Skip to main content

मराठी चित्रपट - एकंदरीत साधकबाधक चर्चा..

मराठी चित्रपट - एकंदरीत साधकबाधक चर्चा..

Published on 03/01/2011 - 12:33 प्रकाशित मुखपृष्ठ
आत्ताच समीरसूर याचा आयडियाची कल्पना - फिकी मिसळ हा लेख वाचला.. छान परिक्षण..! हे परिक्षण वाचून काही ढोबळ विचार मनात आले ते खाली उतरवत आहे.. सचिन, महेश कोठारेंबद्दल मला काही बोलायचे नाही..माझ्या मते ते दोघेही सामान्य किंवा अतिसामान्य कुवतीचे आहेत..सचिन स्वत:लाच महागुरू वगैरे म्हणवून घेतो याची मौज वाटते..! :) अशिक सराफ -मूळातला खूप गुणी. निर्विवादपणे एक समर्थ अभिनेता. परंतु तरुण वयातही तो बागेत नट्यांमागनं धावतांना कैच्याबैच दिसायचा... मराठी सिनेसृष्टीला या अभिनेत्याकडून खूप काही करून घेता आले असते..! लक्षा आवडायचा मला.. अतिशय गुणी. परंतु त्याच्याही कलेचे खरे चीज झाले नाही, निर्मात्या-दिग्दर्शकांना ते करून घेता आले नाही हे माझे व माझ्या गुरुजीचे - भाईकाकांचे मत...! अलिकडच्या काळातले अगदी म्हणावे तसे आणि किमान दोन-तीन वेळा पाहावे असे, लक्षात राहण्यासारखे माझे आवडते चित्रपट दोनच - १) ध्यासपर्व २) हरिश्चंद्राची फॅक्टरी. राजाभाऊ परांजपेंसारखी मंडळी कुठे गेली आता...? डॉ लागू, निळूभाऊ, जब्बार, यांचीही खूप उणीव भासते.. मराठी चित्रपटातले आजचे संगीत - मला विशेष आवडत नाही, भावत नाही किंवा समजत नाही असे मी म्हणेन..अर्थात, एखाद दोन काही मोजके अपवाद आहेत.. बाबूजी, राम कदम, आनंद मोडक, भास्कर चंदावरकर या सर्वांची खूप म्हणजे खूपच उणीव भासते.. त्यातल्या त्यात आनंद मोडकांकडून अजून खूप काही आशा आहेत.. अजय-अतुल ही मुलं तशी गुणी आहेत.. परंतु त्यांनीही ग्लॅमरमध्ये हरवून न जाता जास्तीत जास्त चांगले काम करावे असे वाटते.. उगाच, 'पी हळद आणि हो गोरा..' असे त्यांचे होऊ नये, जे सध्या होऊ पाहात आहे असे वाटते..! असो.. हे काही फुटकळ विचार. मनात आले ते पटापट उतरवले.. इतरांनीही येथे आपापली, आजच्या व पूर्वीच्या मराठी चित्रपटांविषयी व त्यातल्या संगीताविषयी आपली एकंदरीत मते माडावीत व या धाग्यास एका साधकबाधक चर्चेचे मूर्त स्वरूप द्यावे, ही विनंती.. आपला, (मराठी चित्रपटप्रेमी) तात्या.

याद्या 36935
प्रतिक्रिया 107

बाबूजींचं संगीत असलेला सुवासिनी, जगाच्या पाठीवर आणि हृदयनाथ मंगेशकारांचें संगीत असलेला उंबरठा व जैत रे जैत हे दोन चित्रपट, म्हणजे मराठी चित्रसंगीताच्या दुनियेतले सर्वोच्च क्षण हे माझं वैयक्तिक मत.. इतरांचीही मतं वाचायला आवडतील.. तात्या.

ध्यासपर्व पाहिला नाही, हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहिला पण भावला नाही. एका महान कार्याची ओळख करुन देणारा चित्रपट त्यातील नायकाच्या विविध बदलत्या भावावस्थेला न्याय देऊ शकला नाही. जुने काही मराठी चित्रपट बरे होते पण त्यापेक्षा हिंदी चित्रपट किंवा आंग्ल चित्रपट पहाणे मी ठीक मानतो. इतर भाषा मला समजत नाहीत, सबटायटल्स वाचुन चित्रपट समजुन घेणे मला जमत नाही. जुनी मराठी गाणी हा अमुल्य ठेवा आहे. मात्र बरेचसे मराठी चित्रपट पहाणे हा जन्मठेपेपेक्षा भयानक अनुभव असतो असे मी स्वत: मराठी असुन आणि माझी मातृभाषा मराठी असुनही मत आहे. एकही मराठी चित्रपट कालातीत किंवा सुरेख, परिपुर्ण, बेस्ट या लायकीचा नाही. अवांतर - मी चित्रपट क्षेत्राशी संबंधित नसल्याने आणि त्यात कधी जाईल अशी शक्यता नसल्याने उगाचच मग तुम्ही तरी दा़खवा करुन चांगला चित्रपट ! असल्या विचारजंती प्रतिक्रिया देऊ नये. धन्यवाद.

In reply to by अवलिया

ध्यासपर्व पाहिला नाही,
अवश्य पाहा.. मला तरी खूप आवडला होता हा सिनेमा..
एकही मराठी चित्रपट कालातीत किंवा सुरेख, परिपुर्ण, बेस्ट या लायकीचा नाही.
अपवाद म्हणून नावे घ्यायची झाली तर जब्बारच्या सिंहासन या चित्रपटाचे नांव आत्ता तरी चटकन आठवत आहे.. असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

माझे आजोबा व त्यांचे जेष्ठ भाऊ कर्व्यांचे खंदे पाठीराखे होते .व त्यांच्या कार्यात फुल न फुलाची पाकळी म्हणून मदत करत .त्यांना स्वताला त्याकाळात अनुक्रमे दोन मुल व दोन मुली होत्या . हा सिनेमा अप्रतिम आहे, मात्र त्याचे मार्केटिंग अजून केले पाहिजे होते .असे राहून राहून वाटते .माझ्या मते ती किशोर ह्यांची सर्वोत्कृष्ट भूमिका .

In reply to by विसोबा खेचर

अवश्य पाहा.. मला तरी खूप आवडला होता हा सिनेमा..
जरुर.
अपवाद म्हणून नावे घ्यायची झाली तर जब्बारच्या सिंहासन या चित्रपटाचे नांव आत्ता तरी चटकन आठवत आहे..
मान्य आहे. सिंहासन असो की अजुन कुठलाही नाव घ्या .. हे चित्रपट चांगलेच आहेत. पण .... हा पण मोठा गंमतीचा आहे. असो.

In reply to by विसोबा खेचर

अशोक सराफ चा " वजीर " देखील सुरेख, परिपुर्ण आणी बेस्ट म्हणता येईल. पाहीला नसेल तर जरुर पहा.

असे एकदा वाचले होते आणी या मधे तथ्य आहे असे वाटते. त्यांचे चीत्रपट कला, मनोरंजन, कथा, दीग्दर्शन, संगीत, अभीनय, ग्लॅमर व अंबट्शौकीनता यांनी परीपूर्ण असल्याने त्याला समाजाचा व्यापक पाठींबा मिळतो. जे सध्या आपण मराठीत मीस करतोय.

In reply to by आत्मशून्य

'हो आणि दबंग मधील व्रात्य पणाची. शीला आणि मुन्नी मराठी सिने सुष्टीत आहेत ० साईज च्या .पण त्यांच्या पुढ्यात जरठ ./खुजे (अभिनय व शारीरिक ) अवाढव्य केसाळ पोटाचे चट्टेरी पट्टेरी कापड घालणारे अभिनेते असतात .एक हाणामारीचे कथानक असलेला सिनेमा हवा आहे .ज्यात विनोद चतकोर असेल मराठी सिनेमा नेट च्या माध्यमातून जगभर नेणे व इतर भाषेत भाषांतरित करणे आदी उपायांनी त्याचे उत्पन्न वाढू शकेल .. बाकी राजीव पाटील कला व दर्जा सांभाळून सिनेमे काढेन पण जेष्ठ मात्र त्याच जुन्या पुराण्या आयडिया तून धमाल करू पाहत आहेत .

मकरंद अनासपुरे सुरुवातीला चांगला वाटला पण नन्तर कुठे घोडे अडले कोण जाणे. त्याच्या अभिनयात तोचतोच पणा आलाय. भरतजाधव बद्दल काहीच बोलायचे नाही. तो अतीसामान्य आणि पठडीतला ( जिवावर येतय मण दुसरा शब्द नाही म्हणून लिहितोय) अभिनय सिद्धार्थ जाधव. खरच गुणी अभिनेता. याला चांगल्या भुमीका मिळतील त्याचे तो सोने करेल सम्जय नार्वेकर हा देखील बरेच दिवसात दिसला नाही. कोणत्याही प्रकारच्या भुमीका उत्तम सादर करु शकतो. नव्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडे छान काम करते. पण उत्तम कथानक जोवर येत नाही तोवर काहीच उपयोग नसतो. नुसते पीजे आणि मरुनमुटकून केलेले विनोद याचा काहीच उपयोग होत नाही

In reply to by विजुभाऊ

नव्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडे छान काम करते.
मला हरिश्चंद्राच्या फॅक्टरीतली विभावरी देशपांडे खूप आवडली.. तात्या.

मराठीत इतक्यात चांगले चित्रपट आलेच नाहीत असे नाही. सातच्या आत घरात, श्वास, नितळ, गोष्ट छोटी डोंगराएवढी, कायद्याचे बोला, नटरंग, टिंग्या, जोगवा, डोम्बिवली फास्ट, वळू, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे अलिकडच्या काळातले काही चांगले चित्रपट. मला यंदा कर्तव्य आहे, अगं बाई अरेच्या, गुलमोहर आदि पिक्चर सुद्धा आवडले. चित्रपट संगीत मात्र फारसे चांगले येत नाही आहे. नटरंग वगळता फार आवडेल असे कुठले नाव संगीताच्या बाबतीत घेण्यासारखे नाही. मधल्या काळात जे भंकस, बक्वास, टिनपाट चित्रपट येउन गेले त्यामानाने आत्ता परिस्थिती बरीच चांगली आहे असे माझे मत आहे. लक्ष्या चांगला अभिनेता खरा. अशोक सराफ पण. पण या दोघांनी मिळुन मराठी चित्रपटसृष्टीची जेवढी वाट लावली तेवढी अजुन कोणी लावली नसेल.

In reply to by मृत्युन्जय

लक्ष्या चांगला अभिनेता खरा. अशोक सराफ पण. पण या दोघांनी मिळुन मराठी चित्रपटसृष्टीची जेवढी वाट लावली तेवढी अजुन कोणी लावली नसेल.
या मृत्युंजयाच्या मताशी १००% सहमत दोन पावलं पुढे जाउन अस म्हणेन की हिंदी चित्रपटांत केविलवाण्या भुमिका करुन मराठी अभिनेत्यांसाठी हिंदी चित्रपटांतील चांगल्या भुमिकांची कवाडं बंद करुन ठेवलीत.

