तू मला टाळतो आहेस. हे मला माहिती आहे. तुला धोतर परत करायचे आहे पण ते जमत नाही हे ही मला दिसते आहे. एका धोतराने माझे काही अडणार नाहीये. पण तुला मात्र गोष्टी परत न करण्याची सवय लागेल. आता तू मला धोतर आत्ताच्या आत्ता आहे तसे आणून दे.' मी तातडीने ते परत आणून दिले. सायंकाळी आजोबा धोतर घेऊन परत हजर! हे आता तुला देतो आहे आज. कालचा आपला व्यवहार संपला. मी तुला धोतर दिले, तू उशीर केलास; ते आता संपले. पण आता तुला गोष्टी परत करायला शिकायचे आहे. हे धोतर मला उद्या धून आणून दे. आणि तोवर तुझी गाडीची चावी मला देऊन ठेव. मी मुकाट चावी देऊन टाकली. धोतर धून, पायी चालत जाऊन नेऊन दिले. त्यांनी तत्परतेने चावी दिली. दुसर्‍या दिवशी आजोबा परत धोतर घेऊन आले. याला इस्त्री करून दे. आज मात्र चावी मागितली नाही. आणि मला धोतर उद्या हवे आहे. आता यावेळी मी गपचूप इस्त्री करून प्रायोरिटीने धोतर नेऊन दिले. मग मात्र त्यांनी मला बसवूनच घेतले आणि माझे चांगले बौद्धिक घेतले. धोतर वेळीच आणल्याबद्दल नारळवडी ही दिली :) दुसर्‍याने मदत केल्यावर त्याची जाण ठेवली पाहिजे. हे कोणत्याही प्रकारे न रागावता, डुख न धरता त्या अजोबांनी मला अतिशय चांगल्या प्रकारे शिकवले. असे लोक मला योग्य काळात भेटले हे माझे भाग्यच!

५० फक्त नवीन

आनंद आहे, यावर अतिशय चांगला पण कधी कधी जास्त खर्चिक उपाय , म्हणजे अगदी आगीतुन फुफाट्यात गेल्यासारखा पण होईल असा, लग्न करा. बाकी, वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे मैत्री अन व्यवहार कधीच मिसळु नयेत, दोन्ही धड राहात नाहीत.

पप्पुपेजर नवीन

माझे पण असेच अनुभव आहेत काय करावे, नाही म्हणता येत नाही :) आणि लोकांना पैसे वापस मागण्याची हि चोरी असते कधी कधी. एक तर इतका जबरदस्त अनुभव होता कि घेणारा म्हणाला होता तुला काय गरज आहे २५००० ची :)