✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाभारतातील व्यक्तीचित्रे-१ कुंती

श
शरद यांनी
Sun, 04/08/2012 - 20:03  ·  लेख
लेख
राजमाता कुंती "काही द्यायचंच असेल " या कवितेच्या सुरवातीलाच आपण कुंतीच्या मागणे पाहिले होते. एका सम्राटाच्या पत्नीने, पाच जगज्येत्या पुत्रांच्या आईने असे मागणे जरा विचित्रच वाटते नाही ? पण तुम्ही संपूर्ण महाभारत वाचले असेल, संस्कृतमध्ये म्हणत नाही मी, पण मराठी भाषांतर, तर तुम्ही तसे म्हणणार नाही. दुर्दैवाने ६००-७०० पानांचे सात खंड वाचणे सगळ्यांना शक्य नाही हे ही मला समजते. त्यामुळे काही फुटकळ गोष्टी, एखाददुसरी कादंबरी एवढ्यावरच आपण आपले वाचन संपविलेले असते. त्यामुळे काय होते आपण आपली मते तेवढ्याच ज्ञानावर बनवतो. त्यामुळे कर्णाचा बालपणीचा त्याग ही कुंतीची चूक, द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी दुर्योधनाला न आवरणे ही भीष्मांची चूक, कर्णाला केवळ कृष्णाच्या मदतीनेच अर्जून मारू शकला, असे आपणास वाटू लागते. मी सगळे महाभारत सांगत बसणार नाही, ते अशक्यच आहे, पण काही महत्वाच्या व्यक्तींची चित्रे महर्षी व्यासांनी कशी रेखाटली आहेत ते पहाणे मनोरंजक आहे. काही नवीन माहितीही आपणास मिळण्याची शक्यता आहे. इथेच एक लक्षात घ्या. हे लेखन ३५०० वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळच्या समाजाच्या, धुरिणांच्या काही श्रद्धा होत्या, नीतिकल्पना होत्या, त्यांना धरूनच व्यक्ती वागत होत्या. आजच्या आपल्या धारणा निराळ्या आहेत; त्यांना समोर ठेवून त्या वेळच्या व्यक्तींच्या वागण्याला बरोबर -चूक म्हणणे योग्य ठरणार नाही. असो. कुंती ही शूर राजाची मुलगी. श्रीकृष्णाची आत्या. शूराचा आतेभाऊ कुंतीभोज याला अपत्य नव्हते म्हणून शूराने त्याला सांगितले की माझे पहिले अपत्य मी तुला देईन. त्या प्रमाणे कुंती आपल्या लहानपणापासून दुसर्‍याच्या घरी वाढली. कुंतीभोजाकडे एकदा दुर्वास ऋषी रहावयास आले..राजाने कुंतीला त्यांच्या सेवेकरता ठेवले. कुंतीच्या मनोभावाने केलेल्या सेवेने प्रसन्न होऊन त्यांनी तिला एक मंत्र दिला व सांगितले की " या मंत्राने ज्या ज्या देवाला आवाहन करशील तो तो देव आपल्या प्रभावाने तुला पुत्र देईल ". कुंतीच्या दुर्दशेला येथूनच सुरवात झाली. बालसुलभ औत्सुक्याने, अजाणता तिने समोर दिसलेल्या सूर्याला आवाहन केले. तो समोर आल्यावर गोंधळून, काय करावयाचे म्हणून त्याला नमस्कार करून परत जावयास संगितले. त्याला ते शक्य नव्हते. सूर्याने तिला " तुझे कौमार्य अबाधित राहील " असे सांगून तत्काळ जो पुत्र दिला तो कर्ण. आता दुसर्‍याच्या घरात रहाणार्‍या , अविवाहित मुलीने काय करावयाचे ? ती काही विसाव्या शतकात अमेरिकेत रहात नव्हती. नातलगांच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने एका पेटीत,धन, दागिने व कवचकुंडलेयुक्त मुलाला ठेवून ती पेटी नदीत सोडली. ती अधिरथ नावाच्या सूताला सापडली व त्याने मुलाला आपल्या घरी नेले. तेव्हा पासून कर्ण सूतपुत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. कुंतीला पुढे अनेक वर्षे त्याची माहिती नव्हती. नंतर कुंतीचे पाण्डूशी लग्न झाले व ती कुरुवंशाची साम्राज्ञी झाली. माद्रीवर तिचे धाकट्या बहिणीसारखे प्रेम होते. पाण्डूला मृगयेचा नाद असल्याने भीष्मांवर राज्याचा भार सोडून तो अरण्यातच विहार करत असे. तेथे त्याला एका ऋषीचा शाप मिळाला की शरीरसुखाकरिता तू स्त्रीला स्पर्श केलास की तू मृत्यु पावशील. निपुत्रिक मरावयाचे नाही म्हणून त्याने कुंतीला नियोग पद्धतीने पुत्र प्राप्त करून घे असे सांगितल्यावर कुंतीने त्याला आपल्याला मिळालेला वर सांगितला. आनंदित झालेल्या पाण्डूच्या सांगण्यावरून तिला प्रथम धर्म, तेवढ्याने पाण्डूचे समाधान होईना म्हणून मग भीम व नंतर अर्जुन हे पुत्र झाले. मग मात्र तिने पाण्डूला सांगितले की आता या पुढे पुत्र मिळवणे ही वेश्यावृत्ती होईल. मग माद्रीने तिला विनंती केली की तुला पुत्र नको असेल तर मला मंत्र दे ; मी निपुत्रिक रहाणार नाही. मोठ्या मनाने तिने ती विनंती मान्य केली व माद्रीला नकुल-सहदेव ही मुले झाली. समभाव पाण्डूच्या मृत्युनंतर कुंती सती जाणार होती तेव्हा माद्री तिला म्हणाली " मी तुझ्या व माझ्या मुलांना सारखेच वागवीन याची मला खात्री देत येत नाही पण मी सती गेले तर तू सगळ्यांना सारखेच वागवशील याची मला खात्री आहे " सवतीच्या मनांत इतका विश्वास निर्माण करण्यासाठी तुमची वागवणुक किती थोर असावयास पाहिजे ? आपल्या चांगुलपणाचा वारसा तिने पुढील पिढीतही पोचविला. यक्षप्रश्नांच्या वेळी यक्ष प्रसन्न होवून युधिष्ठिराला तुझा एक भाऊ जिवंत होईल असे सांगतो त्यावेळी धर्म अर्जुन किंवा भीमाला जिवंत कर असे न सांगता नकुलाला जिवंत करावयास सांगतो. यक्ष चक्रावून त्याला विचारतो ज्यांच्या जोरावर तू परत राज्य मिळवू