मामाचा वाडा चिरेबंदी
गोमू माहेरला आली हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
असं गाणं लहानपणापासून ऐकलं होतं. माझ्या आजीचं (आईच्या आईचं) गाव राजापूर. आईच्या वडलांचं गाव वेरळ. त्यामुळे मी आणि माझे आईवडील हाडाचे मुंबईकर असले तरी भावविश्वात कोकण यायचंच. कधी आईच्या मामाने आणलेला फणस, तर कधी मला न आवडणारं कुळथाचं पिठलं. लग्नकार्याच्या वेळी एकत्र जमलेल्या लोकांकडून ऐकलेल्या गप्पा, होणाऱ्या अतिशय जवळिकीच्या ( पक्षी खोदून खोदून होणाऱ्या - पैसे किती मिळतात, इतकी वर्षं झाली तरी मूल का नाही वगैरे) चौकशा व भुताखेतांच्या गोष्टी - इतपतच कोकणाची माहिती. त्यात कल्पनाविश्वात भर म्हणजे गारंबीचा बापू, पुलंचा अंतू बर्वा वगैरे. पण कोकणात जायची वेळ शाळेच्या गणपतीपुळ्याच्या ट्रिपपलिकडे कधी आली नव्हती. आई काही वेळा जाऊन आलेली आहे, पण त्यावेळी मी एकतर अभ्यासात मग्न होतो, किंवा अमेरिकेत होतो. तिला तिच्या घोवाला कोकण दाखवण्याची खूप इच्छा होती, पण प्रवास (तोही सासुरवाडी) या कल्पनेचाच तिटकारा असल्यामुळे ते कधी कोकणात गेले नाहीत. तिच्या सुदैवाने माझ्या बाबतीत, इतक्या उशीराने का होईना, पण तो योग या भारतवारीत जुळून आला. काही वर्षांपूर्वी माझ्या मामाने दापोलीला घर बांधलं. (मामा प्रत्यक्ष दापोली शहरात राहात नाही, अडीच किलोमीटरवर असलेल्या 'सबर्ब'मध्ये राहातो. त्या गावाचं नाव जालगाव .) तो मला नेहेमी म्हणायचा की एकदा येऊन जा. पण भारताच्या छोट्या ट्रिप्समध्ये सगळ्यांचंच दापोलीला जाणं जमलं नव्हतं. यावेळी मामा मामी जाणार होते, तर मीही जायचं ठरवलं.
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया म्हणत झुकझुक आगीनगाडीने जाण्याचा काही योग नव्हता. प्रवास पुण्याहूनच सुरू होणार असल्यामुळे पर्याय फक्त बसचाच होता. बरेच लोक असते तर कार करून जाणं सोयीचं ठरतं, पण तिघेच जण जायचे असल्यामुळे आम्ही एस्टीनेच जायचं ठरवलं. त्यात तारखा बदलत राह्यल्यामुळे आयत्या वेळी जाऊन रिझर्व्हेशन केलं. त्यामुळे निमआराम बशींमधल्या जागा संपल्या होत्या. मग आम्ही साध्या लाल डबा एस्टीने गेलो. हाही अनुभव खूप वर्षांनी घ्यायची संधी मिळाली.
पोचलो तेव्हा मध्यरात्र होऊन गेली होती त्यामुळे कोकणाचं पहिलं दर्शन झालं ते सकाळीच. पहिलं चित्र उभं राहिलं ते लाल माती, चिऱ्यांचं बांधकाम,निळं आकाश आणि हिरवीगर्द झाडी.
मामाच्या घराचे वास्तुशांतीचे फोटो वगैरे बघितले होते, पण त्यावेळी ते काहीसं ओकंबोकं होतं. आता चारही बाजूंनी गर्द झाडं - आंबे, चिकू, आवळा, पेरू, जास्वंद आणि इतरही कितीतरी - बघून मन प्रसन्न झालं. त्यांच्या दारात दोन बुटकेसे सिंगापुरी नारळदेखील आहेत. मामाचं घर खरोखरच चिरेबंदी आहे, पण वरून सिमेंट/प्लास्टर लावून गुळगुळीत केलेलं आहे. आणि सुखाच्या कल्पनेतलं अल्टिमेट म्हणजे झोपाळा आहे.
