मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सरकार राज .. वैताग सिनेमा !

लिखाळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार ! काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला. अहो, तो चित्रपट पाहून इतका वैताग आला आहे, की जरा मित्रमंडळींसमोर बडबड करुन मन हालके करावे या हेतूने इथे लिहित आहे. ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून.. निव्वळ बडबड आहे. सत्या, कंपनी, सरकार अश्या चित्रपटांत लहान तुटक वाक्यांचे संवाद, सर्वांचे मख्ख चेहरे, काळसर पिवळसर रंगातले चित्रीकरण (माझ्याकडची प्रिंट खराब असल्याने मला रंग असे दिसले असतील बहुधा !), नजरेतून जास्तीतजास्त बोलणे..कोणी नुसते डोळ्यात डोळे घालून पाहिले की 'कोणाला तरी मारावे' असा संदेश- आदेश त्यातून देणे..इत्यादी सर्व गोष्टींचा अतिवापर या चित्रपटात केला आहे असे मला वाटले. अमिताभचा आवाज एकेकाळे लैभारी होता..कबूल आहे..पण या चित्रपटात तो काय बोलतो ते ऐकायला मला प्रत्येकवेळी एक्-एक वाक्य दोनवेळा एकायला लागले.. अमिताभच्या संवादांच्या वेळी खाली सबटायटल्स टाकावित असे वाटू लागले. कॅमेरा एका दोरीला टांगून तो सोडून दिला.. आणि त्याच्या आंदोलनांमध्ये जे दृष्य टिपले गेले आणि बरे वाटले ते सर्व जोडले आणि एक एक प्रसंग तयार झाला असे अनेकदा मला वाटले. कॅमेरा, त्याचे झूम आणि इतर रचना इतक्या बदलत वापरल्यासारख्या दिसत होत्या की डोळ्यांची वाट लागेल असेच वाटत होते. खुर्चीखालून, टिपॉयच्या काचेखालून.. कुठून कुठून शूटिंग... आणि त्यात अनेक दृष्यांत प्रकाशाचा मोठा तीव्र स्रोत अभिनेत्याच्या चेहर्‍याच्या मागे ठेवून मधून मधून आपले डोळे दिपवणे. इतका खर्च करुन सिनेमा बनवला.. चार दोन प्रखर दिवे त्या सरकारच्या घरात बसवले असते तर किती बरे झाले असते. 'सरकार' चित्रपटात एक मुख्यमंत्री मोठा कट करुन सरकारच्या गोटातील अनेक माणसे फोडतो. 'सरकार'ला गोळ्या घालतो, त्याला तुरुंगात बसवतो, त्याच्यावर तेथे हल्ला करवतो, त्याच्या मुलाला, आणि आतल्या गोटातल्या लोकांना ठार मारण्यापर्यंत वेळ येते..पण मुलगा (अभिषेक)वाचतो.., एका मुला फितवतो आणि घरात हल्ल्याचा डाव होतो..त्यात तो मुलगा मात्र मारला जातो... बापरे.. येवढा मोठा पावरबाज 'सरकार' आणि पहिल्या चित्रपटात इतकी धुळधाण. आता या नव्या 'सरकार राज' या चित्रपटात तर एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..त्यात सरकारची सून (गर्भवती असताना) घरच्या गाडीत बाँबफुटून मरते.. वीस वर्षे जवळ असलेला इमानी सेवक फुटतो, मुलगा मरतो... बापरे.. या सिनेमात तर पूर्णच धुळधाण... असे असताना मला तर तो अमिताभ दयनीय दिसू लागला.. तो पावरबाज आहे अशी पाटी लावावी..तरच आम्हाला तसे वाटेल. आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!! तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ??? -- (वैतागलेला) लिखाळ.