शकशील असे अर्जुन वा भीम यांच्या ऐवजी तू नकुल का निवडलास ? धर्म म्हणतो " माझ्या पित्याला दोन बायका होत्या. मला दोन्ही समानच आहेत, जर कुंती पुत्रवती असणार तर माद्रीही पुत्रवतीच असली पाहिजे. स्वत:सारखे इतरांना करणे जास्त महत्वाचे. मोठा आघात हस्तिनापूरला आल्यावर तिच्यापुढे दु:र्योधना-शकुनीपासून आपली मुले वाचवणे याची काळजी घ्यावी लागली. भीमाला विषप्रयोग झाला तरी तिने त्याची वाच्यता केली नाही. विदुराच्या मदतीने सर्व त्रास गुपचुप सहन केला. शिक्षण संपल्यावर तिच्यावर एक मोठा आघात झाला. तिला आपला पहिला मुलगा इतक्या वर्षांनंतर दिसला पण परिस्थिती काय होती ? मोठ्या मुलाने धाकट्या मुलाला युद्धाचे आव्हान दिलेले ! या धक्क्याने ती बेशुद्धच पडली. या वेळीही कर्णाची ओळख पटविणे शक्य नव्हते. उपकाराची फेड प्रत्युपकाराने नंतर लाक्षागृहाचा प्रसंग ओढावला. रानात कुंतीला तहान लागली तर पाणी पिण्यास भांडे नाही म्हणून भीमाने जाड कापड भिजवून, ते पिळून कुंतीला पाणी पाजले. पुढे एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी ते उत्ररले होते. बकासूराला बळी म्हणून त्या कुटुंबावर पाळी आली तेव्हा कुंतीने " माझा मुलगा भीम जाईल, तुम्ही काळजी करू नका " असे त्यांना सांगितले. याचा धर्माला राग आला." दुसर्‍याकरता आपल्या मुलाचा बळी तू देत आहेस, तुझी बुद्धी दुर्बळ झाली का ? " असे त्याने विचारल्यावर कुंतीने दिलेल्या उत्तरात तिच्या हृदयाचे औदार्य दिसून येते. ती म्हणते " आपण यांच्या घरी उतरल्याने त्यांचे आपल्यावर उपकार झाले आहेत. उपकाराची फेड दुप्पट प्रत्युपकाराने करणे हेच पुरुषार्थाचे खरे कर्तव्य आहे. भीमाच्या बळाबद्दल मला खात्री आहे". द्युतानंतर पांडव वनवासाला निघाले त्यवेळी तिने द्रौपदीचा गौरव करून तिला सांगितले " हे सद्गुणसंपन्न साध्वी, तू आपल्या बापाच्या व पतीच्या कुळाला भूषविले आहेस. तू अत्यंत शीलाचारसंपन्न असून तुला स्त्रीयांचा धर्म कळतो. संकटात धर्मच तुझे रक्षण करील व तुला लवकरच कल्याणकारक दिवस प्राप्त होतील. वनात सर्वांहून अधिक सहदेवाची काळजे घे.तो सर्वात धाकटा आहे ". या घोर दु:खातही तिला जास्त काळजी माद्रीच्या मुलाची आहे. क्षात्राणी कृष्णशिष्टाई नंतर कृष्ण कुंतीला भेटावयास आला त्यावेळी तिने त्याच्याबरोबर मुलांना जो निरोप पाठवला त्यात प्रसिद्ध विदुलेची गोष्ट आहे. विदुला आपल्या मुलाला सांगते की तू क्षत्रीय आहेस. युद्धात मरण पावलास तरी चालेल, भ्याडपणे जिवंत राहू नकोस. मुलाला आश्चर्य वाटते की आपली आई असे कसे काय म्हणते.पण विदुलेने त्याला त्याचा धर्म समजावून सांगितला व युद्ध करून तो विजयी झाला. तोच संदेश कुंती आपल्या मुलांना पाठवते. युधिष्ठिराला ती सांगते "भलत्या गोष्टीला धर्म म्हणून कवटाळून बसू नकोस.तुझे राज्य लढून मिळव ; भीक मागून नको. राजाने योग्य ठिकाणी दंडनीतीचा उपयोग केलाच पाहिजे. याच ठिकाणी ती कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणं ! इति ते संशयो ना भुद्राजा कालस्य कारणं!! हे सुप्रसिद्ध वचन त्याला सांगते.भिक्षा मागून पोट भरणे हा ब्राह्मणाचा धर्म, शेती-व्यवसाय हा वैश्यांचा धर्म व सेवा हा शूद्रांचा धर्म ; हे तुझ्याकरिता नाहीत. वाडवडीलांपासून प्राप्त झालेले राज्य तू लढूनच मिळव. याच करिता मुलाची अपेक्षा आईवडीलांना असते. आपल्या पितामहांना शोकसागरात अथवा अधोगतीत बुडवू नकोस. अर्जुन-भीमाला निरोप सांग की द्रौपदीची विटंबना विसरू नका ." आईचा शोक युद्धाआधी कर्णाला भेटून तिने त्याला खरी परिस्थिती सांगून युद्ध थांबविण्याचा प्रयत्न केला. पण आता फार उशीर झाला होता. युद्धानंतर मात्र तिचा बांध फुटला व तिने पांडवांना कर्ण हा तुमचा मोठा भाऊ असल्याचे सांगितले. शेवटचे विधी तरी योग्य तसे व्हावेत एवढीच इच्छा ! खरी आर्य स्त्री कुंतीचा खरा मोठेपणा युद्धानंतरच दिसून येतो. राजधानीत तिने आपले आयुष्य धृतराष्ट्र- गांधारी यांच्या सेवेत घालवले.ती दोघे वनात निघाली तेव्हा तीही त्यांच्याबरोबर वनात गेली. भीम म्हणाला की " तुला जर वनातच जावयाचे होते तर एवढे युद्ध करावयास आम्हास का सांगितलेस ?" कुंती म्हणाली "तुमचे कर्तव्य तुम्ही करावे म्हणून मी तसे सांगितले. मला काही राज्योपभोग घ्यावयाचे नव्ह्ते. राजा पाण्डूच्या काळात मी यज्ञ केले, दान दिले, उपभोग घेतले. मला यांची आता काही इच्छा नाही." सासूसासर्‍या सारखे असलेल्या त्या दोघा वृद्धांची सेवा करण्यात तिने उरलेले आयुष्य वेचले व त्यांच्या बरोबरच ती वणव्यात नाहिशी झाली. नियतीचे विचित्र खेळ कुंतीच्या आयुष्यात पहावयास मिळतात. असे व्हावयास नको होते एवढेच आपण म्हणू शकतो. शरद
  • महाभारतातीक व्यक्तिचित्रे-२ महामानिनी द्रौपदी
  • महाभारतातील व्यक्तिचित्रे-३ राजर्षि भीष्म
  • महाभारतातील व्यक्तिचित्रे-४ महारथी कर्ण
  • महाभारतातील व्यक्तिचित्रे-५ अर्जुन

