✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अण्णा, प्लीज जपा..!

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 08/22/2011 - 12:27  ·  लेख
लेख
प्रिय अण्णा, सर्वप्रथम तुमच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमचं स्वच्छ चारित्र्य, तुमची साधी राहणी, तुमची सात्त्विकता, तुमच्यातली सादगी, तुमच्यातली निरागसता, तुमचं सेवाव्रत या सर्वांना माझा सलाम. अगदी मनापासून. अण्णा, खूप भावता तुम्ही मला.. आता काही मुद्दे - १) काही दिसांपूर्वी तुम्ही आणि तुमची टीम असं म्हणत होतात की सरकारनं त्यांच्या लोकपालपदासोबत तुमचंही जनलोकपाल बील संसेदेपुढे किमान सादर तरी करावं; मग संसद त्यावर जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल. किंवा त्यावर आधारीत पुढील वर्चा किंवा आंदोलनाची दिशा ठरवता येईल. २) पण सरकारने नेहमीप्रमाणे सगळ्यांना धोका दिला आणि फक्त स्वत:चंच बील सादर केलं. त्यामुळे सरकारच्या या फसवणुकीविरुद्ध तुम्ही उपोषणाला बसलात ज्याला माझ्यासकट अनेकानेकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. ३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता. ४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..! ५) अण्णा, अनेक सरकारांनी गेल्या ४२ वर्षात काहीना काही कारणं, सबबी सांगून लोकपाल बील अस्तित्वात आणलं नाही हे अगदी मान्य. त्याकरता जनतेतल्या प्रचंड असंतोषाला तुम्ही तोंड फोडलंत हेही नक्कीच खूप मोठं काम. परंतु एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की, अ) जरी एखाद्या कायद्याला ४२ वर्ष उशीर झालेला असला तरी, ब) किंवा आज प्रचंड लोकपाठिंब्याच्या बळावर तुम्ही लौकरात लौकर हा कायदा करण्यास सरकारला भाग पाडलं असलं तरी, क) किंवा याच लोकबळावर तुम्ही सरकारच्या सिंहासनाला धक्का लावलेला असला तरी, येत्या चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे. आणि म्हणूनच ३० तारखेच्या आत आमचंच लोकपाल बील जसंच्या तसं पास करा नाहीतर चालते व्हा, हा मला तरी थोडासा अट्टाहासच वाटतो. परंतु हा केवळ तुमचाच अट्टाहास आहे/असेल असंही मला मुळीच वाटत नाही. या मागचा तुम्हाला पुढे करून आपला अजेंडा मांडणारा बोलविता धनी कोण आहे हे मला माहीत नाही..! असं वाटण्याचं कारण असं की महाराष्ट्रातही तुम्ही अनेक आंदोलनं/उपोषणं केली आहेत आणि आवश्यक तिथे किंवा बहुतांशी वेळेला समजुतीनं घेऊन आवश्यक ती माघार घेऊन संबंधितांना आवश्यक ती स्पेसही दिली आहे असा अनुभव आहे. परंतु या वेळेला मात्र इतर काही मंडळींकडून तुम्हाला मुद्दामून जिवघेण्या जिद्दीला भाग पाडलं जात आहे असा मला संशय आहे..! ६) अण्णा, अजून काही गोष्टी मांडू इच्छितो - अ) आम्ही तुम्हाला ओळखतो अण्णा, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया ह्या गेल्या ३-४ महिन्यातच अचानक उगवलेल्या व्यक्तिंना मी किंवा इतर भारतीय जनता ओळखत नाही. यांच्या अजेंड्याबद्दल, किंबहुना 'त्यांच्यात काहीही हिडन अजेंडा नाही..' असं निदान मी तरी छातीठोकपणे म्हणू शकत नाही..! ब) एक कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने मी किरण बेदींना नक्कीच आदारपूर्वक ओळखतो. परंतु ह्या आंदोलनात मात्र 'त्यांच्याकडेही काहीही हिडन अजेंडा नाही..' असं का माहीत नाही, परंतु मी ते म्हणू शकत नाही..! तेव्हा अण्णा, लहान तोंडी मोठा घास घेतो आणि इतकंच सांगतो, की अण्णा जपा. स्वत:ला जपा..! आज तुम्ही अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि किरण बेदी यांच्या पूर्णपणे नसलात तरी बर्‍याच अंशी कह्यात गेला आहात असं मला जाणवतं आहे आणि भितीही वाटते आहे. अण्णा, तुम्ही खूप आपले वाटता म्हणूनच इतक्या मोकळेपणाने लिहितो आहे. दिल्ली, आपला देश इत्यादींबद्दल मलाही नि:संशय खूप आदर आहे. परंतु अण्णा, आजही तुम्ही राळेगणसिद्धीला हवे आहात, देशापेक्षाही महाराष्ट्राला प्रथम हवे आहात इतकंच नम्रपणे सांगू इच्छितो.. अजून काय लिहू..? तुमचाच, तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
शुभेच्छा
मत
माध्यमवेध
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
49994 वाचन

💬 प्रतिसाद (138)

प्रतिक्रिया

.

स्पा
Mon, 08/22/2011 - 12:34 नवीन
अगदी मनातल्या भावना मांडल्याबद्दल तात्यांचे आभार
  • Log in or register to post comments

समर्थन

श्रावण मोडक
Mon, 08/22/2011 - 12:37 नवीन
चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.
सहमत. या मुद्यांवर अधिक चर्चा व्हावी.
  • Log in or register to post comments

+१

ऋषिकेश
Mon, 08/22/2011 - 15:25 नवीन
+१ शिवाय, अण्णांच्या मागण्या अधिक असमंजस होत आहेत या लेखातील मुळ मतितार्थाशीही सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

या मुद्यांवर अधिक चर्चा

मराठी_माणूस
Mon, 08/22/2011 - 15:35 नवीन
या मुद्यांवर अधिक चर्चा व्हावी. कृती कधी होणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

भरपूर वेळ देऊनही मोहीम 'फुस्स' होईल या आशेने सरकारने वेळ दवडला!

