Skip to main content

सोन्याच्या धुराचे ठसके: जरूर वाचावे असे काही

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 09/05/2010 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच डॉ. उज्वला दळवी यांचे 'सोन्याच्या धुराचे ठसके: पाव शतकी सौदी अनुभव' (प्रकाशकः ग्रंथाली) हे अप्रतिम पुस्तक वाचून खाली ठेवले आणि मिपाकडे धाव घेतली. वाटले, हे पुस्तक सर्व मराठी वाचकांनी आवर्जुन वाचलेच पाहिजे इतके सुंदर आहे. लेखिकेची लेखनशैली अतिशय ओघवती अन मिष्किल आहे; वाचक गालातल्या गालात हसत राहतो, कधी अचंबित होतो तर कधी मन विदिर्ण होतं; विशेषतः सौदीतली स्त्रियांची अवस्था वाचतांना.. स्वतः लेखिका एम्.डी मेडिसिन असून आपल्या पतिंसमवेत त्या सौदीमध्ये अजूनही वैद्यकिय सेवा देत आहेत. पुस्तक वाचतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते ती म्हणजे लेखिकेचे अफाट वाचन आणि मराठीवरचे प्रभूत्व! लेखिका डॉक्टर असल्याने त्यांना सौदींच्या समाजजीवनात डोकावून पाहाता आले, व्यक्तिगत बाबीसुद्धा निरखता आल्या. हे पुस्तक म्हणजे एका सामान्य मराठी माणसाच्या दृष्टीला सामोरे आलेल्या अनेको प्रकारच्या विसंगती, अडचणी, किचकट कायदे, पराकोटीची धार्मिकता, पुरूषप्रधान अरबी संस्कृती, त्यांच्या खाण्याच्या (आपल्या दृष्टीने विचित्रच) सवयी ह्या सगळ्याचे भन्नाट निरिक्षण आहे. जास्त लिहित नाही कारण मला आता ते पुस्तक दुसर्‍यांदा वाचायला घ्यायचे आहे! सध्या अनेक डॉक्टर्स लिहिते झाले आहेत ही मराठी साहित्याच्या दृष्टीने एक आनंदाची अन कौतूकाची बाब आहे. गेल्या काही दिवसांत डॉक्टरांनी लिहिलेली खूप सुंदर पुस्तके वाचायला मिळाली उदा. आणखी दोन हात- डॉ. श्रीखंडे, बिहाईंड दी मास्क- डॉ. सुभाष मुंजे इ. त्यात आणखी एका नितांतसुंदर पुस्तकाची भर पडली आहे.. जरूर वाचावे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12365
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

पुस्तक परिचय वाचून पुस्तक वाचण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. धन्यवाद. सन्जोप राव किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है

नोंद केली आहे.. माहितीबद्दल धन्यवाद... _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

एकदा याच पुस्तकाबद्दल बहुतेक लोकसत्तात वाचले होते...आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद...जरून वाचेन. http://shilpasview.blogspot.com/

या बाई या वेळच्या साहित्य सम्मेलनात निमन्त्रीत होत्या. आमच्या कडुन ही आमचे भावे काका निमन्त्रीत होते. परत आल्यवर त्यान्नी या पुस्तकाबद्दल आणि लेखिकेबद्दल छान उल्लेख केला होता. विषेशतः त्यान्च्या एका रुग्ण मैत्रीणीन यान्च्या प्रेमात पडुन तुझ्या यजमान्नाना मला सवत करुन घ्ययला सन्ग म्हणुन केलेली विनन्ती. सवत आवडली म्हणुन वाट्टेल तसला नवरा तिल चालला असता. नाव किती सुन्दर निवडलय पुस्तकाला. या छोट्याश्या ओळखी बद्दल धन्यवाद!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

नमस्कार, जास्त लिहित नाही कारण मला आता ते पुस्तक दुसर्‍यांदा वाचायला घ्यायचे आहे! क्रुपया लेखिकेची माहीती द्यावी. मी सॉदी मध्येच आहे. पुस्तकावर त्यांचा ईमेल,फोन किंवा पत्ता असेल तर क्रुपया कळवावा. म्हणजे मला ओळख करून घेता येइल. तुमचे परिक्षण वाचून खुप उत्सुकता आहे. नाही तर सुट्टीत पुण्याला जाइ पर्यंत वाट पहावी लागेल. (साधारण आणखी तिन महीने) ग म भ न ची फारशी सवय नसल्यामुळे लिखाणात चु. भु. द्या. घ्या.

एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...

