Skip to main content

गुगलवीन नाही दुजा आधार

लेखक विकास यांनी शुक्रवार, 20/08/2010 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकाळी आकाशवाणीवर सकाळच्या वेळेस ऐकलेले "गुरूवीण नाही दुजा आधार" हे गाणे आठवले. अर्थात त्याचे कारणः यंत्राच्या प्रभावावरील लेख आहे, पहीला अनुयायी कसा मिळवावा हे नाही. :-) तर जो शिष्याला ज्ञान देतो, जगण्याचा मार्ग दाखवतो, दिशा देतो वगैरे वगैरेला आपण गुरू म्हणतो. तो अध्यात्मिकच असला पाहीजे असे अजिबात नाही. म्हणून "गुरूवीण नाही दुजा आधार" म्हणले आहे. आता प्रत्येकाला गुरू असतोच असे नाही. पण जसे प्राईसलेस गोष्टी सोडल्यावर इतर गोष्टींसाठी मास्टरकार्ड असते, तसेच सध्या गुगलचे झाले आहे... म्हणजे, व्यावहारीक जगतात पुस्तके, भेटीगाठी, लाईव्ह कार्यक्रम वगैरे आहेत, पण ते मिळत नसेलेल्या इतरांसाठी "गुगल आहे"! म्हणूनच म्हणावेसे वाटते की, "गुगलवीन नाही दुजा आधार" अशी अवस्था नकळत होत असताना आपल्याला वास्तवाचा विसर तर पडलेला नाही ना? जे गुगल दाखवते तीच काय ती माहीती, तोच काय तो (गुगल मॅप्सवरचा) मार्ग आणि तोच काय तो (जी टॉकवरील) संवाद असे आपले कितपत होत आहे? आपण माहीती मिळवण्याकरता केवळ गुगलवर अवलंबून असता का प्रत्यक्ष ग्रंथालयात अथवा इतर विशेष जालीय सेवा देखील वापरून मुळापासून वाचता? आपण केवळ चॅटवरील संवादात समाधान मानता का प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न देखील करत असता? तसे म्हणाल तर गुगल हे प्रातिनिधिक आहे, हा प्रश्न आंतर्जालासंदर्भातच आहे. आपण वास्तव विश्व आणि कल्पनाविश्व यातील सीमारेषा किती धूसर करत आहोत या संदर्भात. या चर्चेत वरील प्रश्नांव्यतिरीक अजून गुगल (तत्सम सेवा) चा आपण कशाकशासाठी वापर करता (उ.दा. शोध, बुक्स, फोटो, वगैरे..) हे देखील सांगू शकता. सरते शेवटी जर उद्या गुगल (कुठलेही "शोधयंत्र") बंद पडले तर नक्की आपल्यावर काय परीणाम होईल असे वाटते?

वाचने 7411
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

धाग वाचुन नुकतेच कांचनतै कराई ह्यांनी गुगलचा अतिशय हुशारीने उपयोग करुन एका साहित्य चोराला शिकवलेला धडा आठवला. http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thief-bokya-satbande.html

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा शेठ ! दिलेली लिंक खरोखर धक्कादायक आहे ! स्किपट्रेसर आणि हॅकर यांचा सामना मनोरंजक आहे :)

लहानपणी 'सुर्य नाहीसा झाला तर' अश्या विषयावर निबंध लिहायला असायचा. आता 'गुगल बंद पडले तर' असा विषय दिला जाईल :-) >अजून गुगल (तत्सम सेवा) चा आपण कशाकशासाठी वापर करता बहुतेक आपल्या घरातील गोष्टी व गल्लीत मिळणारा किफायतशीर सौदा सोडला तर सर्व बाबींकरता गुगलला धक्क्याला लावता येते.