सुधीर काळे
Tue, 08/23/2011 - 11:44 नवीन
खरे तर ५ एप्रिलपासून १६ ऑगस्टपर्यंत सरकारने काय केले? आज "चर्चेला तयार आहोत" असे म्हणणार्‍या सरकारने ४ महिने १० दिवस इतका भरपूर वेळ देऊनही ही मोहीम 'फुस्स' होईल अशा आशेन वेळ दवडला असेच मला वाटते. पण आंदोलनाची धार बोथट न होता आणखीच तीक्ष्ण झाली त्यामुळे सरकारचे धाबे दणाणलेले आहे! म्हणून या "बगळ्यां"बद्दल मला तरी सहानुभूती नाहीं. आता ममोसींना "honourable discharge" द्यावा असेच मला वाटते! अर्थात मी नेहमीप्रमाणे अल्पमतातच असेन! केजरीवालांबद्दल वाचा http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal इथे. त्यांना आतापर्यंत खालील पारितोषिके.सन्मान मिळालेले आहेतः 2004: Ashoka Fellow, Civic Engagement.[7] 2005: 'Satyendra Dubey Memorial Award', IIT Kanpur for his campaign for bringing transparency in Government.[4] 2006: Ramon Magsaysay Award for Eminent Leadership.[1] 2006: CNN-IBN, 'Indian of the Year' in Public Service [12] 2009: Distinguished Alumnus Award, IIT Kharagpur for Eminent Leadership.[13] 2010: Policy Change Agent of the Year, Economic Times Corporate Excellence Award along with Aruna Roy. तेंव्हां केजरीवाल हे "लंबी रेसका घोडा" असावेत असेच मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

गुळाचा गणपती

सुनील
Mon, 08/22/2011 - 12:45 नवीन
आज तुम्ही अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि किरण बेदी यांच्या पूर्णपणे नसलात तरी बर्‍याच अंशी कह्यात गेला आहात असं मला जाणवतं आहे आणि भितीही वाटते आहे. परवाच वाचलेली बातमी - राळेगण सिद्धीतील अण्णांच्या कायम संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना रामलीला मैदानात अण्णांची भेटदेखिल मिळू शकली नाही. शेवटी अण्णांना न भेटताच हे कार्यकर्ते दिल्लीहून राळेगण सिद्धीला परतले. कोण असावेत हे झारीतील शुक्राचार्य? अण्णांचा गुळाचा गणपती न होवो म्हणजे झालं!
  • Log in or register to post comments

परवाच वाचलेली बातमी - राळेगण

विसोबा खेचर
Mon, 08/22/2011 - 12:55 नवीन
परवाच वाचलेली बातमी - राळेगण सिद्धीतील अण्णांच्या कायम संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना रामलीला मैदानात अण्णांची भेटदेखिल मिळू शकली नाही.
हो, माझ्याही ऐकिवात आली आहे ही बातमी. ज्यांच्यामध्ये अण्णा अगदी २४ तास सहजगत्या वावरले अश्या राळेगणसिद्धीतल्या कुणा गावकर्‍याला किंवा कार्यकर्त्याला अण्णांना भेटण्यास आता केजरीवाल किंवा सिसोदियाची परवानगी लागणार ही बाब अत्यंत काळजीची आहे..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

कदाचित सुरक्षिततेच्या

कवितानागेश
Mon, 08/22/2011 - 13:16 नवीन
कदाचित सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक असेल. भेटायला आलेले लोक विश्वासार्ह आहेत हे कळणार कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सांगोवांगीच्या गोष्टी!

बाळकराम
Mon, 08/22/2011 - 16:58 नवीन
तात्या, केजरीवाल, सिसोदिया वा किरण बेदी यांच्या सारख्या अभ्यासू आणि प्रामाणिक लोकांवर "यांचा हिडन अजेंडा काही ठाऊक नाही बुवा" असा पवित्रा घेऊन तुम्ही अण्णांच्या आंदोलनाला अडथळेच आणत आहात! माहिती असेल तर पुराव्यानिशी माहिती द्या, उगाच आपले नाक कापून भल्या कार्याला अपशकुन करु नका! तुमची कळकळ जरी चांगली असली तरी ती अस्थानी आहे, अशा वावड्या उठवून तुम्ही तुमच्या आवडत्या काँग्रेसला एकप्रकारे मदतच करता आहात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

=))

नितिन थत्ते
Mon, 08/22/2011 - 17:23 नवीन
>>तुम्ही तुमच्या आवडत्या काँग्रेसला तात्यांवर हा आरोप आजवर कोणी केला नसेल !!!! तात्यांना आता चुल्लूभर पानीमें डुबण्याखेरीज गत्यंतर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

अरे.......

सविता००१
Mon, 08/22/2011 - 12:54 नवीन
अगदी मनातले लिहिले आहे तात्या तुम्ही. धन्यवाद
  • Log in or register to post comments

सर्वच मुद्यांशी पूर्णत: सहमत

चेतन सुभाष गुगळे
Mon, 08/22/2011 - 13:11 नवीन
इतका पद्धतशीर, तर्कशुद्ध विचारांचा लेख यापूर्वी कधीच कुठल्याच नियतकालिकात, संकेतस्थळावरील धाग्यात वाचनात आलेला नाही. ज्यावर आक्षेप घ्यावा, असहमती दर्शवावी असा एकही मुद्दा, एकही वाक्य या लेखात आढळलेलं नाहीय. १०० टक्के परिपूर्ण, अचूक असा हा लेख आहे. (अत्र्यांच्या स्टायलीत म्हणायचं तर गेल्या दहा हजार वर्षात इतका समतोल लेख लिहीला गेलेला नाहीय) इतका सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं लेखन सहसा आढळत नाहीच. तात्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. हा लेख अण्णा आणि टीमपर्यंत कसा पोचू शकेल आणि त्यावर ते किमान विचार तरी करतील याबद्दल आता प्रयत्न होणे गरजेचे आहे. तात्या हा लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध होईल अशी व्यवस्था करा. लोकसत्ता कडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाटते. ह्या विचारांची पूर्ण ताकदीनिशी प्रसिद्धी होणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

कृपया..

