Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ए.चंद्रशेखर on Sun, 11/27/2011 - 15:10
खाद्यपेये, धान्ये, भाजीपाला, या सारख्या उपभोग्य, ग्राहकोपयोगी व जीवनोपयोगी वस्तूंची किरकोळ विक्री केवळ छोट्या व्यापार्‍यांच्या आणि भारतीय कंपन्यांच्याच हातात असावी की त्यात परदेशी बड्या कंपन्यांना शिरकाव करू द्यावा या गेली 5 वर्षे गाजत असलेल्या व त्यावर अनेक उलट सुलट विचार मांडले गेलेल्या मुद्यावर अखेरीस भारताच्या मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे. काही अटीसह या क्षेत्रात परदेशी कंपन्यांना शिरकाव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयावर काही राजकीय पक्ष किंवा अडते बाजारातील दलाल, व्यापारी हे साहजिकच नाखुष असणार हे स्वाभाविक आहे. परंतु सर्वसाधारण उपभोक्ता व या अशा वस्तूंचे उत्पादक व शेतकरी यांच्यावर या निर्णयामुळे काय परिणाम होईल? उपभोक्त्यांना वस्तू स्वस्त मिळतील का? शेतकर्‍यांना रास्त भाव मिळतील का? या बाबतीत लोकांच्या मनात शंका असणे साहजिकच आहे. गेल्या काही वर्षांच्या अनुभवामुळे या बाबतीत काही अंदाज बांधणे शक्य होईल असे मला वाटते व माझे आडाखे मी खाली देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतातील परंपरागत वितरण व्यवस्था ही उत्पादक- अडते- घाऊक खरेदीदार- किरकोळ विक्री करणारे-उपभोक्ता अशी राहिलेली आहे. या व्यवस्थेत सुधारणा म्हणून सरकारी खरेदी-विक्री संस्था अस्तित्वात आल्या. शेतकर्‍यांना योग्य भाव मिळावा म्हणून सरकारने अनेक कायदे केले, हमी किंमती ठरवल्या. परंतु हे सर्व करूनही शेतकर्‍यांना किंवा उत्पादकांना मिळणारी किंमत व उपभोक्त्याला पडणारी किंमत यात अनेक पटीचा फरक हा राहिलेलाच आहे हा फरक या साखळीतील अडते व घाऊक खरेदीदार हे मिळवत असलेला अतिरिक्त नफ्याच्या स्वरूपातला आहे. 2000 च्या दशकात भारत सरकारने प्रथम या वितरण क्षेत्रात प्रवेश करण्यास भारतीय कंपन्यांना परवानगी दिली. रिलायन्स, बिग बझार, टाटा यासारख्या काही उद्योगांनी आपल्या वितरण साखळ्या तयार केल्या व त्यांच्याकडे ग्राहक वर्ग़ आकर्षिला गेला ही सत्यता आहे. मला स्वत:ला रिलायन्स व टाटा यांचा अनुभव नाही परंतु बिग बझारच्या अनुभवावरून मला असे स्पष्ट दिसते आहे की ग्राहकासाठी तरी या बड्या वितरकांची दुकाने हे एक वरदानच आहे. वस्तूंच्या किंमती 10% दराने वाढत असताना हे वितरक त्यांच्या दुकानात विकल्या जाणार्‍या मालाच्या किंमतीत कमीत कमी वाढ करत असतात हे मी गेले वर्षभर अनुभवलेले सत्य आहे. त्यामुळे या बड्या वितरकांची लोकप्रियता वाढतच चालली आहे. हे बडे वितरक मार्केट यार्डांमधून घाऊक खरेदी करत असल्याने वितरणाच्या साखळीतील मधले दुवे अनावश्यक ठरत आहेत व त्यामुळेच या बड्या वितरकांना माल कमी किंमतीत विकणे शक्य होते आहे. स्पेन्सर्स ही चेन्नई मधील कंपनी या वितरणाच्या