Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ५० फक्त on Tue, 11/08/2011 - 10:40
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
अशोक नाथाच्या घरी आला होता, सिव्हिल मध्ये काय झालं ते सांगायला ... नाथानं दोघांना हाकलुन दिलं आणि लाईट बंद करताना बायकोच्या शिव्या खात व तिला शिव्या देत तो घराबाहेर पडला. आपली आवडती सुझुकी घेउन तो डायरेक्ट समाचार चौकात आला, एका बोळातल्या घरी जाउन दोन जणांना उठवलं आणि चार गोष्टी सांगितल्या, दोन बंडलं दिली अन पुन्हा घरी आला. तो घरी येउन, त्याच्या बायकोनं दरवाजा उघडुन त्याला आत घेईपर्यंत समाचार चौकातुन एक ओम्नी सात रस्ता क्रॉस करुन गेली होती विजापुरच्या दिशेनं, आणि तिचा ड्रायव्हर हणमंता त्या बिचा-या ओम्नीला ताण ताण ताणत होता. गाडी खड्यातुन गेल्यावर मागं बसलेला कुमार त्याला ओरडत होता ' अबे, एखादं माल उडाला ना कोपचितुन थेड गांडीत घुसेल तुझ्या, हळु जरा खड्डे बिड्डे बघ की भाड्या '. तेवढा विचार करायला हणमंताला वेळ नव्हता, एकतर बिनचपलेची गाडी चालवणं त्याला अवघड होत होतं अन ही किरकिर. नाथानं दिलेले टायमिंग बरोबर असतील तर त्याला मोठा मासा मिळणं अवघड होतं पण छोटा मासा म्हणजे बांगरे तरी निश्चित मिळालाच असता, पण आज त्याचं नशीब जरा जास्तच चांगलं होतं, आटिओला कुणी अडवलं नाही की चेकपोस्टला कुणी अडवलं नाही कि पुढं राज्यसीमेला पण नाही. हणमंता आता पुरता मुडमध्ये आला होता, गाडी चालवायच्या आणि माल चालवायच्या पण. पाच वर्षं जुनी ओम्नी अगदी जिवावर येउन ७०-८० च्या स्पिडनं विजापुरकडं जात होती. नाथा घरी येउन झोपला पण फॉरेस्टच्या रेल्वे क्वार्टरच्या मागे असलेल्या कॅरम क्लबमध्ये मात्र सुनसान शांतता होती. आनंद चव्हाण त्याच्या पित्त्यांवर चिडुन होता, बांगरेची सायकल कुठं गेली आणि तो एमएटिवाला हॉस्टेलमधुन कुठं गेला. बांगरेची सायकल गेल्याचं कळाल्यावर त्यानं मुश्ताकचं जाणं कॅन्सल केलं होतं पण त्याच्याच हट्टामुळं त्याला रात्री ऐनवेळची गाडीची व्यवस्था करुन पाठवावं लागलं होतं त्याचं टेन्शन होतंच. तिकडं अशोकनं दिलेली ओसि संपल्यावर सिव्हिलच्या शवागाराच्या शिपायानं करुन आनंदला दिलेली माहिती त्याच्या रागात भर घालत होती , यावेळी एका अगदीच अनोळखी माणसाला यात गोवण्यात आलं होतं त्यामुळं नेहमीच्या माणसांच्या हातुन काम न करुन घेण्याची त्याची आयडिया त्याच्याच विरुद्ध वापरली जात होती. शेवटी रात्रीचे साडेतीन वाजले तेंव्हा दोन तीन जणं घरी गेली अन बाकीचे तिथंच टेबलं जोडुन झोपायचे तयारीला लागले, तेंव्हाच आनंदला मुश्ताक विजापुरला पोहोचल्याचा फोन आला अन त्याचं निम्मं टेन्शन कमी झालं आणि तो पण झोपुन गेला. नाथा पहाटेच उठला अन आंघोळ वगैरे आवरुन तालमीजवळ गणपती ठेवलेल्या शेडमध्ये आला, शेडमध्येच झोपलेल्या कार्यकर्त्यांना उठवुन तो आता गेला, दिवा लावला आणि दोन उदबत्त्या ओवाळुन ठेवल्या. तिथल्याच मागच्या पोत्यातले चार नारळ काढुन एका पिशवीत