Book traversal links for महाभारतातील व्यक्तीचित्रे-१ कुंती

  • महाभारतातीक व्यक्तिचित्रे-२ महामानिनी द्रौपदी ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18006 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

उत्तम व्यक्तिचित्रण

पैसा
Sun, 04/08/2012 - 20:37 नवीन
कुंतीचं आयुष्य असामान्यच म्हटलं पाहिजे. तिने कृष्णाकडे दु:ख मागून घेतलं असं म्हणतात, पण खरं तर तिला ते जन्माला आल्यापासून मिळालेलंच होतं. तिच्या संपूर्ण आयुष्याची उत्तम ओळख करून दिली आहेत.
हे लेखन ३५०० वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळच्या समाजाच्या, धुरिणांच्या काही श्रद्धा होत्या, नीतिकल्पना होत्या, त्यांना धरूनच व्यक्ती वागत होत्या. आजच्या आपल्या धारणा निराळ्या आहेत; त्यांना समोर ठेवून त्या वेळच्या व्यक्तींच्या वागण्याला बरोबर -चूक म्हणणे योग्य ठरणार नाही.
चर्चा करताना सर्वांनी हे लक्षात घेतलं तर फार बरं होईल.
  • Log in or register to post comments

तो समोर आल्यावर गोंधळून, काय

माझीही शॅम्पेन
Sun, 04/08/2012 - 20:54 नवीन
तो समोर आल्यावर गोंधळून, काय करावयाचे म्हणून त्याला नमस्कार करून परत जावयास संगितले. त्याला ते शक्य नव्हते. सूर्याने तिला " तुझे कौमार्य अबाधित राहील "
हे सपशेल अमान्य !!! हे केवळ व्यक्ती-पूजेच स्तोम असाव असा आमचा अंदाज !!! चुका कोणा-कडूनही होऊ शकतात
  • Log in or register to post comments

हे सपशेल अमान्य !!! हे केवळ

यकु
Sun, 04/08/2012 - 20:57 नवीन
हे सपशेल अमान्य !!! हे केवळ व्यक्ती-पूजेच स्तोम असाव असा आमचा अंदाज !!! चुका कोणा-कडूनही होऊ शकतात
हे जर अमान्य असेल तर असला विचित्र मंत्र देणार्‍या 'ऋषि' बद्दल आपलं काय म्हणणं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

ते विचित्र ऋषि दुर्वास ऋषी

माझीही शॅम्पेन
Sun, 04/08/2012 - 22:36 नवीन
ते विचित्र ऋषि दुर्वास ऋषी असल्याने त्याचा क्रोध टाळण्यासाठी काही ही न बोललेले बरे :) !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ते विचित्र ऋषि दुर्वास ऋषी

