Skip to main content

मी पाहिलेले मयत

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 20/05/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ७-८ वर्षापूर्वीची कथा. आषाढातला रविवार. पाउस धो धो कोसळत होता. दुपारची जेवणे होउन जरा पडापड होतेय तेवढ्यात फोन वाजला. गावाकडे चुलत आजी वारल्याची बातमी आली. सगळी आवराआवर करुन आम्ही घरातले सगळे २० मैलावर आसलेल्या गावी निघालो. गावाकडचा आमचा दुमजली वाडा एकदम टिपिकल आहे. दगडी पायर्‍या. दींडी दरवाजा , तटबंदी,पायर्‍यांना लागुन डाव्याबाजुला दगडी कट्टा. पायर्‍यांच्या उजव्या बाजुला मोकळे वावर. तिथे म्हशींचे गोठे. गोबरग्यासची टाकी. दरवाज्यातून आत गेले की मोठे अंगण. खालचा सोपा, वरचा सोपा, माजघर, स्वयंपाकघर. ७-७ फूटी मातीच्या भिंती. भिंतीतून वर जायला जिने. मागच्याबाजुला २ एकराचे परस. त्यात एक आड. मोठ चिंचेच झाड,बांबूचे बन आणि किरकोळ झाडे. पण यावेळी संपूर्ण वाड्यावर सुतकी कळा होती. पाऊस थांबला होता पण आभाळ भरुन आल्याने वातावरण कुंद होते. त्यात जमलेल्या बायकांचे माजघरात आजीच्या आठवणी सांगत रडणे सुरु होते. बाहेर सोप्यावर आणि बाहेरच्या कट्ट्यावर पुरुषमंडळींची दबक्या आवाजात "याला बोलावले का? " "त्याला कळवले का?" "पुण्याची मंडळी कधीपर्यंत पोचतील?" अशी चर्चा सुरु होती. होताहोता संध्याकाळी ६ वाजता पुण्याची माणसे रात्री ९ वाजता पोचतील अशी बातमी आली. आणि चर्चा 'पुण्याच्या लोकांसाठी थांबायचे की उरकून टाकायचे' या दिशेला वळली. एकंदरीत बघीतल की खेड्यातल्या माणसाना बाकी कशाची नसली तरी कोणी मेल की त्याला जाळून टाकायची फार घाई असते. त्यामुळे थांबायचे कि उरकून टाकायचे यावर २ तट पडून त्याविषयी लगेच सांगोपांग चर्चा सुरू झाली. शेवटी 'थांबायचे' या निर्णयावर चर्चा संपली. लोक हळुहळु पुढच्या तयारीला लागले. परसातून बांबू तोडून आणले.(अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली )त्याची तिरडी बांधली.त्यावर कडबा पसरला. कुणाला तरी सांगून लाकडे पुढे पाठवली. अंघोळ, तोंडात सोन्याचा तुकडा वगैरे सोपस्कार सुरु झाले. तो पर्यन्त ९ वाजून गेले आणि पुण्याची माणसे पण पोचली. मग त्यांचे अंत्यदर्शन, रडारड, त्यांच्या रडण्यामूळे परत जुन्या रडणार्‍याना येणारे नविन उमाळे हे करता करता अंत्ययात्रा निघायला रात्रीचे १०:३० वाजुन गेले. अंत्ययात्रा स्मशानात पोचली . स्मशान म्हन्जे एका वेळी २ लोकांची सोय होइल येवढा बांधलेला चौथरा आणि त्यावर पत्रा. चौथर्‍याच्या एका बाजुला ओढा. दुसर्‍याबाजुला लगेचच एकाचे शेत होते आणि त्यात दाट ऊस आला होता. तिथले विधी पार पडून अग्नी द्यायला ११ वाजुन गेले आणि वाकडातिकडा धो धो पाउस परत सुरु झाला. अधुनमधुन वार्‍यामुळे बाजुने पावसाचे पाणी आत चितेवर येत होते. तेवढ्यात फाटकन कवटी फुटल्याचा आवाज वातावरण चिरत गेला व लोक हळुहळु पांगू लागले. पावसामुळे चिता विझू नये म्हणुन त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी माझ्यासहित माझ्या ३-४ चुलतभावांवर टाकुन बाकीची मंडळी परत गेली. धग लागू नये म्हणुन आम्ही थोडे लांब , चितेपासुन २०-२५ फूटावर बसलो होतो. रात्रीचे १२ वाजत आलेले. धोधो कोसळणारा पाऊस,सूं सूं आवाज करत सुटलेला वारा थंडी हाडापर्यंत पोहोचवत होता. डाव्याबाजुला भरुन वाहणारा ओढा, उजव्याबाजुला गर्द ऊस आणि त्याच्या पानांचा वार्‍याने होणारा सळसळ आवाज. समोर चिता पेटलेली. आसपास चिटपाखरु नाही. अश्या वातावरणात माणुस कितीही धीट असला आणि भीती वाटत नसली तरी एक प्रकारचे दडपण येतेच. तोच अनुभव घेत आम्ही ४-५ जण बसलो होतो. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. आणि अचानक एक काळाकभिन्न , उंच , धिप्पाड माणुस त्या उसातुन बाहेर चौथर्‍यावर आला. डोक्याला मुंडासे, गुढग्यापर्यंतच असलेल धोतर्,अंगात पोटापाशी खिसा आसलेली बन्डी,एका खांद्यावर घोंगड, दुसर्‍या खांद्यावर कुर्‍हाड असा दैत्यासारखा हा इसम आमच्याकडे पाठ करुन चितेजवळ आला. त्याचे आमच्याकडे लक्ष नव्हते. चितेजवळ येउन त्याने घोंगड आणि कुर्‍हाड खाली ठेवली मुंडास काढल आणि २ पायावर बसून 'आहा हा हा' करत हात , छाती शेकू लागला. इकडे आमची पार बोबडी वळली होती. तोंडातुन शब्द फुटत नव्हता. हात आणि छाती नीट शेकुन झाल्यावर त्याने बंडीच्या खिश्यातून एक प्लास्टीकची पिशवी काढून त्यातली एक बिडी तोंडाला लावली. एका बाजुने न पेटलेला चितेतला एक लाकडाचा तुकडा उचलुन त्याने ती विडी शिलगावली. चांगले २-३ भक्कम झुरके घेउन त्याने छाती आतुन गरम केली आणि पाठ शेकायला म्हणुन तो वळला आणि त्याचे आमच्याकडे लक्ष गेल. "ह्या ह्या ह्या" असे कसनुस हसत तो म्हणाला "तुमी आजुन हाय व्हय.... मला वाटल समदी गेली घराकड.... लै गारठा पडलाय...". असे म्हणुन त्याने पाठ शेकत शांतपणे विडी चे आजुन २ झुरके मारले. विडी जमिनीवर घासुन विझवली. घोंगडे व कुर्‍हाड खांद्यावर टाकली आणि मुंडासे काखोटीला मारुन तो आला तसा ऊसात गडप झाला. क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14822
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

