Skip to main content

विड्या एक फुंकणे

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 11/11/2010 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
( विनायक पाचलग यांचा स्मृतीरंजनात्मक लेख वाचून आमच्याही काही बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या) आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळांएवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन आधुनिकता कशी वाईटच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते. आणि खरे आहे ते ..! पण, निदान दिवाळीच्या सुट्टीत तरी हा प्रश्न मला कधी पडायचाच नाही, का म्हणता? अहो विड्या ...... आमचा जीव की प्राण . त्यामुळे वेळ कसा घालवायचा असा विचार करायला तरी वेळ कुठे असायचा ? आधीच सहामाही परीक्षा दसर्‍याच्या वगैरे सुट्यांमुळे खूप लांबायची. त्यामुळे, परीक्षा संपायच्या आधीच विड्या फुंकण्याची तयारी सुरू व्हायची. जागा, कोण कोण येणार, कोण कधी गावाला जाणार आहे याची चर्चा व्हायची. आणि मग शेवटचा पेपर देऊन झाला की, हुर्रे! मग फक्त आम्ही पोरं आणि विड्या-काड्या! पेपर झाला ,की दप्तर टाकायचे आणि बाहेर पळायचे, सगळे वाट पाहत असायचेच. मग काय, मिशन विड्या आणि काड्या! मिळेल तिथून मिळेल तसली थोटकं आणायची, मोठी, छोटी, गुलाबी धाग्याची, जळलेली, विझलेली, सगळी. मग ती विडी पेटवता येईल का, याचा विचार पण करायचा नाही. खोबणीत अडकलेली विडी काढता येत नसेल तर, ''ये, इकडे या रे बाकीचे ..'' म्हणून बाकीच्यांना हाक मारायची. मग समुद्रमंथनातून रत्नं काढल्यासारखे आम्ही चार पाच स्वघोषित देव दानव ती विडी करकटकाचा वासुकी करून बाहेर काढायचो. अर्थात यात एक दोघांना खरचटायचं वगैरे. पण कोणाला कुठे लागलंय याच भानच नसायचं! उलट स्वातंत्र्यसैनिकासारख्या त्या खुणा आम्ही सार्‍या ग्रुपभर दाखवीत फिरायचो. पण याहून बोंब व्हायची ती जागा ठरविताना. चांगल्या जागेवर नजर असायचीच, पण आम्हा सगळ्या दोस्तांची एक आमसभा व्हायची. आणि त्यात दोन तीन जागांवर अणुकरारावर झाली तशी चर्चा व्हायची. ''अरे त्या जोशीकाकूंच्या बाजूच्या खोपटात नको तिथून धूर बाहेर येताना दिसतो.आपली सगळी मेहनत वाया जाईल.'' ''अरे, ते पवारासमोर नको रे, खाली राख पडलेली दिसली तर कॉलनी डोक्यावर घेतील ते.'' शेवटी सगळयांनुमते जागा ठरायची आणि आम्ही तिथे ही रत्नं आणून लपवून ठेवायचो. पुरेशा विड्या झाल्या वाटले की, थांबायचे. मग आता पुढची पायरी काड्यापेट्या आणणे, त्या जवळ कुठे मिळायच्या नाही. घरची पळवलेली आईच्या लक्षात आली की बाप रे बाप! मग चलो पानाची गादी! मिळतील त्या सबबी सांगून पानाच्या गादीवर जायचे. आणि एक एक करत खंडीभर काड्या पळवून आणायच्या, त्या आल्या की थांबणे नाही ,त्याच गंधकाच्या वासाच्या हाताने गँग कामाला लागायची ती विड्या पेटवायला .. इथं सगळं दंगा व्हायचा, कोंडाळं करून, थोटकं हातात घेऊन ''अरे, मोठं थोटुक आधी पेटव रे'' ''ही काडी पेटव'', ''अरे ठसका लागू देऊ नको रे.'' हजार सूचना, कोणाच्या पायावर ठिणगी पडते, खोपटातला एखादा कागद जळतो आणि साधारणता; एक तास, दोन तासाने विड्या ओढून व्हायच्या. मग राहिलेल्या खजिन्यावर गोणपाट टाकायचा. एखादं दुसर्‍याने एखाद्या वाण्याकडून तो आणलेला असतोच. हा, आता सगळे एका मजेशीर कामात बुडलेले असतात. एक्स्ट्रास्ट्रांगच्या गोळ्या वाटणे, एक गोळ्यांच पाकीट मिळालं की, साधारणता: दहा मिनिटात सगळ्यांच्या जिभा आपसूक लाल झालेल्या असतात, ''अभ्यास करा'' सारखे जिभा लाल करा असे इथे सांगायला लागत नाही, वास घालवण्यासाठी ते करावं लागतं हे आपसुकच ठाऊक असतं. विड्या लपवलेला खड्डा चिखल लावून सपाट बिपाट केला जातो. थोटकं बुजविली जातात. मग काय, थोडं सेंट शिंपडलं की, खोपट पुन्हा रेडी! एकदम फिट! पण हे विड्या पुराण इथेच थांबत नाही. यानंतर गँग बाहेर पडते ते पानं आणायला. चुना लावायचा, तंबाखु घालायची मग कोणत्या तरी शेजारच्या बिल्डिंगमधल्यांशी पिंक टाकण्याच्या स्पर्धेत भाग घेतलेला असतो त्यांची वाट पाहायची. बहुतेकदा ते येत नाहीतच. पण पाळीपाळीने सगळ्या खोपटापाशी थांबलेले असतात,आत्ता येतील ,मग येतीत म्हणून.. या सगळ्यात दिवाळी कशी संपली कळतंच नाही. या किल्ला पुराणात अनेक घटना घडायच्या, घडतात. जेवणखाणं तर आपण विसरलेलो असतोच. मग, घरातून आईचा ओरडा ''अरे, काही खाणार आहेस की नाही, का रात्रीच घरी येणार आहेस?'' मग रंगलेलं तोंड घेऊन घरी आल्यावर बाबाचा ओरडा ठरलेला. पोरापोरामध्ये भांडणे ठरलेली. कोणतरी रुसत, त्याला शांत करायचे. आणि जय संभाजी छाप म्हणत दिवाळी घालवायची. शेवटच्या दिवशी सगळी उरलेली थोटकं सुतळी बाँबमध्ये भरून पेटवला तर ढूम्म! स्वतः:च विड्यांची शकलं आसमंतात उधळायची. पण तुम्ही म्हणाल यात नवीन ते काय? आम्ही पण असंच करायचो.आता सगळ आठवतय ते आम्हाला , बरोबर आहे, कारण तीच आपली परंपरा आहे. पण आजकाल परिस्थिती बदलत आहे. सगळी पोरं ''मार्लबोरो, गुदांगरम'' सिगरेटी वापरत आहेत आणि यांच्यापुढे विड्या मागे पडत चालल्या आहेत. आणि काही पालक देखाल मुलांना वेगवेगळ्या बंधनांत अडकवून ठेवत आहे आणि हा आनंद हिरावत आहेत .. त्यामुळेच सगळे तज्ञ ,लेखक ओरडून सांगत आहेत, असं करु नका म्हणुन .. नेहमी सांगतात, पण तसा फारसा फरक पडत नाही.च महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे असं सांगावं का लागतं? आपणच आपल्या मुलांना यापासून का परावृत्त करतो? काही पालकांना एवढी काळजी, की विडीने तुला त्रास होईल म्हणून साखरेच्या सिगारेटी देणार, मग म्हणणार ओढ. हे काय नविनच? आजकाल मुलांचा आयक्यू चेक करतात. तो कमी आल्यावर चिडतात. मला एक सांगा, कसा वाढेल आयक्यू? विड्या फुंकण्यासारख्या उपक्रमामुळे जी मुलांची वाढ होते ती इतरवेळी होतच नाही. नकळतपणे मुले हुशार होतात, हरहुन्नरी होतात, एकत्र काम करायला शिकतात. अचानक आलेल्या संकटांना तोंड द्यायला शिकतात हे शिक्षण इतर कुठे मिळते बरे? निदान मी तरी शिकलेलो .. आपण त्यांना मदत केली , बंधन घातले तर तेच या शिक्षणाला मुकतात, त्यामुळे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन विड्या ओढू देणं हेच चांगलं! त्यांचे काय झालंय, असतंय तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. या म्हणीप्रमाणे आपण आपल्या मराठी परंपरांना विसरलोय. पारंपरिक गोष्टी सोडायच्या ..आणि नव्या गोष्टींनी आयक्यू वाढत नाही म्हणून ओरडायचं! लेख लिहायचे! मग असे प्रश्न आमच्या इंग्लिशच्या पुस्तकात येत आहेत. वाईट वाटत ते आपल्या करंटेपणाचं! सगळं असताना मॉडर्न व्हायच्या नादात आपण हे घालवतोय. आणि, संस्कृती मरतेय म्हणून गप्पा मारतोय, असो, सगळेच तसे आहेत असे मुळीच नाही ,पण आपण त्यात जाऊ नये एवढी काळजी घेउया ना ?काय म्हणता ? आणि ते सगळं राहु दे , आपली संस्कृती जपण्यासाठी म्हणून नव्हे, तर या स्पर्धेच्या जगात तुम्हाला तुमच्या पोराचा आयक्यू, इक्यू वाढवायचा आहे, म्हणून तरी, त्याला विड्या फुंकू दे, तुम्ही खूश आणि तो ही! बस्स, या दिवाळीला एवढंच सांगणं! सर्व मिपाकराना दिवाळीच्या (उशीरा का होईना) खुप खुप शुभेच्छा व ही भेट !!!! गेल्या डिसेंबर महिन्यात लिहिलेला हा अप्रकाशित लेख परवा सहज सापडला , तो आधीच उशीर झाल्याने इथे तसाच देत आहे . त्यामुळे वाक्यरचनेतल्या चुका, नसलेल्या म्हणी, काळाचे गोंधळ, स्वल्पविरामाच्या अथवा पूर्णविरामाच्या अलिकडे पलिकडे स्पेस ठेवण्याची विविधता, आणि सर्वसाधारण अशुद्धलेखन वगैरे गोष्टी बदलण्याच्या भानगडीत पडलेलो नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9887
प्रतिक्रिया 65