मृगनयनी
Mon, 04/09/2012 - 20:05 नवीन
ते विचित्र ऋषि दुर्वास ऋषी असल्याने त्याचा क्रोध टाळण्यासाठी काही ही न बोललेले बरे Smile ! सहमत!!!.. दुर्वास हे अत्यंत तापट स्वभावाचे "तपस्वी" होते. आपल्या योगसामर्थ्याने आपल्या शापाने अनेकांच्या आयुष्याची त्यांनी वाट लावली होती.. अर्थात "तपस्वी" लोकांचा तो गुणधर्मच असतो.. एखाद्याने त्यांच्यासाठी केलेली सेवा त्यांना आवडली, तर ते खूप चांगला आशीर्वादही द्यायचे. आणि एखाद्याने/ एखादीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर त्यास ते शाप देऊन मोकळे व्हायचे... उदा.:- दशरथ-पत्नी कैकेयीने लहानपणी दुर्वासांची मनोभावे सेवा केली म्हणून त्यांनी ती'स ("ती'स म्हणजे तिला.. सन्दर्भः उंच माझा झोका. :) ) आशीर्वाद दिला,की "तुझ्या हातास यश येईल". आणि त्यानुसार कैकेयीने एका युद्धाच्या वेळेस दशरथाच्या रथाचे तुटलेले चाक हाताने तोलून धरले..व दशरथास जिंकवून दिले. तसेच एकदा कैकेयीने दुर्वास तपा'स बसलेले असता गम्मत म्हणून काजळाचे हात त्यांच्या गालास लावले... पण तपा'तून बाहेर आल्यावर दुर्वासांना जेव्हा हे कळलं.. तेव्हा त्यांनी कैकेयीस शाप दिला, की "जगात तुझे तोन्ड काळे होईल".. आणि रामास वनवासास पाठवल्यामुळे कैकेयीला तो शापदेखील फळला.. अर्थात हे शाप-आशीर्वाद तपस्वी स्वतः स्पॉन्टेनिअसली देत असल्याने त्यांच्या वाचासिद्धीमुळे त्या बाधित व्यक्तीच्या हातून त्या त्या नुसार चांगली वाईट कर्मे घडत असतात. तसेच दुर्वास'जींचे अजून एक उदाहरण म्हणजे शकुन्तला!!.. शकुन्तला जेव्हा गान्धर्वविवाहानन्तर तिच्या नवर्‍यास (पक्षी: राजा दुष्यन्तास) भेटायला चालली होती.. तेव्हाच नेमके दुर्वास'जी आश्रमात आले.. पण शकुन्तलेचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही.. म्हणून ते चिडले आणि त्याचक्षणी तिला शाप दिला.. की "तू ज्यास भेटावयास चाल्लीयेस.. तो तुला ओळखणारही नाही..".. झालं... त्यानन्तर मग जलप्रवासात दुष्यन्ताने दिलेली अंगठी शकुन्तलेच्या बोटातून नकळत पाण्यात पडली.. आणि तिच्यापाशी दुष्यन्त राजा'ची एकही निषाणी उरली नाही... (सिवाय उसके पेटमे पलनेवाले बच्चे के..)... ;) (ह्याच्च बच्च्या'च्या नावाने म्हणजे "भरता"च्या नावाने आपल्या देशाला "भारत" हे नाव पडले.. ) आणि इकडे दुष्यन्त राजालाही अल्झायमर'ने थोड्या काळासाठी पछाडलेले असल्याने त्यास शकुन्तलेची विस्मृती झाली... त्यामुळे शकुन्तलेस विन्मुख होऊन परतावे लागले.. अर्थात पुढे एका "ताईता" मुळे दुष्यन्त राजास कळाते, की "भरत" त्याचाच मुलगा आहे.. असो... तात्पर्य असे, की दैवयोजनेनुसार आणि स्वतःच्या हातातील कर्माने "दुर्वास"मुनींनी अनेक जणांना शाप देऊन बेजार केले होते... व स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. आणि अनेकांनी त्यांच्याबद्दल विष्णुकडे तक्रारीही केल्या होत्या.. त्यापैंकीच एक म्हणजे "अम्बरीश राजा"...तो महान विष्णुभक्त होता... दुर्वासांनी एकदा स्वतःच्या खोट्या अहंकारापोटी अम्बरीशा'स शाप दिला.. तो शाप चुकवण्यासाठी अम्बरीश राजा विष्णुला शरण गेला... अम्बरीशाचा शाप विष्णुने स्वतःवर घेतला... पण दुर्वासमुनींची खोड कायमचीच मोडण्यासाठी विष्णुने त्यांच्यावर सुदर्शनचक्र सोडले..... आणि मग मात्र त्या चक्रापासून स्वतःला वाचवण्यासाठी दुर्वास'जी धूम्म्म्म पळत सुटले... आपल्या तपःसामर्थ्याच्या अति अहंकारापोटी अनेकांची आयुष्ये बरबाद करणार्‍या दुर्वासांनी मग विष्णुपुढे शरणागती पत्करली..व स्वतःची जान बख्श देण्याबद्दल विनन्ती केली... :) पण विष्णुने मात्र त्यांना त्यांच्या अपराधांसाठी शाप दिला की, "दुर्वास यापुढे अनेक जन्म सरपटणार्‍या प्राण्याच्या रूपात बिळात भीतीने लपून राहतील.. व अत्यंत घाबरत घाबरत आयुष्य जगतील.." तात्पर्यः आपल्याकडे कितीही शक्ती असली तिचा उगीचच दुरुपयोग करू नये.. नैतर विष्णु खूप वाईट शिक्षा देतो!.. (विष्णु- म्हणजे भगवान विष्णु- लक्ष्मीपती होय... नैतर कुणाला वाटायचं.. की पिन्जरा'तल्या तुसगावच्या आक्काचा अडाणी उजवा हात - विष्णु!!! ;) ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