धन्यु डॉक्टर साहेब. नक्की वाचुन काढतो आता. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

ओळख. हे पुस्तक मिळवून वाचायला हवं आता. एका परिचिताने ह्या पुस्तकातील काही भाग लिहून पाठवला होता. तो येथे देत आहे. (यात कुठल्या कायद्याचे/नियमाचे उल्लंघन होत असल्यास, खालील परिच्छेद उडवले तरी हरकत नाही.) "या दक्तूर, अस्सलाम आलेकुम व श्लोनक? ये, ये, कॉफी प्यायला ये." हाजचा पवित्र महिना होता. आम्ही दोघं आमच्या चौदा वर्षांच्या लेकीला घेऊन जुबैलच्या समुद्रावर संध्याकाळी फिरायला गेलो होतो. किना-यावरच्या वाळूत गालिचा अंथरून, एक पंचावन्नचा ढोल्या बेदू कुटुंबकबिल्यासह मजेत गहवा पीत पहुडला होता. बायको, तीन वयात आलेल्या मुली, दोन लहान मुलगे, असं ते समस्त कुटुंब पेशंट म्हणून आम्हाला कधी ना कधी भेटलेलं होतं. त्यामुळे आम्हाला पाहिल्या पाहिल्या त्याने उठून कॉफी प्यायला बोलावलं. "श्लोनक"चं दळण दळून झालं. मग आम्ही कॉफी पीत, खजूर खात होतो. इकडचं तिकडचं बोलणं चाललं होतं. त्याच ओघात, अगदी सहजपणे तो म्हणाला, "या दक्तूर, ही कोण आहे तुझ्याबरोबर? तुझी मुलगी का? मला आवडली ती. देऊन टाक ती मला. तिचे किती पैसे घेशील तू? आणि तूसुद्धा आवडतोस मला. या माझ्या मुली. यांच्यातली कुठली तुला हवी तर बघ. जी आवडेल ती दिली तुला. काय म्हणतोस?" माझ्या घशात खजूराची बी अडकली. एका दमात तो दोन मागण्या घालून मोकळा झाला होता. हसावं का रडावं ते कळेना. पण आमच्या लेकीचे बाबा परिस्थिती सांभाळायला समर्थ होते. "मलाही अतिशय आवडले असतं. पण या माझ्या लेकीला गेल्याच महिन्यात माझ्या दुस-या एका मित्राने मागणी घातली आणि ठरलं ते लग्न. आता नाइलाज आहे. आणि माझं म्हणशील तर माझ्या बाकीच्या तीन बायका भारतात आहेत. त्यामुळे पाचवं लग्न कठीण जाईल मला. शिवाय तुझ्या मुलीलासुद्धा तसं आवडणार नाही." "असं म्हणतोस? मग कठीण आहे. बरं जाऊ दे. घ्या घ्या मामूल खाऊन तर बघा. माझ्या बायकोने केलेत." आम्ही निर्धास्तपणे तो खाऊ खाल्ला. रणरागिणी असलेल्या आमच्या लेकीने एरवी तिसरा डोळा उघडून त्या माणसाचं भस्मच केलं असतं. पण अरबीत झालेलं ते संभाषण तिला कळलच नव्हतं. त्यामुळे तिने तो खाऊ आम्हाला खाऊ दिला. त्या माणसाच्या, तिच्याच वयाच्या मुलींना हसून थॅंक यू सुद्धा म्हटलं. आम्ही बेदू असतो तर त्या बैठकीत ही दोन्ही लग्न सहज ठरली असती. तान्हं बाळ असल्यापासून अंगाखांद्यावर खेळलेली मित्राची मुलगी वयात आली की तिला स्वत:साठी मागणी घालणं इथे रास्तच असतं. इतकच नव्हे तर तो त्या मुलीच्या बापाचा बहुमान असतो. मुलगी दहा वर्षांची झाली की तिचं खेळणं, मोठ्यानं बोलणं, मान वर करून पुरुषांशी बोलणं, सा-यावर बंदी येते. आतापर्यंत चढला नसलाच तर आता तिच्या अंगावर अबाया म्हणजे बुरखा चढतोच. खास पदार्थ शिजले की पुरुष नोकरांनीसुद्धा ओरबाडून खाल्ल्यावर जे काही ताटात उरतं ते उष्टंच तिला खायला मिळतं. तिचं एकटीनं बाहेर जाणं बंद होतं. तिला कुठेही बाहेर जाताना बरोबर मुहर्रीम म्हणजे पाठीराखा लागतो. बाप, भाऊ, नवरा किंवा मुलगा यांच्यापैकीच एक जण पाठीराखा म्हणून जाऊ शकतो. डॉक्टर, नर्स, शिक्षिका किंवा कारकून या चारच व्यवसायात तिचा शिरकाव होऊ शकतो. पुरुषांना काही काम सांगणं, त्यांना सल्ला देणं याचा अधिकार तिला नसतो. तिला गाडी चालवता येत नाही. भारतीय उद्योगपती श्री विक्रमपत सिंघानिया जेव्हा त्यांच्या छोट्या विमानातून पृथ्वीप्रदक्षिणा करत होते, तेव्हा सौ. सिंघानिया त्यांच्या सावलीसारख्या जमिनीवरून त्यांच्या मागोमाग प्रवास करत होत्या. वॉकीटॉकीने दोघं सतत संपर्कात होते. प्रवासाचा मार्ग सौदी अरेबियात शिरला मात्र आणि त्यांचा हा सततचा संपर्क तुटला. बाईनं गाडी चालवणं हा सौदी अरेबियात गुन्हा असल्यामुळे देशाची