Skip to main content

.

.

Published on 01/12/2010 - 19:57 प्रकाशित मुखपृष्ठ
.

याद्या 11613
प्रतिक्रिया 58

कधीकधी एखादी नकोशी व्यक्तीसुद्धा हुरहुर लावून जाते खरी
ही अगदी नेमकी भावना व्यक्त केली आहेस प्रियाली. सगळं असतानासुद्धा कोणी आपलं आयुष्य असं उधळून का द्यावं या प्रश्नाला काही उत्तर नाही. एका अनाथ मुलाला नियतीने एक संधी दिली होती चांगलं आयुष्य जगण्याची, पण ते आयुष्य असं वार्‍यावर गेलं हीच नीतिशची नियति असावी. काही गोष्टीना उत्तर नसतं आपण फक्त असं का म्हणून विचार करत रहातो...

In reply to by पैसा

एका अनाथ मुलाला नियतीने एक संधी दिली होती चांगलं आयुष्य जगण्याची, पण ते आयुष्य असं वार्‍यावर गेलं हीच नीतिशची नियति असावी. काही गोष्टीना उत्तर नसतं आपण फक्त असं का म्हणून विचार करत रहातो
हेच म्हणतो. पैसाताईंनी बरोबर सांगितलं.

माझ्या लांबच्या नात्यातल्या मुलाची अशीच काहिशी गोष्ट झाली. फरक म्हणजे, तो त्यांचा स्वतःचा मुलगा, त्याचं लग्न झाल्यावर हे सगळं उघडकीला आलं, तोपर्यंत एक मूलही झालं होतं...आणि तो 'अजुनतरी' रस्त्यावर नाही आलेला.

हम्म. :( वाईट वाटले. याच रस्त्यावर असलेले एक उदाहरण पहाण्यात आहे. समजाउन/ चार गोष्टी चांगल्या सांगुन कैक वेळा हात पोळुन घेतलेत.

भयानक सत्यकथा वाटली..(तुमच्या भयकथा त्यापेक्षा आम्हाला चालतील..पण असल्या कथा नाही वाचवत) बिच्चारे आई वडील..पण लाड हेच एक कारण होते का मुळ स्वभाव..? परवाच एक घटना माझ्या डोळ्यासमोर पाहिली. आमच्या शेजारी एक पाकिस्तानी कुटूंब राहते. चार मुलींनंतर झालेला मुलगा म्हणून मुलाचे (आता वय वर्ष ४) लाड पाहीले. त्यांच्या घरी मी त्यांना wireless internet setting साठी मदत करायला गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या लॅपटॉपला USB माऊस लावला होता. तो एकदम नवीन होता आणि त्याला कारचा शेप होता. अचानक त्या मुलाचे माऊसकडे लक्ष गेले आणि त्याने तो माऊस खेळायला मागितला. त्याला खरेतर त्या कारशी खेळायचे होते.(घरी बाकी बर्‍याच गाड्या होत्या). त्याच्या आईने शांतपणे कात्री घेतली आणि त्या माऊसची USB वायर कापली आणि राहिलेला कारशेप त्याला खेळायला दिला. त्या मुलाने ती कार(?) फक्त २-३ मि. खेळायला वापरली. मी त्या बाईला इतका चांगला USB माऊस आणि तो पण त्या मुलाकडे बाकीच्या गाड्या असताना का तोडला असे विचारले तर तिने सांगितले की "नाहीतर त्याने खुप रडारड करून घर डोक्यावर घेतले असते". त्या बाईने किंवा तिच्या मुलींनी त्या छोट्याला समजवण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही. मला मात्र उगाच माऊसचे वाटोळे झाल्याने वाईट वाटले. याला आता मी लाड म्हणू का माज म्हणू? आता तो मुलगा मोठा होऊन काय दिवे लावणार ते दिसतच आहे. ती बाई आमच्या घरात याचीच सत्ता चालते, ह्याने टिव्ही लावला तरच आम्ही पहातो, अशा प्रकारच्या गोष्टी मोठ्या कौतूकाने मला सांगत होती.

In reply to by योगी९००

>>आमच्या घरात याचीच सत्ता चालते, ह्याने टिव्ही लावला तरच आम्ही पहातो हे वाक्य मी खूप लोकांकडून ऐकले आहे आणि नेहमीच हे कौतुकानेच बोलले जाते.

In reply to by नगरीनिरंजन

सहमत. आम्ही टाऊन बदलतानाही लोक विचारत होते. मुलाची शाळ बदललेली त्याला चालेल का? आम्हाला आश्चर्य वाटले होते. आम्ही त्याच्यासाठी चांगली शाळा बघणार. त्याला चालेल/ न चालेल हे ठरवायला तो मोठा नाही अजून.

In reply to by रेवती

सहमत. आम्ही टाऊन बदलतानाही लोक विचारत होते. मुलाची शाळ बदललेली त्याला चालेल का?
चांगले वाईट हे मोठ्यांना कळते(?). मुलांना कळतेच असे नाही. आपले मित्र-मैत्रिणी, शिक्षक दुरावणार या गोष्टींचा त्यांच्या बालमनावर परिणाम होऊ शकतो. त्यांना एकाकीपणा जाणवू शकतो. याबाबत अधिक चौकशी केल्यास डॉक्टर किंवा स्कूल काउन्सलर तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतील. म्हणून कदाचित लोक अशी चौकशी करत असावेत.

In reply to by प्रियाली

माझी स्वत:ची शाळा दर एक ते दोन वर्षांनी बदलली आहे. वय वाढत जाते तश्या मैत्रिणी, शिक्षक विसरणे अवघड होत जाते. त्यावेळेस आपण म्हणता ते अगदी योग्य आहे. अश्यावेळी आईवडीलांनीच मुलाच्या मनाची हळूहळू कशी तयारी करायची हे पहायला हवे. माझ्यामते आजकाल काही घरांमध्ये मुलांच्या निर्णयाला अवास्तव महत्व मिळत आहे. एका लहान मुलाने दिवाळी पार्टीत सेलफोनवर गाणी कशी चालू करतात हे मला हौसेने दाखवले. अश्यावेळी आपणही त्यांचे कौतुक करतो. त्याची आई जवळ येऊन त्याचा आयक्यु कसा चांगला आहे. वयाच्या चौथ्या वर्षीच आमची काळजी कशी मिटली हे सांगत होती. फोनही मुले म्हणतील तेच घ्यायचे. मोठा मुलगा मात्र सेलफोनवर गाणी काय पण कॉन्टॅक्ट लिस्ट कशी शोधू शकत नाही अशी तक्रार करत होती. एका दुकानातले लाल रंगाचे मिटन्स संपले मग आम्ही चार दिवस दुकाने पालथी घालून सहा वर्षाच्या मुलांसाठी लाल रंग मिळवला हे ऐकू येतं तर दिवाळी पार्टीत एका आईने मुलीचे १२ सिपिकप्स आणले होते. का ? तर तिला स्टार्टर झाल्यावर 'डोराचा' अमका कप लागतो. जेवताना तमका वगैरे. नंतर मूड बदलला तर आणखी काही. मी या बाबतीत बरीच 'मागास' आहे हे लक्षात आले.