मृगनयनी

Madhavi_Bhave
Tue, 04/10/2012 - 13:07 नवीन
मृगनयनी तुमची प्रतिक्रिया वाचताना परम पूज्य कलावती आईनी लिहिलेल्या प्रकाशनाची आठवण होत होती. तव भक्ती लागी तनु ही झिजू दे| तव चरणकमली मन हे निजू दे | तव स्मरणी ठेवी ही वाचा रिझाया | नमस्कार माझा तुला गुरुराया || हे वाचल्यावर तुम्ही प पु कलावती आईच्या मार्गातील आहात असा विचार स्पर्शून गेला. माधवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

माधवी'जी.. हो!!... मी

मृगनयनी
Tue, 04/10/2012 - 22:04 नवीन
माधवी'जी.. हो!!... मी आईंच्याच मार्गातील आहे... तुम्हीही आईभक्त आहात.. हे पाहून खरंच खूप बरे वाटले!!!! :) इकडे आपल्या मिपा'वर भरपूर आई-भक्त आहेत.. :) :) बाकी आपण खरडवहीतून बोलूच्च!!!! :) || ओम नमः शिवाय ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Madhavi_Bhave

ह्या दुर्वास ऋषींच आयुष्य

किचेन
Tue, 04/10/2012 - 17:24 नवीन
ह्या दुर्वास ऋषींच आयुष्य किती असावं..म्हण्जे शाकुंतल मध्येही तेच, रामायणात तेच, आणि महाभारतातही तेच.... ...ह्या महाकाव्य लेखकांनी सिरीयल वाल्यान्सारख का नी केल, तेच पात्र तोच स्वभाव....फक्त प्रत्येक सिरीयल मध्ये नाव आणि रूप वेगळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

तुम्हाला नाय माहित हल्लीचे

५० फक्त
Tue, 04/10/2012 - 18:56 नवीन
तुम्हाला नाय माहित हल्लीचे सगळे बॉस आणि ब-याच जणांच्या बायकामध्ये दुर्वांसाचे रुप दिसते कधी कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

ह्या दुर्वास ऋषींच आयुष्य

मृगनयनी
Tue, 04/10/2012 - 22:00 नवीन
ह्या दुर्वास ऋषींच आयुष्य किती असावं..म्हण्जे शाकुंतल मध्येही तेच, रामायणात तेच, आणि महाभारतातही तेच.... ह्म्म... खरंय.. हे दुर्वास मुनी म्हणजे चांगदेवांच्या वरताण होते.. चान्गदेवांनी त्यांचं आयुष्य १४०० वर्षांनी वाढवलं होतं..... पण दुर्वास'जीं युगानुयुगं...तसेच्च होते... अर्थात आपल्या योगसामर्थ्याच्या जोरावर!!!! पान्डवांना या दुर्वास'जींचा फायदा झाला... कृष्णामुळे... :) द्यूतात हरल्यानन्तर वनवासात पान्डवांच्या सूर्योपासनेमुळे सूर्यदेवाने द्रौपदीला एक जादुई थाळी दिली होती...ती थाळी सूर्यास्तापर्यन्त पान्डवांना पायजेल तेवढे जेवण देत असे.... पण सूर्यास्तानन्तर तिचा प्रभाव सम्पत असे. ही गोष्ट कौरवान्ना माहित असल्याने दुर्योधनाने दुर्वासांना मुद्दाम पान्डवांकडे रात्रीच्या वेळेस जेवण मागायला पाठवले.. त्यावेळी दुर्वास आणि त्यांचे पाचशे शिष्य पान्डवांकडे रात्री जेवायला गेले.. प्रसन्गावधान राखून द्रौपदीने त्या सगळ्यांना जेवायच्या आधी स्नान-सन्ध्या करण्यासाठी जवळच्या नदीवर पिटाळले.. आणि तेवढ्या वेळात द्रौपदीने कृष्णास बोलाविले... व आपली व्यथा सान्गितली.. "कृष्ण" द्रौपदीचा भाऊ असल्याने आणि अर्थातच तो देव असल्याने तिने स्मरण केल्या केल्या तो यायचा... तेव्हा कृष्णाने त्या जादुई थाळीला चिकटलेले एक भाजीचे पान खाल्ले.. व दुर्वासांच्या आणि त्यांच्या शिष्याचे पोट भरले.. त्यांनी पान्डवांना भुरभुरुन (हा भरत जाधव'चा शब्द! ;) ) आशीर्वाद दिले... कृष्ण नसता.. तर दुर्वासान्नी पान्डवांची वाट लावली असती.. हे नक्की... पण शेवटी देव तारी त्यास कोण मारी? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