आधी वाटले, हे काहीतरी गंभिर लेखन असेल.... पण पेटत्या चितेवर अंग शेकणारा आणि विडी शिलगावणारा माणूस... हे वाचून एकदम हसू आले. प्रसंग डोळ्यापुढे आला आणि तुमची काय अवस्था झाली असेल ही कल्पना आली. चांगले लेखन. पुढचा भाग लवकर येऊद्यात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आयला हा आंबोळी सगळ्या अशा मरणाशी संबंधीत कथा का लिहीत आहे? तो काय मृत्यूचा दूत वगैरे आहे का? का त्याला 'अंधेरा कायम रहे ' वाल्याने सर्वाना घाबरवण्याचे कंत्राट दिले आहे. :) (ह.घ्या.) पण बाकी याने मयत आणि बाकी सर्व गोष्टींचे वर्णन भारी केले आहे. मागे एकदा मी माझ्या आजोळी केळशीला गेलो होतो, ८-९ वीत(इयत्तेत) असेन तेव्हा. तिथे छान उथळ असा समुद्रकिनारा आहे मस्त डुंबता येते. आम्ही सर्वजण समुद्रावर खेळायला आणि डुंबायला गेलो होतो. तिथेच समुद्रकिनार्‍यावर एक स्मशान पण आहे. स्मशान म्हणजे फक्त एक चौथरा ज्यावर चिता रचण्यासाठी ६ लोखंडी दांडे उभे पुरलेले असतात आणि त्यावर एक पत्र्याची शेड असते. मी तेव्हा अगदी चिता रचण्या पासून ते अग्नि देईपर्यंत सगळे विधी पाहीले होते. आणि तेवढ्यात कोणाच्यातरी लक्षात आले की मी सर्व खेळणार्‍या मुलांच्यात नाहीये. मग शोधाशोध सुरू झाली. पण लगेच मी या स्मशानातल्या गर्दीत सापडलो. लगेच मला आजोबांनी समुद्रात बुडी मारून यायला लावली . आणि मी पाण्यात गेल्यावर हळूहळू सर्वजण पाण्यात उतरून खेळायला लागले. :) पुण्याचे पेशवे