प्रतिक्रिया

_/\_ गुर्जी विषयाची निवड अगदी समयोचितच :)
पहिला अर्धा भाग आवडला. पोरापोरांनी परीक्षा संपल्यावर धुम ठोकून आपले गमतीचे उद्योग करणे अशा आठवणींशी बहुतेकांना एकरूप होता येतं. पण नंतरचं तत्वचिंतन ओढून ताणून आणल्यासारखं वाटलं. आपण आपल्या संस्कृतीतून काहीतरी हरवतोय असं म्हणणं ठीक आहे, पण त्याची जागा घ्यायला दुसरं काहीच नाही असं म्हणणं बरोबर वाटत नाही. ते खरं असतं तर एव्हाना बाल्य वगैरे गोष्टी संपून गेल्या असत्या कारण प्रत्येक पिढीतले वृद्ध हेच म्हणत आलेले आहेत. कदाचित काहीशे वर्षांपूर्वी पोरांनी विड्या ओढायला सुरूवात केली असेल तेव्हासुद्धा त्यांच्या वयोवृद्धांनी 'आमच्या काळी थेट तंबाखूंच्या पानांचं सेवन व्हायचं, ते आता आपण हरवत चाललो आहोत' अशी बोंब मारली असेल.
बाकी शेवटचा परिच्छेद वाचून अंमळ हळवा झालो :), शिवाय 'या किल्ला पुराणात अनेक घटना घडायच्या, घडतात.' हे वाक्य तसंच्या तसं वापरण्यामागची कल्पकता पाहून डोळे पाणावले!

उत्स्फुर्त अन ओढुन ताणुन यातला फरक आज अगदी ठसठशीत कळला! ० ० ० ० शेवटी ते लिखाण दगड विटांच निदान महिनाभर मनात रुंजी घालणार, मुलांना घेउन परत एकदा किल्ला करावा काय? अस वाटायला लावणार, अन हे लिखाण वर दाखवलेल्या धुम्र वलयांच झटक्यात उडुन जाणार. अन हा फरक व्यवस्थित दिसत रहावा म्हणुन 'या किल्ला पुराणात अनेक घटना घडायच्या, घडतात.' हे वाक्य संपादित करु नये अशी विनंती.