पटण्या योग्य स्पष्टीकरण

पंतश्री
Tue, 04/10/2012 - 18:45 नवीन
मलाहि हाच प्रश्न काही काळापूर्वी पडला होता. शोधा - शोध केली तेव्हा एक पुस्तक सापडले.कोणी " भारतीय विवाह संस्थेचा इतिहास" ह्या पुस्तका बद्दल ऐकले आहे कि नाही ते माहित नाही. पण ह्यात बर्याच गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे आणि ते पटण्या सारखे आहे. खरे खोटे वि. का. राजवाडे ह्यांनाच माहित.तरी त्या पुस्तकाचे pdf लिंक इथे देत आहे. कोणाला हवे असल्यास वाचावे.
" भारतीय विवाह संस्थेचा इतिहास "
ह्यात राजवाडे ह्यांनी म्हटले आहे कि तेव्हा समाज पितृसत्ताक नसून मातृसत्ताक होता. तेवा विवाह संस्था अस्तिवात नव्हती, तेव्हा स्त्री ला आपल्या आवडत्या कोणत्याही पुरुषाशी शरीर संबंध ठेवता येत असे. मुलांची नावे हि मातृ नामावरून असत. हे महाभारत लिहिताना महर्षी व्यासांनी काहीतरी गडबड करून नवीन कथा रचल्या आणि हा व्यभिचार लपवला. प्रेषक शरद ह्यांच्या म्हणण्यानुसार
हे लेखन ३५०० वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळच्या समाजाच्या, धुरिणांच्या काही श्रद्धा होत्या, नीतिकल्पना होत्या, त्यांना धरूनच व्यक्ती वागत होत्या. आजच्या आपल्या धारणा निराळ्या आहेत; त्यांना समोर ठेवून त्या वेळच्या व्यक्तींच्या वागण्याला बरोबर -चूक म्हणणे योग्य ठरणार नाही.
ह्याचा विचार करून मी माझे वैयक्तिक मत मांडत नाही. ह्या सर्व गोष्टी ह्या पुस्तकात राजवाडे ह्यांनी मांडल्या आहेत. विषय निघाला आहे तर सर्वांपर्यंत हि माहिती पोहोचावी म्हणून लिंक पण दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

मनोरंजक लेख. खुप लहान असताना

शिल्पा ब
Sun, 04/08/2012 - 22:33 नवीन
मनोरंजक लेख. खुप लहान असताना अशी पुस्तकं वाचली होती तेंव्हा सगळं खरं वाटायचं. नुसते मंत्र म्हंटल्याने मुलं काय होतात, नवजात अर्भकाला टोपलीत घालुन नदीत सोडल्याचे समर्थन काय होते, नुसत्या शापाने लोकं नपुंसक काय होतात...अजुन काय काय!!! त्याहुनही कमालीचे मनोरंजन म्हणजे एकविसाव्या शतकातील लोकं हे खरं मानुन लेखच काय लिहितात!
  • Log in or register to post comments

मनोरंजक

श्रीरंग
Mon, 04/09/2012 - 10:54 नवीन
त्या कमालीच्या मनोरंजनाहूनही मनोरंजक म्हणजे, या कश्शा कश्शावर विश्वास नसलेली हुश्शार लोकं हे पटत नसलेले लेख वाचून त्यावर प्रतिक्रिया पण देतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

नुसत्या प्रतिक्रिया???? अहो

प्यारे१
Mon, 04/09/2012 - 12:22 नवीन
नुसत्या प्रतिक्रिया???? अहो ऊसात राहून मुद्द्याच्या ऊसाचा (हा वेगळा, तो वेगळा ;) ) रस असा काढतात की नंतर त्या चिपाडाला गुरंपण तोंड लावीत नाहीत... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

हाहाहा! खरंय!!

श्रीरंग
Mon, 04/09/2012 - 12:30 नवीन
हाहाहा! खरंय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

त्याचं काय ए की वाचल्याशिवाय

शिल्पा ब
Tue, 04/10/2012 - 03:42 नवीन
त्याचं काय ए की वाचल्याशिवाय आम्हाला समजत नै की पटतंय का नै ते!! आम्ही फक्त हुशारच आहोत, तुमच्यासारखे विद्वान नैत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

अस्सं होय! नुसते मंत्र

श्रीरंग
Tue, 04/10/2012 - 09:39 नवीन
अस्सं होय! नुसते मंत्र म्हंटल्याने मुलं काय होतात, नवजात अर्भकाला टोपलीत घालुन नदीत सोडल्याचे समर्थन काय होते, नुसत्या शापाने लोकं नपुंसक काय होतात या महाभारतातल्या गोष्टी लेख वाचण्यापूर्वी तुम्हाला माहित असतील असे वाटले होते. असो. लेखकाने कुठेही या गोष्टी खर्या मानल्याच पाहिजेत असा सूर लावलेला दिसला नाहे. बाकी मृत्युंजय यांनी समर्पक उत्तर खाली दिलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आँ?

मन१
Sun, 04/08/2012 - 23:27 नवीन
तो समोर आल्यावर गोंधळून, काय करावयाचे म्हणून त्याला नमस्कार करून परत जावयास संगितले. त्याला ते शक्य नव्हते. सूर्याने तिला " तुझे कौमार्य अबाधित राहील " ह्याबद्दल वेगळं ऐकलय. http://www.misalpav.com/node/3866 भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास (इतिहासकार राजवाडे) वनपर्वाच्या ३०७व्या अध्यायात सूर्य म्हणतो, "हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..." आता बोला!
  • Log in or register to post comments

ऑ.वनपर्वात कुठून झाला हा

प्रचेतस
Mon, 04/09/2012 - 10:18 नवीन
ऑं? वनपर्वात कुठून झाला हा सूर्य-कुंतीचा संवाद? हा भाग आदिपर्वातल्या संभवपर्व नावाच्या उपपर्वात येतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

आदिपर्वातल्या संभवपर्व

मन१
Mon, 04/09/2012 - 18:25 नवीन
हा भाग आदिपर्वातल्या संभवपर्व नावाच्या उपपर्वात येतो. माहितीबद्दल आभार. हे अभ्यासावतारी,हास्यमुख बालका वल्ली तुला सतत विविध ग्रंथांचे वाचन करायचे व त्याचे मिपावर संदर्भ द्यायचे वरदानच मिळाले आहे. तुझा विजय असो. मात्र माझ्या प्रतिसादातील माहिती म्हण्जे केवळ निरोप्याचे काम होय. त्याच्या पूर्ण यशापयशाचे श्रेय हे त्या मूळच्या दागाकर्त्यांना व राजवाडे ऋषींना जाते. चला आता अंतर्धान पावीत आहे. तुझा पुनश्च विजय असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्या प्रमाणे कुंती आपल्या