नुकतीच यंत्रावर अवलंबण्याची चर्चा झाल्याने मी "गुगलवीन नाही दूजा आजार" असे वाचले

In reply to by नितिन थत्ते

मी "गुगलवीन नाही दूजा आजार" असे वाचले नुसते पोटदुखी/डोकेदुखी वगैरे शब्द घालून गुगललेत तर अचानक अनेक आजार झाल्याचे वास्तव जगात वाटेल. :-)

मोजक्या शब्दात खूप छान मुद्दा मांडला आहे. माझ्या तरी मते आभासी जगानी, वास्तव जग बरचसं झाकोळून गेलेलं आहे हे खरं आहे. पूर्वी नवीन रस्ते चोखाळले गेले असते, नवीन रस्त्यावरची नवीन ठिकाणं, नवीन व्यक्ती यांना भेट देण्याचा योग आला असता जो की सरधोपट गुगलने सपक करून टाकला आहे. तीच गोष्ट जी टॉक ची. एका क्लिक सरशी स्मायली पाठविणे सहज सोपे झाले आहे. तेच मित्राच्या पाठीवर प्रेमाचा धपाटा देणं कितीतरी पटीनी सुखावह आहे. १० पुस्तकं हाताळून कष्टानी माहीती वेचण्याऐवजी सहज माहीती उपलब्ध होते आहे. पण पुस्तकांची मजा और ती औरच. गुगल अचानक नाहीसे झाले तर वाईट वाटेल पण काही चांगल्या गोष्टी देखील होतील असं मला वाटतं.

गूगलचा वापर करतोच.(मिपाचा शोध गुगलतानाच मला लागला होता.) परंतू मूळ पुस्तके वाचून संदर्भ गोळा करण्यावर मी बराच भर देतो. इतर संस्थळांचा वापर पण करतो. जी -टॉकचा वापर अजून केला नाही. मध्ये एकदा मिपा बंद पडते का काय अशी भिती वाटत होती तेव्हा फेसबुकात नाव टाकून सवंगड्यांची जमवाजमव केली होती.बाकी सोशल नेटवर्कींगचा अनुभव नाही.त्यामुळे अजूनही काही अडले आहे असा अनुभव नाही.

"माहित नाही तर गुगल कर" हा सल्ला अगदी सहजच दिला जातो. माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हटलं तर समोर असलेल्या लोकांशी पटत नसताना बळंच त्यांच्याशी बोलण्यापेक्षा ज्यांच्याशी पटतं त्यांच्याशी जीटॉकवर गप्पा मारणं जास्त आवडतं! भेटता आलं तर सोन्याहून पिवळंच, पण नाही मिळालं तरी मनाला लावून घेत नाही. मिपावरच भेटलेल्या अनेकांशी जीटॉकवर गप्पा मारल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात पहिल्यांदा भेटले तेव्हा पहिल्यांदाच भेटतो आहोत असं काही झालं नाही.

गूगलला आपण आपलंसं केलं आहे त्याचे उत्तम उदाहरण गूगलणे अशी क्रियापदात भरती. :) अन्यथा, भाषेत शब्द स्वीकारला तरी क्रियापदांच्या रूपात सहसा स्वीकारला जात नाही. गूगल मॅप्स आणि जीपीएसवर मी खूप अवलंबून आहे कारण आमच्याकडे स्वतः गाडी हाकण्याऐवजी दुसरी व्यवस्था नाही तेव्हा रस्ते शोधत शोधत जावे लागते. गाडीत जीपीएस आणि नेटावर पत्ता मिळाला की लगेच गूगलमॅप. माझ्याकडे जीटॉक मात्र नाही पण जीमेलने डावीकडील विंडोत चॅट सुविधा देऊन अनंत उपकार केले आहेत. ही सुविधा ब्लॉक नसते त्यामुळे लोकांशी संपर्क साधता येतो. तिसरी सुविधा, गूगल बुक्स. तीही मला उपयुक्त वाटते.

सगळ्याच गोष्टी आपल्याला आणि आपल्या ओळखीतल्या लोकांना माहित नसतात त्यामुळे कोणाला विचारात फिरायच्या ऐवजी घरी आधी गुगल करून मगच पुढे जाणे सोयीचे पडते...याशिवाय वेगवेगळ्या विषयातील माहिती एकाच ठिकाणी साठवून हवी तेव्हा शोधून बघता येते...एकप्रकारची इंटरनेट librabry च म्हणा ना... समजा हे गुगल बंद पडले तर फारच अवघड होऊन बसेल....रस्ते शोधणे, पत्ता शोधणे, आजूबाजूची स्थळे शोधणे इ. कसे करणार? (इथे गुगल म्हणजे समस्त सर्च इंजिन हे गृहीत धरले आहे.)