एकंदरीत तीन दिवसांचं वास्तव्य असल्यामुळे कुठे खूप हिंडण्याचा बेत नव्हता. आसपासच्या एकदोन गावांमध्ये जाऊन यायचं, भरपूर आंबे वगैरे खायचे, आराम करायचा आणि एकंदरीत कोकणाचा फील घ्यायचा असा बेत होता. मामाची बायको सुगरण, म्हणून मामीने खायची प्यायची चंगळ केली होती. त्यामुळे त्याही आघाडीवर चैनच होती.
पहिला दिवस आराम केला. संध्याकाळी सहज बाहेर फिरायला निघालो. हवेत पावसाचे वेध होते. बाजूला सर्वत्र हिरवळ होती. आणि रस्त्याच्या कडेला करवंदाची जाळी होती. मुठीमुठीने करवंदं तोडून चालता चालता खायला मजा आली. दुसऱ्या दिवशी आंबरस पोळीचं जेवण हाणून अंमळ झोप काढल्यानंतर आम्ही मुरुडला गेलो. मुरुड हे अण्णासाहेब कर्व्यांचं गाव. तिथे त्यांचं स्मारक आहे, व राहात्या वास्तूत त्यांच्या जुन्या छायाचित्रांचा संग्रह आहे. मुरुडचा समुद्रकिनारा हा आजकाल पर्यटकांसाठी खूपच आकर्षक ठरलेला आहे. गावात जागोजागी कोकणच्या मेव्याच्या, रिसॉर्ट्सच्या, पॅरासेलिंगच्या, जाहिराती दिसतात. 'कृपया किनारा स्वच्छ ठेवावा' अशी आवाहनं व त्याकडे पूर्णपणे केलेलं दुर्लक्षही दिसलं. "एकंदरीत कोकणातले लोकही आजकाल पैसे करायला शिकायला लागले आहेत" मामा म्हणाला, "असंच चाललं तर लवकरच कोकणचा कॅलिफोर्निया होईल!” मुंबईत जन्म काढूनही मामा आपली कोकणी मुळं विसरलेला नाही. मुरुडच्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही आसूद गावाला निघालो.
आसूद गावाविषयी लिहावं तितकंच थोडं आहे. पेंडसे इथेच राहायचे . बापूची गारंबी हीच. बापूने घेतलेल्या पोफळीच्या बागा दिसतात. राधाबाई भजी तळत बसलेली असे ते ठिकाण बघायला मिळतं. विठोबाला ज्या पुलावरून ढकलून दिला तो पूलही तिथेच आहे. गाव बघितलं की अक्षरश: प्रेमात पडायला होतं. या गावात कादंबरी घडलीच पाहिजे असं वाटतं. एव्हाना मी कोकणाच्या हिरव्या गारव्याला सरावलो होतो. पण आसूद गावात दाबके वाडीत शिरलो आणि इथे माणसं राहातात यावर विश्वासच बसला नाही. आत्तापर्यंत मला इतकी वनराई केवळ ट्रेकला जाताना किंवा नॅशनल पार्क्समध्ये वगैरे जपून ठेवलेली दिसली आहे. हिरव्याकंच झाडांमधून मध्येच घरं उगवलेली, डोंगराच्या चढउताराबरोबर त्याला बिलगून बसलेली. दुर्दैवाने माझ्याकडचा कॅमेरा अतिशयच साधासुधा होता त्यामुळे ती हिरवाई पुरेशा परिणामकारकपणे पकडता आली नाही. पण ही 'गगनचुंबी' झाडं दिसली...त्यांमागच्या गर्द वनराजीने एकंदरीत गावाची कल्पना येते.
आसूदला केशवराजाचं दर्शन घ्यायचं म्हणजे एक दिव्यच आहे. गावातून शंभर एक पायऱ्या उतरायच्या. त्यापुढे पुलावरून जायचं. आणि मग दोनेकशे पायऱ्या चढून डोंगरावर केशवराजाचं मंदीर आहे.
इतके कष्ट घेऊन दर्शनाला जायचं म्हणजे श्रद्धा जबरच असली पाहिजे. मी भारतात आल्यापासून अबरचबर खाण्याची जी पापं केली ती केशवराजाच्या पायाशी जाईपर्यंतच फिटली असावी. कोकणातले लोक काटक आणि बारीक असतात ते काही उगीच नाही. मासे खायचे, भात ढिगल्यांनी रिचवायचा आणि असले डोंगर चढायचे- उतरायचे. कशाला होताहेत रक्तदाब, मधुमेहासारखी शहरी घरबशी दुखणी!
