Skip to main content

स्वप्नातला राजकुमार

स्वप्नातला राजकुमार

Published on 26/07/2011 - 18:06 प्रकाशित मुखपृष्ठ
लग्नाचा वाढदिवस होऊन तीन दिवस झाले होते. तरीही अजूनही फोन वरचे मेसेजेस आणि फेसबुक वरच्या कॉम्प्लीमेंटस आणि त्याची उत्तरे ह्यातून पूर्णपणे सुटका अजूनही व्हायची होती. तेच, तेच मेसेजेस अन तीच, तीच उत्तरं! एकच साच्यातून काढल्यासारखी. कधी कधी कंटाळा येतो ह्या सगळ्याचा. असो कितीही कन्टाळवाणं आणि औपचारिक असलं तरीही आपण ही करतोच की अगदी असंच, वाईट दिसू नये म्हणून हेच मेसेजेस कट, कॉपी, पेस्ट करून पाठवतोच की असल्या ओकेजन्सला लोकं ही तेच करतात. औपचारिकच सगळं ह्यात कोण किती मनापासून करतं हे मात्रं शोधत बसायचं नाही. अन हे फोनबुक आणि फेसबुक किती भरलंय? नाव आणि नंबर्स ची गर्दी नुसती! कितीतरी लोकं समोर आलेत तर काय बोलावं हे ही कळणार नाही. पण वाढदिवस, एनीव्हसरी ला सगळ्यांचे मेसेजेस असतातच. सगळं दिसायला किती सुन्दर वाटतं ना? पण सगळं किती आभासी आहे. खरंच किती जीवाभावाचे आहेत ह्या मध्ये? आणि आपण ही कुणाचे? आपण हेच शोधत होतो का? आपल्याला तर एकच हवा होता जीवाभावाचा तोच पुरला असता जन्मभरासाठी. आपला लहानपणा पासूनचा सखा! आपल्या स्वप्नातला राजकुमार. तो कुठेच भेटला नाही आयुष्याच्या कुठल्या ही टप्प्यावर. अन आता तर आपलं लग्न ही झालाय. फार पूर्वीच. बाप रे नऊ वर्षं झालीत की लग्नाला! तिशीत आलो की आपण! कळलंच नाही काळ कसा गेला ते! जे काही व्हायचं आयुष्यात ते घडून गेलं की! आता पुढे जे काही घडणार आहे ते ठरून गेलंच आहे. जे काही घडलंय ते तसं काही वाईट ही नाही म्हणा. चांगलच तर आहे सगळं. नवरा, मुलं घर! करीअर छान सुरु आहे. पैसा, गाड्या सगळं काही तर आहे. तरीही हा रितेपणा जाणवतो कधी कधी? सर्वकाही चांगलं छान सुरु असलं तरीही मनासारखं घडलं का? ती विचार करत होती. तिचं आयष्य चार चौघींसारखंच होतं पहिले पासून. शाळेत अभ्यासात खेळात सगळीकडे एकदम पुढे नाही एकदम मागे पण नाही. तिची स्वप्नं पण सगळ्या मुलींसारखीच होती. तेव्हा तिची स्वप्नं खूप मोठी होती. तिच्या पण स्वप्नात एक राजकुमार होता. तो फक्त तिचाच होता. फक्त आणि फक्त तिच्यावरच प्रेम करणारा. नेहमीच तिची बाजू घेणारा. त्याच्या नुसत्या कल्पनेनीच तिला थरारून यायचं. नुसत्या तिच्या रूप, रंगावरच नाही तर तिच्या सगळ्याच गोष्टींवर मनापासून प्रेम करणारा. जेव्हा तिचं भावंडांशी भांडण व्हायचं तेव्हा तो तिच्या मनात यायचा प्रेमानी कुरवाळायचा. मग ती सगळं विसरून जायची. आई बाबा रागावले की ती रडायची. तेव्हा तो तिच्या मनात येऊन तिच्या डोक्यावरून प्रेमानी हात फिरवायचा.. मग ती हासायची. तिचे मैत्रीणीशी वाद व्हायचे तेव्हा तो तिच्या मनांतल्या मनात तिचा पप्पी घ्यायचा. जेव्हा जेव्हा ती कुठल्याही गोष्टीत मागे पडायची, तिला रडू यायचे. पण तेव्हा ही तो तिच्या मागे उभा असलेला तिला दिसायचा, तिच्या पाठीवरून प्रेमानी हात फिरवून तो म्हणायचा काळजी नको करूस मी आहे ना तुझ्या सोबत काहीही झालं तरी मी तुझाच आहे फक्त तुझाच. मग