In reply to by रेवती

हे अतीच...आमच्या मनुचे फालतू लाड वगैरे करतच नाही...तिचा बाबा जरा जास्त कौतुक करतो पण हे असली भानगड नाही. हे म्हणजे मुलं हातानी बिघडवन्यासारखे झाले...

In reply to by शिल्पा ब

होय, तसेही आजकाल एकट्या दुकट्या मुलांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुरवण्याकडे आईवडीलांचा कल असतोच. जरा मोठ्या मुलांना घरातल्या छोट्या गोष्टींचे निर्णय घेताना शक्य तितके सामिलही करून घेतले जाते. कथेतल्या मुलाची केस ही समुपदेशनाची आहे हे मान्य. कधीकधी आपण प्रयत्न करूनही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत तेही ठिक पण आपल्या हाताने अनेक 'नितिश' तयार करणे पटत नाही.

In reply to by योगी९००

पण लाड हेच एक कारण होते का मुळ स्वभाव..?
लाड आणि स्वभाव ही अनेक कारणांतील दोन कारणे आहेत. वेडे लाड काकी करत. काका नाही. त्यांचा दराराही घरात होता पण टोकाचा दरारा नाही. मला वाटतं या कुटुंबाला समुपदेशनाची गरज होती. त्या मुलातही काही पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असाव्यात पण तो काळ असा नव्हता. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. बाकी तुम्ही म्हणता त्या पाकिस्तानी कुटुंबात जे सांगितले ते थोड्या फार फरकाने अरबी कुटुंबात पाहिले आहे. अरबी कुटुंबांमध्ये मुलींना, आईला, बायकोला किंवा बहीणीला महत्त्व नसते. घरातले पुरुष जे म्हणतात, जे मागतात ते त्यांना करावे लागते, द्यावे लागते. सौदीतील राजकन्येचे आत्मवृत्त हल्लीच वाचले. त्यात तिने हातातले सफरचंद भावाने (राजपुत्राने) मागितले ते न देता त्याचा ढास घेतला म्हणून ९ वर्षाच्या भावाने बहिणीला दिवसेंदिवस उपाशी ठेवण्याची शिक्षा फर्मावली आणि ती पाळली गेली. :)

In reply to by प्रियाली

मी पण ते पुस्तक वाचलंय. त्यातल्या सौदी मधल्या स्त्रियांच्या कथा आणि व्यथा वाचून काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे.

(सत्य)कथा सुन्न करणारी आहे. माझ्या आठवणीतली अशी काही कुटुंबे , मुलं आठवतात. इतरांसारखीच सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती असताना यांचीच धूळधाण का झाली असावी या आठवणींनी दु:ख होते. हे सर्व या कथेमुळे आठवले. माझ्यामते सर्व स्तरांमधे "फॉलिंग थ्रू द क्रॅक्स" असे घटक असतात. या अशा , एका विशिष्ट अर्थाने , दुर्बल अशा घटकांना मागे पडू न देण्याची जबाबदारी आजूबाजूच्या कम्युनिटीवर पडत असते. बर्‍याचदा व्यावसायिक समुपदेशकापेक्षा, या कम्युनिटीमधून घडणारे समुपदेशन जास्त परिणामकारक ठरते असे मला वाटते. आपल्या कुटुंबाची प्रायव्हसी जपू देऊन, त्याच वेळी आपल्या कुटुंबीयांना - विशेषतः मुलांना - खुल्या वातावरणाची, सामाजिक आदानप्रदानाची आवड निर्माण करणे या गोष्टीचे महत्त्व या अशा केसेस मधून अधोरेखित होत राहाते. "शेम कॅन बी अ डिटरंट" असे म्हण्टले जाते त्याचीही आठवण येते. वाईट सवयी , व्यावसायिक/शैक्षणिक अपयश , आळशीपणा , एकाकीपणा , बुद्धीचे नि शरीराचे मांद्य, डिप्रेशन या सर्व गोष्टी दुष्टचक्राप्रमाणे (व्हिशस सर्कल ) असल्याचे पाहायला मिळते. यापैकी प्रत्येक घटक दुसर्‍या घटकाचे पोषण करत राहातो आणि हे दुष्टचक्र भेदले गेले नाही तर त्याची परिणती फार वाईट होऊ शकते. नुसते इंटरव्हेन्शनच नव्हे तर वेळच्यावेळी केलेले (टाइमली) इंटरव्हेन्शन या प्रकाराचे अनन्यसाधारण महत्व अशा प्रसंगांमधून अधोरेखित होते असे मला वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

प्रतिसादाशी सहमत आहे. मोजक्या शब्दांत उत्तम सांगितलेत.
नुसते इंटरव्हेन्शनच नव्हे तर वेळच्यावेळी केलेले (टाइमली) इंटरव्हेन्शन या प्रकाराचे अनन्यसाधारण महत्व अशा प्रसंगांमधून अधोरेखित होते असे मला वाटते.
याच्याशीही सहमत आहे. कधीतरी वाईटपणा घेऊन मध्यस्थी करायची गरज असते परंतु विभक्त कुटुंब आणि फ्लॅट संस्कृतीत हे इंटरवेन्शन करणे थोडे कठिण होते. एका विशिष्ट मर्यादे पलीकडे लोक अशा प्रकरणांत रुची घेत नाहीत. दुसर्‍या एका प्रसंगात काही त्रयस्थ माणसे (इथे बेल वाजवली का? टाईप प्रकार होता.) मध्यस्थी करावयास गेली असता त्यांचा वाईट अपमान करून त्यांना हाकलण्यात आले. त्यानंतर पुढे जाऊन पोलिसी कार्यवाही करण्यास सामान्य मनुष्य कां कू करतो आणि हे विशस सायकल सुरूच राहते. :(

नितीशची लोकांपासून आणि लोकांची नितीशपासून सुटका झाली म्हणायची! बाकी हे असे का घडले असावे याचे वरती दिलेल्यापैकी एकही स्पष्टीकरण पटत नाही. अशीच कारणे उपलब्ध असतानाही वाया न जाणारी मुले असतातच की. नायक काका-काकुंचे चुकलेच असे म्हणताना 'आपण नितीशच्या आई-वडीलांच्या जागी असतो तर असं होऊ दिलं नसतं' हे मनात असेल, तर तो फुकाचा अहंकार आहे. कथेचा नायक अपवादात्मक केस आहे. या नमुन्याला श्यामची आईदेखील वळण लाऊ शकली असती की नाही शंकाच आहे. हे असं असं झालं. वाईट झालं. बस्स. एवढंच म्हणता येतं.

In reply to by आळश्यांचा राजा

कथेचा नायक अपवादात्मक केस आहे. या नमुन्याला श्यामची आईदेखील वळण लाऊ शकली असती की नाही शंकाच आहे.
सहमत आहे. अपवादात्मक केस आहे म्हणून शब्द खर्ची घालावेसे वाटले. :) अन्यथा, बिघडलेली पोरं सर्वत्र दिसतात पण म्हणून रस्त्यावर बेवारशासारखे मरण येणारे विरळाच.
बाकी हे असे का घडले असावे याचे वरती दिलेल्यापैकी एकही स्पष्टीकरण पटत नाही. अशीच कारणे उपलब्ध असतानाही वाया न जाणारी मुले असतातच की.
तशी वर फारशी स्पष्टीकरणे नाहीत. जी आहेत ती देण्याचा प्रयत्न होणारच. घटनेची कारणे शोधणे हा मनुष्य स्वभाव आहे. जन्मभर धूम्रपान करूनही फुप्फुसाचा कॅन्सर वगैरे न होता सुखाने मरण येणारे लोक असतात पण म्हणून धूम्रपानाने कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच.

In reply to by प्रियाली

घटनेची कारणे शोधणे हा मनुष्यस्वभाव खराच. तशी ती शोधू नयेत असे मी म्हणत नाहीच आहे. (जी काही मांडलेली आहेत ती) कारणे पटत नाहीत एवढंच म्हणणं आहे. बाकी केस मांडली आहे अगदी व्यवस्थित. तपशीलवार. विचारात पाडणारी.

In reply to by प्रियाली

हम्म...माझ्या पाहण्यात एक मनुष्य होता...मी लहान असताना...प्रकाश , सगळेच त्याला पक्या म्हणायचे...त्याची आई गेल्यावर काय झाले माहिती नाही पण इतर घरच्यांनी त्याला वाळीतच टाकले... आम्ही ज्या बिल्डींगमध्ये राहत होतो ती त्याचा कुटुंबाची होती...त्याच्या भावाने दोन मोठ्या खोल्या (पक्याच्या खोल्या) त्याला दिल्या त्यापलीकडे काही नाही...तो तिथेही नसायचाच...आम्हीच खेळायचो. तो असाच रस्यावर असायचा...गलिच्छ कपडे, अंग, वाढलेली दाढी...वगैरे...बोलायचा मात्र व्यवस्थित ...शुद्ध मराठी...बहुतेक engineer होता...श्रीमंत, ब्राह्मण कुटुंबातील हा माणूस असाच रस्त्यावर मेला.

हा पोरगा खरं तर माझ्यापेक्षा बराच लहान. माझ्या शाळेतही नव्हता. कधी कधी दिसायचा रस्त्यावर, तेव्हा सगळेच व्यवस्थित होते. नंतर मात्र हे सगळे दुर्दैवाचे दशावतार घडत गेले तेव्हा लांबून दिसत होते. मी पण नंतर परदेशात होतो. पण अजूनही हे सगळे आठवले की विलक्षण हुरहुर लागून राहते. ते पूर्वीचे सुखी त्रिकोणी कुटुंब नजरेसमोर येतं, मग तो सगळा भणंगपणाही समोर येतो. :(

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका, मी त्याला तशा परिस्थितीत पाहिले नाही. मागच्या वेळी भारतात गेले होते तेव्हा त्याला घर विकून पैसे मिळाल्याने तो गायब झाला होता. बाकीच्या गोष्टी घरच्यांकडून आणि इतरांकडूनच कळल्या. बरे झाले त्याला पाहिले नाही असे वाटते. नाहीतर ते त्याचे रुप आठवत राहिले असते.

काय बोलंणार.. वाईट वाटलं.. अतिव लाडांमुळे रसातळाला गेलेली मुलं (विशेषतः मुलगे) आणि पर्यायाने कुटुंबाची झालेली होरपळ ह्याची एकापेक्षा अधिक उदाहरणे जवळून पाहिलेयत.. चाळीच्या वस्तिला राहिल्यामुळे थोडाफार (फ्लॅट संस्कृतीपेक्षा) चाप बसतो असं जाणवलं पण तरीही (लाडाकोडांमुळे)अगदी लहानपणीच हाती आलेला पैसा/ चैनीची ओढ हेच सगळ्यांचं प्राथमिक कारण होतं असं दिसतं.. त्यातही लग्न झाल्यावर सुधारेल असं म्हणणारे आई-बापही दिसतात आणि चीड येते.. वाईट वाटतं ते अशा घरात येणार्‍या नव्या नवरीचं आणि त्यातून पुढे मुलं झाली तर त्यांचं.. एका मर्यादेपलिकडे कोरडी सहानुभूती ओढण्यापलिकडे आणि 'अमक्या तमक्या सारखा फुकट जाशील' असा धाकवजा मापदंड वापरण्यापलिकडे आपण विशेष काही करु शकत नाही हे ही खरं!

आजूबाजूला पाहिलेली अशीच काही उदाहरणं आठवली हे दोन्ही भाग वाचून.

वाईट वाटलं...आईच्या अतिलाडामुळे अन धाक नसल्याने असे झाले असावे...आणि नाही म्हंटले तरी अशामुळेच लोक मुल दत्तक घ्यायला नाही म्हणतात.. काही झाले तरी आई वडिलांच्या जीन्सचा भाग असतोच नाही का?

In reply to by शिल्पा ब

जीन्सचा भाग असणे हे एक मोठे दुर्दैवी प्रकरण आहे असे मला वाटायला लागले आहे. आम्हा मुलींना लहानपणी चष्मा लागला, माझ्या आईच्या बाजूने आम्हाला चष्मा आला असे कितीतरी लोकांना वाटत असे. आमचे लग्न कसे होणार याची आमच्यापेक्षा बाहेरच्यांनाच चिंता असावी. असो. मूल दत्तक घेणे हे फार भावनिक पातळीवरची गोष्ट आहे. त्याबद्दल सरसकट विधाने करणे टाळलेले बरे.

In reply to by चित्रा

मुल दत्तक घ्यावे का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न...पण म्हणून सत्य काही बदलत नाही...प्रत्यक व्यक्तीमध्ये स्वतःच्या जन्मादात्यांचे जीन्स असतातच ज्याने फरक पडू शकतो...तुमचेच एक उदा. चष्म्याचे (तुमच्या किंवा तुमच्या घरातल्या लोकांच्या लग्नाची काळजी करण्याचे दुसर्या कोणाला कारण नाही हि गोष्ट वेगळी ) निर्व्यसनी राहण्याचे, मित्र मैत्रिणीच्या निवडीवर लक्ष ठेवणे, काही गैर वाटले तर संवाद साधून, आधीच काही गोष्टी उदा. sex , VD इ विषयावर वैज्ञानिक माहिती देणे (मुल कसेही आणलेले असो ) करून असे प्रकार टाळता येऊ शकतात.. बाकी मुलात आई वडिलांचे जीन्स असतात यालाच (तुमचाच असे नाही )आक्षेप आहे किंवा काबुल करायचे नाही हे वाचून अंमळ मजा वाटली...

In reply to by मुक्तसुनीत

वरील फोटो एकंदर लेख आणि प्रतिसादात अस्थानी वाटत आहे. केवळ लिंक देऊन भागत असेल तर सुधारणा करावी. नाही केली तरी काही हरकत नाही. सुज्ञांची नगरी आहे ही !

सत्य परिस्थिती आहे म्हणून अधिकच वाईट वाटले. असे नाही, पण घरच्यांचे दुर्लक्ष झाल्याने चुकीच्या मार्गाला लागलेली मुले आपण आजूबाजूला पाहतच असतो. कोणीतरी नितीशला कसे समजवावे हे सांगण्याची गरज होती असे वाटते. दुर्लक्ष हे केवळ एवढे मोठ्या प्रमाणावरच असण्याची गरज नाही, पण आईवडिलांचा दुराग्रह, अतिशिस्त किंवा अति दुर्लक्ष हे सर्वच मुलांच्या दॄष्टीने वाईट ठरतात.

सत्यकथा असल्यामुळे अर्थातच सर्वांनी नितीशच्या दुर्दैवावर, दुःखांतावर चर्चा केलेली आहे. पण मला सर्वप्रथम त्याची कथा उत्तम पद्धतीने सांगितल्याबद्दल लेखिकेचं अभिनंदन करावंसं वाटतं. ओघवत्या भाषेत लिहिल्यामुळे कथा परिणामकारक झालेली आहे (म्हणूनच नितीश वाचकांना कुठेतरी भिडतो). त्याच्या दुर्दैवी शेवटाकडे हळुहळू जाणारा प्रवास बारीकसारीक पाऊलखुणा दाखवत केलेला आहे. नितीशच्या बाबतीत त्याच्याविषयी, त्याच्या आईविषयीदेखील सहानुभूती वाटत राहाते. नेचर की नर्चर हा प्रश्न सहज सुटत नाही. फ्लॅट संस्कृती की चाळ संस्कृती इतक्या वरवरच्या पातळीवर उत्तरं सापडत नाहीत. (आमच्या चाळीत देखील नितीश घडलेले आहेत) वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर असे नितीश दिसतात. मग मागाहून आपण - लाडावल्यामुळे, अतिकठोर वागवल्यामुळे, श्रीमंतीमुळे, अतिगरीबीमुळे वगैरे कारणं देतो. पण कदाचित अनेक वाईट कारणं नशीबाने एकत्र येऊन बहुधा १% लोकांच्या नशिबी काही ना काही दुःखांत येतात. बहुतेक प्रत्येकाच्या माहितीत असे एखाद दोन तरी असतात. त्यातला एक तुम्ही जिवंत करून दाखवला आहे.

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटत, म्हणजे माझ निरिक्षण आहे, की दत्तक घेतल्या मुळे पालक थोडे हळवे असतात किंवा असावेत. आता कालचाच प्रसंग घ्या, माझ ७ वर्षीय लेकरु उगाचच एका मुलाच्या अंगावर सायकल घालत होता. माझ्या मुलीन तक्रार आणली, मी विचारल्यावर त्याच म्हणण ' I am a playful child' हे डिस्क्रिप्शन त्याच्या टीचरच्या तोंडात कायम असत. मी धरला त्याला अन , ' I am playful playful ' म्हणत चांगला बदडला. अगदी ओठ थरथरत होते त्याचे पण धडा मिळाला! मी पाहिलेले दत्तक आई वडील माया दाखवायच्या प्रयत्नात जरा आपल्या पेक्षा जास्त हळवे असतात अस निदान मला तरी वाटत. अर्थात याचा अर्थ पोटची पोर बिघडत नाहीत असा नाही पण त्याला संगत वाईट अशी बाहेरील कारण असतात. इथे हा मुलगा सोडुन बाकी सारे मार्गाला लागलेले दिसतात. प्रियाली अतिशय खोलवर जाउन केलेल निरिक्षण अन वर्णन पुरा जीवन पट उलगडुन दाखवतेय इथ.

सत्यकथा आहे हे सांगितले नसते तर चालले नसते का? कारण खोटी वाटावी अशी कथा नाहीये. अनेकांना ते स्वत: या मार्गावर कुठपर्यंत जाऊन परतले आहेत याचाही आढावा (स्वत:शी) घेता येईल. ;)

In reply to by नितिन थत्ते

सत्यकथा आहे हे सांगितले नसते तर चालले नसते का?
मी माझ्या गोष्टींमध्ये त्या संपूर्णतः काल्पनिक नसतील तर क्रेडिट द्यायला विसरत नाही एवढेच कारण आहे सत्यकथा म्हणून सांगण्याचे. :) नसते सांगितले तर बिका म्हणाला असता, "ही गोष्ट मला माहित होती. सत्यकथा आहे ना?" म्हणून आधीच स्पष्टीकरण दिलं. ;)
अनेकांना ते स्वत: या मार्गावर कुठपर्यंत जाऊन परतले आहेत याचाही आढावा (स्वत:शी) घेता येईल.
:) परतले असतील तर कौतुक आहे.

कथा वाचली. खरे सांगायचे तर मंडई विद्यापिठात अशा अनेक कथा पाहिल्या आहेत आणि काही आत्ता देखील पाहतो आहे. हे वाचुन खरेतर वाईट वाटले पाहिजे पण एकुणातच मुर्दाडासारखे वाटत आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हे वाचुन खरेतर वाईट वाटले पाहिजे पण एकुणातच मुर्दाडासारखे वाटत आहे.
मुर्दाडपणा तेव्हाच येतो जेव्हा एखाद्या गोष्टीतल्या भिषणतेचं/कारुण्याचं/भितीचं नाविन्य संपून जातं आणि रोज घडणार्‍या गोष्टींसारखं त्या गोष्टीही समोर दिसायला लागतात. आता ह्याला कोणी निर्ढावलेपण म्हणेल तर कदाचित कोणी निष्ठूर वगैरे म्हणेल, पण स्मशानात काम करणार्‍या डोंबाला जसं रोजची मरणं आणि मढी पाहून काहीच वाटेनासं होतं तसंच काहीसं म्हणॅन मी.

In reply to by धमाल मुलगा

इलाज नाही आणि मुर्दाडपणा या दोहोंशी सहमत आहे. फरक इतकाच की जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती त्या चक्रात सापडते तेव्हा मनाशी लागलेली बोचणी टाळता येत नाही. :(

In reply to by प्रियाली

अगदी मी जे डोंबाचं उदाहरण दिलं त्यामध्येही त्याच्या घरात मृत्यूची घटना घडली तर मात्र तो असा रोजच्यासारखा शांत/त्रयस्थ भावनेनं वगैरे नाहीच राहू शकणार. बोचणीबद्दल पुर्ण सहमत.

कथा वाचुन वाईट वाटले ... आपण खुप छान पद्धतीने सांगितले आहे हे सगळे ... -- रिप्लाय ही मस्त आहेत. फक्त दत्तक घेताना त्याचे जीन्स वेगळॅ असतात तो कसाही असु शकतो ही कल्पना समाजात रुढ नाही झाली पाहिजे असे मनापसुन वाटते ... -- तसेच लहानपणी नितिश च्या मनस्तीथीचा , तसेच कोणी खेळायला न घेतले .. कींवा कोणी चेष्टा केली तर एकलपणाचा झालेला परिनाम त्याच्या वागण्यातुन दिसला असेलच पण त्याच्या आई शिवाय कोणाला हा माहित नसावा असे वाटते ... आणि त्यामुळेच तो जास्त एकलकोंडा होउ नये म्हणुन त्याचे लाड होउन तो आणखिन बिघडण्यात त्याचे परिनिती झाली असे वाटत आहे ..

प्रियाली, खूप छान लिहिली आहे कथा. अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहिले नितीशचे. तुम्ही म्हणता ते खरे आहे; नको असलेली माणसे गेल्यानंतरही हूरहूर लावून जातात. नितीश हुशार होता; अभ्यासात चांगले गुण मिळवायचा; नीट राहिला असता तर आयुष्याचे सोने झाले असते. कदाचित ही हळहळ मनात रुतून बसते म्हणून आपण तिरस्कार करतो अशा व्यक्तींचे देखील मृत्यू हूरहूर लावून जातात. शिवाय शेवटी त्याची झालेली विपन्नावस्था, भीक मागणे, हे सगळं त्याला काहीतरी मानसिक आजार असल्यामुळे घडले असण्याची शक्यता निर्माण होणे या सगळ्या गोष्टींचा परिणाम असेल कदाचित....मग आपण असल्या लोकांची कीव करायला लागतो; त्यांची दया यायला लागते. आमच्या एका ओळखीच्या कुटुंबात तीन मुले होती. तिन्ही खूप हुशार होती. उंच, गोरीपान आणि सुदृढ मुले होती ती. शाळेत वक्तृत्वस्पर्धा, निबंधस्पर्धा अशा स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवायची. अभ्यासातही हुशार होती. कसे कोण जाणे एकदम काहीतरी बिनसले आणि तिन्ही मुलांच्या वाटा आगगाडीचे रुळ बदलतात त्याप्रमाणे बदलल्या. तिन्ही मुले गुटखा खायला लागली, हळूहळू गावातल्या एकमेव बारमधून बाहेर पडतांना दिसायला लागली. नंतर शर्टाची वरची दोन बटणे उघडी ठेवून एखाद्या मवाल्याप्रमाणे तोंडात गुटख्याचा तोबरा कोंबून ही मुले गावात फिरू लागली. पुढे नववी-दहावी पासून नापास होत गेली. त्यांच्या वडीलांना खूप चिंता वाटायची. वडील खूप साधे आणि पापभिरु होते. योगासने शिकवायचे. मुलांचे वागणे दिवसेंदिवस अधिकच बेताल होत गेले. नंतर निवृत्त झाल्यावर हे कुटुंब गाव सोडून गेले. नंतर काय झाले काही नीटसे कळले नाही पण मोठ्या मुलाला कुठेतरी नोकरी लागली होती असे पुसटसे कळले..... काय घडत असेल, का अशा अचानक वाटा बदलून आयुष्य कोमेजून जात असेल याची उत्तरे सापडणे कठीणच. बहुधा मानसिक दुबळेपणा आणि भावनिक आधाराची उणीव यामुळे असे घडत असावे. मग 'जग नावे ठेवेल' या भीतीचाही फारसा उपयोग होत नाही. दरम्यान व्यसने अजगरासारखी विळखा घालून बसल्यावर तारतम्यच राहत नाही. मग आई-वडीलांना मारहाण, दारू पिऊन गोंधळ घालणे या गोष्टी इच्छा नसतांनाही अशा मुलांकडून घडतात. त्यांची विवेकबुद्धी हळूहळू नाहीशी होत जाते. माझा सगळेच तिरस्कार करतात, मला कुणीच समजून घेत नाही, मला सगळे वाईट म्हणतात, माझ्याशी कुणीच मनापासून बोलत नाही अशा भावनांचा अतिरेक झाला की मग 'खड्ड्यात गेले जग, मला जे वाटते तेच मी करणार' अशी भावना वाढीस लागते आणि त्या दृष्टचक्रातून बाहेर पडणे अवघड होऊन जाते. वेळीच मानसोपचारतज्ञाची मदत, खेळीमेळीचे वातावरण, बसून केलेली चर्चा, परिणामांची दिलेली कल्पना इत्यादी गोष्टी कदाचित आयुष्यांची अशी वाताहत रोखू शकतात. पण या आधी लहानपणी मुलांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या चुकांबद्दल त्यांना रागावणे, क्वचित थोडा चोप देणे, घरातले वातावरण चांगले ठेवणे, त्यांच्या चुकांना पाठीशी अजिबात न घालणे, त्यांनी जाणून-बुजून केलेल्या चुकांची त्यांना जाणीव होईल इतपत शिक्षा करणे इत्यादी गोष्टी करणे अपरिहार्य आहेत असे मला वाटते.