सरहद्द ओलांडल्याबरोबर सौ. सिंघानियांच्या गाडीची किल्ली जप्त झाली होती. पंचविशीची, काळीसावळी पण रेखीव, उंचीपुरी, डौलदार आयेषा प्रकृतीने रसरशीत होती. ती झोकात इमर्जन्सीत शिरली. तिथल्या डॉक्टरांना म्हणाली, "मला उलटीत रक्त पडतं आहे कालपासून." "कालपासून? आणि तू आजपर्यंत घरी बसून काय केलंस? संडासला कसं होतं? त्याचा रंग कसा आहे?" "माझ्या केसांसारखा काळा." "कसली ऍस्प्रोसारखी गोळी घेतली होतीस का? किती रक्त पडतं वेळेला? पेलाभर? चमचाभर?" "साधारण अर्धा पेला. मला आत्ता उलटी येते आहे." नर्सने घाईघाईने तस्त तिच्यापुढे केलं. आयेषा रक्त ओकली. तिला भरती करून तात्काळ चाचण्या सुरू झाल्या. दुर्बिणीतून अन्ननलिका, जठर इत्यादींचा तपास रातोरात झाला. पुढच्या आठवडाभर यकृताच्या, रक्ताच्या गोठण्याच्या या आणि त्या ब-याच परीक्षा झाल्या. आयेषाची प्रकृती त्या सगळ्यात फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. शेवटी तिच्या कान-नाक-घशाचीसुद्धा तपासणी झाली. तब्येत ठणठणीत असल्याचा शिक्का बसला. "आयेषा, आज संध्याकाळी घरून कुणी आलं की सांग हं. आज तुला घरी जायचय." सकाळच्या राउंडमध्ये डॉक्टरांनी सांगितलं. दुपारी आयेषाला पुन्हा रक्ताची उलटी झाली. तिची पाठवणी लांबणीवर पडली. पुढचा महिनाभर आयेषाची रक्तगुळणी तिच्या पाठवणीशी पाठशिवणीचा खेळ खेळली. शेवटी सगळ्या डॉक्टरांची एकत्र मीटिंग होऊन या रहस्याबद्दल वादविवाद झाला. कुणालाही उलगडा होईना. मग तिला रियाधच्या मोठ्या हॉस्पिटलला धाडायचं ठरलं. तिथल्या ओपीडीची एक आठवड्यानंतरची तारीख मिळाली. पण त्या आठवड्यात आयेषाला रक्त पडले नाही. "मी आता घरी जाऊ का दक्तूर? आता बरी आहे मी." "अग, घरी गेल्यावर पुन्हा रक्त पडलं तर?" "नाही पडणार आता." "तुझ्या स्वप्नात येऊन सांगतं का तुला ते?" "ते सोडा ना. मला जाऊ दे. नाहीतर मी सही करून आपली आपणच निघून जाईन." तिने धमकावले. डॉक्टरांनी सायकायट्रिस्ट डॉ. करीमना ती घरी जाण्यापूर्वी एकदा तिच्याशी बोलायची विनंती केली. आयेषाने धरलेली गुपिताची गुळणी बाहेर काढण्याचं काम करीमबाबांना बरोब्बर जमलं. आयेषाच्या वडिलांनी तिचं लग्न एका म्हाता-याशी ठरवलं होतं. ते मोडावं म्हणून तिने हे नाटक महिनाभर चालू ठेवलं होतं. ती नखाने आपल्या नाकाचा घोणा फोडून तिथून वाहणारं रक्त पिऊन घेई. मग ते ओकून दाखवी. एकदोनदा ते पोटातच ठेवून त्याचा शेवटपर्यंतचा प्रवासही तिने पाहून घेतला होता. हॉस्पिटलमध्ये कान-नाक-घशाचा तपास सर्वात शेवट, जवळ जवळ आठवड्याने होई. तोवर नाकाची जखम भरलेली असे. तिच्याच शब्दात सांगायचं तर महिन्याभरात या प्रकरणाचा "दमदमा दम (रक्ताचा डंका)" गावभर दणाणला. त्या "लग्ना अजुनी लहान" असलेल्या म्हाता-याने असल्या "रोगट" मुलीला नकार दिला. त्याचा असा निक्काल लावल्यावरच या रक्तपिपासू वाघिणीने नखं कापली. दौला नावाची, पंधरासोळा वर्षाची एक देखणी मुलगी अशीच नेहेमी उगाचच भरती करा म्हणून हटून बसे. इमर्जन्सीच्या डॉक्टरांना मामा बनवून ऍडमिट होई आणि मग हजार सबबी सांगून घरी जाणं टाळत राही. अशीच एकदा ती घरी जायची टाळाटाळ करत बरेच दिवस वॉर्डात टिकून राहिली. तेव्हा मी ठरवलं, हिच्या नव-यालाच सांगावं, "ही धडधाकट आहे. हिला पुन्हा पुन्हा इथे आणू नका." साडेतीन वाजता तो नवरा आला, म्हणून मला फोन आला. मी तावातावाने गेले. तो नवरा माझ्यासमोर उभा राहिला. उकिरड्याच्या परिमळाने दरवळणारा, ढेरपोट्या, काळाकभिन्न, पंचाहत्तरीचा, डोळ्यात फूल पडलेला तो माणूस... त्याच्या चेहे-यावरचा तो रंगेल भाव... माझा आवेश माझ्या काळजाच्या पाण्यात कधी वाहून गेला ते मलाच कळलं नाही. "दौला बरीच आजारी आहे. तिला अजून इथेच राहावं लागेल," एवढच कसंबसं बोलले मी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

