Skip to main content

..........गुढ सिहंगडावरचे...१/२

लेखक सुहास..
शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सुनील आणि मी जे. एन. पेटीट ला एकत्र शाळेत होतो. तो माझ्या वर्गात नव्हता, पण फुटबॉल टिममध्ये एकत्र असल्याने घष्टण झाली होती. मी डिफेंडर,तो सेंटर-फॉरवर्ड. दहावीला असताना एस.एस.पी.एम.एस.च्या किंवा डॉन बास्को स्कुलच्या मैदानावर आंतरशालेय स्पर्धा असायच्या. जेव्हा-जेव्हा आमचा सामना असायचा तेव्हा सामन्याला प्रेक्षक लाभावेत तसेच थोडेफार आमच्या बाजूनेही चियर-अप व्हावं म्हणुन सेंट फेलीक्सच्या व डॉन बास्कोच्या विद्यार्थिनी यायच्या. त्यांना बघून आम्हालाही हुरुप यायचा. त्यातलीच एक म्हणजे सेंट फेलीक्सची अनघा. अनघाला सुन्याचा खेळ फार आवडत असे आणि सुन्याला तिचे स्वप्नाळु डोळे. अनघाच घर कोरेगाव पार्कमध्ये होते आणि सुन्या येरवड्यातल्या किराणा व्यापाराचा एकुलता एक मुलगा. दोघेही सधन कुटुंबातील होते. पण सुन्याचं घर येरवड्यात असल्यानं तो सायकल मारत शाळेत यायचा. अनघाला मात्र न्यायला-घ्यायला घरची कार यायची, पण ती मुद्दामुन थोडावेळ बंडगार्डनच्या बस-थांब्यावर थांबायची. एकदा का सायकलवर जाणारा सुन्या नजरेला पडला की मगच ती घरी जायची. अशीच नजरानजर बरेच दिवस चालली. एक दिवस सुन्यानं हिम्मत करुन तिला चिठ्ठी दिली. दुसर्‍या दिवशी तिने उत्तर दिले. त्यांची पहिली भेट घडली ते "नाला पार्क" ला. ह्या पहिल्या प्रेमाच्या पहिल्या भेटीचा मी आणि आणखी तीन जण "मूक" साक्षीदार आहोत. तिच्या त्या तीन मैत्रीणींमध्ये अनघा एकटीच बोलत होती. सहसा असं घडत नाही. ही गोरीगोमटी, लाघवी बोलणारी, टवटवीत चेहर्‍याची परी सुन्याच्या आयुष्यात आल्यानं मितभाषी असणारा सुन्या चांगलाच खुलला होता. जन्माच्या रेशीमगाठी गुंफत होत्या. दहावीच्या निकालानंतर ह्या रेशीमगाठी आणखीनच घट्ट झाल्या. चांगले टक्के मिळाल्याने त्या दोघांचीही अ‍ॅडमिशन्स ईंजिनियरिंगला झाली. त्या दोघांनी कुस्रो वाडियाला आणि मी नेस वाडियाला अ‍ॅडमिशन घेतली. त्या कुस्रोत, ईंजिनियरिंग कॉलेजात एकांत भेटणे, सवड मिळणे, ह्या गोष्टी जरा अवघडच होत्या. त्यात सुन्या मेकॅनिकलला आणि अनघा ईलेक्ट्रॉनिक्सला. सुन्याला घरचा डबा खायची सवय असल्याने तो कँटीनमध्ये आमच्याबरोबर डबा खायला यायचा. अर्थात, अनघापण त्याच्याबरोबर असे. एकदा ती आली की खूप गमतीजमती व्हायच्या. अनघाच्या चिवचिवाटाने अख्खं कँटीन दणाणून जायच. ती होतीच तशी. सर्वांमध्ये सहजपणे मिसळणारी, पण अंतर ठेवून. अंताक्षरी खेळताना तर सर्वात पुढे. तिचा आवाजही तिच्यासारखाच मोहक होता. हळुहळू दोघांमध्येही वयामुळे यौवनक्रांती घडुन आली. सुन्या धिप्पाड दिसायला लागला होता. तर अनघा सुडौल बांध्यामुळे अधिकच सुंदर दिसायला लागली होती. तिला अनेकजण जरी लाईक करत असले तरी तिच्या लाघवी स्वभावामुळे तिला प्रपोझ करुन दुखावण्याची कोणालाही हिम्मत होत नसे. त्या दोघांना एकत्र बघून परका माणूसही म्हणायचा "व्हाट अ परफेक्ट कपल", "जस्ट मेड फॉर ईच ऑदर". कँटीनच्या गाठीभेटी वगळता दर शुक्रवारी नेसच्या ग्राऊंडवर आख्ख्या ग्रूपच्या गाठीभेटी होत असत. मीही हॉटेलच्या कामातून दर शुक्रवारी सुट्टी घेउन स्टेप्सवर बसायचो. पण त्यात आख्ख्या गोंगाटातही अनघा म्हणजे "महफिल की जान" असायची. अशाच एका शुक्रवारी, ग्रूपमधल्या एका मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, शनिवारी पानशेतला जायचं ठरलं. शनिवारी हॉटेलकामातून सुट्टी अशक्य असल्यानं माझ जाणं काही शक्य नव्हतं. मी नकार दिला. ग्रूपचं जायचं ठरलं. बाईक्स आणि पैशाची जमवाजमव झाली. ग्रूप ठरल्याप्रमाणे सकाळीच गायब झाला होता. अनघा आणि सुन्यानं कॉलेजला दांडी मारली होती. सोमवारी नेहमीप्रमाणे कँटीनला भेटलो. पण त्यात अनघाचा पत्ता नव्हता. मी विचारपूस केल्यावर कळलं की ती आजारी आहे. सुन्याला शुक्रवारचं विचारल्यावर त्यानं जे सांगितलं ते असं होतं: आख्खा ग्रूप पानशेतला निघाला होता. पण मध्येच सिहंगड-रोडवर एकाची बाईक पंक्चर झाली, शिवाय नाष्टा-पानी करता-करता वेळ गेला. मग सगळ्यांनी ठरवलं की सिंहगडला जायचं. सगळ्या बाईक्स पायथ्यापाशी पार्क केल्यानंतर ही मंडळी चालत-चालत झाडी-झुडुपातुन वर निघाली. अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर लक्षात आलं की अनघा त्यांच्याबरोबर नाही. ती गायब होती. मग ह्यांनी सर्वत्र शोधा-शोध केली. तीन एक तासानंतर ती एका झाडाखाली बसलेली दिसली. सुन्या तर तिथंच रडायला लागला. सर्वांनी तिला चांगलेच धारेवर धरलं. पण तिने तोंडातून चकार शब्द काढला नाही. घरी आल्यानंतर तिला ताप आला. तिच्या घरच्यांनी आराम करायसाठी तिला सोमवारी घरीच ठेवले. गुरुवारी अनघा कँटीनला आली. पण ती पहिल्यासारखी बोलत नव्हती. शांत होती. आम्हाला वाटलं आत्ताच आजारपणातून उठली आहे म्हणून कदाचित शांत असेल. असेच काही दिवस गेले. ती शांतच असायची. एक दिवस मी विचारले की त्या शुक्रवारी काय झालं होतं? तर तिनं "मी एकाच जागी बसुन होते, मला हे लोक शोधून काढतील अशी खात्री होती" ईतकंच सांगितलं. दिवसामागून दिवस जात होते. नेहमी कँटीनमध्ये भेटणारं हे जोडपं आता कधीतरीच यायचे. त्यातही दोघंही शांत असायचे. बहुधा त्यांना प्रायव्हसी हवी असावी. अनघा थोडफार बोलायची. पण त्यात पूर्वीसारखा आत्मविश्वास, चार्म नसायचा. आम्हाला वाटायच की ईंजिनियरिंगला आहेत, अभ्यासाचं प्रेशर असणार. पण एक दिवस हॉटेलवर नऊ-साडेनउच्या दरम्यान सुन्या गेटवर आल्याचा निरोप आला.मी गेलो.त्याचा भेदरलेला चेहरा बघीतला आणी क्षणभर माझ्या मनात चर्र झाल. "काय झाल ?" "अरे,ती परत सिंहगडावर गेली?" "कोण?" "अनघा" "म्हणजे,मला नीट सांग बर काय झालय ते ?" सिक्युरिटी डेस्कवरुन पाण्याची बाटली आणली,त्याला पाणी पाजल.त्याने सांगायला सुरुवात केली. "अनघा गेल्या दोन महिन्यात सारखेच सिंहगडावर जातेय,सुरुवातीला काही वेळा मी तिच्याबरोबर गेलो,तिथे ती काहीच करत नाही,काहीच बोलत नाही, नुसतीच त्या झाडाखाली बसुन रहाते.पण गेले एक महिनाभर मला टाळुन ती एकटीच जातीये.काल-परवापर्यंत ती सहा-सात वाजता परत येत असे.आज अजुनही आली नाही.आठ वाजता तिचे पप्पा माझ्याकडे आले व त्यांनी मला सांगितले की ती आज ती पांढरी साडी,गजरा वगैरै लावुन गेली आहे.त्यांच्या कार मध्ये बसुन मी थेट तुझ्याकडे आलो. काय करावे हेच सुचत नाही" हे बोलताना सुन्याच्या डोळ्यात आलेल पाणी,पार्कींगच्या हॅलोजनच्या प्रकाशामुळे स्पष्टपणे चमकत होते. मला ही काय करावे ते सुचेना.सिक्युरिटी डेस्कवरुन फोन केला.टेबलं दुसर्‍याच्या हवाली केली.आणी अनघाच्या पप्पांच्या फोर्ड आयकॉन मध्ये जाउन बसलो. "मामा ,सिहंगडलाच जाउ सरळ"सुन्या बोलला. कार सिहंगडच्या दिशेने निघाली.. क्रमश.........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5794
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

खुप दिवसांनी तुझे लिखाण वाचतोय सुहास......मस्तच. छान लिहिले आहेस. उच्छुकता लावणारी कथा........

बॉस हिच स्टोरी मी पुर्वी वाचलीय... कुठे ते आठवत नाही... तु पुर्वी पण टाकली होतीस का कुठे? कथा आहे छान.

वाचतोय. एक नंबर लिहिलंय! पण जर खरं असेल तर मात्र घटना शॉकींग आहे. --असुर

मी कधी हे असं काही वाचत नाहि.... जाम भिती वाटते ! २-४ दिवस झोप जातेच! खुप खुप खुप दिवसांनी वाचलिये.... लवकर टाक रे बाबा पुढच भाग!