क्षेत्रात उतरलेली आहे. त्यांच्या दुकानातून मी बर्‍याच वेळांना भाजी पाला खरेदी करतो. येथेही माझा अनुभव अतिशय उत्तम आहे. हे खरे आहे की या दुकानात मिळणारे भाजांचे प्रकार मर्यादित असतात. परंतु ज्या काही भाजा मिळतात त्या बाजारभावापेक्षा बर्‍याच स्वस्त असतात. या वितरकाला हे शक्य होते कारण त्याने अनेक भाजी उत्पादकांना बांधून घेतले आहे व त्यांना तो किंमतीची हमी देत असल्याने शेतकरी त्याला भाजी देण्यास नेहमीच तयार असतात. यावरून एक गोष्ट लक्षात येते की बड्या वितरकांचा या क्षेत्रातील प्रवेश हा उत्पादक व उपभोक्ता या दोन्हींसाठी लाभदायक ठरला आहे. भारतातील उपभोक्त्यांची एकून संख्या लक्षात घेतली तर वितरणाचे हे क्षेत्र केवढे अमर्याद आहे हे सहज लक्षात येते. भारतातील वितरक अजून तेवढे मोठे नाहीत. त्यांच्याकडचे भांडवल, त्यांनी निर्माण केलेल्या वितरण सुविधा या नाही म्हटले तरी एकूण उपभोक्ता संख्येच्या मानाने मर्यादित आहेत. त्यामुळेच परदेशी वितरक या क्षेत्रात आले तरी त्यांच्यामुळे भारतीय वितरक कंपन्यांच्या व्यापारावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे आणि एकूण स्पर्धा वाढली तर फायदा ग्राहक व उत्पादक यांचाच होणार आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचे आपण सर्व ग्राहकांनी सहर्ष स्वागत केले पाहिजे असे मला वाटते. मंत्रीमंडळाने या शिवाय आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. एकाच ब्रॅण्ड नावाने विक्री करणार्‍या वितरकांना आता पूर्णपणे त्यांच्या मालकीची (100 % स्वत:च्या मालकीचे भांडवल) दुकाने काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. बर्‍याच लोकांना असे वाटते आहे की कार्तिए, प्राडा या सारख्या उच्च फॅशन्स मालाच्या दुकानदारांसाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे. या बाबतीत एका स्वीडिश कंपनीचे उदाहरण मला द्यावेसे वाटते. ‘इकिया‘ ही कंपनी जगभर आपल्या ब्रॅन्डची दुकाने चालवते. ही कंपनी अगदी सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा किंमतीमधे फर्निचर, गृहोपयोगी वस्तू, भांडी यासारख्या वस्तू विकत असते. भारतात येण्याला ‘इकिया‘ ला बराच रस आहे. ही कंपनी जर भारतात आली तर गृहोपयोगी सामानाच्या क्षेत्रात एक क्रांती घडून येईल या बद्दल मला तरी शंका वाटत नाही. या कंपनीच्या उत्पादनांशी स्पर्धा करू शकतील अशा वस्तू इतर स्पर्धकांना बनवाव्या लागतील व सर्व सामान्यांना परवडतील अशा वस्तूंची एक नवी मालिकाच भारतात उपलब्ध होऊ शकेल. भारत सरकारच्या या दोन्ही निर्णयांचे आपण सर्वांनी स्वागतच केले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. बिग बझार या भारतीय मालकीच्या व विक्री क्षेत्रात उतरलेल्या यशस्वी कंपनीबद्दलचा माझा लेख या दुव्यावर वाचता येईल.
  • Log in or register to post comments
  • 8681 views