घेतले, गणपतीसमोरच्या डब्यातुन अरगजा घेउन एक पुडी बांधुन घेतली अन तडक बाहेर पडला. सुझुकी घेउन थेट गणपती घाटावर आला, रात्री मिळालेली बातमी अन सिद्धेश्वर तळ्याच्या बाजुचं पहाटेचं थंड व शांत वातावरण यानं तो उत्साहित झाला. सुझुकी सेंट्रल टॉकिजच्या बाजुला लावुन पिशवी घेउन नाथा चालत निघाला. घाट उतरुन गणपतीच्या देवळात बाहेरुनच नमस्कार केला, बाहेर पायरीवरच थोडा अरगजा वाहिला, एक नारळ फोडला अन पुन्हा गाडीकडं आला, लांबुनच त्याला त्याच्या गाडीजवळ उभी राहिलेली ओम्नि दिसली. झपाझप पावलं टाकत नाथा गाडीकडं आला, मागचा दरवाजा सरकावुन आत वाकुन पाहिलं, हसला आणि बाहेर थुंकुन चार शिव्या दिल्या. खिशातुन अजुन एक बंडल काढुन हणमंताला दिलं अन तो गेला की लगेच परेशला फोन लावला. इकडं आनंद सकाळिच क्लब बंद करुन घरी आला तेवढ्यातच त्याचा मोबाईल वाजला अन कालच्या गाडीच्या ड्रायव्हरनं विजापुरहुन परत येताना गाडी बंद पडल्याचं आणि तुम्हीच पाठवलेल्या एका व्हॅनमध्ये दोघेजण येउन बांगरेला घेउन गेल्याचं सांगितलं. यावर्षी घरच्या आणि मंडळाच्या गणपतीला फोडलेले नारळ नासकेच निघाले होते, त्याचा हा परिणाम आहे का काय असं त्याला वाटायला लागलं. त्यानं लगेच माननियांना फोन लावला, म्हणजे हे माननिय ४ वर्षापुर्वीपर्यंत वर्षातले कमीत कमी २ महिने तरी जेल मध्ये असायचे आणि उरलेला वेळ जिल्ह्यातुन तडीपार, पण एका मोठ्या पक्षाचे दोन तुकडे झाले अन असे बरेच जण रात्रीतुन माननिय झाले होते, हे त्यापैकीच एक. माननीय झाल्यावर एक हॉटेल आणि एक शाळा असे मुख्य उद्योग सुरु केलेले असले तरी, मुळच्या धंद्याशी इमान राखुन होते. अजुन माननीयांची आंघोळ झाली नाही, असं त्यांच्या एका कार्यकर्त्यांनं सांगितल्यावर, फोनवर बोलण्यापेक्षा डायरेकट बंगल्यावर गेलेलंच बरं असा विचार करुन आनंद निघाला. पंधरा मिनिटात एक लाल अल्टो त्या अलिशान बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर थांबली. ग्रे कलरचा सफारी घातलेला आनंद त्यातुन बाहेर निघाला अन गाडी लॉक करुन झटपट बंगल्याच्या मुख्य दरवाज्यातुन आत गेला. अर्धा तासानं जेंव्हा तो बाहेर आला तेंव्हा त्याच्याबरोबर अजुन दोघं जण होती अन त्याच्या गाडीच्या मागं मागं एक पांढरी स्कॉर्पिओ निघाली. दोन्ही गाड्या माननीयांच्या संपर्क कार्यालयाजवळ येउन थांबल्या, आनंद बरोबर जे होते ते दोघं जण उतरुन निघुन गेले आणि आनंद गाडीतच बसुन राहिला. तिथं अर्धा तास बसुन त्याची अस्वस्थता वाढतच होती, त्यातच त्याच्या फोनवर बांगरेच्या मुलीचा फोन आला, अण्णा कधी घरी येणार आहेत अन कुठं आहेत या तिच्या दोन्ही प्रश्नांना आनंद कडं आत्ता तरी काहीच उत्तरं नव्हती. तो शांतच राहिला. संपर्क कार्यालयातुन एक जण पाकीट घेउन बाहेर आला अन आनंद्च्या गाडीत बसला. आनंदनं त्या रहदारीच्या रस्त्यावरच यु टर्न मारत गाडी स्टेशनसमोरच्या काडादी चाळीकडं घेतली. तो तिथं पोहोचेपर्यंत त्याच्या बरोबरचा माणुस त्याला बरंच काही सांगत होता, त्यातलं बरंच त्याला कळत होतं, बरंच डोक्यात घुसतच नव्हतं. स्टेशनच्या पार्किगमध्ये गाडी लावुन ती दोघं चालत काडादी चाळीत आले, आतल्या बाजुच्या १२ नंबर चाळीतल्या खालच्या मजल्यावरच बांगरेचं घर होतं. त्याची मुलगी बाहेरच भांडे घासत होती. आनंदला कोणाबरोबर तरी येताना पाहुन तिनं हात धुतले, कमरेला गुंडाळलेली ओढणी काढुन गळ्यात घेतली अन दारासमोरची भांडी बाजुला करत घरात गेली. आनंद दरवाज्यात उभा राहिला तेंव्हा आत बांगरेची बायको पुढच्या खोलीतल्या कॉटवर बसुन भाजी निवडत होती. ' येउ का वहिनी आत ?' आनंद आवाजानं तिनं वर पाहिलं अन काहीतरी बिघडल्याचं तिच्या लक्षात आलं, तिच्या हो किंवा नाही म्हणण्यानं आनंद काही थांबणार नव्हता. आनंद आणि त्याचा बरोबरची व्यक्ती दोघं त्या कॉटवर बसेपर्यंतच ते घर शांत होतं, ते बसल्या बसल्या बांगरेच्या बायकोनं आनंदला जे शिव्याशाप द्यायला सुरु केल्या त्याला काही उत्तर त्यावेळी तरी आनंद कडं नव्हतं, तो फक्त हा रागाचा भार ओसरण्याची वाट पाहात होता. नाथाला परेशच्या घरात यायला कुणाला विचारावं लागायचं नाही, दुकानाच्या बाजुच्या जिन्यानं तो सरळ वर आला, चपला काढुन 'नाजुक ब्राम्हणा आहेस का घरात ?' असं मुद्दाम बायकी आवाजात हेल काढत विचारलं. परेशची आई अन बायको एकदमच बाहेर आल्या. ' या नाथा भावोजी' परेशच्या बायकोनं सासुवर एक पॉईंट मिळवला आणि पुन्हा आत निघुन गेली. नाथानं परेशच्या आईच्या पायाला हात लावत नमस्कार केला अन रस्त्याकडच्या खिड्कीच्या जवळ ठेवलेल्या बाकड्यावर बसला. ' काय म्हणताय सासुबाई, हल्ली दिसत नाहीत ओ परेश शेट दुकानात जास्तीचं, कधीपण विचारा त्या पोरींना, मालक वर हायंत एवढंच सांगतात' चेष्टेच्या सुरात नाथा बोलला, ही चेष्टा त्याला बारा तासापुर्वी सुचली नसतीच. परेश येउन त्याच बाकड्यावर बसला, दोघांच हळु आवाजात कुजबुजणं झालं. परेशची बायको चहा घेउन आली तेवढाच वेळ दोघं शांत होते. इकडं बांगरेची बायको शांत झाल्यावर आनंदनं तिला सांगितलं की, बांगरे काल विजापुरला गेला आहे, आणि परत यायला ७-८ दिवस लागतील. तेवढ्यात, बाहेर एकजण आला आणि बाहेरुनच ओरडला ' मावशी, अण्णांची सायकल ठेवलीय बाहेर, आत्ता एकजण टेम्पोमधुन बाहेर पानटपरीला टाकुन गेलाय ' आता मात्र आनंदची टरकली, बांगरे सायकल क्लबला ठेवुन विजापुरला गेल्याचं त्यानं सांगितलं होतं. आता, बांगरेच्या बायको आणि मुलीच्या रडण्याला काय उत्तर द्यावं त्याला काहीच सुचेना. मगाशीचा दंगा आणि आत्ताचं रडणं ऐकुन चाळीतल्या बाकीची लोकं जमा झाली, दोनच मिनिटात ती छोटीशी खोली भरुन गेली. आनंदला बाहेर जायचं पण मुश्किल झालं. गर्दीतुन एकाचा आवाज आला, ' मावशी, पोलिसला कळवा झाटदिशी, निस्ती भानगड नको तिच्यायला', त्या परिस्थितीत बांगरेच्या बायको आणि मुलीला हा पर्याय जास्त जवळचा वाटला अन त्या दोघी घरातुन बाहेर निघाल्या, तसं आनंदची डोकं सरकलं. या भानगडीत पोलिस आले असते तर अजुनच गोंधळ वाढला असता. पण एवढ्या