In reply to by मिसळभोक्ता

'रिसर्च' हा शब्द येव्हढ्या हलक्या पातळीवर वापरताना बघितले की डोक्यात जाते !

In reply to by शाहरुख

गूगल मारून नवनवीन कल्पना मात्र नक्की सुचतात. 'नवीन' अशा किती कल्पना जगात असतील?

साधे उदाहरण देतो. परवा मी अण्णा बेडेकरचा नंबर शोधण्यासाठी २२२२२२२२ ऐवजी गूगल सर्च मारला जे काम फोनवर ३ मिनिटात आणि येल्लो पेजेसमध्ये ५ मिनिटात होते ते गूगलवर ३० सेकंदात झाले. म्हणजे गूगल असेल तर जस्ट डायल सेवा पण नको आणि येल्लोपेजेस पण नकोत. कुठे जायचे असेल तर बिनधास्त गूगल मॅप्स बघतो. पुस्तकांपेक्षा जास्त भरवशाचे आणि मुख्य म्हणजे फुकटात आणि जास्त झटपट काम होते. एखादी गोष्ट शोधायची असेल तर मुळात कुठे शोधायची हेच माहित नसेल तरीही गूगल आहेच. एकुणात उद्या गूगल आणि तत्सम सेवा बंद झाल्या तर आमचे अवघड आहे.

मला देखील बरेचदा गुगल चा आधार वाटतो. मात्र काल एक मजेशीर किस्सा ऐकायला मिळाला. एका मुलीला तिच्या बाळंत पणा करता म्हणून भारतातून आलेल्या स्वतःच्या आई च्या सल्ल्या पेक्षा गुगल चा आधार जास्त मोलाचा वाटतो. आईने काही सांगितले कि ती मुलगी म्हणणार ...............मी आधी गुगल वर शोधते माहिती. हे जरा अती च होते आहे नाही ?

In reply to by पारुबाई

सहमत आहे. मिळणारी माहिती ऑथेंटिक आहे की नाही हे कळू शकत नाही. तरी मी काही ठोकताळे वापरतो. डॉट इडीयु वरची माहिती डॉट कॉम पेक्षा बरी. डॉट जीओव्ही वरची माहिती डॉट कॉम/ब्लॉगस्पॉट पेक्षा बरी डॉट ऑर्ग बाबत थोडे जजमेंट वापरायला लागते.

महाकाय चीन गुगलला भिक घालत नाही. तिथे baidu (का काय तरी) वापरतात, ओर्कुट ऐवजी kixin वापरतात, गुगळे MAP ऐवजी dittu वापरतात (ह्या बद्दल नक्की खात्री नाही, पण गुगल map वापरत नाही हे नक्की) Youtube ऐवजी youku वापरतात. gmail ऐवजी 163 वापरतात. picasa & facebook तर तिथे चालत नाही एकाचेही गुगल वाचून खेटर अडत नाही. वरील सर्व चीनचे स्वताचे आहे. गुगल बाबाला पाठ टेकायला सुद्धा खूप झगडावे लागते तिथे, कसाबसा तग धरून उभा आहे तिथे गुगल बाबा. तो देश खरच महासात्ताकडे चालला(नव्हे घौडदौड करत) आहे त्याचे हे एक खूप-खूप छोटे उदाहरण आहे. http://timesofindia.indiatimes.com/tech/news/internet/Google-remains-at… आणि आपण त्याच्या शिवाय आपले कसे अडते हे अभिमानाने सांगतो आणि गुगल समोर नतमस्तक होतो. धन्य आपण , तरीसुद्धा (बळच) मेरा भारत महान.