In reply to by मृत्युन्जय

जास्त आवश्यक आहेत.
मधल्या काळात जे भंकस, बक्वास, टिनपाट चित्रपट येउन गेले त्यामानाने आत्ता परिस्थिती बरीच चांगली आहे असे माझे मत आहे. लक्ष्या चांगला अभिनेता खरा. अशोक सराफ पण. पण या दोघांनी मिळुन मराठी चित्रपटसृष्टीची जेवढी वाट लावली तेवढी अजुन कोणी लावली नसेल
चालायचेच, मराठीत वीनोदाची लाट आली आणी क्रीएटीव्हीटि संपली भंपकपणा वाढला आणी हेच सध्या बोलीवुड्ला लागू पडत आहे.. नूसतेच इनोदी चीत्रपट येतायत एका मागून एक ह्यामूळे लवकरच बोलीवुड पण डब्यात जाणारच आहे म्हणून तर साला जो तो स्टार आज टी.वी. प्रोग्राम पटकावत आहे. कारन पैका तीथच भेटतो आन धंदा बी सेफ.. कालाय तस्मै नमः

मी माझ्या मुलाला चित्रपट क्षेत्राची ओळखच जॅत रे जॅत नं करुन दिलि आहे, श्री. जब्बार पटेल हे आमचे गाव वाले आणि हदेचे माजी विद्यार्थी त्यामुळे ही मनात कुठेतरी जवळीक होतिच. एकेकाळी ' गो-या देहावरती' कॉलेजचं गॅदरिंग ३ वर्षे गाजवलं आहे. हृदयनाथ मंगेशकारांचें संगीत असलेला निवडुंग हा पण मला आवडणारा चित्रपट आहे, त्यातली गाणि, संगित आणि अर्चना जोगळेकर. लहानपणी शिवाजी महाराजांचे सगळे चित्रपट आवडायचे, विशेष करुन सुर्यकांतांचे वगॅरे. साधी माणसं पण खुप छान आहे. नवीन पॅकी चेकमेट, जोगवा, आघात, गाभडीचा पाउस हे चित्रपट काही आशा जागवुन गेले होते. हर्षद.

अशोक सराफ पण >> मान्य !! वजीर, एक डाव धोबी पछाड आणि एक उनाड दिवस या विषयी काय मत आहे आपले. (यातल ' हुरहुर असते हे गाण झक्कास !! ). धाग्याकर्त्यास विनम्र सुचना (म्हणजे बस क्या तात्या, बच्चे की जान लोगे क्या !! ;) ) अजुन काही चित्रपटांची यादी देत आहे, नक्की पहा मग आपले मत बनवा ही विनंती. १) सावरखेड- एक गाव २) मुंबई-पुणे-मुंबई ३) वळु ४) दहावी फ ५) मी सिंधुताई सपकाळ ६) एक कप चहा ७) जोगवा ८) त्या रात्री पाउस होता. ९) गाभ्रीचा पाउस १०)रानभुल ११) गैर तुर्तास ईतके बघा , बाकीची यादी देतो लवकरच !!

वजीर, लपंडाव, गोष्ट छोटी डोंगराएवढी, यंदा कर्तव्य आहे असे काही आवडलेले मराठी सिनेमे. बाय द वे.. महेश कोठारेचे थरथराट, धांगडधिंगा, झपाटलेला, खबरदार, दे दणादण, धडाकेबाज अशा नावांवरूनच त्यांचे जीनर काय आहे ते कळते. जरा थ्रिलर, कधी हॉरर, हॉलीवूडच्या थीम्सचे मराठी अर्धशहरी अर्ध गावरान रूप अशा एका साच्यातले चालतात म्हणून काढत राहिलेले सिनेमे. तेच सचिनचंही. त्याचे नर्मविनोदी सिनेमे "नवरी मिळे नवर्‍याला" पासून "नवरा माझा नवसाचा" पर्यंत हे एकूण जुळी पात्रं, वेषांतर, हलकेफुलके कौटुंबिक जोक्स, फसवाफसवी, काहीतरी करायला जाऊन लफड्यात पाय फसणे अशा थीमचे एकसाची असतात. नावावरुन आणि अनुभवाने माहीत होणारी जातकुळी त्या त्या वेगळ्याच ट्रेडमार्क प्रकारची असल्याने त्याची तुलना श्वास, वळू, ध्यासपर्व वगैरे या गटाशी होऊ शकत नाही. ध्यासपर्व, श्वास, वजीर, सरकारनामा वगैरे हे गंभीरपणे बघण्याचे सिनेमे आहेत. त्यांचा दर्जा अत्युच्च आहेच पण उच्च नीच म्हणावे की "वेगळा" म्हणावे असा प्रश्न पडतो. नवीन काळात तर खूप नवीन धाडसी विषय घेऊन मराठी सिनेमे निघताहेत असं दिसतं. टेक्निकली आणि आशयात सुद्धा. फ्रेश तर नक्कीच आहे बदल..

In reply to by गवि

त्यांचा दर्जा अत्युच्च आहेच पण उच्च नीच म्हणावे की "वेगळा" म्हणावे असा प्रश्न पडतो. सहमत आहे. या धमाल जोड्यांचे धूमधडाका, बनवाबनवी, झपाटलेला हे टाईमपास सिनेमे आमचे ऑल टाईम फेव्हरीट आहेत. :) तसेच अगं बाई अरेच्चा, कायद्याचं बोला, जाऊ तिथं खाऊ हे देखील खूप आवडले होते.

मराठी चित्रपट तांत्रिक अंगांने अगदीच मागासलेला वाटायचा.. आताही चित्र तुलनात्मदृष्ट्या वाईटच आहे.. मात्र अभिनय व काहि प्रमाणात कथा यांत मराठी चित्रपट मला हिंदी चित्रपटांपेक्षा उजवा वाटतो. अर्थात उत्तम प्रेमकथा नसणे हा मराठी चित्रपटसृष्टीचा पराभव की मराठी मानसिकता हा प्रश्न उरतोच :)

In reply to by ऋषिकेश

साले भडक साऊथवाले सूध्दा एक एक नीतांत सून्दर प्रेमकथा सादर करत असतात आणे आपण ? श्वास सारखे संवेदन्शील चित्रपट चूचकारण्यातच महानता मानतो

वर असंख्य चांगल्या चित्रपटांची यादी दिलीच आहे. एक दोन वर्षापूर्वी एकदा चाफळकरांनी (मंगला / सिटी प्राईड) कोथरूड सिटी प्राईड ला चक्क सगळे मराठी पिक्चर लावले होते आणि सगळे उत्तम चालत होते मल्टिप्लेक्स मध्ये. या दोघा / तिघा म्हातार्‍यांना आणि सगळ्यात जास्त सचिनला वेड लागलं आहे किंवा बळंच मूर्खपणा / माज आला आहे. महागुरू हा तर फक्त हसण्याच्या किंवा अनुल्लेखे मारावे या लायकीचा प्रकार होता. त्याचा तो विग आणि अनेक वर्षांच्या कारकिर्दीचा पुन्हा पुन्हा वापर उल्लेख हा वीट आणणारा प्रकार असतो. पण अनेक चांगले पिक्चर्स गेल्या ८-१० वर्षात बनले आहेत -- १) श्वास, २) नितळ, ३)गोष्ट छोटी डोंगराएवढी, ४) कायद्याचे बोला, ५)नटरंग, ६)टिंग्या, ७)जोगवा, ८)डोम्बिवली फास्ट, ९)वळू, १०)मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ११) दहावी फ १२) गाभ्रीचा पाउस १३) गैर इतर काही १) वास्तुपुरुष - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर २) पक पक पकाक - सई परांजपे ३) उत्तरायण - एक अतिशय सुंदर चित्रपट ४) दोघी ५) तू तिथे मी - अप्रतिम ... ६) बनगर वाडी - अमोल पालेकर - जुना आहे ९५-९७ असावा. ७) मुक्ता - पुन्हा जब्बार आणि जुना आहे. ८) हरिश्चंद्राची फॅक्टरी एक गोष्ट ही आहे की जब्बार / सुमित्रा - सुनील / सई परांजपे/ अमोल पालेकर इत्यादींनी गेल्या दहा वर्षात जास्त चित्रपट केले नाहीत. जे एक दोन केलेत ते अतिशय उत्तम दर्जाचे आहेत. अस्मिता चित्र / संजय सूरकरचा एकही नवीन पिक्चर गेल्या काही वर्षात आला नाही. पण अनेक नवीन दिग्दर्शक आणि कलाकार पुढे आले आहेत. आनंद मोडकांसारखं मधुर नसेल अगदी पण अजय अतुलने खूप मोठा बदल नक्कीच घडवला आहे. महेश कोठारेच्या डॅम इट आणि उघडी बटणं आणि पोट सुटलेला हिरो म्हणून अशोक सराफ पेक्षा आता अतुल कुलकर्णी ( दहावी फ / नटरंग / वळू/वास्तुपुरुष), गिरीश कुलकर्णी (वळू/ गोष्ट छोटी डोंगराएवढी) असे उत्तम नायक, सोनाली कुलकर्णी (मुक्ता मधली आपली जुनी सोनाली :)), अमृता सुभाष, देविका दफ्तरदार, मुक्ता बर्वे, शर्वरी जमेनीस अशा अनेक चांगल्या अभिनय करू शकणार्‍या नायिका, सहनायिका आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगल्या पिक्चरला महाग तिकीट काढून थिएटरला जाणारे प्रेक्षकही आहेत. एकूण थोडा जास्त उठाव मिळण्याची गरज आहे. जरा दोन वर्षापूर्वी जसा जोर धरला होता तसे परत खूप चांगले पिक्चर्स एकामागोमाग एक प्रदर्शित व्हायला हवेत. काही जुन्या कलाकारांनी (आनंद मोडक, नीना कुलकर्णी, संजय सूरकर, स्मिता तळवलकर, दिलीप प्रभावळकर) काही नवीन कामं केली तर कधीही उत्तम चित्रपट होऊ शकतात आणि कुठल्याही मल्टिप्लेक्स मध्ये चुलबुल पांडे आणि शीलाच्य बरोबरीने हाउस फुल चालू शकतात.

In reply to by आत्मशून्य

कायद्याचं बोला हा बराच चांगला चित्रपट आहे. My cousin Vinny चे कुठलेही कोर्टातले प्रसंग वापरलेले नाहीत. शर्वरी जमेनीस ला केस मध्ये कुठलाही भाव / जागा नाही. मराठीकरण उत्तम केलं आहे. राहण्याची जागा बदलण्याच्या गोष्टी कॉपी केलेल्या नाहीत. फडणवीसाने त्याला शेवटी नियमात पकडणे हे मूळ चित्रपटात नाही. वर कोणी म्हटल्या प्रमाणे ती फुलराणी ही पण कॉपीच आहे. पण अजरामर आहे... तसा हाही चांगला प्रयत्न आहे. ठराविक साच्यातल्या गोष्टी.. तोच हिरो, भरतचे तेच तेच तेच तेच परत परत बोलणं. तोच चेहरा यापेक्षा खूप बरा आहे.