ती त्याच्या खांद्या वर डोकं विसावून मुक्त व्हायची बाकीच्या जगापासून. सगळे विचारायचे तिला नेहमी की तू नेहमीच कसली स्वप्नं बघत असतेस. तेव्हा ती मनातल्या मनात खूप हसायची. काहीपण बोलायची नाही, कारण ती तिची गम्मत होती. फक्त तिची एकटीची. ते तीच आणि त्याच जग होतं. त्यात ती कुणालाही प्रवेश देणार नव्हती. लोकं स्वप्न का म्हणेना, पण ते खूप खूप सुंदर होतं बाकीच्या जगा पेक्षा. म्हणून तर तिला लवकरात लवकर मोठं व्हायचं होतं. कारण तो तेव्हा तिला भेटणार होता, मग ते दोघं खूप खूप सुखात राहणार होते. हळूहळू ती ही मोठी झाली. शाळेत तिला तो भेटला नाही. कॉलेज मध्ये पण तिची नजर त्यालाच शोधायची. पण तिथेही तो नव्हता. एकदोघं आवडले होते पण त्यांच्यातही तो आढळला नाही. मग ती अजून मोठी झाली. नोकरी, करीअर मार्गाला लागले. ऑफीस मध्ये पण तो नव्हता. आता ती मोठी झाली होती. तिचे लग्नाचे वय झाले होते. प्रॅक्टीकल विचार करू लागली होती. तिची ही एक दोन अफेअर्स झालीत. मग एकाशी तिचा आणाभाका घेऊन रीतसर प्रेमविवाह ही झाला. ती खूप आनंदात होती. हा तिला भेटलेला सगळ्यात चांगला मुलगा होता. लग्नाचा विचार केला तर आयुष्यभराचा जोडीदार म्हणून हाच सगळ्यात चांगला चॉइस होता. दिसायला चांगला, स्वभाव ही चांगलाच, सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण करीअर सगळे व्यवस्थित होते. तरीही हा तिचा स्वनाताला राजकुमार नाही हे तिला आतून कळत होते. पण ते फार आत खोलवर कुठेतरी. पण त्या जाणीवेनी आता तिला तेव्हढा त्रास होत नव्हता. तिने त्या राजकुमाराची खूप वाट बघितली होती. आता ती हळू हळू त्याच्या शिवाय जगायला शिकली होती. आता तर ती आपल्या प्रियकराची झाली होती. त्याच्या बाहुपाशात ती जगाला काय स्वत:लाच विसरून जायची. लग्न झाले तेव्हा दोघंही फार फार आनंदात होते. पुढचे दिवस कसे गेलेत कळलेच नाही. हळूहळू नव्याचे नऊ दिवस सरले. जे व्हायचे ते हळू हळू होतंच होती. मग हळूहळू ते जाणवायला लागले. त्याचा पूर्णपणे नवरा होऊन गेला. आणि तिची पूर्णपणे बायको होऊन गेली होती. हा ही बदल पचवायला इतकं काही कठीण गेलं नाही. कारण जगात सगळी कडे हेच होत होतं. आणि जगाच्या दृष्टीनी बघितलं तर तिचं सर्वकाही चांगलंच सुरु होतं की. तिच्या आई, बाबांच्या म्हणण्या प्रमाणे अगदी दृष्टं लागण्या सारखंच! मग तीही खंत कमी झाली. आता तर नव्याची नऊ वर्षं ही संपलीत. नावीन्य सरलं असलं कंटाळा येत असला तरी सवय मात्र झाली होती. फक्त आजच फार दिवसांनी त्याची आठवण झाली इतकंच. विचार करता करताच तिची मुलं, नवरा घरी आले. मुलांच्या अभ्यासाची चौकशी, नव-याशी रोजच्याच विषयांवर बोलणे, जेवणखाण, टी.