In reply to by गांधीवादी

चीनचे इतके गुण ऐकून अरुणाचलचे रहीवासी गोंधळात पडतील हा! की गांधीवादी भारताला इतकी नावे ठेवतायत व चीन तर स्व:ताच्या गुणवत्तेवर इतका प्रबळ होणारा देश आहे. उद्या तिकडे फुटीरतावादी वाढले तर आम्ही म्हणु गांधीवादींनी अरुणाचलवासीयांचे जनमत चीनच्या बाजुने केले. बाकी गांधीवादी तुम्ही म्हणताय ते नॉर्थ कोरीयाचे ही तस्सेच काहीसे आहे. ते देखील महासत्ताच म्हणुन घेतात स्वःताला.

In reply to by सहज

हे बघा http://www.google.com/publicdata?ds=wb-wdi&met=ny_gdp_mktp_cd&idim=coun… हे वाचा http://www.businessweek.com/news/2010-08-16/japan-economy-is-overtaken-… खरे तर हे काही अंशी फसवे देखील आहे, पण भारतापेक्षा नक्कीच चांगले. एक स्वैर विचार : (हलके घ्या ) जर अरुणाचलवासीयांना पोसणे भारताला जड जात असेल आणि चीन त्याची योग्य देखभाल करू शकत असेल, तर त्यांचे भले करण्यासाठी तो भाग चीन ला द्यायला हरकत काय आहे ? पाकिस्तानचे भले करण्यासठी नाही का आपण काही भाग आपल्या लहान बंधूराजेना दिला. (कित्ती कित्ती गुना गोविंदाने राहतो आहे तो आता, जास्त बोलू नका, दुष्ट लागेल हो, पाकिस्तानला ) गांधीवादी पणा काय फक्त भारताला लागू पडत नाय, तो सगळ्या जगाला लागू पडतो, कळतच नाय राव तुमास्नी. पण काहीही झाले तरी मेराइच भारत महान. (दुसर्या कोणाचा देश महान असूच शकत नाही, पाकिस्तान, चीन तर नाहीच नाही. असंच काहीतरी) ते १५०० RS. चे tablet pc पुढच्या वर्षी येणार आहेत असे ऐकले आहे, तिथे येऊन जमाना झाला.

In reply to by गांधीवादी

गुगल शिवाय जालावर शोधाशोधी करणे सोपे काम नाही,कारण जे उत्तर गुगल देते आणि ज्या पद्धतीने देते त्या प्रकारे इतर सर्च इंजिन देउ शकत नाहीत आणि म्हणुनच गुगलची लोकप्रियता अजुन टिकुन आहे. गुगल त्यांच्या प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनवर बरेच लक्ष घालते एव्ड्ढेच नव्हे तर त्यांच्या कंपनीतील कर्मचार्‍यांना देखील बरीच मोकळीक दिलेली असते.उदा. डेस्क निवडने, रुमचा लुक (जिथे बसुन काम करायचे आहे) इ. जालावर फक्त गुगल ऑफिस हा सर्च मारुन फोटो पहा (अर्थातच गुगल वापरुनच !!! ;) ) नाहीतर आमच्या आयटी कंपन्या कंन्सल्टंट मेला की जिवंत आहे त्याची पर्वा करणार नाहीत फक्त बिलींग होते की नाही ते महत्वाचे आहे यांच्यासाठी. असो, वरचा गांचावादी यांचा प्रतिसाद आवडला.

In reply to by मदनबाण

>>वरचा गांचावादी यांचा प्रतिसाद आवडला. गांचावादी शब्द लै आवडला. अर्थ काय हो याचा?

In reply to by नितिन थत्ते

गांचावादी शब्द लै आवडला. अर्थ काय हो याचा? ती टंकन चूक आहे,क्रोम वापरताना लयं भानगड व्हते... पुर्वदॄष्य करताना आणि प्रतिसाद प्रकाशित करताना पुढच्या वेळे पासुन काळजी घेइन.

In reply to by मदनबाण

आमच्या आयटी कंपन्या कंन्सल्टंट मेला की जिवंत आहे त्याची पर्वा करणार नाहीत फक्त बिलींग होते की नाही ते महत्वाचे आहे यांच्यासाठी. >>> हा हा हा हा !! सत्यम शिवम सुन्दरम !!

सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढणार्‍या [ गुगर्ल ] बद्द्ल बोलायलाच नको.. सगळ्या क्षेत्रात ही असतेच!