" बनवा-बनबी " नंतर सचिन हा माझ्यासाठी बहिष्कृत नट आहे. १२ ) क्षण १३ ) गोजिरी (कॉपी असला तरी छानच होता.) १४ ) सनई चौघडे १५) विहीर १६ ) उलाढाल (एक भरतचा पचकुळा अभिनय सोडला तर ) १७ ) रीटा

कलाकारांची बलस्थानं आणि उणिवा ह्यांचा तात्यांइतका सखोल अभ्यास दुसर्‍या कुणाचा नसेल. हे स्किल असे छोट्या लेखांपुरते मर्यादित न ठेवता अजून पुढे न्यावे ही विनंती. उत्तम कलाकॄती घडण्यासाठी अंकूश असणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच आपल्या अनेक ठिकाणी ओळखीही आहेत. मनावर घेऊन आपण समिक्षा केल्यास ती पोकळी आपण भरू शकता ह्यात शंका नाही.

अश्विनी भावेचा "कदाचित" नाही का आवडला कुणाला? मला खूपच आवडला होता! कथा, अभिनय, सादरीकरण, तांत्रिक बाजू, अश्विनी भावेचं "वय" ग्रेसफुल्ली कॅरी करणं, सगळंच मला खुप आवडलं होतं.

In reply to by यशोधरा

यशो कदाचित तुनळीवरुने काढलेला दिसतोय. पण नेटफ्लिक्सवर आहे - मराठी चित्रपटांसाठी अजुन एक चांगली गोष्ट, पण तुला नेटफ्लिक्स किती सोयीस्कर आहे याची कल्पना नाही.

In reply to by यशोधरा

अगं सोयीच अशासाठी म्हटलं कारण त्याला महीन्याची वर्गणी असते - इथे अमेरीकेत ८-१० डॉलर, म्हणजे खूप काही महाग नाही , पाहीजे तितके चित्रपट पाहू शकतो महीनाभरा. आणि मुख्य म्हणजे पायरेटेड नसते, त्यामुळे ते समाधानही मिळते. बाकी ठिकाणचं माहीती नाही म्हणून म्हटलं की कितपत सोयीचं आहे ते माहित नाही.

In reply to by सखी

अमेरिकेबाहेर (बहुदा कॅनडाचा अपवाद वगळता) तुम्हाला नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग अ‍ॅक्सेस करता येत नाहीत.

आयुश्य हे ....... . .. .. हे हे हे .... चुलीवरल्या ... ल्या ल्या ल्या ... कढई मधले ... ले ले ले ... कान्द्द्द्द्द्द्द्दे प्प्प्प्प्पोह्ह्ह्हे .... ह्हे ह्हे ह्हे !!

मराठी सिनेमात बर्‍याच वेळा चांगल्या विषयाची वाट लावलेली बघायला मिळते. उदा: सनई चौघडे. काही वाट न लावलेले सिनेमे गंभीर असतात म्हणून चालत नाहीत. उदा: कवडसे. गाण्यांशिवाय, कथा असलेले, वेगवान सिनेमे क्वचितच येतात. उदा: चेकमेट.

सचिन कुंडलकरचा 'गंध' पाहावा अशी शिफारस करेन. किमान मध्यमवर्गीय नागरी प्रेक्षकास रंजक वाटेल आणि तरीही निव्वळ टाईमपास वाटणार नाही अशा दुहेरी निकषांवर तो उतरतो. अर्थात लहान गावांत असे चित्रपट चालत नाहीत त्यामुळे प्रदर्शित होतच नाहीत. त्यामुळे दूरचित्रवाणीवर यायची वाट पाहणे नाहीतर डीव्हीडी किंवा पायरेटेड पाहाणे याला पर्याय नाही.

मी बर्‍याच वर्षात खिशातली दमडी खर्च करुन अथवा गेलाबाजार लोकाच्या पैशाने देखील थेटरात जाउन मराठी सिनेमा पाहिलेला नाही. त्यामुळे ह्या विषयावर काही अक्कल पाजळायचा मला अधीकार आहे असे वाटत नाही. बाकी चर्चा वाचतोय...

वरील अनेक प्रतिसादात "चांगल्या" चित्रपटांची यादी दिली आहे (जी खरोखरच चांगली आहेत यात दुमत दिसत नाही...) त्यातील नावे वाचल्यावर हे प्रकर्षाने जाणविले की, मुंबई आणि पुणे सोडल्यास महाराष्ट्रात हे चित्रपट प्रदर्शितच झाले नसावेत. आमचे कोल्हापूर तर मराठी चित्रपटसृष्टीची एकेकाळची कर्मभूमी समजली जाते पण मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यार्‍या इथल्या थिएटरची शोचनीय अवस्था पाहता तिथे जागा असलीच तर 'अलकाताईं' ते जगप्रसिद्ध जीवघेणे रडणे पाहून स्वतःला तिच्या जागी कल्पणार्‍या स्त्रियांनाच व तसल्या भट्टीतीलच चित्रपटांना. त्यामुळे वरील कल्पक नावीन्यपूर्ण कथानक असलेल्या चित्रपटाना इथे (आणि तत्सम शहरात) एकदोन दिवसासाठीही थिएटर नसते [सन्माननीय अपवाद "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय....] आणि शिवाय त्या निर्मात्याला "आपला चित्रपट फक्त मुंबई-पुणेकरा" साठीच आहे असेही कुठेतरी वाटत असेल. फक्त एकदा येथील स्थानिक फिल्म क्लबच्या लोकांनी प्रयत्नपूर्वक 'श्वास', 'दहावी फ', 'वास्तुपुरूष', 'विहीर' असे मोजके चित्रपट निमंत्रितांसाठी आणले होते, त्याचा लाभ झाला आणि मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे निव्वळ 'ती' त्रयी नव्हे असेही वाटून गेले. त्या सप्ताहात कोल्हापुरकरांशी झालेल्या संवादात "वास्तुपुरुष" च्या सुमित्रा भावे यानी कबुली दिली होती की निव्वळ वितरणव्यवस्थेच्या त्रुटीमुळे असे चित्रपट महाराष्ट्रात जावू शकत नाहीत त्यामुळे मराठी चित्रपटाने जागतिक पातळीवर जाण्याइतपत प्रगती केली आहे हे फक्त माध्यमात वाचण्याचीच बाब राहिली आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सहमत. अनेकदा असे होते की चित्रपट येणार म्हणून कुठेतरी वाचतो आणि येण्याची वाट बघतो, विसरूनही जातो नंतर. काही दिवसांनी लक्षात येते की तो चित्रपट आपल्याकडे आलाच नाही. 'देवराई'चे असे झालेले आठवतेय मला.

In reply to by मिहिर

जुना धागा या प्रतिसादाने परत वर काढते आहे मंडळी, पण एकोळी/अतिछोटा धागा न काढण्याचा इतका एकच उपाय समोर होता. ह्या चित्रपटांचे नाव मागच्या वर्षी कानावर आले होते, पण नंतर काहीच ऐकलं नाही, २००९ च्या बीएमएमला दाखवणार होते. मिपांकरांनी यातले कोणतेही चित्रपट पाहीले आहेत का? आणि त्याबद्दलची त्यांची मतं (बरी/वाईट) वाचायला उत्सुक आहे. अचानक - लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण म्हणून चित्रपटाविषयी उत्सकता आहे http://in.bookmyshow.com/movies/Achanak-(Marathi)/ET00002285 वावटळ - राजश्रीच्या साईटवर याचं ट्रेलर असावं, पणं इथुन आत्ता दुवा देता येत नाही. तांदळा - याची स्वतःची अशी बेबसाईटही आहे http://www.tandalathefilm.com/homeM1.html . यात एक गाणं आरती अंकलीकरांनी गायलेले दिसतयं आणि कलाकारांमध्ये आसावरी जोशीचे नाव आहे, म्हणजे बहुदा ती 'ढुंढते रह जाओगे' मधलीच ना.

चांगले असलेले गंभीर मराठी चित्रपट नेहमीच राजकारण, समाजकारण किंवा कौटुंबिक विषयांवर असतात. जे विनोदी चित्रपट असतात तेही बर्‍याच घासून गुळगुळीत झालेल्या विषयावर असतात आणि त्यात त्या विषयापेक्षा अभिनेत्यांचे संवाद आणि टायमिंग यातून विनोद निर्मीती करायचा प्रयत्न असतो. वरती आत्मशून्य यांनी म्हटल्याप्रमाणे, निव्वळ करमणूकप्रधान आणि सगळा मालमसाला भरलेले व्यवस्थित बजेटचे चित्रपट फारसे नसतातच आणि असले तरी त्यातली पात्रं इतकी अविश्वसनीय मराठी बोलतात, इतके विचित्र कपडे घालतात आणि इतके टुक्कार दिसतात की त्या चित्रपटाचा 'ग्लॅमर क्वोशंट' पार रसातळाला जातो. खूप पैसा लावून, भरपूर मेहनत घेऊन आणि खरोखर चांगले दिसणारे (म्हणजे उदाहरणार्थ अतिश्रीमंताच्या रोलमध्येही मध्यमवर्गीय न वाटणारे) नट-नट्या घेऊन प्रेमकथा, थ्रीलर्स वगैरे जोपर्यंत बनत नाहीत तोपर्यंत मराठी चित्रपट बहुजनांमध्ये लोकप्रिय होणार नाही. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांशी स्पर्धा करण्याची इच्छा जोपर्यंत मराठी चित्रपट निर्मात्यांमध्ये निर्माण होत नाही तो पर्यंत दर्जा सुधारणार नाही. वरती काही लोकांनी दिलेल्या यादीतले चित्रपट चांगले आहेत पण फक्त एका विशिष्ट वर्गाला आवडतील असे आहेत. भाषा न समजणार्‍या माणसाने पाहिला तरी त्याला चित्रपट आवडला पाहिजे.

In reply to by नगरीनिरंजन

वरती काही लोकांनी दिलेल्या यादीतले चित्रपट चांगले आहेत पण फक्त एका विशिष्ट वर्गाला आवडतील असे आहेत. भाषा न समजणार्‍या माणसाने पाहिला तरी त्याला चित्रपट आवडला पाहिजे.
म्हणजे काय ते नीटसे कळले नाही. मराठी न समजणार्‍या माणसाने दादा कोंडक्यांचे सिनेमे पाहिले असते तर त्याला त्यातल्या द्वयर्थी संवादांचा एकही अर्थ कळला नसता. तमाशापटांतले सवाल-जबाब वगैरे भाषानिष्ठ प्रकारही मराठी न समजणार्‍या माणसांना कळणार नाहीत. अभिजनांना आवडणारे वेगळ्या वळणाचे चित्रपट न ध्यानात घेता इथे मुद्दाम लोकप्रिय मराठी पिच्चरांची उदाहरणे घेऊन पाहिली तरीही तुमचा मुद्दा लक्षात आला नाही.

