Skip to main content

द्वैताशिवाय निर्मिती शक्य आहे काय? (कृपया युक्तिवाद द्यावा.)

लेखक क्रेमर
Published on शनीवार, 06/11/2010

वाचन संख्या 1240
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

होय असे उत्तर दिले आहे. युक्तिवाद टंकण्याइतका वेळ नसल्याने (दिवाळी आहे ना भो! देवपूजा वगैरे, देवळांत जाणे, नातलगांना भेटणे अशी बरीच कामे आहेत ) जिज्ञासुंनी वेदांताचा अभ्यास करावा असे सुचवतो. :)

अनिश्चित ला मत दिले आहे. हा युक्तीवाद नाही. काय आहे ते मला माहीत नाही. द्वैत नाही हे जाणवलं की स्वत:च्या तोपर्यंत झालेल्या बांधणीसकट सर्व निर्मिती कोसळू लागतात. हे तीन सेकंदापेक्षाही कमी काळात घडते. (नंतर तो जो कुणी असेल त्याची शरीराची उपस्थिती वगळता काहीच शिल्लक उरत नाही) या तीन सेकंदात घडणार्‍या घटनेपर्यंत जाण्याचा कोणताही मार्ग नाही. ध्यान, समाधी, विपश्यना, साक्षीभाव हे जे मार्ग आहेत उंच कड्यापर्यंतच जाणारे मार्ग आहेत. यात आंतर-मनो-शारीरिक इजा होणारच नाही अशी काहीही खात्री नाही. सर्व उपनिषदकार, दर्शनकार, पतंजली, भ. बुध्द, योगी अरविंद, जे. कृष्णमूर्ती, रजनीश आणि त्यांचे अलिकडचे बगलबच्चे व त्यातून फोफावलेली प्रजा, एकहार्ट टुली, मूजी, पुंजाजी, एसएसवाय वाले ऋषि प्रभाकर, आर्ट ऑफ लिव्हींगवाले श्रीश्री रविशंकर सर्व सर्व त्या कड्यापर्यंतच पोहोचून तिथेच मुक्काम ठोकून तिथूनच आरोळ्या ठोकणारे लोक आहेत. या विधानाला यु.जी. कृष्णमूर्ती या अगदी अलिकडेपर्यंत आपल्यात असलेल्या आपल्यासाठीच्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या "कॅलॅमिटीचा" भक्कम पुरावा आहे; त्याबद्दलची लेखमाला नुकतीच इथं झालेली आहे. वर उल्लेख केलेल्या आणि त्याच प्रकारातील आता नेमके नाव न आठवणार्‍या सर्वांचे त्या कड्यापर्यंत जाईपर्यंत मनोरूपांतरण घडून गेलेले होते - ते संपर्कात येणार्‍या इतर व्यक्तींच्या मनोरचनांवर सहज प्रभाव पाडू शकत - मग त्या-त्या मनोरंचनांना जोडलेली शरीरं त्यांच्या मागे जात. एक उदाहरण: ध्यानाच्या अत्यंत गहिर्‍या अवस्थेतून रजनीश/ओशो बोलत आणि ऐकणाराही मोहिनी पडणे म्हटले जाते त्या अवस्थेत स्वत:मध्येच त्या उंच कड्याच्या दिशेने चालू लागत असे. पण रजनीशांचे बोलणे थांबले की काही काळानंतर पुन्हा रजनीश लागत. पुन:पुन्हा लागत. पुढे त्यांची पुस्तके कंटाळवाणी होतात/ बोलण्यातले गमक कळून येते आणि त्या माणसाचा मोक्षप्राप्तीचा दावा उघडा पडतो. इतर सर्व गुरूंबाबतही हेच उदाहरण पुरेसे. हुश्श!