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद. अगदी नावे घेऊन सांगत नाही पण अनेकांचे प्रतिसाद वाचनीय आहेत, त्यांचे विशेष धन्यवाद. याबाबत माझं मत मी कथेत मांडलेलं नाही. ते असं आहे की - इथे फाजील लाड, दत्तक घेतल्याने आईची वेडी माया, वडिलांचा धाक, इतर मुलांनी दिलेली वागणुक, व्यसने वगैरे वगैरे ही निमित्ते आहेत आणि ती खरी ही आहेत. अनेकदा लाडावलेली मुले पुढे सुधारतात. व्रात्य मुले पुढे जाऊन अतिशय सद्गुणी बनतात. नैराश्याच्या झटक्याने सद्गुणी मुले वाममार्गाला लागतात. असेही प्रसंग आहेत ज्यांत आई-वडिलच बेशिस्त आहेत, व्यसनी किंवा व्याभिचारी आहेत, त्यांनी मुलांना संस्कार दिलेले नाहीत तरीही मुले चांगली निपजली. तर कुठे तरी, आई वडिल अतिशय सन्मार्गी असूनही मुले वाईट निपजली. रिहॅबमध्ये ट्रिटमेंट घेऊनसुद्धा पुन्हा व्यसने जवळ केलेली माणसे आपण बघतो. येथे दत्तक घ्यावे की नको असा प्रश्न कृपया मध्ये आणू नये. पोटची पोरेही अशीच बिघडतात किंबहुना ते प्रमाण खूप जास्त आहे. माझ्या स्वतःच्या कुटुंबात दत्तक घेतलेली मुले आहेत आणि कुटुंबे सुखी आहेत. जीन्स वगैरेंबद्दल नको बोलूया....कंटाळा आला. बहुतांश माणसांना आयुष्यात कधी ना कधी "अक्कल येते." येथे अक्कल येणे म्हणजे स्वत्वाची जाणीव होणे. याला कोणी जबाबदारीची जाणीव होणेही म्हणू शकेल. मला आयुष्यात हे करायचे आहे. इथून वर उठायचे आहे, प्रगती साधायची आहे किंवा मी करतो ते अयोग्य आहे, यातून बाहेर पडायचे आहे ही जाणीव होते. टोचणी लागते आणि तेव्हा मनुष्य परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. ज्या माणसांना ही जाणीव होत नाही किंवा अशी माणसे दुर्बळ असतात म्हणून व्यसनांत आपल्याला झोकून देतात. अशांना वेळीच मदतीचा हात लागतो आणि तो हात हातात घेणे हे सर्वस्वी त्या माणसावर स्वतःवर अवलंबून असतं. नितीशचा विचार केला तर लहानपणाचा काळ सोडता आपल्या अधोगतीस तो स्वतः जबाबदार आहे असे मला वाटते.

In reply to by प्रियाली

प्रियाली कथा चांगली लिहीली आहेस, आणि ह्या प्रतिसादातीतल स्पष्टीकरण अगदी पटण्यासारखे आहे. मीही हेच म्हणणार होते की येथे दत्तक घ्यावे हा प्रश्न का आणावा - त्या पालकांची किंवा दत्तक मुलाची गरज असली, नसली तरी असे म्हणणे - हे त्यांना चपराक मारल्यासारखेच आहे असे मला वाटते. भयकथांपासुन एक बदल म्हणून तुझी ही मांडणी आवडली, तुझ्या कथेत असणारी पात्रांची घट्ट वीण नेहमीच भावते. पण म्हणून भयकथा लिहायच्या थांबवू नकोस - आम्हाला दोन्ही आवडतील. आता कीस काढायचा नाही पण फक्त ही गोष्ट जराशी खटकली कदाचित कथेची ती गरज असावी (पण तसाही अनुभव नाही :) ) सक्काळी सातला इमारती समोरच्या पानवाल्याने शटर वर केलं की त्याचे पहिले गिर्‍हाइक नितीश असे. पानवाले सक्काळी सातला उघडतात? आणि मला वाटले पानाची टपरी असते - आता भारतात यांचेही शटरवाले दुकान असे तर माहीती नाही बा :)

In reply to by सखी

निरीक्षण चांगले आहे. त्याचे असे आहे की आमच्या इथल्या पानवाल्याची अगदीच टपरी नाही. छोटेसे टपरीवजा दुकान आहे त्याचे नाव देव आनंद. :) त्या दुकानाला अर्थात शटर आहे. ते डोळ्यासमोर असल्याने तसे लिहिले. :) हा पानवाला बहुधा सातच्या आधीही उघडत असावा आणि त्याचे कारण असे की आमच्या भागातून पुढे गेल्यावर मोठा इंडस्ट्रीयल विभाग आहे. तो २४ तास सुरु असतो. सकाळची शिफ्ट वगैरे असल्याने कामगार लवकर येतात. त्यांना पान, विड्या, सिग्रेटी लागतातच. बाकी, भयकथा बंद काय करेन? ते आमचे ब्रेड-बटर आहे. ;) पण नेहमी नेहमी तेच लिहून चालत नाही. टाइपकास्टचा शिक्का बसलेला आहेच पण आपल्याला दुसरे काही जमते का असा प्रश्न पडतो. :) असो. प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