In reply to by चिंतातुर जंतू

तुम्ही मराठी चित्रपटांचीच उदाहरणे का घेत आहात ते समजत नाही. मला अभिप्रेत असलेले चित्रपट मराठीत बनतच नाहीत. संवेदनशील चित्रपट फक्त शिकलेल्या आणि कलेची जाण असलेल्यांना आवडतात. तमाशापट किंवा दादा कोंडकेंचाही स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग होता. असं नेहमीच का असतं? सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात मनोरंजन करू शकेल असे चित्रपट का बनत नाहीत? इंग्रजी न समजताही लोक इंग्रजी चित्रपट पाहतात आणि त्यांना ते आवडतातही. वेगवेगळे (पण करमणूकप्रधान) विषय, उत्तम बजेट आणि त्याचा उत्तम वापर करून तंत्रदॄष्ट्या उत्तम चित्रपट असतील तरच मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळतो असं मला म्हणायचं आहे.

In reply to by नगरीनिरंजन

तमाशापट किंवा दादा कोंडकेंचाही स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग होता. असं नेहमीच का असतं? सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात मनोरंजन करू शकेल असे चित्रपट का बनत नाहीत?
दादा कोंडक्यांचे चित्रपट किंवा काही तमाशापट सुपरहिट होते. त्यामुळे बहुतेकांचं मनोरंजन ते करू शकत होते असं वाटतं.
संवेदनशील चित्रपट फक्त शिकलेल्या आणि कलेची जाण असलेल्यांना आवडतात.
अमेरिकेतही हेच होताना दिसतं. 'टायटॅनिक' किंवा 'अवतार'ला नाकं मुरडणारे कलेची जाण असणारे लोक अमेरिकेतही आहेतच. त्यामुळे हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर वैश्विक असावा.
इंग्रजी न समजताही लोक इंग्रजी चित्रपट पाहतात आणि त्यांना ते आवडतातही. वेगवेगळे (पण करमणूकप्रधान) विषय, उत्तम बजेट आणि त्याचा उत्तम वापर करून तंत्रदॄष्ट्या उत्तम चित्रपट असतील तरच मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळतो असं मला म्हणायचं आहे.
'मोठ्या प्रमाणावर जनाधार' हे महत्त्वाचं आहे. दादा कोंडके किंवा काही तमाशापट यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनाधार होता असं म्हणता येईल. पण ते तंत्रदृष्ट्या उत्तम नव्हते, कमी खर्चात बनत आणि विषयही तेच तेच असत. म्हणून तुमचा (भाषा न जाणणार्‍या माणसालाही सिनेमा कळला पाहिजे हा) मुद्दा कळला नाही.

In reply to by चिंतातुर जंतू

>>दादा कोंडके किंवा काही तमाशापट यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनाधार होता असं म्हणता येईल मान्य पण यात होता हा शब्द महत्त्वाचा आहे. आता परिस्थिती तशी आहे का? त्या काळात हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट यात किती फरक होता आणि आता किती आहे, तेव्हा लोकांना हिंदी किती समजायचं आणि आता किती समजतं आणि लोकांची आवड तेव्हा कशी होती आणि आता कशी आहे हे ही लक्षात घेतले पाहिजे. त्याकाळी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये इतकी दरी नव्हती, किंबहुना कित्येक मराठी चित्रपट समकालीन हिंदी चित्रपटांपेक्षा सादरीकरणात जास्त उजवे होते. दुर्दैवाने मराठी चित्रपट आता हिंदी चित्रपटांशी स्पर्धा न करता एकतर त्यांची भ्रष्ट नक्कल करतात किंवा हिंदी चित्रपटात नसणारे विषय घेऊन संवेदनशील वगैरे चित्रपट बनवतात. >>पण ते तंत्रदृष्ट्या उत्तम नव्हते, कमी खर्चात बनत आणि विषयही तेच तेच असत. म्हणून तुमचा (भाषा न जाणणार्‍या माणसालाही सिनेमा कळला पाहिजे हा) मुद्दा कळला नाही. तेव्हा ते चालायचे कारण तेव्हाची परिस्थिती. आता तसेच चित्रपट चालतील असे नाही. हिंदी चित्रपटांशी स्पर्धा करून, त्यांचे विषय त्यांच्यापेक्षा नाहीतर किमान त्यांच्याइतक्याच चांगल्या पद्धतीने दाखवले तरच लोक मराठी चित्रपटांना प्राधान्य देतील. आजकाल दाक्षिणात्य चित्रपट इतके चांगले असतात की ते इतर लोकही पाहतात आणि बरेचसे हिंदीत रिमेक (गझनी, रावण वगैरे) करून दाखवले जातात. तसं मराठीचं व्हावं अशी इच्छा धरली तरच थोडं फार भविष्य आहे.

In reply to by नगरीनिरंजन

किंबहुना कित्येक मराठी चित्रपट समकालीन हिंदी चित्रपटांपेक्षा सादरीकरणात जास्त उजवे होते.
हा सुवर्णकाळ कोणता आणि असे कोणते चित्रपट आपण उदाहरणादाखल नमूद करू शकाल? तुलनेसाठी त्यांच्या समकालीन हिंदी चित्रपटांचेही मासले द्यावेत ही विनंती.
दुर्दैवाने मराठी चित्रपट आता हिंदी चित्रपटांशी स्पर्धा न करता एकतर त्यांची भ्रष्ट नक्कल करतात किंवा हिंदी चित्रपटात नसणारे विषय घेऊन संवेदनशील वगैरे चित्रपट बनवतात.
त्यामागे तर साधं धंद्याचं गणित असावं. हिंदी सिनेमाला ज्या व्यापक जनाधाराची शक्यता असते, ती शक्यता मराठी सिनेमाला नसते, नसणार. त्यामुळे मराठी सिनेमा हिंदी सिनेमाशी धंद्यात स्पर्धा करू शकणार नाही. 'नटरंग'सारखा एखादा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी सिनेमा मासल्यादाखल घेतला तरीही तो हिंदी सिनेमाच्या मानानं काहीच धंदा करू शकत नाही असं दिसतं.

In reply to by चिंतातुर जंतू

एक दोन उदाहरणे देतो. पाठलाग या चित्रपटाच्या यशाने प्रभावित होऊन मेरा साया काढण्यात आला. माणूस आणि आदमी (माझ्या समजुतीप्रमाणे) एकाचवेळी मराठी आणि हिंदीत काढून दोन्ही गाजले. आणखीही उदाहरणे असतीलच. पण तुम्हाला खरेच माझा मुद्दा समजला नाहीये. हिंदीशी स्पर्धा केल्याने मराठी चित्रपटाचा व्यवसाय तेवढा होईल असे मी म्हणत नाहीये. पण तशी स्पर्धा करायची वृत्तीच नाहीये असं मी म्हणतोय. चित्रपट निर्मिती हा धंदा आहे हे मान्य पण त्यातही काहीतरी मोठं करायची जोखीम कोणी घेत नाही. जेव्हा स्वतंत्र आणि मोठा विचार करून चित्रपट काढले जातील तेव्हा नक्कीच लोक ते पाहतील. नटरंग वगैरेचं यश हेच सांगतंय की लोक पाहायला तयार आहेत, पण त्यांना हवंय ते देणारे चित्रपट तर काढले पाहिजेत. आता नटरंग चालला म्हणून कोणी पुन्हा तमाशा-लावणीवर चित्रपट काढला तर चालणार नाही. पण तसाच संगीत, उत्तम छायाचित्रण, चांगले कलाकार आणि इतर तांत्रिक अंगांनी उत्तम असलेला चित्रपट चालेल. गुणवत्ता कमी नाहीय, पण निर्माते जोखीम घेत नाहीत त्यामुळे असेच लो बजेट चित्रपट निघणार आणि त्यातला एखादा उत्तम कथा, दिग्दर्शन यामुळे थोडाफार चालणार.

अजून काही चांगले - स्मृतिचित्रे, २२ जून १८९७. सुखांत ही चांगला होता, असे ऐकून आहे - इच्छामरण हा विषय.

In reply to by रेवती

सुखांत नाही आवडला का तुम्हाला? म्हणजे थोडंसं अवास्तव वाटणारं आहे त्यात, पण चित्रपटांत चालूनही जातं. मला तरी विषय आवडला त्याचा... आता प्रतिक्रिया लिहितानाच जाणीव झाली की कदाचित दिग्दर्शन याहून चांगले होऊ शकले असते. पण 'सुखांत' पाहिला तेव्हा विषयच एवढा महत्त्वाचा वाटला की बाकिच्या गोष्टी जाणवल्याच नाहीत.

"बायको पळाली स्टँडवर " हा फार छान सिनेमा वितरणातल्या उणीवेमुळे शहरी प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही असे ऐकले...... त्याचे पोस्टर एकदा शिवाजीनगर स्टँडावर पाहिले होते.. खूप उत्सुकता निर्माण झाली होती हा सिनेमा पहायची.... पण योग नाही आला....

In reply to by भडकमकर मास्तर

"बायको पळाली स्टँडवर " हा फार छान सिनेमा वितरणातल्या उणीवेमुळे शहरी प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही असे ऐकले...... त्याचे पोस्टर एकदा शिवाजीनगर स्टँडावर पाहिले होते..
बापरे !!! त्या पळालेल्या ( दुसर्‍याच्या ) बायकोच्या शोधात मास्तर लगेच ( शिवाजीनगर ) स्टँडावर जातील असे वाटले नव्हते बॉ ;) अवांतर : एकदम फालतु शिनेमा होता, बरेच प्रेक्षक पळाले. असो. - छोटा डॉन

In reply to by भडकमकर मास्तर

"बायको पळाली स्टँडवर " हा फार छान सिनेमा वितरणातल्या उणीवेमुळे शहरी प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही असे ऐकले...... त्याचे पोस्टर एकदा शिवाजीनगर स्टँडावर पाहिले होते.. खूप उत्सुकता निर्माण झाली होती हा सिनेमा पहायची.... पण योग नाही आला....
"बायको पळाली स्टँडवर " हे शिर्षक असलेल्या काही सिडी दत्त मंदीराच्या मागील बोळात मिळतात, इच्छुकांनी लाभ घ्यावा.