प्रतिक्रिया

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sun, 11/27/2011 - 17:38

Permalink

असे वाटले होते की परदेशी

असे वाटले होते की परदेशी तंत्र्द्यान येथे येईल.. चीन सारखे कारखान दारीचे जाळे भारतात पसरेल...कुशल कामगार तयार होतील..नोक-यांचा सुकाळ होईल. पण पिझ्झा..जीन्स..मॉल्स..मोबाईल..सिनेमे..चिप्स..आदी चंगळवादी वास्तूंनी धुमाकूळ घातला व मूळ कल्पना धुळीस मिळाली की काय अशी परिस्थिती आली आहे. ना आपण मोबाईल ना संगणक बनवू शकत.. १ कोटी नोक-या निर्माण होणार असा दावा केला जातो.. पण कुठल्या नोक-या? मोल मध्ये कपड्याच्या घड्या घाल|णे..हे उचला तिकडे ठेव..असल्या नोक-या गांधीचा मित्र आहे वालमार्त चा मालक असे माया बेहन म्हणत आहे.. ख.खो.दे.जा... राजकीय नेते व त्यांचे नातेवाईक यांची मजा आहे.... शेवटी भरभक्क म भाडे तेच वसूल करणार.. काकडे मोल..डेक्कन वरचा के.एफ सी चा मोल..सा-यां ठाऊक आहे कुणाचा आहे तो. येऊ द्यात.. मारु चक्कर...
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sun, 11/27/2011 - 17:56

Permalink

अड्त्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष

अड्त्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Sun, 11/27/2011 - 18:44

Permalink

परदेशी कंपन्यांकडून पुरवठा

परदेशी कंपन्यांकडून पुरवठा साखळी सुधारण्याची अपेक्षा करुन एफडीआयला मंजूरी दिली जात असेल मग त्याचा अर्थ 'आमच्या देशात हे आम्हाला करणे शक्य नाही' हे सरकारनेच मान्य केल्यासारखे वाटते. http://www.thehindubusinessline.com/industry-and-economy/economy/article2554965.ece FDI in multi -brand retail Dr Rangarajan said the opening up of retail is independent of containing inflation. This is in contrast to the recommendation of the Inter Ministerial Group, headed by the Chief Economic Advisor, Dr Kaushik Basu. The group had said that FDI in multi-brand retail should be allowed in order to curb inflation. Dr Rangarajan said first, there is no surety on the number of multinational companies that would be interested in setting up contracts for the farmers and secondly, no one can ascertain the impact of opening up of the sector. केंद्राच्या कुणीतरी जबाबदार अधिकार्‍याने 'किरकोळ क्षेत्रात एफडीआयला मंजूरी दिल्यास पुरवठा साखळीत सुधारणा होईल आणि त्याचा फायदा किमती कमी होण्यात होईल असे म्हटल्याचे आठवते. असे सी. रंगराजन म्हणाल्याचे पुसटसे आठवत होते.. पण आत्ता शोध घेतला तर ते वेगळेच काही म्हणाल्याचे दिसते. असो. तुका म्हणे स्वस्थ रहावे वगैरे..
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sun, 11/27/2011 - 22:06

Permalink

हम्म

.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 11/27/2011 - 23:32

Permalink

कॉलिंग मुटे साहेब.

हे मार्केट कमिटी प्रकरण जरा आम्हाला समजाऊन सांगाल काय? मी शेतकरी असलो, अन माझ्या शेतातली भाजी लोटगाडिवर घालून शेजारच्या शहरात विकायला नेलि तर काय होते?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/28/2011 - 16:05

In reply to कॉलिंग मुटे साहेब. by आनंदी गोपाळ

Permalink

हे मार्केट कमिटी प्रकरण जरा

हे मार्केट कमिटी प्रकरण जरा आम्हाला समजाऊन सांगाल काय? मी शेतकरी असलो, अन माझ्या शेतातली भाजी लोटगाडिवर घालून शेजारच्या शहरात विकायला नेलि तर काय होते? प्रत्येक शहरात कृषीउत्पन्न बाजार समिती असते. या समितीत कृषी उत्पादक असावेत अशी अपेक्षा असते. पण अनुभव मात्र वेगळाच आहे. तुम्ही तुमचा शेती माल या घाऊक बाजारात नेलात तर सर्वप्रथम त्याची बाजार समितीला नोंद करावी लागते त्यानंतरच तुम्ही माल लिलावात विकू शकता. लिलाव बोलणारे दलाल हा शेतकर्‍याचा माल कोणत्याही तर्कशास्त्रा नुसार नव्हे तर त्यांच्या मनाल येईल ( बहुतेक प्रसंगी सिंडिकेट करुन ) त्या पडेल भावात खरेदी करतात्. व्किरी झाल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात सरळ पैसा उपलब्ध होत नाही. तो दलालाने दिल्यानंतर बाजार समिती च्या नुसार उपलब्ध होतो. बाजार समितीला या व्यवहाराबद्दल कमिशन मिळते. तुम्ही बाजार समितीला डावलुन घाऊक बाजारात थेट विक्री करु शकत नाही.( हापुस चित्रपट पहा) माल कितीही उत्तम असला तरीही त्याचा भाव मार्केटमधले दलाल ठरवतात. बरेचदा बाजारात आवक जास्त असेल तर वाहतुक खर्च देखील निघत नाही. शेतकर्‍याला अक्षरशः माल न विकला गेल्यामुळे फेकून द्यावा लागतो. बहुतांश बाजार समित्या राजकीय पुढारी आणि दलालांच्या हातात असतात. बळीराजाची नाडणूक करण्याचे काम पद्धतशीरपणे केले जाते
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 11/28/2011 - 21:02