द्वैत व निर्मिती या शब्दांचे अर्थ निश्चित माहीत नसल्याने गोंधळात पडलो आहे. - बप्पी लाहिरीने एखाद्या गाण्याची चाल ढापून नवीन गाणं तयार केलं तर ती द्वैती निर्मिती म्हणावी की अद्वैती? - तसंच जर कोणी एखादं विडंबन लिहिलं तर ती द्वैती निर्मिती होईल का? अगदी ते विडंबन अद्वितीय असेल तरी? - दोन व्यक्तींनी एकत्र येऊन जी निर्मिती होते, त्याला तर द्वैती निर्मिती म्हटलेलं नाही? - मिठाचे अब्जावधी रेणू एकत्र येऊन स्फटिकाची निर्मिती होते - याला द्वैती म्हणावं काय? - कोणी एखाद्या अनोख्या विश्वाचं सिम्युलेशन केलं (सिम सिटी वगैरे) तर ती अद्वैती निर्मिती का? मग आपण वावरतो ते जग सिम्युलेशनच नाही हे कसं सिद्ध करणार? सारांश काय, तर लेखकाने आपले विचार थोड्या विस्ताराने मांडावे. (कौलात ते करता येत नाही, मान्य. पण प्रतिसादात तरी टाकावेत)

In reply to by राजेश घासकडवी

नवीन प्रतिसाद देता येत नसल्याने उपप्रतिसाद देत आहे. काल एका रॅबायशी (ज्यु धर्मोपदेशक) संभाषण करण्याचा प्रसंग ओढवला. त्यांना भारताविषयी बर्‍यापैकी माहिती होती. त्यांनी मला हिंदू धर्माविषयी अनेक प्रश्न विचारले. मग त्यांनी अद्वैत म्हणजे काय वगैरे प्रश्न सुरू केले. संभाषण न लांबवण्यासाठी व पळ काढणे शक्य नसल्याने मी त्याबद्दल मला फारशी माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर या गृहस्थांनी मला अद्वैताविषयी सांगण्यास सुरूवात केली व विचारले की पंडितांना 'द्वैताशिवाय निर्मीती' ('creation without duality' त्यांचे शब्द) कशी शक्य आहे? असा प्रश्न पडला नसेल काय? माझी माहिती याबाबत त्रोटक असल्याने मी खांदे उडवून प्रश्न रोचक आहे असे म्हणालो. घरी येतांना मी यावर थोडा विचार केला. पण मला फारसे काही सूचले नाही. मग मिपाकरांना विचारायचे ठरवले. पार्श्वभुमी देणे आवश्यक होते पण मी मुद्दामच तसे न करण्याचे ठरवले. यावर अनेक अंगांनी विचार करणे शक्य आहे व सर्व मतांचे स्वागत आहे.

In reply to by क्रेमर

या मधे तूम्हि सोडून आणखी कोणाचा सहभाग असतो ? मी स्वप्नात दिसणार्या गोष्टीचे reference न्हवे तर त्या प्रत्यक्शात दीसण्यात आणी दा़खवण्यात कोणाचा सहभाग असतो हे सान्गा असे म्हणेन...... माझे उत्तर हो असे आहे

कौलाचा संदर्भ अथवा त्यामागची भूमिका कळली नाही. वेदांत वगैरे अंगाने कोणीतरी लिहिलच. पण पेशीविभाजन (सेल डिव्हिजन... Cell Division) द्वारे नवीन जीवनिर्मिती होते. त्या अनुषंगाने होय असे मत दिले आहे.

अफाट गहन विषय आहे. मी अजीबात काहीही वाचन केलेलं नाही या विषयावर. पण मनात आलेले विचार, कधी काही कानावर पदलेलं इथे नोंदवते आहे. ३ दृष्टांत देते आहे. (१) पांढरा शुभ्र प्रकाश (अद्वैत) लोलकामधून निघाल्यावर ७ रंगामध्ये (द्वैत) परावर्तीत होतो . (२) शांत समुद्र (अद्वैत) वार्‍यामुळे लाटास्वरूप (द्वैत) भासतो. (३) सोन्याच्या लडीला (अद्वैत) सोनार दागीन्यांचे (द्वैत) रूप देतो. म्हणजे इथे साहीत्य (प्रकाश, समुद्र, सोनं) आहे. कोणीतरी कॅटॅलीस्ट(लोलक, वारा, सोनार) आहे आणि आपण (सप्तरंग,लाटा, दागीने) आहोत. असं काहीसं बाळबोध मला वाटतं.

म्हणजे काय नेमकं? पुराणात वगैरे कुमारी माता प्रकार आहेत त्यासारखच काही का? का कसल्यातरी अणूतून ब्रह्मांड निर्माण झालेसे म्हणतात ते?

वैयक्तिक धारणेतून, या प्रश्नाबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे, अनिश्चित या पर्यायाला मत दिले आहे. मात्र, क्रेमर यांच्या प्रतिसादातून चर्चेमागची थोडी पार्श्वभूमी समजली (रॅबायशी झालेले संभाषण). त्या दृष्टिकोनातून उत्तर 'होय' असे असावे. वेदान्तात काय म्हटले आहे, याबद्दल जाणकार सांगतीलच. पण ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवातही काही उत्तरं सापडतात. सध्या डॉ. रविन थत्ते यांचे 'मी हिंदू झालो' हे पुस्तक वाचत आहे. त्यात त्यांनी 'ॐ नमोजी आद्या| वेदप्रतिपाद्या| जय जय स्वसंवेद्या| आत्मरुपा||' या ज्ञानेश्वरीतील श्लोकाचा अर्थविस्तार करताना विद् (= जाणणे, ज्ञान मिळणे) ह्या धातूपासून तयार झालेल्या स्वसंवेद्य ह्या शब्दाकडे लक्ष वेधले आहे. त्यातून अद्वैताबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणतात -
विज्ञान असे म्हणते की प्रचंड दबावाने एक स्फोट झाला आणि ह्या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली. एकच काहीतरी होते. एकटेच, एकाकी, स्वयंभू, तुलनेच्या पलीकडे. त्याच्यामध्ये परिवर्तन झाले. ते जे होते ते संपले नाही. पण विखुरल्यासारखे वाटू लागले. ते फुटल्यानंतर जे झाले त्यात त्या एकाचे चित्र उमटणे स्वाभाविक होते. आईच्या उदरातून बाळ यावे आणि आईसारखे असावे तसेच हे सगळे होते. त्या एकट्या, एकाकी, तुलनेच्या पलीकडे असलेल्या तत्त्वात जे सामावले होते ते मग सगळीकडे पसरले; एकमेकांना संदेश पाठवतात तसे. हा जो स्फोट झाला त्यात सगळे ज्ञान, सगळी जाणीव, सगळ्या वेदना आणि संवेदना साठवलेल्या होत्या. एक फार मोठा फरक मात्र होता. ह्या संवेदना आणि हे ज्ञान, सगळे एकच होते. एक वस्तू, मग ती देणार काय आणि घेणार काय? अवघड संस्कृतमध्ये सांगायचे झाले तर ते अद्वैत होते. स्वतःच जाणते होते. स्वतःचे स्वतःबद्दलचे ज्ञान आपल्यामध्येच ठेवून ते शांत होते. तिथे व्यवहार नव्हता, जो आपण या जगात बघतो. म्हणून ते 'स्वसंवेद्य होते'.
बाकी 'अमृतानुभवा'चे नववे प्रकरण ह्यासंदर्भात वाचण्यासारखे आहे. निव्वळ एक काव्य म्हणूनही त्यातले "जिव्हा लोधली रसे। कमळ सूर्यपणे विकासे। चकोरचि जैसे। चंद्रमा झाले॥" सारखे दृष्टांत फार सुरेख आहेत. अवांतर - नवीन प्रतिसाद लिहिण्यासाठी कौलाच्या मजकुराखालच्या लाल पट्टीवरील 'प्रतिक्रिया द्या'वर क्लिक करावे.

होय. ज्याला आपण निर्मिती म्हणतो ती खरं म्हणजे विभागणी आहे असे मला वाटते. उदा. अमीबा हा एकपेशीय प्राणी स्वतःचे विभाजन करून नवीन अमीबा तयार करतो. व्यापक दृष्टीने विचार केल्यास विश्वातली प्रत्येक वस्तु ही आधीच्याच उर्जा आणि वस्तुमानाच्या फेरविभागणीने बनते. शिवाय उर्जा आणि वस्तुमान हे अद्वैत आहे हे ही सिद्ध झालेले आहेच.

म्या पामराला याबद्दल काही ज्ञान नाही. जोवर अनुभव नाही तोवर आहे ती माहिती. अनुभवानंतर ज्ञान म्हणू शकू. वाचनात आलेले, मनन केलेले सांगू शकतो. पण प्रश्नाचा मूळ उद्देश पुरेसा स्पष्ट नसल्यामुळे लिहिलेले पुरेसे असेल काय याबद्दल साशंक आहे. (भगवंत आहे हा मूळ संदर्भ घेऊन -) अद्वैत म्हणजे काय? जेथे दुसर्‍या कोणत्याही अस्तित्वाचा विचारही नाही अशी अवस्था. भगवंताने संकल्पाने सृष्टी निर्मिली म्हणजे काय? ज्या क्षणी दुसर्‍या अस्तित्वाचा विचार आला त्याच क्षणी द्वैत झाले. म्हणजे द्वैताची निर्मिती अद्वैतातून झाली. भगवंताच्या दृष्टीने सर्व अजूनही अद्वैतच आहे कारण हे सर्व त्याचेच रूप हे तो जाणून आहे. पण जे रूप निर्माण झाले त्याला मात्र अजून हे सर्व भगवंताचेच रूप अशी जाणीव नाही. त्यामुळे या रूपाच्या दृष्टीने द्वैत आहे. हे द्वैत संपले की अद्वैत उरते. यालाच मोक्ष असेही म्हणतात. आरं तिच्या: "आता कौलाचे उत्तर काय द्यावे बरे?? होय व नाही हे दोन्हीही त्या-त्या संदर्भात योग्य!" :)

कौलात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार. नंदन, राघव, यशवंत, शुचि व निरंजन यांचे स्पष्टीकरणाबद्दल विशेष आभार. कौलामागचा उद्देश्य, संज्ञांचा अर्थ व संदर्भ न दिल्यामुळे नेमके काय मत द्यावे हा संभ्रम अशा त्रुटी प्रस्तुत कौलात आहेत. पण मीही याबाबत गोंधळात असल्याने व चर्चा ओपन-एन्डेड ठेवावी या दृष्टीकोनातून ही चर्चा काथ्याकुटातून न करता कौलातून करण्याचे ठरवले. बारा मतांपैकी आठ मते ही द्वैताशिवाय निर्मीती शक्य आहे या पर्यायास पडल्याने रॅबायच्या प्रश्नासंदर्भात काहीएक माहिती मिळते. द्वैताशिवाय निर्मीती शक्य आहे, यात तत्कालीन हिंदू पंडितांना फारसे वावगे दिसले नसावे असे असू शकेल. (त्या काळातील इतिहास व वाद मला माहीत नसल्याने तत्कालीन विद्वानांनी असे केलेच नसावे असे मात्र खात्रीलायकरित्या सांगता येत नाही. पण माधवाचार्यांच्या 'द्वैत' तत्त्वातून विरोधी मतप्रवाह असावा असे जाणवते.) थोडक्यात प्रश्न मला जरी रोचक वाटला असला तरी 'द्वैताशिवाय निर्मीती' हा अनेकांना आगंतुक वाटत नाही.

In reply to by क्रेमर

"अद्वैता"च्या संदर्भात "निर्मिती" शब्दाचा वेगळा अर्थ असावा. "जे आधी नाही, नंतर आहे" अशाच वस्तूंबद्दल "निर्मिती" ही संकल्पना लागू आहे. आता विचार आणि वैचारिक संकल्पना यांत बदल होतो, हे मानल्याशिवाय संवाद (किंवा एकाकी विचारही) ठप्प होतो. "बदल" म्हणजे आधी नसलेली स्थिती नंतर असणे, होय. "निर्मिती" या संकल्पनेची व्याप्ती विचारविश्वाशी मर्यादित ठेवली, तर "निर्मितीबद्दल प्रश्नाचा विचार निर्माण झाला = कसलीतरी निर्मिती होऊ शकते" हे मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र विचारविश्वात उपयोगी आणि निरुपयोगी अशा दोन्ही प्रकारचे विचार उत्पन्न होऊ शकतात. "उपयोगी" विचारांचा विचारां"बाहेर"च्या विश्वाशी काही समन्वय असतो. (यात "बाहेर"चे विश्व असते असे मानणे म्हणजे "आत-बाहेर" द्वैत आधीच मानणे आहे काय? असेल किंवा नसेल. पुढील व्याख्येनुसार हे द्वैत मानणे नाही.) आता "निर्मिती" संकल्पना फक्त विचार-बाह्यविश्व-समन्वयाच्या उदाहरणांनाच लागू करावी, अशी मर्यादा घालता येईल. अशा समन्वित विश्वाची "खरे-विश्व" अशी व्याख्या करूया. असे असता "विचारांची निर्मिती होत असताना 'बाह्य' विश्व अचल असू शकते" असे मानण्यात कुठलाच अंतर्गत विरोध नाही. आता "खरे विश्व अचल आहे" किंवा "खरे विश्व चल-बदल-निर्मितींनी युक्त आहे" असे दोन पक्ष घेता येतात. (अ) "१. खरे विश्व अचल आहे = अद्वैत" + "२. विचारविश्वात बदल असू शकतात = निर्मिती" ही दोन विधाने वेगवेगळ्या विश्वांबद्दल आहेत. अंतर्गत विरोध कुठलाच नाही. (आ) "१. खरे विश्व चल आहे = द्वैत" + "२. विचारविश्वात बदल असू शकतात = निर्मिती" ही दोन विधाने कदाचित एकाच विश्वाबद्दल आहेत किंवा वेगवेगळ्या विश्वांबद्दल आहेत. यांतही अंतर्गत विरोध कुठलाच नाही. (आ-विशेष) "१. खरे विश्व चल आहे = द्वैत" + "२. विचारविश्वातले काही बदल खर्‍या विश्वातील काही बदलांशी समन्वित असतातव= निर्मिती". यात दोन्ही विधानातील विश्वे एकच आहेत असे विशेषेकरून म्हटलेले आहे. तुमच्या ओळखीच्या ज्यूधर्मगुरूचा प्रश्न होता : "१. विश्व अचल आहे = अद्वैत" + "२. विश्वात बदल असू शकतात = निर्मिती" या दोहोंत अंतर्गत विरोध कसा टाळता येईल? टाळता येणार नाही. पण त्याचा प्रश्न हिंदूधर्मातील (किंवा अन्य धर्मातील) अद्वैताशी संबंधित नाही. त्याच्या दोन विधानांमध्ये "विश्व" एकच आहे (म्हणजे "आ-विशेष" सारखे) हे अध्याहृत आहे. या विश्लेषणाचा उपयोग काय? तो असा. "अद्वैत" आणि "द्वैत" यांच्यातला फरक "अंतर्गत विरोध" असा नव्हे. "विचारविश्व आणि 'खरे' विश्व समजण्याइतपत समन्वित आहेत की नाहीत" हे गृहीतक आहे. हे कळता आपण "अंतर्गत विरोधा"च्या अंतर्गत-वांझ वादात सापडणार नाही. "गृहीतक मानण्यायोग्य आहे की नाही" ही चर्चा अंतर्गत-वांझ नाही, ती चर्चा करू. त्यातून फळ मिळेलच अशी खात्री नाही. पण "अंतर्गत-विरोध" वादातून फळ मिळणार नाही अशी खात्री आहे.

In reply to by धनंजय

या कौलाच्या विधानाचे (त्यामागील विचाराचे) स्फटिकीकरण केल्याबद्दल धनंजय यांचे अनेक आभार. 'आ-विशेष' मधील विधानाशी संबंधितच प्रश्न असावा, या निरीक्षणाशी सहमत आहे. प्रश्न हिंदू धर्मातील 'अद्वैत' संकल्पनेशी संबंधित नसू शकेल. तपशील आता नीटसा आठवत नाही पण रॅबायशी आधी झालेल्या चर्चेवरून मायमॉनिडीजचे विचार व हिंदू धर्मातील अद्वैताची संकल्पना यातील साम्यस्थळांविषयी त्याला कुतूहल असावे असे जाणवले.
विचारविश्व आणि 'खरे' विश्व समजण्याइतपत समन्वित आहेत की नाहीत
जर तुमच्या प्रतिसादातील पूर्वार्ध पाहीला तर निरुपयोगी विचारही विचारविश्वात अंतर्भूत असल्याने समन्वित नसावेत. पण 'समजण्याइतपत' समन्वित असावेत, असे वाटते. योगायोगाने युलिसिस कादंबरीत मायमॉनिडीजसंदर्भात एक वाक्य आहे, ते येथे दिल्याशिवाय राहवत नाही: Gone too from the world, Averroes and Moses Maimonides, dark men in mien and movement, flashing in their mocking mirrors the obscure soul of the world, a darkness shining in brightness which brightness could not comprehend.

या प्रश्नाचे खरे समाधानकारक उत्तर मिळवण्यासाठी 'ज्ञान' व्हायला हवे. त्या साठी काही इशारे संत साहित्यात दिलेले आहेत. भावार्थ गीतेतील उपयुक्त भाग: पूर्ण लोपते जाणीव जिथे न च तर्काची धाव| मने कल्पिता नये तत्वता त्या 'ज्ञान' हे नाव|| तरी स्वभावे जे समवे मन-बुद्धीच्या प्रांती| प्रापंचिक जे सकाळ तयाते 'विज्ञान' असे म्हणती|| त्या विज्ञानी 'अज्ञानपणे' सत्य-बुद्धी न च ठेवी| ज्ञान-रूप तू होऊनी स्वये स्व-रूप-सिद्धी मिळवी|| खालील संकल्पनांचा संत साहित्याचा उपयोग करत 'भाष्यकाराते वाट पुसत' अभ्यास केला, आणि त्यावर चिंतन, मनन केले तर उपयुक्त ठरेल. १. युगपात सृष्टी आणि क्रमसृष्टी (यांनाच सृष्टी-दृष्टी वाद आणि दृष्टी-सृष्टी वाद असेही म्हणतात) . २. आचार्यांचा मायावाद आणि ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद. ३. ज्ञान आणि विज्ञान हा अभ्यास करताना तर्काने, विश्लेषणात्मक विचार करणे न थांबवता त्या जोडीनेच श्रद्धेने आणि साकल्याने विचार करता आला तर चांगले आहे. असो. (माझी प्रतिक्रिया असंबद्ध/ निरुपयोगी वाटत असल्यास क्षमस्व.)

मूळात अद्वैतच असते... निर्मितेनंतरच द्वैत निर्माण होते! द्वैताशिवायच निर्मिती झाली आहे.

या सगळ्यात माझी अक्कल फार काय चालत नाही. पण सहज चाळा म्हणून विचार करु म्हटलं. पहिल्याच पावलात ठेच लागली. "निर्मिती"च मुळी शक्य आहे का ? विश्वाचे एकूण वस्तुमान असे काही असते का ? ते स्थिर असते का ? जर असते तर मग सारी जी निर्मिती ते रुपांतरणच नाही काय ? तीन मितींनी युक्त अवकाश आणि चवथा काळ यांच्या आरंभाची (किंवा अभावाची) कल्पना कशी करावी ? जे डोळ्यांना दिसत नाही पण असते (उदा. अणु मधले धन , ऋण भारित कण) यांच्या गुणांची (उदा . आकार) कल्पना आपण कशी करतो ? बहुधा ज्ञात आकारांच्या संदर्भाने. म्हणजे ईलेक्ट्रॉन म्हणजे छोटा गोळा असं उगाचंच डोळ्यासमोर येतो. तर मग काळाच्या आरंभाची कल्पना(किंवा अवकाशाच्या अभावाची) कोणत्या ज्ञात अनुभवाच्या संदर्भाने करावी ?

In reply to by अडगळ

हम्म.हे बरोबर आलंय शेवटी असं वाटतंय. भगवंत म्हणजे अनादी-अनंत असे म्हणतात ते हेच असावे.निर्मितीच मुळात शक्य नाही.द्वैत म्हणजे माया ही त्यातून उत्पन्न जरी झाली तरी निर्माण असे काहीही झालेले नाही. म्हणजेच अद्वैत. :)

प्रश्न कळला नाही परंतु मतदानाचा हक्क तर बजावायचा होता. म्हणून अखेर टॉस करून 'होय'ला मत दिले आहे.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सगळी गहन चर्चा वाचुन माझ्या सुक्ष्म बुद्धीप्रमाणे मला "होय" ह्या पर्यायास उत्तर द्यावे असे वाटते...