भाकरी निर्मिती एक कला..
लष्कराच्या भाकरी थापणे जितके सोपे तितके भाकरीचे निर्माण नाही. ज्वारी, बाजरी, नाचणी ही एकदल धान्ये आता औषधापुरतीच जगतमान्य झाली आहेत. अन् अशांची भाकरी भाजणे ही एक चैन समजावी अशी परिस्थिती दिसते. मुळात भाकरी थापणे, भाजणे या फार मोठ्या कौशल्याच्या गोष्टी आहेत. गावाकडची एखादी जुनी जाणती कौशल्याबाईच ते करु जाणे.
तर 'भाकरी निर्माण' ही बऱ्यापैकी अवघड कला. त्यासाठी धान्य निवडण्यापासून सुरुवात करावी लागेल. दळण्या अगोदर धान्यातली कच, खडे, तुसे बाहेर टाकली नाहीत तर भाकरी खमंग होऊनही चावतांना वादंग उठण्याचीच शक्यता जास्त. तेव्हा डोळ्यांत तेल घालून धान्याची निवडणूक झाली की चांगलं पीठ दळून घ्यावं लागतं. गिरणीवाला गृहिणीच्या फेवरमधला असेल तर तो जरा बेताचीच कळ पिळून खास भाकरीसाठीचं पीठ काढून देईल. गव्हासारखा फार बारीक आटा भाकरीला मानवत नाही. संयुक्तिक पीठ मिळाले की ते पुरेशा पाण्यात व चवीइतक्या मीठात मळावे लागते. बोटातून गळू नये इतके फेटावे लागते. कणकेचा तो पिठाळ गोळा एकजीव होणे फार महत्त्वाचे. आत्ताच्या स्टीलच्या मऊसूत परातीत ते शक्य नाही. त्याकरिता काथवट नावाची वस्तू फार उपयोगी असायची. एकतर ते लाकडाचे असल्याने त्यात पीठ व्यवस्थित मळले जायचे, शिवाय ते स्टीलसारखे गुळगुळीत नसल्याने भाकरीखाली फार पीठ भुरभुरावे लागायचे नाही. परंतु असे हे एकसंध असलेले काष्ठपात्र स्वैँपाकघरातून केव्हाच हद्दपार केले गेले आहे. असो.
एकदा का पीठ योग्यप्रकारे मळले की त्याचा मिटत्या ओंजळी इतका मुटका तोडून घ्यायचा. त्याला दोन्ही हातांनी गोलाकार देऊन परातीत भुरभुरलेल्या पीठावर टाकायचा अन् भाकरी थापायला सुरुवात करायची.
हे थापणं म्हणजे सर्वाँगिण काम असतं. कारण परात इकडे तिकडे सरकून भाकरीचा नकाशा होऊ नये यासाठी पायाच्या अंगठ्यांनी ती जमिनीवर दाबून धरावी लागते. किचन ओट्यावर हे जमणं अशक्यच. कोणतंही कसदार काम करायचं असेल तर जमिनीवरच यावं लागतं याची प्रचिती यावेळी येईल.
नंतर कणकेवर सगळ्या बाजूंनी सारख्या दाबाच्या चक्राकार थपट्या मारीत भाकरी पसरत न्यायची. साधारणतः दोन्ही हातांचे अंगठे चिकटवून व बोटे पसरवून जेवढा पंखा तयार होईल त्या आकाराची भाकरी थापायची. शक्यतो चिरा पडू नयेत या वेगाने थापा द्यायच्या. उजवे असाल तर घड्याळाच्या दिशेने पीठ थोपटणे सोईस्कर जाते, डावखुरे असाल तर त्याउलट. कदाचित चिरा पडल्या तर पाणी व पीठ याचा संमिश्र वापर करून त्या बुजवता येतात. मुळात पीठ योग्य प्रमाणात हाटले असेल तर चिराही पडत नाहीत व भाकरीही उचलतांना तुटत नाही.
भाकरी एका तळव्यावर उचलून गरम तव्यावर वेळेत टाकणे हा अनुभवाने सिद्ध होण्याचा भाग असतो. गरम तव्यावर भाकरी पडली की पातळ पापुद्रा सुटण्यासाठी घोटभर पाण्याने वरची बाजू मऊ करायची. जरावेळाने म्हणजे भाकरी पचल्यावर उलथण्याने तिच्या सर्व कडा मध्यापर्यंत सोडवून ती पटदिशी उलथायची. त्याबाजूनेही पचली की निखाऱ्यावर भाजायला टाकायची.
आजकाल चूल व निखारे या दंत कथा झाल्या आहेत. विस्तवावर भाजलेल्या भाकरीची चव 'खरपूस' असते तर गँसवर भाजलेली 'करपूस' लागते! असो.
तेव्हा खरपूस पापुद्रा वर येऊन भाकरी पुरीसारखी टम्म फुगली की भाकरीच्या यशस्वी निर्माणाची पोचपावती मिळाली असं समजून चालायचं... ( 'चौफेर' मधुन..)
वाचने
6043
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
सुरेख लेख!!! मी १-२ दा
कधी कधी अतिशय सुगरण ह्याच्या
मस्त! माझ्या आजीची टम्म
छान लेख न टीप्स मी जेव्हा
रुमवरील आठवण झाली. पहिल्याच
भाकरीचा चंद्र...
छान
छान लेख.. मी सुद्धा भाकरी
योगप्रभु, सोलापुरची आठवण
डॉ. लेख चांगला लिहीलात. पण
आमच्याकडे भाकर्या वेगळ्या
मी ज्वारी, बाजरी आणि तांदूळ..
काय मस्त आठवणी जाग्या केल्यात?