In reply to हे मार्केट कमिटी प्रकरण जरा by विजुभाऊ

Permalink

>>> तुम्ही बाजार समितीला

>>> तुम्ही बाजार समितीला डावलुन घाऊक बाजारात थेट विक्री करु शकत नाही. मग शहरात जिपडे भरून कोबी, फुलवर कशी काय विकतात शेतकरी? धान्यबाजारही भरतो काही ठिकाणी. अन शेतकर्‍यावर याच बाजारसमीतीत माल विकावा असे बंधन नसते. तो इतर ठिकाणीही जावू शकतो. अर्थात काही वेळा जिल्हाबंदी, राज्यबंदी आदी प्रकार होवू शकतात पण ते नियमाला अपवाद या न्यायाने.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Wed, 11/30/2011 - 20:52

In reply to हे मार्केट कमिटी प्रकरण जरा by विजुभाऊ

Permalink

एक्झॅक्ट्ली!

शेतकर्‍यांचा जीव घेणारा हा ब्रिटिशकालीन प्रकार या निर्णयामुळे मोडीत निघेल तर फार बरे होईल..
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Mon, 11/28/2011 - 09:46

Permalink

आउट सोर्सिंग मधे अमेरिकेने

आउट सोर्सिंग मधे अमेरिकेने निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला कि आपण आरडा ओरड करतो मग त्याना इथे येउन धंदा करु द्यायला काय हरकत आहे . फक्त आपणच तेथे जाउन पैसे कमवायचे हा एकांगी विचार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Mon, 11/28/2011 - 12:27

Permalink

चांगलं झालं

अडते, मोठे व्यापारी, सावकार आणि त्यांना पाठीशी घालणारे राजकारणी ह्यांच्या भ्रष्ट युती मुळे इतकी वर्ष शेतकरी आणि सामान्य माणूस भरडला जात होता. आता ह्या सगळ्याला पायाबंद बसेल अशी अपेक्षा आहे. जे आतापर्यंत लोकांना नागवत आले त्यांना आता बांबू लागायची चिन्ह आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Mon, 11/28/2011 - 12:47

Permalink

किशोर

ह्यापूर्वीही ह्या क्षेत्रात परदेशी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही विरोध होता. बिग बाजारचे किशोर बियानी ह्यांनी परदेशी गुंतवणूक देशाला हानिकारक ठरेल असे वृत्तपत्रांमधून लिहिले होते.!! म्हणजे ह्यांनी दुकाने उघडली तर देशाला फायदा आणि ईतरांनी उघडली तर देशाला तोटा. जे आतापर्यंत लोकांना नागवत आले त्यांना आता बांबू लागायची चिन्ह आहे. सहमत. ही मोठी साखळीच देशाला ** बनवत आली आहे वर्षानुवर्षे. मायावाती,जयललिता,शरद यादव ह्या भ्रष्ट पुढार्‍यानी या विरोधात बोंब ठोकली आहे. सरकार लोकहिताचा निर्णय् घेते की शेठजी लॉबीपुढे नमते ते बघायचे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 11/28/2011 - 13:11

