महाभारतातील व्यक्तीचित्रे-१ कुंती
राजमाता कुंती
"काही द्यायचंच असेल " या कवितेच्या सुरवातीलाच आपण कुंतीच्या मागणे पाहिले होते. एका सम्राटाच्या पत्नीने, पाच जगज्येत्या पुत्रांच्या आईने असे मागणे जरा विचित्रच वाटते नाही ? पण तुम्ही संपूर्ण महाभारत वाचले असेल, संस्कृतमध्ये म्हणत नाही मी, पण मराठी भाषांतर, तर तुम्ही तसे म्हणणार नाही. दुर्दैवाने ६००-७०० पानांचे सात खंड वाचणे सगळ्यांना शक्य नाही हे ही मला समजते. त्यामुळे काही फुटकळ गोष्टी, एखाददुसरी कादंबरी एवढ्यावरच आपण आपले वाचन संपविलेले असते. त्यामुळे काय होते आपण आपली मते तेवढ्याच ज्ञानावर बनवतो. त्यामुळे कर्णाचा बालपणीचा त्याग ही कुंतीची चूक, द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी दुर्योधनाला न आवरणे ही भीष्मांची चूक, कर्णाला केवळ कृष्णाच्या मदतीनेच अर्जून मारू शकला, असे आपणास वाटू लागते. मी सगळे महाभारत सांगत बसणार नाही, ते अशक्यच आहे, पण काही महत्वाच्या व्यक्तींची चित्रे महर्षी व्यासांनी कशी रेखाटली आहेत ते पहाणे मनोरंजक आहे. काही नवीन माहितीही आपणास मिळण्याची शक्यता आहे. इथेच एक लक्षात घ्या. हे लेखन ३५०० वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळच्या समाजाच्या, धुरिणांच्या काही श्रद्धा होत्या, नीतिकल्पना होत्या, त्यांना धरूनच व्यक्ती वागत होत्या. आजच्या आपल्या धारणा निराळ्या आहेत; त्यांना समोर ठेवून त्या वेळच्या व्यक्तींच्या वागण्याला बरोबर -चूक म्हणणे योग्य ठरणार नाही. असो.
कुंती ही शूर राजाची मुलगी. श्रीकृष्णाची आत्या. शूराचा आतेभाऊ कुंतीभोज याला अपत्य नव्हते म्हणून शूराने त्याला सांगितले की माझे पहिले अपत्य मी तुला देईन. त्या प्रमाणे कुंती आपल्या लहानपणापासून दुसर्याच्या घरी वाढली. कुंतीभोजाकडे एकदा दुर्वास ऋषी रहावयास आले..राजाने कुंतीला त्यांच्या सेवेकरता ठेवले. कुंतीच्या मनोभावाने केलेल्या सेवेने प्रसन्न होऊन त्यांनी तिला एक मंत्र दिला व सांगितले की " या मंत्राने ज्या ज्या देवाला आवाहन करशील तो तो देव आपल्या प्रभावाने तुला पुत्र देईल ". कुंतीच्या दुर्दशेला येथूनच सुरवात झाली. बालसुलभ औत्सुक्याने, अजाणता तिने समोर दिसलेल्या सूर्याला आवाहन केले. तो समोर आल्यावर गोंधळून, काय करावयाचे म्हणून त्याला नमस्कार करून परत जावयास संगितले. त्याला ते शक्य नव्हते. सूर्याने तिला " तुझे कौमार्य अबाधित राहील " असे सांगून तत्काळ जो पुत्र दिला तो कर्ण. आता दुसर्याच्या घरात रहाणार्या , अविवाहित मुलीने काय करावयाचे ? ती काही विसाव्या शतकात अमेरिकेत रहात नव्हती. नातलगांच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने एका पेटीत,धन, दागिने व कवचकुंडलेयुक्त मुलाला ठेवून ती पेटी नदीत सोडली. ती अधिरथ नावाच्या सूताला सापडली व त्याने मुलाला आपल्या घरी नेले. तेव्हा पासून कर्ण सूतपुत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. कुंतीला पुढे अनेक वर्षे त्याची माहिती नव्हती.
नंतर कुंतीचे पाण्डूशी लग्न झाले व ती कुरुवंशाची साम्राज्ञी झाली. माद्रीवर तिचे धाकट्या बहिणीसारखे प्रेम होते. पाण्डूला मृगयेचा नाद असल्याने भीष्मांवर राज्याचा भार सोडून तो अरण्यातच विहार करत असे. तेथे त्याला एका ऋषीचा शाप मिळाला की शरीरसुखाकरिता तू स्त्रीला स्पर्श केलास की तू मृत्यु पावशील. निपुत्रिक मरावयाचे नाही म्हणून त्याने कुंतीला नियोग पद्धतीने पुत्र प्राप्त करून घे असे सांगितल्यावर कुंतीने त्याला आपल्याला मिळालेला वर सांगितला. आनंदित झालेल्या पाण्डूच्या सांगण्यावरून तिला प्रथम धर्म, तेवढ्याने पाण्डूचे समाधान होईना म्हणून मग भीम व नंतर अर्जुन हे पुत्र झाले. मग मात्र तिने पाण्डूला सांगितले की आता या पुढे पुत्र मिळवणे ही वेश्यावृत्ती होईल. मग माद्रीने तिला विनंती केली की तुला पुत्र नको असेल तर मला मंत्र दे ; मी निपुत्रिक रहाणार नाही. मोठ्या मनाने तिने ती विनंती मान्य केली व माद्रीला नकुल-सहदेव ही मुले झाली.