दिलीप प्रभावळकरानी मोजक्याच काही चित्रपटात कामे केलेली आहेत. एक डाव भुताचा : हा साधाच पण चांगला चित्रपट होता. कथा दोन गणपतरावांची : या चित्रपटात सुंदर सोपा नैसर्गीक अभिनय काय असतो याचा प्रत्यय प्रभावळकर आणि डॉ.मोहन आगाशे देतात. सुंदर चित्रण , प्रसंगाची सहज मांडणी पुन्हा एकदा राजा परांजपेंचा चित्रपट पहातोय असा आनद मिळतो. रात्र आरंभः दिलीप प्रभावळकरांचा अजून एक आगळा चित्रपट. सरकारनामा: यातील कोकणातील मंत्र्याची बोलण्याची ढब दिलीप प्रभावळकर छोट्या रोल मध्ये देखील लक्षात रहातात मराठीत अनेक गुणी कलाकार आहेत. त्याना वाव मिळेल अशा भुमीका मिळत नाहीत. अशोक सराफ देखील "हम पांच" मालीकेत जी धमाल करतात तसे रोल त्यान मराठीत मिळत नाहीत. मराठी चित्रपटाना उत्त्तमोत्तम कथा मिळू शकत नाहीत असेदेखील नाही. चाम्गले चित्रपट असतील तर प्रेक्षक येतील अशी आता परिस्थिती आहे.

In reply to by विजुभाऊ

चौकट राजा विसरलात काय? या चित्रपटाला आनंद मोडकांचेच संगित होते. तसे प्रभावळकर यांनी काही टुकार भुमिकाही केल्यात ..छक्के पंजे या चित्रपटातील आणि तात्या विंचू.. यातला तात्या विंचूला मात्र माफ करा कारण तो त्यांचा गेस्ट अ‍ॅपिअरन्स होता..जास्त भुमिकातर त्या बाहूल्याचीच होती. ओम फट् स्वाहा!!

रजनीकांत ने मराठी चित्रपटात काम करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याने स्वतः काही केले तरच काहितरी होईल. रजनीकान्त कडून असा चमत्कार होईल का?

In reply to by विजुभाऊ

रजनीकांतने डावा खिसा झटकला तरी एक मराठी चित्रपट सहज निघेल. अशोक सराफला हिरो म्हणून जर बरीच वर्षं स्विकारलं गेलं तर रजनीकांतला नक्कीच स्विकारलं जाईल.;)

गैर हा चित्रपट नुकताच पाहिला. चांगल्या चित्रपटांच्या यादीत त्याचे नाव वाचून खेद वाटला. :) न पटणारे अचाट कथानक, दुबळी तांत्रिक बाजू, सुरकुत्या पडलेला हिरो, आयटम साँगमधले कपडे, सजावट बाजारू बारमधल्या गोष्टींपेक्षाही बेकार वगैरे वगैरे.

In reply to by प्रियाली

अगदी अगदी... मी कालच पाहिला गैर, भंकस वाटला. एखाद्या रडक्या डेली सोपचे ७-८ भाग एकत्र जोडल्यागत वाटले. आणि गाणी तर कुठेही आणि काहीही गरज नसताना घुसवली आहेत. 'त्या रात्री पाऊस होता'चं कथानक जरी चांगलं असलं तरी चित्रपट जरा अतीरंजीत आहे. त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी आणि चिरकणंच जास्तं आहे.

In reply to by अनामिक

त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी आणि चिरकणंच जास्तं आहे.
याच धाग्यावर परत एकदा १००% सहमत. यावेळी अनामिकशी. ही बया किती ओव्हर अ‍ॅक्टिंग करते त्याला तोड नाही. श्वास पासुनच डॉक्यात जायची.... कुठेतरी एकदम ट्रांन्स मध्ये हरवल्यासारख तिच ते बोलणं ऐकलं की शॉट बसतो डोक्याला.

In reply to by प्रियाली

अगदी १००% सहमत. जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा बघण्याची फार ईच्छा होती. पण तेव्हा जमलं नाही. आणि मग राहूनच गेलं. मागच्या महिन्यात राजश्री.कॉम वरून बघितला आणि पैसे वाचल्याचा आनंद झाला. सिनेमा प्रेसेंटेबल झालेला असला तरी हिंदीची कॉपी बनवण्याच्या नादात पार वाट लावली आहे. संदिप कुलकर्णी (हाच हिरो आहे ना?) मात्र एक चांगला अभिनेता आहे. अंकुश चौधरी तर मला वाटतं मराठी सिनेमातला एकमेव 'ग्लॅमरस' हिरो आहे. अवांतरः ह्या आणि आणखी कुठल्याशा एका मराठी सिनेमात मी हिंदीतली गाणी पाहिली. मात्र हिंदीत गाणी करण्याचं प्रयोजन काही लक्षात आलं नाही ?

In reply to by मराठे

ह्या आणि आणखी कुठल्याशा एका मराठी सिनेमात मी हिंदीतली गाणी पाहिली. मात्र हिंदीत गाणी करण्याचं प्रयोजन काही लक्षात आलं नाही ?
कारण मी तरी इतक्यात दुसरा कोणता मराठी सिनेमा पाहिला नाही. :( हा बघून पुढले चित्रपट बघण्याची इच्छा झाली नाही. भयंकर प्रकार आहे तो हिंदी-मराठी गाणी. विशेषतः तीन सराईत चोरांना/ खुन्यांना पकडण्यासाठी पोलिसांची टिम वर्षभर श्रीमंत उद्योगपती, त्याची पार्टनर, आई वगैरेंचे नाटक करते पाहून विशाद वाटला. असली नाटके करण्याची क्षमता असेल तर पोलिसांचे पगार वाढवा अशी मागणी करायला हवी. ;)

वरती बरीच चर्चा झाली आहे .. म्हणुन पुन्हा काही जास्त बोलत नाहि. अवांतर : वयक्तीक रीत्या , मला मराठी चित्रपट खुप आवडतात.. मी हमखास थेटर मध्ये जावुन बरेच मराठी पिक्चत बघितले आहे. खुप नितळ वाटतात ते मला.. मला हिंदी पिक्चर आवडत नाही असे नाही , मी बरेचस से ते ही खुप आवडिने पाहतो .. परंतु घरात झी टॉकीज ही बर्याचदा लावतोच .. मराठी पिक्चर मधील साधी माणसं खुप काही शिकवुन जातात .. संगीत आनि गाण्यात जे मोकळेपण असते ते खुप भावते ...

उत्तम प्रतिसाद, उत्तम संकलन.. आम्ही टाकलेला धागा सार्थकी लागला.. येऊ द्यात अजूनही.. (आनंदीत) तात्या.

मैत्र+इतर प्रतिसादक यांनी मराठी चित्रपटांची चांगली यादी दिलीय. त्यात भर घालण्यासारखा पतकन आठवलेला चित्रपटः 'नॉट ओन्ली मिसेस राऊत'!! बाकी,
'त्या रात्री पाऊस होता'चं कथानक जरी चांगलं असलं तरी चित्रपट जरा अतीरंजीत आहे. त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी आणि चिरकणंच जास्तं आहे.
या अनामिकांच्या वाक्याला हजारदा अनुमोदन. दारू पिणं, ड्रग्ज घेणं आणि तोंड वर करून बरेच जणांशी शारिरिक संबंध असणं हे किंचाळून सांगणं हाच त्यांना अभिनय वाटतो.

In reply to by मस्त कलंदर

नॉट ओन्ली मिसेस राऊत ह्या सुचवणीबद्दल सहमत. त्या रात्री... जरा अतिरंजीत होता हेदेखील मान्य. अमृता सुभाष ह्या अभिनेत्रीच्या अभिनयाबद्दल फारसं बोलु नाही शकणार मी, पण, "दारू पिणं, ड्रग्ज घेणं आणि तोंड वर करून बरेच जणांशी शारिरिक संबंध असणं हे किंचाळून सांगणं हाच त्यांना अभिनय वाटतो." ह्या वाक्यावर मात्र आवर्जुन असहमती नोंदवु इच्छितो. मला वाटतं, आपण त्या व्यक्तिरेखेचा मुळात विचारच करत नाहीये. जाणत्या-अजाणत्या वयाच्या सीमारेषेवर भावाशी, वडिलांशी ताटातूट झालेली असणं, आईचं त्रयस्थ पुरुषासोबत (भले पराकोटीच्या असमर्थतेतुन किंवा नाईलाजातून म्हणा, पण त्या वयाच्या मुलीसाठी ते किती वाईट असेल?) शय्यासोबतीला जाणं, पुढे अशा ताणांमधून व्यसनांच्या आहारी जाणं, आईबद्दलची कुजबुज आजुबाजूला ऐकुन तथाकथित सामाजिक बंधनांची चौकट उबग येऊन तोडण्याच्या रागातून शरीरसंबंधांबद्दल धाडसी होणं, ह्या सगळ्यातून गेलेली व्यक्तिरेखा रंगवताना कोणत्या प्रकारचा अभिनय अपेक्षित असु शकतो? 'लोक बायका ठेवतात, मी पुरुष ठेवते' अशी विधानं करणं...ह्याचाच एक प्रकार वाटतो. दारु/ड्रग्जच्या सेवनानंतर माणूस आपल्यावरचा ताबा ठेवु शकत नाही, त्यावेळी त्याच्या आतला दडलेला खरा माणुस बाहेर येतो ना? मग तो जर रागानं पिचलेला असेल, उद्वेगानं भरलेला असेल तर तो शांतपणॅ कसा व्यक्त होईल? ती व्यक्तिरेखा मुळातच सर्वसामान्य चौकटीत न जगलेली आहे. तिला शालीनतेचे, सभ्यतेचे सार्वत्रिक निकष कसे लावता येतील? दारुचे दोन ग्लास पोटात गेल्यावर तारस्वरात किंचाळत, अरेरावी करत बोलणारे पाहिले आहेत. कित्येक असतील..ते आपण वस्तुस्थिती म्हणुन स्विकारत असु तर पडद्यावर एक मुलगी/बाई अशाच नशेच्या आहारी जाऊन किंचाळली तर ते अति का वाटतं? असो! मात्र, 'त्या रात्री पाऊस होता' ची ३ बलस्थानं आहेत (असं मला वाटतं.) १. सोनाली कुलकर्णी (थोरली हो..धाकटीला आम्ही सोनाली नाही, बाहुली म्हणतो. ;) ) २. सयाजी शिंदे. ३. शिंद्यांनी साकारलेला आबा (आबाच ना? त्या वर्कशॉपवरच्या गड्याचं नक्की नाव आठवत नाहीये आता...) ह्या तिघांसाठी मी आवर्जुन पाहिला हा सिनेमा.

