✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देशाच्या गळ्यातील ताईत ~ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग दुसरा...)

इ
इन्द्र्राज पवार यांनी
Tue, 09/28/2010 - 16:24  ·  लेख
लेख
मागील लेखापुढे..... १९६५ च्या पहिल्या पाक युद्धात माणेकशॉ पूर्व विभागाचे सेनानी होते आणि पश्चिम विभाग मिळवित चाललेल्या विजयामुळे आनंदित झालेल्या राजकारण्यांनी पूर्व पाकिस्तानवर आताच ताबा मिळवावा अशी भूमिका घेतली, तिला माणेकशॉनी विरोध केला कारण ते जाणत होते की, पूर्व पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याला सामोरे जातील ते हतबल असलेले सर्वसाधारण नागरिकच कारण तिथे पाकचे सैन्य भारतीय तोफांच्या भडिमारासमोर त्यांनाच उभे करणार हे सॅम जाणून होते. ही चाल शहाणपणाची ठरली. पण म्हणून लष्कर निवांत राहिले असे नाही तर तो काळ आपल्याकडून व्यूहरचनेसाठी फार उपयुक्त ठरला. दरम्यान १९६२ च्या चीन युद्धात आलेली नामुष्कीही या विजयामुळे मागे पडली आणि अमेरिकेला भारताच्या वाढत्या लष्करी ताकदीची नोंद घेणे भाग पडले. हिंदी महासागरात त्यांचे नौदल तैनात होणार या बातम्या पसरताच रशिया भारताचा एक मित्र म्हणून तात्काळ पुढे आला. हे पुढील काळासाठी फार चांगले ठरणार होते....झालेही तसेच. ढाक्क्यातील शेख मुजिबर रेहमानच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे रावळपिंडी अस्वस्थ होऊ लागली तेव्हा आज ना उद्या परत दुसर्‍या युध्दाचा भडका उडणार हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नव्हती तसेच श्रीमती इंदिरा गांधी पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणार हेही उघड होते. अशावेळी रावळपिंडी वॉशिंग्टनचे बोट धरून युनोत कांगावा करणार हे तज्ज्ञांनी ओळखले असल्याने तिथे 'व्हेटो' चा वापर करून भारताविरूद्ध कोणतीही कारवाई करायला लागणार नाही हे पाहण्यासाठी अमेरिकेच्या तोडीसतोड ताकदवार रशिया आपला मित्र असणे फार आवश्यक होते. ती एक यशस्वी राजनैतिक चाल होती. तोपर्यंत इकडे १९७१ साल उजाडेपर्यंत भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानाच्या आजुबाजूच्या सर्व ठाण्यावर करडी नजर ठेवून युध्द झालेच तर त्याची यशस्वीरित्याच सांगता करण्याच्या उद्देशानेच लढले जाईल याची सिद्धता केली. सॅमचा हा विश्वास सर्वार्थाने सार्थ ठरला. पुढे १९६९ मध्ये जनरल कुमारमंगलम यांच्या जागी पूर्व विभागाचे लेफ्ट.जनरल सॅम माणेकशॉ यांची 'भारतीय सैन्यदलाचे जनरल' झाले त्यावेळी पुढील यशस्वी कारकिर्दीची लक्षणे तिथेच दिसली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आखल्या गेलेल्या मोहिमेचे नेतृत्व ले.जनरल जगजितसिंग अरोरा यांनी केले...भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे पाकिस्तानच्या ले.जनरल 'टायगर' नियाझीने १६ डिसेम्बर १९७१ रोजी ९०,००० सैन्यासह गुडघे टेकले, शरणागती पत्करली....'आम्ही हरलो' म्हणून त्या ऐतिहासिक कागदपत्रावर सही केली आणि 'बांगला देश' ची निर्मिती झाली.....आणि देशभरात 'जनरल सॅम माणेकशॉ' हे घराघरातील नाव झाले. सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील तर ते ताईतच बनले. दिल्लीतच नव्हे तर शांती काळात त्यांना विविध नागरी समारंभांची निमंत्रणे येऊ लागली. शेवटी 'युध्दस्य कथः रम्य' या वचनानुसार सॅमबहादूर काय बोलतात, प्रत्यक्ष कसे दिसतात हे पाहण्यासाठी नागरी लोक गर्दी करत. कोल्हापुरात २२ फेब्रुवारी १९७२ मध्ये ते आले होते व करवीरच्या ताराराणीच्या अश्वारूढ पुतळ्याचे त्यांच्या हस्ते [राजारामपुरी येथील ताराराणी विद्यापीठ आवारात] अनावरण झाले तर त्याच दिवशी संध्याकाळी भव्य अशा खासबाग कुस्ती मैदानात गर्दीने फुलून गेलेल्या कोल्हापुरकरांसमोर "जनरल" च्या गणवेशात ~ त्यावेळी ते फिल्ड मार्शल झाले नव्हते ~ त्यांची जाहीर सभा झाली. त्या सभेला हजर असलेल्या काही लोकांना तसेच ताराराणी विद्यापीठाच्या काही संचालकांना/पदाधिकार्‍यांना मी भेटलो आहे. या लोकांनी दोन्ही कार्यक्रमांच्या तसेच जनरलसाहेब आणि त्यांच्या आदराचे स्थान असलेल्या ले.जनरल एस.पी.पी.थोरातसाहेब यांच्या बंगल्यावर झालेल्या दिलखुलास भेटीचेही वर्णन केले. पण दुर्दैवाने या सातआठांपैकी एकाकडेही त्या समारंभाचा एखादाही फोटो नाही. 