समभाव
पाण्डूच्या मृत्युनंतर कुंती सती जाणार होती तेव्हा माद्री तिला म्हणाली " मी तुझ्या व माझ्या मुलांना सारखेच वागवीन याची मला खात्री देत येत नाही पण मी सती गेले तर तू सगळ्यांना सारखेच वागवशील याची मला खात्री आहे " सवतीच्या मनांत इतका विश्वास निर्माण करण्यासाठी तुमची वागवणुक किती थोर असावयास पाहिजे ? आपल्या चांगुलपणाचा वारसा तिने पुढील पिढीतही पोचविला. यक्षप्रश्नांच्या वेळी यक्ष प्रसन्न होवून युधिष्ठिराला तुझा एक भाऊ जिवंत होईल असे सांगतो त्यावेळी धर्म अर्जुन किंवा भीमाला जिवंत कर असे न सांगता नकुलाला जिवंत करावयास सांगतो. यक्ष चक्रावून त्याला विचारतो ज्यांच्या जोरावर तू परत राज्य मिळवू शकशील असे अर्जुन वा भीम यांच्या ऐवजी तू नकुल का निवडलास ? धर्म म्हणतो " माझ्या पित्याला दोन बायका होत्या. मला दोन्ही समानच आहेत, जर कुंती पुत्रवती असणार तर माद्रीही पुत्रवतीच असली पाहिजे. स्वत:सारखे इतरांना करणे जास्त महत्वाचे.
मोठा आघात
हस्तिनापूरला आल्यावर तिच्यापुढे दु:र्योधना-शकुनीपासून आपली मुले वाचवणे याची काळजी घ्यावी लागली. भीमाला विषप्रयोग झाला तरी तिने त्याची वाच्यता केली नाही. विदुराच्या मदतीने सर्व त्रास गुपचुप सहन केला. शिक्षण संपल्यावर तिच्यावर एक मोठा आघात झाला. तिला आपला पहिला मुलगा इतक्या वर्षांनंतर दिसला पण परिस्थिती काय होती ? मोठ्या मुलाने धाकट्या मुलाला युद्धाचे आव्हान दिलेले ! या धक्क्याने ती बेशुद्धच पडली. या वेळीही कर्णाची ओळख पटविणे शक्य नव्हते.
उपकाराची फेड प्रत्युपकाराने
नंतर लाक्षागृहाचा प्रसंग ओढावला. रानात कुंतीला तहान लागली तर पाणी पिण्यास भांडे नाही म्हणून भीमाने जाड कापड भिजवून, ते पिळून कुंतीला पाणी पाजले. पुढे एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी ते उत्ररले होते. बकासूराला बळी म्हणून त्या कुटुंबावर पाळी आली तेव्हा कुंतीने " माझा मुलगा भीम जाईल, तुम्ही काळजी करू नका " असे त्यांना सांगितले. याचा धर्माला राग आला." दुसर्याकरता आपल्या मुलाचा बळी तू देत आहेस, तुझी बुद्धी दुर्बळ झाली का ? " असे त्याने विचारल्यावर कुंतीने दिलेल्या उत्तरात तिच्या हृदयाचे औदार्य दिसून येते. ती म्हणते " आपण यांच्या घरी उतरल्याने त्यांचे आपल्यावर उपकार झाले आहेत. उपकाराची फेड दुप्पट प्रत्युपकाराने करणे हेच पुरुषार्थाचे खरे कर्तव्य आहे. भीमाच्या बळाबद्दल मला खात्री आहे".
द्युतानंतर पांडव वनवासाला निघाले त्यवेळी तिने द्रौपदीचा गौरव करून तिला सांगितले " हे सद्गुणसंपन्न साध्वी, तू आपल्या बापाच्या व पतीच्या कुळाला भूषविले आहेस. तू अत्यंत शीलाचारसंपन्न असून तुला स्त्रीयांचा धर्म कळतो. संकटात धर्मच तुझे रक्षण करील व तुला लवकरच कल्याणकारक दिवस प्राप्त होतील.
वनात सर्वांहून अधिक सहदेवाची काळजे घे.तो सर्वात धाकटा आहे ". या घोर दु:खातही तिला जास्त काळजी माद्रीच्या मुलाची आहे.
क्षात्राणी
कृष्णशिष्टाई नंतर कृष्ण कुंतीला भेटावयास आला त्यावेळी तिने त्याच्याबरोबर मुलांना जो निरोप पाठवला त्यात प्रसिद्ध विदुलेची गोष्ट आहे. विदुला आपल्या मुलाला सांगते की तू क्षत्रीय आहेस. युद्धात मरण पावलास तरी चालेल, भ्याडपणे जिवंत राहू नकोस. मुलाला आश्चर्य वाटते की आपली आई असे कसे काय म्हणते.पण विदुलेने त्याला त्याचा धर्म समजावून सांगितला व युद्ध करून तो विजयी झाला. तोच संदेश कुंती आपल्या मुलांना पाठवते. युधिष्ठिराला ती सांगते "भलत्या गोष्टीला धर्म म्हणून कवटाळून बसू नकोस.तुझे राज्य लढून मिळव ; भीक मागून नको. राजाने योग्य ठिकाणी दंडनीतीचा उपयोग केलाच पाहिजे. याच ठिकाणी ती
कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणं !
इति ते संशयो ना भुद्राजा कालस्य कारणं!!
हे सुप्रसिद्ध वचन त्याला सांगते.भिक्षा मागून पोट भरणे हा ब्राह्मणाचा धर्म, शेती-व्यवसाय हा वैश्यांचा धर्म व सेवा हा शूद्रांचा धर्म ; हे तुझ्याकरिता नाहीत. वाडवडीलांपासून प्राप्त झालेले राज्य तू लढूनच मिळव. याच करिता मुलाची अपेक्षा आईवडीलांना असते. आपल्या पितामहांना शोकसागरात अथवा अधोगतीत बुडवू नकोस. अर्जुन-भीमाला निरोप सांग की द्रौपदीची विटंबना विसरू नका ."
आईचा शोक
युद्धाआधी कर्णाला भेटून तिने त्याला खरी परिस्थिती सांगून युद्ध थांबविण्याचा प्रयत्न केला. पण आता फार उशीर झाला होता. युद्धानंतर मात्र तिचा बांध फुटला व तिने पांडवांना कर्ण हा तुमचा मोठा भाऊ असल्याचे सांगितले. शेवटचे विधी तरी योग्य तसे व्हावेत एवढीच इच्छा !
खरी आर्य स्त्री
कुंतीचा खरा मोठेपणा युद्धानंतरच दिसून येतो. राजधानीत तिने आपले आयुष्य धृतराष्ट्र- गांधारी यांच्या सेवेत घालवले.ती दोघे वनात निघाली तेव्हा तीही त्यांच्याबरोबर वनात गेली. भीम म्हणाला की " तुला जर वनातच जावयाचे होते तर एवढे युद्ध करावयास आम्हास का सांगितलेस ?" कुंती म्हणाली "तुमचे कर्तव्य तुम्ही करावे म्हणून मी तसे सांगितले. मला काही राज्योपभोग घ्यावयाचे नव्ह्ते. राजा पाण्डूच्या काळात मी यज्ञ केले, दान दिले, उपभोग घेतले. मला यांची आता काही इच्छा नाही." सासूसासर्या सारखे असलेल्या त्या दोघा वृद्धांची सेवा करण्यात तिने उरलेले आयुष्य वेचले व त्यांच्या बरोबरच ती वणव्यात नाहिशी झाली.
नियतीचे विचित्र खेळ कुंतीच्या आयुष्यात पहावयास मिळतात. असे व्हावयास नको होते एवढेच आपण म्हणू शकतो.
शरद
- महाभारतातीक व्यक्तिचित्रे-२ महामानिनी द्रौपदी
- महाभारतातील व्यक्तिचित्रे-३ राजर्षि भीष्म
- महाभारतातील व्यक्तिचित्रे-४ महारथी कर्ण
- महाभारतातील व्यक्तिचित्रे-५ अर्जुन
Book traversal links for महाभारतातील व्यक्तीचित्रे-१ कुंती
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम व्यक्तिचित्रण
तो समोर आल्यावर गोंधळून, काय
हे सपशेल अमान्य !!! हे केवळ
ते विचित्र ऋषि दुर्वास ऋषी
ते विचित्र ऋषि दुर्वास ऋषी
मृगनयनी
माधवी'जी.. हो!!... मी
ह्या दुर्वास ऋषींच आयुष्य
तुम्हाला नाय माहित हल्लीचे
ह्या दुर्वास ऋषींच आयुष्य
पटण्या योग्य स्पष्टीकरण
मनोरंजक लेख. खुप लहान असताना
मनोरंजक
नुसत्या प्रतिक्रिया???? अहो
हाहाहा! खरंय!!
त्याचं काय ए की वाचल्याशिवाय
अस्सं होय! नुसते मंत्र
आँ?
ऑ.वनपर्वात कुठून झाला हा
आदिपर्वातल्या संभवपर्व
त्या प्रमाणे कुंती आपल्या
याबाबतीत मन ने दिलेल्या
पॉप्कॉर्न आणल्या गेल्या आहे.
धन्यवाद
चांगले लिहिले आहे पण थोडे
+१
शत प्रतिशत सहमत
सहमत.पण तरीही लोक रामायण
सत्य समजणे किंवा न समजणे हे
फार सुंदर
लेख आवडला
मस्त लेख....
माहिती पूर्ण लेखन ! राजा
लेख आवडला. पुढील भागाच्या
नेहमीप्रमाणे शरद यांचा सुंदर
"युगान्त"(इरावती कर्वे) मधील उल्लेख
महिला.....