In reply to by धमाल मुलगा

वर्कशॉपवरच्या गड्याचं...
माझ्या मते ते तानाजी उमप!!! चित्रपटातलं त्यांचं नांव आठवत नाही आता..
अमृता सुभाष ह्या अभिनेत्रीच्या अभिनयाबद्दल फारसं बोलु नाही शकणार मी, पण, "दारू पिणं, ड्रग्ज घेणं आणि तोंड वर करून बरेच जणांशी शारिरिक संबंध असणं हे किंचाळून सांगणं हाच त्यांना अभिनय वाटतो." ह्या वाक्यावर मात्र आवर्जुन असहमती नोंदवु इच्छितो.
अशा असहमतीची अपेक्षा होतीच. अर्थात जसं मला माझं मत असू शकतं तसंच ते इतरांना आहेच. असो. माझा मुद्दा असा, की अमृता सुभाषने साकारलेली मुलगी ही सर्वसाधारण व्यक्तिरेखा नाही. पण तेही राग, लोभ, मद, मोह मत्सर असलं जे जे काही असतं ते असणारं एक जिवंत माणूस आहे. हे सगळे इतर पैलू दिसण्यापेक्षा तिचं दारू पिणं आणि किंचाळणंच जास्त दिसतं.
ती व्यक्तिरेखा मुळातच सर्वसामान्य चौकटीत न जगलेली आहे. तिला शालीनतेचे, सभ्यतेचे सार्वत्रिक निकष कसे लावता येतील? दारुचे दोन ग्लास पोटात गेल्यावर तारस्वरात किंचाळत, अरेरावी करत बोलणारे पाहिले आहेत.
खरंय. पण अशा प्रकारचे पिक्चर पाहिल्यावर आपल्याला नक्की काय लक्षात रहावं अशी अपेक्षा असते, आणि हा सिनेमा पाहून काय लक्षात राहातं हाही मुद्दा आहेच. पूर्ण पिक्चरभर तसेच प्रसंग दाखवणं( उठसूट ती ड्रगची सुई हातात खुपसून घ्यायची, किंवा हा ढमका माझा ठोक्या आहे असं म्हणणं) यापेक्षा काही प्रसंग आक्रस्ताळेपणाचे आणि काही तिच्या मनाची संवेदनशीलता, तरलता दाखवणारे असतील, तर त्याची एकूणातली परिणामकारकता वाढते. थोडक्यात 'सटल्टी' नावांच्या प्रकरणाला थोडाफार थारा असावा, नाहीतर शेवटी 'नाना पाटेकर' होतो. याच चित्रपटातला एक प्रसंग, बहुधा शेवटचा प्रसंग आहे तो: 'सुबोध भावेला त्याची आई बेवारशासारखी त्याच्या ऑफिससमोर दोन दिवसांपासून मरून पडलेली आहे हे कळतं'. हा प्रसंग जसा चित्रित आणि अभिनित झालाय, तसे अमृताचे काही प्रसंग रंगवायला हवे होते. चाकोरीबाहेरचे चित्रपट मला आवडतात. हा आक्रस्ताळेपणा टाळला गेला असता तर कदाचित माझी दुसर्‍यांदा हा मूव्ही पाहण्याची हिंमत झाली असती.

In reply to by मस्त कलंदर

>>हे सगळे इतर पैलू दिसण्यापेक्षा तिचं दारू पिणं आणि किंचाळणंच जास्त दिसतं. मला असं वाटतं, की आपल्या चौकटी पक्क्या बांधिव असतात, त्याच्यात हे बसत नसल्यानं आपल्याला ते जास्त ढळढळीतपणे दिसत राहतं आणि तेच डोक्यात राहतं. तसं पाहता, तिचे बाबांसोबतच्या आठवणींचे हळवे क्षण भावाला सांगताना, किंवा आईची अवस्था सांगताना पिळवटून जाणं, आणि पुन्हा 'सेल्फ-मेड' असल्याचा झगा चढवल्यासारखं दुसर्‍या क्षणी तो दु:खी चेहरा लपवून कुर्रेबाजपणा दाखवणं हे ही अगदी नोटेबल आहेच. फक्त आपल्या चौकटीमुळं ते 'पांढर्‍याशेजारी काळा ठेवल्यावर काळा जास्त गडद दिसतो' असं दारु, ड्रग्ज आणि किंचाळणं आठवत राहतं असं मला वाटतं. >>माझ्या मते ते तानाजी उमप!!! येस! उमप..उमप. माय मिश्टेक.
काही प्रसंग आक्रस्ताळेपणाचे आणि काही तिच्या मनाची संवेदनशीलता, तरलता दाखवणारे असतील, तर त्याची एकूणातली परिणामकारकता वाढते
. ते तसे आहेतही. फक्त 'एम्बॉयसिंग'चा प्रश्न येतोय असं माझं मत. >> थोडक्यात 'सटल्टी' नावांच्या प्रकरणाला थोडाफार थारा असावा, सटल्टी? 'त्या रात्री..'मध्ये सगळंच जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न आहे असं जाणवतं. मग अशा व्यक्तीरेखेलाच का सटल्टीचा डिस्काउंट? मला ती शब्दशः वस्तुस्थिती वाटते, कारण अशा आक्रस्ताळेपणाचा बळी असलेल्या व्यक्तीसोबत काही काळ मित्र म्हणून घालवला आहे. काहीही वेगळं चित्र पाहतोय असं वाटलंच नाही. एखाद्या लहान वयात गुन्हेगारीत पडलेल्याशी गप्पा मारताना लक्षात येतं, की त्याच्या गप्पांचा ओघ फिरुन फिरुन 'मी ह्याला कसा बडवला/ मी त्याला कसा कापला' वगैरेवर येतो. एखाद्या विटलेल्या व्यक्तीशी बोलताना, 'माझ्याच नशीबात अशी दु:खं येतात..' वगैरे सूर असतो. तसंच ह्या रस्त्यानं जाणार्‍या मुलीच्या तोंडी सतत 'अमुक माझा ठोक्या आहे' वगैरे येणं फार वेगळं वाटत नाही. बाकी, नशेबाबत प्रत्येकाचे लिमिट्स, मापदंड वेगळे. मी चेनस्मोकर असेन तर सतत माझ्या तोंडात सिगारेट असेल, दारुड्या असेन तर सतत नशेत असेन,ऐपत असेल तर खिशात फ्लास्क घेऊन फिरेन. तसंच तिचे ड्रग्जचे इंजेक्शन्स घेण्याची वारंवारता! कुणाला आठवड्यातून एकदा पुरतं, कुणाला जरा चुणचुण कमी झाली की परत डोस हवा असतो. त्यामुळं ते अतिरेकी का दिसावं ते कळालं नाही. :) अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री हे तर आहेच. म्हणुनच आपण बोलु शकतो. :)

चित्र गेल्या ५-६ वर्षात बदलतंय. मराठी चित्रपटसृष्टीत येणं बंद झालेला पैसा परत येऊ लागलाय. त्या आधी ५ लाखात फिल्म करायची १६ मिमि वर, जत्रेत चालवायची, कोपर्‍यात रिलीज करायची आणि पुढच्या फिल्मसाठी १५ लाखाची सबसिडी घ्यायची. मग परत तेच चक्र असा प्रकार खूप जास्त चालत होता. गणितं बदललीयेत. ३५-४० लाखात फिल्म करून त्याची रिकव्हरी तर अगदी सोपी झालेली आहे. बरी गाणी, ठिकठाक स्टारकास्ट, ठिकठाक कथा आणि थोडा चकचकाट/ ग्लॅमर असेल तर १ कोटी पर्यंतची ही रिकव्हरी शक्य झालेली आहे. हे सगळे बदल अक्षरशः ५-६ वर्षात घडलेत. कुठलाही व्यवसाय आधी आर्थिकरित्या सबळ झाल्यावर मगच प्रयोगशील इत्यादी होतो ना. थोडा वेळ लागेल. पण सगळ्या पातळ्यांवर बदल होतोच आहे. हिंदी चित्रपटांशी तुलना करण्यात अर्थ नाही. कारण तिथलं गणित वेगळं आहे. मराठी व्ह्यूअरशिप १ असेल तर हिंदी १० आहे.. हा निव्वळ मराठी भाषिक + मराठी बघणारे आणि हिंदी भाषिक + हिंदी बघणारे यांच्या संख्येतला फरक आहे. तो रहाणारच आहे. तुलना करायचीच असेल तर प्रादेशिक चित्रपटसृष्टींशी करायला हवी. उदाहरणार्थ बंगाली किंवा मल्याळी. आणि ती तुलना करताना प्रेक्षक म्हणून आपलीही तुलना बंगाली वा मल्याळी प्रेक्षकांशी करून बघायला हरकत नाही. चित्रपटसाक्षर प्रेक्षकांमुळे त्या त्या चित्रपटसृष्टींची भरभराट होण्यासाठी मोठा हातभार लागलाय हे विसरून चालणार नाही. निर्मात्यांची/ दिग्दर्शकांची बाजू घेण्यासाठी हे लिहिलेले नाही. पण इथे लिहिणारे बरेचसे प्रेक्षकच आहेत तर त्यांनीही किंचित अंतर्मुख होऊन हा विचार करून पहायला काय हरकत आहे? असो..

In reply to by नीधप

".....चित्रपटसाक्षर प्रेक्षकांमुळे त्या त्या चित्रपटसृष्टींची भरभराट होण्यासाठी मोठा हातभार लागलाय हे विसरून चालणार नाही...." ~ या वाक्यात फार मोठा अर्थ आहे, जो सध्यातरी बंगाली आणि मल्याळी प्रेक्षकांनाच प्रामुख्याने लागू होतो. सत्यजीत रे तर राहू देत, पण ऋत्विक घटक, मृणाल सेन, बुद्धदेव दासगुप्ता, गौतम घोष, ऋतुपर्ण घोष हे बंगाली जादुगार आणि अदूर गोपालकृष्णन, शाजी करुण, जॉन अब्राहम, जी.अरविंदम या मल्याळींनी जी मोहिनी अखिल भारतीय चित्रपटप्रेमीवर घातली आहे, ती पाहता त्या दोन भाषा न कळतादेखील त्या त्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांची फ्रेम न् फ्रेम कशी जिवंत करता येते हे वेळोवेळी दाखविले आहे. आणि यांचे बजेट तर काय असते एका चित्रपटाचे? इंग्रजीत ज्याला "Shoe String" म्हणतात त्याच धर्तीचे....तरीही आज भारतीय चित्रपटसृष्टीचे जागतिक पातळीवर (जे काही असेल थोडेफार ते) नाव आहे ते नि:संशय बंगाली आणि मल्याळी चित्रपटांमुळे. [मल्याळी दिग्दर्शक प्रियदर्शन यानी हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील अलिकडे जे स्पृहणीय यश मिळविले आहे तेदेखील लक्षात ठेवले पाहिजे.] कन्नडमधील गिरिश कासारवल्ली, शंकर नाग (फार अकाली गेली ही प्रतिभावंत व्यक्ती), गिरिश कर्नाड ही काही उल्लेखनीय नावे. अशावेळी मराठीकडे नजर टाकल्यास किती असे दिग्दर्शक नजरेसमोर येतील ज्याना संपूर्ण भारत ओळखू शकेल? ~ एकतरी ??? आणि असा दिग्दर्शक इथे नसेल तर त्याला तितकाच जबाबदार इथला प्रेक्षक वर्गदेखील असू शकतोच. तो खर्‍या अर्थाने "साक्षर" होणे गरजेचे आहे. इन्द्रा

In reply to by नीधप

आता गरज आहे ते चांगल्या प्रसिद्धीतंत्राची. हिंदी चित्रपट नुसत्या गाण्यांवर हिट होतात. मराठीत झीचे सोडले तर बाकी चित्रपटांमधील गाणी ऐकूही येत नाहीत. नंतर कुठेतरी सारेगमप किंवा तत्सम कार्यक्रमात ऐकल्यावर मग ही गाणी कळतात. हल्ली वृत्तवाहिन्या काही कार्यक्रमांमध्ये नवीन चित्रपट, मुलाखती वगैरे दाखवतात पण ते किती लोकांपर्यंत पोचतात कोणास ठावूक. नटरंग सारख्या सिनेमांनी प्रसिद्धी मिळाल्यावर चित्रपट चालतो हे दाखवून दिले आहेच. गाणी, प्रोमो या गोष्टींवर पैसे खर्च करण्याची तयारी निर्मात्यांनी दाखवली पाहिजे. - ओंकार.