पल्लवी
Mon, 08/22/2011 - 13:16 नवीन
रविवार सकाळ्मधील समीरण वाळवेकर तसेच अमोल पालेकर यांचे लेख वाचावेत ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

असहमती दर्शवावी असा एकही

मराठी_माणूस
Mon, 08/22/2011 - 17:10 नवीन
असहमती दर्शवावी असा एकही मुद्दा, एकही वाक्य या लेखात आढळलेलं नाहीय. नुसताच लेख वाचलेला दिसतोय. प्रतीसाद पण वाचा , बरेच मुद्दे मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पल्लवी

गरीबांचा सुमार केतकर!

बाळकराम
Mon, 08/22/2011 - 17:48 नवीन
समीरण वाळवेकर हा "गरीबांचा सुमार केतकर" आहे- यातच सगळं आलं नाही का?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पल्लवी

बाब्बौ!!

बाळकराम
Mon, 08/22/2011 - 17:07 नवीन
<<१०० टक्के परिपूर्ण, अचूक असा हा लेख आहे. (अत्र्यांच्या स्टायलीत म्हणायचं तर गेल्या दहा हजार वर्षात इतका समतोल लेख लिहीला गेलेला नाहीय)>>...बाब्बौ!!...मज्जाय बुवा एका माणसाची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

पटले.

पल्लवी
Mon, 08/22/2011 - 13:13 नवीन
जे काही चालू आहे ते नक्की कुठल्या दिशेने चालले आहे असा प्रश्न पडतो. अट्टाहासाने, ब्लॅकमेलिंग करून काय साधणार ? सत्ता पडली तरी येणारे नवे सरकार धुतले तांदूळ असणार आहे का ? मुळात ही लोकपाल समिती भ्रष्टाचारमुक्त राहील ह्याची सुद्धा काय गॅरंटी ? आणि तुम्हा-आम्हा सामान्य जनतेला जे समजते ते माध्यमांना कळ्त नसेल का ? अण्णा अट्टाहासच करत आहेत हे त्यांना स्पष्टपणे दाखवून देणे/समजावुन सांगणे हे माध्यमांची जबाबदारी नाही का ?
  • Log in or register to post comments

मग

बाळकराम
Mon, 08/22/2011 - 17:55 नवीन
हे बिल पास झालं नाही तर सुरेश कलमाडी, ए राजा वा इतरानी केलेला भ्रष्टाचार परत होणार नाही याची गॅरंटी देणार का तुम्ही? की सगळे राजकीय भ्रष्टाचार्‍याना उपरती होउन ते चांगले वागायला लागतील अशी तुमची अपेक्षा आहे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पल्लवी

आणि

पल्लवी
Mon, 08/22/2011 - 21:09 नवीन
हे बिल पास झालं तर त्यात लूप होल्स असणार नाहीत किन्वा ते शोधून शोधून कोणीच कधीच भ्रष्टाचार करणार नाही याची गॅरंटी देणार का तुम्ही? हे बिल पास झालं तर आणि तरच राजकीय भ्रष्टाचार्‍याना उपरती होउन ते लग्गेच लोकपाल बिलास घाबरुन चांगले वागायला लागतील अशी तुमची अपेक्षा/आशा आहे? काँग्रेसविषयी मला काही प्रेम वगैरे नाही. पण काँग्रेसचे आत्ताचे सरकार गेलेच इतर पक्षाचे सरकार लग्गेच भ्रष्टाचार त्यागून देईल असे तुम्हांस वाटते का ? भाजप वगैरे जे सध्या अण्णांच्या बाजुने आहेत ( किंवा तसे भासवत आहेत ), ते आता सत्तारुढ असते तर त्यांची काय भुमिका असली असती असे आपणांस वाटते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे

मराठी_माणूस
Tue, 08/23/2011 - 08:55 नवीन
स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे काही आलबेल होईल ह्याची गॅरंटी त्या काळी कोणी दीली होती का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पल्लवी

गॅरंटी

स्वतन्त्र
Tue, 08/23/2011 - 12:31 नवीन
मुळात ही लोकपाल समिती भ्रष्टाचारमुक्त राहील ह्याची सुद्धा काय गॅरंटी ? १०० % सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

ठीक आहे. तुम्हाला तशी हमी

मराठी_माणूस
Tue, 08/23/2011 - 14:42 नवीन
ठीक आहे. तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत तुम्ही पाठींबा देउ नका अथवा पर्याय सुचवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वतन्त्र

म.मा.