Permalink

ग्राहकांना यामुळे फायदाच

ग्राहकांना यामुळे फायदाच होईल... मॉल मधले एक उदा. सांगावेसे वाटते... सामान्य दुकानातुन सॉस किंवा जॅमच्या बाटली घ्यायची झाली तर ठराविक ब्रॅडचाच घ्यावा लागतो...पण हेच मॉल मधे गेलात तर अनेक पर्याय उपलब्ध असतात्,शिवाय लोकल मेक चे (छोटे उत्पादकांचे) सुद्धा सॉस आणि जॅम विक्रीस ठेवलेले आढळतात्...छोट्या उत्पादकांना मॉलमुळे चांगले दिवस आले आहेत्.दुकानदार त्याचे उत्पादन ठेवतो ज्यात त्याला पैसे सुटतात किंवा कमिशन मिळते. विक्रीक्षेत्रामध्ये बड्या कंपन्यांचा शिरकाव झाल्यास ग्राहकांना अनेक प्रर्याय खरेदी करताना मिळतील तसेच त्यांचे पैसे देखील वाचतील्.मॉल मधुन खरेदी केलेल्या वस्तुंचे बील नीट पाहिल्यास बिलाच्या शेवटी तुम्ही किती पैसे वाचवलेत याचा तपशील बर्‍याच वेळा आढळतो. भाजीपाला वगरै जर शेतकर्‍यांनकडुन उचलला जाणार असेल तर शेतकर्‍यांसाठी ते एक वरदान ठरेल... सरकारने तसे काही नियम देखील करावेत. ज्या विदेशी वस्तु पुर्वी सामान्य ग्राहकाला घेणे शक्य नव्हते /मिळत नव्हत्या त्या यामुळे घेणे सोप्पे जाईल.अगदी साधारण उदा. द्यायचे झाले तर ब्रान्डेड प्रफ्युम्स. बाकी प्रतिक्रिया वाचत आहे आणि जाणकार मिपाकरांच्या येणार्‍या प्रतिक्रियेंची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मानस् on Mon, 11/28/2011 - 16:32

In reply to ग्राहकांना यामुळे फायदाच by मदनबाण

Permalink

हे खरं आहे

हे खरं आहे, परवा बायकोने वाण्याच्या दुकानातून मॅप्रोची सरबताची बाटली आणली ती छापील किमतीला (एम्.आर्.पी.) मिळाली, नंतर त्याच आठड्यात तशीच सरबताची बाटली एका मॉल मधे छापील किमतीवर ३०% डिस्काउंटमधे मिळत होती.दुकानदाराने ही गोष्ट लपवली,तर मॉल मधे खप वाढावा म्हणून याचा वेगळ्या टेबलवर डिसप्ले लावला होता. भाजी मंडईमधे तर माणूस पाहून दर सांगतात,एखादा नवखा बकरा सापडला तर कापला गेलाच समजा.मॉल मधे अशी फसवणूक तरी नाही निदान.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 11/28/2011 - 13:13

Permalink

एकुणात फायद्याचा सौदा!

