Skip to main content

तुम्ही बी घडाना ....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 22/04/2011 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूरशी एक घट्ट छान भावनिक नातं आहे. मामाच्या गावाशी असावं तसंच. त्यामुळे पुढे आयुष्यभर वेळोवेळी चघळाव्या अशा लहानपणीच्या अनेक आठवणींचे भले मोठे गाठोडे आहे. एकटे असताना प्रवासात, तासंतास मित्राची, कस्टमरची वाट बघताना किंवा नुसतेच रिकामे असताना जवळ असणा-या समृद्ध अडगळीतुन कधीतरी असे एखादे गाठोडे अचानक बाहेर येतं. मग गाठोड्यातल्या एकएक आठवणींशी गप्पा मारायला, आता थोड्या वेगळ्या संदर्भातून बघायला धमाल येते. कोल्हापुरच्या महलक्ष्मी मंदिराच्या म्हंजे अंबाबाईच्या देवळातल्या आठवणींचाच एक भला मोठा संच आहे. आई नवरIत्रातल्या त्या तोबा गर्दीत खास निपाणीहुन अंबाबाईच्या दर्शनाला न्यायची, खुप लहान असताना - पहिली दुसरीमध्ये होतो तेव्हापासुन साठवलेला संच. त्यानंतर मोठेपणी स्वतंत्रपणे फिरायला लागल्यावर मंदिर परिसरातून फेरफटका मारतानाचे किस्से सुद्धा. पण गेल्या आठवड्यात IBN लोकमत बघताना जरा नाराज झालो. अचानक त्या आठवणींच्या संचाला तडाच गेला. आवडत्या गॉगलच्या काचेवर चरा उमटावा तसा. बातमी होती अंबाबाईच्या गाभा-यात महिलांना प्रवेश नाही या संदर्भातली. महिलांना प्रवेश नाही हे विचित्रच आहे. एक पुजारी सांगत होते, कॅमे-या समोर, की पावित्र्य टिकवण्यासाठी म्हणे सुरुवातीपासूनच महिलांना ही बंदी आहे. अशीच प्रथा आहे..! मला जरा हे असलं पावित्र्य घृणास्पद वाटतं. हे पावित्र्य ठरवणार कोण? ते पावित्र्य म्हणजे काय ? ते कसं दिसतं ? आणि पुरुषांनी प्रवेश केला तर ते गाभा-यातलं पावित्र्य डिस्टर्ब नाही होत! आणि प्रवेश करणा-या त्या वैयक्तिक पुरुषाचे पावित्र्य कोण तपासतं? ते self certified असतात का? जन्माने पुरुष आहेत म्हणुन? बरं पुरुष म्हणुन जन्माला येण्यामध्ये त्यांचे कतृत्व ते काय ? अशी काय एखादी परिक्षा वगैरे असते असे त्यांना वाटते काय? म्हणजे अमुक अमुक एवढे मार्क्स पडले की पुरुष म्हणुन जन्म मिळणार आणि बाकी सगळ्या स्त्रिया ...? अरे देऊळ अंबाबाईचं. म्हंजे मातेचं. म्हंजे स्त्रीचं. आणि तिच्या 'जवळपास' फिरकायला स्त्रियांना बंदी..? कारण मातेचा “जवळपास” अपवित्र होतो ...? जोकच आहे ना ? अगदी क्रूर जोक. या लोकांना भेदाचा अर्थ तरी कळतो का ? मनुष्यप्राण्यांमध्ये आई होण्याचे नैसर्गिक वेगळेपण असणारी व्यक्ती महिला असते. असा साधा सोपा अर्थ भेद समजुन घ्यायला यांना पुरेसा नाई का ? मी खरेतर गेल्या विधानात 'वेगळेपण' या शब्दाऐवजी आई होण्याचे 'सामर्थ्य' असा शब्द प्रयोग करायला हवा होता. बरं हे फक्त जन्माने निसर्गत: बाणलेलं वा मिळालेलं qualification च फक्त त्यांचे ठायी असते असे ही नाही ना. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची प्रमुख होण्याचे, त्या राष्ट्रातल्या लोकनिर्वाचित सत्ताधारी राजकीय पक्षाची प्रमुख आणि अंकुश असण्याचे, पुरुषांशी स्पर्धा करून ( अजितदादा पवार ज्याला टगेगिरी म्हणतात ) तशी कायदेशीर स्पर्धा करून निवडून येऊन एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे, अनेक उद्योग साम्राज्याची प्रमुख असण्याचे, उत्तम गाइका असण्याचे, उत्तम डॉक्टर असण्याचे वगैरे वगैरे कित्येक ठिकाणी सामर्थ्य दिसते आहे ना? मग कमतरता कुठे आहे? मग "तुम्ही आत या" आणि "तुम्ही जरा बाजूला थांबा" असा भेदभाव कशासाठी ? आणि तेही एकविसाव्या शतकात ? गरज आहे ते धार्मिक नियम बदलण्याची. प्रवेश दिला नाही म्हणुन कोण्यास्त्रीचा विकास थांबला नसेल वा काही अडलं नसेल. पण विषमतेची कीड शेवटपर्यंत नष्ट व्हायला नको का ? अशी अंशत: कीड देखील असणं हे या समाजाच्या सुदृढतेला बाधक आहे. कदाचित एखाद्या महिलेला तिच्या बाबांबरोबर, नव-या बरोबर, भावाबरोबर मंदिरात गेल्यावर त्यांच्या सारखेच, जरा आतमध्ये गाभा-यात जाता आलं असतं तर किती मज्जा आली असती नाई ? असं वाटणं आणि केवळ बाई आहे म्हणुन तिनं मनाला दडपण हे भीषण आणि क्रूर आहे. व्यक्तीस्वातंत्र्य एकदा मान्य केल्यावर धार्मिक स्वातंत्र्यही अंगीकारल्यावर जन्माने बाणलेल्या गुणधर्मावर आधारित भेदभाव कशाला? थोड्या अधिक अभ्यासांती मला कळले की अंबाबाईच्या देवळातील महिलांना प्रवेश मिळण्यासंदर्भात महाराष्ट्रातल्या काही समाजसेवकांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखला केली आहे - दहा वर्षांपूर्वी. म्हणजे एका बाजूला आम्ही एकविसाव्या शतकात प्रवेश करण्याचे सनई चौघडे वाजवत होतो आणि दुस-या बाजूला महाराष्ट्रासारख्या प्रगत (?) राज्यामध्ये इथल्या महिला समानते साठी टाहो फोडत होत्या. कोर्टाने पुजा-यांना स्पष्टीकरण विचारल्यावर त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र लिहुन दिलं. बायकांना धार्मिक पावित्र्य टिकविण्यासाठी गाभा-यात प्रवेश देता येणार नाही. मंदिराच्या पुरुष विश्वस्तांनीपण याचीच री ओढली. पण महिला विश्वस्तांनी विरोध केला. दुर्दैव आहे. या समाजाचं दुर्दैव आहे. गेल्या आठवड्यात काही राजकीय पक्षानी दडपशाहीने ही बंदी झुगारली आणि महिलांनी प्रवेश केला. पण पुजा-यांनी ते प्रतिज्ञापत्र आजही मागे घेतले नाही. याचा अर्थ तत्वत: अजुनी मान्यता नाही. स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळे नियम लावणारी आणखी एक संस्कृती आहे जी आता आपण सर्वांच्या परिचयाची आहे. तालिबान्यांची. मानसिकता मला सारखीच वाटते. या मानसिकतेचे विश्लेषण करण्याचे मी प्रयत्न करतो तेव्हा मला फक्त एकच उत्तर सापडते ते म्हणजे अरेरवी! हा Arrogance च आहे. Arrogance of Inferiority !!!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1785
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

हल्ली तो प्रकार वर आला म्हणून ! नाहीतर एरवी त्यावर लिखाण केले असते काय ?

या वर मिहि लेख लिहीला आहे काही प्रतीक्रिया तर अशा होत्या कि इथे अंबाबाईच्या गाभा-यात महिलांना प्रवेश नाही हेच मुळि त्यांना माहित न्हवतं ( म्हणजे सगळं कसं बिनबोभाट चालु आहे नाही..) आणी काहींनी याचं समर्थनही केलं आहे यालाच काही जण हीच आपली संस्क्रुती आहे असं म्हणतात.( वा वा धन्य आहे.) काहींना मुद्दे खोडता आले नाही तर उगा करायचा ( त्यांची संस्क्रुती) म्हणुन विरोध केला आहे (अपेक्षे प्रमाणे) देवाच पवित्र म्हणजे नक्की काय ? ते कसा मोजतात त्याच युनिट काय आहे? कुणी सांगु शकेल काय? पुर्वी दलितांना प्रवेश नसायचा काही काळ मराठ्यांना ही तो नाकारला गेला होता कारण एकच देवाच पावित्र्य नष्ट होतं आता वरील दोघांना प्रवेश आहे मग त्या पावित्र्याच काय झालं??? कुणि सांगेल का?? मुळात भेद देवाने नसुन मानवाने केले आहेत..( आणी करणारे कोण? हे सांगने नलगे;-)) या मानसिकतेचे विश्लेषण करण्याचे मी प्रयत्न करतो तेव्हा मला फक्त एकच उत्तर सापडते ते म्हणजे अरेरवी! हा Arrogance च आहे. Arrogance of Inferiority !!!!! +१०० अगदी सहमत आणी धन्यवाद धागा काढल्या बद्दल..!!!१!!