गद्याचे विडंबन हा साहित्यप्रकार मधल्या काळात कुठेशी लुप्त झाला होता किंवा मागे पडला होता, असे वाटायचे. मिसळपावच्या स्थापनेनंतर या साहित्यप्रकाराला नवजीवन मिळाल्यासारखे वाटते ;) लेख/विडंबन जे काही म्हणाल ते वाचनीय आहे. (वाचक)बेसनलाडू

प्रिय राजेश 'काका' सुंदर विडंबन लिहील्याबद्दल आभार. आपल्याकडे विडंबनाद्वारे लेख जशास तसा उभा करण्याचे कसब आहे. लेखातील जे आपण मुद्दे सांडले आहेत, ते खरंच लाचार करण्यास प्रवृत्त करतात. भविष्यात दे़खील अशीच विडंबने आपणाकडून वाचावयास मिळतील ही अपेक्षा. धन्यवाद!

माझे घर व माझे आजोळ शहरातले. आम्हाला बिड्यांऐवजी ओळख झाली ती डायरेक्ट सिगारची. आमची कोवळी फुफुस्से व त्यात बालदमा त्यामुळे सिगार पेटवतानाच जी वाट लागली तेव्हापासुन बिडी,गुडगुडी प्रकाराची नावड निर्माण झाली ती आजही कायम आहे. आपसूक पॅकमॅन ते वी खेळात आम्ही जे अडकलो ते अडकलोच. शेवटी बालपणची संस्कृती वेगळी असली म्हणून काय ज्याची त्याची संस्कृती ज्याला त्याला प्रियच असणार ना? असो आपले भवताल आणि अनुभव वेगळे आहेत , प्रत्येक जण आपापल्या अनुभवावर लिहितो ,ते वेगवेगळे असु शकतात .. पण त्यासाठी एकाने दुसर्‍यावर कुरघोडी करायचा प्रयत्न मात्र करु नये ,किंवा मी म्हणतो तेच खरे असेही करु नये एवढेच ... बाकी , तुम्हाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!! सहायक

छान लेख.फ्लॅट सिस्टीम मधे विड्या फुंकणं कमी होत चाललयं हे खरं आहे. आमच्या बिल्डींग मध्ये गेल्या कित्येक वर्षात मुलांनी बिड्या फुंकल्याच नाही आणी कोणी मोठ्यांनीही कधी पोत्साहन दिलेले पाहिले नाही. (त्यात मीही आलोच पण बाहेर रहात असल्याने तशी संधिही मिळाली नाही.) जय महाराष्ट्र , जय मराठी ! - फुक्या

मी माझ्या मुलान्ना मनोसोक्त बिड्या फुंकू देतो. मुलान्वर थोडा आरडाओरडा पण करतो म्हणजे बायको पण शान्त रहाते. कारण नन्तर सगळी केमोथेरपी तीलाच करायला लागते. तेवधा समतोल साधला कि बर्याच गोश्ति साध्य होतात. मुले खुश व बायकोहि खुश म्हणजे आपण हि खुश . - फुंकणप्रेमी

आम्ही बरिच वर्षं बीड्या फुंकायचो. थोटकं विझवायला नंतर जिवावर यायचं. एकेवर्षी बरेच दिवस विझवली नाही व नंतर आग लागली. भलीमोठी वित्तहानी झाली होती. आश्चर्यानं थक्क झालो होतो आम्ही मुले! पनवती.

किल्ला एक करणे या लेखावर आधारीत असे फालतू लेख का लिहिता? पाचलग यांचा लेख प्रामाणिक आहे. मला आवडला होता. त्यावर इतके फालतू विडंबन चांगले वाटले नाही. विडी ऐवजी इतर काही असते तर कदाचित चाललाही असता. पण लहानपणापासून विड्या प्यायल्याने काय होते याचे वयोवृद्ध उदाहरण घरातच आहे. त्यामुळे लेख आवडला नाही. शिवाय राजेशसाहेब हे चांगले लेखक आहेत. त्यांचे लेखन मी इंद्रासाहेबांच्या लेखना सारखेच आवडीने वाचतो. त्यांनी इतक्या खाली येऊन असे लिहिणे आवडले नाही. कंपूतल्या चार लोकांना खुष करण्यासाठी म्हणून आपण काहीही लिहू नये. ते आज हसतील उद्या काम आले तर निघून जातील. तुमच्यातला लेखक मात्र हीन पातळीवर येऊन बसेल. खुदाने तुम्हाला बुद्धीची फार मोठी देन दिली आहे. ती अशी वाया घालवू नका. वाईट वाटून घेऊ नका राजेश साहेब, जे खरे मनात आले ते लिहिले. कुणाच्या तरी खोट्या स्तूती पेक्षा खरे मत तुम्हाला आवडेल असे मनात आल्याने लाग इन करून प्रतिसाद दिला. तुमचे लेखन आवडत नसते तर सोडूनही देता आला असता. खरे मत न आवडल्यास तसे कळवावे, परत लिहिणार नाही.