माझा एक मित्र. बीई च्या तिसर्या वर्षातुन कॉलेज सोडुन दिले. खरंतर कॉलेजला असताना माझी त्याची फक्त जुजबी ओळख होती. मी नोकरीसाठी मुंबईला आलो तेव्हा हा अचानक स्टेशनला भेटला. चहापाणी झालं आनी भेटीगाठी सुरु झाल्या. माझं स्ट्रगल चालु होतं तेव्हा हे साहेब त्याच्या वडीलांचा व्यवसाय पहात होते. आंम्ही २-३ दिवसातुन एकदातरी भेटत असु. आमची भेट्ण्याची जागा म्हणजे बार. २-३ तास गप्पा चालायच्या. पैसे कमावण्यापासुन ते समाज सुधारणा.......ते अगदी अध्यात्मापर्यंत कुठलाही विषय वर्ज नसायचे. एक दिवस त्याने मला ३ र्या वर्षातुन कॉलेज का सोडले त्याचे कारण सांगितले. त्याचे एका बाईवर प्रेम बसले होते. एक तर ती दुसर्या धर्माची, तिला २ मुले , नवरा असताना ती याच्याबरोबर पळुन आली मुले घेउन. हे ईंजिनिअरिंगला असताना. त्याच्या घरी कळाले , बराच गोंधळ झाला. हा मोठा त्यात एकुलता एक. दोन बहीणी लहान घरात. या प्रकरणात कॉलेज सोडुन घरचा व्यवसाय पहात होता. मी फॅक्स मशीन विक्री आनी रिपेअरचे काम करत होतो. त्यावेळेस फॅक्स मशीन नवीन अस्ल्याने महाग होत्या. त्यासाठी फेक्स सेव्हर असे एक उपकरण मिळायचे. जेव्हा फेक्स लाईनवर रिंग येते तेंव्हा मशीन चालु होते आनी नंतर १-मिनिटाने ते बंद होते. मला पगार कमी असल्याने मी ते मशीन स्वतः बनवायचा निर्णय घेतला आनी ते युनीट मित्राला दाखवले.त्त्याने १५ दिवस खटपट करुन ते बनवले. बाजारात होते त्यापेक्षा आकर्षक. आम्ही बरेच पैसेही कमावले त्यातुन. असो. पिणे आणी सिगारेट ओढणे हे त्याचे खास शौक. मूड असेल तर कितीही काम करणार नसेल तर कितीही नुकसान होणार असेल तरी काम नाही करणार असा ह्याचा खाक्या. या कारणाने आमचे मतभेद व्हायला लागल्याने मी तो व्यवसाय बंद केला. पण मैत्री चालुच होती. मी त्याच्या घरी नेहमीच जायचो. उशीर झाला तर तिथेच रहायचो. वेळेला त्याच्या आईकडुन उसने पैसेही घ्यायचो. पण हा घरात जे सणकीसारखं वागायचा ते माझ्या समोरच. आई-वडिलांना उलट बोलणे , आदळआपट करणे. मग मी त्याला आम्ही दोघेच असताना समजावुन सांगायचो. तो मला उलट कधी बोलायचा नाही पण सांगायचा तुला माहित नाही माझे आईवडील कसे आहेत ते. असं नेहमी सांगायचा त्यामुळे मी एक दिवस त्याला सांगच तुझे आईवडील कसे वाईट आहेत ते विचारले? पण त्याने काहीही सांगितले नाही. पण त्याचे आईवडील खुप-खुप चांगले आहेत हे मी खात्रीने सांगु शकतो. त्या बाईबरोबर याला रहायला नकार दिला आनी ऐकायचं नसेलच तर घर सोडुन जा असे त्याला सांगितले हाच काय तो त्यांचा दोष. बहीनींचे लग्न झाले मग हे तिघेच घरात. मग तर त्याने त्यांच्याशी दावाच मांडला आणी एक दिवस भाड्याने खोली घेउन राहु लागला. मि त्याला खुप समजावले पन व्यर्थ. मग घरुन पैसे नाहीत तर एक हॉटेल चालवायला घेतले, कुक नसेल तर हा स्वतः बनवायचा कधी-कधी. मग मला त्याने पैसे मागितले हॉटेलच्या विस्तारासाठी. मी नसतानाही माझ्या नावावर पतपेढीचे लोण काढुन पैसे दिले मैत्रीखातर. आनी हप्ते वेळेत भरण्याच्या अटीवर. ४ महीने हप्ते भरले आनी ५ व्या महिण्यात हप्ता चुकवला म्हणुन लेटर घरी आले. त्याला विचारले तर भरतो म्हणाला पण मग नाही ते नाहीच भरले. मग वसुलीसाठी लोक माझ्या घरी येउ लागले त्यात मी रहायचो माझ्या बहिनीकडे. मग त्याला गाठले तर म्हणाला लॉस झालाय आता नवीन लोण काढ तुझ्या नावावर आनी मग जुणे भरुन टाकु. मी ठाम नकार दिल्यावर जमेल तसे भरतो म्हणाला पण नाही. मग मी त्याच्याकडे जाणे सोडुन दिले, नंतर त्याने कार घेतली मला समजल्यावर मी परत त्याच्याकडे तगादा लावला, उपयोग शुन्य. तरीही मित्र म्हणुन मी त्याला २-३ कामं मिळवुन दिली आनी यातल्या फायद्यातुन त्याने लोण फेडावे असे सांगितले. काम तर त्याने केले पण पैसे काही भरले नाहीत. मग २ वर्षापुर्वी तो मला शोधत आला, त्याची तब्येत खुपच खालावलेली दिसल्याने मला फार वाईट वाटले. मी मटन वगैरे आणले आनी आम्ही घरिच पार्टी केली. मी त्याला विचारले का एवढा खराब झालास? आपण दवाखाण्यात जाउ मी तुझ्याबरोबर येतो. तर काही नाही म्हणाला कामाचा खुप ताण आहे ३-४ तासच झोप होते म्हणुन. मला पटले नाही मग मी त्याला मी तुझ्या घरी बोलतो आनी तु परत घरी रहायला ये असे सांगितले तर ठाम नकार. मग मी त्याला लोण कधी भरणार असे विचारले. मग तो माझ्यावर प्रथमच चिडला आनी आता लोण भरल्याशिवाय परत तुला भेटणार नाही असे म्हणुन रात्री १ ला घरातुन गेला. मिही जाउ दिले. १० मिनिटात परत आला. मी: भरुन आलास की काय रे पैसे? तर हसला आनी म्हणाला माझं सिगारेटच पाकीट राहीलय तेवढं न्यायला आलोय. बाहेर नाही मिळाली म्हणुन परत आलो. पाकीट घेउन गेला. परत काही आला नाही. मी ब्राझीलला गेल्यावर मला समजले की तो वारला. परत आल्यावर त्याच्या घरी गेलो, आईवडिलांना भेटलो. त्याची आई खुप रडली. मग वडीलांबरोबर बाहेर आलो तेव्हा त्यांनी त्याच्या कृष्णकृत्यांचा पाढाच वाचला.तो जेंव्हा खुप आजारी आहे असे समजले तेंव्हा वडील त्याला घरी घेउन आले. चांगल्या दवाखान्यात उपचार केले पण तो गेला. एकुलता एक मुलगा. मला त्यांनी सांगितले तु येत जा कधी वेळ मिळेल तेंव्हा. काही मदत लागली तरी खुशाल सांग . जसा तो होता तसा तु आहेस आम्हाला. मला भरुन आले हे ऐकुन , पण खरे तर माझे डोळे भरुन आले ते मी त्याचे मतपरिवर्तन नाही करु शकलो म्हणुन. तो मला माझा पराभव वाटला. कसाही असला तरी मी बराच काळ त्याच्याबरोबर व्यतीत केलेला होता. २-३ दिवसांपुर्वी मला आणखी एका मित्राचा फोन आला. तो त्याच्याबाद्दलच बोलत होता . त्याने त्याच्याकडुनही बरीच रक्कम घेतलेली होती. मी त्याला तो आता या जगात नाही असे सांगीतले. तर त्यालाही खुप हळहळ वाटली. तो खरोखर अभ्यासात हुशार होता तसाच कामातही प्रवीण होता. ३-फेज इलेक्ट्रीकचे, पॅनल बोर्ड, हॉटेल , कुक, पेटींग पासुन लिफ्ट बसवण्यापर्यंत सगळी कामे करत असे. असो.

चांगली कथा आहे.. वर अनेक मिपा बंधु भगिनींनी एक चांगला मुद्दा मांडला आहे की माणुस बिघडायला नेमकी सुरवात केव्हा होते? तर माझे उत्तर आहे जेव्हा तो स्वतःवरील स्वतःचे नियंत्रण उठवतो तेव्हा. ही सुरवात होते ते त्याच्या मनाला कळत असते, आणि हा 'आतला आवाज' त्याने मला वाटत क्धीही इग्नोर करु नये. मी स्वतःदेखील दारु पितो पण आजवर कधीही अभ्यासात 'पहिला वर्ग' सोडला नाही. तसेच मी दारु प्यायलो असेन तेव्हाही आणि नॉर्मल असेन तेव्हाही, कधीही वाईट किंवा इममॉरल वागत नाही. त्यामुळे माझ्या पिण्याला काही अटींसहित आईबाबांनी देखील मान्यता दिली आहे. त्यातही तसेच मला 'सिगरेट आणि अन्य तंबाखुजन्य पदार्थ' या प्रकाराची प्रचंड चीड आहे.. आणि मित्रांनी आजवर मला अनेकदा आग्रह केला, पण मी नाही वर ठाम आहे, याचे कार्ण मला त्या वाटेला जायच नाहीच आहे हे मी मनाशी ठरवलेलं आहे. नियंत्रित मद्यपान, जीवन खुशहाल!

उत्तम कथन. अशी सगळ्यांच्याच माहितीत/पाहण्यात असावीतच उदाहरणं. आपल्या स्वतःच्या बाबतीत अनुभवलेलं नसलं तरी त्रयस्थ दृष्टीकोनातून पाहूनही वाईट वाटायचं ते वाटतंच. दैवस्य कुटिला गति: :(

नुसती कथाच नसल्याने कथा म्हणून आवडली असे म्हणणे जीवावर येत आहे, पण कथन म्हणून चांगलेच आहे/आवडले. सत्यकथाच असल्याने आणि वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे दुर्दैवाने कधी ना कधी बघायला मिळणारी देखील आहे. वरचे अनेकांचे विचार पटणारे आहेत. दत्तक घेणे वगैरेचा येथे (अथवा कधीच) संबंध लावू नये आणि चर्चा करून नये असेच वाटते. कथेतील उल्लेखावरून असे कुठेतरी म्हणावेसे वाटते (जर-तरच्या गोष्टी) की काकूंनी जर मुलाच्या दोषांवर पांघरूण घातले नसते तर भले तो सद्गुणांचा पुतळा जरी झाला नाही तरी असा शेवट होणे टळले असते का? लहानपणी लाडावलेल्या मुलाने मोठेपणी तुरूंगात जाताना आईला काहीतरी सांगायचे आहे म्हणत जवळ जाऊन कान चावला, कारण वेळीच चांगल्या सवयी लावल्या नाहीत म्हणून अशी वेळ आली. असेच काहीसे वाटले. आधीकधीतरी लिहीलेला ठाण्यातला एक जुना अनुभव आठवला, ज्यात एक मुलगा (तिशीतला बाप्या) टोप्या घालत पैसे ढापायचा. मग ती माणसे त्याच्या घरात गेली की वडील शांतपणे पैसे घेऊन येयचे आणि देऊन टाकायचे. अशाने तो मुलगा कसा सुधारणार? त्याला हाकलायला नको का?

हम्म! अशा आयुष्य वाया घालवणार्‍या मुलांच्या बाबतीत ' का?' या प्रश्नाला उत्तर नसते. मात्र अशा मुलांच्या आई-वडिलांचे हाल पाहावत नाहित. :(