पल्लवी
Tue, 08/23/2011 - 19:56 नवीन
>>स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे काही आलबेल होईल ह्याची गॅरंटी त्या काळी कोणी दीली होती का कदाचित ह्यासाठीच आधी स्वातंत्र्य की आधी समाज सुधारणा हा वाद रंगला होता टिळक आणि गोखल्यांमधे. स्वातंत्र्य मिळालं की ते सांभाळ्ण्याची कुवत समाजात असावा, हा विचार त्यामागे असावा. असो. >>तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत तुम्ही पाठींबा देउ नका. अच्छा म्हणजे जे चालले आहे त्याला चांगले म्हणा, नाहीतर तुम्ही विरोधक ?! अधिक स्पष्ट करुन सांगायचे झाल्यास, भ्रष्टाचार नष्ट करणे कोणाला नको आहे ? अण्णांबद्दल कोणाला आदर नाही ? हे ह्या स्तरावर, ह्या जोमाने होणे गरजेचे होतेच ह्याबद्द्ल कोणाचे दुमत असेल ? पण हे सगळे करताना / घडताना तारतम्य हरवले जाउ नये, अती ताणून जे मिळू शकेल त्याचेही मिळण्याचे चांसेस (मराठी शब्द ? ) घालवु नये, आपणच निवडून आणलेल्या सरकाराला आता संधी मिळताच शिव्या घातल्या जाउन प्रकरण हातघाईवर आणु नये असे वाटते. >>पर्याय सुचवा. शेवटी काय आहे ना, सामान्य माणुस काय किंवा बिग शॉट्स काय, जोपर्यंत माणुस स्वतः "भ्रष्टाचार करणार नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारे हातभार लावणार नाही" असे self-policing करत नाही, तोपर्यंत सगळं अवघडच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

>>तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 08/24/2011 - 13:37 नवीन
>>तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत तुम्ही पाठींबा देउ नका. >>>>अच्छा म्हणजे जे चालले आहे त्याला चांगले म्हणा, नाहीतर तुम्ही विरोधक ?! पाठींबा न देणे म्हणजे विरोध करणे नाही. पटत नसेल तर पाठींबा देऊ नका हे एकदम सरळ तर्कात बसणारे वाक्य आहे. त्यांनी काय, पटत नसेल तरी पाठींबा द्या म्हणायचे की काय :-) ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पल्लवी

१)सरकारचे वागणे जर "नाक

मराठी_माणूस
Mon, 08/22/2011 - 13:26 नवीन
१)सरकारचे वागणे जर "नाक दाबल्या वर तोंड उघडते" असेच असेल तर काय करावे. २)घाइगडबडीतत उरकण्या सारखी ही गोष्ट नसेल पण ४२ वर्ष हा काळ घाइचा म्हणात येणार नाहे. ३)उर्वरीत महाराष्ट्रात कायम काळोखाचे साम्राज्य (लोड शेडींग) असले आणि आरडाओरड केली तरी काहीही फरक पडत नाहे , पण तेच मुंबईत घडले तर लगेच दखल घेतली जाते. त्यामुळेच दिल्लीचे महत्व. ४)विसंगत वागण्याची फक्त सरकारचीच मक्तेदारी नाही.आंदोलनातील विसंगती कदाचीत सरकारच्या विसंगतीचाच परीणाम असु शकतो.
  • Log in or register to post comments

चार आठ दिवसात घाईघाईने एखादा

मालोजीराव
Mon, 08/22/2011 - 13:40 नवीन
चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.
याची गरज आहे असं वाटत नाही, कारण यापूर्वी जनता गाढ झोपेत असताना अतिशय महत्वपूर्ण,'अर्थपूर्ण' अशी बिल्स विना चर्चा,लोकसभेत राज्यसभेत गोंधळ चालू असताना मंजूर झाली आहेत.सरकारकडून जनतेला या बिलासंदर्भात लेखी शब्द मिळणे अपेक्षित आहे. कारण सोनियाजी परदेशात पळून गेल्यात,मनमोहनजी यांच्या तोंडून कोणतेही सकारात्मक शब्द निघत नाहीयेत आणि मनु संघवी,सिब्बलांच्या तोंडावरची मग्रुरी 'फोटोजेनिक' आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

खासदार मंडळी "तू नहीं और सही, और नहीं और सही" हे गाणे गाताहेत!

सुधीर काळे
Tue, 08/23/2011 - 14:27 नवीन
चार महिन्यांपेक्षा जास्त वेळ देऊनही कांहीं झाले नाहीं. तेंव्हां आता वेळ देत नाहींत ही ओरड अस्थानी आहे. जेंव्हां "टीम अण्णा" सरकारशी बोलणी करत होती तेंव्हाचा कपिल सिबल यांचा बेरकी चेहेरा, कुत्सित हास्य आणि टर उडविण्याचा पवित्रा मला अजूनही आठवत आहेत. त्यावेळची असली वागणूक आता भारी पडते आहे काँग्रेसी नेत्यांना! त्यात राजमाता आजारी आणि राजपुत्र कुठे तरी कमी महत्वाच्या जागी वावरतोय्! मग काय करणार बिचारे ममोसिं तरी? आता प्रिया दत्त, एरॉन, शशी थरूर हे खासदार तर फुटलेले दिसत आहेत. परवा-परवापर्यंत अण्णांच्या विरुद्ध काँग्रेसचे समर्थन करणारे संजय निरूपण अण्णांच्या टोपीत आज अगदीच 'विदू' दिसत होते. (अर्थात् ते जातिवंत दलबदलूच आहेत!) राजकारणात वेळ कांहीं सांगून येत नाहीं म्हणून सगळे खासदार दोन्ही डगरींवर हात ठेवून आहेत. अगदी "तू नहीं और सही, और नहीं और सही" हे गाणे गाताहेत बरेच खासदार! घरो-घरी बैठकी चालल्या आहेत. आपापसात काय बोलतात कुणास ठाऊक! भाजपाही "सरशी तिकडे क्षक्षक्ष" या तंत्राचा उपयोग करताना दिसतो आहे. फक्त लाल बावटेवाले मात्र त्यांच्या निवेदनांवरून आपल्या तत्वांशी प्रमाणिक वाटले. "येन केन प्रकारेण प्रसिद्धा रुंधती भवेत्" या न्यायाने या बाईही काल बोलल्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