आम्ही एकदा कोकणात फिरत असताना नदीचा एक सुन्दर घाट दिसला. बाईक्स थांबवून जरा आम्ही तिथले सौंदर्य बघत होतो. बरंच अंतर कापायचं असल्याने मोठ्या मुश्कीलीने नदीत उतरायचा मोह टाळला. पण पायर्‍यांवर बसून फोटो वगरे काढले. नि तेवढ्यात एक मित्र ओरडला 'आयला ते बघ काय', बघितलं तर एक छोटसं मडकं पाण्यात तरंगत होतं. शंका आली म्हणून आजू बाजूला बघितलं तर जवळच स्मशान होतं नी तो घाट अस्थीविसर्जनाचा होता. आम्ही घाबरलो वगरे नाही. पण इतकं अप्रतीम निसर्ग सौंदर्य नी स्मशान ह काँट्रास्ट मात्र जाणवून गेला. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

छान लिहिता तुम्ही आंबोळीराव. पण सारखं सारखं ते मरणाचं(विविध अँगल मधुन का असेना) वाचुन घाबरायला होतं हो! :-) (कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार :-) ह.घ्या.) आपलाच जाम टरकलेला, मनोबा

भयानक आवडली गोष्ट. पण अहो तुम्ही बघितलेला माणूस सभ्य होता असंच म्हणावं लागेल. आमच्या गोरेगावला एक 'अंत्यसंस्कार' फेम गुरूजी होते ते तर विधी संपून चिता पेटली रे पेटली की मस्त छान त्याच चितेवर बीडी वगैरे पेटवून मोकळे. माणूस गप्पिष्ट. बाकीचे लोक जायला नुघाले की आग्रह वगैरे करून थांबवायचे, म्हणायचे "थांबा हो, जायचा तो गेला, तुम्ही थांबा" बिपिन.

हा लेख वाचताना आठवलेल्या दोन गोष्टी: (जशी आठवत तशी:) सुधीर गाडगीळांनी एकदा त्यांच्या कार्यक्रमात पुण्यातील अशा केवळ अंत्यसंस्कार करणार्‍या पुजारी कुटूंबाबद्दल सांगीतले होते (आडनाव विसरलो). त्यांनी त्यातील एका गुरूजींना स्मशानभूमीत प्रश्न विचारला की तुमचे यावर कसे भागते? त्यावर ते म्हणाले की अहो कधी कधी मृत व्यक्तींच्या अंगात दागीने ठेवले जातात ते आम्हीच घेतो वगैरे... नंतर काही काळाने गाडगीळ कुणाच्या तरी अंत्यसंस्काराला वैकुंठ स्मशानभूमीत गेले असताना ते गुरूजी परत भेटले तर ते तावातावाने चिडून म्हणाले की गाडगीळ तुमच्या अंत्यसंस्काराला आम्ही कोणी येणार नाही... का म्हणून गाडगीळांनी विचारले तर म्हणाले की मागच्या वेळेस माझी घेत असलेली मुलाखत ही प्रक्षेपित होणार आहे हे माहीत नव्हते (थोडक्यात धंद्याचे गुपीत उघडकीस आले). ---------------------------- कधी काळी मित्र कॉळेजच्या परीक्षा संपल्यावर अलीबाग/मुरूड जंजीरा ह्या भागातील पण कुठल्याशा वेगळ्या समुद्र किनार्‍यावर गेलो होतो. समुद्रात पाय घालून ओले झाल्यावर वाळू झटकायला म्हणून बाजूच्या दगडी कट्ट्यावर पाय हलवत आम्ही बसलो. तेव्हढ्यात (उभा असलेल्या) एकाची नजर त्या कट्ट्याच्या भिंतीवर लिहीलेल्या सुचनेकडे गेली: (या अर्थी) "मयताला ठेवायची जागा" - त्याने मोठ्यांदा वाचताच सर्वजण दचकून उठले आणि मुकाट्याने गाडीकडे वळले!

In reply to by विकास

हा लेख वाचुन मला मी १० वी मधे असताना असलेला मराठी धडा स्मशानातल सोन आठवला..... मदनबाण.....

शेवटी तो अग्नीच, त्यामुळे थंडीपासून रक्षण करणार्‍या त्या आगीकडे तो माणूस आपसूक आला आणि अंग शेकून गेला इतकच नाही तर बिडीसुद्धा पेटवून गेला! तुमची काहीवेळ पाचावर धारण बसली असणार ह्याचा विचार मनात येऊन हसू आले! :) (स्वगत - ह्या अंबोळीकडचा तो कंदिल आता कुठल्या अवस्थेत असेल बरे? :? ) चतुरंग

कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार किती हो मरणावर लिहिणार जरा जगण्यावर लिहा ना.... :S स्वगतः ह्या आंबोळी दादांनी कधी मुलगी पटवायचा प्रयत्न केला असेल का? त्या मुली घाबरुन पळून गेल्या असाव्यात.... :?

कसला तो अनुभव... टरकावून टाकणारा.. >:) अवांतर : ओ मतकरी, दुसरं काहीतरी लिहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

अहाहा. इथे इतके वेगवेगळ्या जॉनरचे ( लेखनप्रकार असा एक फालतु प्रतिशब्द सध्या सुचतो आहे , पण तो अपुरा आहे हे ठाऊक असल्याने ..."जॉनरच " )... लिहिणारे लोक आहेत की एकदम बेष्ट वाटते... ... आंबोळीराव, तुमची काळजी वाटते हो... तुम्ही जरा उतारा म्हणून हलक्या फुलक्या निसर्ग, प्रेम, पाखरे , नदी नाले, दर्‍याखोर्‍या यांच्या चारोळ्या वाचत आणि पाडत चला..... थोडं ऑर्कुट वरती गेल्यासारखं वाटेल पण मानसोपचारतज्ञाला त्रास आणि पैसे देण्यापेक्षा हे फार बरे... काही नमुने... ______________________________________ " तू आलीस तिकडून सखे आनंदाचा पूर आला भावनांनी माझा ऊर भरून आला... सखे तुझ्या पावलांची मंद सळसळ पैंजणांची तर रूणझूण , खचितच माझ्या वेड लावते गे जीवाला...." _____________________ तू कधी येणार? वाट पाहतोय.. येशील ना? ______________-- फुलणार फुलणार... आमच्या प्रतिभेचा चाफा फुलणार? काय गं? ओळख आहे ना? ________________________ ओढ वाटते जीवाला , सारखी तुझीच आठवण... ध्यास तुझा , कधी फळेल हे जीवन... __________________________________ असलं काहीबाही पाडत रहा नाहीतर मानसिक त्रास होईल.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टरकथा लेखक. :-) कंदिल.... आता मयत.. चांगले आहे. चालु द्या. "वाचतोय व बहुतेक वाचु" ;-)

>>हा लेख वाचुन मला मी १० वी मधे असताना असलेला मराठी धडा स्मशानातल सोन आठवला..... खरचं तो भीमा असेल असं वाटलं

आंबोळी म्हटला की ते मरणाचा 'कंदील' आठवतो. च्यायला येऊन जाऊन मरणाचाच विषय कसा सुचतो राव तुम्हाला !!! बाकी मयताचे वर्णन तर असे केले की आम्हीही आपल्याबरोबर तो कार्यक्रम अटेंड केल्यासारखा वाटला. बाकी त्या धिप्पाड माणसाची इंट्री मस्तच झाली !!! येऊ दे !!! येऊ दे !!! आम्हालाही आंबोळीच्या लेखनाचे व्यसन लागेल असे वाटते. :)

मस्त लिहिलयस रे आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास??

अंबोळीशेठ, लेख चांगला झाला आहे..प्रसंगाचे वर्णन उत्तम :SS ..पुढचा भाग लवकर येऊदे.. (वाचक) केशवसुमार स्वगतः रात्री कुणाचा त्रास नको म्हणून स्मशानात दारू पिणारे आणि जुगार खेळणारे आणि भूक लागल्यावर अता बाहेर कुठे जायचे म्हणून पिंडाचा भात कावळ्यांना हकलून खाणारे बघितले आहेत त्या मुळे चितेच्या धगीवर हात शेकण्याचे काहीच वाटले नाही >:P

कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार =)) कन्दील नरेश आम्बोळी ...कन्दील काय ?मयत काय? आता या पुढचे लिखाणाचे विषय " मृत्युच्या सूचना आणि मृत्युनन्तरचे जिवन" असा घे बघ. मजा येइल. आणि त्या पुढचा विषय "पुनर्जन्म" हा घे. त्या पुढे जाऊन आणखी विषय मिपा चे गवकरी देतिलच. बाकी प्रगती बेष्टच. कन्दीलाची एजन्सी कोणाला दिलीस? आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास?? तू सरळ दाम्बीस काकांचे नाव ठोकुन दे असल्या प्रश्नावर. मी तेच करतो.

केवळ अंत्यसंस्कार करणार्‍या पुजारी कुटूंबाबद्दल सांगीतले होते मोघे गुरूजी वाचका॑चे प्रतिसाद पाहून द.मा.मिरासदारा॑ची 'विर॑गुळा' नावाची गोष्ट आठवली, त्यातल्या तात्या देशपा॑डे॑ना असल्या' गोष्टीत भय॑कर रस असतो..

मला हे वाचुन राम नगरकरांच्या 'रामनगरी' तील वर्‍हाडाचा प्रसंग आठवला. नवरामुलगा प्रेताला टेकुन आराम करत असतो.. तो प्रसंग. छान आहे लेखन..

रामनगरी एकूण पुस्तकच 'भारी' आहे.. पण त्यातले लग्नाचे प्रकरण कडी आहे

ह्या वेगळ्या विषयावर छान लिहिले आहे. मिपावर एकाच विषयावर सातत्याने आणि कसबीने लिहिणारे आपण बहुधा पहिलेच असाल. ;) बाकी ,स्मशानातला प्रसंग फार घाईत उरकल्यासारखा वाटतो.अजुन खुलवून लिहिता आला असता. स्मशानातील भाषणेबिषणे वगैरे कव्हर कराल असे वाटले होते. जमल्यास पुढच्या भागात येउ देत. आंबोळीराव , तुम्ही ,लोकांनी दिलेले सल्ले/उपदेश जास्त मनावर घेउ नका हो. तुम्हाला जे आवडते ते लिहा.लेखन हे प्रसिद्धिकरीता नसून स्वसमाधानाकरीता असावे असे वाटते. फक्त लेखन हे किती सकस आहे हेच महत्वाचे. पुढील भागाची वाट पहात आहे. अभिज्ञ. B)

सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे व वाचणार्‍यांचे आभार. मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. त्यामुळे मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते असा माझा अनुभव आहे. आणि मी तेच करत असतो. फक्त मरण या शाश्वत गोष्टीबद्दल कोणी फारसे लिहिताना आढळले नाही. ती राहिलेली फट बुजवण्याचा हा प्रमाणिक प्रयत्न. आपण सर्वानी गोड (?) मानुन घ्या. >>पण सारखं सारखं ते मरणाचं(विविध अँगल मधुन का असेना) वाचुन घाबरायला होतं हो! अहो इथे घाबरलात की इतर लेखकांचे अल्हादायी लेखन वाचतानाचा आनंद द्वीगुणीत होइल. >>(स्वगत - ह्या अंबोळीकडचा तो कंदिल आता कुठल्या अवस्थेत असेल बरे? ) माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले पाहिजे एकदा. >>आम्हालाही आंबोळीच्या लेखनाचे व्यसन लागेल असे वाटते. आयला... माझे लेखन व्यसन लागण्याइतके नशीली आसेल असे मला स्वप्नातसुध्धा वाटले नव्हते. (बहुतेक "रक्तगाभुळली वटवाघळे,उप्पिटम" वगैरे वाचुन प्रवास करत नसल्यामुळे स्वप्नात तसे वाटत नसेल.....) >>मस्त लिहिलयस रे आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास?? स्वप्नभटके विजुभौ >>स्मशानातला प्रसंग फार घाईत उरकल्यासारखा वाटतो.अजुन खुलवून लिहिता आला असता>> अहो मी फक्त घडलेला प्रसंग सांगीतला. पण पुढच्यावेळी लक्षात ठेवीन. >>तुम्ही ,लोकांनी दिलेले सल्ले/उपदेश जास्त मनावर घेउ नका हो. या दिलेल्या सल्ल्याविषयीही आपले हेच मत आहे? ;) >>स्वगतः ह्या आंबोळी दादांनी कधी मुलगी पटवायचा प्रयत्न केला असेल का? त्या मुली घाबरुन पळून गेल्या असाव्यात.... आरे हो ती स्टोरी सांगायची राहिली. पुर्वी आम्ही एक पोरगी पटवली होती. म्हन्जे जातायेता इशारे, खाणाखुणा आणि पत्रव्यवहार इथपर्यंतच मामला होता. शेवटी आम्ही एकदा भेटून प्रेमाच्या आणाभाका घ्यायचे ठरवले. आता गावात एकांत मिळेल असे एकच ठिकाण होते ते म्हंजे स्मशान. तेंव्हा संध्याकाळी ७ नंतर तिथे भेटायचे ठरले. आम्ही निघालो. थंडीचे दिवस आसल्याने लवकर अंधार पडेल म्हणुन आम्ही बरोबर "कंदील" घेतला होता. जाताना वाटेतच तो लावावा लागला. स्मशानात चौथर्‍यावर बसुन आम्ही तासभर गप्पा मारल्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता. (वरच्या स्टोरीतली सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत) (कृतज्ञ)आंबोळी

In reply to by आंबोळी

थंडीचे दिवस आसल्याने लवकर अंधार पडेल म्हणुन आम्ही बरोबर "कंदील" घेतला होता. जाताना वाटेतच तो लावावा लागला. स्मशानात चौथर्‍यावर बसुन आम्ही तासभर गप्पा मारल्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by आंबोळी

मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. धन्यवाद आंबोळीराव! अहो पण जरा हळू बोला! मिपाच्या हितशत्रूंना हे वाक्य आवडणार नाही! त्यांना असं वाटतं की मिपा हे फक्त काहितरी पोरकट टाईमपास असणारं, व सतत काहितरी फालतूगिरी चालू असलेलं संस्थळ आहे! हां, आता वडील वारल्यासारखे चेहरे करून सतत दुसर्‍याच्या शुद्धलेखनाच्या व व्याकरणाच्या चुका काढण्यातच मिपाकर धन्यता मानत नाहीत, त्याला काय इलाज बरं?! :) असो... तात्या.

च्यायला, लै म्हणजे लैच उशीर घडला बॉ प्रतिक्रिया द्यायला :( आम्बोळ्या, भौ हे खरंच असं घडलं होतं? आयला, चितेवर बिडी पेटवायची म्हणजे काय गंमत आहे का? नेहमीप्रमाणे लेख उत्तम आहेच हे वे.सां.न.ल. :)
...प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता.
हाण तिच्याआयला! एकदम जब्राट! च्यायला हा किस्सा तर लैच भारी! अवांतरः नाही नाही त्या गोष्टी शिकवून बायकोचे कान भरणार्‍या तिच्या माहेरच्या भोचक नातेवाईकांवर हा कंदील काम करतो का?
मी पण पाहिलेली मयत :
आम्ही साधारण १२वीत असु. एक मित्र, पराग नाव त्याचं, नुकताच गाडी शिकला होता आणि त्याच्या बा नं त्याला यामाहा घेऊन दिली होती. मग काय हो...भर गावातून बुंग..बुंग करत हिंडायचो आम्ही. एक दिवस असेच सुसाट फिरत होतो, तर समोरुन एक अंत्ययात्रा आली, म्हण्जे अंत्ययात्रा चाललीच होती, आम्ही तिच्यासमोर आलो. पर्‍याचा गाडीवर काहीकेल्या ताबा राहिना....टरकून मी मागच्यामागं उडी टाकली. आणि हा बहाद्दर........ गेलेल्या माणसाला जे चार खांदेकरी घेऊन चालले होते, सरळ त्यांच्यातच गाडी घेऊन घुसला...अरारारा...तिरडी टाकून जी काय पळापळ झाली....हातात मडकं घेऊन पुढं चालणारा त्या मयताचा मुलगा मडक्यासकट सांडला. ती तिरडी, तिच्यावरचं ते प्रेत आणि तो पडलेला मुलगा हे सगळं जस्संच्या तस्संच ठेऊन त्या सगळ्यांनी पर्‍याला बेक्कार धूतला :( नंतर पोलिसकेस केली...ह्या सगळ्या गडबडीत पर्‍याच्या बापसाला आणायला म्हणून मी गेलो तो परत येऊन पाहतो तर पर्‍या एका बाजुला डोकं धरुन बसलेला, मामालोकांनी पंचनामा करुन घेतलेला, रस्त्यात वेडावाकडा पडलेला मुलगा, ते मडकं तिरडी इ.इ. सगळं खडूनं आखून घेतलेलं.... काय तिच्यामारी एकेक अनुभव आहेत आमचे!

In reply to by धमाल मुलगा

नेहमीच्या रटाळ धाग्यांना कंटाळुन जरा जुने लेख चाळत होतो त्यामधे हे रत्न सापडले... धमाल मुलगा ह्यांचा हा प्रतिसाद पण एक्दम जबरा... ठ्या करुन फोटलो एक्दम... =)) =)) अवांतरः आंबोळी यांचे 'कंदील व कंदील-२' हे लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचावे हे नम्रपणे सुचवतो.

केवळ सह्ही लिहिलं आहे! :) आपला, (कबरस्तानचा रखवालदार) तात्या.

मानलं तुम्हाला...धन्य आहात कसली ष्टोरी आहे जबराट पुढं हे नाही सांगितलं आजोबांना पाहीलं आणि मागे पाहिलं तर ती मुलगी गायब झालेली.....कोण होती ती? ........ कुठुन सुचतं हो... माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले पाहिजे एकदा. :O

>>माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले >>पाहिजे एकदा. विसर शिंच्या नाव विसर माझे ...

येथे जातीने उपस्थीत राहून माझ्या मयताला खांदा दिल्याबद्दल तात्या व इतर गावकरी मंडळींचे मनःपुर्वक आभार !!! असाच योग पुन्हःपुन्हा येवो. (आभारी) आंबोळी

मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. त्यामुळे मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सहमत१००%.

In reply to by अभिता

मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सहमत१००%. नक्किच. १००००% मान्य्. आपलाच, मनोबा

तुम्ही कधी भूत पाहिले नाहित का? भूत न पाहणारी माणसे जास्त टरकतात.

रापचीक !!! लै भारी !!!

रापचीक !!! लै भारी !!!

In reply to by अनुप ढेरे

शेम टो शेम हेच म्हणतो. हे असले जुने लेख खाणकाम करुन काढत राहिले पाहिजे. जरा तजेला येइल इथे परत! - (जुना मिपाकर) सोकाजी

हा धागा उघडला तर २००८ सालचा आता खणून वर काढलेला . उत्सुकता म्हणून वाचून काढला . "क्रमश:" हा शब्द बऱ्याच जणांच्या भावना दुखावणारा वाटला .पण यात तांत्रिक दृषट्या गैर काहीच वाटले नाही . हापण विषय क्रमश: होऊ शकतो . आता मूळ धागाकर्ता जोपर्यंत काही नवीन भर घालत नाही तोपर्यँत प्रतिसाद वाढवण्यात काहीच उपयोग नाही .यात्रेचे मजेदार अनुभव असू शकतात यावर आपल्या विनोदी लेखकांनी प्रकाशकांचा सल्याने कमीच लिहिले आहे .