वाणसामानः याने गल्लीतल्या किराणामालाच्या दुकानांवर परिणाम होईलसे वाटते. मात्र पटकन लागणार्‍या रोज-गरजेच्या वस्तुंसाठी ही 'डेली शॉप्स' या स्वरुपात टिकून राहतील. मोठा फरक पडेल तो मध्यम आकाराच्या दुकानांना. मात्र तो अपरिहार्य आहे असे वाटते. जर या मोठ्या वितरकांनी मधले दलाल कमी केले तर ग्राहकाला व शेतकर्‍याला थोडा फायदा होईलसे वाटते. दुसरे असे वाणसामानाचे पोस्ट प्रोसेसिंग, पॅकिंग वगैरे सेवांना बरकत येईलसे वाटते. शेतकर्‍यांचा फायदा किती होईल हे सरकार या नियमाची अंमलबजावणी कशी करते यावर अवलंबून असेल कपडे: एक-दुकानी किरकोळ कपडे व्यापारावर तर आधीच परिणाम झालेला दिसतो. साड्या सोडल्यास बाकी तयार कपडे या मोठाल्या दुकानांतून घेणे सोपे, आकर्षक आणि स्वस्त पडते - तेव्हा गिर्‍हाईके तिथे जातात. छोटी कपड्यांची दुकाने मोठ्या शहरातून हळूहळू हद्दपार तर निमशहरी विभागात एकत्र येतील असे वाटते. भाज्या, फळफळावळ वगैरे: येथे मात्र रस्त्यावरचे भाजीवाले, फेरीवाले यांच्यावर गदा येणार नाहि असे वातते. भारतात अजुनही 'ताजी भाजी', 'ताजी फळे' आपले स्थान-रुची टिकवून आहेत. याबाबतीतील भारतीय चोखंदळपणा सोयीवर मात करेलसे वाटते ;) दुध, अंडी, मांस, तयार अन्न इथे परदेशासारखी क्रांती येऊ शकते. मटण/चिकन ताजे हवे की स्वच्छ यावर यातील यश अवलंबून असेल सजावट, गृहपयोगी वस्तु: लेखात म्हटल्याप्रमाणे महाग विभागातील वस्तुंमधिल वैविध्य व या क्षेत्रातील कसबी कलाकारांना ठोस रोजगार ही बलस्थाने. मात्र अती-किरकोळ गृहपयोगी वस्तु (जसे पिना, गाळणी, चमचे वैगैरे) एक-दुकानी छोट्या वितरकांकडेच स्वस्त पडतील व तिथेच त्याची विक्री होईलसे वाटते. स्टेशनरी: इथेही ग्राहकाचा तसेच या वस्तु उत्पादन करणार्‍यांचा मोठा फायदा होईल. नवनवीन पर्याय ग्राहकांपुढे येतील इलेक्ट्रॉनिकः कपड्यांप्रमाणे याही मार्केटवर मोठा परिणाम आहे. 'जुनी ओळख' हा अश्या दुकानांचा युएस्पी नव्या वेगाने बदलत्या - स्थलांतरकर्त्या दुनियेत टिकणे कठीण आहे. औषधे: स्थानिक विक्रेत्यांवर प्रिस्क्राईब्ड औषधांसाठी फारसा परिणाम नसावा. ओटीसी मात्र सांगता येत नाहि
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 11/30/2011 - 10:45

In reply to एकुणात फायद्याचा सौदा! by ऋषिकेश

Permalink

भाज्या, फळफळावळ वगैरे: येथे

भाज्या, फळफळावळ वगैरे: येथे मात्र रस्त्यावरचे भाजीवाले, फेरीवाले यांच्यावर गदा येणार नाहि असे वातते. भारतात अजुनही 'ताजी भाजी', 'ताजी फळे' आपले स्थान-रुची टिकवून आहेत. याबाबतीतील भारतीय चोखंदळपणा सोयीवर मात करेलसे वाटते दुध, अंडी, मांस, तयार अन्न इथे परदेशासारखी क्रांती येऊ शकते. मटण/चिकन ताजे हवे की स्वच्छ यावर यातील यश अवलंबून असेल याबाबतीत असं ऐकलं होतं आणि नंतर प्रत्यक्ष वापराने पटलं की फ्रोझन मासे, मटण, चिकन (जे पकडल्यावर्/मारल्यावर तातडीने फ्रीझ केले गेले आहे) ते कोळणींकडच्या "ताज्या" मासळी किंवा माम्यांकडच्या "ताज्या" भाजीपेक्षाही "ताजं" असतं. त्यात क्वालिटी टिकून राहते. कितीही म्हटले तरी मोठ्या शहरात आपल्या घराजवळच्या मार्केटात भाजी / मासे पोचेपर्यंत किमान २-३ दिवस (भाजी) / १-२ दिवस (मासे) इतका वेळ गेलेला असतो. त्या काळात दुर्गंधी सुरु व्हायला लागलेलीही असते. शिवाय दिवसभर त्या मासळीवर / फळांवर माश्या बसत असतात.. इ इ. त्यामुळे लवकरच लोकांना हे पटून फ्रोझन फूड स्वीकारलं जाईलसं वाटतं .. मुंबई ठाण्यात सर्वच मॉल्समधे होणारी फ्रोझनची जबरदस्त विक्री पाहून इथे ते ऑलरेडी झालेलं आहे असं दिसतं. हायपरमार्ट वगैरेमधे मिळणारं मटण त्याच दिवशी सकाळी फ्रीझ केलेलं असतं दिवसभरात आणून बनवण्यापूर्वी "थॉ" केलं की खाटकाकडून समोर बोकड मारुन आणलेल्याइतकं ताजं रहातं. (इथे फ्रोझन म्हणजे प्रोसेस्ड नव्हे.. मीठ्/साखर घालून प्रोसेस करुन मग फ्रीझ केलेले पराठे, फ्रोझन आलू टिक्की, फ्रोझन फिश मसाला रेडी टू फ्राय वगैरे पदार्थांना हे लागू होत नाही.. ते त्या मीठ्/तेल्/साखरेमुळे हानिकारक असू शकतात..)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Mon, 11/28/2011 - 14:48