शंका

नितिन थत्ते
Mon, 08/22/2011 - 13:53 नवीन
अण्णांच्या रूपात भगवान श्रीकॄष्णच प्रकटले असताना अशा शंका घेणे शोभत नाही.
  • Log in or register to post comments

जल्ला तुम्ही एकपण संधी सोडु

गणपा
Mon, 08/22/2011 - 15:07 नवीन
जल्ला तुम्ही एकपण संधी सोडु नका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

प्रियाली
Mon, 08/22/2011 - 15:57 नवीन
तात्याचा लेख आवडला. तरीही,
अण्णांच्या रूपात भगवान श्रीकॄष्णच प्रकटले असताना अशा शंका घेणे शोभत नाही.
याच्याशी +१. ;-) तात्याच्या लेखावर सुधीर काळे यांचा प्रतिसाद वाचनीय असेल असे भाकित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

३) या आंदोलनाच्या दरम्यान

शानबा५१२
Mon, 08/22/2011 - 14:05 नवीन
३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता. ४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..!
हा मुद्दा चुकीचा आहे. अण्णा आदोंलनाच्या एक दीवस आधीच म्हणाले होते की 'सरकार पडले तरी चालेल पण भ्रष्टाचार संपला पाहीजे' आणि जेव्हा अण्णा बोलतात की '...........सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही' तेव्हा त्यांना हेच म्हणायचे आहे की सरकार पाडणे आमचा उद्देश नाही पण जर बील पास होण्यासाठी ते गरजेचे असेल तर काही हरकत नाही. मनीष तीवारी सारखा मुर्ख अण्णांवर 'सैन्यातुन पळाले' असा आरोप करतो,नंतर तो आरोप एक अमराठी माणुस चुकीचा असल्याचे माहीतीच्य अधिकारातुन दाखवुन देतो हे एक विशेष होते,त्यावर चर्चा नाही झाली. बिहारची एक युवती उपोषणाला बसलेय्,तीन दीवसांनंतर तीला चालताही येत नव्हते,अण्णा सहा दीवसांनंतरही ओरडुन ओरडुन भाषण देतायत. ह्यावरुन काय सिध्द होते?
  • Log in or register to post comments

मी पण म्हणतो : अण्णा, प्लीज

पाषाणभेद
Mon, 08/22/2011 - 14:20 नवीन
मी पण म्हणतो : अण्णा, प्लीज जपा..! पण थोड्या वेगळ्या अर्थाने. जसे की अण्णा, प्लीज जपा..! पण जरा जिवाला! कारण असले अण्णा देशाला हवे आहेत. अन तात्या, अहो कायदा होणे महत्वाचे. त्यात नंतर सुधारणा करता येईलच की.
  • Log in or register to post comments

ही नालायक भ्रष्टाचार-रक्षकांची कोंडी फोडली गेली पाहिजे

सुधीर काळे
Tue, 08/23/2011 - 15:19 नवीन
एकदम बरोबर बोललात, पाषाणभेद-जी! मलाही हेच वाटते कीं ही नालायक भ्रष्टाचार-रक्षकांची कोंडी फोडली गेली पाहिजे. त्यानंतर अण्णा हजारे आणि "टीम अण्णा" हजारोंनी सुधारणा करतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा

गवि
Mon, 08/22/2011 - 14:34 नवीन
मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा मुद्दा: सात आठ दिवस अन्न पूर्ण सोडून बसले तर कोणत्याही वयाचा मनुष्य टिकाव धरु शकेल असे वाटत नाही. आणि तरीही हे किंवा रामदेव बाबा वगैरे सात आठ दिवसांनीही बर्‍यापैकी ठीक दिसतात. हे पटत नाही. पाणीही पीत नसतील तर दोन दिवसांतच अत्यंत घातक परिणाम होतील. पाणी पिऊन फक्त खाणे बंद ठेवले तर तीन ते चार दिवसांत हायपोग्लायसेमियामुळे प्राणघातक स्थिती दिसणे स्वाभाविक असावे. तितके काही होताना दिसत नाही. काय असते नेमके हे उपोषण. संशय म्हणून नव्हे पण खरोखरीची शंका म्हणून विचारतोय.
  • Log in or register to post comments

उपोषणादरम्यान पाणी प्यायले जाते.