In reply to by नीधप

. तुलना करायचीच असेल तर प्रादेशिक चित्रपटसृष्टींशी करायला हवी. उदाहरणार्थ बंगाली किंवा मल्याळी. का? तुलना तामिळ वा तेलगूशी का नको? ह्या भाषकांची संख्या साधारणतः मराठी भाषकांशी मिळतीजुळती आहे, तरीही त्यांना हिंदी व्ह्यूअरशिपची अडचण का येत नाही? कुठलाही व्यवसाय आधी आर्थिकरित्या सबळ झाल्यावर मगच प्रयोगशील इत्यादी होतो ना. अगदी! आधी तामिळ-तेलगूसारखा पैसा येऊदे मग बंगाली-मल्याळीची उंची गाठण्याचा विचार करता येईल.

In reply to by नीधप

शेवटी सगळा खेळ आहे तो पैशाच्या डोलार्‍यावर. पण मला एक प्रश्न पडतो, अजुन आपल्याकडं सस्पेन्स, थ्रिलर, अ‍ॅक्शन, कोर्टरुम ड्रामा असे प्रकार एकतर हाताळत नाहीत, किंवा खूपच ढिसाळपणे हाताळले जातात. तर असं का व्हावं? कोकणासारखं निसर्गसौंदर्य हाताशी आहे, त्याच कोकणाच्या पोटात भुताखेतांच्या गोष्टी आहेत..पण वापर मात्र परिणामकारकरित्या करुन घेणं नाही. असं का व्हावं हे मात्र कळत नाही.

२२ जून १८९७ हा एक उत्तम मराठी सिनेमा. १०० वर्षापूर्वीचे वातावरण, भाषा, वेषभूषा सगळे उत्तम. सिंहासन आणि सामना तर प्रश्नच नाही. पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात. जैत रे जैत: हृदयनाथांचे संगीत आणि मातब्बर गायक गायिकांचे आवाज आहेत. पण आदिवासी ठाकर असली भाषा बोलत नाहीत. ठाकरांची भाषा थोडेबहुत ऐकलेली असल्यामुळे मला हे कायम खटकते. ना.धो महानोरांची भाषा ह्या सिनेमाकरता अगदी चुकीची आहे. पाठलाग आणि पडछाया हे एक चांगले रहस्यपट होते. पण ही परंपरा खंडित होऊन एकाच छापाचे सिनेमे यायला सुरवात झाली. हा खेळ सावल्यांचा हाही एक चांगला भयपट.

In reply to by हुप्प्या

+१ २२ जून, सिंहासन, सामना, शामची आई या सिनेमांमधे ती कथा ज्या काळात ज्या ठिकाणी घडली असेल ते ठीकाण हुबेहुब उभे करण्याची सफाई जी दिसली ती तितकी इतर सिनेमात दिसली नाही. अपवाद अर्थातच आहेत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

"...२२ जून...." खरे तर घटना ज्या काळात घडली त्या काळातील वातावरण जसेच्या तसे उभे करणे हे पटवर्धन दांपत्यापुढील मोठे आव्हान होते. दोघेही आर्किटेक्ट असल्याने त्यांनी शूटिंगपूर्वी महिनोनमहिने "काळ उभारणी" साठी जी धडपड केली ती कशी सार्थकी लागली हे श्री.नचिकेत आणि सौ.जयू पटवर्धन यानी वेळोवेळी त्या संदर्भात केलेल्या लेखनामुळे तसेच व्याख्यानामुळे ऐकताना चित्रपटप्रेमी प्रभावित होतो. त्यातही १०० वर्षापूर्वीच्या "पुण्या"साठी "वाई" निवडून चापेकर वाडा असा [जशाचा तसा] काही उभा केला आहे त्याबद्दल त्याना वंदनच केले पाहिजे. अनेक स्त्री पात्रे आहेत चापेकरांचे घरचे वातावरण दाखविण्यासाठी....पण एकाही पात्राला एका ओळीचाही थेट संवाद नाही, हे एक दिग्दर्शकद्वयाचे नेमकेपणाचे वैशिष्ट्य....दामोदरपंतांना आरोपाखाली नेण्यासाठी इन्स्पेक्टर ब्रुईन (की ब्रेविन?) घरी येतो आणि त्याना घेऊन जाताना दामोदर चापेकरांची पत्नी पाण्याचा पेला देताना 'शेवटची' अशी एक नजर पतीकडे टाकते, ते अबोल दृश्य अंगावर शहारे निर्माण करणारेच आहे. सर्वच पात्रांची अचूक निवड हेदेखील २२ जूनची एक जादाची गुणवत्ता.... मुख्य तर राहू दे, पण अगदी 'हवालदार रामा पांडू' देखील. पुणे विद्यापीठ आणि गणेश खिंडीचीही बांधणी आणि चित्रीकरण पाहताना क्षणभरही कुठे जाणवत नाही की, चित्रपटाचे शूटिंग १९८० सालातील आहे. या चित्रपटाबद्दल पटवर्धन दांपत्याला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जी काही पारितोषिके मिळाली आहेत, तित 'आर्ट डायरेक्शन' चे जे एक आहे, त्याचा त्याना विशेष आनंद होत असेल. निर्माते आणि दिग्दर्शक 'कलादिग्दर्शना'कडे अशा गंभीरतेने लक्ष देतील तर मराठी भाषेतील अनेक कथारत्ने "२२ जून" च्या तोडीची होऊ शकतील....[अशी आशा वाटते] इन्द्रा

आज काळाचे छान मराठी चित्रपट आणि त्यांचे विषय हाताळणी उत्कृष्ट आहे. खालील काही चित्रपट जरूर पहा १) नटरंग २) झेंडा ३)त्या रात्री पाऊस होता ४) मुंबई पुणे मुंबई ५)जोगवा ६)ऑकसीजन ७)एक डाव धीबी पछाड तरी आपण वरील चित्रपट पाहून परत एकदा चर्चा करावी ............................................................................................... नसती उठाठेव ..............................................................................................

"""'त्या रात्री पाऊस होता'चं कथानक जरी चांगलं असलं तरी चित्रपट जरा अतीरंजीत आहे. त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी आणि चिरकणंच जास्तं आहे.""" त्या रात्री पाऊस होता मधील अमृता सुभाष चा अभिनय विषयाशी निगडीत असल्याने मला नाही वाटत त्यात काही गैर असेल असे वाटत नाही आणि हो drugs ,शारीरिक संबंध हे सगळे विषयाशी सलंग्न आहे .त्यामुळे ते योग्य आहे असे मला वाटते .................................................................... नसती उठाठेव ........................................................

त्या रात्री पाऊस होता मधील अमृता सुभाष चा अभिनय विषयाशी निगडीत असल्याने मला नाही वाटत त्यात काही गैर असेल असे वाटत नाही आणि हो drugs ,शारीरिक संबंध हे सगळे विषयाशी सलंग्न आहे .त्यामुळे ते योग्य आहे असे मला वाटते >> असेच म्हणतो !! नाहीतर अगंवर धड कपडे नसलेल्या हिन्दी अभिनेत्र्या !!

मराठी सिनेमानं चांगला व्यवसाय करावा की रसिकप्रिय व्हावं याविषयी अनेक प्रतिसादांमध्ये दोन वेगवेगळ्या टोकांची मतं दिसत आहेत. मुळात कोणत्याही स्थानिक किंवा जागतिक पातळीवरच्या चित्रपटसृष्टीत असे दोन प्रवाह दिसतातच. त्यामुळे ते मराठीतही असणं हे स्वाभाविक वाटतं. पण 'प्रभात'काळ सोडता दोन्ही बाबतींत मराठी सिनेमा नेहमीच इतरांहून मागे होता हे सत्य आहे. धंदा करण्याच्या बाबतीत दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमाशी तुलना केली तर हे सहज लक्षात येईल. पण एक बाजारपेठ म्हणून मराठीच्या अंगभूत मर्यादा आहेत. त्या लक्षात घेता आशेची परिस्थिती वाटत नाही. शिवाय आहे त्या बाजारपेठेत बर्‍याचशा मराठी जनतेला आवडेल असा सिनेमा बनवणं आता अशक्यच वाटतं. शहरी/ग्रामीण, तरुण/मध्यमवयीन, मल्टिप्लेक्स-सिंगल पडदा-तंबू अशांत विभागल्या गेलेल्या आजच्या मराठी प्रेक्षकाच्या आवडीनिवडी खूपच भिन्न आहेत; म्हणून आहे ती बाजारपेठही विभागली जाते. खेडोपाडी तंबूत दाखवला जाणारा मराठी सिनेमा आता आपल्या मराठी वाहिन्यांवर आणि पुण्या-मुंबईतल्या चित्रपटगृहांत येऊ शकत नाही. त्याउलट पुण्या-मुंबईत प्रदर्शित होणारा सिनेमा तंबूत वा दुसर्‍या-तिसर्‍या फळीच्या शहरांत जात नाही. रसिकप्रियतेचे निकष पाहताही बंगाली/मल्याळी रसिकप्रिय चित्रपटांच्या तुलनेत आताआतापर्यंतचा मराठी सिनेमा मागेच पडत आला आहे. कदाचित 'डोंबिवली फास्ट' आणि 'श्वास'नंतरच्या वेगळ्या मराठी सिनेमाकडून (संदीप सावंत, निशिकांत कामत, परेश मोकाशी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, नंदू माधव वगैरे नवे दिग्दर्शक) काहीतरी अपेक्षा ठेवता येतील. अर्थात, त्यांनाही रसिकप्रिय हिंदी सिनेमाची भुरळ पडली नाही तरच ते शक्य आहे. थोडक्यात, मराठी सिनेमाला जागतिक किंवा भारतीय पातळीवर दखलपात्र करण्याची आशा/अपेक्षा ठेवायची झालीच तर त्यातल्या त्यात रसिकप्रिय सिनेमाकडूनच तशी ठेवता येईल असं वाटतं.

