सूडाची ठिणगी - उत्तरार्ध
सम्राज्ञी गांधारीदेवींच्या भेटीला जाताना आपल्या मनातील योजना संशय येऊ न देता कशी मांडायची, यावर भानुमतीने बारकाईने विचार करुन ठेवला होता. राजमाता कुंतीदेवी आणि पांडव स्त्रियांनी आपला अपमान केला, हे गांधारीदेवींना सांगून चालणार नव्हते. तसं सांगितलं असतं तर उलट 'बरी जिरली सुनेची' म्हणून थेरडी मनातून सुखावली असती. त्यातून पांडवस्त्रियांचे एकवेळ ठीक, पण कुंतीदेवींबद्दल उलटसुलट सांगून चालणार नव्हते. सुनांवर दबाव ठेवण्यात या म्हातार्या नेहमीच एकमेकींच्या मैत्रिणी असतात. कुंतीमातेला वैधव्य प्राप्त झाल्याने इंद्रप्रस्थाचे सिंहासन ज्येष्ठ स्नुषा द्रौपदीकडे गेले खरे, पण ज्येष्ठत्वाच्या नात्याने अजुनही त्यांचा शब्द तेथे चालतो. हस्तिनापुरात तर काय बोलायलाच नको. अंध आणि वृद्ध का होईना, पण पती जिवंत असल्याने गांधारीदेवी अजुनही सम्राज्ञी होत्या. आपल्या कोणत्याही मागणीला खवट सासू फार विचार केल्याचा आव आणून अखेर ठोकरुन लावते, हे भानुमतीला अनुभवाने पक्के माहीत झाले होते.
'ये भानुमती. कसा झाला वास्तुशांतीचा कार्यक्रम?' गांधारीदेवींनी विचारले. पुढे होऊन सासूला वाकून नमस्कार करत भानुमती गोड हसून म्हणाली, 'हो आई. कार्यक्रम एकदम छान झाला. राजमाता कुंतीदेवींनी तुम्हाला परतीचा आहेरही पाठवला आहे.' तिने बरोबरच्या दासाला खूण केली. एका रत्नजडीत मंजुषेतील तलम वस्त्र उलगडून समोर धरले. ते सुंदर वस्र हाताळताना सम्राज्ञी सुखावल्या. 'किती सुंदर पोत आहे. इंद्रप्रस्थात अशी सुंदर वस्त्रे विणणारे आहेत?' त्या म्हणाल्या. त्यावर भानुमतीने पहिली खेळी खेळली. ती म्हणाली, ' हो आई. आणि असे विणकर अन्यत्र शोधूनही सापडणार नाहीत. राजमाता तर म्हणाल्याही, की गांधार देशातही अशी कलाकारी आढळत नाही, त्यामुळे तुझी सासू नक्की आनंदी होईल.'
आपल्या माहेरचा उल्लेख ऐकताच गांधारीदेवींचे कान तीक्ष्ण झाले. क्षणात ते वस्त्र हाताने दूर सारत त्या म्हणाल्या, ' हं!हस्तिनापूर सम्राज्ञीला असली वस्त्रे दुर्मीळ नाहीत. बरं. आपला आहेर आवडला का त्यांना?' त्यावर संभ्रमशील मुद्रा करुन भानुमती म्हणाली, ' मी तिथे गेल्यापासून कामात व्यग्र होते. मला कुणाशी बोलायला वेळच मिळाला नाही, मग जाणून तरी कसे घेणार?' गांधारीदेवींच्या मुद्रेवर आठी उमटली, 'काम? कसले काम? आणि तुला कुणी सांगितले?' त्यांनी विचारले. त्यावर भानुमती धूर्तपणे म्हणाली, ' नेहमीचेच हो आई. अतिथींचे आगतस्वागत. आहेरांची गणना. शीतपेयांचे वाटप.' पण ते विशेष नाही. समारंभ मात्र अत्युत्तम झाला. असे वैभव भूतलावर कुठेही आढळणार नाही, असे जो तो म्हणत होता. आपल्या द्रोणीमाता आणि कृपीमातांना तर राजमातांनी रत्नजडीत तबकात घालून लक्ष निष्क दक्षिणा म्हणून दिले.'
गांधारीच्या चेहर्यावर आता आठ्यांचे जाळे पसरले. नेत्रांवर पट्टी बांधलेली असल्याने त्यांचे भाव भानुमतीला पाहता आले नाहीत, परंतु सासू अस्वस्थ झाली आहे, हे ओळखून तिने खडा टाकला, ' मला वाटतं आई. या समारंभामुळे सगळ्याच कौरव स्त्रियांना श्रम झालेत. आपण हस्तिनापुरात श्रमपरिहाराचा कार्यक्रम ठेऊया का? तेवढेच सगळ्यांचे मनोरंजन होईल. जमल्यास पांडव स्त्रियांनाही बोलवूया.' त्यावर नेहमीच्या पद्धतीने गांधारीदेवी बोलल्या, 'बघू विचार करते.'
भानुमतीने पहिला डाव जिंकला. गांधारीदेवींनी हस्तिनापुरात श्रमपरिहाराला परवानगी दिली. पांडव स्त्रिया हस्तिनापुरात येऊन दाखल झाल्या. मौजमजा, चांदण्यात विहार, उत्तमोत्तम खाणे, गप्पा यामध्ये काळ कसा जात होता, हे समजतच नव्हते. एक दिवस दुपारच्या भोजनानंतर सगळ्या स्त्रिया एकत्र जमल्या होत्या. बराच वेळ गप्पा झाल्यावर भानुमती म्हणाली, 'कंटाळा आला बाई. काहीतरी खेळ खेळूया का?' त्याला पांडवस्त्रियांनी सहमती दर्शवली. भानुमतीने दासाला सांगून अक्षपट मागवला. द्रौपदी आणि भानुमती दोघीही डावामागून डाव जिंकू-हरु लागल्या. बाकीच्या स्त्रिया उत्सुकतेने डाव बघत होत्या. तेवढ्यात भानुमती म्हणाली, 'श्शी बाई. कसले पांचट डाव खेळतोय आपण? काहीतरी थरारक खेळू या का?' द्रौपदीने विचारले, 'म्हणजे कसे?' त्यावर भानुमती म्हणाली, ' तू तुझे इंद्रप्रस्थ राज्य, स्वतःसकट पांडवस्त्रिया आणि दास पती डावावर लावतेस का? द्रौपदी क्षणभर गांगरली, पण सगळ्या स्त्रियांमध्ये प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने अखेर कबूल झाली. दुर्दैवाने तो डाव द्रौपदी हरली.
भानुमतीला पराकोटीचा आनंद झाला. तिने सखी वृषालीला विचारले, ' आता या सगळ्याजणीच आपल्या दास झाल्यात आणि दासांना दास नसतो. त्यामुळे या स्त्रियांचे पती आपलेच दास झाले. आता त्या वाचाळ अर्जुनाला सगळ्यांसमक्ष फटके मारुन अंगावर पट्ट्या बांधायला भाग पाडूया का?' त्यावर वृषालीने आनंदाने होकार दिला. तिचा अर्जुनावर डोळा होताच, पण भानुमतीकडून चतुराईने अर्जुन दास म्हणून मिळवण्याचीही संधी आली होती. पांडवस्त्रिया हरल्याने मान खाली घालून बसल्या होत्या. तेवढ्यात गांधारीदेवी, द्रोणी, कृपी या म्हातार्याही काय गंमत झाली ते बघायला येऊन बसल्या. भानुमतीने अर्जुनाला महिलावर्गासमोर येण्याचा आदेश दिला. पण अर्जुनाने उलट निरोप पाठवला, 'आदल्या रात्री चारही स्त्रियांची हौस पुरी करताना मी पारच गळून गेलो असल्याने माझ्या अंगात त्राण उरलेले नाही. त्यातून त्यांच्या झोंबाझोंबीत माझी वस्त्रेही फाटून गेल्याने मी एकवस्त्र आहे. अशा अवस्थेत मला येता येत नाही.' हे ऐकताच भानुमतीचा क्रोध अनावर झाला. तिने नणंद दु:शीलेला आज्ञा केली, 'जा. त्या अर्जुनाला फरपटत इथे घेऊन ये. त्यादिवशी कसा अगदी पोपटासारखा बडबडत होता? आज नाही त्या पोपटाला बाहेर काढले तर नावाची भानुमती नव्हे.'
दु:शीला ही अर्धवट डोक्याची आणि माथेफिरु होती. तिने अर्जुनाला केसाला धरुन फरपटत आणले. विकट हसून भानुमती म्हणाली, ' डोळस सून काय करु शकते, हे आज तुला कळेल दासा.' ती अर्जुनाला म्हणाली, ' तुला आमच्या कौरवस्त्रियांपैकी कुणाचाही दास म्हणून राहाता येईल. बोल तुला कोण आवडेल?' त्यावर अर्जुन म्हणाला, 'मी केवळ चार स्त्रियांचा दास राहिलो आहे. मी त्यांच्याशीच एकनिष्ठ राहाणार. मी व्यभिचारी नाही' संतप्त भानुमती अर्जुनाला झोडपण्याचा आदेश देणार तोच वृषालीने सूत्रे आपल्या हाती घेतली. ती भानुमतीला म्हणाली, ' राज्ञी. याचे काय ऐकता? चार चार स्त्रियांनी दास म्हणून ठेवलेला हा पुरुष आणि म्हणे व्यभिचारी नाही. याच्यापेक्षा देहविक्रय करणारा पुरुष बरा. तो निदान उघड व्यवसाय करतो.'
इतकावेळ उभे राहिल्याने अर्जुनाच्या पायाला कळ लागली होती. तो म्हणाला, 'आधीच माझ्या अंगात त्राण नाही आणि त्यातून उभा. निदान बसायला जागा तरी द्या.' त्यावर छद्मी हसून भानुमती म्हणाली, ' या इतक्या बायकांनी जागा व्यापल्यानंतर तुला बसायला काय चौरंग मांडू का? की आमच्या छोट्या लक्ष्मणासारखा मांडीवर घेऊन बसू? निर्लज्ज कुठला?' वृषालीने यावेळी एक औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. ती भानुमतीला म्हणाली, 'राज्ञी! हा पुरुष निर्लज्जच नव्हे तर उर्मटही आहे. याच्या अंगावर अद्याप पांडवांचे वस्त्र आहे. अक्षपट खेळात हरल्याने हा आता कौरवांचा दास झालाय. तेव्हा त्याला ते वस्त्र उतरावयाला सांगावे.' वृषालीचा यात आणखी एक हेतू होता. द्रौपदीच्या या पती-दासाच्या अंगावर कुठेही केस नाहीत आणि त्याची त्वचा नीतळ सुवर्णझळाळी मिरवणारी आहे, शिवाय त्याच्या अंगाला नैसर्गिक सुगंध आहे, असे वृषालीने ऐकले होते. कपिसम केसाळ, अजागळ आणि अंगाकाखांना घर्माचा कुबट वास मारणारे पुरुष वारंवार नजरेला पडल्याने तिला हा चमत्कार बघण्याची खूप काळापासून इच्छा होती. भानुमतीला वृषालीची सूचना इतकी पटली, की डोळ्यासमोर पती-दासाला निर्वस्त्र केलेले पाहून द्रौपदीच्या अंगाची कशी लाही होईल, हे बघण्यास ती आतुर झाली. तिने अर्जुनाला आदेश दिला, ' ते वस्त्र काढून टाक आणि कौरवांचे वस्त्र घाल.' त्यावर अर्जुन थरथर कापू लागला. त्याने अंगावरचे वस्त्र हाताने घट्ट धरुन ठेवले.
अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर भानुमतीने दु:शीलेला आदेश दिला, की तू स्वतः ते वस्त्र हिसकावून घे. यावेळी पांडवस्त्रिया प्रचंड क्षुब्ध झाल्या. हिडिंबा उठून म्हणाली, ' भानुमती. तुझ्या झिंज्या उपटून टाकीन, ही माझी प्रतिज्ञा आहे.' त्यावर वृषाली पुढे सरसावली आणि म्हणाली, ' ए टवळे! झिंज्या कुणाच्या उपटणार तू?' आधी स्वत:च्या मस्तकावर बोटभर केस उरलेत तिकडे बघ. खादाड मेली. जेव्हा बघावं तेव्हा ही , तिचा दास भीम आणि मुलगा घटोत्कच सारखे चरत असतात. खाऊन खाऊन माजलेत नुसते. एक बाळंतपण काय झालं तर हत्तीण बरी इतकी अवाढव्य फुगलीय नुसती. आणि तू कशाला द्रौपदीच्या दासासाठी कंठशोष करतीयस. तुझा तो वृकोदर दास भीम संभाळून ठेव. पुन्हा आपल्या आकाराचा दास मिळणार नाही तुला. जा वजन कमी कर आधी. नाहीतर कोपर्यात घोरत पड.'
यावर नागकन्या उलुपि पुढे सरसावली. ती वृषालीला म्हणाली, 'तू निम्न जातीची बाई. तुझा काय राजस्त्रियांमध्ये बोलण्याचा संबंध? हिडिंबा काय तुझ्या बापाचं खाते का? तू मात्र कौरवांचे खरकटे खाऊन जगतेस आणि नखरा केवढा गावभवानीचा?' जातीवरुन हिणवल्याने वृषाली संतापली. पण तिला मागे सारत भानुमती म्हणाली, ' अगं हडळे! वृषाली निदान मानवातील निम्न जातीची तरी आहे. तुम्ही नागलोक म्हणजे मानवापेक्षाही खालच्या योनीचे आहात. जरा बरोबर बसवलं की माजलेच हे नागडे.'
ही भांडाभांडी अजून पेटली असती, पण द्रौपदी इतक्या वेळपासून प्रथमच बोलली, ' माझं द्रौपदी नाव 'द' अक्षराने सुरु होते. तेव्हा मी दानी आहे आणि भानुमती तुझं नाव 'भ' पासून सुरु होते त्यामुळे तू भिकारी आहेस. मी माझं राज्य तुला दानात दिलंय ते पुरेसं नाही का? तुझी माझ्या पती-दासावर नजर का? तुला जास्त दास गरजेचे होते तर तसं सांगायचं मला. दिले असते.'
त्यावर दु:शीला उसळून म्हणाली, ' समजलं गं सटवे तुझं कुजकं बोलणं. पण एक लक्षात ठेव. आमच्या वैन्यांना प्रत्येकी एक पती-दास दिलाय करुन आम्ही. तुमच्यासारखं एक तीळ सातजणांत वाटून खाण्याची वेळ आलेली नाही अजून कौरवांवर. हे असले एका ताटात सगळ्यांनी जेवायचे प्रकार भिकार्यांमध्ये असतात. तेव्हा समजतंय का, कोण भिकारी आहे ते.'
दु:शीलेने पुढे होऊन अर्जुनाचे वस्त्र अंगावरुन खेचून काढले. सगळी सभा स्तब्ध झाली. गंमत बघायला मिळणार, या अपेक्षेत असलेल्या वृषालीचा भ्रमनिरास झाला. अर्जुनाने आतून कमरेला एक शेला बांधलेला होता तो सगळ्यांना दिसला. वृषाली दातओठ खात भानुमतीला म्हणाली, ' हा नीच आपल्याशी खोटं बोलला. एकवस्त्र आहे असं म्हणाला होता. मग आता हे दुसरं वस्त्र आलं कुठून?
'मी दिलं'... एक अपरिचित धारदार आवाज आला. सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले. अर्जुनाच्या लगत बसलेली एक स्त्री उठून उभी राहिली होती. महिलावर्गात एकदम कुजबूज सुरु झाली. 'अगंबाई. ही तर रुक्मिणी. द्वारकेची राणी. पण ही इथं कशी?' पांडवस्त्रियांनी रुक्मिणीकडे धाव घेतली आणि 'अय्या! रुक्मे तू? अगदी ऐनवेळी आलीस गं.' म्हणत तिच्या गळ्यात हात टाकले. सुभद्रेला आपल्या वैनीचा विलक्षण अभिमान वाटला.
भानुमतीकडे बघून रुक्मिणी म्हणाली, ' तुम्ही अर्जुनाच्या अंगावरचे पांडवांचे वस्त्र काढून घेतले आहे. आता त्याच्या कटीला जो शेला आहे तो माझा आहे, यादवांचा आहे. त्याला हात तर लाऊन बघा. नाही एकेकीच्या कमरेत लाथा घातल्या तर नावाची रुक्मिणी नाही. बिनकामाच्या अवदसा मेल्या!' रुक्मिणीचा तो आवेश बघून भानुमती गांगरली.
