एक जत्रा..... हरवलेली
बरेच दिवसांनी पावसाळ्यात घरी असल्याने भारी वाटत होतं. त्यातच श्रावणाची चाहूल लागलेली. अशी संधी असताना फक्त घरी बसणे शिक्षेसारखे वाटायला लागले होते. यंदाचा श्रावण कुठेतरी जाऊन कामी आणायचा असं मनोमन ठरवलं होतं. :) श्रावणाच्या दुसऱ्याच सोमवारी सांगली जवळ हरिपूर येथील जत्रेला जाण्याचे निश्चित केले. सकाळी लवकरच घराबाहेर पडलो, जेणेकरून जत्रेची पूर्वतयारी वगैरे बघता येईल.
जातना वाटेत इतका जोरदार पाऊस लागला की बीच रास्ते से ही परत फिरावे का असा प्रश्न पडला. पण उम्मीद ठेवून मी पुढेच निघालो. तासाभराच्या रस्त्याला दीड तास लागला, पण पोचलो एकदाचा सांगलीत. सकाळपासून पाठी लागलेला पाऊस इथे मात्र कुठे गायब झाला तेच कळेना.
सांगलीत आत आल्याबरोबर एसटी स्टँडकडे न वळता डावीकडे वळून पुढे जात राहिल्यास साधारण ३.५ किमी अंतरावर हरिपूर नावाचे गाव लागते.
जसजसं मी हरिपुराच्या दिशेने जायला लागलो, माझे मन भूतकाळच्या आठवणीत जायला लागले. आठवू लागले ते दिवस, जेंव्हा मी आजोबांबरोबर (ज्यांना मी आप्पा म्हणतो) रात्रीच हरिपुराला जायचो.रात्रीच्या वेळेस सांगली ते हरिपूर रस्ता इतका भयाण वाटायचा की कधी एकदा हरिपूर येते असं व्हायचं. १५ मिनिटांचा रस्ताही तासाभराचा असल्याप्रमाणे वाटायचा. जाताना काही लँडमार्क्स बघून किती वेळ राहिला याचा अंदाज यायचा. वास्तविक संगलीतले घर भाड्याचे होते अन हरिपुरचे घर स्वतःचे होते, पण का कुणास ठावूक आईच्या मायेसारखी ऊब वाटायची ती सांगलीतल्या घरात आणि हरिपूरचे घर हा वडिलांसारखा आधारागत वाटायचा. सकाळी पहाटे लगबगीने उठून स्वच्छ केलेला घराचा आवार, देवपूजेसाठी तोडलेली फुले, वेचलेली कवठे, सकाळी सकाळी ऐकलेल्या ऑल इंडिया रेडियोच्या इंग्रजी आणि हिंदी बातम्या. खरंच काय दिवस होते ते! आधी घरच्या देवांची पूजा, नंतर संगमेश्वराची पूजा असा दिनक्रम अप्पांनी कितीतरी वर्ष सांभाळला.
श्रावणात तर हरिपूरला वेगळीच धुंदी असायची. (तेंव्हाच्या)लोकल ट्रेनपेक्षाही जास्त गर्दी व्हायची जत्रेसाठी. सगळा सांगली जिल्हाच जणू लोटायचा इथे! सांगली एसटी स्टँड पासून हरीपूरला येण्याचे एकमेव साधन म्हणजे टांगे. श्रावणी सोमवारी या टांगेवाल्याना पण जबरा भाव यायचा. लहान मुलांना आवडणारे विविध प्रकार विक्रीला यायचे. धनुष्यबाण, काठीच्या तलवारी, पत्र्याच्या शिट्ट्या, प्लास्टीकचे गॉगल्स, पुढे-मागे करता येणारे वेताचे साप असल्या खेळण्यांच्या टोपल्या जागोजागी दिसायच्या. त्याच्या भोवतीनं गराडा घालून कुतूहलाने बघणारी मुलं, मला अमुक एक खेळणे पाहिजेच म्हणून हट्टाला पेटणारी मुलं आणि त्यांचे वैतागलेले आई-बाप हा झाला एक सेक्शन.
दुसरा सेक्शन असायचा फुल विक्रेत्यांचा. गलाट्याचे ढीग, गुलाब आणि काही पांढरी फुले यापासून बनवलेले हार, त्या सगळ्याचा एकत्रित असा वेगळाच गंध. आपल्याकडून भाविकांनी हार-फुले घ्यावीत यासाठी चाललेला विक्रेत्यांचा आटापिटा तेंव्हा गंमतशीर वाटायचा. लोक आपापल्या घरात फुलझाडे का लावत नाहीत असं राहून राहून वाटायचे. घरीसुद्धा अनेक लोक फुलं मागायला यायचे पण अनेकांना मी ओळखत नसल्याने जाम पंगा घ्यायचो. “मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाला घरात येऊ देणार नाही” असं मी टिळकांच्या आवेशात ओरडायचो असं गप्पातून कळलं की आता हसू येते.
या जत्रेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे मिळणाऱ्या साखरेच्या मूर्ती. हत्ती,घोडे, उंट, गणपती यांच्या मूर्ती त्याही मातीच्या नव्हेत, तर चक्क साखरेच्या. सुबकता बघितली तर एखादी गणेशमूर्ती घरात ठेवावी असे वाटेल. एरवी आपल्याला साखरेची माळ गुढीपाडव्यालाच बघून माहिती असते. इथे मात्र निराळाच प्रकार. साखरेपासून असे काही करता येते हे हरीपुराच्या जत्रेतच कळले. बाकी चिंचा-कवठे विकायला बसलेल्या बायका आणि त्यांचे एकमेकींशी चाललेले बोलणे हा एक रिसर्चचा विषय होईल. (लहान असल्याने तेंव्हा याची काही कल्पना नव्हती हो! ;) )
आप्पा देवळात पुजारी असल्या कारणाने सगळे देऊळ हे आपल्याला आंदण दिलेले असे वाटून मला कितीही दंगा घालता यायचा. अनेकदा संगमेश्वराचे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलेले आठवतेय. देवळातच एका पारावर ठेवलेली भली मोठी सहाण हा माझ्या तसेच इतर लहान मुलांच्या औत्सुक्याची गोष्ट असे.
इतक्या सगळ्या आठवणी उराशी बाळगून मोठ्या अपेक्षेने मी निघालो होतो. वाटले, या सगळ्या आठवणींना एक तजेला मिळेल; तो माहौल पुन्हा एकदा अनुभवू.
एव्हाना हरिपूर रोडला लागलो होतो. काही खुणा अजूनही तश्याच होत्या. पण नंतर नंतर सगळेच बदललेले दिसू लागले. टांग्याची वर्दळ कमी झाली होती. तेंव्हा अगदी सामसूम दिसणारा हरिपूर रस्ता आता वाहनांनी बऱ्यापैकी गजबजला होता. पण श्रावणी सोमवार म्हणून जितकी गर्दी असायला हवी होती तितकी दिसली नाही. बॅनर्स आणि फ्लेक्स ची दाटी झाली होती. जाताना लागणाऱ्या ओढ्याचा आवाज आता ऐकू येत नाही. जाणवते फक्त पाण्याची दुर्गंधी. कुठल्या कुठल्या नगर्या आजूबाजूला दिसू लागल्या होत्या. इतर महानगरांप्रमाणेच सांगलीचा विस्तार दूरदूरवर होतोय हे दिसत होतं. मनात एक आशा पल्लवीत झाली होती की ज्या तऱ्हेने लोकसंख्या वाढली, त्यामुळे जत्रेनेसुद्धा आता एकदम ग्रँड रूप घेतले असेल.
लगेचच हरीपुरात पोचता झालो. वेशीजवळ गाडी पार्क केली आणि मंदिर आवारात गेलो. डोळ्यासमोर अपघात व्हावा तसा मला धक्का बसला. जी जत्रेत १०% सुद्धा लोक नव्हते. कवठ-चिंचा विकणाऱ्या बायका दुर्मिळ झाल्यात आता. साखरेचे हत्ती-घोडे, गणपती गायब झालेत. तलवारी, धनुष्यबाण याच्यासाठी हट्ट करणारी मुळे आता इतिहासजमा झालीत. वेताचा साप सुद्धा कुठे दिसत नाही. रंगीबेरंगी गॉगल्सच्या अवतीभवती कुणी लहानगा घुटमळताना दिसत नाही.
काय अपेक्षा घेऊन आलो होतो आणि काय बघतोय मी हे? आजूबाजूच्या परिसरात राहायला असणाऱ्या लोकांना माहितीच नाहीये का इथे जत्रा भरते ते? कुठे गेले ते लोक जे पूर्वी कित्येक किलोमीटर वरून टांगा करून यायचे? कुठे गेली त्यांची श्रद्धा? कुणालाच काही आठवत नाहीये का? नक्की काय हरवलंय? बालपण? माणसे? की जत्रा?
खरंच गदिमांनी अगदी बरोबर लिहून ठेवले आहे
संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही
कारण इतक्या सगळ्या गदारोळात एकटी कृष्णामाईच स्थितप्रज्ञासारखी वाहत होती. माझ्या डोळ्यात तारालालेल्या अश्रूंशी तिला काहीच देणे घेणे नव्हते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
छान
लेखन आवडले.
छान लेख
धन्यवाद
चेपुवर बोललोय आधीच..
छान
खरंच कृष्णामाई खंबीरपणे तोंड
लाजवाब,अत्यंत ह्रुदयस्पर्शी
मस्त लेखन...
मन, मनातल्या आठवणी.., आणि
@ गणेशा, ''निरागस असणारी
>>स्पावड्याच्या खरडवहीत आहे
छान लेखन. जत्रांच्या जुन्या
स्मरणरंजन
चांगला विचार आहे. दुसरी बाजू
छान लिहीलंयस.
सही...
सध्या उत्साह फक्त शॉपिंग
गावातला आठवडे बाजार पण आता
हाय कंबख्त!!!!
सौरभ, अरे या हरिपुरातच भरायचा
:)
आवडले.
सही रे!
छान!!
मस्त!
सुरेख
एक मॉल हरवलेला....
कृष्णेचे गटार करुन टाकलंय...
योगप्रभू, नदीबद्दलच्या
मस्तच
स्पावड्या वर त रंगहिन करायचा
टक्केवारीची काही भानगड ??
अतिशय सुंदर लेख.
वा वा
खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या.....
हमखास यशस्वी विषय.
इतके सारे सांगलीकर इथे आहेत
लेख आवडला
तुम्हीच किती दिवसांनी गेलात
तुमी लिवा मालक..... असंच
हरिपूर.. काय आठवण काढलीस
बागेतला गणपती
उत्तम लेख ...