यकु
Mon, 04/09/2012 - 01:04 नवीन
त्या प्रमाणे कुंती आपल्या लहानपणापासून दुसर्‍याच्या घरी वाढली. कुंतीभोजाकडे एकदा दुर्वास ऋषी रहावयास आले..राजाने कुंतीला त्यांच्या सेवेकरता ठेवले. कुंतीच्या मनोभावाने केलेल्या सेवेने प्रसन्न होऊन त्यांनी तिला एक मंत्र दिला व सांगितले की " या मंत्राने ज्या ज्या देवाला आवाहन करशील तो तो देव आपल्या प्रभावाने तुला पुत्र देईल "
इति दुर्वास आणि
"हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..."
इति सूर्य यावरुन तरी असे वाटते की, महाभारत खरे जसे घडले आणि जेव्हा जसे लिहिले गेले त्यात अंतर आहे. ऋषि कुंतीला कोणत्या का भूमिकेतून होईना पण मंत्र देतो. यावरून तरी असे वाटते की महाभारत जसे घडले असेल त्याकाळी कामोपभोगांना आजच्यासारखे अदखलपात्र न मानता, तो जीवनाच्या इतर कुठल्याही अंगाइतकाच आणि तरीही इतर अंगांपेक्षा किंचीतही जास्त महत्व नसणार एक भाग असेल. आणि तो 'सोशल शेअरींगचाही' भाग असेल - नाहीतर ऋषिने असला मंत्र कशाला द्यावा आणि ऋषिच्या या असल्या मंत्रांनंतरही सूर्याने कुंतीला हा 'कन्येच्या' उत्त्पत्तीचा दाखला का द्यावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कार्य पार पडूनच 'कर्णाची' उत्पत्ती व्हावी ? नीतीकल्पना जरुर असतीलच त्यामुळेच कदाचित सूर्याला हे असलं 'सायटेशन' द्यावं लागलं असेल ;-) * अर्थातच सगळा प्रतिसाद निपुत्रिकास पुत्रवान करणार्‍या देवता, वर, चमत्कार असला कोणताही चमत्कारीक कंटेंट न मानता या सगळ्या पात्रांना सर्वसामान्यच लोक मानून लिहिला आहे. मंत्र दिला - मंत्र दिला म्हणजे अमुक अमुक रचना तु म्हण म्हणजे जो हवा तो देव तुझ्‍या समक्ष हजर होईल असा अर्थ अगदीच गावंढळ वाटतो. व्याकरणदृष्ट्या मंत्रणेला गुप्ततेचीही अर्थच्छटा आहे. हेतू साध्‍य होईपर्यंत मंत्रणेतील गोष्‍टी कुठे बोलायच्या नाही अर्थातच या गुप्त गोष्‍टी बोलणारे संबंधित लोक नंतर आपापल्या लोकव्यवहारात गुंतून पडत असतील आणि मंत्रणा पूर्ततेचा प्रसंग आला की योग्य तिथे निरोप पोचवून मंत्र सिद्ध करीत असतील ;-) याबाबतीत मन ने दिलेल्या दुव्यावरील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास वाचायला सुरुवात केल्याने या प्रतिसादातील सर्व शंकांची उत्तर प्रतिसाद लिहिल्यानंतर मिळाली आहेत.' तेव्हा प्रतिवाद अपेक्षित नाही.
  • Log in or register to post comments

याबाबतीत मन ने दिलेल्या

धन्या
Mon, 04/09/2012 - 08:20 नवीन
याबाबतीत मन ने दिलेल्या दुव्यावरील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास वाचायला सुरुवात केल्याने या प्रतिसादातील सर्व शंकांची उत्तर प्रतिसाद लिहिल्यानंतर मिळाली आहेत.' तेव्हा प्रतिवाद अपेक्षित नाही.
नक्की वाचा. वाचून झाल्यानंतर मात्र तुमच्या मनात असलेल्या नीतीमत्तेच्या कल्पनांना धक्का लागला म्हणून बोंब मारु नका म्हणजे झालं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

पॉप्कॉर्न आणल्या गेल्या आहे.

आत्मशून्य
Mon, 04/09/2012 - 00:23 नवीन
असे व्हावयास नको होते एवढेच आपण म्हणू शकतो.
Image removed. हा हा !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

प्रचेतस
Mon, 04/09/2012 - 10:19 नवीन
लिखाण सहजसुंदर. महाभारतातील पुढच्या व्यक्तिचित्रांचीही वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

चांगले लिहिले आहे पण थोडे

मृत्युन्जय
Mon, 04/09/2012 - 11:40 नवीन
चांगले लिहिले आहे पण थोडे एकांगी झाले आहे. महाभारत एक महान काव्य आहे हे मात्र मान्य करावे लागेल. ज्यांना त्यातील सत्यतेबद्दल खाती नसेल त्यांनी ती एक अजरामर साहित्यिक कलाकृती म्हणुन त्याकडे पहावे. काथ्याकूट काय हो साहित्यावर पडतातच की. वपुंवर हिरेरीने लोक मध्यमवर्ग्यीयांचा लेखक म्हणुन तुटुन पडतात तर पुलंची वैचारिक पातळी कमी असलेला लेखक म्हणुन संभावना करतात. जी ए अगम्य आणि बोर लिहितात अशी टीका होते तर दलित वाङ्मयावर दर दोन पानामागे ३ नवीन शिव्यांचा शोध लावल्याबद्दल टीका होते. थोडक्यात कल्पित लेखनावर काथ्याकूट आणि टीका करण्याचा आपल्याकदे उदंड अनुभव आहे. महाभारत खरे वाटत नसल्यासही त्यातील साहित्य आणी कथेवर काथ्याकूट होउ शकतोच की. महाभारत जर कल्पित आहे असे मान्य केले तर मग उलट त्याचे साहित्यिक मूल्या लाखपटीन वाढते. अहो जो माणूस केवळ कल्पनेच्या बळावर इतके अद्भूत आणि मानवी नातेसंबंधांबद्दल, अध्यात्माबद्दल, तर्कशास्त्रावर, इतके खोल आणि सूक्ष्म विचार मांडू शकतो तो किती प्रचंड ताकदीचा लेखक असेल याचा जरा विचार तर करा. असो. तुर्तास एवढेच. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