मन१
Mon, 08/22/2011 - 15:39 नवीन
होय्.सध्या उपोषणादरम्यान पाणी प्यायले जाते. मुद्दे बरोबर आहेत. >> एक वेगळा मुद्दा: सात आठ दिवस अन्न पूर्ण सोडून बसले तर कोणत्याही वयाचा मनुष्य टिकाव धरु शकेल असे वाटत नाही. हो. अवघड परिस्थिती होते खरी. पण माणसाचा जीव काही जात नाही. "टिकाव धरणे " कशाला म्हणताय ते सांगा. "जिवंत राहणे" ह्याला टिकाव धरणे म्हणत असाल तर,माणुस नक्कीच टिकाव धरु शकतो. आमरण उपोषण करुन खरोखर मृत्यु पावलेली प्रथम व्यक्ती म्हणजे भगतसिंग ह्यांचे सहकारी जतिंद्रनाथ दास्. त्यांनी जेलमध्ये असताना १९२९ मध्ये आमरण उपोषण केले व ६३ व्या दिवशी त्यांचे निधन झाले. भाषावार प्रांतरचनेसाठी, (विशेषतः आंध्र च्या मागणीसाठी) १९५२ आमरण उपोषण करुन पोट्टी श्रीरमलु ह्यांना उपोषणाच्या ८२व्या दिवशी मृत्युने गाठले. मागच्याच १-२ महिन्यात गंगाशुद्धीकरण संबंधित प्रश्नासाठी स्वामी निगमानंद ह्यांनी ६५ दिवस उपोषण केल्यावर त्यांचा जीव गेला.उपोषणानेच तो गेला असावा असा अंदाज आहे. ही सर्व उदाहरणे बघता, ५-७ दिवसात आपण म्हणता तसे जीव जायची शक्यता नाही. सुमारे८-१० दिवसात बाबा रामदेव ह्यांची तब्येत खराब झाली. पण त्यात विना अन्नपाणी केलेल्या दगदगीचाच अधिक सहभाग होता असे म्हणतात. त्यांनी निव्वळ उपोषणच केले असते आणि मौनव्रत धारण केले असते तर ते जरा अधिक काळ बरे राहिले असते. >> आणि तरीही हे किंवा रामदेव बाबा वगैरे सात आठ दिवसांनीही बर्‍यापैकी ठीक दिसतात. हे पटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे बाबा रामदेव अत्यवस्थ झाल्याने त्यांना अ‍ॅड्मिट करावे लागले होते. ते काही बर्‍यापैकी ठिक दिसत नव्हते. म्हणुन तर दिग्गीराजा वगैरे मंडळी "others will also meet the same fate as that of Ramdev " वगैरे म्हणत होती. तुम्हीही अत्यवस्थ व दुर्लक्षित व्हाल अशी भिती घालत होती. पाणीही पीत नसतील तर दोन दिवसांतच अत्यंत घातक परिणाम होतील. पाणी पितात हो. अगदि व्यवस्थित पितात.(मला वाटते बाटलीबंद पाणी पीत असावेतएकात्यांना भेटायला गेलेल्या एका डॉक्टाराने ते पाण्यातुनच ग्लुकोज्/एलेक्ट्राल किंवा तत्सम घेतात असा दावा केलाय. http://www.youtube.com/watch?v=G4zRHEw21h8 >>पाणी पिऊन फक्त खाणे बंद ठेवले तर तीन ते चार दिवसांत हायपोग्लायसेमियामुळे प्राणघातक स्थिती दिसणे स्वाभाविक असावे. नाही. वरील उदाहरणे पहावीत. >>काय असते नेमके हे उपोषण. संशय म्हणून नव्हे पण खरोखरीची शंका म्हणून विचारतोय. संशय(असल्यास) बलावण्यास कारण :- http://www.youtube.com/watch?v=G4zRHEw21h8. माझ्या माहितीत :- "उपोषण म्हणजे अन्नग्रहण न करणे, त्याद्वारे स्वतःला निय्मित क्लेश देणे व मृत्युकडे वाटचाल. ह्या संभाव्य मृत्युची नैतिक जिम्मेदारी ही ज्याच्याविरुद्ध उपोषण केले जाते त्याच्यावर असते." थोडक्यात, आधुनिक काळात मध्ययुगीन मुल्ये राहिलेली नाहित. सर्व प्रजेच्या संवर्धनाची थेट जिम्मेदारी ही सरकारकडेच असते अधोरेखित संकल्पना मुळात ब्रिटिशांच्या राज्यात होती. ती व्यवस्थित समजून घेउन, तिचा पुरेपुर वापर गांधीजींनी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर करुन दाखवला. उपोषण करणारी व्यक्ती पुरेसा जनाधार असलेली किंवा मिडियाच्या नजरेत असनारी असेल तर केवळ एखाद्या व्यक्तिच्या मृत्युनेही आख्खे सरकार गोत्यात येउ शकते, मग ते केंद्र असो वा रज्या वा अजुन कुठलेही. थोडक्यात, जुन्या हिंदीपिक्चरमध्ये हीरो-हिरोइनचे वडील कसे आपल्या अपत्याला त्याच्या प्रेमिकापासुन दूर होउन, स्वतःच्या मर्जीने ठरवलेले लग्न करण्यास भाग पाडण्यासाठी heart-attack आणत असत ना, तस्सच म्हणा हवं तर उपोषणाला. मुलीच्या बापाची कशी भूमिका असे की:- "मी मेलो तर जिम्मेदारी तुझी" वगैरे वगैरे. मग उगाच तो guilt टाळण्यासाठी हिरोइन्स कशा कुणाशीही खुशाल लग्नाला तयार होत ना, तसच सरकारनही व्हावं अशी अपेक्षा सरकारकडुन असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आँ!!

बाळकराम
Mon, 08/22/2011 - 18:10 नवीन
<<सर्व प्रजेच्या संवर्धनाची थेट जिम्मेदारी ही सरकारकडेच असते अधोरेखित संकल्पना मुळात ब्रिटिशांच्या राज्यात होती.>>...हा शोध कुठून लावलात तुम्ही? भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचा इतका मोठा अपमान कुणीही केला नसेल ;( हे जर खरं असेल तर जालियनवाला बाग, १८५७ ची वगैरे ब्रिटिशांनी घडवलेली शेकडो हत्याकांडे आणि त्यात मारलेली लाखो माणसे इ. काय नुसती भातुकलीच्या खेळण्यातली भांडणं होती वाटतं? ब्रिटिश जाऊन ६४ वर्षे झाली पण काळ्या इंग्रजांची जळजळ अजून जात नाही! दुर्दैव देशाचं, दुसरं काय ;(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

होय. ते तसे मानत होते.