भीषण वास्तव! मला हे पुस्तक वाचवेल का नाही माहित नाही. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच म्हणतो! बाकी डॉक्टरांचे वाचन पाहून त्यांचा हेवा वाटतो. भेटूया रे एकदा लवकरच...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत!

In reply to by नंदन

या लोकाना आपला मनू (मनूस्म्रुति वाला...) कधी कोठे भेटला होता का? त्याचा सल्ला त्यान्नी फारच मनावर घेतलेला दिस्तोय ....

In reply to by नंदन

बाप रे! मी नाही वाचू शकत. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by नंदन

नंदन आणि दाढेसाहेब, धन्यवाद. वाचायलाच हवे. (कुणी येत्या उन्हाळ्यात भारतातून येणार असल्यास माझ्यासाठी आणावे ही नम्र विनंती.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

हे पुर्वीच वर्णन आहे का आत्त्ताही असच आहे ?

ह्या "सोन्याच्या धुराचे ठसके" बद्दल आता फारच उत्सुकता वाढलीये. उज्वला दळवी ह्या व्यक्तिमत्वाबद्दल आदरही नितांत वाढलाय :)

फारच सुंदर परिक्षण... शिवाय वाचकांची उत्सुकता किती जागृत झाली ही बाब प्रतिसादावरून अधोरेखीत होतेच.... आताच नित्याच्या स्थानिक विक्रेत्याला फोन करून पुस्तक नोंदविलेदेखील.... हा या संस्थाळाचा मोठा फायदा आहे असे मी मानतो.... अन्यथा हे पुस्तक नक्कीच वाचनातुन निसटले असते. "डॉक्टर" लेखकांची परंपरा माझ्या माहितीप्रमाणे प्रथम डॉ.अरुण लिमये यांनी सुरू केली आणि त्यामुळे असेल कदाचित... बर्‍याच डॉक्टर्सना त्यापासुन स्फूर्ती मिळाली असे म्हणावे लागेल. --------------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पुस्तकाचे परिक्षण सुरेख केले आहे. पुस्तक वाचायची खूपच उत्सुकता आहे. बघुया कधी जमते ते. अवांतरः डॉ.अरुण लिमये यांचे "क्लोरोफोर्म" हे पुस्तक गेली कित्येक वर्षे उपलब्ध नाही. पण माझ्याकडे त्याची झेरोक्समधील प्रत आहे. कुणाला हवे तर संपर्क करावा. अजून एक सुंदर पुस्तक सुचवावेसे वाटते. Complications: A Surgeon's Notes on an Imperfect Science by Atul Gawande

In reply to by उदय

ह्यांच्या पुस्तकाची आठवण केल्याबद्दल आभार. ह्याविषयीही बरेच वाचले आहे, आणि ते घेऊन वाचायचे मनात होते, राहून गेले होते. आता हा संदर्भ दिलात ते चांगले केलेत.

