मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ते आहेत ना

शशिकांत ओक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ते आहेत ना
मंगला ओक आपले अनुभव सांगताना – चंदननगरच्या डोळ्याच्या दवाखान्यात आई औषध घातल्याने डोळे मिटून होती, तेंव्हा मी आईला काही आठवणी सांगायला विनंती केली आणि मग आईच्या आठवणींचा खजिना उघडला. तो शब्दांकित...
ते आहेत ना येकंममरडी गावी कुलकर्णी म्हणून होते. त्यांच्या खेडेगावातील ते लहानसं देऊळ. पण फार जुनं. त्यांच्या पूर्वजांचं दोनशे-तीनशे वर्षांचं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दत्ताचं जागृत देवस्थान होतं. लहानशीच मूर्ती होती. ते दरवर्षी तेथे दत्तजन्म करत असत. तिथे मी गेले. सकाळी पूजा आणि संध्याकाळी किर्तन. सकाळी ते कुलकर्णी पूजा करत होते. पूजा करत असताना त्यांचं दोनदा बोलणं ऐकलं, ‘अरे ही अत्तराची बाटली कशी विसरली. बरे नाही झाले हे.’ ‘दत्तांना तर सुगंधाची आवड आहे. हे बरोबर नाही.’ मी समोरच बसले होते ते ऐकून मला थोडं हसू आलं. ऐवढं काय त्यात नसेल अत्तर तर. पण त्यात ऐवढं वाईट वाटण्यासारखं काय. मग पुजा वगैरे झाली. आणि मी किर्तनाला उभी राहिले. पेटी – तबला उत्तम पण कीर्तन ऐकायला कोणीही नाही. त्यांच्या घरातली माणसं, पेटी-तबला वाजवणारे. त्याचं मला बरं नाही वाटलं, किर्तन ऐकायला जर कोणीच नाही तर किर्तन कोणाला सांगणार? त्याच ठिकणी ते कुळकर्णी बसलेले होते. ते म्हणाले, ‘ते आहेत ना.’ ‘बाकीच्यांशी आपल्याला काय करायचय? कोणीही नाही आलं ऐकायला तरी चालेल. आपल्याला त्यांच्यासाठी नाही करायचं. तुम्ही सुरूवात करा.’ ते ऐकून माझ्या अंगावर एकदम असा काटा आला. ‘ ‘हो, बरोबर आहे’ असे म्हणून मी त्याठिकाणी कीर्तन केलं, छान झालं. मी अगदी रंगात कीर्तन केलं. दुसरे दिवशी घरी गेल्यावर (माझे वडील जनार्दन पंतांना आई ‘दादा’ असे संबोधते) दादांना त्याबाबत सांगितलं. तर दादा म्हणाले, ‘तुला दत्तात्रयांनी तिथे त्या गावी हे ऐकवण्यासाठीच नेलं. ते त्यांनी तुला त्या कुलकर्ण्यांच्या तोंडून ऐकवलं की, ‘ते आहेत ना’ या श्रध्देने सर्व करायचं. लोकांच्यासाठी नाही. ‘ हे तुला कळावं यासाठीच तुझं त्याठिकाणी जाणं झालेलं आहे. बरोबर आहे.’ त्यांना एखादा संदेश द्यायचा असेल तर ते अशाच माध्यमातून देतात. कोणाच्या तरी तोंडून देतात. आपली चूक सुधारून देतात.’ मी जेव्हा जेव्हा किर्तनाला जायचे तेव्हा-तेव्हा अशा भावनेनेच जायचे. उगीच आपलं कीर्तन करायचय म्हणून कधीच नाही गेले. त्याच्यात हे अनुभव आल्यामुळे विशेष वाटलं. समोर श्रोते असोत नाहीतर नसोत. आपल्याला आनंद होतोय आणि ‘समोर ते आहेत’ या भावनेनं. अनेकदा मी आपलं मनात म्हटलं, ‘श्रोते हो, मी काय किर्तन करणार. परंतु आता ईश्वरी इच्छेने मुखातून जे येईल ते आपणाला सादर करणार’ म्हणून मी ते कीर्तन करत असे. आणि ते फार छान होई.. मला त्यातून फार आनंद मिळे. असे अनेक अनुभव आपल्याला दिले जातात. आपल्या चुका सुधारण्यासाठी कुणाच्यातरी तोंडून, कोणाच्यातरी माध्यमातून आपल्याला तो संदेश दिला जातो, दुसरं काही नाही.

वाचने 2848 वाचनखूण प्रतिक्रिया 12

प्रकाश घाटपांडे 02/07/2011 - 18:38
छान आहे आईची आठवण.स्वांतसुखायचे समाधान वेगळेच असते. तिथे श्रद्धा / अश्रद्धा हा भाग येत नाही. बाकी आपली आई किर्तन करीत असे म्हणजे आठवणींचा खजाना आपल्याकडे असणार.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/07/2011 - 18:44
छान आठवण........! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रकाश घाटपांडे

श्रावण मोडक 02/07/2011 - 19:15
सहमत. गावाचे नाव यमकनमर्डी असे आहे का? जिल्हा बेळगाव.

In reply to by श्रावण मोडक

शशिकांत ओक 02/07/2011 - 20:18
मित्रा, बोलीभाषेतील तो उच्चार.

In reply to by शशिकांत ओक

श्रावण मोडक 02/07/2011 - 20:58
हो. मी फक्त खातरजमा केली. :)

स्पा 02/07/2011 - 20:37
ओक साहेब त्या नाड्यांची रंगपंचमी सोडा आणि.. असे स्वच्छ काळ्या अक्षरातील असे छान अनुभव येउंद्यात ;)

तुझ्याच शोधात.... 03/07/2011 - 18:21
असे अनुभव येतात पण ते लक्षात यायला त्यांच्या पाशी श्रद्धा हवी.. नी ज्यांच्या कडे ती नाही त्यांना ह्सु येणारच..

शशिकांत ओक 03/07/2011 - 18:34
मित्रा, अनुभव येतात पण ते लक्षात यायला त्यांच्या पाशी श्रद्धा हवी खरे आहे.

रणजित चितळे 04/07/2011 - 14:09
फार छान अनुभव सांगितलात अजून सांगा ना. असे अनुभव येतात पण ते लक्षात यायला त्यांच्या पाशी श्रद्धा हवी.. नी ज्यांच्या कडे ती नाही त्यांना ह्सु येणारच.. खरे आहे.

शशिकांत ओक 04/07/2011 - 14:19
प्रिय रणजीत जी, आपली फरमाईश कळली. जरूर प्रयत्न करेन. कधी कधी मूड आला की अशा गोष्टी आठवतात. मग शब्द जुळायला लागले की मग गती येते.
मित्रांनो, काल आईला तिच्या कथनाचा लेख प्रिंट काढून वाचायला दिला. मिपावरील तात्काळ प्रतिसादांचे आश्चर्य तिला वाटले. म्हणाली, 'अगोबाई, दोन दिवसात इतक्या लोकांपर्यंत पोहोचला?' मिपाकरांना आई तर्फे धन्यवाद.