व्ही. बघणे सगळे झाले. रोजचं रुटीन संपून गेलं होतं. नवरा ही गुड नाईट किस देऊन झोपून गेला होता. ती मात्र विचार करीत बाजूला लोटली होती. मनातल्या मनात म्हणाली कुठे आसशील रे तू? किती वाट बघितली मी तुझी! जाऊ दे जे माझे व्हायचे ते झाले. पण तुझे काय झाले असेल? पहिली गोष्टं! तू वास्तवात खरंच कुठे तरी असशील का? की फक्तं लहान पणीच्या परीकथेतच असतोस? आणि जर खरचं ह्या जगात असशील तर कुठे असशील? तुझं नाव, गाव काय असेल? आता तर तू ही आता मोठा झाला असणार ना? अगदी माणूस! तुझं लग्नं झालं असेल का रे? असेल तर तुझी बायको कशी असेल? एखाद्या परी सारखी सुंदर! की चार चौघीं सारखीच? असू दे कशीही! पण एक गोष्टं मात्र एकदम पक्की आहे हं. जर तुझं लग्न झालं असेल ना तर मी पैज लाऊन सांगू शकते की तू आता राजकुमार काही राहिला नसशील. चक्क नवरा झाला असशील! अगदी माझ्या नव-या सारखाच. त्याच्या सारखाच कशाला अगदी सगळ्या नव-यां सारखाच. तू कसा दिसत असशील? कसा वागत असशील हे अगदी बरोबर सांगू शकते मी! आणि तुझी ती! ती पण अगदी बायको होऊन गेली असेल! तुझा ही संसार अगदी माझ्या सारखाच सुरु असेल. हे असंच होतं रे! नेहमी असंच होतं! काहीही वेगळं नसतं! परीकथे सारखं थोडीच होतं प्रत्यक्षात? ती पुन्हा हसली. आता त्याचं काय म्हणा! माझं जे काही व्हायचं ते होऊन गेलंय. परीकथे सारखं सुंदर नसलं तरी ठीकच सुरु आहे माझं! तिने जांभई दिली. तुलाही शुभेच्छा पुढच्या जीवनासाठी. तिचं एक सुन्दर स्वप्न संपलं होतं. ती कड परतवून शांतपणे झोपून गेली. सहवासा मुळे निर्माण झालेल्या सहवेदना आणि संवेदना आहेत. पण ते तसं भारून टाकणारं प्रेम नाही. मला तर वेग आणि आवेग हवा होता आयुष्यात....... माझंही आयुष्य तसं काही वाईट नाही म्हणा. पण ते आहे एका तळयासारखं. शांत! ते प्रवाही असतं तर? एखाद्या झ-या सारखं! दगड धोंड्यांशी भांडून रस्ता काढणा-या आणि खळखळून हसणा-या.......... आता तिला मंगलाष्टक ऐकू येत होती. तिच्या लग्नाची नव्हे तिच्या मैत्रीणीच्या लग्नाची. आता ती स्वत:लाच बघत होती मागे उभी असलेली. खूप खूप आनंदात असलेली, कारण आता लवकरच तिचंही लग्नं होणार होतं. मात्र असं ख-या आयुष्यात कधीच का घडत नाही ? ती विचार करत होती. असं प्रेम वास्तवात खरोखर मिळतं का? की त्या फक्त माझ्या इच्छा होत्या, कल्पना होत्या, स्वप्नं होती बालपणीची रम्य स्वप्नं! पण स्वप्नांच ही काय? जशी, जशी मी मोठी होत गेली तशी माझी स्वप्नं मात्र लहान लहान होत गेली............. तिला आता इजिप्तचे पिरॅमिड, आयफेल टॉवर, लिबर्टी चा पुतळा सगळे दिसायला लागले, टीव्ही, फोटो मध्ये नाही तर प्रत्यक्षात. ती तिथे भविष्यात जाणार होती प्लॅनींग केल्या प्रमाणे. तिथे ती आताच मनानी पोहचली होती. मग तुझं स्वप्नं ही हळूहळू दूर जाऊ लागलं. तुझा शोध सुरु असला तरीही गरज मात्र कमी कमी होत गेली. प्रेमाची गरज कमी होत गेली की ते मिळण्याची अपेक्षा कमी होत गेली. खरं तर प्रेमा शिवाय अजून कशाची गरज असते माणसाला?......... आता तिला ताजमहाल दिसत होता, जिथे ती गेली होती हनिमूनच्या वेळी. पण प्रेमा शिवाय ही जगायला शिकली मी! जे माझ्या सोबत घडलं तेच मग माझ्या कडूनही घडत गेलं. प्रेम मिळाल्या शिवाय जगते आहे. आणि प्रेम केल्या शिवाय ही......... झोप लागली तरीही विचार कुठे थांबतात? अनेक तुटक तुटक विचारां सोबत ह्याही विचारांच चक्र तिच्या डोक्यात सुरूच होतं. फक्त आता त्याची तिला जाणीव नव्हती. (समाप्त)
लेखनप्रकार