डॉक्टर साहेब पुस्तक परिचयाबद्दल आभार..! पुस्तकातील भाग डकवल्याबद्दल नंदनचेही आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेच म्हणतो... मदनबाण..... देशात जातीनिहाय जनगणना व्हावी -रामदास आठवले http://bit.ly/aP8kZG मला पडलेला प्रश्नः--- मुंबईत जर भय्या लोकांची संख्या जास्त आढळली तर मराठी लोकांना आरक्षण मिळणार का ?

In reply to by मदनबाण

हेच म्हणतो. --टुकुल

फारच सुंदर परिक्षण...नक्की वाचणार :) आणि पुस्तकातील काही भाग दिल्याबद्दल नंदन यांचेही आभार :) हा आणि एक दुवा *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता

सर्व वाचकांचे व प्रतिक्रिया नोंदविणार्‍या मिपाकरांचे आभार. परदेशीस्थित विशेषतः अरबी देशात वास्तव्याला असणार्‍या मराठी वाचकांनी तर आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे. एव्हढ्यात जर भारतभेट होणार नसेल तर त्यांनी इथून मागवून घ्यायला हरकत नाही पण वाचावेच! मला पुस्तक आवडल्यानंतर लेखकाशी संपर्क साधण्याची आवड आहे म्हणूनच मी प्रस्तूत पुस्तकाच्या लेखिका डॉ. उज्ज्वला दळवी यांना ई-मेल पाठविला व गंमत म्हणजे त्यांचे त्वरित उत्तरही आले. त्यांच्या पुढिल भारतभेटीत कदाचित प्रत्यक्ष भेटीचाही योग येण्याची शक्यता आहे. भाग्यवान, डॉ. प्रसाद दाढे

डॉ.प्रसाद दाढे साहेब, मी सौदिला राहतो अनि लेखिका डॉ. उज्ज्वला दळवी याचे बरोबर मरठी मडळ जुबैल चे प्रोग्रमला सहभागि होतो. जरदस्त वक्तिमत्व आहे . फारच सुंदर परिक्षण केले आहे. जुबैल ला मराठी लोक्स नौकरी साठी जरुर यावे. काहि शन्का असतिल तर सम्प्रक करा. जुबैल्कर.

स्त्रियांना फर्नीचरप्रमाणे वागवण्याच्या मध्ययुगीन पिळवणुकीला काही देशांमध्ये घटनात्मक पाठबळ आहे. यावरुन त्या देशांतील स्त्रियांच्या परवडीची थोडीफार कल्पना असतेच. पण ही परवड किती अमानुष व भीषण आहे हे नंदन यांनी दिलेल्या उतार्‍यांवरुन लक्षात आले. डॉ. दाढे आणि नंदन यांचे आभार.

डॉ. दाढे आणि नंदन यांनी करुन दिलेल्या पुस्तक परिचयानुसार हे पुस्तक निश्चितच वाचणार. मुत्सद्दि.

डॉ. दाढे आणि नंदन-जी यांना धन्यवाद. फारच झकास परीक्षण आहे. मी नक्कीच वाचेन व इंडोनेशियाच्या स्त्री-जीवनाशी तूलना करण्याचा प्रयत्न करेन. सामाजिक जीवनात तरी इथल्या बायका 'बिन्धास' असतात, पण त्यांच्या घरी, त्यांच्या समाजात कशा असतात हे थोडेसेच पाहिले आहे! जिलबा वापरणार्‍या स्त्रियांमध्ये वाढ जरूर आहे पण बरेच स्वातंत्र्य असावे असे वाटते (इंडोनेशिया हा लोकसंख्येनुसार जगातला एक नंबरचा मुस्लिम देश आहे.) पुस्तक वाचल्यावर आमच्या ऑफीसातील 'हाजी' आणि 'हज्जा' मंडळीना विचारून बघतो! हाजी बरेच आहेत पण हज्जाही (हजची यात्रा केलेल्या स्त्रिया) एक-दोन आहेत. ------------------------ सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत! 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.