'कमला कॉलेज' मध्येही मुद्दाम गेलो होतो [जिथे 'ताराराणीचा पुतळा अनावरण समारंभ झाला] व त्यांच्या जुन्या दप्तरात १९७२ च्या माणेकशॉ भेटीचे काही फोटो मिळतात का याची चौकशी केली. पण तिथेही "कशाला?", "आता इतके जुने फोटो कुठे मिळणार?" अशी उदास चेहर्‍यांनी दिलेली उत्तरे ऐकली. (त्यावेळी इथून 'सकाळ' प्रकाशीत होत नव्हते, अन्यथा त्यांच्या लायब्ररीत अशा कार्यक्रमाचे फोटो आवर्जून दिले जातात याचा अनुभव आहे...असो थोडेसे मूळ विषयापासून दूर झालो.). सर्वसाधारण भारतीयच नव्हे तर १९७२ मध्ये बॉलिवूडने 'फिल्मफेअर' च्या वार्षिक पारितोषिक समारंभाला प्रमुख पाहुणे या नात्याने 'जनरल सॅम माणेकशॉ' यांना आदरपूर्वक निमंत्रण दिले आणि मुंबईत झालेल्या त्या कार्यक्रमात राजेश खन्नाने अत्यंत आनंदाने त्या वर्षाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जनरलसाहेबांच्या हस्ते स्वीकारला. दोघेही त्या काळात देशाच्या गळ्यातील ताईत बनले होते. फिल्मफेअरच्या आजपर्यंतच्या इतिहासातील ते एकमेव वर्ष असे आहे की जिथे भारतीय सैन्यदलाच्या सर्वोच्च अधिकार्‍यांने कलाकारांना ट्रॉफीज दिल्या. या लखलखत्या सेवेची कदर देशाने त्यांना 'सैन्यदलातील पहिले फिल्ड मार्शल' हा फार मोठा बहुमान प्रदान केला त्यावेळी त्यांची अ‍ॅक्टीव्ह मिलिटरी सर्व्हीस फक्त १३ दिवसांची राहिली होती. विशेष म्हणजे हा बहुमान स्वीकारतानाही सॅमसाहेबांच्या मनात आपल्या सैन्याचा आणि कर्तबगार अधिकार्‍यांचाच विचार होता. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'खरं तर पराक्रम केला तो जग्गीने [ले.जनरल जगजितसिंग अरोरा] आणि मार्शलचे बॅटन मात्र माझ्या हातात आले.' केवळ आपल्याच सैनिकांचे अन् अधिकार्‍यांचे प्रेम त्यांनी मिळविले असे नाही तर त्यांच्या लक्षणीय अशा दोन कृतीमुळे ते भारतीय लष्करी अधिकार्‍यांत आणि दुसर्‍या बाजुला पाकिस्तान सैन्यातदेखील (युद्धानंतर...) तितकेच लोकप्रिय झाले. ते प्रसंग > १. दिल्लीत आणि त्यानंतर सार्‍या देशात बातमी धडकली की, 'ढाक्क्यात पाक सैन्याने भारतीय लष्करापुढे अखेर शरणागती पत्करली आणि उद्या त्यांच्यातर्फे ले.जन.नियाझी शरणागती पत्रकावर सही करणार - शरणागतीचाही एक सोहळा असतो...प्रथम शरण आलेला अधिकारी त्या सोहळ्याच्या ठिकाणी प्रवेश करतात, त्यानंतर विजयी झालेल्या देशाचा लष्कराधिकारी तिथे येतो. तो आलेल्या क्षणी पराभूत अधिकार्‍याकडून त्याना सल्यूट दिला जातो, जो तसाच स्वीकारला जातो. कागद्पत्रे तयार असतातच, त्यातील फक्त शेवटचा पॅरा मोठ्याने वाचला जातो, त्यावर संमतीदर्शक अशी शरण आलेल्याने सही करणे; नंतर उजव्या खांद्यावरील लेनयार्ड {एक अधिकार पदाचे चिन्ह असलेली सुंभाची रस्सी} काढून 'आपण लष्करी अधिकार्‍याचे पद सोडत आहे' अशी कबुली व नंतर तिसरी महत्वाची कृती म्हणजे त्या अधिकार्‍याने - इथे ले.जन.नियाझी - आपले वैयक्तिक पिस्तूल नळीकडे धरून त्याची मूठ विजयी झालेल्या सैन्याच्या अधिकार्‍याकडे द्यायचे असते. इतके झाल्यानंतर 'आपण तुमची शरणागती स्वीकारली,," अशा आशयाचे पत्र विजयी जनरलकडून प्रदान केले जाते आणि हा सोहळा संपतो ~~~ पण जगातील जवळपास सर्व सैन्यात एक गोष्ट कटाक्षाने पाळतात ती म्हणजे या तीन घटनेंचे फोटो काढले जात नाहीत.....शरण आलेल्या शत्रूची कोणत्याही परिस्थितीत मानहानी करू नये हाच यामागील उदात्त हेतू असतो. ....तर असा सोहळा निश्चित झाल्यानंतर आर्मी हेडक्वार्टर्सतर्फे जनरल माणेकशॉ यांच्या ढाक्क्याला जाण्याची तयारी सुरू झाली. पण ती त्या क्षणीच सॅमनी थांबविली. कारण सांगितले : "मी तेथे आता गेलो तर सार्‍या सैन्याचे व नागरी वस्तीचे लक्ष माझ्याकडे जाईल आणि जेन.जगजीतसिंग आणि त्यांच्या तुकड्यांनी जो पराक्रम केला आहे त्याला दुय्यम स्थान प्राप्त होईल. त्यामुळे शरणागतीचे सर्व सोपस्कार केवळ जग्गीच पाहील..." हे ढाक्यात समजल्यावर सर्वच अधिकारी सॅमबहादूर यांच्या या दाद देण्याच्या क्रियेला पाहून हरखून गेले. २. दुसरा प्रसंग > ले.जन.नियाझी यांनी शरणागती पत्करली, तो कार्यक्रमही आटोपला मग मात्र दुसर्‍याच दिवशी 'बांगला देश' ची निर्मिती झाली. त्या कार्यक्रमाला हजर राहणे आणि आपल्या विजयी वीरांना भेटणे यासाठी जनरल माणेकशॉ विमानाने कलकत्याला रवाना झाले. ते येणार म्हणून साहजिकच सैन्य दलात जल्लोष उडाला. डमडम विमानतळावर त्यांचे राजेशाही थाटात स्वागत, अर्थातच, झाले. डाक्याकडे त्यांना नेण्यासाठी एका खास 'मर्सिडीज' कारची तेथील कमांडर्सनी व्यवस्था केली होती. ती कार पाहत असताना जनरलसाहेबांना काही शंका आली व थोडी चौकशी केली असता त्या अधिकार्‍यांने मोठ्या रूबाबात उत्तर दिले, "ही आम्ही पाकच्या जनरलची जिंकलेली गाडी आहे, जी तुमच्या सेवेत आता आणत आहोत..." त्या क्षणाला माणेकशॉ संतापाने फुलून गेले. शत्रू असला तरी तो जनरल आहे आणि मी या कारमध्ये बसणे म्हणजे त्याची एक प्रकारची मानहानी आहे, हे त्यांनी तिथल्यातिथे त्या अधिकार्‍यांच्या गटाला सुनावले व पुढील कार्यक्रमासाठी तिथे एक क्षणही न थांबता विमानतळावर हजर असलेल्या मिलिटरी व्हॅनमधे बसून डाक्याकडे कूच केले. इतकेच नव्हे तर त्या युद्धात जे पाकिस्तानी अधिकारी मृत्युमुखी पडले त्यांच्या शवपेटीकाही त्यांच्या त्यांच्या "रॅन्क" नुसार त्यांनी करवून घेतल्या व त्या दर्जानेच त्या शवपेटीका लाहोरला रवाना करण्यात आल्या. जनरलसाहेबांच्या या दिलदारपणाच्या बातम्या पुढे रावळपिंडी आणि कराचीमध्येही गेल्या आणि तिथल्या सैन्यांने माणेकशॉना मनोमनी सलाम केला. पुढे १९७२ मध्ये ते पाकिस्तानला सैन्य कराराच्या काही कमानिमित्य गेले तर त्यांना तेथील सेनेने आणि सर्वदलीय अधिकार्‍यांनी दिलेली मानवंदना सर्वांना चकीत करून गेली होती. देशभरात त्यांचे ज्या ज्या माध्यमाद्वारे फोटो झळकले होते ते कायम त्यांच्या हसर्‍या छबीचेच. कमालीचा आत्मविश्वास हा त्यांचा स्थायीभाव होता तर वाणी ही त्यांची मन जिंकण्याचे साधन होते. स्वभाव दिलखुलास असल्याने साध्या सैनिकापासून इंदिरा गांधीपर्यन्त सर्वांशी 'अरे तुरे, अगंतुगं' च नाते. पंडित नेहरूंच्या जवळकीमुळे इंदिरा गांधी यांची ओळख अगदी घरच्यासारखी होती. (इंदिराजी त्यांच्यापेक्षा ३-४ वर्षांनी लहान होत्या) त्यामुळे त्या पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांच्यातील एकेरी नात्याच्या संबोधनात काही फरक पडला नाही. इतकेच नव्हे तर इंदिरा ही जरी नेहरूकन्या असली तरी तिची उपस्थिती मिलिटरी मीटिंगच्यावेळी ते खपवून घेत नसत. चीनी आक्रमणानंतर त्यांच्या ब्रिगेडच्या अधिपत्याखाली बोलाविलेल्या एका मीटिंगचे वेळी (सन १९६३) माणेकशॉ युनिट प्रमुख या नात्याने पंतप्रधान नेहरू आणि त्यावेळेचे संरक्षणमंत्री श्री.यशवंतराव चव्हाण तसेच उच्च अधिकारी यांना अपडेट देत असतानाच इंदिरा गांधींनी मीटिंगमध्ये प्रवेश केला. त्या क्षणी सर्वासमक्ष माणेकशॉ यांनी त्याना तिथे हजर राहण्यास मज्जाव केला. लष्करी मीटिंगला हजर राहणार्‍यांनी रूममध्ये येण्यापूर्वी 'गुप्ततेची शपथ' घ्यायची असते असा नियम आहे. आणि तशी एकदा शपथ झाली आणि मीटिंग सुरू झाली की तिथे अन्य कुणालाही प्रवेश दिला जात नाही. बेअरादेखील टी सर्व्हिससाठी आत येत नाही. पण आता या नेहरू कन्येला कोण अडविणार? पण ते काम सर्वासमक्ष माणेकशॉनी केले आणि इंदिरा गांधी तत्क्षणी रूममधून बाहेर पडल्या {{ हा किस्सा सविस्तरपणे श्री.राम प्रधान यांनी सांगितला आहे. ते त्यावेळी रक्षामंत्री सचिव या नात्याने मीटिंगला हजर होते }}. पण असे असले तरी इंदिरा गांधी जनरलसाहेबांचे लष्करी महत्व जाणून होत्याच. त्यामुळे त्यानीच पंतप्रधान झाल्यावर ८ जून १९६९ ला सॅम माणेकशॉ यांची 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' या सर्वोच्च पदी नियुक्ती केली. थोडक्यात कितीही ताणतणावाचे प्रसंग आले तरी दोघांचे नाते (त्या काळात तरी) मैत्रीपूर्ण राहिले होते. अगदी सरकारी कार्यक्रमात वा परदेशी पाहुण्यांच्यासमवेत आयोजित केलेल्या मेजवानीप्रसंगीदेखील ते इंदिरा गांधींना 'स्वीटी' म्हणून हाक मारत. एखाद्या पार्टीत इंदिरा गांधी ठेवणीतील साडी नेसून आल्या असतील तर 'वॉव, यू लूक प्रेटी टुडे..." असा उत्स्फूर्त शेराही देत. पण पुढे कुणीतरी इंदिरा गांधींचे 'त्या आणिबाणी फेमस धवन-शुक्ला' जोडीने "जनरल माणेकशॉ हे फिल्ड मार्शल पदाचा गैरफायदा घेऊन लोकशाही सरकार उलथविण्याच्या प्रयत्नात आहेत..." असे कान भरले व तो काळच (१९७३ ते ७७) बाईंच्या दृष्टीने नाजूक बनला असल्याने ते त्यांना बहुधा खरेही वाटले असेल. जवळकीच्या संबंधामुळे बाईंनी माणेकशॉना याबाबत छेडले असता, ते गंभीर झाले आणि शांतपणे म्हणाले, "मदाम प्राईम मिनिस्टर, एक शंका कधीही मनी आणू नका की, मी तुमची जागा घ्यायला पात्र नाही. तुमचे नाक जसे मोठे आहे, तसे माझेही आहेच, फरक इतकाच आहे की मी दुसर्‍यांच्या कामात नाक खुपसत नाही." ~ विषय तिथेच संपला. मात्र हेही आता स्पष्ट दिसू लागले होते की, दिल्लीकरांना फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ नकोसे होऊ लागले होते.... (पुढे चालू......)

Book traversal links for देशाच्या गळ्यातील ताईत ~ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग दुसरा...)

  • ‹ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ ~ यश आणि उपेक्षा
  • Up
  • राजकारण, मत्सर, असूया....आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग-३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25203 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

वाचतो आहे!

ब्रिटिश टिंग्या
Tue, 09/28/2010 - 16:33 नवीन
वाचतो आहे!
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Tue, 09/28/2010 - 16:35 नवीन
माहितीपूर्ण भाग. त्या काळी कोल्हापुरात सकाळ नसला तरी पुढारी तर असणार. पुढारीच्या कार्यालयात फोटो मिळू शकतील. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

'पुढारी' आणि "पवार"

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 16:53 नवीन
"पुढारीच्या कार्यालयात फोटो मिळू शकतील....." ~~ होय. ही बाब माझ्या ध्यानी होती/आहे देखील....पण काय आहे की, पुढारीकारांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच 'पवार' आडनावाची अ‍ॅलर्जी आहे, त्यामुळे तिथे माझे आयकार्ड दाखविले की उपसंपादकापासून गेटमनपर्यंत सर्वांच्या कपाळावर आठया पडतील, म्हणून टाऊन हॉलकडे गाडी घेतली नाही. पण तुम्ही म्हणता ती शक्यता आहेच आहे, कारण १९७२ च्या सुमारास 'पुढारी' व 'सत्यवादी' हेच दोन स्थानिक पेपर्स कोल्हापुरात प्रसिद्ध होते. माझ्या मामांच्या ओळखीचे एक गृहस्थ श्री.राम देशपांडे [श्री.वि.स.खांडेकर यांचे लेखनीक] पुढारीत लायब्ररीयन म्हणून काम करीत असत त्यांच्याशीही यासंदर्भात संपर्क साधला होता. पण ते निवृत्त झाले असून पुढारीशी तसा काही संबंध ठेवला नसल्याचे त्यांच्या उदास बोलण्यावरून जाणवले. पण असो. प्रयत्न करतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

रामभाऊ

श्रावण मोडक
Tue, 09/28/2010 - 18:35 नवीन
रामभाऊ कसे आहेत हो सध्या? ते 'सकाळ'मध्येही होते. या माणसाकडील स्वाक्षरी संग्रहाविषयी लिहा केंव्हा तरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

स्वाक्षरी संग्रह

इन्द्र्राज पवार
Wed, 09/29/2010 - 12:45 नवीन
श्री.राम देशपांडे आमच्या घरी यायचे (मामांचे मित्र आहेत....किंवा मामांच्याबरोबर मी आणि माझे मित्रही कधीतरी त्यांच्या घरी गेलो होतो....); पण निवृत्तीनंतर त्यांनी फिरणे थोडे कमी केले असल्याचे समजले (काही डोळ्याचाही मध्यंतरी त्रास झाला असे 'अक्षर पुस्तकालया'च्या श्री.रविन्द्र जोशी यांच्याकडून समजले होते....'अक्षर' हा त्यांच्या आणि समवयस्कांचा संध्याकाळच्या साहित्यविषयक बैठकीचा गप्पांचा अड्डा होता). "स्वाक्षरी संग्रहा" [स्वाक्षरी नव्हे, तर लेखकांचे हस्ताक्षर] विषयी ~~ तुम्ही म्हणता तो विषय माझ्या डोक्यात मे महिन्यात डोकावला होता, श्रामो जी. करवीर नगर वाचन मंदिरमध्ये एका पुस्तक प्रकाशन समारंभासाठी ते आले होते त्यावेळी त्यांना अगदी जवळून ओळखणार्‍या माझ्या मित्राने त्या विषयाचे त्यांच्यासमोर सूतोवाच केले होते. पण त्यांनी ना होकार दिला ना नकार. पण चहापानाच्या वेळी आलोक याने (श्री.जोशींचे चिरंजीव) तिथे सांगितले की ते त्या संग्रहाचे फोटो काढू देत नाहीत. आता याचे कारण विचारण्याचे प्रश्नच नव्हता, ते श्री.रामभाऊंच्या मौनाने सांगितले होतेच. शिवाय इथे त्या विषयावर लिहायचे म्हटले तर हस्तलिखिताच्या नमुन्याशिवाय लिहिण्यात अर्थही नाही. तरीही येत्या सुट्टीत परत एकदा प्रयत्न करतो. [अशा संग्रहकांना अशी एक भीती वा शंका असते की, आम्ही ते प्रकाशित करून पैसे मिळविणार....कसा गैरसमज दूर करणार?] इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

एक अतिशय उत्कृष्ट मेजवानी.

गांधीवादी
Tue, 09/28/2010 - 16:37 नवीन
एक अतिशय उत्कृष्ट मेजवानी.
  • Log in or register to post comments

प्रवास....

इन्द्र्राज पवार
Wed, 09/29/2010 - 23:13 नवीन
श्री.गांधीवादी यांचा आतापर्यंतचा इथला प्रवास पाहता असे दिसते की, ते सातत्याने देशाच्या प्रगतीचा आणि हिताचा आवर्जून पाठपुरावा करतात...त्यामुळे मला त्यांच्याकडून या विषयावर विस्ताराने प्रतिक्रिया अपेक्षित होती....आहे. ~~ जरी आता ते देवू शकले नाही तरी, तिसर्‍या/चौथ्या भागात तर तसे करण्याची वाट पाहतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

>>श्री.गांधीवादी यांचा

नितिन थत्ते
Wed, 09/29/2010 - 23:54 नवीन
>>श्री.गांधीवादी यांचा आतापर्यंतचा इथला प्रवास पाहता असे दिसते की, ते सातत्याने देशाच्या प्रगतीचा आणि हिताचा आवर्जून पाठपुरावा करतात अतिशय विनोदी प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

नोप...नो विनोदी प्रतिसाद

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 09/30/2010 - 00:12 नवीन
"अतिशय विनोदी प्रतिसाद...." उप्प्स्स्स.....नाही. त्यांचे प्रतिसाद आणि धाग्यातून त्यांची त्यांना देशाविषयी वाटणारी काळजीच प्रतिबिंबीत होते असे वाटते. त्यामुळेच माझी अशी अपेक्षा आहे/होती की, निदान या निमित्ताने का होईना देशाच्याच एका प्रश्नाशी निगडीत असलेल्या या विषयावर त्यांनी 'लेख आवडला' असे शुष्कपणे न म्हणता खुल्या मनाने लिखाण करावे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तुम्हाला गांधीवादी यांची काही

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/30/2010 - 06:25 नवीन
तुम्हाला गांधीवादी यांची काही मते पटत नाहीत म्हणून ते देशाच्या हिताचा आणि प्रगतीचा विचार करत नाहीत असे होत नाही थत्तेकाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पुढे

श्रावण मोडक
Tue, 09/28/2010 - 16:41 नवीन
पुढे? उत्सुकता ताणवू नका जास्ती!
  • Log in or register to post comments

मस्त लेखमाला. आपल्याकडे

यशवंतकुलकर्णी
Tue, 09/28/2010 - 16:48 नवीन
मस्त लेखमाला. आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड नको तिथं कात्री लावते म्हणून असल्या घटनांवर आधारीत अर्थपूर्ण रिअ‍ॅलिटी सिनेमे तयार होत नाहीत, मुद्दाम होऊ दिले जात नाहीत असे वाटते. जे होतात त्यात देश के लिये‌ ऽऽऽ, देश की जनता‌‍ऽऽऽ आणि असलाच निरर्थक ब्लाह्ब्लाह असतो. नाहीतर पॅटनसाहेबाच्या तोडीस तोड माणूस आहे हा.
  • Log in or register to post comments

पॅटन

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 09/30/2010 - 09:44 नवीन
"पॅटनसाहेबाच्या तोडीस तोड माणूस आहे हा....." जनरल पॅटनदेखील सॅम माणेकशॉ यांच्यासारखेच अखेरीस राजकारण्यांच्या मत्सराचे बळी ठरले होते, हाही एक योगायोगच.... 'पॅटन" वरही स्वतंत्रपणे लिहू या, पुढे कधीतरी. "असल्या घटनांवर आधारीत अर्थपूर्ण रिअ‍ॅलिटी सिनेमे तयार होत नाहीत, " ~~ होय हे मात्र सत्य आहेच. हॉलिवूडची ('सेव्हिंग प्रायव्हेट रायन' वा 'प्लटून'), अशी उदाहरणे पाहिली की आपल्याकडील 'चिठ्ठी आयी है, वतनसे चिठ्ठी आयी है, वहाँसे कब घर लौटोगे..." अशी धाय मोकलून रडणार्‍या सैनिकांची (आणि तीही मिलिटरी ड्रेसमध्येच) दृष्ये दाखविणारे आपल्याकडील चित्रपट पाहिले की समजते या निर्मात्यांना युध्द कथानकातदेखील 'दिल के टुकडे' आणल्याशिवाय काही जमणारच नाही. त्यातल्या त्यात 'हकिकत' हा एक रोखठोक चित्रपट होता असे म्हणतात. पाहिलेला नाही, पण ऐकले आहे खूप. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

:)

अब् क
Tue, 09/28/2010 - 16:52 नवीन
:)
  • Log in or register to post comments

सुरेख.

पैसा
Tue, 09/28/2010 - 16:55 नवीन
"मला एका राजासारखे वागव" हे सिकंदरला फक्त भारतातला पोरस राजा सांगू शकतो. आणि हरला तरी तो (पाकिस्तानी) जनरल आहे हे सॅम माणेकशॉच सांगू शकतात! पारशी स्टाईल नाकाचा किस्सा खासच! आणि फोटोतही दोघांची नाके उठून दिसतायत! कृष्ण मेनन हे नेहरू गांधी परिवाराला विशेषतः इंदिराजीना खूप जवळचे होते असा एक प्रवाद होता. तसेच सॅमबहादूरची लोकप्रियता हेही त्याना साईडलाईन करण्यामागचे कारण असावे काय? लोकनेते जयप्रकाश यांचेही इंदिराजींबरोबर सुरुवातीला जवळचे संबंध होते, आणि तेही त्याना मुलीसारखं वागवत असत. पण आणिबाणीच्या काळात काय झाले हा इतिहास आहे!
  • Log in or register to post comments

करेक्शन

नितिन थत्ते
Tue, 09/28/2010 - 17:09 नवीन
>>कृष्ण मेनन हे नेहरू गांधी परिवाराला विशेषतः इंदिराजीना खूप जवळचे होते असा एक प्रवाद होता. कृष्णमेनन १९६२ च्या चीन युद्धात डिसक्रेडिट झाले होते. इंदिरा गांधी १९६६ मध्ये पंतप्रधान झाल्या त्यावेळी कृष्णमेनन जवळचे असायची शक्यता नाही. >>लोकनेते जयप्रकाश यांचेही इंदिराजींबरोबर सुरुवातीला जवळचे संबंध होते, आणि तेही त्याना मुलीसारखं वागवत असत. पण आणिबाणीच्या काळात काय झाले हा इतिहास आहे. आणिबाणीत त्यांच्यात वितुष्ट आले नसून, त्यांच्यात वितुष्ट आल्यानंतर ३-४ वर्षांनी आणिबाणी आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

करेक्शन

पैसा
Tue, 09/28/2010 - 17:23 नवीन
थत्तेसाहेब करेक्शनबद्दल धन्यवाद. मेनन याना दूर केल्यामुळे इंदिरांचा काही grudge होता का? असं मला म्हणायचं होतं. आणि J.P. बरोबर वितुष्ट आधी आलं होतं हे मला ठाऊक आहे. मतलब एवढाच की J.P. ना त्या वयात तुरुंगात टाकलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थोडे थांबा...

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 17:28 नवीन
पैसा.... एक दोन दिवस थांबा.... [मेनन संदर्भातील] तुमच्या मनातील सर्व विषयांचा उहापोह मी पुढील लेखात केला आहे. श्री.नितिन थत्तेना त्याची माहिती आहेच, पण तो सर्व घटनाक्रम लेख स्वरूपात वाचा, मग जरी शंका राहिलीच तर तिथे तिसर्‍या भागावर चर्चा पुढे नेऊ या. ओके? इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वाचताना अगदी गुंग होऊन गेलो

अनिल २७
Tue, 09/28/2010 - 17:01 नवीन
वाचताना अगदी गुंग होऊन गेलो होतो.. छान आहे माहीती.. लवकर पुढला भाग येऊ द्या..
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

बेसनलाडू
Tue, 09/28/2010 - 22:20 नवीन
(वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

वाचतेय...

प्राजक्ता पवार
Tue, 09/28/2010 - 17:13 नवीन
वाचतेय...
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया....

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 19:24 नवीन
जरूर वाचा...दोन्ही भाग. पण तुम्हाला काय वाटले त्याबद्दलही लिहा...[इथेच नव्हे पण तुम्हाला जे जे धागे आवडतील, तसेच त्यातील आशय भावेल अशा सर्व विषयांवर...).हे अशासाठी सांगतोय की पुढील भागात कोणत्या प्रकारे अधिकचे लिहिता येईल हे धागाकर्त्यांना समजते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजक्ता पवार

सॅम माणकेशाँचे बालपण..

अनिल २७
Tue, 09/28/2010 - 17:13 नवीन
सॅम माणकेशाँचे बालपण म्हणजे, जन्म कुठे झाला, बालपणीचे काही किस्से उपलब्ध असल्यास त्यावरही एक धागा काढावा ही ईंद्रराजजींना विनंती. कदाचित ही माहीती नेटावर प्रयत्न केल्यास उपलब्ध होईलही, पण ईंद्रराज पवार ह्यांच्या लेखनशैलीत ही माहीती वाचणे म्हणजे आम्हा पामरांस मेजवाणीच असेल...
  • Log in or register to post comments

कौटुंबिक माहिती...

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 17:22 नवीन
"माणकेशाँचे बालपण म्हणजे, जन्म कुठे झाला, बालपणीचे काही किस्से उपलब्ध असल्यास...." ~~ लेखनाच्या अखेरच्या भागात या संदर्भात, तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भात, वैयक्तिक पातळीवर.. लेख आहेच. त्यावेळी तुम्हाला ते समजेलच....पण त्या अगोदर 'राजकारण आणि लष्कर' यात ते कसे भरडले गेले, तो लेख देतो. ओके? [कौतुकाच्या शेर्‍याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, अनिल जी..] इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

ओ.के.

अनिल २७
Tue, 09/28/2010 - 17:27 नवीन
ओ.के. ईंद्रराजजी.. (विषयांतर : आमच्या नावासमोर 'जी' लावयला आम्ही काय त्या भाईच्या फ्लेक्सातले नाही आहोत !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

सवयीचा परिणाम

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 17:59 नवीन
"त्या भाईच्या फ्लेक्सातले नाही आहोत !" ~ सॉरी....त्या अर्थाने ते 'जी' नव्हते. केवळ सवयीचा तो परिणाम आहे. इथे दिल्लीत विविध सरकारी कार्यालयात, कार्पोरेट मिटींग्ज, सोशल गेट टुगेदरनेस समयी 'जी' सातत्याने इतके कानावर पडते की, त्याचे एकप्रकारे बोलीत आणि लिखाणात (विशेषतः समोरची व्यक्ती अनोळखी असेल तर....) प्रतिबिंब येतेच येते. आपल्या मराठीत जसे "काय राव....होय राव...बरोबर आहे हे राव." असे म्हटले जाते, त्याचीच ही हिंदी आवृती. इकडील हिंदी (आणि पंजाबी भाषिकात) मुलाने बापाला "डॅडी....: अशी सहजजरी हाक मारली तरी बापाकडून, "जी, बेटा?" असा प्रतिसाद मिळतो....इतके कॅज्युअल आहे ते 'जी'. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

छान लेख

चिरोटा
Tue, 09/28/2010 - 17:14 नवीन
छान लेख.पुढचे भाग येवू द्यात.
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Tue, 09/28/2010 - 17:28 नवीन
लेख सुरेख. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

विसुनाना
Tue, 09/28/2010 - 17:59 नवीन
माणेकशॉ यांच्या मोठेपणाबद्दल ऐकून होतो. विशेषतः त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कोणीही केंद्रीय मंत्री उपस्थित राहिला नाही -या गदारोळामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. तुमच्या लेखामुळे उत्तम माहिती मिळत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Tue, 09/28/2010 - 18:04 नवीन
मंत्रीच नाही तर तत्कालीन लष्करप्रमुखही. पण त्यांची Funeral with full state honour झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

अंत्यसंस्कार

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 18:09 नवीन
"त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कोणीही केंद्रीय मंत्री उपस्थित राहिला नाही -या गदारोळामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती...." ~~ यावर विस्ताराने [फोटोसह] पुढील भागात लिहीत आहेच. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सुंदर

आंसमा शख्स
Tue, 09/28/2010 - 18:17 नवीन
दुसरा भागही सुंदर. अजून विस्तारानेही लेख चालेल. उदा. बांग्लादेश निर्मितीच्यावेळी त्यांनी लढवलेले डावपेच वाचायला आवडत्याते किती लोकप्रिय होते यापेक्ष ते कशामुळे लोकप्रिय होत गेले हे सांगत असल्याने लेख आवडतो आहे. तुमची शैली इतकी ओघवती आहे की,छायाचित्रांची गरजच नाही...
  • Log in or register to post comments

फोटोंची आवश्यकता...

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 19:11 नवीन
"तुमची शैली इतकी ओघवती आहे की,छायाचित्रांची गरजच नाही... " ~ प्रशंसेबद्दल तसेच सूचनेबद्दलही धन्यवाद. तिसरा/चौथा भागदेखील तितकेच रोचक होतील याची दक्षता घेतो. माहितीचा प्रचंड खजिनाच आहे एकुण लष्कर या विषयावर. पाहु या, "सॅम" मालिका पसंद पडली तर त्या अनुषंगाने लष्कराविषयीही लिहिता येईल. फोटोंबाबत तुम्ही लिहिले आहे....वेल, फोटो देण्याचा उद्देश इतकाच की या निमित्ताने सॅमसाहेबांच्या मुद्राही मजकुरासमवेत पाहिल्या तर त्यांच्याविषयी अजून आदर वाढतो, हे मी पाहिले आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

आंसमा यांच्या विनंतीशी सहमत आहे.....

मुशाफिर
Tue, 09/28/2010 - 20:56 नवीन
इन्द्र्राज साहेब, तुम्ही बांगलादेश युद्धात जनरल माणेकशाँनी लढवलेल्या डावपेचांविषयी थोडं विस्ताराने लिहाचं (हवं तर वेगळ्या धाग्यात). १९७२ च्या एप्रिल-मे मध्येच (त्यावेळच्या) पूर्व पाकिस्तानवर हल्ला करावा, ह्या राजकिय दबावाला बळी न पडता, नीट योजना आखून ऑक्टोबर, नोव्हेम्बर मध्ये खरीपाच्या पिकांची कापणी झाल्यावरच (म्हणजे किमान रसद उपलब्ध झाल्यावरच) आपण हल्ला करावा, हे इंदिरा गाधींना त्यानी अतिशय कुशलतेनं पटवून दिलं होतं. तसचं लष्कराच्या पूर्व मुख्यालयाला (लवकरात लवकर युद्ध निकाली काढण्यासाठी ) तयारीसाठी किमान १० महिने तरी हवेत हे जाणून आणि तिथल्या कर्तबगार अधिकार्‍यांना बरेचसं निर्णय स्वातंत्र्य देवून त्यांनी युद्धशास्त्रातला एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला. पूर्व पाकिस्तानच्या लष्करी ठाण्यांची माहिती 'रॉ' कडून सुसुत्रपणे मिळवण्यासाठी ज्याप्रकारे व्यवस्था केली होती, तसे गुप्तहेर खातं आणि सक्रिय लष्कर (इंटलिजंस अँड ऑपरेशनल फोर्सेस), यांच्या समन्वयाचे दुसरे उदाहरण स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासात विरळाचं. केवळ १७ दिवसात निकाली निघालेलं हे युद्ध म्हणजे जगभराच्या लष्करी तज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे. माझ्या माहितीप्रमाणे, हे युद्ध जगभरातील विविध सैनिकी अभ्यासक्रमात अतिशय बारकाईने अभ्यासलं जातं. आपला व्यासंग फार मोठा आहे, तेव्हा एव्हढं मनावर घ्याचं! मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

मुशाफिरी

अर्धवटराव
Tue, 09/28/2010 - 21:19 नवीन
>>आपला व्यासंग फार मोठा आहे, तेव्हा एव्हढं मनावर घ्याचं! प्रतिसादावरुन तरी वाटतय कि तुमचीही या लश्कर क्षेत्रात बरीच मुशाफिरी झालेली आहे. इंद्रजीतांना तर आग्रह केलाच आहे... आपणही मनावर घ्या आणि आपले "प्रवासवर्णन" लिहा.. कसं... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

नाही हो, असं काही नाही....

मुशाफिर
Tue, 09/28/2010 - 21:32 नवीन
अर्धवटराव, भारताच्या लष्करी इतिहासाविषयी माझं थोडसं वाचन असलं, तरी इंन्द्रजीत साहेबांसारखा दांडगा अभ्यास आणि मोठा व्यासंग नाही. तेव्हा गुजराथीत म्हणतात तसं "जेनु कामं तेनु....." :) कसं? मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मुशाफिर साहेब.. बांगला देशचे युद्ध...

संजय अभ्यंकर
Tue, 09/28/2010 - 23:05 नवीन
१९७१ डिसेंबर मध्ये झाले होते.. १९७२ चा उल्लेख कसा? चु.भु.दे.घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

बरोबर! युद्ध १९७१ डिसेंबर मध्येच झालं होतं....

मुशाफिर
Wed, 09/29/2010 - 00:18 नवीन
३ डिसेंबर ते १६ डिसेंबर ह्या दरम्यान. एकूण १३ दिवसात भारतीय सैन्यने ते जिंकलं. मला १९७१ च्या एप्रिल-मे मधील घडामोडींचा उल्लेख करायचा होता. १९७२ चा उल्लेख अनावधानाने झाला आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

हेरखातं आणि सैन्यदल या दोन्ही

पुष्करिणी
Wed, 09/29/2010 - 00:46 नवीन
हेरखातं आणि सैन्यदल या दोन्ही पातळ्यावरून हे युद्ध 'वेल प्रिपेअर्ड' होतं. पहिली फेज रामेश्वरनाथ काओ आणि दुसरी माणेकशांनी अत्यंत समर्थपणे पेलली. आणि हे हेरखातं फक्त ३ वर्षाचं होतं १९७१ मधे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

नक्किच!

मुशाफिर
Wed, 09/29/2010 - 02:13 नवीन
पण याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची पश्चिम आघाडीवरील कामगिरी खुपच तोकडी पडली होती, असचं म्हणावं लागेल. मे. ज. खंबाटानी केलेल्या चुका आपल्याला भलत्याच भोवल्या होत्या. लोंगोवाला पोस्टची लढाई आपण जरी जिंकली असली ; (हो तीच ती 'बॉर्डर' मधली! ज्यात 'सनी ' पाजी जवळजवळ एकटाच सगळ्या पाकिस्तानी सैन्याला पाणी पाजताना आणि जॅकी श्रॉफ रणगाड्यांवर बॉम्ब टाकल्यावर शेरोशायरी करताना दाखवलाय! :) )तरी लोंगोवाला लढवण्याची वेळ आपल्यावर आलीच नसती ,जर जनरल माणेकशॉनी वारंवार सांगूनही 'रहिमयार कान/खान' वरच्या हल्ल्याला मे. ज. खंबाटानी आणि त्या भागाचे प्रमूख (सेक्टर जी. ओ. सी.) ज. गोपाळ बेवूर यांनी कोणत्यातरी अनाकलनिय कारणाने चार दिवसांनी उशीर केला नसता (अगदी भारतीय वायुसेनेचा तुलनात्मकदृष्ट्या चांगला पाठिंबा उपलब्ध असतानाही). एक लोंगोवाला सोडलं तर बाकी १९७१ मध्ये पश्चिम आघाडीवर आपली कामगिरी अपेक्षेपेक्षा फारच कमी दर्जाची होती, हे बहुतेक सगळेच तज्ञ मान्य करतात. १९७१ च्या युद्धाचा हा भागही अभ्यास करण्यासारखा आहे. मुशाफिर. अवांतरः इंद्रराजसाहेब, तुमच्या धाग्यावर हे लिहून विषयांतर करायचा अजिबात हेतू नाही. पण आपल्याला आपली तोकडी बाजू माहित असावी ,हाच उद्देश अहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

अभ्यास....

इन्द्र्राज पवार
Wed, 09/29/2010 - 11:17 नवीन
"१९७१ च्या युद्धाचा हा भागही अभ्यास करण्यासारखा आहे...." ~~ होय, याचीही गरज आहे. प्रत्यक्षात ही सर्व माहिती घटनाक्रमासह माझ्याकडे आहेच; पण मुळात धागा हा प्रामुख्याने सॅमसाहेबांच्या करिअरशी निगडीत ठेवण्याचा उद्देश असल्याने सर्वच घटनांवर फोकस टाकणे म्हणजे अस्ताव्यस्तपणा वाढण्याची भीती वाटली. त्यामुळे काहा वेळा शार्प एडिटींगही करावे लागले...लागत आहे. पण एकूणच "लष्कर" या विषयाची व्याप्ती जितकी रोमहर्षक तितकीच प्रचंड आहे हे तुम्हीही मान्य कराल. त्यामुळे, जरी महत्वाच्या असल्या, तरी काही घटनांना नाईलाजास्तव बाजुला ठेवावे लागते. शिवाय सदस्यांच्या वाचनक्षमतेचाही विचार करावा लागतोच. इन्द्रा (जाताजाता >> तुम्ही माझ्या या विषयातील अभ्यासाबद्दल वर प्रत्येक प्रतिसादात चांगले उदगार काढले आहेत....प्रत्यक्ष तुमचा 'लष्कर' अभ्यास माझ्यापेक्षा जास्त असावा असे मी मानू लागलो आहे, हे लक्षात ठेवा.....इन्द्रा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

वाह !!

अर्धवटराव
Tue, 09/28/2010 - 21:14 नवीन
>>माहितीचा प्रचंड खजिनाच आहे एकुण लष्कर या विषयावर. पाहु या, "सॅम" मालिका पसंद पडली तर त्या अनुषंगाने लष्कराविषयीही लिहिता येईल. एका अत्यावश्यक पण तेव्हढ्याच उपेक्षीत विषयावर तुमच्या सारख्या व्यासंगी लेखकाकडुन येउ घातलेल्या मालिकेची प्रतीक्षा करतोय. माणेकशाँवरची ही मालिका या लश्कर संहितेचा "श्रीगणेशा" ठरावा अशी हार्दीक ईच्छा. (सिव्हिलियन) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

उत्कृष्ट लेख

मन१
Tue, 09/28/2010 - 18:29 नवीन
आणि लेखमाला.... वाचतोय. हल्ली इंद्राच्या लिखाणाचा फ्यान झालोय.
  • Log in or register to post comments

उत्तम माहितीपुर्ण लेख..

हर्षद आनंदी
Tue, 09/28/2010 - 19:12 नवीन
स्वातंत्र्य उत्तर २०-२५ वर्षे भारतात कीमान नितीमत्ता बाळगुन असणारी काही ऊच्च प्रतीची निष्ठावान माणसे होती, असे ऐकुन होतो. अश्या माणसांविषयी मिळणारी माहिती नेहमीच आवडेल.
  • Log in or register to post comments

थोडी निराशा

प्रदीप
Tue, 09/28/2010 - 19:55 नवीन
झाली हा भाग वाचून. पहिल्या भागापेक्षा हा थोडा 'खाली उतरलाय' असे वाटले, कारण एक इंदिरा गांधी ह्या मिलिटरीच्या मीटिंगला उपस्थित राहिल्या तो प्रसंग सोडला तर इतर सर्व माहिती नवी नव्हती अथवा जी होती ती फारशी सिग्निफिकंट वाटली नाही. अर्थात इंद्रचे लिखाण दिलकश असल्याने सुरूवातीपासून शेवटपर्यंत वाचकास खिळवून ठेवण्याची कला आहे. पुढील माहितीपूर्ण भागांच्या प्रतिक्षेत. जाता जाता: कॄष्ण मेननांविषयी वाचावयास आवडेल पण ते एकतर्फी नको. आणि त्यात खुशवंत सिंगाचे काही असेल, तर ते बरेच डिस्टील करून घेतलेले बरे.
  • Log in or register to post comments

वाचतोय. उत्तम लेख.

बिपिन कार्यकर्ते
Tue, 09/28/2010 - 20:02 नवीन
वाचतोय. उत्तम लेख. छायाचित्रांचे सिलेक्शनही उत्तम आणि चपखल. जेता कसा असावा याचा आदर्श घालून देणारा सॅमबहादुर. सलाम!!!
  • Log in or register to post comments

ज. थोरात.

जयंत कुलकर्णी
Tue, 09/28/2010 - 22:06 नवीन
फार सुंदर लेखमाला. पवारसाहेबांचे आभार मानावेत तेवढे कमीच. हे सगळे वाचताना जनरल थोरांतांची एक आठवण सांगायची रहावत नाही. अर्थात ही मी कुठेतरी वाचलेली आहे. श्री. कार्यकर्ते यांनी जेता कसा असावा असे म्हटले आहे त्याचेच हे ही उदाहरण आहे. १९४१ ते १९४५ च्या दरम्यान ज. थोरातांना एका युधकैद्यांच्या तुरुंगाचे अधिकारी म्हणून काम करावे लागले. त्या तुरुंगात सर्व जपानी युध्द्कैदी भरले होते. युध्द्कैद्यांचा कँप कसा असतो हे आपण अनेक सिनेमात पाहिला असेलच. तर जेव्हा ज. थोरात त्या कँपला पहिल्यांदा भेट द्यायला गेले तेव्हा एक वयस्कर असा जपानी अधिकारी त्यांना मानवंदना द्यायला धावत धावत आला व त्याने ज. थोरातांना सॅल्युट केला. त्याच्या खांद्यावरच्या चिन्हांनी तो एक वरिष्ठ ब्रिगेडियर आहे हे समजत होते. ज. थोरातांनी तो परत केला आणि विचारले " पण आपण धावत का आहात ?" " सुप्रीम कमांडरची आज्ञा आहे की कैद्यांनी सर्व काम धावतच करायची आहेत." ज. थोरात काही बोलले नाहीत पण त्यांनी GOCशी बोलुन ही ऑर्डर रद्द करून घेतली. व तसे त्या कँपमधे नवीन ऑर्डर दिली. हे कळल्यावर तो ब्रिगेडियर त्यांना भेटायला आला आणि म्हणाला "मी आपले आभार मानायला आलो आहे. मी स्वतः व माझा देश ही घटना कधिच विसरणार नाही". दहा वर्षांनंतर जेव्हा ज. थोरात कोरीयाला Indian Custodian Force चे कमांडर म्हणून गेले तेव्हा त्यांनी पत्नीसमवेत टोकीयोला भेट दिली होती. ही भेट तशी खाजगी होती. पण दुसर्‍या दिचशी जेव्हा ते त्या हॉटेलमधून त्यांच्या कारमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या साठी त्या रस्त्यातली पूर्ण रहदारी थांबवली गेली होती. त्यांच्या लक्षात हे कसे काय झाले हे यईना. जेव्हा त्यांनी अधिक चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की त्याच ब्रिगेडियरने टोकियोच्या पोलिसदलाच्या प्रमूखाला ती जुनी हकिकत सांगून ज. थोरांताच्या प्रती आदर दर्शवण्यासाठी हे केले होते आणि त्या पोलिस प्रमूखलाही हा आदर अशा प्रकारे व्यक्त करावासा वाटला. सगळेच भारी ! आहे की नाही ?
  • Log in or register to post comments

खरेच भारी आठवण आहे

बेसनलाडू
Tue, 09/28/2010 - 22:22 नवीन
(अचंबित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अगदी हेच

सहज
Wed, 09/29/2010 - 06:33 नवीन
म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

असेच

प्रदीप
Wed, 09/29/2010 - 19:59 नवीन
म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा