Skip to main content

लता मंगेशकर यांचे एक विस्मयजनक विधान

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 17/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिद्ध छायाचित्रकार कै.गौतम राजाध्यक्ष यांच्या एका चित्रग्रंथ- प्रकाशनाबद्दलच्या या बातमीत खालील मजकूर दिलेला आहे: ....लतादीदींनी राजाध्यक्षांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मला छायाचित्रे काढण्याचा छंद होता. तेव्हा आपल्यासारखी छायाचित्रे कोणास काढता येत नाही, असा माझा समज होता. पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली छायाचित्रे पाहून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी छायाचित्रणासाठी कॅमेरा बाहेर काढलाच नाही, असे मनोगत व्यक्त केले .... लतादीदींचे हे विधान मलातरी फार विस्मयजनक व बुचकळ्यात पाडणारे वाटते. ... आपण सर्वच फोटोग्राफी, चित्रकला, संगीत, कविता, लेखन, इ.इ. काहीतरी छंद जोपासत असतो, परंतु आपल्यापेक्षा श्रेष्ट दर्जाचे काम बघून आपला तो छंद कोणी सोडून देइल, असे वाटत नाही. ...मी स्वतः अनेक वर्षे चित्रे व फोटो काढत आलेलो आहे. उच्च दर्जाची चित्रे व फोटो बघण्यासाठी मी नेहमी आसुसलेला असतो, व असे काही बघायला मिळाले, की माझा उत्साह अनेक पटींनी वाढून मी आणखी जोमाने कामाला लागतो. लतादीदींच्या गायनातील प्रविण्याबद्दल वादच नाही, फोटोग्राफीपण त्या उत्तम करत असतील, त्यांचेबद्दल पूर्ण आदरभाव असून त्यांच्या या विधानात आणखी काही सुप्त विधाने दडलेली आहेत की काय, असे मला वाटून गेले. दीदींच्या भक्तांची क्षमा मागून मी ती विधाने खाली मांडतो आहे, इथे माझी भूमिका त्यांचा अवमान करण्याचा नसून मानवी मनातील सुप्त भावनांचा वेध घेणे, असा आहे. १. मी अमूक एक काम उत्तम करतो असे मला वाटते. २. माझ्यामते त्या क्षेत्रात मी सर्वश्रेष्ठ आहे. ३. ते काम माझ्यापेक्षाही आणखी कुणी जास्त चांगले केलेले बघून मी अस्वस्थ होतो. आपले सर्वश्रेष्ठ पद डळमळू लागले, असे मला वाटू लागते. ४. या अस्वस्थतेमुळे त्या व्यक्तीला खाली खेचावे, त्याच्या प्रगतीत अडसर घालावा, असे मला वाटू लागते. ५. परंतु असे करणे अनैतिक आहे, असेही मला वाटते. तरीही असे करण्याची माझी सुप्त इच्छा पूर्ण करणे जिथे अशक्य आहे, असे दिसून येते, तिथे मी स्वतःच ते काम करणे सोडून देतो. ६. कारण मी सर्वश्रेष्ठ आहे, हा माझा समज खोटा ठरलेला बघणे मी सहन करू शकत नाही..... यावर तुमचे काय विचार आहेत, हे जाणून घ्यायचे आहे. कृपया लतादीदींबद्दलच्या माझ्या आदराविषयी संशय बाळगू नये. हा मुद्दा मानसशास्त्राबद्दलचा आहे.

वाचने 16798
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

>>कारण मी सर्वश्रेष्ठ आहे, हा माझा समज खोटा ठरलेला बघणे मी सहन करू शकत नाही..... क्रिकेट सोडा आणि विटीदांडू खेळा हे विधान या वृत्तीचे द्योतक असावे का?

विसोबा खेचर यांच्या प्रतिसादाची वाट बघतो आहे.

>> क्रिकेट सोडा आणि विटीदांडू खेळा हे विधान या वृत्तीचे द्योतक असावे का? आम्ही जगज्जेते आहोत पण आता विटीदांडूच

लतादिदिंच्या विधानाबद्दल मला काही वावगे वाटले नाही. गानकलेत त्या सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्यांना कदाचित आपण फोटोग्राफीमध्येसुध्दा ( वा तत्सम इतर कलांमध्ये) अव्वल असु असा ग्रह होऊ शकतो. गौतम राजाध्यक्षांनी काढलेले फोटो पाहुन त्यांना आपण ह्या क्षेत्रात किती पाण्यात आहोत ह्याचा अंदाज आला असावा. सचिन तेंडुलकरलाही आपण (भारतीय संघाचा) श्रेष्ठ कप्तान बनु असे वाटले असावे म्हणुन एक्-दोन वर्षे कप्तानपदावर काढल्यावर त्याला कप्तान म्हणुन स्वतःमध्ये असलेल्या उणीवांची जाणीव झाल्यानंतर तो चुकुनही त्या वाटेला पुन्हा गेला नाही. अमिताभला ए.बी.सी.एल स्थापन करताना असाच काही ग्रह झाला असावा पण त्यानंतर त्याला कळुन चुकले असावे की एक अ‍ॅक्टर म्हणुन आपण कितीही ग्रेट असलो तरी एक एंतरप्रेनर म्हणुन अपनेमें वो बात नही है.! असेच काहीसे लतादिदिंबद्दल झाले असावे.

In reply to by कानडाऊ योगेशु

अमिताभला ए.बी.सी.एल स्थापन करताना असाच काही ग्रह झाला असावा पण त्यानंतर त्याला कळुन चुकले असावे की एक अ‍ॅक्टर म्हणुन आपण कितीही ग्रेट असलो तरी एक एंतरप्रेनर म्हणुन अपनेमें वो बात नही है.! याच अमिताभने नंतर एबी कॊर्पची स्थापना केली.

In reply to by सन्जोप राव

ही माणसे मोठी का ते एका उदाहरणावरुन सांगतो - मध्यंतरी अमिताभची मुलाखत कॉफी विथ करण ह्या कार्यक्रमांतर्गत पाहिली. त्यात त्याला विचारलं की तुझ्या आयुष्यात तुला कधी संपून गेल्याची भावना आली का? अमिताभ म्हणतो "माझ्या एबीसीएल च्या अपयशानंतर आणि इतरही प्रदीर्घ अपयशी काळानंतर इलस्ट्रेटेड वीकलीने माझ्यावर एक अंक काढला त्यात प्रीतिश नंदीने कवरवर माझा फोटो टाकून "FINISHED" एवढंच ठळक अक्षरात त्यावर लिहिलं होतं! तो अंक मी घरी आणला आणि माझ्या रुममधल्या टेबलावर तो ठेवला. रोज झोपताना मी ते चित्र पहात असे आणि उठतानाही पुन्हा पहात असे. प्रीतिश आणि मी अगदी चांगले मित्र आहोत. त्याही काळात आमची मैत्री होतीच. त्याने विचारले की तू हा अंक का ठेवला आहेस. तेव्हा मी म्हणालो की मला त्यात म्हटलेले खोटे ठरवायचे आहे!" आणि अमिताभने नंतर पुन्हा जी भरारी मारली त्याला तोड नाही! यशाच्या सर्वोच्च शिखरावर आणि अपयशाच्या गर्तेत दोन्ही ठिकाणी तुम्ही फक्त एकटेच असता आणि दोन्ही ठिकाणच्या ताणाला तोंड देणे येरागबाळ्याचे काम नोहे! -रंगा

कप्तानपद भूषवणे वा एखादा धंदा चालू करणे ---- आणि एखादी कला जोपासणे --- यात फरक आहे. कलासाधना आपण त्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ठरावे म्हणून करायची असते की त्यातून मिळणार्‍या आनंदासाठी, त्याद्वारे घेता येणार्‍या स्वतःच्या, त्या माध्यमाच्या, आणि एकंदरित विश्वातील अद्भुततेच्या शोधासाठी?

In reply to by चित्रगुप्त

कलासाधना आपण त्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ठरावे म्हणून करायची असते की त्यातून मिळणार्‍या आनंदासाठी, त्याद्वारे घेता येणार्‍या स्वतःच्या, त्या माध्यमाच्या, आणि एकंदरित विश्वातील अद्भुततेच्या शोधासाठी? >>>>> हेच मुळी मान्य नाही. कला आणि कलेचा व्यवसाय किंबहुना कोणतीही गोष्ट ही त्यातले नंबर वन किंवा प्रसिद्ध बनण्याच्या इच्छेने केले जाते. तुम्ही ज्याला कलेतला आनंद म्हणता आहात तो आनंद लोकप्रियतेत आहे. कोणी बघून बेस्ट म्हणावं या ध्येयात आहे. निव्वळ आनंद वगैरे भ्रमात कलाकार कसे राहू शकतात कोण जाणे. In that case चित्रे काढून लेख लिहून वगैरे कोणालाच न दाखवता कपाटात बंद करुन कोणी ठेवतात का?

In reply to by गवि

चित्रे काढून लेख लिहून वगैरे कोणालाच न दाखवता कपाटात बंद करुन कोणी ठेवतात का? माझ्या बाबतीत याचे उत्तर "होय" असे आहे. माझ्याकडे लहानपणापासून काढलेली शेकडो चित्रे ठेवलेली आहेत, ती माझ्या कुटुंबियांखेरीज कोणीही बघितलेली नाहीत. तसेच लेखनाने भरलेल्या वह्यांचे खोके आहे. अलिकडे मी मिपामुळे थोडेसे लेखन प्रसिद्ध करू लागलो आहे. मी जी चित्रे प्रदर्शनात ठेवतो, त्याच्या अनेकपट चित्रे मी बनवतो, त्यापैकी फक्त निवडकच इतरांना दाखवतो. माझा स्वतःचा अनुभव..."मी स्वतः अनेक वर्षे चित्रे व फोटो काढत आलेलो आहे. उच्च दर्जाची चित्रे व फोटो बघण्यासाठी मी नेहमी आसुसलेला असतो, व असे काही बघायला मिळाले, की माझा उत्साह अनेक पटींनी वाढून मी आणखी जोमाने कामाला लागतो...." असा असल्याने मला विस्मय वाटला. हा धागा लतादीदींसारख्या दिग्गज कलावंताच्या अनुषंगाने निघाल्याने मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले, असे वाटते. काही अपवाद वगळता बहुसंख्य प्रतिसाद दीदींच्या समर्थनार्थ लिहिले जाऊन मूळ प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे, असे म्हणावेसे वाटते. समजा, या लेखातून लतादीदींचे नाव काढून टाकून कुणा 'क्ष' व 'य' बद्दल हेच लिखाण केले, तर वेगळ्या प्रकारचे प्रतिसाद येतील, असे वाटते.

In reply to by चित्रगुप्त

खाली म्हंटल्याप्रमाणे त्यामागे राजाध्यक्षांच्या फोटोग्राफीच्या कौतुकाचा भाग आहे. आपण फोटोग्राफी सोडली ह्या विधानामागे थोडी अतिशयोक्ति असू शकेल.
समजा, या लेखातून लतादीदींचे नाव काढून टाकून कुणा 'क्ष' व 'य' बद्दल हेच लिखाण केले, तर वेगळ्या प्रकारचे प्रतिसाद येतील, असे वाटते.
खरे आहे. भारतिय संस्कृतित कोणत्याही क्षेत्रातल्या दिग्गज लोकांना सहसा questioning करायचे नसते हा अलिखित नियम आहे.

In reply to by चित्रगुप्त

मी जी चित्रे प्रदर्शनात ठेवतो, त्याच्या अनेकपट चित्रे मी बनवतो, त्यापैकी फक्त निवडकच इतरांना दाखवतो. एक्झॅक्टली... यू सेड इट.. :) तुमचंच वरील म्हणणं पुन्हा वाचा... :) कोणताही लेखक अनेक पाने लिहून फाडूनही टाकतो. निवडक नीटसच लोकांना दाखवतो. गायक रियाजाला श्रोते बोलवत नाही. कमावून लावलेला आवाज तो "परफॉर्मन्स" म्हणून कॉन्सर्टमधे दाखवतो. छंदाला असं वेगळं उदात्त रूप देताना त्यात उगाच स्वांत सुखाय असं लेबल आणलं जातं. मी तर म्हणतो की इतरांसाठी कलाकृती बनवतो, कोणी वाचावं म्हणून लिहितो असा प्रामाणिक दृष्टिकोन घेतला की तुम्ही आपल्या रसिक प्रेक्षक्/श्रोते/वाचक यांनाही "इन्क्लूड" करता आणि अधिक चांगलं काही देऊ शकता. अहो.. बाथरूम सिंगरही स्वान्त सुखाय गातोय असं वाटत असलं तरी तो जणू आपण स्टेजवर गातोय अशा फँटसीतच गात असतो. एकूणच "धंदा","काम" हे काहीतरी उद्देशाने, कमवायला केलेलं आणि कला, छंद मात्र पवित्र, निरपेक्ष हे मलातरी झोपेचं सोंग घेण्यासारखं वाटतं. अगदी कुष्ठरोग्यांची सेवा करणार्‍या "निरपेक्ष' सेवकालाही कोणत्यातरी न्-आर्थिक प्रकारचे इन्सेंटिव्ह असतेच.. भले ते कुष्ठरुग्णाचे हास्य किंवा आशीर्वाद असतील. इतर कोणाकडून काहीच न मिळताही कोणी काही करत राहणे शक्यच नाही. प्रतीक्षा तरी तो करतच राहणार. अहो इन्सान खुद के ही न॑ही दूसरे की छाती में भी जिंदा रहने का सबूत मांगता है.. मिसळपाववर कशाला येतो मग आपण. ?? प्रतिसाद किती आलेत ते बघत राहतो ना? कसल्या परताव्याशिवाय अन उद्देशाशिवाय आपला पुढचा श्वासही घडणार नाही.

In reply to by गवि

गवि,
मिसळपाववर कशाला येतो मग आपण. ?? प्रतिसाद किती आलेत ते बघत राहतो ना?
शत प्रतिशत सहमत! मी मिपावर लोकांनी वाचुन प्रतिसाद द्यावे म्हणुनच लिहीतो आणि पुन्हा पुन्हा प्रतिसाद किती आलेत ते बघत राहतो :) - (कसल्यातरी परताव्याची मनिषा बाळगणारा) सोकाजी

In reply to by गवि

कलेसाठी कला की कलेतर उद्दिष्टांसाठी कला, हा वाद फार जुना. मिपावर अश्या चर्चेसाठी वेगळा धागा काढूयात का ?

In reply to by चित्रगुप्त

हो ना!! मी तर लहानपणापासुन कित्ती कित्ती चित्रं काढली पण अगदी कोणीही ती बघीतली नाहीत...अगदी चित्रकलेच्य बाईंनीसुद्धा ती बघवली नाहीत हो!!! शेवटी मी चित्र दाखवणं सोडुन दिलं अन नंतर काढणं सुद्धा. य जमाना बडा बेदर्द हय~~

In reply to by शिल्पा ब

चित्रं काढायचं सोडून कशाला दिलंस ग? ;) अमूर्त चित्रं काढायची होतीस, म्हणजे इथे आम्हाला एम एफ हुसेनवरचे लेख आणि त्यावरचे वाद वाचायला लागले नसते! ;)

In reply to by गवि

-----------------स्वाक्षरी सुरु-------------- छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति.. -----------------स्वाक्षरी समाप्त-------------- उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

याहून वेगळा अर्थ काय? अशी कबुली देणे यात गैर काहिही नाही उलट त्यातुन लतादिदींचा मोठेपणाच दिसतो असे मला वाटते. >>>>यावर तुमचे काय विचार आहेत, हे जाणून घ्यायचे आहे. कृपया लतादीदींबद्दलच्या माझ्या आदराविषयी संशय बाळगू नये. हा मुद्दा मानसशास्त्राबद्दलचा आहे. नक्की जाणून घ्यायचे आहे??????:~ :-~ :puzzled: प्रतिसादकर्त्यांची मानसीकता की लतादिदींबद्दलची मते??????;) ;-) :wink: जे जाणून घेतलेत ते काही कालानंतर जरूर येथे मांडा.

आपण वर्षानुवर्षे जोपासलेला छंद अचानक (कुणाचे तरी जास्त चांगले काम बघून) सोडून देणे, यात कोणती मानसिक प्रक्रिया आहे, हे जाणून घ्यायचे आहे. कबुली देण्यातून लतादिदींचा मोठेपणाच दिसतो, हे खरे, पण "माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी छायाचित्रणासाठी कॅमेरा बाहेर काढलाच नाही" हे मला अगम्य वाटते.

लतादिदींच्या बोलण्यात काही वावगे नाही. कधीकधी एखाद्याची स्तुती करताना 'अतिशयोक्ती' हा अलंकार वापरतात. तसेच त्यांनी केले असावे. प्रत्यक्षांत त्यांनी फोटोग्राफी चालूच ठेवली. मी त्यांच्या फोटोंचे प्रदर्शन पाहिले आहे. आणि त्या सुध्दा चांगली फोटोग्राफी करतात हे अनुभवले आहे.

In reply to by तिमा

सहमत - (अतिशयोक्ती अलंकाराचा पुरस्कर्ता ) सोकाजी

In reply to by सोत्रि

- (अतिशयोक्ती अलंकाराचा पुरस्कर्ता ) सोकाजी
मी चुकून (अतिपेयोक्ती अलंकाराचा पुरस्कर्ता ) सोकाजी असं वाचलं.

In reply to by राजेश घासकडवी

आत्ता 'अतिपेयोक्ती' हा अलंकार ल्यायलो असल्यामुळे खिक करुन नीट हसताही येत नाहीयेय, सबब उद्याला हा अलंकार उतर(व)ल्यावर खो खो करुन हसेन :) - (अतिपेयोक्ती अलंकाराचाही पुरस्कर्ता) सोकाजी

लता दिदींना जर वाटत असेल की त्यांच्यासारखी छायाचित्र कुणाला काढता येत नाहीत तर तो त्यांचा समज / मत आहे. उगाच कशावरूनही बुचकळ्यात पडणे बरं नव्हे दाजिबा. मात्र तुम्हाला पडलेल्या प्रश्नांवरून मीच बुचकळ्यात पडलो आहे कार राजाध्यक्षांची कला बघून त्यांना जे वाटले आणि त्यांनी जे केले ते पुरेसं स्पष्ट आहे. तरीही त्यातून सूप्त विधाने शोधणे हे खर्‍या विचारवंताचे लक्षण आहे. ३. ते काम माझ्यापेक्षाही आणखी कुणी जास्त चांगले केलेले बघून मी अस्वस्थ होतो. आपले सर्वश्रेष्ठ पद डळमळू लागले, असे मला वाटू लागते. ४. या अस्वस्थतेमुळे त्या व्यक्तीला खाली खेचावे, त्याच्या प्रगतीत अडसर घालावा, असे मला वाटू लागते. ५. परंतु असे करणे अनैतिक आहे, असेही मला वाटते. तरीही असे करण्याची माझी सुप्त इच्छा पूर्ण करणे जिथे अशक्य आहे, असे दिसून येते, तिथे मी स्वतःच ते काम करणे सोडून देतो. लता दिदींच्या पुढल्या स्टेटमेंट वरून त्यांनी ह्यातलं काही केलं नाही हे कळतंय. काही प्रश्न मलाही पडले आहेत १. सुतावरून स्वर्ग गाठणे ह्यालाच म्हणतात का? २. पराचा कावळा करणे ह्यालाच म्हणतात का? ३. वडाची साल वांग्याला लावणे ह्यालाच म्हणतात का?

In reply to by आदिजोशी

१. सुतावरून स्वर्ग गाठणे ह्यालाच म्हणतात का? २. पराचा कावळा करणे ह्यालाच म्हणतात का? स ३. वडाची साल वांग्याला लावणे ह्यालाच म्हणतात का?
नाही हो! लता'दिदीं'बद्दल चर्चाप्रवर्तकच्या मनात अपार आदर आहे असे त्याने लेखात व प्रतिसादातही वारंवार म्हटले आहे. ही मानसशास्त्राच्या संदर्भातली चर्चा आहे, असे ते नमूद करतातच. तरी तुम्ही हे असे म्हणता? मलाही असेच काहीसे सुरूवातीस वाटून गेले. पण नंतर सखोल विचार करण्याचा प्रयत्न केल्यावर म्हटले, आपलेच काही चुकत असावे. लता'दिदीं'च्या चालण्या-बोलण्यातून, आणि त्याही पलिकडे नुसत्या ऐकीव 'माहिती'च्या आधारे त्यांच्या व्यावसायिक वर्तनाविषयी सखोल अनुमाने काढत बसणे हा मराठी मध्यमवर्गीयांचा आवडता छंद आहे. अलिकडेच एके ठिकाणी वाचनात आले, की त्यांच्या घरापाशी त्यांची कार गेली की त्या गाडीतून उतरतांना एका विशीष्ट दिशेने पाउल ठेवतात. एका मर्हाठी चाणाक्ष व ज्ञानी पत्रकाराने हे दोन तीनदा न्याहाळले, व मग त्यातील गोम त्याच्या लक्षात आली. ज्या दिशेने लता'दिदी' पाउल ठेवतात त्या दिशेस एका 'प्रतिलता' बनावयास निघालेल्या गायिकेचे घर आहे. म्हणजे पहा, लता'दिदी' आपल्या मनातील तिच्याविषयीचे भाव कसे सहजरित्या व्यक्त करत आहेत ते? बाकी 'दिदी'मानसशास्त्राचा अभ्यास चालू दे!

सुहृदाच्या मृत्यूच्या प्रसंगी शोक व्यक्त करतानाची काव्यात्मक अतिशयोक्ती असावी. खरोखरचा घटनाक्रम माहीत असल्याशिवाय फार खोलात विश्लेषण करायची गरज नाही. एक सहजशक्य घटनाक्रम असा : स्वतःची छायाचित्रकारी सुरुवातीला वाटे त्यापेक्षा रटाळ वाटू लागली असेल, आणि सुमार चित्रे काढण्याबाबत त्यांना कंटाळा आला असेल. त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे चित्रांच्या दर्जात सरावाने सुधार करण्यास त्यांना वेळ मिळत नसेल. किंवा या रियाझाची प्राथमिकता वाटली नसेल. लता मंगेशकर यांच्या अभिरुचीत सुधार होण्यात अनेक चित्रकारांची चित्रे बघण्याचे योगदान आले असेल. त्या चित्रकारांपैकी एक गौतम राजाध्यक्ष असावेत. राजाध्यक्षांच्या मृत्यूच्या प्रसंगी त्या घटनाक्रमातील एक भागच आठवला असेल. "म्या पामरापुढे त्यांची कला इतकी उत्तुंग की तिथपर्यंत पोचायची अपेक्षाच नाही." हा मथितार्थ असलेले हे अतिशयोक्तिपूर्ण विधान केलेले असेल. आणि "कॅमेर्‍याला हात लावला नाही" हे अक्षरशः खरे असेल की नाही हे आपल्याला माहीत नाही. अधूनमधून फोटो काढत असतील, पण पूर्वी छंद म्हणून कॅमेरा जितपत वापरत असतील त्या मानाने आताचा वापर नगण्य असेल.

पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली छायाचित्रे पाहून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी छायाचित्रणासाठी कॅमेरा बाहेर काढलाच नाही, असे मनोगत व्यक्त केले ....
असं म्हणण्यामागे राज्याध्यक्षांकरता दिदिचा केवळ कौतुकाचाच भाग दडलेला आहे असं मला वाटतं. दिदिने खरोखरंच त्यानंतर कधीही कॅमेराला हात लावला नसेल असं नव्हे. आपल्या कलाकारीद्वारे काही अभिनेत्रींचे चेहरे उजळ्णार्‍या राज्याध्यक्षांचं आपल्या दैवी स्वराने सार्‍या विश्वाला न्हाऊ घालणार्‍या भारतरत्न दिदिनेदेखील कौतुक केलं हे विशेष..! (कट्टर दिदिभक्त) तात्या.

माझा विस्मय लतादीदींनी खरोखरच त्यानंतर फोटो काढलेले नाहीत, असे वाटल्यामुळे झालेला आहे. थोडेसे अतिशयोक्तीपूर्ण कौतूक, असे ते विधान असेल, आणि त्यांनी फोटो काढणे आणखी उत्साहाने सुरु ठेवले असेल तर प्रश्नच मिटला.

मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद होता. तेव्हा आपल्यासारखी गाणी कोणास म्हणता येत नाही, असा माझा समज होता. पण, लता मंगेशकर यांनी म्हटलेली गाणी ऐकून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी कधी गाणी म्हटली नाहीत.

In reply to by राजेश घासकडवी

लता मंगेशकर यांनी म्हटलेली गाणी ऐकून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी कधी गाणी म्हटली नाहीत. हुश्श्य! देवाक काळजी!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

'आकाशातला ठोंब्या' नसता तर आपल्याला लताबाईंची सगळी गाणी गुर्जींच्या आवाजात ऐकावी लागली असती. देव आहे याचा पुरावाच नव्हे का हा?

In reply to by शहराजाद

"मेरे ख्वाबों में जो आये" करत काजोल नाचते आहे आणि गुर्जींच्या आवाजावर लिप सिंक* करते आहे या कल्पनेने माझे ड्वाले हसून हसून पाणावले. *आता यावर आणखी काही विनोद येणार का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गुर्जींच्या आवाजावर लिप सिंक* करते आहे या कल्पनेने
हापिसात असल्यामुळे लिपातल्या लिपात ...आय मीन ओठातल्या ओठात हसु 'सिंक' करावे लागले :) - (लिप 'सिंक' करण्यापेक्षा 'सक' करायला आवडणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

- (अतिपेयोक्ती अलंकाराचाही पुरस्कर्ता) सोकाजी -(लिप 'सिंक' करण्यापेक्षा 'सक' करायला आवडणारा) सोकाजी __/\__ :bigsmile:

In reply to by विनीत संखे

आंग्ल भाषेत 'ल्युड' म्हणावे हा ह्या प्रतिसादास?
'न्यूड' म्हणाल तर अजून उत्तम. प्रगल्भतेच्या दिशेने भराभर वाटचाल व्हायला लागेल मग तुमची.

In reply to by राजेश घासकडवी

हा हा हा.... मला वाटलं, तुम्ही गाणं म्हटलं तर "लताबाईंचं कसं होणार?" या विचाराने तुम्ही गाणं सोडलं. ;)

In reply to by राजेश घासकडवी

मंगेशकर यांनी म्हटलेली गाणी ऐकून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी कधी गाणी म्हटली नाहीत.... हे कळल्याबरोबर तुमचे नाव 'शी मराठी' च्या आगामी ' सपाट लोशन एकापेक्षा दोन ' या मालिकेचे 'मान्यवर महाअंतिम महागुरु' म्हणून खुद्द दीदींनी सुचवले असल्याचे वृत्त आत्ताच आले आहे, बघा: www.sheemarathi.com

In reply to by चित्रगुप्त

तुम्ही दिलेली बातमी वाचून घाईघाईने तुम्ही दिलेल्या लिंकवर गेलो तर मला तिथे काय दिसलं बघा... Marathi Find Marathis at Great Prices. Sponsored by www.Pronto.com Marathi - Sale Prices Latest Fashions and Styles on Sale. Buy Marathi Fast! Sponsored by www.Calibex.com/Clothing मराठी लोक, मराठी भाषा आणि तिच्यातल्या स्टाईल्स अतिशय स्वस्तात विकत मिळत आहेत हे वाचून डोळे पाणावले. आपल्या धंद्याची अशी उघड उघड जाहिरात केल्याबद्दल निषेध करावा की काही मराठी पटकन स्वस्तात विकत घेऊन टाकावेत अशा द्विधा मनस्थितीत सापडलो आहे.

In reply to by राजेश घासकडवी

आणि मला पूर्वी हापिसात जाउन काम करणे बरे वाटत असे. आणि आपण फारच छान संगणक आज्ञावली लिहितो असा माझा समज होता. एकदा अ‍ॅपलने बनवलेली संगणकप्रणाली पाहिल्यावर माझा चेहरा पडला, म्हणुनच आजही हापिसात जातो, पण काम अजिब्बात करत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद होता. तेव्हा आपल्यासारखी गाणी कोणास म्हणता येत नाही, असा माझा समज होता. पण, लता मंगेशकर यांनी म्हटलेली गाणी ऐकून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी कधी गाणी म्हटली नाहीत.
केवळ या एकमेव अचिव्हमेंटबद्दल आणि त्यायोगे समस्त मानवजातीवर केलेल्या उपकाराबद्दल लता मंगेशकरांना भारतरत्न द्यावे असे सुचवतो..

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लता मंगेशकरांना भारतरत्न द्यावे असे सुचवतो.. सुचवतो??????????:O :-O :shock: हे जरा डोक्यावरूनच गेले. कारण भारतरत्न एकदाच देतात असे वाटते

In reply to by चिंतामणी

अहो हे एक काम त्यांनी एवढे थोर केले आहे त्यामुळे अजून एक द्यावेच लागते ब्वॉ आता... साक्षात गुर्जींना गप्प बसवले म्हणजे काय खाऊ आहे काय, आँ?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लता मंगेशकरांना भारतरत्न द्यावे असे सुचवतो.. सुचवतो??????????:O :-O :shock: हे जरा डोक्यावरूनच गेले. कारण भारतरत्न एकदाच देतात असे वाटते

शास्त्रीय संगिताच्या मैफिलीमधे काहि उदाहरणे आहे कि एखाद्या गवैय्याने एखादा रागाचे प्रस्तुतिकरण उच्चतम केल्यानंतर त्यापुढचा कलाकार गाण गायचं नाकारतो. दिदींचे वाक्य अशाच मानसिकतेतुन आले असेल आणि मला त्यात काहि वावगे किंवा नकारात्मक वाटत नाही. सचिन तेंडुलकरचे उदाहरण पटले. बाकि हि चर्चा दोन क्षेत्रातील आयुष्य कलेला समर्पित केलेल्या दिग्गजांबाबत चालु आहे याची जाणिव सभासंदांना आहेच. आभार.

मटा ची बातमी आहे , विश्वास किती ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे.

यावर तुमचे काय विचार आहेत, हे जाणून घ्यायचे आहे. कृपया लतादीदींबद्दलच्या माझ्या आदराविषयी संशय बाळगू नये. हा मुद्दा मानसशास्त्राबद्दलचा आहे. >> यावरील माझे विचार मी इथे मांडत आहे. १. आपण संदर्भासाठी दिलेली लिंक २० जुन २०१० च्या बातमीची आहे. म्हणजे त्यांचे विधान (ज्याचा आपल्याला विस्मय वाटला ते) सव्वा वर्षांपूर्वी केलेले आहे. २. मिसळपावच्या वाचकांकरिता देखील हा विषय तसा जुनाच आहे. माझ्याच एका लेखात (http://www.misalpav.com/node/18717) एका प्रतिसादकर्त्याने मला माझ्या लेखाची प्रेरणा काय आहे असे विचारले. त्यांना उत्तर देते वेळी (http://www.misalpav.com/node/18717#comment-327977) मी लता मंगेशकरांचे उदाहरण दिले. त्यात लता मंगेशकर छायाचित्रे काढत असा उल्लेख होता. सदर प्रतिसाद कर्त्यास ही माहिती नवीन असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त करून मला या संदर्भात अधिक माहिती मागितली. त्याप्रमाणे मी त्यांना अधिक माहिती दिली (http://www.misalpav.com/node/18717#comment-328004). त्यात अधिक संदर्भाकरिता मी त्यांना तिथेच Why Lata Mangeshkar Stopped Photography ह्या लेखाची लिंक दिली होती - http://www.mid-day.com/entertainment/2010/jun/190610-lata-mangeshkar-ph… यात लताजींचे विधान पुरेसे स्पष्ट आहे. Lata Mangeshkar revealed at an event on Friday night that she considered herself to be a good photographer till she met ace lensman Gautam Rajadhyksha. "I purchased a rolleiflex camera in 1946 and took a lot of pictures. I thought I was good. I don't like to be photographed. But, a few years later, I started getting calls from Gautam saying he wanted to take my pictures. I always ignored that," she said. म्हणजे असाही एक काळ होता जेव्हा त्या गौतम राजाध्यक्ष यांच्या कडे एक फोटोग्राफर म्हणून ही दुर्लक्ष करीत होत्या. लक्षात घ्या लता मंगेशकर १९४६ पासून फोटोग्राफी करीत होत्या आणि राजाध्यक्ष हे नावाजलेले फोटोग्राफर झाले ते थेट १९८७ नंतर. त्याशिवाय मी अजुन एक लिंक दिली होती http://www.screenindia.com/old/nov12/cover.htm ज्यात लता मंगेशकरांनी स्वत:च्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविल्याचा उल्लेख आहे. आपण ह्या सार्‍या लिंक्स द्वारे मिळणारी माहिती पुन्हा एकदा सविस्तर वाचावी. ३. सबब ज्या विधानाचा आपल्याला विस्मय वाटत आहे ते विधान लता मंगेशकर यांनी सव्वा वर्षापुर्वी केले असले तरी त्यामागची त्यांची भूमिका फार पुर्वीची आहे (म्हणजे गौतम यांची फोटोग्राफी पाहून स्वत: फोटोग्राफी बंद करणे). त्यांनी फक्त त्या पुस्तक समारंभाच्या निमित्ताने आपली ही भुमिका सदर विधानाद्वारे व्यक्त केली इतकेच. त्या विषयी विस्मय वाटावा असे काही नाही हे माझे स्पष्ट मत आहे. आता शेवटचे आणि सर्वात महत्वाचे - हे विधान इतके जुने आणि मिसळपाववर याचा उल्लेख यापूर्वी झालेला असतानाही धागाकर्त्याला आताच हा असा विस्मय का वाटावा? याविषयी त्यांनी आणि इतरांनीही आता आपले विचार मांडावे. (कृपया या धाग्याच्या लेखकाद्दलच्या माझ्या आदराविषयी संशय बाळगू नये. हा मुद्दा मानसशास्त्राबद्दलचा आहे.) अवांतर :- कुणाला ही विस्मय वाटावा अशी काही विधाने लता मंगेशकर यांनी जाहीर रीत्या केलेली आहेत, पण ती वेगळ्या व्यक्तिच्या संदर्भात आणि अत्यंत वेगळ्या प्रसंगी. इथे त्याविषयी सविस्तर लिहीत नाही, परंतू जाणकारांच्या आठवणी जाग्या झाल्या असतीलच.

In reply to by शिल्पा ब

शिल्पा ब यांचा प्रतिसादः प्रत्येक गोष्टीची पिसं काढायचा तुम्हाला भारी छंद दिसतोय.... माझा प्रश्नः तुम्हाला म्हणजे कुणाला बुवा ? (किंवा बाई ?)

In reply to by चित्रगुप्त

धागा काढणार्‍या/ री ला. म्हणुनच तुम्ही लग्गेच इथे प्रतिसादा उत्तर दिले ना? खर्र खर्र सांगा हं!!

In reply to by lakhu risbud

लखुजी, बोळा फिरवण्याबरोबरच, अडकलेले बोळे काढुन पाणी वाहते करण्याचाही छंद आहे बर का आमच्या शिल्पातैना ! - (सोकाजी त्र) सोकाजी

In reply to by शिल्पा ब

अहो ताई, मराठी माणसाची सवयच आहे पिसे काढणे. कोंबडी सोलायच्या आधी काढावीच लागतात.

टोकाची मानवंदना अतिशयोक्ती म्हणायला हरकत नाही लता दिदींची.

..

In reply to by आशु जोग

अप्रतिम प्रतिसाद. इतक्या विद्वत्तापूर्ण प्रतिसादासाठी मिपारत्न पुरस्कार द्यावा असे सुचवतो.

आमच्या कडे पण बरेच डेव्हलपर्स असाच कोड लिहितात. त्यांच्याकडे बघुन मला प्रोगॅमिंग करणे सोडुन द्यावेसे वाटते.

मिसळपाववर लोक काय एकेक प्रतिसाद लिहतात. ते वाचून मलाही प्रतिसाद लिहणे बंद करावे असे बरेचदा वाटते. पण लोककल्याणास्तव लिहतो बापडा. (लेखांबद्दल तर काय विचारुच नका.)

पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली छायाचित्रे पाहून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी छायाचित्रणासाठी कॅमेरा बाहेर काढलाच नाही, असे मनोगत व्यक्त केले ....
व्वा: !! खरच दिदींसारखी जाण + समज + अक्कल इथल्या मिपावरच्या काही टूकार डायरीया झालेल्या लेखकांना देवाने बहाल केली तर इथले मिपावरचे इतर सकस लिखाण बघून ते आपले लिखाण थांबवतील आणि पुन्हा एकदा नंदनवन फुलेल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

खरच दिदींसारखी जाण + समज + अक्कल इथल्या मिपावरच्या काही टूकार डायरीया झालेल्या लेखकांना देवाने बहाल केली तर इथले मिपावरचे इतर सकस लिखाण बघून ते आपले लिखाण थांबवतील आणि पुन्हा एकदा नंदनवन फुलेल. Only Fairytales Have Happy Endings ..... ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा साहेब का होतकरू लेखकांचा सेल्फ एस्टीम पणाला लावताय? जसा टिव्ही साठी रीमोट तसा आपल्या हाती प्रतिसाद न देणे असते.... मिपावर आधीच सकस लिखाण लिहिणारे लेखक आळशी होऊन बसलेत.