वाचने 10175 वाचनखूण प्रतिक्रिया 30

एकूण प्रसंग पाहता कट व्यसस्थित शिजल्यासारखा वाटला. आपल्या नातवाला नेता बनविण्यासाठीचा डाव कुटील राजकारण्याच्या मुरब्बी ढोंगीपणाची साक्ष देतो. एकूणच राजकारण्याचे कुटील कारस्थान म्हणजे सरकार राज म्हणता येईल. त्यात तरुण रक्ताच्या शंकर ने फसणे आणि राजकारणाचा अनुभव नसल्याने कटाचा बळी पडणे देखील. २० वर्षाच्या इमानी सेवकाचे फुटणे गैर वाटत नाही आजूबाजूची परीस्थिती पाहीली तर. फक्त व्होराने रावसाहेबाच्या तालावर नाचणे खटकले. पुण्याचे पेशवे

प्रियाली 17/06/2008 - 22:21
(|:
काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला.
मी पण इंडियाना जोन्स अँड द किंगडम ऑफ द क्रिस्टल स्कल नवा चित्रपट आहे म्हणूनच पाहिला. ~X(
सत्या, कंपनी, सरकार अश्या चित्रपटांत लहान तुटक वाक्यांचे संवाद, सर्वांचे मख्ख चेहरे, काळसर पिवळसर रंगातले चित्रीकरण
आर यू शुअर की तू सरकारराज पाहिलास? मला वाटलं की रामू झोंबींवर चित्रपट काढत असावा. तशी त्याला या विषयात बरी गती आहे, असं त्याचं त्यालाच वाटतं. >:)
पण या चित्रपटात तो काय बोलतो ते ऐकायला मला प्रत्येकवेळी एक्-एक वाक्य दोनवेळा एकायला लागले.. अमिताभच्या संवादांच्या वेळी खाली सबटायटल्स टाकावित असे वाटू लागले.
कशाला कशाला एवढे कष्ट एका टुकार चित्रपटासाठी. त्यापेक्षा एकदा डायलॉग ऐकला की पटकन कान बंद करायचे, दुसर्‍यांदाचा डायलॉग ऐकू जाणार नाही. #o
इतका खर्च करुन सिनेमा बनवला.. चार दोन प्रखर दिवे त्या सरकारच्या घरात बसवले असते तर किती बरे झाले असते.
जाऊ दे रे! इतक्या खर्चात इलेक्ट्रिसिटीचा अधिक खर्च रामूला परवडला नसेल रे! तसेही झोंबी असतील तर त्यांना प्रकाश कशाला हवा?
कॅमेरा एका दोरीला टांगून तो सोडून दिला.. आणि त्याच्या आंदोलनांमध्ये जे दृष्य टिपले गेले आणि बरे वाटले ते सर्व जोडले आणि एक एक प्रसंग तयार झाला असे अनेकदा मला वाटले.
आणि मला वाचून वाटलं की तात्यांनी ग्लेनफिडिचची बाटली क्यमेरामनला भेट दिली का काय?
'सरकार' चित्रपटात एक मुख्यमंत्री मोठा कट करुन सरकारच्या गोटातील अनेक माणसे फोडतो.
बघा आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पोराला एखाद्या बिग ब्यानरचा चित्रपटही मिळवून देता येत नाही. शेळपट कुठले!
आता या नव्या 'सरकार राज' या चित्रपटात तर एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..
अरेरे! असे समाजसुधारक गल्ली गल्लीत तयार व्हायला हवेत.
आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
म्हणजे भविष्यात सरकारिण-मदर सदृश नावाचा चित्रपट येणार तर! हाल आहेत प्रेक्षकांचे
तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ???
येडा समझ के रखा है क्या! ;)
ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून.. निव्वळ बडबड आहे.
म्हणून तर मीही हात धुवून घेतले. ह. घे

सरकार राज अशा नावाचा शिनूमा आलाय आणि त्यात बच्चन खानदानाने एकत्रित काम केलं आहे म्हटल्यावरच माझा पाहण्याचा उत्साह जेमतेम झाला. पण मोठ्या साहेबांसाठी पहायचा सिनेमा असं वाटतं होतं ..आता हे वाचल्यावर बेत क्यानसल.. स्वाती

कोलबेर 17/06/2008 - 13:34
मी पाहिला. कणेकर ष्टाईलीत ह्याचे परिक्षण करायचे असेल तर, 'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' असे वाटले.

In reply to by कोलबेर

मुक्तसुनीत 17/06/2008 - 20:57
'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' कोल्बेर : "साला अपुन ने एक मारा , लेकिन सॉलीड मारा कि नही !" =))

In reply to by कोलबेर

लिखाळ 19/06/2008 - 02:26
'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' असे वाटले. हा हा हा.. हे लै भारी... --लिखाळ.

>> तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ??? मी स्वतः दोन्ही सिनेमा पाहिलेत आणि मनापासून आवडले ! पसंद अपनी अपनी .. खयाल अपना अपना ! (ह्यात कुठलाही उपहास अभिप्रेत नाही) ------------ माझ्या मते रामूने गेल्या काही वर्षांत जे चित्रपट काढले त्यापैकी ह्या दोन्ही सिनेमांत त्याने दिग्दर्शक म्हणून खूपच चांगलं काम केलंय. अमिताभचा शब्द नि शब्द स्पष्ट ऐकू आला (निदान मला तरी) आणि त्याहीपेक्षा महत्वाची म्हणजे त्याच्या डोळ्यांतली इन्टेन्सिटी. ती इन्टेन्सिटी अजून कोणीही दाखवू शकत नाही आणि रामूने ती व्यवस्थित वापरलीय. उदाहरणं देत बसल्यास वेगळा लेख होईल. हिचकॉक म्हणायचा की चित्रपटात संवाद हे बाकीच्या संगीताप्रमाणेच यावेत. अभिनेत्याने बोलावं ते नजरेने ! ------------ लिखाळ -- एक सूचना, कृपया राग मानून घेऊ नये. आपण जेव्हा चित्रपट, नाटक, पुस्तक अशा कोणत्याही कलाकृतीबद्दल लिहितो ज्यामधे थोडाफार का होईना पट 'सस्पेंस एलिमेंट' असतो; तेव्हा हे भान ठेवावं की आपण तो सस्पेन्स सांगून तर टाकत नाहीये ना? अर्थात 'लोकसत्ता'सारख्या दैनिकात सुद्धा एका लेखात 'सरकार राज्'चा सस्पेन्स सांगून टाकलाय. (हॅरी पॉटरचे शेवटचं पुस्तक आले तेव्हा झी टीव्हीने बातम्यांत जाहीर करून टाकले होते की शेवट काय होतो !!!) एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांना 'शोले', 'गॉडफादर,' सिंहासन' इ. क्लासिक्स आवडले नाहीत. ------------

In reply to by संदीप चित्रे

मुक्तसुनीत 17/06/2008 - 21:02
चित्रे यांच्याशी प्रस्तुत चित्रपट आवडण्याबद्दल सहमत होता येणार नाही असे चित्रपटाचा रिपोर्ट वाचून/प्रोमोज पाहून वाटते आहे ; पण त्यानी मांडलेला "स्पॉईलर अलर्ट" चा मुद्दा बिनतोड आहे. लिखाळ आणि तुम्हीआम्ही सर्वानी हे ध्यानात ठेवायला हवे.

In reply to by मुक्तसुनीत

मलासुद्धा सरकार १ मधले डायलॉग ऐकूच आले नाहीत आणि मी जाम वैतागलो होतो... ( माझी प्रिंट खराब होती) ...स.रा. पाहायची हिंमत नाही केली... आणि तेच ते कॅमेरा अँगल, वाकडे तिकडे , थंड नजरेने खून पाडणारे गावठी गॉडफादर... आणि रामूची तीच ती दाढीवाली, कळकट एक्स्ट्रा गुंड माणसे मागे उभी... आणि तेच ते दक्षिणी पद्धतीने हेल काढत बोलणारे व्हिलन... रामू आणि सत्या + कंपनी च्या त्याच त्याच अंडरवल्डी कॉप्या पाहणे (पायरेटेडसुद्धा नाही / फुकटही नाही) टोटल बंद... _________________________________ मात्र "स्पॉईलर अलर्ट गोष्ट लिहिताना (शेवट सांगणे अगदीच आवश्यक वाटत असेल तर ) "स्पॉईलर अलर्ट " असे वरती मोठे लिहायचे असते, तुम्हाला पिच्चर कितीही फाल्तु वाटत असला तरी... _________________________________ तथाकथित उच्चभ्रू फिल्म क्रिटिक्सचे वाईट रिव्ह्यू वाचूना रामु उखडला आणि त्याने रिव्ह्यूंचे रिव्ह्यू लिहायला सुरुवात केली... त्यातले एक एक वाक्य घेऊन .... अगदी तात्याची आठवण झाली... विशेषतः मग? सो व्हॉट? अशी उत्तरे वाचनीय... वेळ असला तर वाचा... http://rgvarma.spaces.live.com/Blog/cns!5187B91811914FB4!546.entry रामुला मराठी येते की नाही माहित नाही, येत असेल तर लिखाळ यांच्या रिव्ह्यूवर सुद्धा तो ब्लॉगमध्ये उत्तर द्यायची शक्यता नाकारता येत नाही... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

II राजे II 17/06/2008 - 23:12
सहमत. पण सत्या ईतका काही वाईट नव्हता..... उर्मी मुळे थोडा चांगला वाटला आम्हाला ;) राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

पण सत्या ईतका काही वाईट नव्हता..... सत्या मला खूपच आवडला होता.. कंपनीसुद्धा ओक्के होता... पण पुढे सगळ्या त्याच त्याच कॉप्या होत्या त्यांचा वैताग आला.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 17/06/2008 - 23:16
भडकमकरांचे टोले बेक्कार बसताहेत ! लगे रहो मास्तर ! बाय द वे ..... सरकार-राज आणि रामू यांच्यावरचा एक फर्मास लेख : चक्क मराठीमधे !! अत्यंत खुसखुशीत नि खुमासदार ! http://batmidar.blogspot.com/2008/06/blog-post_14.html

अनिल हटेला 17/06/2008 - 21:19
छान !! सरकारराज मी सुद्धा पाहीला ... असो प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते ... मला मात्र सिनेमा आवडला.... अमिताभ ,अभिषेक पेक्षा दिलीप प्रभवळकर यान्च काम जास्त परीणाम कारक वाटल... लगे रहो नन्तर अजुन एक चान्गल पात्र त्यान्नी वठवलये.... बाकी रामू स्टायल सिनेमा म्हटल तर त्याची चित्रपट बनवण्याची पद्धत च हटके आहे ... अर्थात हे माझ म्हणने आहे ... व्यक्ती सापेक्ष विचारात फरक असतोच नाही का !!!!

अमोल केळकर 17/06/2008 - 22:49
चित्रपट प्रदर्शनापुर्वी तो राज ठाकरेंच्या व्यक्तीरेखेवर आहे असे म्हणले जात होते . खरे आहे का हे? पाकिस्तानात या चित्रपटावर बंदी घातली आहे कारण त्यात बाळासाहेबांचा उदो-उदो आहे म्हणे. नक्की या चित्रपटाचे नायक कोण काका की पुतणे ? ( का मुलगा?) आपला ( राम राज्याचा चाहता) अमोल

यशोधरा 17/06/2008 - 23:00
हा सिनेमा मला तसा फारसा आवडला नाही, पण अगदीच टाकाऊ आहे असे पण वाटले नाही. महत्वाची म्हणजे त्याच्या डोळ्यांतली इन्टेन्सिटी. ती इन्टेन्सिटी अजून कोणीही दाखवू शकत नाही आणि रामूने ती व्यवस्थित वापरलीय. उदाहरणं देत बसल्यास वेगळा लेख होईल. हिचकॉक म्हणायचा की चित्रपटात संवाद हे बाकीच्या संगीताप्रमाणेच यावेत. अभिनेत्याने बोलावं ते नजरेने ! १००% अनुमोदन संदीप!! अमिताभ आणि दिलीप प्रभावळकर या दोघांचा अभिनय सुरेखच आहे.

ऋचा 17/06/2008 - 23:21
सिनेमा इतका काही टाकाऊ नव्हता, मला दिलिप प्रभावळकर यांचे काम आवडले (बच्चन फ्यामिली पेक्षा). इतका काही टुकार नाहीय. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

गिरिजा 17/06/2008 - 23:44
सरकार आवडला होता.. सरकार राज नाही आवडला.. पण लिखाळ, एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही. याच्याशी पुर्णपणे सहमत आहे.. माझ्या मते, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले असतेच.. आपल्याला काही वेगळ अपेक्षित असेल आणि ते त्यात नसेल, तर आपल्याला नाही आवडत.. म्हणुन ते टुकार, अस अजिबात नाही. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मनस्वी 18/06/2008 - 00:00
एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..
हाच नेता सरकारचा राजकारण-गुरुही असतो.
आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
सोबतीला सरकारने चिकूला पण बोलावून घेतलंय ना! का तो डायलॉग ऐकू नाही आला? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना 18/06/2008 - 13:45
'सरकार राज'ला काय करायची आहे स्पॉइलर अलर्ट? तो काही गुह्यभेद वगैरे आहे तो रामूला नंतर ओढून ताणून सुचला असावा असे वाटते.अत्यंत हास्यास्पद ! उलट दिलीप प्रभावळकर हाच खलनायक आहे हे अगोदर माहित असेल तर पटकथेत पहिल्यापासूनच किती भगदाडे आहेत ते समजायला सोपे जाईल. (अर्थात कोणी फक्त मापे काढायच्या माफक उद्देशाने स्वतःच्या खिशाला खार लाऊन पहाणार असेल तर...)

अन्या दातार 18/06/2008 - 13:46
स्.रा. चे जेंव्हा प्रोमोज टीव्हीवर झळकू लागले तेंव्हापासूनच मला तो बघावासा वाटला नाही. अनेक कलाकृतींचे रिमेक्/सिक्वेल्स हे एका समान धर्तीवर आधारित असल्याने तुलना ही होतेच. त्यात बर्‍याचदा पहिली कृती चांगली वाटते. उदा. १]मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. वरुन त्याचा दुसरा पार्ट लगे रहो मुन्नाभाई काढला. पण एम्.बी.बी.एस. जितका चांगला झाला तितका लगे रहो नाही वाटला. २] मुघल्-ए-आझम चा मेगा सिक्वेल म्हणून काढलेला ताज महल(सन २००५) नावाचा एक सिनेमा कधी आला आणि कधी गेला तेही कळाले नाही. :| त्यातली गाणी मात्र अप्रतिम आहेत.(शेवटी नौशाद साहेबांचे संगीत होते! :) ) हा असा माझा सर्व्हे असल्याने मी सरकारराज बघायचे टाळले. (सर्व्हेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त कराव्यात.) अनिरुद्ध दातार

In reply to by अन्या दातार

मनिष 18/06/2008 - 17:16
मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. वरुन त्याचा दुसरा पार्ट लगे रहो मुन्नाभाई काढला. पण एम्.बी.बी.एस. जितका चांगला झाला तितका लगे रहो नाही वाटला.
'लगे रहो...' खरच उत्तम चित्रपट आहे, किंबहुना मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. पेक्षा सरस असेल पण वाईट नाही! सरकार राज माझ्याही डोक्यात गेला. (अमिताभची इंटेन्सिटी, सेपिया टोन, रखरखीत्पणा/क्रौर्य दाखवणार्‍या ओव्हरएक्सोपस्ड फ्रेम्स हे सगळं ठीक आहे, पन....सिनेमा फसलाच!) सरकार बघितला नाही.

II राजे II 18/06/2008 - 18:01
"एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही." १००% सहमत. सरकार आवडला होता... सरकार राज अजून पाहीला नाही.. पण पाहीन नक्कीच !! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

वेताळ 18/06/2008 - 19:34
का उगाचच टुकार सिनेमाला चांगला चांगला म्हणुन इतराचा टाईम वाया घालवता. दोन वर्षानंतर थेटरात जाउन एकादा सिनेमा बघावा म्हणुन सरकार राज बघायला गेलो , बाहेर येताना खेटार तोंडावर मारुन घेउन आलो. मला पण सिनेमात प्रकाश योजना खुप खटकली . मुळात सरकार हा सिनेमा मी बघितला नाही म्हणुन मी स्वःताला भाग्यवान समजतो.मठ्ठ थोबाड घेउन अभिषेक हिरोगीरी करत असतो.काळी लुंगी घालुन सरकार अंधारया घरात सारखे चहा,खीर आणि इडली खात असतात.घरात अंधार असल्यामुळे मला त्याची लुंगी काळी दिसली असावी किंवा सरकाराच्या घरात लोड्शेंडीग केली असावे.एक बाई २०० हजार कोटीचा का २०० कोटीचा पावर प्रोजेक्ट घेउन महाराष्ट्रात येते.ठाकरवाडी लाच तिला प्रोजेक्ट करायचा असतो,अन ते गाव सरकारांच्या गुरुचे असते. हाच खरा घोळ आहे. सरकारांचा विरोध असुन अभि ला तो प्रोजेक्ट आवडतो( प्रोजेक्ट वाली बाई आपली ऐश्वर्या असते,आलं का कारण लक्षात?) प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी बायको सोडुन ऐश ला घेउन फिरत बसतो.पण गुरुचा नातु प्रोजेक्टच्या आडवा येतो. खुप गोंधळ होतो, बरेच जण मरतात पण शेवटी हातमोजे वाला माणुस अभि ला मारतो. पण सरकार शेवटी सगळा छडा लावतात. सगळा सिनेमा बघण्यापेक्षा हाच भाग बघितला तरी सगळी कथा समजते.ह्या सगळ्या खेळाचा मास्टरमाईड सरकारचे गुरु असतात.सरकार पेक्षा पावरफुल्ल हे गावटी सरकार असतात.गावात बसुन लंडन मधल्या माणसाला महाराष्ट्रात पावर प्रोजेक्ट काढायला लावतात(२००हजार कोटी) . गुरु सकारला अभि मेल्यावर भेटायला येतात.आणि बोलता बोलता विचारतात आता अभि नंतर कोन?,त्यावेळी बोलत असताना सरकारचा एक माणुस कोपरयात बॅटरी चा झोत मारतो,तिथे गुरुचा नातु मेलेला असतो.त्यावेळी खरे कळते की सरकारच्या घरात लाईटचे वांदे आहेत म्हणुन संपुर्ण सिनेमात सरकारचे घर अंधारलेले दाखवले आहे.शेवटी पावर प्रोजेक्टवाली बाई सकारच्या घरी चहा पिताना दाखवली आहे. बिचारीला काय दशा येते. रामुची आई प्रत्येक वेळी त्याचा नवीन चित्रपट बघते आणि आपला अभिप्राय त्याला देते(रामुची सकाळ मध्ये मुलाकात आली होती त्यात तो हे म्हणाला) . हा सिनेमा बघुन नक्की तिने रामुला खेटराने मारले असणार. (अंधाराचे वांदे असणारा) वेताळ

In reply to by वेताळ

मनस्वी 19/06/2008 - 17:43
त्यावेळी बोलत असताना सरकारचा एक माणुस कोपरयात बॅटरी चा झोत मारतो,तिथे गुरुचा नातु मेलेला असतो.त्यावेळी खरे कळते की सरकारच्या घरात लाईटचे वांदे आहेत
हा हा हा हा :D हा हा हा हा :D मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

लिखाळ 19/06/2008 - 00:09
नमस्कार मंडळी ! प्रतिसादाबद्दल, अनुकूल-प्रतिकूल मतांबद्दल आभार. खरेतर सिनेमा पाहून आलेला वौताग सर्वां बरोबरोब बोलून हलका करावा या एकाच उद्देशाने लिखाण केले. सिनेमाला टूकार म्हणणे हा उद्देश नव्हता तर ते उद्दिपन होते ;) आवड व्यक्तीसापेक्ष आहे. ज्यांना सिनेमा आवडला त्यांच्या मताचा आदरच आहे. वरिल एका प्रतिसादात श्री. चित्रे म्हणतात की सिनेमाचा शेवट असा सांगू नये वा तशी सूचना आधी द्यावी ! खरे आहे. माझी अनवधानाने ही चूक झाली. कोणाचा रसभंग झाला असल्यास मला क्षमा करावी. मी केवळ गप्पा या हेतूने हा लेख लिहिला..त्यमुळे मी शेवट सांगत आहे आणि ते योग्य होणार नाही हे माझ्या लक्षातच आले नाही. (रामुने सरकारिण असा फालतू सिनेमा काढला आणि तो पाहून मी काही लिहिले तर त्या वेळी मी नक्की काळजी घेईन :)) सहभागाबद्दल सर्वांचे पुन्हा आभार. आपला --लिखाळ.

विसोबा खेचर 19/06/2008 - 00:14
लिखाळराव, सावध केलंत ते बरं झाल! माझा आपल्या परिक्षणावर पूर्ण विश्वास आहे. आता हा सिनेमा न पाहिलेलाच बरा! :) आणि तसंही बच्चन कुटुंबाचा आताशा वैतागच यायला लागलाय. आम्ही आपले जुन्या बच्चनसाहेबांचेच फ्यॅन आहोत.. अभिषेक आणि पांढरी पाल ऍश तर बघवतच नाहीत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पण कमीत कमी दिलीप प्रभावळकर आणि लिमये दोन मराठी कलाकारांचा अभिनयासाठी तरी बघ. छान काम केले आहे दोघांनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसुनाना 20/06/2008 - 11:40
आजकाल तेलुगू चित्रपटात मुख्य खलनायकांच्या भूमिका मिळवून दणदणीत यश मिळवणारा आपला सातारचा सयाजी शिंदे! त्याला विसरलात. खरंच! मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले.

In reply to by विसुनाना

गिरिजा 20/06/2008 - 11:47
मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले.
खरय.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले. -----------------------