चंद्रकोरीपरी कोवळें हासणें.... वसंत बापट
चंद्रकोरीपरी कोवळें हासणें
कोणत्या कवीने आपल्या प्रेयसीचे वर्णन काव्यात केले नाही ? सर्व काव्यालंकारांचा उपयोग खरे तर त्यासाठीच. ( सुवर्णालंकार परवडत नाहीत म्हणून म्हणून तर कवींनी उपमा-उत्प्रेक्षा यांना काव्यालंकार असे गौरवावयास सुरवात केली नाही ना ? प्रियेला अर्पण करावयास खिशाला चाट नाही) तरीही प्रत्येक कवी वर्णनात आपली खासियत दाखवावयाचा प्रयत्न करतोच. वसंत बापटांच्या संस्कृत अभ्यासाचा व मराठी लावणीच्या बाजाचा त्यांच्या पुढील कवीतेत मनोहर संगम झालेला दिसून येतो.
चंद्रकोरीपरी कोवळें हासणें, पारिजातकाचे ओठ
आहे-नाहीं असें पापणीकांठाला लागले काजळबोट
करपल्लवीला अशोकपानांचा नाजुक बसंती रंग
दक्ष वक्षावरी आस्तिक स्वस्तिक, सावध सांवळें अंग
अभिसारासाठीं जरा झगमग असूं दे धुसर वेषा ...
यौवनाच्या उंच लाटांना कशाला बंदिस्त लक्ष्मणरेषा ?
सैरभैर वाटा निर्जन रानांत, मनांत वादळी हवा ...
पंख फुलारून कधीं घुमायाचा घुमा हा माझा पारवा ?
कळी मौनमुग्ध, अनोखा सुगंध,राखणकुशल कांटा
तरीहि बुल्बुल चुंबून गेल्याचा होणार आहे बोभाटा
अशा क्षणासाठीं अक्षय पुण्याची करावी कुरवंडी सये
दान देतेवेळीं हिशेबठिशेब भल्यानें पाहूंच नये !
वदनाला चंद्राची उपमा देणे आता काही आल्हाददायक वाटत नाही, अतिपरिचयाद. पण हासणें, तेही चंद्रकोरीप्रमाणें कोवळें यात एक नवी सुचना द्यावयाची आहे. चंद्राचे किरण कोवळेंच, पण चंद्रकोर म्हणण्यात त्या चंद्राचे उमलते वय दाखवले आहे. नायिका नवयौवनसंपन्न आहे हे अगदी सुरवातीपासूनच सुचवावयाचे आहे; सांगावयाचे नाही. पारिजातकाचा नैसर्गिक रंग,आहे-नाहीसे काजळ, रंग सावळा असला तरी तळहातांचा अशोकपल्लवीचा बसंती रंग (नाही, मी चुकलेलो नाही, करपल्लवी व अशोकपल्लवी सारखीच नाजुक आहेत), दक्ष वक्ष, सारे सारे तेथेच लक्ष वेधत आहेत. पण तरीही खरी गम्मत पुढच्या विशेषणात आहे. सावध. ती अल्लड/अजाण आहे, म्हणूनच सावध आहे. खैर. उद्या तीही "जाणती" होणार आहेच पण आजघडीला तरी ती "सावध" आहे.
दुसर्या कडव्यात कवी तिला काही सुचना करत आहे, काही प्रश्न स्वत:ला विचारत आहे. अभिसारासाठी वेष धुसरच पाहिजे, तिला माहित नसेल म्हणून सल्ला व त्या बरोबरच जरा झगमग असली तरी चालेल ही सवलत. तर हा पारवा "घुमा" आहे, त्याचे पंख फुलवावयाचे असतील तर मनातील वादळी हवेला , सैरभैर वाटांना थोडा आवर घालावयास पाहिजे हे स्वत:लाच बजावत आहे.
ही दोन कडवी झाली अभिजात संस्कृतची पडछाया. तिसरे कडवे मात्र खास मर्हाटमोळी आहे. कळी मुग्ध आहे, प्रणयसुगंध तिला अजून माहित नाही आणि कोणीतरी जाणकार "आत्याबाई" तिच्यावर नजर ठेऊन असणार हे सर्व कवी जाणून आहे .तरीहि "तारुण्यसुलभ" बोभाटा होणार आहे याची त्याला खात्री आहे. म्हणूनच तो मोठ्या मानभावीपणाने तिला सल्ला देत आहे, " जाऊं दे, दान देतांना कसला विचार करतेस ? पुण्य अक्षय असले तरी अशा क्षणासाठीच त्याचा विनियोग करावयाचा असतो." पहा. या कडव्यात लावणीकाराला साजावे असे रोखठोक सल्ले ( व कठोर वर्णही ) आले आहेत !
१९६२ च्या " अकरावी दिशा" या काव्यसंग्रहात ही कविता आहे. पण त्या आधीच कॉलेजमध्येच आम्हाला ती पाठ होती. आजही आहे, पण थोड्या फरकाने. दुसरी ओळ
"आहे-नाही असे काजळ पिऊन धुंदीत पापणीकांठ "
अशी म्हणत होतो व पुस्तकातही तसे लिहून ठेवले आहे. आता मासिकात (सत्यकथेत ?) ती तशी असावी कां ? आणि नंतर संग्रह करतांना बदलली गेली ? बापटांना विचारावयाचे राहून गेले. आपणास काय जास्त उचित (Fit) वाटते ?
शरद
प्रतिक्रिया
छान कविता
जंगी सहमत.. मला 'आहे-नाहीं
लावणी संस्कृतप्रचुर असु शकते....
उत्तान नसणारी
दक्ष वक्ष
वशीकरण
मस्त रसग्रहण
अकरावी दिशा
आहे-नाही असे काजळ पिऊन धुंदीत
आहे-नाही असे काजळ पिऊन धुंदीत पापणीकांठहे जास्त योग्य वाटते आहे.. कारण, सये.. काजळ नाजुकसे लावलेस तू, ते काजळ जणू तुझ्या पाणीदार डोळ्यांनी पिऊन ते पापणी काठ धुंदीत आहेत असा अर्थ होतो. मला हाच आवडला. ----------==आहे-नाहीं असें पापणीकांठाला लागले काजळबोटयात ही जरी तसाच अर्थ असला तरी काजळ पिऊन धुंद असणारे पाणी दार डोळे यातून व्यक्त होत नाहीत. फक्त थोडेसे काजळ लागलेल्या पापण्या तुझ्या असेच सांगितले जाते. म्हणून आधी सांगितलेली ओळ, जी तुम्ही आधी म्हणत होता तीच या काव्याची जास्त शोभा वाढवते.. काहींना रोख ठोक काव्य आवडते त्यांना दुसरी ओळ जास्त आवडू शकते.. कविता भारीच.