मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'गोल्डमॅन' आ. रमेश वांजळे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

यकु · · काथ्याकूट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासल्याचे आमदार आणि 'गोल्डमॅन' म्हणून राज्यभरात सुपरिचित असलेले रमेश वांजळे यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी हर्षदा, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. गेल्या तीन दिवसांपासून वांजळे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता. त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्याही करण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी कमला नेहरू उद्यान परिसरातील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांची 'एमआरआय' चाचणी करण्यात आली. ही चाचणी करण्यापूर्वी वांजळे यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे, तेथील डॉक्टरांनी ही चाचणी उद्या करण्याचा सल्ला त्यांना दिला. मात्र, त्यांनी ही चाचणी तातडीने करण्याची आग्रही विनंती केली. ही चाचणी सुरू असतानाच, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. [बातमी: मटा] रमेश वांजळे यांना विनम्र श्रध्दांजली!
11 Jun 2011
एवढा पहाडा सारखा माणूस, पण ह्रदयविकाराच्या झटक्याने गेला राव! खरच हा झटका एवढा भयानक असतो? पार विकेट घेणारा?

वाचने 8457 वाचनखूण प्रतिक्रिया 27

हुप्प्या Sat, 06/11/2011 - 00:54
वांजळ्यांबद्दल फार माहित नाही. अबू आझमीसमोर त्यांनी मनसेचा आवाज उठवला एवढेच माहित आहे आणि ते चांगलेच केले. माझी त्यांना श्रद्धांजली. मनसेने एक अनुयायी गमावला. या निमित्ताने एक सांगावेसे वाटते की, हृदयविकार हा एक अत्यंत घातक रोग आहे. भारतीय लोकांत, त्यातही पुरुष मंडळीत ह्य रोगाचे प्रमाण वाढते आहे. त्यावर रामबाण औषध निघेल तेव्हा निघेल पण तोवर व्यायाम, संतुलित आहार, वजनात नियंत्रण हे सगळे असणे आवश्यक आहे. हा रोग माणसाला ठार मारू शकतो, लुळेपांगळे करु शकतो. त्याचा पहिला हल्ला व्ह्यायच्या आधीच आपण योग्य ती खबरदारी घ्यावी हे उत्तम. सुटलेले पोट हे समृद्धीचे लक्षण न मानता ह्या रोगाचा चंचूप्रवेश मानावा आणि त्याविरुद्ध लढावे.

In reply to by हुप्प्या

विकास Sat, 06/11/2011 - 01:30
वांजळ्यांबद्दल फार माहित नाही. अधिक माहिती आणि कार्य (लोकसेवा) कोणी सांगू शकले तर बरे होईल... सुटलेले पोट हे समृद्धीचे लक्षण न मानता ह्या रोगाचा चंचूप्रवेश मानावा आणि त्याविरुद्ध लढावे. अगदी खरे आहे. त्याच बरोबर मटामधली बातमी वाचताना लक्षात आले:
  1. पाऊस आणि रस्त्यावरील गर्दीमुळे त्यांना रुग्णालयात नेण्यास विलंब झाला... कोणी किती मोठा (व्हिआयपी) असो अथवा श्रीमंत. रस्त्याच्या मर्यादा सर्वांनाच सारख्या. किमान त्याचा विचार करत अनेक सुधारणा होणे हे महत्वाचे आहे. एक आमदार गेला म्हणून हे पेपरात आले असे किती सामान्य बळी पडत असतील?
  2. त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला होता पण बातमी पसरताना त्यांच्यावर अ‍ॅटॅ़क झाला म्हणून पसरली. नशीब त्याचे परीवर्तन दंगलीत अथव रुग्णालयाच्या नासधुसीत झाले नाही. पण अशावेळेस त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आणि नातेवाईकांची जबाबदारी असते असे वाटते की स्पष्टपणे जे काही झाले ते जाहीर करून उद्रेक होण्याचे संकट टाळण्यासाठी मदत करावी.

In reply to by विकास

आनंद Sat, 06/11/2011 - 11:15
वाईट झालं... तसेच बातमी वाचताना लक्षात येत की बहुदा ते जोशी हॉस्पीटल मधेच गेले असावते. पण समर्थकांची काय प्रतिक्रीया होइल याची चिंता वाटल्या मुळे तस न सांगता जहांगीर मध्ये घेवुन जायला सांगीतल असाव.

गोगोल Sat, 06/11/2011 - 03:06
वाईट झालं... डिसक्लेमरः आमच सोन्याचं मोठं दुकान आहे.

कुसुमिता१२३ Sat, 06/11/2011 - 11:03
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.. माणूस खरोखर चांगला होता..कामाला वाघ होता..सिंहगड परीसरात खुप सुधारणा केल्या होत्या त्यांनी.. स्वत: संपूर्ण मतदारसंघात फिरुन ते आमच्या अडचणी जाणून घेत असत. ज्यांच्याकडे मतदार अपेक्षेने पाहतो अशा काही मोजक्या लोकनेत्यांपैकी ते एक होते..देव चांगल्या नेत्यांनाच लवकर का नेतो?

दत्ता काळे Sat, 06/11/2011 - 11:18
वांजळेंसारखा मनसेचा चांगला लढवय्या गेला हे फार वाईट झालं. माझी त्यांना श्रद्धांजली.

प्रसन्न केसकर Sat, 06/11/2011 - 11:25
रमेश वांजळे यांच्या मतदारसंघातला मी मतदार. एकाच परिसरात आम्ही जन्मलो वाढलो त्यामुळे अनेक वर्षे त्यांना ओळखतो. सच्चा माणुस, हजारो लोकांचा मनमिळाऊ सुहृद, संतसाहित्याचा गाढा अभ्यास असलेली आणि भजन, किर्तन निरुपणात रमणारी मृदुस्वभावी व्यक्ती, प्रामाणिक आणि तळमळीचा कार्यकर्ता, बुद्धीवान आणि झुंजार राजकारणी, व्यायामाची आवड असलेला पहिलवान, अशी त्यांची अनेक रुपे वेळोवेळी पाहिली. त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते हवेली तालुक्यातले एक सर्वाधिक लोकप्रिय सरपंच होते. घरची तशी सुबत्ता असतानाही स्वतःची प्रगती स्वतः करावी म्हणुन नोकरी करत असताना त्यांचा संबंध मुळशीचे माजी खासदार आणि माजी मंत्री कै. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याशी आला आणि ते राजकारणात सक्रिय झाले. मोरेंना ते गुरुस्थानी मानत. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणुन ते काम करत असताना त्यांना जवळुन पाहिले. आपल्या मतदारांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात म्हणुन संबंधित नेते, अधिकारी इत्यादींबरोबर ते चिकाटीने पाठपुरावा करत असल्याने ते नेहमीच नजरेत भरत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीला ते उभे राहिले अन संपुर्ण खडकवासला मतदारसंघ ढवळुन काढला. बड्या बड्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या विरोधात प्रचारसभा घेतल्या. ते अंगावर दीड किलो सोने घालत याचे भांडवल करण्याचाही प्रयत्न झाला. पण वांजळे त्यांच्या विजयाबाबत कायम निश्चिंत होते. ते म्हणत इतर राजकारणी पैसे खाऊन स्विस बँकेत ठेवतात पण माझ्याकडे एवढी वैध कमाई आहे की मला भ्रष्टाचार करण्याची गरज नाही हे लोकांना कळावे म्हणुन मी उघड सोने घालतो. ते घेण्याची आणि सांभाळण्याची माझ्यात शक्ती आहे. सहसा निवडणुका संपल्यावर राजकारण्यांचे दर्शन दुर्लभ होते पण या नियमाला वांजळे अपवाद होते. आमदार म्हणुन निवडुन आल्यावर देखील ते मतदारांना सतत उपलब्ध होते. एवढेच नव्हे तर लोकांनी प्रश्न घेऊन आपल्याकडे येण्याची वाट न पहाते ते स्वतःच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत. गेल्या दोन वर्षात त्यांनी मतदार संघात गल्ली पातळीवर जाऊन नागरिकांबरोबर शेकडो बैठका घेतल्या. या बैठकांच्या माध्यमातुन लोकांचे प्रश्न समजावुन घेऊन ते तडीला लावण्याचे प्रयत्न केले. सर्वच पक्षाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी राखलेले संबंध यात उपयोगी पडले. अगदी काल परवाच त्यांनी सर्व पक्षांना बरोबर घेऊन हायवेवरील मनमानी टोल वसुलीविरोधात आंदोलन केले होते. वांजळे यांचा लोकसंपर्क सतत अबाधित राहण्याचे अजुन एक कारण म्हणजे त्यांच्यामार्फत सातत्याने होत असलेले विविध यात्रांचे आयोजन. त्यांनी आयोजित केलेल्या काशी, अजमेर, नागपूरची दीक्षाभुमी आदि यात्रांचा फायदा लाखो लोकांनी घेतला. अश्या नेत्यावर मतदारांनी, कार्यकर्त्यांनी जीव टाकला नाही तरच आश्चर्य. अबु आझमी शपथविधी प्रकरणानंतर त्यांना सदनातुन निलंबित केले तेव्हा म्हणुनच लोकांकडुन स्वयंस्फुर्त प्रतिक्रिया उमटली. त्यांचे निलंबन रद्द ह्वावे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले. काल देखील वांजळेंच्या अस्वास्थ्याबाबत कळतात मोठा जनसमुदाय रुग्णालयाकडे धावला. त्यांच्या निधनाने शोकाकुल नागरिकांनी मतदारसंघात आज स्वयंस्फुर्तीने संपुर्ण बंद पाळलेला आहे. वांजळे यांना चिरशांती लाभो हीच माझी प्रार्थना.

In reply to by प्रसन्न केसकर

अप्पा जोगळेकर Mon, 06/13/2011 - 20:22
सविस्तर प्रतिसादाबद्दक धन्यवाद. त्यांच्याबद्दल खूप काही ऐकले होते पण इतकी तपशीलवार माहिती आजच कळली. चांगला माणूस अकाली गेला. वाईट वाटले.

विसुनाना Sat, 06/11/2011 - 12:08
प्रसन्न केसकर आणि त्यांच्यासारख्या खडकवासला मतदारसंघातील इतर व्यक्तींकडून समजल्याप्रमाणे रमेश वांजळे हे खरोखरीच 'चांगले' आमदार होते. वयाच्या ४४व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन व्हावे हे दु:खद आहे. अवांतर - हे लक्षात आले : फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी आणि टक्कल. यात कुणाला दुखावण्याचा हेतू नही.

पाषाणभेद Sat, 06/11/2011 - 12:20
पुण्यात फिरतांना एक रिक्षावाला दोस्त झाला. बोलतांना कळाले की तो आमदारांच्याच मतदारसंघातला आहे म्हणून. मी तर मनसेचा म्हणून मग आमची चांगलीच दोस्ती झाली. त्याने त्याच्या एकदोन मित्रांशी ओळख करून दिली. मलाही वेळ होताच. त्याने आमदार रमेश वांजळेंच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यांचा मनमिळावू स्वभाव, तात्काळ निर्णय घेण्याची वृत्ती, एकीचे समाजकारण आदी गोष्टींबाबत त्याने सांगितले. त्यांच्या जाण्याने मनसेने एक चांगला शिलेदार गमावला आहे. खडकवासला मतदारसंघातल्या जनसामान्यांना त्यांची उणीव नेहमी भासेल. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. जय महाराष्ट्र!

मनिमौ Sat, 06/11/2011 - 23:45
सकालि हि बातमी वाचली आनि आतिशय धक्का बसला धायरी गावात राहात असताना त्यान्च्या विशयि लोकाना केव्ह्दा आदर व प्रेम पाहिले. देव त्यन्च्या आत्मल्या शान्ति देवो

योगप्रभू Sun, 06/12/2011 - 08:58
भाऊंचे आकस्मिक निधन झाल्याचे समजताच सर्व राज्यातून लोक धावले. या अलोट जनसमुदायामुळे सिंहगड रस्ता ते वैकुंठ परिसरातील वाहतूक थांबली होती. खरा लोकनेता काय असतो, हे यातून दिसले. वाईट याचेच वाटले, की त्यांचे ४५ वय जाण्याचे नव्हते. आता कुठे त्यांची राजकीय कारकीर्द खर्‍या अर्थाने बहरु लागली होती. त्यापूर्वीच देवाने त्यांना बोलावून घेतले. पूर्ण निर्व्यसनी आणि सतत सक्रिय अशा भाऊंना कमी वयात ह्र्दयविकाराचा धक्का का यावा? त्यांना अंतःकरणापासून आदरांजली..

धमाल मुलगा Mon, 06/13/2011 - 16:21
फार मोठा माणूस गेला राव. ह्या वाघामध्ये एव्हढी ताकद होती की निवडणूकीला अपक्ष जरी उभा राहिला असता तरी जिंकलाच असता. खडकवासला विभागात फिरलं की लक्षात येतं, रमेशभाऊंनी किती माणसं जोडली होती, कशा प्रकारे कामांसाठी नेट लावला होता..न होणारी कामं चुकारांकडून करुन घेऊन रहिवासी लोकांचे दुवे घेतले होते. अंत्ययात्रेच्या वेळी वैकुंठात उसलेली गर्दी पाहिली अन कळलं, ह्या मनुष्याची ही दौलत किती मोठी होती ते. खरोखर वाईट घटना.

In reply to by धमाल मुलगा

मी-सौरभ Tue, 06/14/2011 - 19:35
लोक ज्याच्याबद्दल चांगल बोल्तात अशा फार कमी राजकारण्यांपैकी एक माणूस आपण गमावला :(