Permalink

अ‍ॅडयाशी सहमत.आपल्याला एकतर

अ‍ॅडयाशी सहमत. आपल्याला एकतर याने काही विशेष फरक पडणार नाही. मुळात महाराष्ट्रात ह्या धंद्यामध्ये मराठी माणूस सोडून मुख्यतः राजस्थानी,सिंधी,गुजराती,मारवाडी ह्याच लोकांचे प्राबल्य आहे. त्यामुळे बाहेरून अजून कोणी ह्या व्यवसायात उतरल्याने काहीच बिघडणार नाही. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/28/2011 - 16:17

Permalink

मॉल मुळे ग्राहकाना बराच फरक

मॉल मुळे ग्राहकाना बराच फरक पडला आहे. एम आर पी असणार्‍या वस्तु ( एफ एम सी जी) बिग बझार मध्ये स्वस्त मीळतात.मात्र इतर वस्तु महाग असतात. लोकांचा खरेदी पॅटर्न बदलु लागला आहे. मात्र खाते लिहुन ठेवणारा किराणा दुकानदाराचा ग्राहक अजुनही टिकुन आहे. पण असे ग्राहक एकूणातच फार कमी असावेत. काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रोनिक वस्तुंची छोटी दुकाने असायची ( डीलर) आता असे बहुतेक दुकानदार नामशेष झालेत. त्या ऐवजी एलेक्ट्रॉनिक वस्तुंची विक्री करणारी मोठी दुकाने छोट्या शहरातही आली आहेत. या दुकानांना घाऊक खरेदीमुळे बाजारभावापेक्षा कमी भावात विक्री परवडते. यामुळे ग्राहकाचा फायदा होतो मात्र छोटे दुकानदार भरडले जातातं नामशेष होतात. (पूर्वी गावोगावी स्थानीक कोल्डड्रिंक उत्पादक होते. पेप्सी /क्प्क आल्यानंतर हे नामशेष झालेत)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 11/28/2011 - 16:23

Permalink

असो...

आमचा आपला एक प्रामाणिक प्रश्न :- ह्यामुळे दारुच्या दरावरती काही परिणाम होणार आहे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Tue, 11/29/2011 - 11:07

In reply to असो... by परिकथेतील राजकुमार

Permalink

नक्कीच पडेल

दारूच्या दरापेक्षा अजूनही अनेक फायदे आहेत. पहिलं म्हणजे वाईन शॉप पेक्षा इथे दारू स्वस्त मिळते. डुप्लिकेट मिळायचे चान्सेस नगण्य. एकाद दुकानात स्कॉच, वेफर्स, सोडा, सिगारेट्स अशी सगळी खरेदी करता येते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे फुड कुपन्सवर दारू घेता येते :) वर लिहिलेल्या गोष्टी निरिक्षणं नसून अनुभव आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/28/2011 - 16:43

Permalink

ह्यामुळे दारुच्या दरावरती

ह्यामुळे दारुच्या दरावरती काही परिणाम होणार आहे काय ? त्याने तुम्हाला असा किते फरक पडणार आहे. एफ टी पी च्या सवयी इतक्या लवकर सुटणार नाहीत. असो. गुत्त्यात बसताना दुकानात १०० रुपयाला मिळाणारी बाटली १८० रुपये देवुन पिताच ना? तिथे हा प्रश का विचारत नाही.पावती घेवून देखील कधी ग्राहक न्यायालयात तुमच्याच्याने जायला होणार नाही या अन्यायाबद्दल
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 11/28/2011 - 19:03

In reply to ह्यामुळे दारुच्या दरावरती by विजुभाऊ

Permalink

???

गुत्त्यात बसताना दुकानात १०० रुपयाला मिळाणारी बाटली १८० रुपये देवुन पिताच ना? तिथे हा प्रश का विचारत नाही.पावती घेवून देखील कधी ग्राहक न्यायालयात तुमच्याच्याने जायला होणार नाही या अन्यायाबद्दल
प्रश्न डोक्यावरुन गेला. विजुभौ गुत्त्यात बाटली बरोबर चखणा, टेबल खुर्च्या, पाणी, बर्फ, कांदा, फ्यान , टिव्ही असल्या सोयी देखील उपलब्ध करुन दिलेल्या असतात आणि त्याचेच चार्जेस अ‍ॅड केल्याने १०० चे १८० झालेले असतात. अर्थात कार्डवरती रेट वाचूनच तुम्ही ऑर्डर देत असल्याने ह्यात अन्याय काय आहे ते कळाले नाही. आणि ही पावती घेऊन ग्राहक न्यायालयात काय गुन्हा नोंदवायचा ते तर अजीबातच कळाले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 11/29/2011 - 23:18

In reply to ह्यामुळे दारुच्या दरावरती by विजुभाऊ

Permalink

छोटासा प्रश्न सुखाची किम्मत

छोटासा प्रश्न सुखाची किम्मत करता येते का !
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 11/30/2011 - 12:11

In reply to छोटासा प्रश्न सुखाची किम्मत by आशु जोग

Permalink

येस

सुखाची किम्मत करता येते का !
फक्त ती ब्रँड प्रमाणे बदलत जाते येवढेच.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 11/28/2011 - 18:12

Permalink

चांगल्या

चांगल्या बदलांना प्रस्थापित दलाल नेहेमीच विरोध करतात. याने ग्राहकांचा फायदाच होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 11/28/2011 - 20:54

Permalink

ऐकियाला भारतात बरीच स्पर्धा

ऐकियाला भारतात बरीच स्पर्धा असणार. मला तरी त्यांचे फर्निचर फारसे आवडले नाही. टाकावू नसते पण सगळे प्रकार एकसारखे वाटू लागतात. आपल्याकडे कलाकुसर हा अजूनही मोठा निकष असणारे ग्राहक आहेत. भारतियांनी सुदैवाने फर्निचर, कपडे , अ‍ॅक्सेसरीज याबाबतीत खूपच चांगली कला पाहिली असल्याने किती (दणकेबाज) रिस्पॉन्स मिळेल हे बघणे आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 11/29/2011 - 11:46

Permalink

आला आला आला बाई वाल मार्ट

आला आला आला बाई वाल मार्ट आला ताज्या भाज्या स्वस्त धान्य द्यायला आला बळीराजाचा माझ्या फायदा कराया आला. लक्ष बेकाराना नोक~या द्यायला आला
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Wed, 11/30/2011 - 02:37

Permalink

+/-

रोखीने खरेदी करणार्‍या ग्राहकांचा फायदा... उधारीने किंवा महिन्याचे खाते करून खरेदी करणार्‍यांचा तोटा... उत्पादकांचा बहुतेक फायदा... दलाल/ अडते आणि छोट्या दुकानदारांचा निश्चित तोटा....
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 11/30/2011 - 20:17

Permalink

सरकार कडे बहुमत..सरकार चर्चेस

सरकार कडे बहुमत..सरकार चर्चेस व मतदानास तयार... द्रमुक फीरला... वाल मार्ट डल्ला मारायला येणार अशी चिन्हे दिसत आहेत
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com