+१

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/09/2012 - 12:24 नवीन
मनातले बोललात!! असो. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

शत प्रतिशत सहमत

अमृत
Mon, 04/09/2012 - 12:44 नवीन
अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सहमत.पण तरीही लोक रामायण

किचेन
Tue, 04/10/2012 - 17:39 नवीन
सहमत.पण तरीही लोक रामायण ,महाभारत याला सत्यच समजून बसलेत.बाबरी मशिदीचा किस्सा तर ताजा आहे. बाय द वे, ह्या असल्या वेगवेगळ्या बापांच्या पोरांनी त्यांच्या त्यांच्या बापाच्या इस्तेस्तीवर हक्क सांगावा.उगीच हिंदुना धर्मग्रंथ हवा , म्हणून भाव भावांची भांडण लावावी, आणि भर रणांगणात सगळ्यांना स्तच्यू करून गीता ऐकवत बसायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सत्य समजणे किंवा न समजणे हे

मृत्युन्जय
Tue, 04/10/2012 - 17:54 नवीन
सत्य समजणे किंवा न समजणे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबुन आहे. त्याला सत्य का मानु नये याचे काही कारण आपण मला देउ शकाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

फार सुंदर

रणजित चितळे
Mon, 04/09/2012 - 11:48 नवीन
ह्या वरुन माझ्या लहानपणी शेवडे गुरुजींची प्रवचने आठवली. ते महाभारतातील १६ पात्रांवरती बोलायचे. फार सुंदर व अत्यंत मुद्देसूद.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

अमृत
Mon, 04/09/2012 - 12:45 नवीन
अमृत
  • Log in or register to post comments

मस्त लेख....

मुक्त विहारि
Mon, 04/09/2012 - 12:49 नवीन
फार छान माहिती....
  • Log in or register to post comments

माहिती पूर्ण लेखन ! राजा

मदनबाण
Mon, 04/09/2012 - 22:44 नवीन
माहिती पूर्ण लेखन ! राजा अंबरिशाची कथा मी लहानपणी बहुधा चांदोबा मधे वाचल्या सारखे वाटते... :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला. पुढील भागाच्या

राघव
Tue, 04/10/2012 - 15:06 नवीन
लेख आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. अवांतरः मूळ महाभारत किंवा त्यावरील टीका कुठे मिळू शकेल काय? राघव.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे शरद यांचा सुंदर

नितिन थत्ते
Tue, 04/10/2012 - 15:26 नवीन
नेहमीप्रमाणे शरद यांचा सुंदर लेख.
  • Log in or register to post comments

"युगान्त"(इरावती कर्वे) मधील उल्लेख

यनावाला
Fri, 04/13/2012 - 22:05 नवीन
*श्री.शरद यांनी मोजक्या शब्दांत नेमकी माहिती उत्तमप्रकारे दिली आहे.तसेच ती मूळ महाभारतानुसार विश्वासार्ह आहे. *युधिष्ठिरादिकांचा जन्मदाता पंडू नाही.मात्र बीजक्षेत्रन्यायानुसार ते पांडव म्हणजे पंडूचे पुत्र आहेत. *कर्णाचा जन्मदाता दुर्वास तर धर्माचा विदुर असे डॉ.इरावतीबाई कर्वे यांनी "युगान्त" कादंबरीत म्हटले आहे. *पाच पांडवांचे जन्मदाते कोण याविषयी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी बराच ऊहापोह केला आहे.त्यांचे निष्कर्ष संभवनीय आहेत. *आपल्या दोन्ही महाकाव्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म नियोगपद्धतीने झाले आहेत.अतिकामामुळे दशरथ नपुंसक झाला होता.पुत्रकामेष्टी यज्ञासाठी विशेष आमंत्रित केलेला ऋष्यशृंग हा रामादि चार पुत्रांचा जन्मदाता असे रामायणावरून दिसते. *दुर्वासाने कुंतीला वर दिला,यज्ञकुंडातून प्रकट झालेल्या अग्नीने दिलेल्या कुंभातील पायस भक्षण (प्राशन ) केल्याने राण्यांना गर्भ राहिले. यांवर कुणाचाही विश्वास असणे शक्य नाही.इथल्या सदस्यांचा तर नाहीच नाही.कारण सर्वजण उच्चशिक्षित आहेत.उपरोक्त गोष्टी केवळ श्रद्धेने खर्‍या मानता येतील.मग क्षीरसागरात श्रीविष्णू पहुडले आहेत.त्यांच्या नाभिकमलात चारतोंडी ब्रह्मदेव बसला आहे हेही खरे मानता येते.
  • Log in or register to post comments

महिला.....

मन१
Sat, 03/09/2013 - 07:16 नवीन
नुकताच होउन गेलेला आंतरराष्ट्रिय महिलादिन व हा धागा; महाभारतकालीन समाज, महिलांविषायक समज.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा