Skip to main content

दाता इतना दिजे....

दाता इतना दिजे....

लेखक रामदास
Published on गुरुवार, 03/06/2010
अनमोल रत्नांना स्वतःचा असा खास इतिहास असतो. मार्क अँटनीचा आताच कुठेतरी उल्लेख झालासा वाटला आणि एक संदर्भ आठवला एका ओपल रत्नाचा. नॉनीयस नावाच्या एका सिनेटर कडे हे ओपल होते. ओपल म्हणजे हिरा नव्हे.ओपलची गणना उपरत्नामध्ये होते.फारसे दुर्मीळ नसणारे रत्न आहे. पण रत्नाची किंमत ठरते आपल्याला हवे असणे आणि आपल्याकडे नसणे यावर . मार्क अँटनीने नॉनीयस कडे ते रत्न मागीतले .नॉनीयसने नकार दिला. या नकारासाठी त्याला वनवासाची शिक्षा मिळाली ती त्यानी स्विकारली पण ओपल देण्यास नकार दिला. ******************************************************* रत्नांना आणि दागीन्यांना एक अंगभूत सवय असते नाहीसे किंवा गहाळ होण्याची. ब्राऊन प्रिन्सशी लग्न करण्याची फॅशन युरोपात अठराशे अठ्ठावन नंतर आली आणि भारतीय राजेरजवाड्यातून रत्ने आणि दागीन्यांना गहाळ होण्याची सवयच लागली.तोपर्यंत गोर्‍या मडमांचे हितरक्षण करण्यासाठी मॅरीड वुमन्स प्रॉपर्टी अ‍ॅक्ट (१८७४)पण आला होता.त्यामुळे देसी राजांच्या गोर्‍या बायकांनी चोरी केली तरी त्याला चोरी म्हणणे शक्य नव्हते. अशीच एक कथा आहे पतीयाळाच्या शिरपेचाची. पतीयाळाच्या महाराजांचा राज्यारोहण समारंभाच खास शिरपेच अचानाक खजीन्यातून नाहीस झाला. दोन वर्षांनी तो सापडला लंडनच्या एका पेढीवर. तपास केल्यावर कळले की महाराजांच्या गोर्‍या विलायती मड्डमेचे ते प्रताप होते.पतीयाळा संस्थानाचा खजीना म्हणजे कुबेराचे भांडारच. अठराशे सत्तावन्नच्या उठावात जे सहभागी झाले नाहीत त्यांचे खजीने भरभरूनवाहत होते. शिखांनी या लढ्यात भाग घेतला नव्हता.त्यामुळे पतीयाळाच खजीना अबाधीत राहीला होता. पतीयाळाच्या नेकलेसची तर एक आणखी एक कथा आहे.जकेस कार्टीयेनी १९२८ साली बनवलेल्या या हारात मुख्य नग होता एक हिरा दोनशे चौतीस कॅरेटचा.प्लॅटीनमच्या गोफात गुंफलेल्या या हारात दोन मोठी ब्रह्मदेशी माणकं आणि लहान मोठे हजार कॅरेट वजनाचे जवळजवळ दोन हजार नऊशे छोटे मोठे हिरे होते. हा हार पण अचानक नाहीसा झाला .एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली लंडनच्या एका जुन्या दागीन्यांच्या व्यापाराकडे सापडला.तोपर्यंत या हारातले मोठे हिरे गायब झाले होते. विकेड विमेन ऑफ द राज या पुस्तकात अशी बरीच उदाहरणे आहेत. परंतू सगळेच राजे असे बेजबाबदार नव्हते.ग्वालीयरच्या (ग्वाल्हेर) च्या खजीन्याची एक वेगळीच कथा आहे .ती नंतर कधीतरी . ********************************************************** आधी एक छोटी कथा वाचा शिवबहादूर सिंग या लोकसभा खासदाराची. शिवबहादूर सिंग मध्यप्रदेशातल्या रेवा संस्थानाचे जहागीरदार. त्यांच्या जहागीरीचे नाव आहे चुरहाट. १९४९ साली हे गृहस्थ नेहरूंच्या मंत्री मंडळात मंत्री होते. त्याच साली पन्ना डायमंड सिंडीकेट या कंपनीने त्यांना लिज वाढवून देण्याची विनंती केली .त्यावेळी रेवा विंध्यप्रदेशात होतं नंतर मध्यप्रदेशात विलीन झालं .पाठीमागच्या तारखेपासून सही करण्यासाठी त्यांनी लाच मागीतली .रक्कम होती पंचवीस हजार रुपये.या सज्जनांना ही रक्कम म्हणजे हाताचा मळ होता. आसक्ती मोहाचे फूला. नगीनदास मेहता या पन्ना डायमंड सिंडीकेटच्या मालकाने लाच देण्यासाठी होकार दिला. दिल्लीच्या कँस्टीट्युशन हाउस मध्ये लाच दिली गेली आणि शिवबहादूर सिंग ट्रॅपमध्ये अडकले. सुरुवातीला स्पेशल कोर्टाने त्यांना मुक्त केलं. सरकार अपीलात गेलं. निकाल सरकारच्या बाजूने लागला. शिवनारायण सिंग यांनी सुप्रीम कोर्टात अपील केलं . या अपीलात त्यांना लावलेल्या कलमांविषयी त्यांनी नकार दिला नव्हता . त्यांचा आग्रह असा होता की विषेश न्यायालयाला ही केस चालवण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिक्षा रद्द व्हावी.सुप्रीम कोर्टाने त्यांची शिक्षा कायम केली. तीन वर्षाची शिक्षा भोगताना तुरुंगातच त्यांना मृत्यु आला. ही कथा आहे अर्जुन सिंगांच्या तिर्थरुपांची. हे तेच अर्जुन सिंग जे गेल्या लोकसभेत मनुष्यबळ मंत्री होते . अशी ही एक कथा लोकशाहीच्या कारभारातली. ************************************************************** हे सगळं वाचलं की वाटतं बरंय काही नाहीय्ये आपल्याजवळ. नको तो पतीयाळाचा खजीना . जोपर्यंत दोन पटीयालात संध्याकाळी स्वर्ग उभा राहतो आहे तो पर्यंत खजीन्याची काही गरज नाही आपल्याला. (एक चपटी -दोन पापड -चार शिगरेटी -आणि पाणी असाही एक फॉर्म्युला आहे.) कबीरानी लिहीलेला एक दोहा रोज रात्री मी वाचतो. दाता इतना दिजे ।जामे कुटुम समाय मै भी भूखा न रहू । साधू न भूखा जाय. एक छोटासा बदल मी केलाय तो एव्हढाच की मै भी भूखा न रहू । साधू ना प्यासा जाय. *******************************************************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 19117
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

रामदासांचं हे वेगळ्याच धर्तीचे लेखन जाम आवडून गेले बॉ आपल्याला! :) (प्यासा साधू)चतुरंग

लेख आणि कबीराचा दोहा दोन्ही भारी. -अनामिक

In reply to by अनामिक

>>>लेख आणि कबीराचा दोहा दोन्ही भारी. -दिलीप बिरुटे

भारी लेख......संपादक पद मानवलं दिसतय काकांना... ;) (दाता) प्रभो

अर्जुनसिंग यांच्या वडलांना अटक झाली होती हे माहीत होते नेमकी केस आठवत नव्हती. खजिन्याचे रहस्य हि संस्थानिकांवरची लेखमाला होउन जाउ दे :-) लेख सहीच!

In reply to by सहज

खजिन्याचे रहस्य हि संस्थानिकांवरची लेखमाला होउन जाउ दे असेच म्हणते.

In reply to by चित्रा

----- सौरभ रामदासी :)

सर्वप्रथम चित्रावैनींचे धन्यवाद. त्यांच्या रत्नलेखाने रामदासांना (पुन्हा) लिहिते केले म्हणून. लेखन आवडले. पण, (एक चपटी -दोन पापड -चार शिगरेटी -आणि पाणी असाही एक फॉर्म्युला आहे.) ह्यातले "असाही" खटकले. त्याऐवजी "असाच" हवे. हल्ली उकडलेले शेंगदाणे वगैरे कैच्याकैच देतात. ते चूक आहे. चांगले भरमसाठ मिरे वगैरे असलेले दोन पापड हवेत. (आणि हो, तळलेले नाही. भाजलेले.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

पण रामदास तसे लिहीतच होते.. त्यामुळे विनयपूर्वक श्रेयअव्हेर करते. पण तुम्हाला लिहीते करायला कोणता लेख टाकू? - असा विचार करते आहे.

In reply to by चित्रा

पण तुम्हाला लिहीते करायला कोणता लेख टाकू? - असा विचार करते आहे. वैनी, एक शिंपल सजेश्चन आहे. हे एन्व्हायरनमेंट प्रोटेक्शन वाले लोक मूलभूत विज्ञान किंवा अर्थशास्त्र विचारात का घेत नाहीत, असा काहीतरी विषय टाका. पाणी पुरवठ्याची किंमत अंमळ जास्त का, आणि हेल्थकेअर (वैद्यकीय सेवा) पेक्षा पाणी पुरवठ्याची यंत्रणा कालापेक्षा मागे का, ह्यावर भर द्या. मग आम्हीही लिहिते होऊ. (हो, आणि अ‍ॅल गोअर आणि टिपर चा घटस्फोट का झाला, ह्याची कारणमिमांसा केल्यास अधिक गुण ;-) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

बाकीचे माहिती नाही, पण अ‍ॅल आणि टिपरच्या आनंदावर बहुदा कोणीतरी विरजण घातले असावे हे नक्की! ;)

In reply to by मिसळभोक्ता

ह्यातले "असाही" खटकले. त्याऐवजी "असाच" हवे. हल्ली उकडलेले शेंगदाणे वगैरे कैच्याकैच देतात. ते चूक आहे. चांगले भरमसाठ मिरे वगैरे असलेले दोन पापड हवेत. (आणि हो, तळलेले नाही. भाजलेले.) सपशेल सहमत आहे. कुवतीनुसार दोन पटियालामध्येही स्वर्ग उभा राहू शकतो. रामदासकाका, लेखन आवडले. तुमच्या लेखनाने मिसळभोक्त्याशी सहमतीचे प्रमाण वाढते आहे, हीच काहीशी चिंतेची बाब आहे. सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह

In reply to by सन्जोप राव

तुमच्या लेखनाने मिसळभोक्त्याशी सहमतीचे प्रमाण वाढते आहे, हीच काहीशी चिंतेची बाब आहे. हा हा हा... चिंतेची बाब कुणासाठी ? तुमच्यासाठी, की इतर मिपाकरांसाठी ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

फक्त पुरुष ए वेदम आणि पुरुख ए वेदम एव्हढाच आहे.

In reply to by मिसळभोक्ता

सर्वप्रथम चित्रावैनींचे धन्यवाद. त्यांच्या रत्नलेखाने रामदासांना (पुन्हा) लिहिते केले म्हणून. सहमत.

रामदासांच्या लेखनाला कोणताही विषय वर्ज्य नाही. हे लेखन वेगळे वाटले, आवडले. रेवती

लेख आवडला... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

मस्त नवीन माहिती,... आणि खासदारसाहेबांना आपल्यावरील आरोप मान्य होते , पण कोर्टाला पावर नाय हे त्यांचे मत वाचूनही गंमत वाटली...

जय जय रघुवीर समर्थ!!!

यावेळेस नेहमीसारखी भारी वाटला नाही लेख. आजोबांनी नातवंडांना सांगितलेल्या गोष्टीसारखा वाटला.

रामदासकाकांचा हा ही लेख आवडला.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

शिंदे संस्थानातील खजिन्याची माहिती द्या. बाकी लेख अप्रतिम

मस्त माहीती! ग्वाल्हेरच्या खजिन्याची गोष्ट पण वाचायला आवडेल. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

>>>एक चपटी -दोन पापड -चार शिगरेटी -आणि पाणी असाही एक फॉर्म्युला आहे. तेज्यायला यका चपटीन क व्हतय र ? आक्का खंबा न ईडी बंडल. पापड नसन त मीट बी चालतय बोल. जर टाईट व्हाचा नसल तर पीवाची कनाला र? बाकी दोन पॅक मारुन लीवलेल यकदम जोरदार होतय बोल. जल्ला यकदम कडक लीवलस. मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

क्या बात है. रामदास काका मस्त लेख. अगदी 'जैशी हरळामाजी रत्नकिळा | कीं रत्नामाजी हिरा निळा' या दर्जाचा. बाकी खुद्द अर्जुनसिंगही चुरहाट लॉटरी प्रकरणातही अडकले होते. थोडक्यात बेईमानीचा वारसा त्यांच्या तीर्थरूपांपासून त्यांना मिळाला होता, असे म्हणायला हरकत नाही. (भोचक) जाणे अज मी अजर

मै भी भूखा न रहू । साधू ना प्यासा जाय. अलख निरंजन!!!!! भिक्षा दे दो भाय!!!! :)

ही कथा आहे अर्जुन सिंगांच्या तिर्थरुपांची. गोडावूनमेही गडबड है तो शोरूम तो ऐसाही निकलेगा ना!!!

लेख मस्त आणि अनेक प्रतिक्रियाही! अदिती

मस्त लेख. अजून लिहा. बिपिन कार्यकर्ते

ती जयपूरच्या (अंबरच्या) खजिन्याची आणि इंदिरा गांधींची काय भानगड होती हो? तिथले गाईडसुद्धा सांगत असतात की आणिबाणीत पोलिसपहार्‍यात बाईंनी सगळा खजिना साफ केला आणि सहा ट्रक भरून बिल्ली दिल्ली को रवाना हो गई. बाकी रामदासकाका भारी लिहितात असे म्हणणे म्हणजे लता मंगेशकर छानच गातात असे म्हणण्यासारखे आहे.

शिंपिणीचे घरटे, धातू वगैरे लिहिणार्‍या लेखणीकडून अधिक अपेक्षा होत्या.