एक होता विदूषक
एक आटपाट नगर होते. नगर तसे संपन्न, नगराला लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला होता. खरेतर सरस्वतीने जरा सढळ हातानेच इथे खर्च केला होता. नगरात मोठा मोठे थोर कलाकार, वादक, लेखक, कवी, गायक, नकलाकार निवास करत होते. ह्या हरहुन्नरी लोकांना त्यांच्या राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यात देखील मोठे नाव होते, सन्मान होता. ह्या अशा नगरात काही नगरकंटक देखील होते पण ते सुग्रास जेवणात मेथीचा खडा यावा इतपतच, आणि खरेतर आरोग्याला गरजेचे.
ह्या नगरात एक विदूषक राहायचा. आपली कामे सांभाळून झाली की मग नगराच्या मुख्य चौकात यावे आणि खेळाला सुरुवात करावी हा त्याचा नेहमीचा उद्योग. कधी नकला कर तर कधी विनोद सांग, कधी कोणाचे विडंबन करून लोकांना हसव अस त्याचा उद्योग, खरेतर छंदच म्हणाना. ह्या बदलात दोन कौतुकाचे बोल आणि पाठीवर एखादी शाबासकीची थाप ह्याशिवाय आधिक कसलीच अपेक्षा विदूषकाने केली नाही. आटपाट नगराचे नाव मोठे व्हावे, त्यात आपला थोडा हातभार लावावा अशीच कायम त्याची इच्छा.
एक दिवशी अचानक चक्रे फिरली आटपाट नगराच्या राजाला पदावरून पायऊतार व्हावे लागले. नवीन राजा सिंहासनावर आरूढ झाला. जुना राजा मोठा दर्दी, हरहुन्नरी. तोंडाचा थोडा फटकळ पण योग्य माणसाची कदर जाणणारा होता. स्वतः एक कलाकार असल्याने साहित्याची, कलेची जाण असणारा होता. नवीन राजा देखील मोठा हरहुन्नरी, कलेची जाण असणारा पण कामात व्यस्त असणारा होता. जुन्या राजाकडे एकाच राज्याची जबाबदारी होती मात्र नवीन राजाकडे अनेक राज्यांच्या जबाबदाऱ्या असल्याने नवीन राज्याला देण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध न्हवता. नवीन राज्याची घडी आपणाला हवी तशी बसवण्यासाठी मोकळा वेळ मिळेपर्यंत जुन्याच राजाच्या मंत्रिमंडळाकडे कारभार सोपवावा असे नवीन राजाने ठरवले. थोडेफार जुजबी बदल करून त्याचे जुन्याच मंत्र्यांकडे राज्याचा कारभार सोपवून टाकला. झाले इथेच एका दुष्टचक्राची सुरुवात झाली....
जुन्या मंत्रिमंडळात काही सभासद ज्येष्ठतेमुळे काही निष्ठेमुळे तर काही त्यांच्या ज्ञानामुळे सामील करण्यात आले होते. नवीन राजाने सर्वांना तसेच कायम ठेवले आणि वर काही अधिक अधिकार देखील बहाल केले. मंत्रिमंडळातील काही चाणाक्ष सदस्यांनी हि कशाची नांदी आहे ते ओळखले आणि आपला पूर्वीचा स्वभाव बदलून जनतेशी अगदी आपुलकीने वागायचे धोरण सुरू केले. काही मंत्री हे सत्ता असली काय नसली काय, कायमच चांगुलपणाने वागणारे असल्याने त्यांना विशेष असा फरक पडलाच नाही. मात्र अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या काही मंत्र्यांना मात्र स्वर्ग जणू दोन बोटे उरला. आपल्याला मंत्रिमंडळात कायम ठेवून वर विशेष अधिकार दिले हा आपल्या ज्ञानाचा आणि ज्येष्ठतेचा अधिकारच होता असेच जणू त्यांना वाटू लागले. त्यात राजा अधेमधेच राज्यात येत असल्याने हे मंत्री स्वतःला प्रतिराजाच समजू लागले. पूर्वीच्या मग्रुरीत आणि आकसात आता दुपटीने वाढ झाली. हे सर्व पाहून काही चाणाक्ष मंत्री आधीच मंत्रिमंडळातून आपणहून दूर झाले. पण ह्याचा उलटा परिणाम म्हणजे आता ह्या उद्दाम मंत्र्यांना कोणाचाच धाक उरला नाही. 'हम करे सो कायदा' ह्या प्रकारात राज्याचा कारभार त्यांनी हाकायला सुरुवात केली. वेळेला आडव्या येणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना देखील न जुमानण्याची रीत त्यांनी रूढ केली.