मन१
Mon, 08/22/2011 - 22:30 नवीन
अधोरेखित वाक्य कृपया out of contextवाचु नये. अधोरेखित वाक्यापूर्वीचे वाक्य पुढील वाक्याला एक विशिष्ट अर्थ देते. मुळात मी स्वातंत्र्यसैनिकांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. उपोषणाला बसल्यावर किंवा आंदोलन केल्यावर बोलणी करायला ब्रिटिश सरकार का येइ, ह्याचा अंदाज ह्यातुन येउ शकतो. म्हणुन्च जालियनवाला बाग हत्याकांडानंतर खुद्द ब्रिटनमधील सामान्य जनता सरकारवर तीव्र नाराज होती. राहिला प्रश्न १८५७ चा. १८५७ चं क्रौर्य दोन्ही बाजुंनी प्रचंड होतं. त्यातली एक बाजु उठाववाल्यांची तर दुसरी East India company नामक खाजगी कंपनीची होती. तो भयंकर रक्तपात पाहुनच ब्रिटिश शासनानं थेट सत्ता हातात घेतली. पुढेही सरकारशी युद्ध पुकारणार्‍यांसोबत ब्रिटिश सत्ता क्रौर्यानं वागली हे खरेच. मात्र सामान्य जनाच्या घरात घुसुन उच्छाद वगैरे मांडात बसणे त्यांना कबूल नसावे. ब्रिटनने भारत लुटला हे खरेच, पण त्यांच्या पूर्वसुरींच्या तुलनेत त्यांनी कुथेही demographic imbalance केलेला नाही. आपण मुद्द्याबद्द्ल आणि मुद्द्यापुरतेच बोलला असतात तर बरं झालं असतं. "काळा इंग्रज" , "जळजळ" असे विखारी शब्द लगेच वापरायची काय जरुर होती ते समजले नाही. स्वातंत्र्यसैनिकांबद्द्ल अनादर करण्याचा हेतु नाही हे पुन्हा एकदा स्प्ष्ट करु इच्छितो. असो, ही चर्चा मूळ चर्चाप्रस्तावाशी अवांतर जाताना दिसते आहे. अधिक काही असल्यास स्वतंत्र धागा उघडणे किंवा व्यनि-खरडी वापरणे इष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

मनोबा,

बाळकराम
Wed, 08/24/2011 - 15:27 नवीन
चालेल, व्यनी/खरड स्वरुपात बातचीत करुयात! ते "काळा इंग्रज" वगैरे तुमच्या साठी नव्हते, इंग्रज हे विष्णूचे अवतार होते असं मानणारा एक वर्ग आपल्या देशात अजूनही आहे त्याना उद्देश्शून ते होते. आपला अनादर झाला असल्यास कृपया माफ करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

"इंग्रज हे विष्णूचे अवतार

शैलेन्द्र
गुरुवार, 08/25/2011 - 10:44 नवीन
"इंग्रज हे विष्णूचे अवतार होते असं मानणारा एक वर्ग आपल्या देशात अजूनही आहे " इंग्रज विष्णुचे अवतार नसतीलही कदाचीत, पण अनेक मध्ययुगीन भारतीय राज्यकर्त्यांपेक्षा, इंग्रजांची व्यवस्था खुपच चांगली होते. मुख्य म्हणजे व्यक्तीसापेक्ष राज्यकारभाराकडुन, कायदेशीर किंवा व्यवस्थाधारीत कारभाराकडे भारताचा प्रवास इंग्रजी राजवटीतच झाला. इंग्रजांऐवजी जर पोर्तुगीजांनी भारत पादाक्रांत केला असता तर आज फार वेगळ चित्र असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

माझ्या माहितीत

प्रियाली
Mon, 08/22/2011 - 15:59 नवीन
माझ्या माहितीतील एक जैन महिला पाण्यावाचून उपवास करून निदान आठवडाभर बोरिवली-चर्चगेट प्रवास करून ऑफिस गाठत असे. नंतर मात्र प्रकृतीमुळे ती ऑफिसला येणे बंद करे पण तिचे उपवास पूर्ण करे. * हल्ली ते जैन उपवास किती दिवस चालायचे ते विसरले आहे पण उपवासानंतर तिची प्रकृती अर्धी झालेली असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

त्यास पर्युषण पर्व असे

वपाडाव
Mon, 08/22/2011 - 18:15 नवीन
त्यास पर्युषण पर्व असे म्हणतात... हा कालावधी १० दिवसांचा असतो... लोक आपापल्यापरीने (झेपेल तसे) उपवास करत असतात. कुणी दिवसात एकच वेळ जेवण करतं कुणी १० दिवस पाण्यावर जगतं, कुणी सायंकाळच्या आत जेवणाच्या वेळा पाळतं (सहसा ही वेळ पाळणाय्चे काम चातुर्मासभर चालते.) दिगांबर पंथाचे लोक हे सर्व गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत पाळतात. आणी श्वेतांबर लोक गणेश चतुर्थीच्या आधीचे १० दिवस हे पाळतात. नुस्ते पाण्यावर १० दिवस काढणार्‍यांचा भाद्रपदाच्या शेवटी सत्कारही केला जातो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अरे हो!

प्रियाली
Mon, 08/22/2011 - 18:17 नवीन
बरोबर :) मी विसरून गेले होते. माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

चातुर्मासात हा लवकर जेवण्याचा

रामदास
Mon, 08/22/2011 - 18:39 नवीन
कार्यक्रम चौवीयार या नावाने पण ओळखला जातो. खास जैनी जेवण असते. (ते साधारण पावणेसात ते सात या दरम्यान केले जाते. हीच गोष्ट लक्षात ठेवून जव्हेरीबाजार-प्रसाद चेंबर्स-दादर येथे बाँबस्फोट केले गेले.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

हायपोग्लायसेमिया हा फक्त मधुमेह असलेल्या व्यक्तीलाच होत असावा?

सुधीर काळे
Tue, 08/23/2011 - 15:25 नवीन
आपल्यातल्या डॉक्टरमंडळींनी यावर मतप्रदर्शन करावे, पण माझ्या वाचनानुसार हायपोग्लायसेमिया हा फक्त मधुमेह असलेल्या व्यक्तीलाच होत असावा व इतरांना होत नसावा. चूभूद्याघ्या! शिवाय मिताहारी माणसाला बरेच दिवस उपाशी रहाता येते. पाणी पीत राहिल्यास साधारणपणे १५ दिवस अशक्तपणाखेरीज इतर कांही काँप्लिकेशन्स होत नाहींत. पण डॉक्टरमंडळींनी यावर जरूर भाष्य करावे. मलाही बरोबर माहिती मिळाल्यास हवीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मला पण.