याद्या 4516
प्रतिक्रिया 28

कटु आणि अपरिहार्य असे सत्य!

मी ही शोधते माझ्या स्वप्नातला राजकुमार, माझ्या नवर्या मधे. अगदि मनातलं बोललात.

कथा छान .. शेवट आवडला. निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त झुकणारा लेख वाटला. अवांतर : स्वप्नातलया राजकुमारा प्रमाणेच आपण ही कोणाच्या तरी स्वप्नातील राजकन्या असु शकतो, याच शोध जेंव्हा नायिकेच्या मनाला लागला असता, तेंव्हाच स्वप्नातला राजकुमार समोर दिसला असता असे वाटते.

In reply to by गणेशा

>>स्वप्नातलया राजकुमारा प्रमाणेच आपण ही कोणाच्या तरी स्वप्नातील राजकन्या असु शकतो, याच शोध जेंव्हा नायिकेच्या मनाला लागला असता, तेंव्हाच स्वप्नातला राजकुमार समोर दिसला असता असे वाटते. अगदी अगदी. बायकोबद्दल नवर्‍या मुलानेही अशीच काही स्वप्न रंगवलेली असतातच की !! आपण त्याला खरे उतरतोय का हा विचार मुली करतात का कधी ? नाही, करत असतील तर आनंद आहे पण बर्‍याचदा तसं दिसत नाही. नवरा नाटकाची/ सिनेमाची तिकिटं घेऊन आला की बायकोला नेमकी मोरी घासायची असते नाहीतर भांड्यांचा रगाडा उपसायचा असतो. कधी आवडीने वेणी, गजरा घेऊन यावं तर ते माळण्याइतके एकतर केस लांब नसतात, असलेच तर नेमकी त्या फुलाचीच अ‍ॅलर्जी असते एक ना अनेक. असो.

In reply to by अप्पा जोगळेकर

"स्वतःचं अस्तित्त्वात नसलेलं दु:ख कुरवाळणार्‍या मंडळींना काय बोलयचं?".. असंच काही लिहायला आलो होतो तर तुमचा प्रतिसाद दिसला.. +१अगदी अगदी

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा अगदी बरोबर बोललात. सुख बोचणारी माणसं वाढताहेत. कारण आनंद मिसिंग असतो. कोणतही दुखः किंवा त्रास नसणे म्ह़णजेच सुख का? माणुस नेमकं काय शोधत असतो. किंवा त्याला नेमकी कशाची गरज जास्त असते. त्या प्रकारच्या सुखाची की आनंदाची. वेग वेगळ्या देशातील क्रांतीकारकांनी खुप अमानुष त्रास सहन केला पण ते दुखी: होते का? कारण त्यांना देशांसाठी काही करीत असल्याचं आनंद आणी समाधान होतं. आनंद असला की दुख: ही तेव्ह्ढं बोचत नाही. आणि तो नसला की कसलं सुख अन कसलं काय?

In reply to by जयनीत

>>कोणतही दुखः किंवा त्रास नसणे म्ह़णजेच सुख का? हो. >> माणसाला नेमकी कशाची गरज जास्त असते. ध्येय निश्चित करण्याची. आणि ध्येयपूर्ती झाल्यावर नविन ध्येय निश्चित करण्याची. >>वेग वेगळ्या देशातील क्रांतीकारकांनी खुप अमानुष त्रास सहन केला पण ते दुखी: होते का? माहीत नाही. असतील कदाचित. >>आनंद असला की दुख: ही तेव्ह्ढं बोचत नाही. आणि तो नसला की कसलं सुख अन कसलं काय? म्हणजे काय ? सदर लेख, तुम्हाला पडलेले प्रश्न आणि प्रतिसादांमधे चालू असलेले शब्दांचे खेळ म्हणजे नुसत्याच कविकल्पना आणि शब्दांचे खेळ आहेत असे वाटते आहे. अस्तित्वात नसलेल्या समस्येवर काय बोलणार ? सबब येथून रजा घेतो. तुमचे कवित्व चालू द्या.

In reply to by जयनीत

@ जयनीत
कोणतही दुखः किंवा त्रास नसणे म्ह़णजेच सुख का?
नाही, म्हणजे सुख नाहि. सुखाचे रुपांतर समाधानामधेय होत नसेल तर माणुस आनंदि नसतो. माणुस आता पर्यंत दु:खाच्या उलट सुखालाच पाहत आलेला आहे, पण खरा आनंद हा समाधानामध्ये असतो. एक उदा. आपल्याकडे काही नाही तरी दुसर्याप्रती काही तरी करत राहण्यात समाधान असते. आणि आपल्याकडे ज्याची गरज वाटते ते असणे म्हणजे सुख असते. म्हणु सुख हे भौतिक तर समाधान हे माणसिक असते असे वाटते. आणि आनंद फक्त माणसिक समाधानातुन मिळतो. कधी कधी दु:ख ही सुखापेक्षा उच्च असु शकते. उदा. आपल्याकडे काही नाही, खुप कष्ट केले तरी पोटाला पुर्ण काही मिळत नाही, पण आपल्या कोणासाठी तरी आपण झटत असतो. आपल्या स्वप्नांना त्याच्या रुपाणे पंख लावत असतो.. परिस्थीचे हेच दु:ख उद्या डायरेक्ट समाधाना मध्ये बदलु शकते. असो दु:खी नसणे म्हणजे आनंदी असणे हे चुक आहे.

कल्पनाविस्तार छान आहे मात्र प्रत्यक्ष जीवनात स्वप्नातला राजकुमार राजकन्या एक फँटसीच ठरते ज्योस्त्ना देवधरांनी नकोशी या कथेत हे प्रखरपणे मांडलेय

'''सुख' टोचणारे लोक दिवसेंदिवस वाढत चालले आहे असे नुकतेच कुमार केतकर यांच्या पुस्तकात वाचले आहे त्याचा प्रत्यय आला.' + १ अप्पा, दुख: भोगायला जेवढि शक्ती लागते त्या पेक्षा खुप जास्त शक्ती सुखं पचवायला लागते हेच आज विसरत चाललेत सगळे, दखः हे लाटेसारखं असतं, धाडकन अंगावर येउन आदळतं, तुमचा तोला जाउ लागतो अन पडायला होतं, नंतर हळुच येणारं सुख परत जाणा-या लाटेसारखं असतं हळुच पायाखालची वाळु काढुन नेतं, त्यावेळी सावरणं जास्त महत्वाचं असतं.

In reply to by ५० फक्त

आप्पा आणि हर्षदराव यांनी लिहिलेली वाक्यं आवडली. सुख-दु:खाला दिलेली लाटांची उपमा मस्तच! बाकी चर्चा चालू द्या.

प्रवाही आणि नेमके शब्द ..वा छान लिहिलय ...चालु द्या..

लग्नापूर्वी (किंवा कमावता/ती होण्यापूर्वी ) आई-वडिलांच्या पैश्यांनी चाललेली खरेदी गिफ्ट म्हणा, फुले, चोकलेट, वडे, किंवा आणखी काही कळ न लागता होते आणि तेवढा वेळही असतो मग लग्नानंतर अचानक कुटुंबाची जबाबदारी उदा. किराणा, दुध, पेपर, दवाखाना, मुलांचे शिक्षण, गृहकर्ज, येणारे जाणारे नातेवाईक ह्या रगाड्यात वेणी, चोकलेट, गिफ्ट, पिक्चर, बाहेर फिरायला जाने वगैरे कुठल्या कुठे हरवते मग .....लग्नापूर्वी तू असा नव्हता किंवा अशी नव्हतीस हे शब्द भांडी चेचायला पुरेशी ठरतात. त्यापेक्षा आहे ती कतरिना किंवा आहे तो सलमान/आमीर समजा आणि चालुद्या.

In reply to by इरसाल

लग्नानंतर अचानक कुटुंबाची जबाबदारी उदा. किराणा, दुध, पेपर, दवाखाना, मुलांचे शिक्षण, गृहकर्ज, येणारे जाणारे नातेवाईक ह्या रगाड्यात वेणी, चोकलेट, गिफ्ट, पिक्चर, बाहेर फिरायला जाने वगैरे कुठल्या कुठे हरवते मग .....लग्नापूर्वी तू असा नव्हता किंवा अशी नव्हतीस हे शब्द भांडी चेचायला पुरेशी ठरतात. + १०००० सहमत आहे. "लग्नापुर्वी तु किती चांगला होतास, माझी किती काळजी घ्यायचासं पण आता तर तुला मुळी माझी फिकीरच नाही." हे आणी असले अनेक ठेवणीतले डॉयलाग नवरोबांना नेहमी ऐकायला मिळतात.

लग्न संस्था ही नरभक्षक चेटकीण असते. ती स्वप्नातले राजकुमार / राजकुमारी वगैरे खाऊन टाकते आणि त्याना नवरा अथवा बायको यात परिवर्तीत करते. शंका: लग्नानंतर नवर्‍याने रोज गुलाबाची फुले खरेदी केलेली आवडत असणारी कोणतीही अप्सरा अजून मी पाहिलेली नाहिय्ये

'' लग्नानंतर नवर्‍याने रोज गुलाबाची फुले खरेदी केलेली आवडत असणारी कोणतीही अप्सरा अजून मी पाहिलेली नाहिय्ये'' विजुभाउ, एक अपवाद, नवरा जर फुलवाला असेल तर त्याला करावंच लागेल ना हे, नाहीतर संध्याकाळी खाणार काय घरी.

तूर्तास, 'स्वप्नातल्या राजकुमारा'पेक्षा 'स्वप्नातला गागाभट्ट' ही संकल्पना (दुवा १, दुवा २) अधिक रोचक वाटत आहे.

In reply to by पंगा

तूर्तास, 'स्वप्नातल्या राजकुमारा'पेक्षा 'स्वप्नातला गागाभट्ट' ही कल्पना अधिक रोचक वाटत आहे.
तुम्ही तर फारच सिरियस झालात गडे ;)