Skip to main content

ने मजसि ने...

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 19/07/2008 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख यापूर्वी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध झाला आहे. परंतु आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या गुरुजींना आदरांजली म्हणून हा लेख मला मिपावरही टाकावासा वाटला म्हणून तो मी टाकत आहे. आपल्यापैकी काही मंडळींनी हा लेख वाचलाही असेल. असो, आजचा दिवस थोडासा बेचैनीतच गेला! बाबूजींना या लेखाद्वारे माझी विनम्र आदरांजली! नमस्कार मंडळी, आज गुरूपौर्णिमा. माझी काही दैवते आहेत. त्यांना मी माझ्या गुरूस्थानी मानतो. बाबुजी(स्व.सुधीर फडके), अण्णा(भीमसेनजी) ह्या माझ्या प्रातःस्मरणीय व्यक्ती. २००२ सालची गुरूपौर्णिमा. सकाळची वेळ. गुरूपौर्णिमेनिमित्त दादरला बाबुजींना भेटायला जायचे होते. मी बाबुजींच्या घरी फोन लावला. फोनवर सौ ललिता मावशी (बाबुजींची पत्नी) होत्या. तेव्हा मला समजलं की बाबुजींना हिंदुजा रुग्णालयांत दाखल केले आहे. मी लगेच हिंदुजाला जायला निघालो तर त्या मला म्हणाल्या की ते अत्यवस्थ आहेत, तेव्हा तू आत्ता लगेच नको येउस, बऱ्याच तपासण्या सुरू आहेत, संध्याकाळी ये. संध्याकाळ होईपर्यंतचा काळ मी खूप अस्वस्थतेत काढला. अनेकवेळा त्यांच्याघरी मी गेलो होतो. त्यांच्याशी बोललो होतो. त्यांच्याकडे जेवलो होतो. ते घरांत नसले की ललिता मावशींकडून त्यांच्या खूप आठवणी ऐकल्या होत्या. काही काही वेळेला बाबुजी मूड मध्ये असले की माझी चेष्टाही करायचे. म्हणायचे, "मग काय पंडितजी, आम्हाला तुमच गाणं केव्हा ऐकवणार? आम्हालाही कळतं गाण्यातलं थोडसं..!" :) संध्याकाळी हिंदुजात गेलो. पण दुर्देव! बाबुजी कोमात गेले होते. बाहेरच व्हरांड्यात श्रीधरजी भेटले. त्यांनी खुणेनंच आंत जा असं सांगीतलं. मी घाबरतच आय. सी. यू. त गेलो. मला खूप भरून आलं होतं. आंत जाऊन पाहतो तर बाबुजी जवळजवळ मरणशय्येवरच विसावले होते. तात्यारांव सावरकरांचा हा शिष्य हळूहळू शांत होत होता. आता जीवनाशी झगडा संपत आला होता. मी कॉटजवळ बसून त्यांचा हात हातात घेतला. पण ते रुसले होते माझ्यावर. सहजच माझी नजर खिडकीबाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे गेली, आणि मला तात्याराव सावरकरांच्या काव्यपंक्ती आठवल्या, "ने मजसी ने...". हातात बाबुजींचा हात, समोर समुद्र, आणि मनांत ह्या काव्यपंक्ती! खरं सांगतो मंडळी, ती भकास कातरवेळ मन विषण्ण करुन गेली. बाहेर आलो, ललितामावशींजवळ थोडा वेळ बसलो. काही सुचेना. एकटाच बाथरूममध्ये जाऊन हमसाहमशी रडलो. अचानक माझ्या एका मित्राची मला आठवण झाली. तो दादरलाच रहायचा. मला नेहमी म्हणायचा, "तात्या लेका इतक्यावेळा बाबुजींकडे जातोस, मला पण ने की केव्हातरी त्यांच्या घरी. पण नेहमी जाऊ जाऊ म्हणता ते राहूनच गेलं होतं माझ्याकडून. मी त्याला फोन केला आणि बोलावून घेतले हिंदुजामध्ये. तो लगेच आला, मी त्याला सर्व कल्पना दिली. तो मला एवढंच म्हणाला, "तात्या, खूप उशीर केलास रे तू....!" तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5096
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

भाग्यवान आहात.. आपल्या मानस गुरूंच्या शेवटच्या क्षणीही आपण त्यांच्याजवळ होतात, त्यांचा सहवास भरपूर लाभला आपल्याला.. हा लेख माझंही मन विषण्ण करून गेला.. आपल्या गुरूंना माझीही आदरांजली.. मी ही म्हणते की, " हा लेख मिपा वर उतरवायला खूप वेळ लावलात, तात्या." - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शतशः नमन बिपिन.

तात्या तुम्ही आठवण सा॑गुन रडवलेत की ही आम्हाला. खुप महान गुरू होते तुमचे.

तात्या, खरोखर भाग्यवान आहात तुम्ही. बाबुजींसारख्या मोठ्या व्यक्तिचा सहवास लाभला तुम्हांला. मला त्यांचं "सखी मंद झाल्या तारका" फार आवडतं. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

तात्या, खरोखर भाग्यवान आहात तुम्ही. बाबुजींसारख्या मोठ्या व्यक्तिचा सहवास लाभला तुम्हांला. -दिलीप बिरुटे

मी कॉटजवळ बसून त्यांचा हात हातात घेतला. पण ते रुसले होते माझ्यावर. सहजच माझी नजर खिडकीबाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे गेली, आणि मला तात्याराव सावरकरांच्या काव्यपंक्ती आठवल्या, "ने मजसी ने...". हातात बाबुजींचा हात, समोर समुद्र, आणि मनांत ह्या काव्यपंक्ती! खरं सांगतो मंडळी, ती भकास कातरवेळ मन विषण्ण करुन गेली.
खर आहे वाचताना देखील कातर झाले. मज वदलाशी अन्य देशी चल जाउ सृष्टीची विविधता पाहु बाबुजींचा श व ष लक्षात रहातात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

खर आहे वाचताना देखील कातर झाले
असेच म्हणतो.. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

परत वाचताना देखील मन विषण्ण .. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला त्यांचा सहवास मिळाला अगदी शेवटपर्यंत...

In reply to by सहज

आधी वाचला होता,परत वाचताना देखील मन विषण्ण.. सहजरावांसारखेच म्हणते. स्वाती

डोळ्यात पाणी आणलत अगदी.............. शब्दच सुचत नहिएत काही बोलायाला.......... कन्ठ दाटून आला ......................