माझे काही अतिआवडते चित्रपट १) माहेरची साडी का आवडतो? यातली रडारड पाहून आपले फार चांगले चालले आहे असे वाटते. जेव्हा जेव्हा कधी दु:खाचे प्रसंग येतील तेव्हा हा पहा..म्हणजे आपले दु:ख थोडे हलके होते. २) टारगेट संजय नार्वेकर, अंकूश चौधरी, सिद्धार्थ जाधव यांनाही पोटापाण्यासाठी असल्या चित्रपटात काम करावे लागते हे आपल्याला उमजून घेण्यासाठी. ३) सचिनचा आत्मविश्वास्, नवरी मिळे .. आणि बनवाबनवी सोडून कोठलाही चित्रपट..तसेच अशोक आणि लक्षाचे काही चित्रपट (चंगू मंगू वगैरे..) फु बाई फु बघताना हसू यावे यासाठी आधी असला एखादा सिनेमा पहावा..म्हणजे अति बोअर झाल्याने थोडेफार हसू देखील फु बाई फु बघताना येईल.. अजून यादी आहे. परत कधीतरी लिहीन...

In reply to by योगी९००

वरील प्रतिसाद वाचुन ठार झालेलो आहे याची नोंद घ्यावी मिस खादाड माउ !! माझे काही अतिआवडते चित्रपट १) माहेरची साडी का आवडतो? यातली रडारड पाहून आपले फार चांगले चालले आहे असे वाटते. जेव्हा जेव्हा कधी दु:खाचे प्रसंग येतील तेव्हा हा पहा..म्हणजे आपले दु:ख थोडे हलके होते. अरारारारारारा !! _/\_ त्या मनोहरकांकाच्या डोक्यात तिडीक जाइल ना !! आत बाकीच जिवंत झाल्यावर........

बरीच नावे मिळाली. यात हे तीन घ्या. १. एक कप च्या (सुहास ने वरती दिला आहे हे आत्ता नंतर दिसले) २. वासुदेव बळवंत फडके ३. घराबाहेर (१९९९ मधे आलेला, मोहन जोशी, सोनाली कुलकर्णी, सुहास जोशी, सचिन खेडकर यांच्या भूमिका असलेला चित्रपट. एक मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव होतो आणि तेथील आमदार (की खासदार लक्षात नाही) आपल्या मुलीला उभी करून निवडून आणतो. मग ती केवळ कठपुतळी न राहता स्वतःचा प्रभाव कसा पाडते वगैरे). लालबाग-परळ सुद्धा चांगला आहे.

In reply to by फारएन्ड

घराबाहेर मध्ये प्रशांत दामलेंचे काम पहिले आणि वाटले की का हा माणूस स्वतःला विनोदी साच्यात अडकवून बसला आहे? सचिन खेडेकर त्याच्या कानाखाली मारतो त्यानंतरचे त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव तर मस्तच.

आतापर्यंत उल्लेखिलेल्या बहुतांश"चांगल्या मराठी" चित्रपटांचे विषय हे पिटातल्या पब्लिकच्या डोक्यावरुन जाणारे आहेत. अश्या चित्रपटांचा फक्त घरी पाहुनच आस्वाद घेता येऊ शकतो. आणि बर्याचदा अश्या चित्रपटात प्रतिकात्मकतेचा अट्टाहास (दिग्दर्शनाच्या नावाखाली) घातलेला दिसुन येतो. अशोक सराफचा "वजीर" असाच डोक्यात गेला होता. "नॉट ओन्ली मिसेस राऊत" मधला तुषार दळवी तर कुठल्याश्या कादंबरीतील वाक्य जशीच्या तशी बोलतोय का काय असे वाटले. दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ जसे लॉयल फॅन फॉलोइंग होते तसे सध्या कुठल्याही मराठी कलाकाराला नाही.त्यामुळे हिंदी अथवा दाक्षिणात्य चित्रपट जसे केवळ कलाकाराच्या जोरावर चालु शकतात तसा प्रकार मराठीत सध्या तरी होताना दिसत नाही. "सामना" काही दिवसांपूर्वीच युट्युबवरुन पाहीला.आणि तरीदेखील चित्रपटाचा इम्पॅक्ट जाणवला.असे चित्रपट नेहेमी नेहेमी बनणे मुश्किलच.

१०० प्रतिक्रीया झाल्या आहेत. पण बहुतांशी प्रतिक्रीया या सिमीत (Limited) वाटल्या. एकतर निराशेचा सुर किंवा टिंगलीचा सूर. काहिंनी थोड्या मोजक्या सिनेमांची उदाहरणे दिली आहेत ती पुरेशी नाहीत. एक गोष्ट मान्य करावे लागेल मराठी सिनेमा तमाशापट, (टुकार) इनोदी सिनेमांच्या लाटे बाहेर आला आहे आणि नक्कीच वेगवेगळे विषय हाताळले जातात. मागील काळात सामना, उंबरठा, जैत रे जैत इत्यादी सिनेमे आले. पण त्यांची संख्या मोजकीच होती. आता एक नजर पुढील यादीवर टाकू. ध्यासपर्व, श्वास, वजीर, सरकारनामा, तू तिथे मी, बनगर वाडी, गोजिरी, सातच्या आत घरात, श्वास, नितळ, सनई चौघडे, विहीर, रीटा,गोष्ट छोटी डोंगराएवढी, कायद्याचे बोला, नटरंग, टिंग्या, जोगवा, डोम्बिवली फास्ट, वळू, वासुदेव बळवंत फडके, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई-पुणे-मुंबई, मी सिंधुताई सपकाळ, गाभ्रीचा पाउस, गैर, गोष्ट छोटी डोंगराएवढी, हरिश्चंद्राची फॅक्टरी इत्यादी हे अलिकडच्या काळातले काही चित्रपट. सगळे चित्रपट उत्तम आहेत असा दावा नाही. पण सर्वात महत्वाची गोष्ट वेगवेगळे विषय हाताळण्याचे धाडस निर्माते/ दिग्दर्शक दाखवत आहेत. दुर्दैवाने त्याबद्दल कोणिही लिहीलेले आढळेले नाही. मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल नक्कीच वेगळ्या वाटेवर चालली आहे आणि हे आशादायक चित्र आहे हे मान्य करायला हवे. (जाताजाता-शतकपुर्ती साठी धागाकर्त्याचे अभीनंदन)

In reply to by चिंतामणी

चांगला आढावा घेतला आहे. अजुन एक मी आधी विसरले होते. अनाहत - अमोल पालेकरांनी दिग्दर्शित केलेला आणि सोनाली बेंद्रेचा पहीला मराठी चित्रपट. तिचा अभिनय ठिकठाक म्हणता येइल, पण ती दिसते चांगली यात आणि ते जुन्या काळचे वातावरण, राजे-रजवाडे दिग्दर्शकाने चांगले जमवुन आणले आहे.

In reply to by चिंतामणी

श्री.चिंतामणी... मीदेखील हे १००+ प्रतिसाद मनापासून वाचले आहेत, पण तुम्ही म्हणता तसा निराशेचा सूर असेल काही प्रतिसादात, पण त्याच्या तुलनेने टिंगलीची लहर प्रकर्षाने जाणवली नाही. हेही मान्य की तमाशा आणि टुकार विनोदी चित्रपटाच्या गर्तेतून मराठी चित्रपट बाहेर येऊन अगदी जागतिक पातळीपर्यंत पोहोचण्याची स्वप्ने पाहात आहे. पण खरी अडचण आहे व जी अद्यापि सुटू शकलेली नाही ती म्हणजे वितरणव्यवस्था. आज इंटरनेटमुळे सारे जग कीबोर्डच्या एका स्ट्रोकने जवळ आले आहे, मी अत्यंत दूर अशा खेडेगावात राहूनदेखील जगातील कित्येक देशातील नेटर्सबरोबर या विषयावर संवाद साधून त्याना 'मराठी चित्रपटाने मारलेली भरारी' बद्दल तासनतास सांगू शकतो, जेणेकरून त्यानाही इथल्या प्रगतीबाबत कुतहूल वाटेल....पण हे केव्हा घडेल?? तर मी स्वतः तुम्ही प्रतिसादात दिलेले चित्रपट पाहिले तर...! पाहिले आहेत का? तर उत्तर आहे...."नाही"....हे निराशजनक असेल (नव्हे आहेच...) तर याला जबाबदार परत त्या निर्मात्याचीच. कारण मी काही मुंबई-पुणे इथे येऊन तर मराठीने चित्रपट सादरीकरणात केलेली प्रगती पाहू शकत नाही. टीव्हीवर माझा विश्वास नाही. चित्रपट भावायचा असेल तर तो शांतपणे थिएटरमध्ये जाऊन पाहिला तरच ते शक्य आहे...अन्यथा ईडियट बॉक्सवर दर पाच मिनिटांनी धो-धो कोसळणारा तो जाहिरातींचा पूर पाहून डोळे आणि मन विटून जाते...कसा भावेल कितीही चांगला असला तरी तो चित्रपट !! मी चित्रपट प्रेमी आहे....अन् या विषयावर तासनतास लिहू बोलू शकतो, पण आता तुमच्या यादीतील शीर्षकांवर नजर टाकली असता मला जाणवले की, नियमित थिएटरमध्ये मी यातील 'नटरंग' आणि 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे दोनच चित्रपट पाहिले आणि तेही सार्‍या महाराष्ट्रात डंका मारला म्हणून इथे कोल्हापुरात प्रदर्शित झाले. बाकीपैकी 'श्वास' आणि 'विहीर' फिल्म क्लबतर्फे छोट्या थिएटरात ....आता राहिलेल्या यादीतील बाकीचे सर्व म्हणजे सुमारे ८०% चित्रपटांनी माझ्या शहराचा नाकाही पाहिला नाही. "फॅक्टरी..." फार बोलबाला झाला म्हणून अगदी नाईलजास्तव झी टॉकिजवर पाहात बसलो...पण मन रमले नाही...त्यामुळे त्याबाबत जे बोलले/लिहिले गेले त्यावरूनच त्याच्या दर्जाची अटकळ बांधणे क्रमप्राप्त आहे. असे जर असेल तर इथे संस्थळावर चर्चा करताना 'निराशेचा' जो सूर येत राहील त्याला जबाबदार निर्मातेच आहेत असे मी म्हणेन. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

आता राहिलेल्या यादीतील बाकीचे सर्व म्हणजे सुमारे ८०% चित्रपटांनी माझ्या शहराचा नाकाही पाहिला नाही. अशी अवस्था असेल तर बोलणेच खुंटले. हे चित्रपट सर्वत्र पोहोचत नसतील तर दुर्दैव आहे. परंतु मी म्हणलो आहे की विषयात विविधता येउ लागली आहे हा मुद्दा बाद होत नाही. मी विविधतेबद्दल बोललो आहे. सगळेच चित्रपत उत्त्म आहेत असे नाही म्हणालो. मी आशा व्यक्त केली की मराठी चित्रपटसृष्टी चांगल्या वाटेवर आहे आणि उत्तम होईल. अजून एक आशा व्यक्त करतो की हे सगळे चांगले चित्रपट मराठी सिनेमांचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरातसुध्दा प्रदर्शीत होतील.