देवळात पोचल्यावर सगळ्या कष्टांचं सार्थक होतं. इतका रम्य परिसर, वातावरणावरच हिरवीगार शांतता पसरवणारी झाडं, गोमुखातून पडणारी पाण्याची धार.
बाजूलाच भिंतीतलं गवाक्ष बुजवून अभावितपणे तयार झालेला गणपती सदृश आकार.
पंधरा मिनिटं नुसतं शांत बसलं तरी सगळे ताण निघून जातात. कोकणात मी तीन देवळं बघितली - तिन्हींचा जीर्णोद्धार होऊन गुळगुळीत गिलाव्याचे खांब, खाली चांगली छान फरशी व रंगरंगोटी केलेली दिसली. आसपास जुन्या चिऱ्याच्या बांधकामाचे अवशेष आहेत. गिलावा आणि फरशा सोयीचे असले तरी ते चिऱ्याचं काळं पडलेलं बांधकाम भक्कम, खानदानी व्यक्तिमत्व असलेलं वाटतं. या दोन्हीचा ताळमेळ दुर्दैवाने चांगला घातलेला नाही, त्यामुळे ती आधुनिक व पुरातन अशी विसंगती डोळ्याला खुपल्यावाचून राहात नाही.
एकंदरीत मामाशी बोलताना, आता खूप लोक मुंबईतून कोकणात परत येताना किंवा निदान गुंतवणुक म्हणून घर घेताना दिसतात असं जाणवलं. दापोलीच्या जवळच काही उच्चवर्गीय वस्त्या, नव्या डेव्हलपमेंटा दिसतात. लाल मातीवर मानवी प्रगतीच्या पाऊलखुणा...
आधुनिक, शहरी दिसणाऱ्या सोसायट्यांमध्ये स्क्वेअर फुटाला 1600 वगैरे भाव ऐकून थोडं दडपल्यासारखं झालं. दापोलीच्या जवळच चिखली आहे - टिळकांचा जन्म झाला ते गाव. दाभोळ फार अंतरावर नाही - तिथून एनरॉनचा प्रकल्प दिसतो . पण ही गावं बघायला जमलं नाही.
मामाच्या गावात आणखीन काही गोष्टी नजरेला आल्या. त्यांच्या सोसायटीत बौद्ध व हिंदू राहातात. बौद्धांचं प्रमाण बहुधा अधिक आहे. मुळात ते अधोरेखित होऊ नये म्हणून हिंदूंनी त्या भागाला श्रीरामनगर असं नाव दिलं होतं. आम्ही गेलो तेव्हा बौद्ध समाजाने नुकतीच मोठी दगडी कमान बांधून मोठ्या अक्षरात 'आंबेडकर नगर' असं लिहिलं होतं. ते मामाला तितकंसं पसंत पडलं नसावं असं वाटलं. अर्थात तो बऱ्यापैकी उदारमतवादी असल्यामुळे व मुळात तिथे फार राहात नसल्यामुळे त्याची मतं तीव्र नव्हती. दुसरी याच संदर्भातली गोष्ट म्हणजे दापोली भागात मुस्लीम वस्ती भरपूर आहे. पण आसपासच्या काही सोसायट्यांमध्ये मात्र मुस्लिमांना घर विकलं जाऊ नये असा अलिखित नियम आहे असं ऐकिवात आलं. असे विचारप्रवाह पुण्यातल्या काही भागातही ऐकलेले आहेत. सेपरेट बट इक्वल ची परिस्थिती भारतात चालू आहे एकंदरीत.
अरे हो, तिथे गेलेलो असताना अनपेक्षित रीतीने आमचे जुने शिक्षक भेटले. पण त्या भेटीचं वर्णन स्वतंत्रच व्हायला हवं.
प्रतिक्रिया
वाह!
मस्तच !
छान
+२
+३
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तुमची आजी
१२-१३
घासकडवी
रिझर्वेशन
तर कधी मला
मस्त
कोकणसफर
तात्या म्हणतो ते अगदी खरं आहे बॉ.
-१
कुळथाचं
वावा..
छानच.
लाल माती,
खासच लेख रे राजेश!
सही
सुंदर.... घरच
फोटोसहितच
लेख आवडला
हे बघा गणपती
चला ,
(विषय दिलेला नाही)
गूड वन...
या हिशेबाने
+१
कोकणातले दिवस
फेरफटका
कोकणसफर
कोकणसफरीन
लेख आणि
अतिशय
ने मज्सि ने परत मत्रुभुमिला
ने मज्सि ने परत मत्रुभुमिला
छान