Skip to main content

चैत्रोत्सव!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 08/04/2008 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत आल्याची वर्दी कोकिळकुहुने दिली आहेच.मिपावरही 'एप्रिलफळे' आणि 'लोणची' तेच सर्वांना सांगत आहेत. घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.असा चैत्रोत्सव साजरा होत असताना आंबे पिकल्याची चाहूल लागेल आणि मग आमरसपुरीच्या मेजवान्या झडतील. ह्या स्मरणरंजनात मग्न असतानाच लक्षात आले ,इथे सातासमुद्रापार मी आणि माझ्यासारखेच अनेक सुह्रद ह्यातल्या अनेक गोष्टी 'मिस' करत आहेत,असे असायचेच..त्याबद्दल तक्रार नाही पण मग वाटले 'आंब्याची डाळ' तरी मिपावर करुया...
आंब्याची डाळ
साहित्य- २वाट्या चण्याची डाळ, पाव ते अर्धी वाटीच्या मध्ये कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी जास्त करणे), ६/७हिरव्या मिरच्या,ओले खोबरे,कोथिंबिर,फोडणीचे साहित्य,तेल,मीठ,साखर कृती- चण्याची डाळ ४/५ तास भिजत घालावी.रोळीत उपसून घावी आणि पाणी पूर्ण निथळू द्यावे.डाळ मिक्सरवर थोडी भरडच वाटावी, वाटताना त्यात मिरच्याही घालाव्यात. ही वाटलेली डाळ+मिरच्या,कैरीचा कीस एकत्र करून त्यात ओले खोबरे,कोथिंबिर,चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालावी.तेलाची खमंग फोडणी करावी व ही फोडणी त्या मिश्रणावर ओतावी.चांगले कालवावे. सर्व्ह करताना खोबरे व कोथिंबिर वरुन घालून सजवावी. कैरी न मिळाल्यास लिंबू किवा आमचूर वापरू शकतो पण अर्थात ते आपले दुधाची तहान ताकावर..
Taxonomy upgrade extras

वाचने 8273
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

स्वातीताई झि॑दाबाद!
घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.
आणि आम्ही आईन॑ कितीही नको नको म्हणल॑ तरी हा हळदीकु॑कवाचा 'मेन्यु' ल॑पास करुन गच्चीवर जाऊन हादडत बसु !!!!

सोबत पन्ह्याची कृती पण टाकाच स्वातीताई :) (डाळपन्हेप्रेमी)बेसनलाडू

खरच्.मि पा वर वसन्तोत्सव चालु आहे..........

अजून आंब्याची डाळ,पन्हं आलं कसं नाही. लहानपणी हे सगळं आई जेव्हा करायची ना तेव्हा आम्ही त्यात मदत करत असू... त्याची आठवण यायला लागलेय. पण हाय.... गेले ते दिवस! असो. आपण सगळे करा मजा. आम्ही आठवणीतच रमतो. :)

वा स्वाती, आंब्याची डाळ मस्तच! पण पन्हं कुठाय? :) चैत्रातल्या हळदीकुंकवात पन्हं न देता नुसती आंब्याची डाळ देऊनच कटवणार आहेस की काय? :) आपला, (चाळीतल्या चैत्रातल्या हळदीकुंकवात बायामाणसात नसती लुडबूड करणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पन्ह येत आहे... स्वाती

वा वा काय आठवण दिलीत हो स्वातीताई! आईला हळदीकुंकवाला लागेल त्याच्या दुप्पट डाळ भिजवायला लागे कारण आमची मदत म्हणजे कैरीची डाळ आणि पन्हे ह्याचेच जेवण करणे अशी असे!;) पन्हे संपेपर्यंत पाणी प्यायचेच नाही असा जणू अलिखित नियमच असे. ते वेलदोडे घातलेलं, सोनेरी रंगाच्या पन्ह्याचं, मंद सुवासानं घमघमणारं मोठं पातेलं तसंच अजून डोळ्यांसमोर आहे;) चतुरंग

कैरीची डाळ, पन्हे.... प्राजक्ता, थांब २-३ दिवस थांब जरा.... मग आहेच.. स्वाती, ...रेसिपी छान - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/