जनता बिचारी राज्याचा उत्कर्ष होत आहे ह्याच समजुतीवर खूश होती. आपण बरे आपले काम बरे.. चार घटका काम करावे दोन घटक विरंगुळा मिळवावा असे त्यांचे नेहमीप्रमाणे जीवन सुरू होते. मात्र अचानक ह्या सुखी जीवनावर संक्रांत कोसळली. अधिकार हातात येताच काही जुने हिशेब चुकते करण्यात गुंतलेले मग्रूर मंत्री आता मोकळे झाले होते. आता ह्या मंत्र्यांच्या गटाने आपला मोर्चा सामान्य जनतेकडे वळवला. हुशार, मनमिळाऊ आणि जनतेच्या मनात आपले स्थान राखून असलेल्या कलाकारांवर त्यांनी वेचून वेचून हल्ले करायला सुरुवात केली. ह्या कलाकारांच्या गायन, वादन, लिखाण ह्या सारख्या कलांवर बंदी आणण्यात आली. कधी सरळ सरळ तर कधी उघडपणे त्यांच्या अपमानास सुरुवात झाली. ह्याचवेळी आपल्या बगलबच्च्यांना मात्र सुरक्षीतपणे पंखाखाली घेण्यास हे मंत्री विसरले नाहीत.
ह्यासर्व प्रकारापुढे शरणागती पत्करून काही कलाकारांनी आपल्या कलेलाच तिलांजली दिली तर काहींनी दुसऱ्या नगराची वाट धरली, तर काहींनी मंत्री गटाला खूश करणारे लेखन, गायन, वादन सुरू केले. आजूबाजूच्या ह्या परिस्थितीत विदूषक अजूनही जनतेसाठी थोडाफार विरंगुळा निर्माण करत होता. विदूषक त्याचे काही मित्र अजूनही ही परिस्थिती बदलेल, निदान आपल्या सारख्या अतिसामान्य माणसांना तरी त्याची झळ पोचणार नाही अशी आशा करत होते. पण हळूहळू विदूषकाच्या एकेक मित्राचा नंबर लागायला सुरुवात झाली. कधी चोर म्हणून तर कधी नगरी कंटक म्हणून अवहेलना सुरू झाली....
अशाच दूषित वातावरणात एक दिवशी नेहमीप्रमाणे विदूषक आपली कला साकारायला बाहेर पडला. नेहमीप्रमाणे नगराच्या मुख्य चौकात जाऊन त्याने आपला खेळ सुरू केला. हळूहळू नागरिकांची गर्दी होऊ लागली. कोणी ओरडून प्रोत्साहन देत होते तर कोणी विशिष्ट नकलेची मागणे करत होते. कोणी खेळ फसतोय विदूषक चुकतोय असा गल्ला करत होते. एकूण मनोरंजनाची लाट जोरात चालू होती. अचानक 'खेळ बंद करा, खेळ बंद करा' अशा आरोळ्या उठल्या. बघावे तो काही मग्रूर मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे खेळाच्या ठिकाणी हजर झाले होते आणि गलका करत होते. हुशार नागरिक पुढे काय होणार हे ओळखून आधीच मागच्या मागे गायब झाले, तर इतर काही गंमत बघत तिथेच उभे राहिले. विदूषक मोठ्या नम्रतेने मंत्र्यांना समोरा गेला. त्याचे हात जोडून मंत्र्यांना "खेळ आवडला नाही का?" असे विचारले.
"हे पाहा रे दळभद्र्या, ह्यापुढे ह्या मुख्य चौकात कुठला खेळ चालावा आणि कुठला नाही ते आम्ही ठरवणार. तुझा हा खेळ अतिशय हिणकस व निरस आहे तेव्हा तो बंद कर.. बंद कर काय, आम्ही बंद केलाच आहे! तेव्हा चंबूगबाळे आवर आणि चालता हो. " मंत्री गरजले.
"पण मंत्रीजी तुम्ही स्वतः आजवर कधी कुठल्या वाद्याला हात लावला नाहीत की कधी कुठले गाणे गुणगुणले नाहीत. स्वतःच्या पगारपत्रका शिवाय बहुदा कधी काळी तुम्ही कुठे चार अक्षरे देखील खरडलेली नाहीत. असे असताना ह्या कलांचा अनादर करण्याचा, त्यांचा सकस-निरस ठरवायचा तुम्ही प्रयत्न का करत आहात? केवळ सत्तेवर आहात म्हणून? पण मग सामान्य जनतेला काय हवे आहे ते तिला कधी ठरवायला मिळणार? " विदूषकाने नम्रतेने विचारले.
"सामान्य जनतेला काय हवे आणि काय नाही ते आम्ही ठरवणार! कारण ह्या सामान्य जनतेचे स्वामी आम्ही आहोत. ह्या पुढे जनतेने काय वाचावे, ऐकावे आणि पाहावे हे आम्ही ठरवणार. जे आम्हाला योग्य वाटेल तेच जनतेसाठी योग्य. आणि तुला जर येवढीच फुशारकी असेल तर तुझे ते थोबाड रंगवण्याचे साहित्य घे आणि दुसऱ्या नगराकडे कुच कर. तिथे तुझ्या ह्या फालतू कलेचे कदाचित होईल कौतुक. "
मंत्र्यांच्या ह्या बोलाने वर्मी घाव घातल्यासारखा विदूषक कळवळला. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य फुटले.. जे थांबता थांबेना.
"काय रे नकल्या, तू काय वेडा झालास का काय? "
"नाही मंत्रीजी. मी विचार करत होतो की तुम्ही आत्ताच म्हणालात की कदाचित दुसऱ्या नगरात माझे कौतुक होईल, माझ्या फालतू कलेचे कौतुक देखील होईल. ह्याचाच अर्थ, फालतू का होईना पण माझ्या जवळ काही कला तरी आहे. ह्या नगराबाहेर ओळखणारे चार जण तरी आहेत. पण तुमचे काय मंत्रीजी? ह्या नगराबाहेर काळे श्वान तरी तुम्हाला ओळखते का? नगराबाहेरचे सोडा मंत्रीजी पण अहो कालच्या राजाची परिस्थिती बदलायला जिथे आज वेळ लागला नाही तिथे तुमचे काय? उद्या जेव्हा ह्या पदावरून पायऊतार व्हावे लागेल तेव्हा ज्या मिजाशीने ह्या जनतेत वावरत आहात तीच्या समोर खंबीरपणे उभा राहायची ताकद तुमच्यात असेल का? आज ज्यांची तोंडे रंगवत आहात त्यांच्या तोंडासमोर उभे राहायची तरी हिंमत अंगात असेल काय? वेळ बदलायला वेळ लागत नाही मंत्रीजी. आज ज्यांच्यावर वार करत आहात, उद्या वेळ बदल्यावर त्यांचे वार झेलायची देखील तयारी ठेवा. तेव्हा हात पाय थरथरू देऊ नका. संधी प्रत्येकाला मिळते, आणि ज्यादिवशी तुमची वेळ बदलेल त्या दिवशी सगळ्यात पहिला वार ह्या विदूषकाचा असेल. "
येवढे बोलून अतिशय शांतपणे विदूषक आपल्या घराकडे मार्गक्रमण करू लागला.
प्रतिक्रिया
चला पॉपकॉर्न घेऊन या
लेख इथे किती वेळ टिकतोय ते
+१
congres आहे हे सरकार. खरच
विदूषकआने क्रन्तिवाद आनि
>>>जुना राजा मोठा दर्दी,
वा व्वा ! अतिशय बाणेदार उत्तर
आरआयपी
आत्म्याला सद्गती? अहो विदुषक
ह्याबद्दल १०००००%
..
व्वा!!
रेफरन्स लागला नाही.
मला पण ....
चालता हो.
+१
हेच म्हणतो.
माझा प्रतिसाद
अप्रतीम
एकदम छान............
वा !
थोडं फार समजतंय....
परा तुझ वय किति लिहितोस
आज पहिल्यांदा
या सग्ल्याला कारन चोता दोन
+१
विदुषकाला मंत्री करावे या
अजिबात नाही. पण मला वाटतं की
नाण्याची दुसरी बाजू काय आहे ?
आणि राजानेही
बाब्बो ! वेगळाच विचार.
थोडा बदल...
मिपाट्रिक्स कसा वाटतो ?
फसलो पण पैसे वसूल
तो सिनेमा
खी: खी: खी:
हाहा
+१
सुधारणा
टुक्कार
+१
हा चित्रपट पहाताना तीन वेळा
अजुन एक भर घालतो.
ही माहिती इथे देण्याचे
तुलना केली नाही.
दरम्यान
विदुषकाने कर्करोगग्रस्त
मिभोलिक्स
म्हणायचे असेल तर
मिभो leaks की licks??
Pagination