गवि
Wed, 08/24/2011 - 10:11 नवीन
मला पण. हायपोग्लायसेमियाबद्दलचा गैरसमज दूर करावा. मनुष्य मरत नसेल पण निदान बोलण्याचालण्याच्या स्थितीत सात आठ दिवसांनी नक्की राहात नसेल. पुन्हा अजून एक प्रश्न. पाण्याशिवाय तर मनुष्य सात दिवसही राहू शकणार नाही. अशा स्थितीत उपोषणाच्यावेळी पाणी पीत राहून आपले उपोषणदिवस वाढवणे हा उद्देश असावा का? पाणीही न प्यायल्याने उपोषणाची धार शतपटींनी वाढेल काय? कारण क्रिटिकल कंडिशन लगेचच येईल. की दहापंधरा दिवस तरी उपोषण चालावे अशी उभय पक्षांची इच्छा असते? उपोषण हा मार्ग योग्य आहे का किंवा खरोखर मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाने मृत्यू ओढवणे (स्वामी निगमानंदांसारखा) अशी घटना सामान्यपणे सर्व उपोषणांबाबत (सध्याचे अण्णांचे उपोषण धरुन) घडू शकते का? की जनरली अशा वेळी (म्हणजे खरेच मरण्याची पाळी आल्यास) समर्थकांकडून अन्य मार्गांनी योग्य परिस्थिती निर्माण करुन उपोषणकर्त्याला येनकेन प्रकारेण गळ घालून उपोषण सोडायला कारण पुरवले जाते? जर याचे उत्तर हो असेल तर मग उपोषण ही निव्वळ स्टंटबाजी असते का? तशी असणे चूक की बरोबर हा पुढचा प्रश्न झाला. मुळात असते का हा प्रश्न सध्या डोकावतो आहे. हे सर्व मी अण्णांच्या उपोषणाबाबत किंवा त्याला विरोध म्हणून नव्हे, तर एकूण उपोषण या "मोडॅलिटी"विषयी म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

त्याला

प्रचेतस
Wed, 08/24/2011 - 10:20 नवीन
पाण्याशिवाय तर मनुष्य सात दिवसही राहू शकणार नाही. अशा स्थितीत उपोषणाच्यावेळी पाणी पीत राहून आपले उपोषणदिवस वाढवणे हा उद्देश असावा का?
उपोषण म्हणजे फक्त अन्न त्यागणे. अन्न व पाणी दोघांच्याही त्यागाला प्रायोपवेशन म्हणतात. सावरकरांनी प्रायोपवेशन केले होते. २२ दिवसांनी त्यांचे निधन झाले. (चूभूदेघे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

उपोषण आणि प्रायोपवेशन यातला

गवि
Wed, 08/24/2011 - 10:26 नवीन
उपोषण आणि प्रायोपवेशन यातला फरक स्पष्ट ज्ञात आहे. मुद्दा असा आहे की प्रायोपवेशन हे राजकीय अस्त्र म्हणून क्वचितच वापरले जात असावे. तिथे "उपोषण"च वापरले जाते. आणि बहुतेक वेळा ते साध्य होत नाही म्हटल्यावर काहीतरी सीन उभा करुन मोसंब्याचा रस पाजला जातो असं पाहण्यात येतं. हे प्रायोपवेशनाच्या बाबतीत कठीण आहे कारण ते हाय रिस्क आहे. त्याविषयी म्हणत होतो. बाकी सावरकरांनी प्रायोपवेशन केले असेल तर ते स्वतःचे जीवन ऐच्छिक रित्या संपवण्यासाठी. काही मागणीसाठी नव्हे. अवांतरः स्वा. सावरकरांनी समुद्रात शिरुन देहत्याग केला असेही ऐकिवात आहे. खरे काय कोणास ठाऊक.. पण त्यांच्यासारखी पट्टीची पोहणारी व्यक्ती (आठवा: बोटीवरुन उडी) , पाण्यात शिरुन बुडू शकेल हे अतर्क्य वाटते. शेवटी कितीही डिटर्मिनेशन असले तरी पोहू शकणारी व्यक्ती एका क्षणानंतर सब्कॉन्शस माईंडच्या प्रभावाने हातपाय मारुन तरंगतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बरेचसे मुद्दे पटले. एकंदर

गणपा
Mon, 08/22/2011 - 15:11 नवीन
बरेचसे मुद्दे पटले. एकंदर गुळाचा गणपती होणार अशी चिन्हे आहेत.
  • Log in or register to post comments

लेख पटला.

मन१
Mon, 08/22/2011 - 15:42 नवीन
लोकपालामुळे खरोखरीच देशाचं भलं होणार असं लोकांना वाटतय बहुतेक. आणि तात्या, (थोड्या उशीरा का असेना)मनःपूर्वक शुभेच्छा; दीर्घायुष्य मिळो.
  • Log in or register to post comments

हिडन

चिरोटा
Mon, 08/22/2011 - 15:52 नवीन
वाचनिय लेख. काही मुद्दे पटले. सिसोदिया, केजरीवाल हे अचानक उगवलेले लोक नाहीत. केजरीवाल ह्यांनी RTI संदर्भात बरेच काम केले आहे. चांगली डिग्री आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते आंदोलनात सामील झाले आहेत. अण्णांच्या आंदोलनामागे अमेरिका,पाक आणि संघपरिवाराचा हात आहे असे 'ज्येष्ठ पत्रकारी' लॉजिक कोणाचे असेल तर भाग वेगळा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा