Skip to main content

केतकीच्या बनी तिथे..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 10/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
केतकीच्या बनी तिथे... (कृपया येथे ऐका)
१९७०-७५ चा काळ असावा तो. किंवा ७०चं दशक म्हणुया. संध्याकाळी पावणे सात की सात वाजता आकाशवाणी मुंबई 'ब' वर केवळ १५ मिनिटांचाच मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागायचा. त्यात हे गाणं अगदी हटकून ऐकायला मिळायचं. घरोघरी पर्वचा, रामरक्षा, शुभंकरोतिचे संस्कार होते तेव्हा. संध्याकाळचा सात-साडेसातचा सुमार असायचा. घरोघरी आमटीभाताचे कुकर लागलेले असायचे. भाजी असलीच तर सकाळची असायची. सोबत फार फार तर कोशिंबिर. अगदी चैन म्हणजे पापड-कुर्डया..! 'केतकीच्या बनी तिथे..!' खूप साध्यासुध्या जमान्याची मर्मबंधातली ठेव सांगणारं हे गाणं...! काय सांगावं सुमनताईंच्या आवाजाबद्दल? अगदी सुरेल, हळवा अन् थेट हृदयाला भिडणारा आवाज आणि गायकी. अशोक पत्की या अत्यंत गुणी माणसाचं संगीत. काय आहे हो या गाण्यात? धांगडधिंगा करणारा रिदम? शंभर वाद्यांचं कडबोळं? गायिकेचा वा संगीतकाराचा एस् एम् एस् चा जोगवा? नाही. यातलं काहीही नाही...! परंतु तरीही हे गाणं खूप मोठं वाटतं, आपलं वाटतं आणि बरंच काही सांगून जातं..! 'गहिवरला मेघ नभि सोडला गं धीर..' ची जी सुरावट आणि गायकी आहे ना, त्याकरता खरंच शब्द नाहीत..! आटोपशीर ठेका, दोन कडव्यातली तबल्याची लग्गी, बासरीचे तुकडे, सुमनताईंची गायकी.. सारंच सात्विक परंतु तेवढंच सुरेख..! आज 'ऐका दाजिबा', 'गारवा', एस् एम् एस् च्या जीवघेण्या स्पर्धा, शोबाजी, हा आल्बम-तो आल्बम, सारं काही आहे..परंतु 'केतकीच्या बनी तिथे..' चा गोडवा, आपलेपणा कुठेच नाही..! -- तात्या अभ्यंकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7368
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

फार सुरेल गाणं आहे. मी पहील्यांदा ऐकलं तेव्हा मनात घरच केलं या गाण्याने. >> घरोघरी पर्वचा, रामरक्षा, शुभंकरोतिचे संस्कार होते तेव्हा. संध्याकाळचा सात-साडेसातचा सुमार असायचा. घरोघरी आमटीभाताचे कुकर लागलेले असायचे. भाजी असलीच तर सकाळची असायची. सोबत फार फार तर कोशिंबिर. अगदी चैन म्हणजे पापड-कुर्डया..!>> सुंदर वाटलं हे वर्णन वाचताना.

तात्याजी मान गये.. गाणे मस्तच..त्यावरील चर्वण त्याहुन छान.. परंतु 'केतकीच्या बनी तिथे..' चा गोडवा, आपलेपणा कुठेच नाही..! ये पते की बात बोली है तात्याजी आपने.. जियो तात्या जियो..

घरोघरी पर्वचा, रामरक्षा, शुभंकरोतिचे संस्कार होते तेव्हा. संध्याकाळचा सात-साडेसातचा सुमार असायचा. >>घरोघरी आमटीभाताचे कुकर लागलेले असायचे. भाजी असलीच तर सकाळची असायची. सोबत फार फार तर कोशिंबिर. अगदी चैन म्हणजे पापड-कुर्डया..!>> अक्षरश: १००% सोना...बालपण आठवलं... सुमनताई म्हणजे संध्याकाळच्या प्रहरच्या समईतील शांत वात...नकळत हात जोडले जात / जातात... कुठे गेली ही माणसं आणि त्यांची हृदयात जपुन ठेवावी अशी ही गाणी.... - (अस्वस्थ) वाटाड्या...

>> सुमनताई म्हणजे संध्याकाळच्या प्रहरच्या समईतील शांत वात...नकळत हात जोडले जात / जातात.. अगदी! आणि आसपास शांतता असली की लख्ख प्रकाशातदेखील ती समई कशी तेजस्वी भासते तसंच सुमनताईंचं गाणं! कधी कधी संध्याकाळी देवापुढं दिवा लावून मी "श्रीरामाचे चरण धरावे" ऐकत बसतो. क्षणभरातच त्यात रामरक्षेचा सात्त्विक भाव जाणवतो! कधी मंद दिव्याच्या उजेडात "आकाश पांघरोनि.." ऐकत बसलो की त्या स्वर्गीय आवाजातल्या स्वरांत भरलेला भक्तीतला सुगंध मन प्रसन्न करून जातो! 'केतकीच्या बनी तिथे' तर कहरच आहे! अप्रतिम! अतिशय सुंदर मुखपृष्ठ हो तात्या! मस्तच!

पुन्हा एकदा लेखाचा, गाण्याचा आस्वाद घ्यायला मजा आली.

गाण्याबद्दल मी पामराने लिहायची जरूरी नाही. गाण्याची महती गाताना त्याचबरोबरीने आलेली घरोघरी पर्वचा, रामरक्षा, शुभंकरोतिचे संस्कार होते तेव्हा. संध्याकाळचा सात-साडेसातचा सुमार असायचा. घरोघरी आमटीभाताचे कुकर लागलेले असायचे. भाजी असलीच तर सकाळची असायची. सोबत फार फार तर कोशिंबिर. अगदी चैन म्हणजे पापड-कुर्डया.. सारखी वाक्ये मागील काळात घेउन गेली.

अगदी मोजक्या शब्दात थेट डोळ्यासमोर चित्र उभे करणारा नितांतसुंदर लेख....अभिनंदन, तात्यासाब! आमटी-भाताचा कुकर, संध्याकाळची वेळ, रेडिओमधून ऐकू येणारी गर्भरेशमी मराठी गाणी, दिवेलागणीची वेळ, घरातलं शांत, सात्विक वातावरण, दिवसभराच्या कामांनंतर घरात रेंगाळणारा एक सैलावलेला मोकळेपणा, घरट्यात परत आलेली पाखरे, उदबत्तीच्या मंद सुवासात न्हाऊन निघालेला प्रत्येक कोपरा...वा वा.. गाणे खासच आहे. अगदी पहिल्या सारेगामापामध्ये आनंदी जोशी या गुणी गायिकेने हे गाणे सुंदर गायिल्याचे स्मरते... सुमनताईंचे 'केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा...' हे गाणे तसेच, शांत, सुवासिक, सात्विक, मन आणि चित्त स्थिर करणारे. रमेश अणावकरांचे शब्दही तितकेच सोपे परंतु हृदयाचा ठाव घेणारे... येऊ द्या तात्यासाब अजून...लई भारी लेख...

गाणं शिकायला सुरूवात केली तेव्हा क्लास मध्ये मला सगळ्यात प्रथम हेच गाणं शिकवलं होतं आमच्या बाईंनी. खूप खूप आवडलं होतं तेव्हा. त्यावेळी बाईंकडून या गाण्याची कॅसेट घरी आणून ऐकलेली आठवते. :)

तात्या, सुंदर गाण्यांचा उल्लेख करताना फक्त गायक-गायिकेचा उल्लेख करुन कसं चालेल? एखादे गाणे अप्रतिम होते त्यामागे शब्दकळा पण असतेच ना? गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीतकार अशोक पत्की यांच्यासमवेत हे मधुर शब्द ज्यांचे आहेत त्या गीतकार स्व. अशोकजी परांजपे यांचा उल्लेख का नाही केलास?

तात्या आठवणींच्या हिंदोळ्यावर पार आमच्या सुवर्णकाळात घेवून गेलात की हो तात्याबा. आमटी-भाताचा कुकर, संध्याकाळची वेळ, रेडिओमधून ऐकू येणारी गर्भरेशमी मराठी गाणी, दिवेलागणीची वेळ, घरातलं शांत, सात्विक वातावरण, दिवसभराच्या कामांनंतर घरात रेंगाळणारा एक सैलावलेला मोकळेपणा, घरट्यात परत आलेली पाखरे, उदबत्तीच्या मंद सुवासात न्हाऊन निघालेला प्रत्येक कोपरा... क्या बात है | जियो | मोहन

वा मी आजच सकाळी सगळी सुमन कल्याणपुरींची गाणि ऐकली. माझ्या मोबाईलमध्येच लोड केली आहेत मी आणि आत्ता हा तुमचा लेख वा आता परत संध्याकाळी ऐकेन.

छान गाणं तसेच अतिशय छान लेख. तात्या धन्यवाद. त्या कॉलं / मदत हवीय च्या गर्दित एक छान लेख आला, पुन्हा एकदा धन्यवाद. हर्षद.