In reply to by आंसमा शख्स

सहमत

In reply to by आंसमा शख्स

सर्वप्रथम प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. बऱ्याच लेखनाबद्दल नुसतं 'लेखन आवडलं' किंवा दुर्लक्ष अशा स्वरूपाचे प्रतिसाद मिळतात. त्यातून लेखकाला पुरेसा फीडबॅक मिळत नाही असं मला राहून राहून वाटतं. तुम्ही मनापासून काय वाटलं आहे ते लिहिलं ते बरं वाटलं. नावडण्याचा प्रश्नच येत नाही.
विडी ऐवजी इतर काही असते तर कदाचित चाललाही असता. पण लहानपणापासून विड्या प्यायल्याने काय होते याचे वयोवृद्ध उदाहरण
तुमच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सहानुभूती आहे. मुळात 'नाड्या एक चोखणे' असा लेख लिहायचं माझ्या बायकोच्या मनात आलं होतं. तांत्रिक कारणांमुळे मला विड्या अधिक सोयीस्कर वाटलं, म्हणून विड्या निवडलं. मुळात हे विडंबन आहे त्यामुळे मी खरोखरच मुलांना विड्या ओढू द्याव्यात असं म्हणत नाहीये, हे लक्षात घ्यावं. माझ्या डोळ्यासमोर मिरासदारांची 'धडपडणारी मुले' ही कथा होती. विडंबन करताना काहीतरी उच्च भावना घ्यायची व तिचं 'संकल्पनांतर' (भाषांतर सारखं) करून हास्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न करायचा ही क्लृप्ती असते. पाचलगांचा लेख प्रामाणिक होता याबद्दल वादच नाही. पण मला तो भाबडा वाटला होता. (माझी त्या लेखावरची प्रतिक्रिया पहावी). आपली संस्कृती आपण विसरतो आहोत याबद्दल टाहो फोडण्याचा प्रकार शतकानुशतकं चालू आहे. त्या भाबडेपणाची चेष्टा करायची होती. ज्या स्मृती आपण खरोखरच हरवल्या आहेत त्या स्मृतींची नाही. किल्ला करण्याविषयीचा जिव्हाळा, किंवा आणखीन सर्वसाधारणपणे आपल्या लहानपणीच्या रम्य आठवणी पुन्हा उजळण्यात जो आनंद असतो, त्या आनंदाचीही चेष्टा करायची नव्हती. पण नवीन पीढीला तसं काहीच नाही असं म्हणणं मला धार्ष्ट्याचं वाटतं इतकंच. विडी आणि सिगरेट च्या उदाहरणातून किल्ला आणि नवीन काहीतरी खेळ यातलं साम्य/वैविध्य अधोरेखित करायचं होतं. कंपूला सुखावण्यासाठी, टाइमपास, वगैरे लेखन करायला हरकत नाही. पण या लेखनामागचा उद्देश वाटतो तितका थिल्लर नव्हता एवढंच म्हणायचं आहे. बाकी तुमच्या कौतुकाबद्दल धन्यवाद. त्याला मी पात्र आहे की नाही ही शंका तूर्तास बाजूलाच ठेवतो.

In reply to by आंसमा शख्स

प्रामाणिक आणि उत्कृष्ट प्रतिसाद. आवडला. मूळ लेख हा पाचलगांच्या लेखावरून प्रेरणा घेऊन लिहिलेले खरे अनुभव आहेत असे समजून उघडला होता. मिपावर विडंबन हा overused प्रकार झाला आहे. दहातील एकच चांगला असतो फारफार तर . त्यामुळे मी फार अपेक्षा ठेवत नाही असे धागे उघडताना. मुळात विडंबन म्हणजे मूळ कविता किंवा लेखाच्या प्रत्येक वाक्याशी मिळते जुळते वाक्य लिहिणे इतपतच मर्यादित आहे का? शैलीचेही विडंबन होऊ शकते, पण ते करणे कठीण असते. नुकतेच मिपावर येऊन गेलेले काव्यफुफाटा हे मला त्या प्रकारातले वाटले. चला, वाचनालयातून झेंडूची फुले आणीन म्हणतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मिपावर विडंबन हा overused प्रकार झाला आहे. दहातील एकच चांगला असतो फारफार तर . त्यामुळे मी फार अपेक्षा ठेवत नाही असे धागे उघडताना.
अगदी..

टारूभाऊंच्या जालनिर्वाणानंतर गद्यविडंबन प्रकारामधे कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे हे प्रकर्षाने जाणवते आहे.

एका चांगल्या, मनापासून लिहिलेल्या लेखाचे अत्यंत हिडीस व हीन दर्जाचे विडंबन मिपावर यावे याची एक मिपाकर म्हणून मला अत्यंत शरम वाटते..! बाकी चालू द्या..!

कोण गाढव आपल्या मूलाला विड्या नको Marlboro, Gudang Garam odh ओढ असे म्हण्तो ? Gudang Garam ही मूलान्चि नीवड आहे, आणी तूमची निवड मूलावर लादू नका. तूमच्याच काय तूमच्या वाडीलान्च्या काळात Gudang Garam आसते तर त्यांनी सूध्दा Gudang Garam ओढले असते. आस्ल्या गोश्टीनि विकास खून्टत नसतो. (बाकीशून्य)
=================
अवांतरः मूळ लेखाचं शीर्षक वाचूनच एकदम फुलपाखरी अश्रूपात टाईप कच्चा माल असेल अशी कल्पना आली होती. हल्ली कसे ते नवीन चित्रपट येतात ना, दाग - The fire, वगैरे नावांचे, तसं काहीसं वाटलं होतं. विडंबन पहायच्या आधीच "कल्ला - एक करणे -- अगदी सणाच्या कुशीतून" असं शीर्षक सुचलंही होतं; आता ते बासनात बांधून टाकते. विडंबन वाचून गुर्जींची वामनमूर्ती आगीशी खेळ करत विड्या फुंकते आहे असं काहीसं चित्रं डोळ्यासमोर आलं.

हे विडंबन वाचून एकदम ४-५ वर्षाची असताना गावात एकदा दुकानात एका माणसाने विडी फुंकायला दिली होती त्याची आठवण आली... आता आम्हाला विडी काडी अजिबात चालत नाही.. फक्त सिगारेटीच अन त्यातसुद्धा मार्लबोरो जास्तच..असो विडंबन छान...उगाच इतरांकडे लक्ष नका देऊ.

गुर्जी जमलं नाही एवढेच म्हणेन. तुमची इतर विडंबने फर्मास आहेत. इथे विषयाची निवडच चुकली असे वाटते आहे. २ विषय एकमेकांशी पूरक नसतील म्हणुन असे वाटत असेल कदाचित. पण मजा नाही आली. हाऊसफुल्ल मधल्या विनोदांसारखे वाटले - ओढुनताणुन केलेले. बाकी विडंबन च असल्यामुळे लहान मुलांनी विड्या पिणे वगैरेबद्दल मला काही आक्षेपार्ह वाटले नाही. एखादा छानसा लेख येऊ देत. हा बासनात गुंडाळुन टाका.

स्तुत्य प्रयत्न पण घरच्या मैदानात गुर्जी hit wicket झालेले दिसताहेत... :) ह. घ्या... - टारूभाऊंच्या जालनिर्वाणानंतर गद्यविडंबन प्रकारामधे कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे हे प्रकर्षाने जाणवते आहे. सहमत...

मी मिपाचा सभासद आहे याची पुन्हा जाणीव करुन देणारा लेख... :)

In reply to by विनायक पाचलग

कृपया हे लेखन व्यक्तिगत पातळीवर घेऊ नये. माझी भूमिका मी मूळ लेखावर आणि इथेदेखील मांडलेली आहे. तुमच्या लेखनाचं, मांडलेल्या विचारांचं विडंबन आहे. विडंबनाचा दर्जा सुमार आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तुम्हाला टारगेट करण्याचा प्रयत्न नाही. मी मिपाचा सभासद नसताना इतरांकडून तसा झाला असेल तर त्याला मी काय करणार?

In reply to by राजेश घासकडवी

व्यक्तिगत पातळीवर अजिबात घेतलेले नाही .. लेख वाचल्या वाचल्या जे वाटले ती स्पाँटेनियस प्रतिक्रिया आहे ... या प्रतिक्रियेचा आणि सदरचा लेख माझ्या लेखाचे विडंबन असल्याचा तसा संबंध नाही ..

In reply to by विनायक पाचलग

या प्रतिक्रियेचा आणि सदरचा लेख माझ्या लेखाचे विडंबन असल्याचा तसा संबंध नाही ..
भाऊ, तुम्ही जर मूळ लेखाचे लेखक असाल तर हे डिस्क्लेमर मूळ प्रतिसादात यायला हवं होतं. नाहीतर इतक्या त्रोटक प्रतिसादातून चुकीचे अर्थ काढले जाऊ शकतात. अजूनही तुमच्या 'मिपाचा सभासद असल्याची जाणीव होण्या'चा अर्थ कळलेला नाही. गरज वाटल्यास समजावून सांगा.

In reply to by राजेश घासकडवी

मी मिपाचा सभासद आहे = मीसुद्धा मिपाचाच सभासद आहे. एकाच मायेची लेकरे आपण. थोडा खट्याळपणा चालायचाच. मी मिपाचा सभासद आहे = हम्म. शेवटी माझा लेख मिपावर होता. विडंबन होणारच. मी मिपाचा सभासद आहे = अहो शेवटी काही झाले तरी एक सामान्य सभासद आहे हो मी. मुकीबिचारी कुणी हाका. मी मिपाचा सभासद आहे = मी मिपाचा सभासद आहे म्हण्टलं , अजून ! हलके घ्या ! ;-)

In reply to by इंटरनेटस्नेही

श्री इंटरनेट्स्नेही, नुस्ते वाखाणुन होवावयाचे नाही. त्याचबरोबर प्रतिसाद लेखकांस एक विशेषण बहाल करायची प्रथा मिपावर आहे हे तुम्हांस माहीत नाही काय? (नसल्यास "हुशार", "रामसे चान" इ. शब्दांचा शोध घेणे, अन अभ्यास वाढवणे)

In reply to by Nile

त्याचबरोबर प्रतिसाद लेखकांस एक विशेषण बहाल करायची प्रथा मिपावर आहे हे तुम्हांस माहीत नाही काय? (नसल्यास "हुशार", "रामसे चान" इ. शब्दांचा शोध घेणे, अन अभ्यास वाढवणे)
एवढा गंभीर विषय सुरू आहे आणि तुम्ही विषयांतर करून प्रतिसाद खाताय. विशेषणांचा अभ्यास वेगळ्या चर्चेत करूया. इथे विडंबनांची धोरणे ठरवू द्यात लोकांना. ;)

In reply to by Nile

आपले मा. संपादक मुक्तसुनीत यांना आम्ही मिसळपाव प्रतिसाद श्री हे विशेषण जाहिर करत आहोत.

In reply to by राजेश घासकडवी

बरेचसे प्रतिसाद वाचले .. हे विंडबन ज्याच्यावर आहे त्या मुळ लेखाचा लेखक म्हणुन मला काहीही म्हणायचे, प्रतिवाद वगैरे करायचा नाही आहे .. आणि कोण कोणाच्या लेवलचा हेदेखील पहायचे नाही आहे व यातील काहीही मी वैयक्तीक वा मनावर घेतलेले नाही ....... पण या सगळ्यामुळे जी काही सांगोपांग चर्चा झाली त्याचा खुप आनंद झाला .. आपला लेख काही नाही तरी निदान यासाठी उपयोगी पडला हे महत्वाचे .... महत्वाचे म्हणजे , यापुर्वी देखील माझ्या लेखांची विडंबने आलेली आहेत , पण सुदैवाने त्या सर्वाचा मला फायदाच झाला आहे .. लिखाणात आणि स्वतःत खुपसे बदल करता आले ..सुदैवाने ते बदल लोकांनाही दिसत आहेत हे प्रतिसादातुन समजले, आनंद वाटला ... हे विंडबन देखील अशाच प्रकारे माझ्या प्रगतीसाठी उपयोगी ठरेल असे वाटते , त्यासाठी लेखकाचे व प्रेमाने प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासुन आभार तुमचाच ( मिपाकर) विनायक

विडंबन आणि त्यावरील उलटसुलट प्रतिसाद, सर्वच रोचक. ;)

विडंबन लेख जमवण्याची चौकट नीट जमवलेली नाही. विडंबन घिसाडघाईने पडल्यासारखे वाटते. उदाहरणार्थ, "विड्या" हा खेळ, आणि त्या खेळाचे महत्त्व फक्त दिवाळी-उन्हाळ्याच्या सुट्टीत... ही जोडणी काही जमली नाही. - - -
आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, "मनोरंजनाच्या नव्या साधनांनी मानसिक वाढ खुंटली आहे का?" दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा, आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे. याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात शाळा सुटली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या अनेक लेखातुन संगणकीय खेळ त्रासदायकच (हे मुळातलेच!!!) हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते. आणि खरे आहे ते ..! . पण, निदान अकरावी-बारावीची शाळा सुटल्यावर तरी हा प्रश्न मला कधी पडायचाच नाही, का म्हणता? अहो विड्या ...... आमचा जीव की प्राण . त्यामुळे वेळ कसा घालवायचा असा विचार करायला तरी वेळ कुठे असायचा ? आधीच बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीमुळे दुपारचे तास खूप लांबायचे. त्यामुळे, तास संपायच्या आधीच विड्यांची तयारी सुरू व्हायची. जागा, कोण कोण येणार, कोण घरच्या कामात आडकला आहे याची चर्चा व्हायची. आणि मग शेवटचा तास संपला की, हुर्रे! मग फक्त आम्ही पोरं आणि विड्या-काड्या!
- - - वर अधोरेखित केल्याइतपत तरी कथानक विड्यांच्या आपणा सर्वांच्या शाळेतील अनुभवाशी समांतर करायला हवे होते. "दर दिवाळीच्या सुटीत मित्रा-मित्रांचा विड्या ओढायचा प्लॅन होतो", असा कोणाला अनुभव आहे? विडंबन स्वतःहून एक भंपक कथा म्हणून उभे राहायला पाहिजे. इथे तर लेखातले एक-एक वाक्य कथानकात कसे काय जुळते ते कळण्यासाठी श्री. पाचलग यांच्या "किल्ला" लेखाचा संदर्भ घ्यावा लागतो. - - - ही झाली तांत्रिक टीका. गद्य आणि शिवाय वर एका वाचकाने सांगितलेली नावड मी प्रतिध्वनित करतो - श्री. पाचलग यांचा लेख प्रामाणिक आहे. श्री. पाचलग यांची भडभडून "गेले ते दिन" गाणारी शैली त्यांच्या नव-प्रौढ वयोमानाला शोभणारी आहे. त्यातील हल्लीच-पौगंडावस्था-सोडलेल्यास-सुलभ स्मृतिरंजन विडंबनाचे कोरडे ओढण्याच्या स्तराला पोचत नाही. टीकेचा प्रतिकार करण्यासाठी लागतो तो अनुभव त्यांच्यापाशी नाही, पण "अजून मी आहे बरे" म्हणण्याचा खिलाडूपणा आहे. अहो, एखाद्या पौगंड मुलाचा प्रणयाराधनात झालेला फजितवडा बघितला तर मला कळवळायला होते. फिस्सकन् हसायला आले तरी त्यात खजील सहानुभूतीचा अंश असतो. विडंबनात अशा प्रकारे "टीनएज आंग्स्ट" दाखवता आली असती, तर त्यात मानव्य कलात्मक गुण असता. मात्र अशा मुलाची फजिती केवळ हास्यास्पद म्हणून दाखवली, तर तशा हसण्यात आणि शाळेतल्या दादागिरी "बुलीइंग" मध्ये काय फरक आहे? (थोडक्यात "पिक समवन युवर ओन साईझ!", "पिक समवन हू इश्यूज यू अ चॅलेंज".) - - - कौशल्य पणाला लावायचे होते, तर राजेश घासकडवी यांनी आधी स्मृतिरंजनाचा दांभिक अतिरेक असलेला एक अतिप्रातिनिधिक (आर्केटिपिकल) निबंध मनात रचायला हवा होता, तो थेट न-देता त्याचे विडंबन करायला हवे होते. तो बाळपणातला अतिप्रातिनिधिक असता, तरी चालले असते. कारण कुठल्या एका बाळाचे नव्हे तर आपणा सर्वांतल्या बाळाची ती चिडवाचिडवी असती. अशा तर्‍हेने केवळ विडंबन वाचून वाचकाला आपल्या आयुष्यात वाचलेल्या कित्येक दांभिक स्मृतिरंजनांची आठवण आली असती. वाचकाच्या स्मृतीमध्ये जाऊन गुदगुल्या करणारे असे विडंबन जमले असते, तर कलाकृती उच्च दर्जाची ठरली असती.

In reply to by धनंजय

एखादं लेखन जमतं, एखादं जमत नाही, वाचकांच्या मनात उतरत नाही. त्यावर किती का कारणं दिली तरी ती कारणं पटल्यामुळे ते लेखन आवडेल असं नाही. आपल्याला व इतर अनेकांना हे लेखन आवडलं नाही हे शेवटी खरं महत्त्वाचं. काहींना त्यातला विनोद दिसला, काहींना ते नाही भावलं. काय करणार. तांत्रिक बाबींचे खुलासे देत नाही. कारण विडंबनाच्या संभाव्य प्रकारांपैकी मी 'शब्दशः विडंबन' निवडलं. त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही सुचवलेले बदल करून शेवटचा परिच्छेद लिहिणं कठीण झालं असतं. खुलासे आहेत ते माझ्या प्रयत्नाचे. कारण त्याविषयी अनेकांच्या मनात गैरसमज आहेत असं वाटतंय. "गेले ते दिन" असं स्मृतीरंजनात्मक लिखाण मनोहारी असू शकतं याबद्दल वादच नाही. त्याला मी भाबडेपणा म्हणत नाही. किंबहुना 'गेले ते दिन गेले' या गाण्यातली हरवलेपणाची वैयक्तिक भावना मूळ लेखातल्या पहिल्या भागात आलेली आहे. चेष्टा त्या भावनेची नाहीच, चेष्टा आहे ती पुढच्या तत्वचिंतनाची. 'आमच्या लहानपणी आम्ही क्ष करायचो. त्यावेळी आम्ही सुखी होतो. तेव्हा ते सुख क्षमुळेच असणार. आता क्ष नाही, तद्वतच आजची पिढी सुखी नाही.' याला मी वैचारिक भाबडेपणा म्हणतो. त्या विचाराचं विडंबन करण्याचा प्रयत्न होता. पण इतकं समजवावं लागतं याचा अर्थ तो काही अंशी तरी फसला असावा. हरकत नाही. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे मिपावरचं साहित्य म्हणजे काही कालिदासाचं अजरामर महाकाव्य नाही.
"पिक समवन युवर ओन साईझ!", "पिक समवन हू इश्यूज यू अ चॅलेंज"
या वाक्यांतलं समवन हे मला विशेष पसंत पडलं नाही. हा लेख कोणी लिहिला आहे याने काडीमात्र फरक पडत नाही. सर्वत्र बोकाळलेल्या 'जग पूर्वी चांगलं होतं आता ते बिघडत चाललं आहे' या विचाराशी भांडण आहे. आणि त्याची साईझ प्रचंड आहे.

In reply to by राजेश घासकडवी

सर्वत्र बोकाळलेल्या 'जग पूर्वी चांगलं होतं आता ते बिघडत चाललं आहे' या विचाराशी भांडण आहे.
हे ठीकच आहे. पण कोणाशी भांडण काढता त्याचा काडीमात्र फरक पडतो. खाली भाई"काका" नाईलमुखातून म्हणतात : पुण्यातल्या बालवाडीतही म्हणतात "आमच्या वेई असे नव्हते". त्या बालवाडीत बौद्धिके घेणार नाहीत इतका काडीमात्र फरक करण्याचा सदसद्विवेक तुम्हाला आहे, आणि तो अनुभवातून मिळवलेला आहे. त्या बालवाडीतली पोरे घेतील एकमेकांची बौद्धिके. लाडात-तिरसट बोलणारा लहान बालक आणि प्राध्यापक येरकुंडीकर यांच्यात भरपूर फरक करता येत असेल, तर त्याच्या मधल्या पायर्‍यांवर शाळकरी-महाविद्यालयीन-कॉलेजकुमार यांच्याशी काय आणि कसा वाद घालायचा याच्या पायर्‍या सुद्धा तुम्हाला जमतात यात काही शंका नाही. मला या पायर्‍यांत काडीमात्र फरक करता येत नसेल, हे खरेच खरे असेल, तर समाजातला अनुभव माझ्यावर वाया गेला. श्री. पाचलग मिसळपावावर गेले काही वर्षे लिहीत आहेत. मोठमोठाले असमर्पक शब्द, अनुभव नसलेल्या, पण अनुभव हवाहवासा असलेल्या भावनांचा उद्रेक, आणि अलंकारांची फेकाफेकी अशा प्रकारचे लिखाण महाविद्यालयीन विद्यार्थ्याला साजेसेच होते. मिसळपावावर भडकमकर मास्तर वगैरेंनी याबद्दल श्री, पाचलग यांना सांगितले. गेल्या काही वर्षांत श्री. पाचलग यांच्या लेखनशैलीत लक्षणीय सुधार झालेला आहे. त्यांचे लेखन आणि अपरिपक्व-कॉपीकॅट कल्पना त्यांच्या वैयक्तिक विकासाच्या मानाने योग्यच आहे. श्री. पाचलग या अधिक अनुभवानंतर त्यांच्या जन्माआदल्या काल्पनिक स्वर्नकाळाच्या स्मृतिरंजनातून बाहेर येतील, ही आशा मलासुद्धा आहे.

In reply to by धनंजय

"पिक समवन युवर ओन साईझ!"
असं म्हणून श्री. धनंजय यांनी श्री. पाचलग आणि/किंवा श्री. घासकडवी यांचा पाणउतारा केलेला आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्हाला ज्ञानेश्वरांची आठवण आली. ;-) साला सद्ध्या भलत्याच आठवणी येत आहेत! (आता लगेच आम्हाला सन्यासाची आठवण करुन देणारे खरडवहीत येतील)

In reply to by Nile

आम्हाला धनंजय ह्यांचा प्रतिसाद वाचून चांगदेवांची आठवण आली. घासुगुर्जी, चला ड्रायव्हर व्हा, आम्ही भिंतीवर बसलो आहोत.

In reply to by धनंजय

श्री. पाचलग यांची भडभडून "गेले ते दिन" गाणारी शैली त्यांच्या नव-प्रौढ वयोमानाला शोभणारी आहे.
कदाचित असेलही, पण आम्हाला पुलंच्या 'पुण्यातील' "पुर्वीचं पुणं राहिलं नाही " म्हणणारी बालवाडीची मुलं का आठवतात कुणास ठावुक!

In reply to by शिल्पा ब

हा प्रकार काय फक्त पुण्यातल्याच बालवाडीत असतो काय? "किड्स से द डार्न्डेस्ट थिंग्स" - बालवाडीतली मुले मोठ्या माणसांच्या चपला घालून ऐतीत फिरतात, लुटूपुटू ऑफिसात जातात, आणि स्वयंपाक करतात, आज्जी-अज्जोबांसारखे जपजाप्य करतात. हे सगळे पुण्यात आणि पुण्याबाहेर सगळ्या गावांतल्या मुलांनी केलेले दिसते. मग आज्जी-आजोबांसारखे "आमच्या वेळी असे नव्हते" म्हणणारी पोरे पुण्याबाहेरच्या लोकांना दिसत नाहीत ते कसे? सहानुभूती थोडी कमी करा आणि जगाभरातल्या सगळ्या मुलांना ढोंगी म्हणून बदडा. सोपे आहे.

In reply to by धनंजय

एक पक्षी जो झाडावर गाणे गातो , त्या गाण्यात आहे एक झाड , ज्या झाडावर एक पक्षी गाणे गातो. प्रतिसाद घुमवण्याचा दांडपट्टा नीट घुमवलेला नाही. प्रतिसाद शरदिनीबाईंनी पाडल्यासारखा वाटतो. उदाहरणार्थ, "विडंबन" हा खेळ, आणि त्या खेळाला येणारी विद्वज्जड प्रतिक्रिया... ही जोडणी काही जमली नाही. - - -
गद्य आणि शिवाय वर एका वाचकाने सांगितलेली नावड मी प्रतिध्वनित करतो - श्री. पाचलग यांचा लेख प्रामाणिक आहे. श्री. पाचलग यांची भडभडून "गेले ते दिन" गाणारी शैली त्यांच्या नव-प्रौढ वयोमानाला शोभणारी आहे. त्यातील हल्लीच-पौगंडावस्था-सोडलेल्यास-सुलभ स्मृतिरंजन विडंबनाचे कोरडे ओढण्याच्या स्तराला पोचत नाही.
- - - वरच्या प्रतिसादात कुठे काय (आणि का) अधोरेखित करावे हे सुद्धा कळत नाही. "एका विडंबनाला जडजंबाल प्रतिसाद ", असा कोणाला अनुभव आहे? प्रतिसाद स्वतःहून एक भंपक लघुकथा म्हणून उभा राहायला पाहिजे. इथे तर प्रतिसादातले एक-एक वाक्य विड्म्बनात , आणि मग कथानकात कसे काय जुळते ते कळण्यासाठी श्री. पाचलग यांच्या "किल्ला" लेखाचा ,घासकडवी यांच्या विड्म्बनाचा ,शब्द्कोशाचा आणि शेवटी विश्व्कोशाचा संदर्भ घ्यावा लागतो. - - - ही झाली तांत्रिक टीका. गद्य आणि शिवाय वर एका 'चावका'ने न सांगितलेली नावड मी प्रतिध्वनित करतो (म्हणजे मीच ध्वनित करतो आणि ती मेंदूला धडकून आपोआप प्रतिध्वनित होईल)- श्री. घासकडवी यांचा विडंबन लेख प्रामाणिक आहे. श्री. घासकडवी यांची भडभडून "आयला काय दिवस आलेत" गाणारी शैली त्यांच्या गत-प्रौढ वयोमानाला शोभणारी आहे. त्यातील हल्लीच-तुंदिलतनु तिशी -जडलेल्यास-सुलभ विडंबन विद्वत्तेचे कोरडे ओढण्याच्या स्तराला पोचत नाही. टीकेचा प्रतिकार करण्यासाठी लागतो तो अनुभव त्यांच्यापाशी आहे पण "दिल तो बच्चा है जी" म्हणण्याचा कृतक लडिवाळपणा नाही. अहो, एखाद्या विडंबकाचा वाचकांनी केलेला फजितवडा बघितला तर मला कळवळायला होते. फिस्सकन् हसायला आले तरी त्यात खजील सहानुभूतीचा अंश असतो. प्रतिसादात अशा प्रकारे "विश्वाचे आर्त" दाखवता आले असते, तर त्यात मानव्य कलात्मक गुण असता. मात्र अशा विड्म्बकाची फजिती केवळ हास्यास्पद म्हणून दाखवली, तर तशा हसण्यात आणि शाळेतल्या दादागिरी "बुलीइंग" मध्ये काय फरक आहे? (थोडक्यात "गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा!", "पाव्हनं जरा जपून , एड्स येतोय लपून".) - - - कौशल्य पणाला लावायचे होते, तर धनंजय यांनी आधी मेलो , वारलो , खपलो चा अतिरेक असलेला एक अतिप्रातिनिधिक (आर्केटिपिकल) धागा मनात विणायला हवा होता, तो थेट न-देता फक्त बाडिस करायला हवे होते. तो बाडिस +१ असता, तरी चालले असते. कारण कुठल्या एका धाग्याला नव्हे तर कुठल्याही धाग्याला तो प्रतिसाद झाला असता. अशा तर्‍हेने केवळ प्रतिसाद वाचून वाचकाला आपल्या आयुष्यात वाचलेल्या कित्येक प्रतिसादांच्या बोरन्हाणाची आठवण आली असती. वाचकाच्या स्मृतीमध्ये जाऊन गुदगुल्या करणारे असे प्रतिसाद रचले असते, तर ते सुद्धा कलाकृती म्हणून उच्च दर्जाचे ठरले असते.

In reply to by अडगळ

मेलो वारलो खपलो मेलो वारलो खपलो मेलो वारलो खपलो मेलो वारलो खपलो मेलो वारलो खपलो

In reply to by अडगळ

आणि पुलेशु तुम्ही पोरासोरांना वाटेल तेवढे बदडा. तुम्हाला पश्चिमेकडच्या सर्व गुरूनी परमिट दिलेले आहे. शिवाय आजकाल मुलांना बेदम शिस्त लावणार्‍यांना "ज्ञानेश्वर" मानतात, आणि "आंधळा क्रूरपणा करू नका" म्हणणार्‍यांना "गर्विष्ठ चांगदेव" मानतात. त्यामुळे तुम्हाला ज्ञानेश्वरांसारखे भिंत चालवून अमर व्हायचे आहे, की चांगदेवासारखे पाणउतारा-झालेले?

In reply to by धनंजय

क्षमस्व चे प्रयोजन कळले नाही. लेख > विडंबन > प्रतिसाद > प्रतिसादाचे विड्म्बन असे मजेशीर वर्तुळ बनवावे म्हणून माझा प्रतिसाद होता. तसे मी कवितेच्या ओळीतून सूचित केले होते. ठळक पहिली ओळ. तरी ही प्रतिसादामुळे भावना दुखावल्या असल्यास क्षमा मागतो.

In reply to by धनंजय

पासष्ट प्रतिसाद झाल्याखेरीज, कुणीही चांगदेव होऊ शकत नाही, असे म्हणतात :-) पाचलगांना पोरेसोरे असे संबोधणे मला तरी खटकले बॉ. त्यांना (म्हणजे त्यांच्या निबंधलेखनकौशल्याला) घासू गुर्जींनी योग्य तो आदर दिला आहे, असे मला वाटते. त्यानिमित्ताने बोळा निघाला, पाणी वाहते झाले, तर ठीकच आहे.

In reply to by मिसळभोक्ता

पाचलगांनी तुम्हाला हवे म्हणून लगबग मोठे व्हावे ही एवढी घाई का?

In reply to by चित्रा

आपले पूर्वज महान होते. आता उदाहरणार्थ चाणक्य घ्या. लालयेत पंच वर्षानि दश वर्षानि ताडयेत प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं (किंवा पाचलगं) मित्रवदाचरेत पाचलगांना बदडणे सोडून मित्रासारखे वागवावे, असे आमच्या मनात आहे.

In reply to by मिसळभोक्ता

आपले म्हणजे कोणाचे? आमचे पूर्वज झाडावर बसत. अजूनही काहीजण ती टेंडन्सी दाखवतात.

लेखकास विडंबन कशाचे आणि का करतात हे बहुदा माहिती नसावे. बाकी शाळकरी मुले आणि विड्या यावरून द. मा. मिरासदारांच्या एका सुंदर कथेची आथवण झाली.

भाऊ झंडु बाम... दबंग..दबंग..दबंग..

In reply to by शिल्पा ब

तुम्ही भलते अर्थ काढू नका! या लेखा-प्रतिसादांत आधीच पुरेसे वेगवेगळे अर्थ काढून झालेले आहेत.

आजकाल मिसळ पावाचे फोरम पाहुन अस वाटायला लागलय.

In reply to by नरेशकुमार

भारी आहेत स्मायल्या (?). पहिली विशेष आवडली. मिपावर वावर करताना विशेष उपयोगी आहे.