आपली बालमैत्रिण आणि हितचिंतक असलेली रुक्मिणी संकटकाळी मदतीला धावल्याने अर्जुन कृतकृत्य झाला. रुक्मिणीने सम्राज्ञी गांधारीदेवींना चांगलेच फैलावर घेतले. 'भरतखंडात स्त्रीसत्ताक पद्धती असली तरी दुर्बल, एकवस्त्र अशा दास पुरुषाची मानखंडना करण्यात कसला आलाय स्त्रियार्थ?' ती कडाडली. 'गांधारीदेवी. सुनांना आवरा. यातच स्त्रियांच्या हेव्यादाव्याची बीजे आहेत.' गांधारीदेवींनी नेत्रावर पट्टी असल्याने आपल्याला काही दिसत नाही, असा पवित्रा घेतला आणि अर्जुनाला तेथून घेऊन जाण्यास सांगितले. रुक्मिणी तेथून जाताच पांडवस्त्रियाही उठल्या. भानुमती मात्र दातओठ खात उभी होती. तरीही तिने द्रौपदीला एक शेवटचे आव्हान दिले. 'फक्त एकच डाव खेळ. जिंकलीस तर तुझे राज्य तुला अन्यथा पांडवस्त्रियांनी दास-पतींसह वनवासात जायचे.' लोभाने खेळलेली द्रौपदी तोही डाव हरली.
सूर्य अस्ताला जात असताना पांडवस्त्रिया आणि त्यांचे दास पती असा एक जथा नगरवेशीच्या बाहेर पडत होता. कुंतीदेवींचे सांत्वन करणारी रुक्मिणी गंभीर झाली होती. सूडाची ही ठिणगी उग्र रुप धारण करुन किती स्त्रियांना एकमेकींचे शत्रू बनवेल, हे चित्र तिला डोळ्यापुढे दिसत होते. लाखो स्त्रिया एकमेकींसमोर उभ्या राहून एकमेकींना यथेच्छ शिव्या देतील, हे दृश्य नियती बघत होती. पुढील हजारो वर्षानंतरही समाज या महामायायुद्धाला 'बोरीचा बार' म्हणून ओळखेल, हे नियतीलाही ठाऊक होते.
(समाप्त)
वर्गीकरण
_/\_
अयायाया... महाभारतातला बाजार
In reply to अयायाया... महाभारतातला बाजार by पिंगू
अगदी हेच मनात आलं...
In reply to अयायाया... महाभारतातला बाजार by पिंगू
+१
जबरा, मस्तच झालंय, बहुधा असंच
_/\_
बाजार!
In reply to बाजार! by पैसा
+१
In reply to +१ by सोत्रि
एकदम मान्य...
In reply to बाजार! by पैसा
शिव्या ऐकणे चांगले नाही....
In reply to शिव्या ऐकणे चांगले नाही.... by योगप्रभू
+१
In reply to +१ by सहज
ठ्ठो:
In reply to ठ्ठो: by रमताराम
मातृसत्ताक
In reply to मातृसत्ताक by पैसा
ओ मावशी
In reply to ओ मावशी by रमताराम
ओ आजोबा,
In reply to ठ्ठो: by रमताराम
यापुढ इथे येताना शिरोवस्त्र
In reply to शिव्या ऐकणे चांगले नाही.... by योगप्रभू
वृषाली...
हाहा
नाग
खपलो
In reply to खपलो by श्रावण मोडक
वाचून नुसता खदा खदा
छान मनोरन्जन झाले वाचून
प्रभु
वा वा!
योगप्रभू, जिंकलात बघा!!!!!
हा हा गंमतीशीर एकदम
मेलो
_/\_
__________/\_________!!!!!!!
ज ब रा हा!!!!! जियो!!!
हा हा हा !!
प्रभुगुर्जी __/\__
कहर....
योगप्रभु साहेब, अफाट भारि आहे हे.
हाहाहा! एकच नंबर! =)) बादवे,
In reply to हाहाहा! एकच नंबर! =)) बादवे, by बिपिन कार्यकर्ते
गणपती नाय
In reply to गणपती नाय by मन१
आयला मग योगप्रभूही चेंज झाले
In reply to आयला मग योगप्रभूही चेंज झाले by बिपिन कार्यकर्ते
=))
In reply to =)) by पैसा
म्हणजे योग्याच गणपती! =))
In reply to म्हणजे योग्याच गणपती! =)) by बिपिन कार्यकर्ते
करा लेको आमचा मोरया...
In reply to करा लेको आमचा मोरया... by योगप्रभू
हा हा हा
In reply to हा हा हा by रमताराम
+१ तुमचा मूषक असाच नेहमी
आता रामायणाकडे वळा.
In reply to आता रामायणाकडे वळा. by JAGOMOHANPYARE
एकेकाळी गाजलेल्या घोष
छान
धन्य आहात योगप्रभू.
सप्शेल आडवा.....
_/\_