लोकातुन बाहेर जाउन त्यांना थांबवणं सुद्धा फार अवघड होतं. गर्दी कमी झाली तसा तो आणि त्याचा जोडीदार बाहेर निघाले. चाळीच्या मोठ्या दारातुन बांगरेची बायको, मुलगी अन बरोबर १०-१५ बायका बाहेर पडत होत्या. तिथंच गाडी थांबवत आनंद उतरला आणि त्या दोघींच्या हातापाया पडुन त्यांना गाडीतुन पोलिस स्टेशनला घेउन जातो असं सांगुन त्यांना घेउन निघाला. नाथा परेशच्या घरुन निघुन गंगाविहिरीच्या बाजुनं चौपाडच्या विट्ठल मंदिरात आला, उरलेले दोन्ही नारळ तिथं फोडले मग तिथल्या पुजाराच्या घरातुन मागच्या खारपेंडीच्या दुकानात गेला. तिथं बसलेल्या ४-५ लोकांबरोबर ब-याच बोलाचाली शिव्यागाळी झालं अन मग घरी आला. जेवायची वेळ तर होउन गेलेलीच होती. त्याची बायको बाहेरच गाडीवर भाजी घेत होती, ' ऐ बये, संपले की गणपती, जरा मासं कर की घरात, तिच्यायला बामणाच्या पोरी ह्या असल्याच, कधी कळायचं काय म्हाईत' , भाजीवाला अन बरोबर उभारलेल्या बाकीच्या बायका फिसक्क्न हसल्या तशी नाथाच्या बायकोला राग आला, घेतलेली भाजीची पिशवी तिथंच आपटली ' आणा मासे आणा, कोंबडे आणा, बकरे आणा आणि खा तुम्हीच , मी मरते उपाशीच, कशाला सोडलं बाबांचं घर अन आले या ठोकळ्याचं मागं काय माहित' बडबडत ती आत निघुन गेली. मागं मागं नाथानं गुपचुप पिशवी उचलली, भाजीवाल्याला वीस रुपये दिले अन आत गेला. आता बाकीच्या बायका जास्तच जोरानं हसायला लागल्या. नाथा खोलीपर्यंत पोहोचलाच होता तेवढ्यात रात्री अशोकला सोडायला गेलेला त्याचा कार्यकर्ता पळत पळत आला, धापा टाकत टाक्त तो सांगायला लागला ' पैलवान, मदनचे घरचे सिव्हिलला चाललेत बाडी आणायला' , एक पाय पायरीवर ठेवलेला नाथा थबकलाच, काय करावं त्याला काहीच सुचेना. तो गपकन तिथंच खाली बसला पायरीवर. मार्चला राहिलेला बारावीचा गणिताचा पेपर ऑक्टोबरला काढतो म्हणालेला, रात्री काय येत नाही, गाडीतच झोपतो पण उद्या सकाळी चहा तर घरीच घेणार म्हणुन मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीला गेलेला पोरगा, आज तीन दिवस झाले घरी आला नव्हता. मंडळातली पोरं काय नीट बोलत नव्हती. मदनचा बाप दोन दिवस वाट बघुन कंटाळला होता, पण काल पेपर मध्ये आलेल्या बातमी वाचुन ' मन चिंती ते वैरी न चिंती' म्हणतात तसं त्याच्या मनाला घोर लागलेला. मदनचा मोठा भाउ सुरत वरुन आल्या आल्या घरातली रडारडी झाल्यावर ती दोघं अन काही बाकीचे नातेवाईक पोलिस स्टेशनला जाउन आले, तेंव्हाच त्यांना तशीच एक बॉडी सिव्हिलला असल्याचं कळालेलं होतं. मदनचं घर दक्षिण कसब्यात होतं. औरंगाबादवरुन दोन वर्षापुर्वी ही लोकं धंद्याच्या निमित्तानं इथं आलेली. नाथाच्याच ओळखीनं हुतात्मा बागेजवळ एक खोकं घेउन तिथं चपलांचं दुकान टाकलेलं होतं. जातींनं चांभार नसला तरी मुंबईला बरीच बर्षं चपलांच्या धंद्यात नोकरी करुन मदनचा बाप याच धंद्यातला झाला होता. दोन पोरांपैकी मोठा सुरतला केमिकल कंपनीत फोरमन होता अन धाकटा मदन इथंच दुकानात बसायचा. संभाजी शिंदे कॉलेजला जायचा, थोडा उडाणटप्पुचं, मुंबईच वारं अंगात होतं. महिन्यातुन एकदा तरी मित्राकडं म्हणुन मुंबईला दोन तीन दिवस जाउन येणारा होता. गेलं वर्षभर तालमीत येत होता, आधी फक्त जिमलाच यायचा पण नंतर बाकी कामांमध्ये पण यायला सुरु झाला. कसब्यातली मंडळं तशी मवाळच,मंडप टाकुन मठपती लायटिंगवाल्याकडुन माळा आणुन सोडल्या की नंतरचे आठ दिवस पत्ते खेळायला आणि एक दिवस सत्यनारायणाची पुजा एवढाच कार्यक्रम राबवणारी. त्यामुळं लांब राहायला असला तरी मदन जिम बरोबरच मंडळाकडं पण आकर्षित झाला. झांज पथकात अजुन वर्णी लागलेली नव्हती. पण बाकीची कामं करायला तो नाथाबरोबर फिरायचा. फार जवळचा झालेला नव्हता तरी नाथाला मदनबद्दल काहीतरी वाटायचं. तर हा असा मदन, विसर्जानाच्या रात्री गुलालानं रंगलेल्या मदनच्या चेह-यानं आणि मुश्ताकच्या दारुनं तारवटलेल्या डोळ्यामुळं मुश्ताकला ओळखता आला नाही आणि हकनाक जीव गमावुन बसला, बरं हा काही ' होता जिवा म्हणुन वाचला शिवा' असला ठरवुन केलेला प्रकार नव्हता, त्यामुळं ज्यांनी मदनला उचललं गेलं ते नक्की कुणाला उचलायला आले होते हे समजणं फार अवघड झालं होतं. त्यासाठी आज सकाळी पकडलेला बांगरे नाथासाठी फार महत्वाचा प्यादा होता, हणमंतानं त्याला मोहोळच्या आश्रमशाळेत पोहोचवला असणारच होता एव्हाना. पण ते अजुन नक्की कळालेलं नव्हतं. इकडं आनंद, बांगरेची बायको आणि त्याची मुलगी पोलिस स्टेशनच्या बाहेर उभारले होते, नेहमीच्या ओळखीच्या एक दोन हवालदारांबरोबर नमस्कार चमत्कार करुन झाल्यावर एकदाचं स्टेशन जमादारानं त्यांना आत बोलावलं, आत गेल्या गेल्या बांगरेच्या बायकोनं पुन्हा रडायला सुरुवात केली जसं काही त्या जमादारानंच तिच्या नव-याला आत टाकलं होतं. त्या पोलिस स्टेशनमधल्या कुणालाच हे प्रकार नवीन नव्हते. आरडा ओरडा कमी झाल्यावर जमादारानं ड्युटिवरच्या लेडिज हवालदाराच्या ताब्यात त्या दोघींना दिलं अन तो आनंद बरोबर बाहेर आला. लेडिज हवालदारानं बांगरे मावशीची कहाणी ऐकली, तिची मुलगी गप्पच होती, दोघीची पोलिस् स्टेशनला पहिल्यांदाच आलेल्या. दहा मिनिटात सगळं ऐकुन लेडिज हवालदारानं एका कागदावर सगळं लिहुन काढलं, अन त्या दोघींना बाहेर झाडाखाली बसायला सांगुन तो कागद घेउन जमादाराकडं गेली. आनंदचं तोपर्यंत जमादाराला पटवुन झालेलं होतं. जमादारानं बांगरेच्या बायको व मुलीला बोलावलं अन नेहमीच्या सवयीनं विश्वास दिला, उद्या सकाळी यायला सांगुन तिथुन कटवलं. त्या वेळेपुरता तो खिशातल्या पाचशेच्या दोन नोटांना जागला होता. त्या मायलेकिंना काडादी चाळीच्या दाराजवळ सोडताना मुलीच्या हातात आनंदनं शंभरच्या नोटांचं एक बंडल दिलं. चपला आणि सत्कार - भाग १ - http://misalpav.com/node/19342 चपला आणि सत्कार - भाग २ - http://misalpav.com/node/19352 चपला आणि सत्कार - भाग ३ - http://misalpav.com/node/19614 चपला आणि सत्कार - भाग ४ - http://misalpav.com/node/19642
  • Log in or register to post comments
  • 4157 views

Book traversal links for चपला आणि सत्कार - भाग ५

  • ‹ चपला आणि सत्कार - भाग ४
  • Up
  • चपला आणि सत्कार - भाग ६ ›

प्रतिक्रिया

Submitted by प्रकाश१११ on Tue, 11/08/2011 - 10:48

Permalink

छान .आपली भाषाशैली आवडली. छान

छान .आपली भाषाशैली आवडली. छान लिहिले आहे. उत्तम ..!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on Tue, 11/08/2011 - 10:48

Permalink

छान .आपली भाषाशैली आवडली. छान

छान .आपली भाषाशैली आवडली. छान लिहिले आहे. उत्तम ..!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 11/08/2011 - 10:48

Permalink

हाही भाग मस्त झालाय. पुढच्या

हाही भाग मस्त झालाय. पुढच्या भागाची उत्सुकता कायम आहे. सोलापूरचे डिटेलिंग मस्तच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 11/08/2011 - 11:15

Permalink

मस्त गतीमान कथा........! लौकर

मस्त गतीमान कथा........! लौकर येऊ द्या. स्वगतः हर्षदला 'अशी' नसली तरी 'कसली तरी' सुट्टी अशीच मिळत राहो... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 11/08/2011 - 13:46

Permalink

नेहमीप्रमाणे हाही भाग

नेहमीप्रमाणे हाही भाग उत्कंठावर्धक. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/08/2011 - 20:51

Permalink

अगदी

तपशीलवार मस्त लिहितोयस! झक्कास!
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 11/10/2011 - 13:06

Permalink

http://misalpav.com/node/1970

http://misalpav.com/node/19700 - पुढचा भाग टाकला आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com